Home Blog Page 40

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

पुणे (दि ०७): नागरिक लोकप्रतिनिधींना केवळ रस्ते, ड्रेनेजसारखी कामे करण्यासाठी निवडून देत नाहीत. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना आळा घालणे ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. अमली पदार्थांमुळे तरुणाईत वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात व्यापक जनचळवळ उभारण्याचे काम येत्या काळामध्ये करत, पोलीस आणि नागरिक यांच्यातील सेतू म्हणून आम्ही कार्य करू, अशी ग्वाही सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबवण्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक २४ मधून करण्यात आली, यावेळी बिडकर बोलत होते. यावेळी नगरसेवक देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्वला यादव, निलेश आल्हाट, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, फरासखानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे शहरामध्ये ड्रग्स तस्करी आणि सेवनाचे प्रकार वाढण्याच्या घटना पुढे आल्या आहेत. पोलिसांकडून अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम केले जाते. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून देखील सहकार्य मिळाल्यास अमली पदार्थाच्या तस्करीला रोखण्यात मदत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम शहरांमध्ये हाती घेण्यात आली आहे.

यावेळी गणेश बिडकर म्हणाले, “अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. वाढत्या ड्रग्सच्या वापराला आळा घालणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची आहे. ज्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळेल, तेथे कारवाईसाठी पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करू, कमी किमतीत अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. या उपक्रमामुळे शहरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती वाढण्यास मदत होईल.

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी ०१,४७,५५०/- रुपयांचे हुक्का साहित्य व विदेशी दारु केली जप्त केली ‘
पोलिसांनी सांगितले कि,’ दि. ०५/०४/२०२६ रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने परिमंडळ ०७ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांना अॅटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेल, विमाननगर, पुणे हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या हुक्का पार्लर चालु असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदरबाबत वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे सदर हॉटेलवर छापा कारवाई केली असता १) स्वप्निल शांताराम तांबे, वय ३२ वर्ष, रा. स्वस्तिक कोलो, उद्रे हॉस्पिटल जवळ, केसनंद फाटा, वाघोली, पुणे, २) अमेय मुकेश अजमीरे, वय २८ वर्ष, रा. पाम अटलांटिस, बावडी रोड, वाघोली, पुणे ३) नवरंग विठ्ठलराव कोल्हे, वय २८ वर्ष, रा.अटलांटिस रुफ टॉप लाउंज, रॉयल टॉवर, विमाननगर, पुणे, ४) अमितकुमार दयालजी गोयल, वय २६ वर्ष, रा. फॉरेस्ट एज, खराडी, पुणे, ५) कमरूल इस्लाम लष्कर, वय २६ वर्ष, रा. साईनाथ नगर, लेन नंबर १, खराडी, पुणे, ६) शिवमकुमार श्रीरामराज यादव, वय २३ वर्ष, रा. सदर, ७) माहरुफ अफताफउद्दीन आलम, वय १८ वर्ष, रा. सदर हे बेकायदेशीर रित्या खाद्यगृहामध्ये हुक्का बार चालवून, विनापरवाना दारूचा साठा करुन विक्री करत असताना मिळून आले. सदर आरोपीतांच्या ताब्यातुन हुक्का पॉट, विदेशी दारुच्या बाटल्या व इतर साहित्य, तसेच रोख रक्कम असा एकुण ०१,४७,५५०/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु र नं. २००/२०२६ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४(अ), २१ (अ) सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ श्री पंडीत रेजितवाड यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक नितीन नाईक पोलीस अंमलदार शेख, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, कळसकर, बारटेवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार माकडी यांनी केली आहे.

