उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली १३ ऑगस्ट,२०२५ रोजी मुंबईत आयोजन
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२५ : महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार, दि. १३ ऑगस्ट, २०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मुंबईतील १३ झोन मधील ९३ पोलीस ठाण्यांच्या दक्षता समिती सदस्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत “रंगस्वर”, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा अॅड. राहुल नार्वेकर हे उपास्थित असतील व कार्यशाळेस मुंबई पोलीस उपायुक्त श्री. विवेक पानसरे, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक श्री. महेश नार्वेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (बॉम्बस्फोट विरोधी पथक) श्री. सचिन गावडे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
सदरची कार्यशाळा फक्त निमंत्रितांसाठीच आयोजित करण्यात आली असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षिततेसंबंधी पोलीस यंत्रणेची तयारी, आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती आणि स्थानिक समित्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले
गोरक्षकांवरील खोट्या केसेस आम्ही खपवून घेणार नाही!
पुणे । प्रतिनिधी गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली.
इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.
तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे.
एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही.
पुणे दि.12:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींनी स्वयंरोजगाराकरीता विविध योजनांअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; याकरिता www.msobcfdc.org/msobefde.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक-बी, सर्वे क्रमांक, 104/105, मनोरुग्णालय कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा. दुरध्वनी क्रमांक 020-29523059, ईमल पत्ता-dmobcpune@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पुणे दि. 12 : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागामार्फत आरोग्य क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्त्राईल देशामध्ये घरगुती सहायक या पदाकरिता काम करण्यास इच्छुक उमदेवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
उमेदवाराचे वय 25 ते 45 वयोगटातील असावे, त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असण्यासोबत त्यांच्याकडे काळजीवाहू-घरगुती सहायक सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र असावे. तसेच मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे किमान 3 वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य असून यापूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा किंवा तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्त्राईल देशामध्ये सध्या काम करीत नसावे किंवा इस्त्राईल देशाचे रहिवासी नसावेत, अशी अट आहे.
याकामी जिल्ह्यातील पुढाकार घेऊन कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी,अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,481, रास्ता पेठ,पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 00000
पुणे, दि.१२ : महाराष्ट्र राज्यातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाचा प्रादूर्भाव अत्यल्प आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार, कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरू असून पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.
लंपी चर्मरोगाने राज्यातील ९ हजार ८२० पशुधन बाधित असून ६ हजार ६१८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर आतापर्यंत ३३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनामार्फत तात्काळ व प्रभावी नियंत्रण उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. राज्यात ९३ टक्के पेक्षा जास्त गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
केंद्र शासनाकडील मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात गोट पॉक्सची विजातीय उत्तरकाशी स्ट्रेन लस दिली जात असून त्याचा परिणाम होऊन रोग प्रादूर्भाव कमी झाले आहेत. लंपी रोग प्रतीबंधक सजातीय लस वापरली गेली तर रोग नियंत्रणाकरीता अधिक परिणामकारक होईल. त्यामुळे या पुढील काळात लंपी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लंपी चर्म रोग प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे तंत्रज्ञान भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अॅग्रीइन्नोवेट इंडिया या कंपनीकडून उपलब्ध करून घेतले असून त्यामुळे पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय संस्थेमध्ये व्यावसायिक तत्वावर लसनिर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्य लंपी चर्म रोगावरील लस उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होवून राज्यातील १०० टक्के गोवर्गीय पशुधनास दरवर्षी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे शक्य होणार आहे.
पशुसंवर्धन विभागाने या रोग प्रादुर्भावाचा साथरोग विषयक अभ्यास करुन रोग प्रतिबंधक लसीकरणाचा समावेश मान्सून पूर्व लसीकरण कार्यक्रमामध्ये केला आहे. या करिता ११९ लक्ष लस मात्रा व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात आला आहे. लंपी चर्म रोगाबाबत पशुपालक तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे.
