Home Blog Page 365

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास: प्रति आसन देणार अनुदान शासन

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय

मुंबई- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढक्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

पुणे-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.
या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

पुणे-महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – १० हजार ९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘वॉर 2′ १४ ऑगस्टला …

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला विश्वास आहे की त्याचा आगामी चित्रपट ‘वॉर 2’, जो १४ ऑगस्ट रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे, प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये पाहण्यासारखा अनमिसेबल प्रोजेक्ट ठरणार आहे.

या चित्रपटात हृतिक, पॅन-इंडियन सुपरस्टार ज्युनियर एनटीआर विरुद्ध एका नो-होल्ड्स-बार्ड, रक्तरंजित लढाईत भिडणार आहे, ज्याला तो मोठ्या पडद्यावरील एक भव्य व्हिज्युअल अनुभव मानतो.

हृतिक म्हणाला, “‘वॉर’ मध्ये कबीरची भूमिका करताना मला जे प्रेम आणि कौतुक मिळाले, त्याने मला ‘कहो ना… प्यार है’, ‘धूम २’ आणि ‘कृष’च्या काळातील प्रेमाची आठवण करून दिली. यावेळी मी पुन्हा कबीर म्हणून परत आलो आहे, आणि ही भूमिका करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण प्रेक्षकांनी हा कॅरेक्टर खूप आवडला होता. या वेळी तो आधीपेक्षा अधिक इंटेन्स आणि द्विधा मनस्थितीत आहे — खूप भावनिक. मला वाटते ‘वॉर २’ हा असा चित्रपट असेल जो चुकवता कामा नये.”

हृतिक, ज्याने गंभीर दुखापतींवर मात करून हा चित्रपट पूर्ण केला, सांगतो की या प्रोजेक्टसाठी सहन केलेला प्रत्येक त्रास आणि वेदना योग्य ठरल्या.

तो म्हणाला, “हे कठीण होते (वेदना आणि दुखापतींवर मात करणे). आम्ही खूप मेहनत घेतली. ‘वॉर २’ च्या शूटिंगदरम्यान आलेल्या सर्व वेदना, सर्व दुखापती या सगळ्या त्याच्यासाठीच होत्या. कधी सेटवर वेदना होत होत्या तेव्हा मी विचार करायचो — हे सगळं खरंच वर्थ आहे का? पण आता जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम पाहतो, तेव्हा उत्तर आहे — हो, नक्कीच.”

‘वॉर २’ हा प्रतिष्ठित वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे, ज्याने आतापर्यंत केवळ ब्लॉकबस्टरच दिल्या आहेत.

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा‘अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” हि तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे.

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच ‘तिरंगा फेस्टिवल’

किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ५०० ढोल-ताशा वादनातून मानवंदना

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘तिरंगा फेस्टिवल २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने शुक्रवार, दिनांक १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर तिरंगा फेस्टिवल २०२५ होणार आहे, अशी माहिती आयोजक किरण साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच होत आहे. देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान तिरंगा फेस्टिवल मध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश आहे. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव होणार आहे. सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार असून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकांतील ५००हून अधिक वादक एकत्रितपणे वाद्यवादन करणार आहेत. ढोल ताशाच्या वादनातून ‘आॅपरेशन सिंदूर’ व ‘आॅपरेशन महादेव’ मधील वीरांना मानवंदना देणार आहेत. संपूर्ण रस्त्यावर तिरंगी ध्वज लावण्यात येणार असून तिरंगी टॅटू यांसह विविध आकर्षण फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत.

विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला ‘नादरंग’ -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम देखील होणार आहे. याशिवाय प्रख्यात कलादिग्दर्शक गणेश लोणारे व सहकारी यांचे देशभक्तीपर पथनाट्य व सादरीकरण होणार आहे. ‘वंदे मातरम’ या स्वर मैफलीतून बालकलाकार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता होणार आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हा फेस्टिवलला उपस्थित राहणार असून पुणेकरांनी यामध्ये सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा

-15 ऑगस्ट रोजीच्या ठिय्या आंदोलनात मुस्लिम समाज सहभागी होणार

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी  नगरसेवक अॅड. हाजी  गफूर पठाण यांनी सांगितले. 