भागवत धर्माला अभिप्रेत असणाऱ्या भक्तीतत्त्वाचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचे जीवन

व्याख्याते अभय टिळक यांचे मत : पुणे प्रार्थना समाज चैत्रोत्सवात व्याख्यान

पुणे : प्रार्थना समाज आणि भगवद्गीता यांचा संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. लोककल्याण आणि लोकशिक्षण या दोहोंची जडणघडण तत्कालीन समाजव्यवस्थेत व्हावी यासाठी संस्थात्मक बांधणी व्हावी, ही ठाम भूमिका न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या हयातीत घेतली. भागवत धर्माला अभिप्रेत असणाऱ्या भक्तीतत्त्वाचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचे जीवन आहे. आपले जीवन नीतिमान आणि शुद्ध बनवायचे असेल, तर आपली विचारप्रक्रिया शुद्ध पाहिजे. नामचिंतन हे मन शुद्ध करण्याचे साधन आहे. ज्याचे मन शुद्ध झाले आहे, त्याने समाजाला उन्नत बनवण्यासाठी कार्यरत झाले पाहिजे, असे मत व्याख्याते अभय टिळक यांनी व्यक्त केले.

पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशाला यंदा ११७ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्रोत्सवात व्याख्याते आणि अर्थविश्लेषक अभय टिळक यांचे व्याख्यान झाले. यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे सभासद उपस्थित होते.

अभय टिळक म्हणाले, धर्माचा हेतू काय, धर्माचे नेमके उद्दिष्ट काय? तर सुखप्राप्ती हा धर्माचा हेतू आहे. परंतु भागवत धर्म असे सांगतो की, सुखप्राप्तीवर लक्ष केंद्रित केल्यास धर्माचे रहस्य कोणालाही कळणार नाही. उत्तम नागरिक बनणे हा धर्माचा खरा हेतू आहे. विकास अधिक होणे आणि क्षमता वाढणे हाच नागरिकतेचा मुख्य उद्देश आहे. जीवन सुसंस्कृत आणि संतुलित करण्यासाठी नीती आणि नैतिकता या दोन घटकांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सत्यनिष्ठा, न्यायनिष्ठा आणि सर्वांच्या हिताचा विचार ही मूल्ये अंगीकारल्यास समाज अधिक सक्षम होईल.

ते पुढे म्हणाले, धर्म केवळ बाह्य शुद्धतेपुरता मर्यादित राहिला असून, त्यामागील नैतिक मूल्ये हरवली आहेत. पूर्वी धर्मात अशा बंधनांचा अतिरेक नव्हता, मात्र आज ते औपचारिकतेत रूपांतरित झाले आहेत.
ही स्थिती बदलण्यासाठी समाजाची पुनर्रचना, परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल, तसेच व्यक्ती आणि समाजाच्या एकत्रित विकासाची गरज आहे.

‘अमरलता’ मैफलीतून उलगडली लता मंगेशकर यांच्या गायकीची वैशिष्ट्ये

साधना कला मंच आयोजित मैफीलीत प्रा. डॉ. मृदुला दाढे यांचे सादरीकरण

पुणे : ‘मालवून टाक दीप’, ‘डौल मोराच्या मानचा रं’, ‘आएगा आनेवाला’, ‘लग जा गले’ अशी लता मंगेशकर यांनी गाऊन अजरामर केलेली एकाहून एक सरस गीते ऐकवत प्रसिद्ध संगीत अभ्यासक, प्रख्यात लेखिका आणि गायिका प्रा. डॉ. मृदुला दाढे व सहकलाकरांनी ‘अमरलता’ मैफलीत रंग भरले. निमित्त होते साधना कला मंच आयोजित संगीत मैफलीचे. कोथरूडमधील हॅप्पी कॉलनी फेडरेशन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लतादिदींची गायकी उलगडून दाखवत त्यांच्या गायकीतील बारकावे रसिकांसमोर मांडण्यात आले.

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या केवळ गायिका नव्हे तर अभ्यासक होत्या असे सांगून डॉ. दाढे म्हणाल्या, लतादिदी गाण्यातला भाव, शब्द, भाषा, सूर या सगळ्याचे सखोल चिंतन करत असत. त्यामुळेच लता मंगेशकर हे एक असे पर्व आहे ज्यात अनेक संगीतकारांनी वेगळ्या धाटणीचे संगीत देण्याचे प्रयोग केले. लतादिदी हा अथांग विषय असून त्या एकट्याच गायिकीचे एक घराणे आहेत.