पुणे, दि. १२: तंत्रज्ञान हे आजच्या न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ असून महा ई-सेवा केंद्रामुळे माहिती मिळविण्याची गती वाढेल, पारदर्शकता टिकून राहील आणि न्याय मिळविण्याचा कालावधी कमी होईल, या केंद्रामुळे नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालय यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन महयांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने ई-कोर्ट इंडिया प्रकल्पाअंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे, बी. वी. वाघ, ए. एल. टिकले, पुणे बार अशोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंझाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅरा लीगल व्हॉलंटियर्स आदी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, महा ई-सेवा केंद्र हे न्यायाला सुलभतेने प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे एक सशक्त माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व घटकांना विशेषतः न्यायालयात प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्या नागरिकांना या केंद्राचा मोठा लाभ होणार आहे, असे त्या म्हणाल्या.
महा ई-सेवा केंद्राचे एकाचवेळी जिल्हा व सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय आणि लघुउद्योग न्यायालय येथे उद्धाटन करण्यात आले असून याठिकाणी न्यायालयीन सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानयुक्त उपलब्ध होणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून नागरिक, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रकरणांची माहिती, ई-फायलिंग, निकालपत्रे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ई-भेटी, ई-कोर्ट मोबाईल अॅपबाबत मार्गदर्शन तसेच इतर संगणकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यावेळी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा संगणक विभागाचे प्रमुख एस. एस. कंठाले यांनी महा-ई सेवा केंद्रामार्फत न्याय सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मुंबई- येथील एका उच्चभ्रू सोसायटीच्या अडेलट्टू कारभारामुळे सप्रसिद्ध अभिनेता आणि कवी सौमित्र यांच्यासह त्यांच्या 23 सभासदांची घरे धोक्यात आल आहेत. सोसायटी कारभाऱ्यांच्या मनमानीमुळे हा प्रकार घडल्याचे समजते. सौमित्र यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह महाराष्ट्रातले तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौमित्र यांच्या या फेसबुक पोस्टच्या तक्रारीची दखल घेतली आहे. त्यांच्या पोस्टला फडणवीस यांनी उत्तर दिले. तसेच ही तक्रार सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील, अशी ग्वाहीही दिली आहे.
सौमित्र यांच्या तक्रारीची पोस्ट जशीच्या तशी…
नमस्कार ! मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे.
मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्त्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.
कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल, PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे. मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत, कायद्याला धरून आवाज उठवतात, अन्यायाविरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे.
मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे. एखादा सभासद जर चौकस असेल, कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते, त्याच्यापासून सगळी महत्त्वाची माहिती लपवली जाते, त्याच्याविरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते, त्याला एकटे पाडले जाते.
ही एका प्रकारची शहरी ॲट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मुंबईसारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.
या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती, मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे.
आरआरसी साउथ वेस्टर्न रेल्वेने ९०० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrchubli.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
विभागवार रिक्त पदांची माहिती:
पदनाम पोस्टची संख्या हुबळी २३७ कॅरिज रिपेअर वर्कशॉप, हुबळी २१७ बेंगळुरू विभाग २३० म्हैसूर विभाग १७७ सेंट्रल वर्कशॉप म्हैसूर ४३ शैक्षणिक पात्रता:
५०% गुणांसह 10वी उत्तीर्ण. संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा:
जास्तीत जास्त २४ वर्षे एससी, एसटीसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट ओबीसींना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट अपंग व्यक्तींसाठी कमाल वयात १० वर्षे सूट शुल्क:
अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग : मोफत इतर: १०० रुपये शिष्यवृत्ती:
पुणे -आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा नाही, असे विधान कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या भूमिकेसंदर्भात रमेश चेन्नीथला यांनी हे मोठे विधान केले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याची देखील शक्यता वर्तवली जात असून यावर देखील चेन्नीथला यांनी आपले मत मांडले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात रमेश चेन्नीथला यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. तसेच आगामी निवडणुकीत आघाडी होऊ पण शकते किंवा नाही पण होऊ शकते असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
रमेश चेन्नीथला म्हणाले, राज ठाकरे आमच्या महाविकास आघाडीमध्ये नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीची काही चर्चा झाली असेल तर ते आम्हाला माहीत नाही. दोन्ही भाऊ हात मिळवत असतील तर आम्हाला त्यात काही अडचण नाही. परंतु, महाविकास आघाडी संदर्भात आम्ही यावर पोलिटिकल अफेअर्स मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुण्यात कॉंग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवासी कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता फक्त ‘अॅक्शन अॅक्शन आणि अॅक्शन’ असे म्हणत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. तसेच आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल, असा विश्वास सपकाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
पुणे दि.12 :- जिल्ह्यातील साहसी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माजी सैनिकांची माहिती सैनिक कल्याण विभागाने 21 ऑगस्ट 2025 पर्यंत मागितली आहे. ज्या माजी सैनिकांचे साहसी प्रशिक्षण (बेसिक माउंटेनिंग कोर्स, एडवांस्ड माउंटेनिंग कोर्स, पैरा ग्लाइडिंग, पैरा जंपिंग, रिवर राफ्टिंग, एक्सपर्ट इन स्विमिंग) झालेले आहे त्या माजी सैनिकांनी खालीलप्रमाणे आपली माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 21ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करावी. माजी सैनिकांनी आर्मी नंबर, रैंक, नाव, पत्ता, जन्म तारीख, कोर्सचे नाव, कोर्स केलेल्या संस्थेचे नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप.
पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२५ भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुलजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू असे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम संदीप, यु बी. व्यंकटेश, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, संजय दत्त रविंद्र दळवी, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. शेजारी देशांशी आपले चांगले संबंध नाहीत, अमेरिका भारताला धमकी देत आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अमेरिकाच काय कोणत्याही देशाने भारताला धमकी देण्याचे धाडस केले नाही. राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर टिप्पणी करतात. आता न्यायालय देशप्रेमी कोण हे ठरवणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार सर्वात भ्रष्ट असून कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळतो, तर गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात असे चेन्नीथला म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यावर आयोगाने उत्तर दिले पाहिजे पण फडणवीस उत्तर का देत आहेत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? असे चेन्नीथला म्हणाले.
राज ठाकरेंबद्दल अद्याप निर्णय नाही.. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल असे चेन्नीथला म्हणाले. नवीन कार्यकारिणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहरे आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम करा असे सांगून लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जिल्ह्या जिल्ह्यात मशाल मोर्चा काढा व सह्याची मोहीम राबवून राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला शक्ती द्या असेही चेन्नीथला म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा प्रदेशाध्यक्षच आहे. जे गेले ते जाऊ द्या, गेले ते कावळे होते व राहिले ते मावळे आहेत आणि मी तुमच्या बरोबर आहे असे आश्वस्त करत दोन दिवसांची कार्यशाळा संपली असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आता Action, action आणि action वरच भर द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय खेचून आणा व काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करा, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
काँग्रेसला नेरेटिव्ह व परसेप्शनची गरज नाही- पवन खेरा. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यावेळी नेरेटिव्ह या विषयावर बोलताना म्हणाले की, जे सरकार व पक्ष काम करत नाही त्यांना नेरेटिव्ह व परसेप्शनची गरज असते काँग्रेस पक्षाला त्याची गरज नाही. भाजपाने फक्त एक खोटी वातावरण निर्मिती करण्याचे काम केले. काँग्रेसचा रस्ता हा सत्याचा आहे, तो कठीण आहे पण त्याच मार्गाने काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून चालत आला आहे व यापुढेही याच मागाने वाटचाल करेल. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरुंनी लोकशाही व संविधानाचा रस्ता निवडला आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवले याच रस्त्याने आज राहुल गांधीही जात आहे. काँग्रेस पक्षाला मोठा जाज्वल्य इतिहास आहे. ५४ वर्षांच्या सत्तेत जनतेची भरपूर सेवा केली व देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले हे जनतेपर्यंत पोहचवा.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवर यावेळी म्हणाले की, राज्यातील भाजपा युतीच्या सरकारने १० लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे व १ लाख ७८ कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. महाराष्ट्राला देशोधडीला लावले आहे. सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. शिक्षक भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करावे सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहेत असे वडेट्टीवार म्हणाले.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची राज्यात आजही मोठी ताकद आहे, १४ खासदार आहेत, आमदारांची संख्या कमी असली तरी आवाज कमी नाही. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा लढवय्या आहे. जोमाने काम करा व काँग्रेस पक्षाला गत वैभव प्राप्त करुन द्या असे आवाहन करत आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे असे देशमुख म्हणाले.
आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते.त्याच हेतूने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच पेरणेफाटा,येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन २१८ युनिट रक्त संकलन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढीच्या टीम ने रक्त संकलन करण्यासाठी विशेष योगदान दिले.