कोंढवा येथील सतेज हॉल या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती, या बैठकीत वरील प्रमाणेचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच याच वेळी मुस्लिम समुदायासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल राहुल डंबाळे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. 

मुस्लिम समुदाय हा कायम आंबेडकरी विचारधारेसोबत जोडला गेला आहे. या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाचे मिळालेले पाठबळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून यामुळे आंदोलकांची ताकद वाढली असल्याने स्मारकाचा  लढा सुटण्याच्या मार्गावर आलेला आहे, असे राहुल डंबाळे यांनी यावेळी सांगितले

दरम्यान पुणे शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रित करून या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज जास्तीत जास्त संख्येने सहभागी होईल याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे अॅड. हाजी  गफूर पठाण यांनी यावेळी सांगितले

महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत हसीनाताई इनामदार , आबीद सय्यद , जमीर कागजी , जावेद शेख, एजाज पठाण , बीलाल पटेल , सज्जन कवडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. 
दरम्यान याच अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये मुस्लिम समाजाची बैठक देखील पार पाडली होती याच माजी नगरसेवक रशीद शेख आयुब शेख रफिक शेख मेहबूब नदाफ रईस सुंडके मुक्तार शेख हाजी फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख अंजुम इनामदार जुबेर मेमन सलीम पटेल आसिफ खान आदी मान्यवरांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“टँगो मल्हार” या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थे अंतर्गत करण्यात आली असून साया दाते या निर्मात्या आहेत. “टँगो मल्हार” या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुण अशा मल्हारला अचानकपणे “टँगो” या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात या कथासूत्रावर ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट बेतला आहे.चित्रपटाच लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केले आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे या नवोदित कलाकरांचा अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित “मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” (एमआयटी) येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केलं, त्यानंतर भारतात परत येऊन पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली. उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं.

साया यांच्यात चित्रपट प्रेमाचं बीजं बालपणीच पेरलं गेलं होतं. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी ‘ऑन द अदर लाइन’ ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुद्धा ही शॉर्टफिल्म गौरवली गेली. त्याशिवाय त्या स्वतः टँगो डान्सरही आहेत. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञान, उद्योगात उत्तम काम करत असताना कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपली आवड जपण्यासाठी त्यांनी ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. त्यामुळे एका संगणक शास्त्रज्ञ, उद्योजिकेचा मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनाचा प्रयत्न नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे यात शंका नाही.

फुफ्फुसांच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्याकबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळाच-डॉ. कल्याण गंगवाल

मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे मोकळ्या जागेत स्थलांतर करावे

शाकाहार, अहिंसावादी कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन

पुणे, ता. १२: “जैन धर्मातील प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांवर माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट असली, तरी डॉक्टर म्हणून माझा कबुतरांना दाणे टाकण्याचा विरोध आहे. फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळायलाच हवे,” अशी स्पष्ट भूमिका पुण्यातील शाकाहार व अहिंसावादी कार्यकर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी मांडली. मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे स्थलांतर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला वास्तव सांगणे भाग आहे. कबुतर हा भारतातील स्थानिक पक्षी नसून तो मध्यपूर्वेतून आलेला आगंतुक प्रजातींमधील पक्षी आहे. त्याचे प्रजनन अतिवेगाने होते. कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. फुफ्फुसाचे गंभीर आजार त्यामुळे होत आहेत. यासह सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, वाहतुकीस अडथळे तसेच चिमणीसारख्या स्थानिक पक्ष्यांचे नामोनिशाण पुसले जात आहे.”

“कबुतरांना खाऊ दिला नाही, तर ते मरतील, ही समजूत चुकीची आहे. पृथ्वीवरील लाखो प्रजाती माणसांशिवाय लाखो वर्षे जगल्या आहेत. निसर्गाने त्यांना टिकण्याची क्षमता आणि संतुलन दिले आहे. कबुतरांना न खाऊ घातल्यास त्यांची नैसर्गिक अन्नशोध प्रवृत्ती वाढते, संख्या नियंत्रणात राहते आणि निसर्गसाखळी सुरक्षित राहते. धर्मापेक्षा आरोग्य व विज्ञान महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत व कबुतरखान्यांवर बंदी घालावी. कबुतरांना खाद्य द्यायचे असल्यास मर्यादित प्रमाणातच करावे; रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी, गल्ल्यांमध्ये हे टाळावे,” असेही आवाहन त्यांनी केले.

कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात धार्मिक मुद्दा उपस्थित करणे अयोग्य आहे. हा मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असून, कबुतरखान्यांवर बंदी योग्य आहे. या निर्णयाचे आपण प्रत्येकाने स्वागत करायला हवे. राज्य सरकारने यासंदर्भात कडक पावले उचलावीत व मानवी आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावे.”

दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी : वजाहत हबीबुल्लाह

0

जनतेला बरोबर घेऊन केलेले शासन हेच सुशासन :
लोकतंत्र यशस्वी होणे जनतेच्याच हाती :
जनसेवकाची भूमिका पारदर्शक असावी : वजाहत हबीबुल्लाह

सरहद, पुणेतर्फे देशाचे माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यान

पुणे : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे प्रशासन अथवा सुशासन नव्हे तर लोकतंत्रामध्ये आपण जनतेची सेवा करण्यासाठी आहोत ही भावना जनसेवकाची असली पाहिजे. सुशासनाबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असून शकतो, परंतु जनतेला सोबत घेऊन केलेले शासन हे खरे सुशासन होय. सरकारची प्रत्येक कृती जनतेला माहिती असणे आवश्यक आहे. लोकतंत्रात अनेक कमतरता असतात कारण लोकतंत्र कधीही परिपूर्ण असू शकत नाही. लोकतंत्र यशस्वी होणे पूर्णपणे जनतेच्या हातात असते, असे प्रतिपादन भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांनी केले. माहिती अधिकाराच्या माध्यमातून पारदर्शक सरकार निर्माण करून योग्य ते कायदे लागू करून सुशासन निर्माण करण्यात सफलता मिळविण्यासाठी जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणे आवश्यक आहे. जनसेवकाने पारदर्शक राहून जनता सुरक्षित करण्यात हातभार लावला तर लोकतंत्र नक्कीच यशस्वी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सरहद, पुणेतर्फे भारताचे माजी गृह सचिव स्व. डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ आज (दि. ११ ऑगस्ट) ‌‘सुशासन : कल्पना की वास्तव‌’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वजाहत हबीबुल्लाह बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव,राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर होते. व्याख्यानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. व्याख्यान टिळक स्मारक मंदिर येथे झाले.
याच कार्यक्रमात डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवृत्त विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
.. तर पंडितांचे स्थलांतर टळले असते
दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी झाली, जनता मारली गेली असे सांगून वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांध्ये धर्मावरून कायम तेढ निर्माण व्हावी हाच पाकिस्तानचा हेतू राहिला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पहेलगामधील धर्मविचारून केलेली हिंदूंची हत्या होय. १९६८ ते १९८२ या काळात काश्मीरमध्ये कार्यरत असताना तेथील सामाजिक वातावरण पूर्णत: अहिंसा आणि प्रेमाचेच होते. पाकिस्तानने धार्मिक तेढ निर्माण केल्यानंतर प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात घेवून हिंदूंची सुरक्षितता सांभाळली असती तर पंडितांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले नसते. काश्मीरी आम जनतेला विश्वासात घेऊन सुशासन निर्माण करणे ही त्या काळातील सरकारची जबाबदारी होती.
माहिती अधिकाराविषयी बोलताना वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, या विभागात काम करू लागल्यानंतर जनतेला नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कायद्यांविषयक तसेच सरकारच्या प्रत्येक कृतीविषयक माहिती नव्हती, हे लक्षात आले. सरकारी कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या विभागीय कामकाजाबद्दलही माहित नव्हते. सरकारमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे, दु:शासन होत आहे हे जनतेला ठाऊक नव्हते. जनसंपर्क ठेवायची इच्छा असली तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सामान्य जनतेला पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. सचिवालयातही मोठ्या प्रमाणात ‘बिझनेस हाऊसेस’मार्फत भ्रष्टाचार होत आहे याची कल्पना मला देखील नव्हती. लोकतंत्र जनतेच्याच हातात आहे असे सांगताना ट्रम्पसारखा एक जोकर जनतेनेच निवडून दिला आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.

