मुंबई-प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेत शेपूट घालून राणा दाम्पत्यांनी पळ काढला. त्यांना भाजपचे पाठबळ आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी भाजप राणा दाम्पत्यरुपी शिखंडीना पुढे करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत खासदार नवनीत राणा आणि आमदार नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली. ते करीत असलेल्या आंदोलनावरही त्यांनी प्रखर शब्दात टीका करून इशाराही दिला.राऊत म्हणाले, राणा दाम्पत्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचे निमित्त काढून पळ काढला. पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. जे गालबोट लावतील त्यांचाच आम्ही समाचार घेणार आहोत असे स्पष्ट केले. गालबोट लागेल म्हणून आम्ही माघार घेत आहोत हा बंटी आणि बबलीचा दावा फोल आहे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, २० फूट खाली गाडले जाल…
शिवसेनेचे नैतृत्व घंटाधारी नाही, आमचे नैतृत्व गदाधारी आहे. गरज पडली तेव्हा अयोध्येत हातोडे देखील घेतलेले आहेत. हिंदुत्व आम्हाला शिकवण्याचा कोणी अतिशहाणपणा करू नये. जे दीड शहाणे आहेत, त्यांना आम्ही आजही सांगतो कृपा करून शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. मातोश्रीशी छेडछाड करू नका, २० फूट खाली गाडले जाल. हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका.” असा इशारा देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला.
“आज जी तुमच्या विषाला उकळी फुटलेली आहे, हिंदुत्वाच्या नावाने विष आहे हे खरे हिंदुत्व नाही. या तुमच्या विषाला उकळी फुटली असेल, तर ती तिथल्या तिथे दाबण्याची ताकद आजही शिवसेनेमध्ये आहे. आम्हाला वारंवार धमक्या देऊ नका, मी देखील नागपुरातच आहे. मी नागपुरातच आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला नागपुरातच राहायला सांगितलेलं आहे.” असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या नादी लागू नका आम्ही पुरुन उरू असा सज्जड दम देत राऊत यांनी भाजपवर प्रहार केला. तुमच्या हिंदुत्वाला उकळ्या फुटत असतील तर त्या दाबण्याची हिंमत आमच्यात आहेत असेही ते म्हणाले.राज्यात राष्ट्पती राजवट लावण्याचा कट आखला जात आहे पण आम्हाला कायदा आणि घटना कळते. घटनात्मक तरतूदी शिवसेनेला शिकवू नका. राज्यात राष्ट्रपती राजवट कधी लागते हे आम्हाला माहित आहे असेही संजय राऊत म्हणाले.
बोगस जात प्रमाणपत्र असलेल्यांनी आम्हाला शिकवू नये
महाभारत घडविण्याची ताकद आमच्यात आहे. बोगस जात प्रमाणपत्र असलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. भारतीय जनता पक्षाचे नैतृत्वाने शिवसेनेला आव्हान देण्याचे प्रयत्न करू नये. आव्हानाच्या छाताडावर आम्ही उभे राहून पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रात ताठ मानेने उभे आहोत असेही त्यांनी भाजपला ठणकावले.
स्मशानात गौऱ्या जातील लक्षात ठेवा
काल मातोश्रीची रेकी करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न शिवसेनेने हाणून पाडला. आम्ही जागेवरच अशांना उत्तर दिले आहे. परत शिवसेनेच्या अंगावर याल तर स्मशानात गौऱ्या जातील असा दमही राऊत यांनी शिवसेनेच्या वाटेला जाणाऱ्यांना भरला.
महाराष्ट्राच्या शत्रूमागे फडणवीस
कायदा सुव्यस्था जर शिवसेनेने हाती घेतला तर पोलिस कारवाई करतील. आमच्या दैवतांवर जर तूम्ही चाल करून जात असतील तर आम्ही ढाल म्हणून उभे राहू. राणा दाम्पत्य महाराष्ट्राचे शत्रू आहे आणि त्यांच्यांमागे राज्याचे विरोधी पक्ष फडणवीस उभे राहतात तु्म्ही हनुमान भक्त कधी झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.