दुःखमुक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही- भारत पाटणकर
‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ परिसंवाद
पुणे : “माणसासाठी सर्वात मोठा दहशतवाद म्हणजे शोषण मुक्त समाजाचे स्वप्न बघण्याचे स्वातंत्र्य नाही. दुःख मुक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही. याचा संबंध ‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ शी आहे. असे मत शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते भारत पाटणकर यांनी ‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ या परिसंवादात व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या परिसंवादात लेखिका अपर्णा लांजेवार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पत्रकार संजय आवटे, बालाजी सुतार, युवराज मोहिते सहभागी झाले होते तर पाटणकर अध्यक्षस्थानी होते.
पाटणकर म्हणाले, “लिहिण्या आधी लोक बोलून व्यक्त होत तेंव्हाही दडपशाही होतीच. सांस्कृतिक दहशतवाद हा फार जुना आहे. जातीयता संपविण्याचे स्वातंत्र्य मला आहे पण त्याविषयी मी बोलतो तेंव्हा हल्ला होतो. सत्ते विरुद्ध लिहिता येत नाही. पण या प्रश्न घराघरातील आहे. ही दडपशाही वाढवण्यास आपणही कारणीभूत आहोत, कारण ते मोडून काढण्याऐवजी तडजोड करतो. यातूनच भयमुक्त समाजाचा प्रश्न निर्माण होतो. खरं बोलतात की, तुमचे खरे नाही अशा नुसत्या धमक्या नाही तर प्रत्यक्षात आणतात.”
खोरे म्हणाले, “माध्यमांच्या जगात प्रस्थापित वर्ग तळातील वर्गाची फार मोठ्याप्रमाणात कोंडी करतो आणि दाबतो. माध्यमे आजही प्रस्थापितानाच व्यासपीठ देतात. त्यामुळे ज्यांना चेहरा नाही पण खऱ्या अर्थाने समाजासाठी काहीतरी करतात त्यांच्यावर अन्याय होतो. समाजाला दिशा दाखविण्याचे काम प्रमुख माध्यमांनी करायला हवे. पण तसे होताना दिसत नाही. अल्पसंख्याक च्या पातळीवर जे जे घटक आहेत त्यांना बरोबर घेऊनच बहुसंख्याकांनी वागायला हवे.”
सुतार म्हणाले, “ज्यांनी बोलायला हवे ते बोलत नाही, की बोलू दिले जात नाही. आणि ज्यांनी नको ते बोलत असतात. अनेकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न, गलचेपीचे प्रश्न समोर येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अजून सत्ताधाऱ्यांना समजलेला नाही आणि सामान्यांपर्यंत झिरपलेला नाही. जिथे तुमच्या नैसर्गिक अभिव्यक्ती वर पावलोपावली बंधने घातली जातात तिथे साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील लोकानंही हे जाणवत नाही याची खंत वाटते.”
लेखक कालावंतांसाठी सगळ्यात चांगला कल असल्याचे सांगत आवटे म्हणाले, “जेंव्हा अभिव्यक्तीची पायमल्ली होते तेंव्हाच चांगला लेखक घडतो. तेथे अभिव्यक्ती अधिक ठळकपणे, ठोसपणे उभी राहते.” “भारत-पाक ऐतिहासिक, भौगोलिक दृष्ट्या समान असला तरी पाक पाक आहे आणि भारत भारत आहे कारण विचारप्रणाली वेगळी आहे. पाकिस्तान अल्ला, आर्मी आणि लष्कर एवढ्यातच अडकलेला आहे. त्याला उत्तर देतानाही भारताने आपण भारत आहोत हे ध्यानात ठेवून उत्तर द्यायचे असते.” असेही ते म्हणाले.
लांजेवार म्हणाल्या, “लेखकाने भयमुक्त अवस्थेत लिहावे. विसंगती दिसल्याशिवाय लेखक लेखकच होत नाही. लेखक व्यवस्था नाही म्हणूनच ते व्यवस्थेविरुद्ध लिहितात. आणि अशी भूमिका घेऊन लिहिणारेच खरे लेखक असतात, बाकी केवळ मनोरंजन करतात.”
मोहिते म्हणाले, “सांस्कृतिक दडपशाहीचे प्रकरण फार जुने आहे. माध्यमांचा प्रभावी वापर सर्वप्रथम बुद्धांनी केलं. पण त्या भिक्कूना या दडपशाहीला सामोरे जावे लागले. पण तरीही कोणी थांबले नाही. लेखन स्वातंत्र्य हवे असेल तर त्याविषयी ठामपणे बोलायला हवे.”