समाजभान ठेवून सुजाण नागरिक बनणे आवश्यक : डॉ. नितीन करीर
डॉ. नितीन करीर म्हणाले, माहिती अधिकार हा साध्य नाही तर तो सुशासनाकडे जाण्याचा मार्ग आहे. नैतिकता, कार्यक्षमता, परिणामकता आणि पारदर्शकता म्हणजे सुशासन होय. प्रत्येक प्रशासकीय निर्णयाला नैतिकता व विवेकाचा पाया असणे आवश्यक आहे. कायदा निर्माण केल्यानंतर त्याची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी या करिता प्रशासनाने तत्पर राहणे आवश्यक आहे. कायदे करताना जनतेचा विचार लक्षात घेऊन, चर्चा करून त्याची पारदर्शकतेने अंमलबजावणी होत आहे की नाही याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. चांगल्या विचारांच्या लोकांनी काहीही न करणे यातूनच वाईटाचे साम्राज्य उभे राहते म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजभान ठेवून सुजाण नागरिक बनणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे, एकत्र येणे आणि सरकारला योग्य-अयोग्यतेची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. हे साधल्यास सुशासन हे स्वप्न न राहता सत्य होईल.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि ना. गोपाळकृष्ण गोखले, शहीद भगतसिंग आणि डॉ. माधव गोडबोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविकात संजय नहार यांनी वजाहत हबीबुल्लाह यांचा परियच करून देत कार्यक्रमाविषयी माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची तर स्वातंत्र्यानंतर ना. गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी ‘बीड वाचतंय’ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. वजाहत हबीबुल्लाह यांचे स्वागत डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि शाल देऊन करण्यात आले. तर डॉ. शैलेश पगारिया व शैलेश वाडेकर यांनी ग्रंथ व स्मृतीचिन्ह भेट दिले. डॉ. नितीन करीर यांचा सन्मान लेशपाल जवळगे, अनुज नहार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, सोशल मीडियाचा वापर वाढवा, महाराष्ट्र काँग्रेसमय करा: सतेज पाटील

जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा: सचिन राव

शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन.

पुणे/मुंबई दि. ११ ऑगस्ट २०२५

राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र आहे. ७१ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात, त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहण्यासाठी सक्रीय रहा, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले आहे.

खडकवासला येथे पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत बोलताना सतेज ऊर्फ बंटी पाटील पुढे म्हणाले की, आपल्या भागातील जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली पाहिजेत. आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे. १८ ते २५ वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेस सोबत जोडला गेला पाहिजे त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमय झाला पाहिजे असा संकल्प करा व त्यादृष्टीने वाटचाल करा असे आवाहनही पाटील यांनी केले.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘सामाजिक न्याय व जनगणना’ या विषयावर मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे यासाठी प्रत्येक समाज घटकाची संख्या निश्चित झाली पाहिजे. राहुल गांधी यांनी यासाठी आग्रही भूमिका घेत जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली. सरकारलाही अखेर झुकावे लागले व जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या समाज घटकाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा हिस्सा असला पाहिजे. जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा, असेही सचिन राव म्हणाले.