या शिबिराचे उदघाटन श्री.ताराचंद करमचंदानी (झोनल प्रमुख, पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा पेरणेफाटा परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी पेरणेफाटा परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार पेरणेफाटा ब्रांच प्रमुख संजय भिलारे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस ही एक चळवळ व विचारधारा, काँग्रेसचा रस्त्यावर व संसदेतही प्रभावी आवाज: संजय आवटे
मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेसचे “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम सुरु.
पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२५
सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी केले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘सोशल मीडिया’ या विषयावर सुप्रिया श्रीनेत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पाच महिन्यात मतदारांची संख्या कशी वाढली याची माहिती दिली तसेच मतचोरी कशी करण्यात आली हे राहुल गांधी यांनी केलेली पोलखोल दाखवली. २००४ ते २००२४ च्या दरम्यान झालेल्या सर्व निवडणुकातील मतदारसंख्या व झालेले मतदान यांची आकडेवारीसह माहिती दिली. आज मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांवर भाजपाने कब्जा करून ठेवला आहे आणि काँग्रेसला प्रसिद्धी खूप कमी दिली जाते अशा परिस्थितीत सोशल मीडिया हेच महत्वाचे साधन ठरत आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची भरपूर कामे केली आहेत. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायद्या सारखी अत्यंत महत्वाची कामे केली पण मागील ११ वर्षात भाजपा सरकारने केलेले एकही काम उल्लेखनीय नाही. जनकल्याणाची कामे करूनही काँग्रेस पक्ष प्रचार व प्रसार करण्यात कमी पडला. आता जागे व्हा व जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रीय व्हा, असे श्रीनेत यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सोशल मीडिया संदर्भात काही प्रश्न विचारले, त्याची सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तरेही दिली.
काँग्रेस एक चळवळ व विचारधारा.. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी, ‘गांधी नेहरु व आंबेडकर’ याविषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, काँग्रेस हा एक विचार आहे, एक चळवळ आहे. आज काँग्रेस रस्त्यावर दिसत आहे व संसदेतही दिसत आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. काँग्रेस पक्षाकडे महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे. विरोधकांनी ‘संघ’ उभा केला पण काँग्रेसने ‘संघराज्य’ उभे केले आहे. सर्वांना मतांचा अधिकार देणारा भारत हा पहिला देश आहे, हे ऐतिहासिक काम काँग्रेस पक्षामुळेच शक्य झाले आहे. मतदार यादी बनवणे अत्यंत अवघड काम होते पण ते काँग्रेसने करून दाखवले, त्यामानाने मतदार याद्यात घोळ घालणे सोपे आहे, असा टोला लगावत लोकशाहीवर जेव्हा आघात होत आहे त्यावेळी काँग्रेस उभी आहे हे संजय आवटे यांनी सांगितले.
आज काँग्रेस सत्तेत नाही आणि हाच काळ काँग्रेससाठी सर्वात चांगला काळ आहे. जे नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले ते सत्तेसाठी गेले असेही संजय आवटे म्हणाले. काँग्रेस पक्षाची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ते राहुल गांधी यांच्याबद्दलही संजय आवटे यांनी सविस्तर व्याख्यान दिले.
काँग्रेस पदाधिका-यांच्या कार्यशाळेच्या दुस-या दिवसाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने झाली. या प्रार्थनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
“नोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम. निवडणूक आयोग आणि भाजपाने संगनमताने मतचोरी करून निवडणुकीत विजय कसा मिळवला याचा पर्दाफाश राहुलजी गांधी यांनी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या मतचोरीविरोधात “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” ही स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे.