लताबाईंनी स्त्रियांच्या मानसशास्त्राचाही अतिशय नेमका अभ्यास केलेला होता. त्यांच्या आवाजातील पोत त्या अतिशय नेमकेपणाने वापरत. कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, शब्दांमध्ये भाव कशापद्धतीने वापरायचे, अभिनय या सगळ्यांवर लताबाईंचे प्रभुत्व होते, असेही डॉ. दाढे म्हणाल्या.

‘मोगरा फुलला’ या सुमधुर गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करत डॉ. दाढे यांनी लतादिदींच्या आवाजातील कंगोरे समजावून सांगताना ‘एहसान तेरा होगा मुझपर’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘पिया तोसे नैना लागे’, ‘रिमझिम गिरे सावन’ अशी अनेक सुमधुर गीते प्रभावीपणे सादर केली. निलेश निरगुडकर (सहगायन), प्रवीण फाटक (की-बोर्ड), अमित कुंटे (तबला), व्यंकटेश कुलकर्णी (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत करत मैफलीत रंग भरले.  

प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा वसुधा कर्दळे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. तर कोषाध्यक्ष प्रदिप बालगावकर यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

रसिकांनी घेतला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अवीट गोडीच्या गीतांचा आस्वाद

पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गायकी अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या मैफलीत रसिकांनी अवीट गोडीच्या गीतांचा आनंद घेतला.

सुरेल प्रस्तुत ‘डिव्हाईन लता’ या मैफलीचे आयोजन पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. प्रसिद्ध पार्श्वगायिका डॉ. देविका दामले आणि डॉ. मोहिका दामले यांनी लतादीदींची एकाहून एक लोकप्रिय गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले होते तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले होते. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना, संहिता आणि निवेदन डॉ. गौरी दामले यांचे होते. ल म्हणजे लय आणि ता म्हणजे ताल अशी ज्यांची फोड होते त्या म्हणजे लतादीदी असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

पेशाने डॉक्टर असलेल्या या भगिनींनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. ‘सत्यम, शिवम सुंदरम’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करत ‘आएगा आनेवाला’, ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’, ‘हवा मे उडता जाए’, ‘चंदन सा बदन’, ‘जीवनात ही घडी’, ‘अपलम-चपलम’, ‘लटपट-लटपट तुझं चालणं’, ‘इक प्यार का नगमा है’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या’, ‘लग जा गले’ अशी एकाहून एक सरस आणि लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ या शिवस्तोत्राने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. विविध गीतकारांनी लिहिलेल्या आणि तितक्याच ताकदीच्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या या हिंदी-मराठी रचना सादर करणाऱ्या या भगिनींना उपस्थितांनी वन्स मोअर देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. 

प्रसिद्ध गायक राजेश दातार, अनिल घाटगे, प्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, प्रदिप देसाई, डॉ. सतीश देसाई, धनंजय दैठणकर, आनंद सराफ, दिलीप कुंभोजकर, अभय नाझरे, विवेक जडे, सतीश दवे आदी मान्यवर उपस्थित होते.

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू

मुंबई, दि. ७ : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झाले होते.

जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे  केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे.

एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १,९४,३२९ शेतकऱ्यांच्या १,२२,९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.

‘पीएमआरडीए’ घरकुलांची बुधवारी सोडत!

  • १,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र
  • आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार प्रक्रिया; ‘म्हाडा’च्या प्रणालीद्वारे पारदर्शकता

पुणे/पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पातील शिल्लक १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवारी (८ एप्रिल २०२६) सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत ५,३१७ पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार असून, ‘पीएमआरडीए’ने याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

या गृहयोजनेसाठी एकूण ५,३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ५,३१७ अर्जदार आता या सोडत प्रक्रियेत नशीब आजमावतील.