‘सांस्कृतिक राजकारण’ या विषयावर शाहीर संभाजी भगत यांनी मार्गदर्शन केले, देशात आज सर्व क्षेत्राचे धार्मिकीकरण केले आहे. सण, उत्सवाचेही व्यावसायीकरण व धार्मिकीकरण केले आहे. सण व उत्सव हे हत्यार बनवले आहेत, याची सुरुवात घर व शाळेतूनच होते. आज जे लोक सत्तेवर आहेत ते कदाचित सत्तेवरून जातीलही पण सांस्कृतीक सत्तेवरून ते जाणार नाहीत. समाजात विष पेरण्याचे काम सुरु असून हे चित्र बदलले पाहिजे. काँग्रेसच्या हाती सत्ता येईल पण जमीन हातात घ्यावी लागणार आहे आणि विष पेरलेली ही जमीन कसावी लागणार आहे, असे संभाजी भगत म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी ‘सामाजिक राजकीय आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले, निवडणूक जिंकण्यासाठी सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरु आहे. कोपर्डीची घटना, परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि पुण्यात तीन मुलींना पोलिसांनी केलेली जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची घटना याची त्यांनी उदाहरणे दिली. पुण्यातील या घटनेवेळी १७-१८ तास ठिय्या देऊनही पोलीसांनी एसटीएसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. अशा प्रसंगी त्यांच्या पाठीशी काँग्रेसने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हिंदू मुस्लीम वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात असून त्यांना नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. आधी मतदार सरकार ठरवत होते आता SIR आणून सरकार मतदार ठरवू लागले आहे. महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले असून अर्बन नक्षलवाद नावाचा बागुलबुवा उभा केला आहे. न्याय व्यवस्थेतही सर्वकाही आलबेल नाही. न्यायाधीशच विचित्र टिपण्णी करु लागले आहेत हे सर्व भयंकर आहे. अदानी अंबानीसाठी आजचे सत्ताधारी देशालाच देशोधडीला लावत आहेत, असे टकले म्हणाले..

निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी ‘प्रशासन व कार्यकर्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले, लोकशाहीत शासन व प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत असे गोंडस नाव दिले आहे पण ते खरे नाही. खरे तर प्रशासनच सरकार असल्यासारखे वागत आहे. प्रशासन ही व्यवस्था सरकार चालवण्यासाठी सहकार्य करणारी व्यवस्था आहे. प्रशासक बटीक वा गुलाम असता कामा नये तर ती स्वतंत्र बाण्याची असली पाहिजे. या प्रशासनाला भक्कम कवच कुंडले आहेत त्यामुळे त्यांना काढून टाकणे खूप कठीण आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला प्रशासनाबद्दल माहिती असणे गरजे आहे, असेही झगडे म्हणाले

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा उद्या दिनांक १२ ऑगस्ट ला समारोपाची दिवस आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा, इतिहासकार अशोककुमार पांडेय व ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे मार्गदर्शन करतील.

कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ घोषणांनी परिसर दणाणला

पुणे – महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा व शहराच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन’ जोरदारपणे पार पडले.‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भ्रष्ट, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, डान्सबार चालवणाऱ्या, रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “आजचे हे युती सरकार हे कलंकित सरकार असून, सामान्य जनतेला दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणाऱ्या मंत्र्यांना सत्ता टिकवून ठेवणे म्हणजे लोकांचा विश्वासघात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना राज्यभर अधिक आक्रमक आंदोलन करेल.”

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, प्रकाश भेगडे, उल्हास शेवाळे, अशोक खांडेभराड, संजय काळे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, रवींद्र मुजुमले, गणपत खाटपे, राजाराम बाणखेले, सचिन पासलकर, रामभाऊ पारिख, आबा कुंभारकर, आबा निकम, प्रशांत राणे, अनंत घरत, पंढरीनाथ खोपडे, राकेश मांढरे, प्रशांत बधे, सचिन खैरे, पोपट शेलार, भोलेनाथ पडवळ, किरण देशमुख, संजय देशमुख, राहुल शिंदे, सयाजी शिंदे, गणेश शिवले, मकरंद पेटकर, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दीपक शेडे, दिलीप पोमन, बाळासाहेब मोडक, रमेश शिरसागर, बाळासाहेब भांडे, सचिन भगत, किशोर रजपूत, रुपेश पवार, चंदन साळुंखे, दीपक जगताप, नागेश खडके, शशिकांत पापळ, राहुल शेडगे, नितीन निगडे, अमर मारटकर, संतोष भुतकर, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, सचिन चिंचवडे, परेश खांडके, अमोल काळे, पुरुषोत्तम विटेकर, सूर्यकांत पवार, हरिश्चंद्र सपकाळ, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, अमोल देवळेकर, युवराज पारिख, सागर पाटील, मुकुंद चव्हाण, प्रवीण डोंगरे, गिरीश गायकवाड, जुबेर शेख, पराग थोरात, रमेश परदेशी, सुरज खंडागळे, हेमंत धनवे, विजय रावडे, राजाराम नवघणे, संदीप आमले, दत्ता घुले, प्रथमेश भुकन, तेजस मर्चंट, ज्ञानेश्वर डफळ, अमोल दांगट, अनिल परदेशी, बाळासाहेब गरुड, सुनील गायकवाड, शंतनू उभे, अनिल दामजी, दत्ता देवकर, मिलिंद पत्की, संजय लाहोट, राजेश राऊत.तर महिला आघाडीच्या
स्वाती ढमाले, पद्मा सोरटे, विद्या होडे, रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, सलमा भाटकर, अमृता पठारे, निकिता मराटकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सोनाली सोनवणे, सीमा मगर, ज्योती वीर, सीमा गायकवाड, सविता गोसावी, स्नेहल पाटोळे, सरोज कसबेकर.आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .

शिवसेनेचे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भव्य, उत्स्फूर्त आणि घोषणाबाजीने गाजले. पुढील टप्प्यात महाराष्ट्रभर अशाच आंदोलने घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’ तर्फे;पुण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल!

0

१४ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण सोहळा.

पुणे- उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. या फेस्टिव्हलअंतर्गत निवडक चित्रपटांचे स्क्रीनिंग १० ऑगस्ट २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक सभागृह, कोरेगाव पार्क येथे पार पडले. या वेळी एकूण ३०० कलाकृतींची नोंदणी झाली होती. त्यापैकी परीक्षकांनी निवडलेल्या २५ कलाकृतींचे स्क्रीनिंग करण्यात आले, तर १७ कलाकृतींना पारितोषिक वितरणासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी ज्युरींमध्ये दिग्दर्शक-अभिनेत्री वृशा सेन-दाभोळकर, निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता विशाल गोरे, दिग्दर्शक-अभिनेता सचिन दानिया आणि दिग्दर्शक-संगीतकार जाहिर दरबार यांचा समावेश होता.

स्पर्धेत १ मिनिट ते ७ मिनिटांच्या शॉर्ट फिल्म्स तसेच स्वतंत्र कॅटेगरीत १ मिनिटांच्या सोशल मीडिया रील्स सादर करण्यात आल्या. समाजजागृती, सांस्कृतिक मूल्ये, सध्याची पिढी, पर्यावरण, वाहतूक, भ्रष्टाचार, महिला सक्षमीकरण, ‘से नो टू ड्रग्स’, ‘गुड टच – बॅड टच’, एड्स जनजागृती, ‘नो मीन्स नो’, हुंडाबळी, घरगुती हिंसा अशा विषयांवरील चित्रफितींना प्राधान्य देण्यात आले, तसेच इतर सर्जनशील व सामाजिक आशय असलेल्या कलाकृतींनाही उत्साहाने स्थान मिळाले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन हॉल, नवी पेठ येथे होणार आहे. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, खासदार राजनी ताई पाटील, जॉइंट पोलीस कमिशनर रंजन शर्मा, माजी खासदार प्रदीपदादा रावत, अभिनेत्री स्मिता गोंदकर, सुहाना मसालाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल चोरडिया, सुर्यादत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे डॉ. संजय चोरडिया, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेशा शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आणि राज इम्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज जैन राणावत हे मान्यवर या सोहळ्यात पाहुणे असतील.

या कार्यक्रमात तीन प्रमुख कॅटेगरींमध्ये सहा मुख्य पारितोषिके आणि दोन प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत. पारितोषिकांमध्ये रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि आकर्षक भेटवस्तूंचा समावेश असेल. मुख्य पारितोषिकांमध्ये कॅमेरा व स्मार्टफोन शॉर्ट फिल्म्स कॅटेगरीत – पहिला क्रमांक ₹२५,०००, दुसरा क्रमांक ₹१५,००० आणि तिसरा क्रमांक ₹९,००० असेल. रील कॅटेगरीत – पहिला क्रमांक ₹५,०००, दुसरा क्रमांक ₹३,००० आणि तिसरा क्रमांक ₹२,००० असा गौरव दिला जाईल, अशी माहिती ‘बिटीया फाउंडेशन’च्या संगीता तिवारी यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, या उपक्रमातून तरुणांना समाजातील ज्वलंत विषयांवर भाष्य करण्याची संधी मिळून, चित्रपटसृष्टीत करिअर घडविण्याची प्रेरणा मिळेल.

