मुंबई-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, आज राज्यात कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगली आहे, काही जणांकडून ती बिघडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, अशी प्रतिक्रिया देत राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव असून राणा दाम्पत्य केवळ प्यादे असल्याचा घणघणाती आरोप केला आहे. राणांनी हनुमान चालिसा आपल्या घरी वाचावी मुंबईत येऊन वाचण्याचे कारण काय ? असा सवाल देखील त्यांनी केला ते पुढे म्हणाले की, राणा दाम्पत्य हे पुढे केलेलं प्यादं आहे. त्यांची नौटंकी सुरू आहे. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. शिवसेनेचे हिंदुत्व महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मवाळ झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे, या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले की, हा त्या दोन पक्षाचा प्रश्न आहे. मी त्यावर बोलणार नाही.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, काही लोकांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र रंगवून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. परंतु तसं काहीही नाही. हनुमान चालिसा लोकांनी आपापल्या घरी वाचावी. मुख्यमंत्री आणि मी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. पोलिस परिस्थितीनुसार कारवाई करत आहेत. कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, पोलिसांच्या नोटिशीनंतरही राणा दाम्पत्य ठाम असेल तर कारवाई होणारच. राणा दाम्पत्यावर कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांशी याबाबत फोनवरून चर्चा झाल्याची माहितीही वळसे पाटलांनी यावेळी दिली. पोलिस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मुंबई शांतत राखण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत. वातावरण बिघडू नये यासाठी मी हेच आवाहन करेन की, सर्वांनी शांतता राखावी.
विरोधकांकडून राष्ट्रपती राजवटीसाठी प्रयत्न सुरू- वळसे पाटील
एखाद्या घटनेमुळे लगेच अख्ख्या मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडली अशा निष्कर्षाला येणं योग्य नाही. त्यांनीही तिथे अशा प्रकारे उतरून भूमिका घेणं चुकीचं आहे. या घटनांवर मी किंवा मुख्यमंत्री कोणतीही सूचना देत नाहीत, दिलेली नाही, यावर मुंबईचे पोलिस आयुक्त निर्णय घेत असतात, त्यानुसार कारवाई सुरू आहे. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, त्रिपुरातील घटनेवरून हिंसाचार, आता भोंग्याचा मुद्दा, हनुमान चालिसाचा मुद्दा असे अनेक मुद्दे करून विरोधी पक्षाच्या वतीने राज्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हा मुद्दा करून विरोधक राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यासाठी वातावरण तयार करत आहेत, असा आरोपही वळसे पाटलांनी केला.