ही सोडत प्रक्रिया ‘म्हाडा’ने विकसित केलेल्या ‘IHLMS २.०’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता यांनी स्पष्ट केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘पीएमआरडीए’च्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे.

सदनिका आणि पात्र अर्जदारांची स्थिती :

  • पेठ क्र. १२ (EWS): ८१ सदनिकांसाठी २,१८२ अर्जदार
  • पेठ क्र. १२ (LIG): ३९३ सदनिकांसाठी १,९७५ अर्जदार
  • पेठ क्र. ३०-३२ (EWS): ३२७ सदनिकांसाठी ४५६ अर्जदार
– पेठ क्र. ३०-३२ (LIG): २२८ सदनिकांसाठी ७०४ अर्जदार

थेट प्रक्षेपणाची सुविधा :
सोडत प्रक्रियेवेळी इच्छुक अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. या प्रक्रियेची ‘यूट्यूब लिंक’ (YouTube Link) सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आली.

हिंजवडीतील यशवीन सोसायटीचा वीजपुरवठा पूर्ववत

क्राँकीटच्या खाली खोलवर होता बिघाड

पुणे, दि. ७ एप्रिल, २०२६- मेट्रोच्या कामादरम्यान उच्चदाबाची वाहिनी नादुरुस्त झाल्याने हिंजवडी भागातील ‘यशवीन’ या हाऊसिंग सोसायटीचा सोमवारी (दि.६) दुपारी १२.४८ वाजता बंद झाला होता. तब्बल २२ तासांच्या अविश्रांत मेहनतीनंतर मंगळवारी (दि.७) सकाळी १०.५० वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे.

 हिंजवडी औद्योगिक वसाहत फेज-३ कडे जाताना डॉहलर कंपनीजवळ मेट्रोस्टेशनचे काम सुरु आहे. कामे करताना मेट्रोकडून महावितरणच्या केबलवर काँक्रीटचे थरावर थर पडल्याने वीज वाहिन्या काँक्रीटमध्ये खोलवर गेल्या आहेत. सोमवारी दुपारी १२.४८ वाजता यशवीन सोसायटीला वीजपुरवठा करणारी २२ केव्ही उच्चदाब वाहिनी नादुरुस्त झाली. या वाहिनीद्वारे यशवीन सोसायटीमधील ३ रोहित्रांना वीजपुरवठा केला जातो. वाहिनी/केबल नादुरुस्त झाल्याने या रोहित्रांवरील ५७२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

 वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम हाती घेतली. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत काम करुन एक फॉल्ट दुरुस्त देखील केला. परंतू, चाचणी दरम्यान दुसरा फॉल्ट आढळून आला. तो काँक्रीट खाली होता. तो काढण्यासाठी रात्रभर खोदकाम केले. मात्र केबल दिसून आली नाही. मंगळवारी सकाळी ७ वाजता केबल सापडली. पण त्यासाठी आणखी काँक्रीट फोडावे लागत आहे. मूळ बिघाड काढण्याचे काम मंगळवारी दुपारीही सुरुच होते. तत्पूर्वी ३० मीटर उच्चदाब केबल टाकून महावितरणने पर्यायी मार्गाने यशवीन सोसायटीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे.  

महावितरणचा आयपीओ येणार ; कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषी ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषी ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) असे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यास मान्यता
बिगर कृषी वितरण क्षेत्रातील महावितरण या कंपनीला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण कंपनीने विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी आहे. या कर्ज दायित्वापोटी महाराष्ट्र शासन पंधरा वर्षे मुदतीचे दीर्घकालिन सरकारी रोखे जारी करणार आहे. यामुळे महावितरणवरील कर्जाचा बोजा कमी होऊन आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्यास मदत होणार आहे.