पुण्याच्या खडकवासला येथील शिबिर स्थळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वाक्ष-या करून या मोहिमेचा शुभारंभ केला.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
‘प्राज’ इंडस्ट्रीजच्या वतीने ‘प्राज बायोव्हर्स’ या जागतिक उपक्रमाची घोषणा
डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : वाहननिर्मिती, संशोधन व डिझाईन या क्षेत्रातील देशाची गतिमानता आणि गुणवत्ता पाहता, नजीकच्या भविष्यात वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मी मंत्री झालो, तेव्हा आपण जगात ७ व्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसऱ्या स्थानी आहोत, असेही ते म्हणाले. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मॅरिएट येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘प्राज बायोव्हर्स’ या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमाची घोषणा केली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना गडकरी बोलत होते. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे हे याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “देशातील वाहन उद्योग क्षेत्र हे २२ लाख कोटींचे उद्योगविश्व असून या क्षेत्राने साडेचार कोटी इतका रोजगार निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे हा उद्योग सर्वाधिक निर्यातक्षमताही राखून आहे. मात्र, या उद्योगाच्या काही बाजू नकारात्मक आहेत. ४० टक्के वायूप्रदूषण हे वाहनांमुळे होते. त्यामुळेच प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाला प्रदूषणरहित, स्वच्छ इंधनाचे पर्याय निर्माण करणे आणि त्यांचा सार्वत्रिक वापर वाढविणे गरजेचे आहे. प्राज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून डॉ. प्रमोद चौधरी आणि त्यांच्या टीमने यासंदर्भात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आज ग्रामीण अर्थव्यवस्थेत असंतुलन आहे. कारण कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ टक्के आहे, पण आजही देशातील सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. सेवा क्षेत्राचा वाटा मात्र वाढत आहे. हे प्रमाण संतुलित करण्यासाठी पर्यायी इंधनस्रोतांची आवश्यकता आहे. पर्यायी इंधनस्रोत कृषी क्षेत्राला बळकटी देतील. आपला शेतकरी केवळ अन्नधान्य उत्पादक न राहता, तो इंधन उत्पादक होण्यासाठी, वाहन उद्योगाने पर्यायी इंधनस्रोतांना अनुकूल अशी निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.”
मी रस्ते बनवितो, हे सर्वपरिचित आहे, पण माझ्या ६ डॉक्टरेट्स या कृषी क्षेत्रातील कार्याशी संबंधित आहेत. त्यामुळे वाहननिर्मिती उद्योग कृषी क्षेत्राशी संलग्न होणे, मला महत्त्वाचे वाटते. इथेनॉल, हायड्रोजन आणि बांबू, असे नवे इंधनस्रोत आपल्या संशोधनाच्या, नवकल्पनांच्या, स्टार्टअप्सच्या केंद्रस्थानी आले, तर आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणे शक्य आहे, असेही गडकरी म्हणाले.
भारतामध्ये अन्नधान्याची निर्मिती वाढली आहे, ते ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. काही वर्षांपूर्वी मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मक्याच्या दरात चांगली वाढ झाली. बिहार मधल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्याचप्रमाणे अन्य धान्याचा वापर करून इथेनॉल तयार केले गेले तर त्याचा शेतकरी वर्गाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे, तिथे बाबूंची लागवड करून त्यापासून इथेनॉल तयार केले तर प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास देखील चांगली मदत मिळू शकते, इतकेच नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होऊ शकते असे गडकरी यांनी नमूद केले.
डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणा होते, त्यावर पर्याय म्हणून आपसोमिथेनॉल हा चांगला पर्याय आहे, भविष्य काळात तो देशासाठी वरदान ठरणार आहे. भारतामध्ये चांगल्या प्रकारचे संशोधन सुरु आहे, त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. डॉ प्रमोद चौधरी यांनी इथेनॉल क्षेत्रात केलेले काम मोठे असून त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
‘प्राज बायोव्हर्स’ या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “प्राज बायोव्हर्स ही संपूर्ण जैव अर्थव्यवस्थेच्या परिसंस्थेला एकत्र आणणारी चळवळ आहे. याद्वारे जैव अर्थव्यवस्थेशी संबंधीत अनेकविध घटक एकत्र येण्यासोबतच नवोपक्रमांना चालना देणे, एकमेकांना आवश्यक सहकार्य करणे, प्रेरणा देणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे अशा पद्धतीने एकत्रितपणे काम केले जाईल. याद्वारे आपण देशासोबतच जागतिक पातळीवर देखील शाश्वत विकासासाठी नवीन क्षितिजे शोधू शकू असा आम्हाला विश्वास आहे.”
संजय किर्लोस्कर, विक्रम गुलाटी, विक्रम कसबेकर आणि विशाल सोनी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार
मुंबई- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजना, ऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीय, निमशासकीय, शासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजना, बीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजना, तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटी, आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.