आर्थिक स्थिती भक्कम करणे आणि
वितरण व्यवस्थेत शाश्वतता निर्माण करण्यासाठी पुनर्रचना
राज्यातील ग्राहकांना ऊर्जा सुरक्षा आणि गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणची आर्थिक स्थिती भक्कम करणे आणि वितरण व्यवस्थेत शाश्वतता निर्माण करण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात येणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठीय संधीचा लाभ घेण्यासाठी अशा दोन कंपन्यांची निर्मिती केली जाईल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या शिफारशी तसेच मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० च्या धोरणात्मक उद्दिष्टानुसार एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड ही कंपनी ३१ मे २०२३ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतीसाठीच्या वीज पुरवठ्याचे नियोजन आणि सौर ऊर्जेवर आधारित कृषि ऊर्जा प्रणाली विकसित करण्यासाठी संस्थात्मक आधारभूत रचना निर्माण होणार आहे.

राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांकडून
महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचनेनंतर राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्याकडून केले जाईल. यात कृषी वितरण संस्था म्हणजेच एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड- एमसएएपीएल कंपनी केवळ कृषी ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देईल. तर अकृषिक वितरण संस्था म्हणजेच महावितरण औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती आणि इतर बिगर कृषी ग्राहकांना सेवा पुरवेल. या दोन्ही कंपन्यांचा वीज विक्री, महसूल व खर्चाचा तपशील यांचा लेखा-जोखा स्वतंत्रपणे मांडला जाईल. विभाजनानंतर सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत महावितरण आयपीओ आणला जाईल. त्यासाठी सेबीकडे आवश्यक त्या मंजुरी व वित्तीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. महावितरणचा आयपीओ – नवीन समभाग (फ्रेश इश्यू) आणि शासनाकडील समभाग विक्री (ऑफर फॉर सेल) याद्वारे आणला जाईल. यामुळे महावितरणाला विस्तारासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. यातून स्मार्ट मिटरिंग व डीजिटल वितरण प्रणाली, ऊर्जा संक्रमणाशी संबंधित गुंतवणूक, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण हे करता येणार आहे.
नवीन स्थापन होणाऱ्या कृषी वितरण कंपनी एमएसएपीएलला सुरूवातीचे भांडवल म्हणून अडीच हजार कोटी रुपयांचे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

कृषि तसेच औद्योगिक, घरगुती ग्राहकांना स्थिर व अखंडित वीज
या दोन्ही कंपन्यांच्या स्थापनेमुळे कृषी तसेच औद्योगिक, घरगुती ग्राहकांना स्थिर व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देता येणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना दिवसा व अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक सौर ऊर्जिकरणाला चालना मिळणार आहे. औद्योगिक ग्राहकांना स्थिर व अखंडित वीजपुरवठा, दरवाढीवरील ताण कमी होणार, हरित ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच घरगुती ग्राहकांसाठी वीज दरांमध्ये अधिक स्थिरता येईल, सेवा गुणवत्तेमध्ये सुधारणा, डीजिटल बिलिंग व ग्राहक सेवा अधिक सक्षम होणार आहे.
00000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. ७ : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून, त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त संविधानाविषयी जनजागृती, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, ग्रामीण शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे प्रबोधन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांनी केले आहे.

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे, दि. ७: भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे संकलन अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्रगणकांद्वारे ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’विकसित करण्यात आले आहे. यामुळे कागदी काम गतीने होण्यासोबतच वेळ व श्रमाची बचत होणार आहे, जनगणनेच्या कामाकरिता प्रगणकांनी या अॅप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

मोबाईल अॅप केवळ गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल अॅप स्टोअर वरूनच डाउनलोड करावे. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅपचे अपडेट वेळोवेळी तपासावेत आणि अॅप अद्ययावत असल्याची खात्री करुन घ्यावी. मोबाईल अॅपमध्ये लॉगिन व त्याचा वापर केवळ एकाच नोंदणीकृत मोबाइल उपकरणावर करावे. उपकरणाची नोंदणी फक्त एकाच युजर आयडी लॉगिनसाठी करावी. आपले मोबाईल उपकरण, प्राधिकृत (चार्ज) अधिकारी यांनी जनगणना व्यवस्थापन व देखरेख प्रणाली (सीएमएमएस) वर घरयादी गटाच्या (एचएलबी) वाटपानंतरच नोंदणीकृत करावा. लॉगिनसाठी आवश्यक क्रेडेन्शियल्सचा तपशील चार्ज अधिकारी एसएमएस, ई-मेलद्वारे पुरविण्यात येणार आहे.

सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइल अॅपचा डीफॉल्ट पासवर्ड बदलावा. मोबाइल अॅप स्क्रीनवर दर्शविलेले स्थानासंबंधी तपशील नियुक्तीपत्रातील दर्शविलेल्या तपशिलानुसार असल्याची खात्री करावी आणि खात्री केल्यानंतरच आपणास दिलेल्या घरयादी गटाच्या क्षेत्रीय कार्याला सूरुवात करावी. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत, स्थानाच्या तपशीलामध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास, उपकरण नोंदणीस अडथळा निर्माण झाल्यास त्वरित चार्ज अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक ५-६ घर, कुटुंबाची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, ही माहिती केंद्रीय सर्व्हरवर अपलोड/सिंक करावी जेणेकरून माहिती गमावण्याची शक्यता टाळता येईल. ‘सिंक’ बटणावर क्लिक केल्यानंतर घरयादी गट पूर्ण झाल्याची पुष्टी करण्यासाठी चेक बॉक्सवर (✔) टिक करणे लक्षात ठेवावे. त्यानंतर रिक्त भागात तुमची स्वाक्षरी करून शेवटी ‘जतन करा’ या बटनावर क्लिक करावे. क्षेत्रीय कार्यादरम्यान आपले मोबाइल उपकरण सुरक्षित ठेवावे, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व लहान मुलांपासून दूर ठेवावा.

भारतीय जनगणना -२०२७ च्या कामाकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना आपल्याशी निगडित वस्तुनिष्ठ माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास जलद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. ‍आशिष शेलार, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७ शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली संलग्नता मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सुमारे ६,६०७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-३ शी जोडली जाणार असून, मीरा भाईंदर ते कुलाबा दरम्यान सीमलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मेट्रो सेवेत कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले असून, सध्या ८० टक्के तिकीट व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. स्मार्ट कार्ड आणि ‘वन कार्ड’ प्रणालीमुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळत आहे. हा प्रकल्प सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाईटिंग आणि रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे हरित प्रकल्प ठरत आहे. तसेच नागपूरप्रमाणेच मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर उभारण्याची डबल डेकर रचना येथेही वापरण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईत १०० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून, देशात दिल्ली नंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत आणखी प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईतील मेट्रो जाळे अधिक विस्तारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीए, संबंधित महानगरपालिका, कंत्राटदार आणि मजूर यांचे योगदानाबद्दल आभार मानून ही मेट्रो सेवा मुंबईकरांना समर्पित केली असल्याची घोषणा केली.

मुंबईएमएमआर कनेक्टिव्हिटीला मोठी चालना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे मुंबई आणि एमएमआर परिसरातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली असून हा दिवस दहिसर व मीरा-भाईंदरमधील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ही मेट्रो दहिसर स्थानकावरून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 शी जोडली गेली असून पुढील काळात मेट्रो 7A, मेट्रो 3 द्वारे कुलाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एकात्मिक मेट्रो जाळे तयार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील मेट्रो नेटवर्क सध्या 101 किलोमीटरपर्यंत पोहोचले असून भविष्यात ते 337 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर मुंबईचे मेट्रो जाळे जगातील अग्रगण्य ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतूक 20 ते 30 टक्क्यांनी कमी होईल, इंधन बचत होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. त्यामुळे कामकाजाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन व पुनर्वसनासारखी आव्हाने पार करत शासनाने गतीने काम केल्याचे सांगून त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले. हा लोकहिताचा प्रकल्प असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मुंबईकरांसाठी ही मेट्रो मोठी दिलासा देणारी ठरणार असून भविष्यात संपूर्ण एमएमआर परिसरातील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो ९ प्रकल्पाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेट्रोने प्रवास केला.

मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर)

* लांबी: १०.५ कि.मी. (उन्नत)

एकूण स्थानके:८

* स्थानाकांची नावे: दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागांव, काशिगांव, साई बाबा नगर, मंदितियानगर, शहीद भगत सिंग उद्यान आणि नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यान

फेज १ (दहिसर ते काशीगांव):

  • लांबी: ४.७ कि.मी.
  • स्थानके: ४
  • स्थानाकांची नावे: दहिसर (पूर्व ), पांडुरंगवाडी, मिरागांव, काशीगांव

कनेक्टिव्हिटी:

  • रेड लाईन कनेक्शन: मेट्रो मार्ग-९ हा मेट्रो मार्ग-७ (दहिसर पूर्व–अंधेरी पूर्व) आणि मार्ग-७अ (अंधेरी पूर्व–छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) यांच्या माध्यमातून ‘रेड लाईन’शी जोडला जातो; यामुळे मीरा-भाईंदर आणि विमानतळ एकमेकांशी जोडले जातात.
  • पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) लिंक आणि इंटरचेंज: लाइन-९ ही पश्चिम द्रुतगती महामार्गच्या बाजूने मेट्रो मार्ग-७ ला जोडली जाते; यामध्ये दहिसर (पूर्व ) येथे इंटरचेंज असून, हे मेट्रो मार्गावरील एक प्रमुख केंद्र आहे.
  • टप्पा -१ मार्ग: काशिगांव पर्यंत विस्तारल्यामुळे प्रवाशांना पश्चिम द्रुतगती महामार्गवर अंधेरी (पू) पर्यंत थेट आणि सोपा मार्ग उपलब्ध होईल.
  • या एकत्रित नेटवर्कमुळे प्रवाशांना विविध मोड्समध्ये बदल न करता सहज प्रवास करता येईल.
  • या योजनेचा एक प्रमुख फायदा म्हणजे, दहिसर टोल प्लाझा येथील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. अधिक थेट आणि कार्यक्षम मेट्रो जोडणीमुळे, रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊ शकते; परिणामी, गर्दीच्या वेळी (peak hours) वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होईल.
  • वाहतुकीतील या सुधारणेमुळे, मीरा-भाईंदरमधील प्रवाशांना प्रवासाचा अधिक सुखद अनुभव मिळू शकेल.काशिगांव ते इतर महत्वाच्या ठिकाणी थेट मेट्रो कनेक्शनमुळे प्रवास वेळ कमी होईल, विद्यार्थ्यांसाठी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.
  • टप्पा -१, मेट्रो लाईन-९ रोजच्या प्रवाशांच्या २०–३०% प्रवासाला रोडवरून मेट्रोकडे वळवेल.
  • गर्दीच्या वेळी (peak hours), यामुळे वाहतूक कोंडी १०–१५ टक्क्यांनी कमी होऊ शकते; परिणामी, वाहनांची हालचाल अधिक वेगवान होईल आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना कमी होतील.
  • ही मेट्रो मार्गिका बस, ऑटोरिक्षा आणि इतर मेट्रो मार्गांशी अखंडपणे जोडलेली असेल; परिणामी, प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून न राहता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.
  • हा पहिला टप्पा संपूर्ण ‘MBVV(मीरा-भायंदर-वसई-विरार)’ मेट्रो कॉरिडॉरचा मार्ग प्रशस्त करतो, ज्यामुळे मीरा-भाईंदर आणि त्याच्या लगतच्या परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.

प्रवाशांसाठी सुविधा:

  • लिफ्ट्स, सरकते जिने (एस्केलेटर्स), सीसीटीव्ही पाळत, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा, आधुनिक फलक आणि प्रकाशमान स्थानक परिसर—या बाबी सुरक्षा व सुलभता वृद्धिंगत करतात.

हरित गतिशीलता आणि उत्सर्जन घट

रस्त्यावरून रेल्वेकडे बदल: मेट्रो लाईन-९ उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक पुरवते, ज्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये खाजगी वाहनांचा वापर, वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमधून होणारे उत्सर्जन यामध्ये लक्षणीय घट होते.

कमी कार्बन फूटप्रिंट: रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत, इलेक्ट्रिक मेट्रोच्या संचालनामुळे प्रति प्रवासी-किमी CO₂ आणि सूक्ष्म कणांच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होते.

ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली:

  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंग: रेल्वे गाड्या रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीने सुसज्ज आहेत, ज्यामुळे ब्रेकिंगमधील ऊर्जा पुनर्प्राप्त करून ट्रॅक्शन पॉवर नेटवर्कमध्ये तिचा पुनर्वापर करणे शक्य होते, परिणामी एकूण ऊर्जेचा वापर कमी होतो.
  • ऊर्जा-कार्यक्षम स्टेशन रचना: स्टेशनची रचना ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना आणि अनुकूलित विद्युत मांडणीसह केली आहे, ज्यामुळे कार्यान्वयनासाठी लागणारी विजेची मागणी कमी होते.
  • केंद्रीकृत SCADA देखरेख: SCADA द्वारे रिअल-टाइम ऊर्जा आणि प्रणालीच्या देखरेखीमुळे कार्यक्षम वीज व्यवस्थापन आणि दोषांचे त्वरित निदान शक्य होते, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय कमी होतो.

प्रवासी-केंद्रित शाश्वत रचना:

  • सार्वत्रिक सुलभता: अडथळामुक्त प्रवेश (लिफ्ट, रॅम्प, स्पर्शक्षम मार्ग) सार्वजनिक वाहतुकीच्या सर्वसमावेशक आणि न्याय्य वापरास प्रोत्साहन देतो.
  • आवाज आणि कंपन नियंत्रण: आधुनिक ट्रॅकची रचना आणि वाहनांची श्रेणी आवाज आणि कंपनाची पातळी कमी करते, ज्यामुळे सभोवतालच्या शहरी पर्यावरणाची गुणवत्ता सुधारते.
  • वर्धित सुरक्षा आणि निगराणी: सीसीटीव्ही आणि पुरेसा प्रकाश असलेली स्थानके सार्वजनिक वाहतुकीचा अधिक अवलंब करण्यास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे शाश्वत गतिशीलतेच्या पर्यायांना समर्थन मिळते.

प्रकल्पाचे फायदे:

* प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि सुलभ प्रवास.

* बहुविध वाहतुकीचे उत्कृष्ट एकीकरण (मल्टी मोडल इंटिग्रेशन).

* कार्बन उत्सर्जनात घट होईल.

* वाहतूक कोंडी कमी होईल.

* प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

पुणे, दि. 7 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.
या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत.
इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. पुणे जिल्ह्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,४८१, रास्ता पेठ, पुणे दूरध्वनी : ०२०-२६१३३६०६ येथे संपर्क साधावा.

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

• उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

मुंबई, दि. ७ : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी, हा शासनाचा मानस असून, गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना ६५.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
0000

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

भाविकांना नित्यदर्शनाकरिता मंदिर ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. ७ एप्रिल : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेवून मंदिर व परिसराचे कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल २०२६ रोजीपासून पुढे ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

सन २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्याप्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता विचारात घेण्यासोबतच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सुरु आहे.

कुंभमेळ्यावेळी श्री. क्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जुन्या सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून पायरी मार्गाचे काम देखील सुरू सुरु आहे. सद्यस्थितीत मुख्य सभामंडप पूर्ण उतरवून नवीन सभामंडप बांधकाम प्रगतीपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामुग्री मंदिर परिसरात असल्याने, चालू कामांचे स्वरुप, भौगोलिक परिस्थिती व भाविकांची संख्या विचारात घेता बांधकाम सुरु असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. मंदिर सभामंडपाचे साधारणतः ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणा-या प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग पुर्णतः बंद आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. माहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यामुळे सद्यस्थितीत विकास कामांना गती देण्यात आलेली आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.