संगीताबाबत महाराष्ट्र संस्कृती भाग्यवान: विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर

श्री तुळशीबाग महागणपती  सांस्कृतिक महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गायिका शैला दातार यांचा सन्मान 

पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीची सुवर्णपाने ज्या मंडळींनी लिहिली त्यामध्ये श्रीनिवास खळे, सुधीर फडके आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा समावेश आहे. ही महाराष्ट्र संस्कृती व मराठी संगीताची त्रिमूर्ती आहेत. अध्यात्म आणि शास्त्रीय संगीत ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी असून संगीताबाबत महाराष्ट्र संस्कृती भाग्यवान आहे, असे मत विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले. 

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गायिका शैला दातार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पं.ह्रदयनाथ मंगेशकर, अभिनेते मोहन जोशी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.

यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना श्रीनिवास खळे यांच्या नावाने व गायिका शैला दातार यांना माणिक वर्मा यांच्या नावाने विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संवाद पुणे निर्मित ‘अमृतस्वर’ हा सांगितीक कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. 

माधुरी मिसाळ म्हणाल्या, आजची तरुणाई सांस्कृतिक कलेचा वारसा चालवत नाहीत, असे म्हणले जाते. मात्र तुळशीबाग गणपती मंडळातील तरुण कार्यकर्ते उत्तमपणे कार्य करीत आहेत. दरवर्षी उत्सवाची उंची वाढवत आहेत. तसेच वर्षभर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुरस्काराला उत्तर देताना अशोक पत्की म्हणाले,  श्रीनिवास खळे, सुधीर फडके आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी एकूण आम्ही मोठे झालो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या सगळ्यांविषयी अनेक आठवणी आहेत. आज माझा सन्मान केला त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो. शैला दातार यांनीही तुळशीबागेविषयी अनेक आठवणी सांगितल्या. नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले. 

सह्याद्रि हॉस्पिटलमध्‍ये रोबोटिक शस्त्रक्रिया :महिला रूग्‍णाच्‍या छातीमधून दुर्मिळ १७ सेमी आकाराचा एक्‍टोपिक थायरॉईड ट्यूमर काढला

जगातील सर्वात मोठा एक्टॉपिक थायरॉईड ट्यूमर यशस्वीपणे रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला

पुणे, ऑगस्ट ११, २०२५ – एका दुर्मिळ आणि उच्च-जोखीम असलेल्या केसमध्ये, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रगत रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ६२ वर्षीय महिलेच्या छातीतून आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्टॉपिक ट्यूमर — १७ x १२ x ११ सेमी आकाराचा आणि ८०० ग्रॅम वजनाचा — यशस्वीरित्या काढला. या ट्यूमरचे निदान दुर्मिळ एक्टोपिक थायरॉईड गोइटर म्हणून झाले. ही अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे, जेथे थायरॉईड ग्रंथी (gland) चुकीच्या ठिकाणी विकसित होते आणि मानेतील सामान्य थायरॉईड ग्रंथीशी तिचा कोणताही संबंध नसतो. अशा केसेस अत्यंत असामान्य आहेत आणि १००,००० ते ३००,००० व्‍यक्‍तींपैकी फक्‍त एका व्‍यक्‍तीमध्‍ये दिसून येते. सह्याद्रि हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुविद्याशाखीय टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या टीममध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे, लॅपरोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते आणि डॉ. फुलचंद पुजारी, कार्डिओथोरेसिक सर्जन डॉ. स्वप्निल कर्णे, भूलतज्ञ डॉ. विकास कर्णे आणि डॉ. बालाजी मोमले यांचा समावेश होता. सुरक्षित व यशस्वी क्लिनिकल निष्‍पत्ती सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया काळजीपूर्वक नियोजनाने आणि प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पाडण्यात आली. 

रुग्ण प्रथम छातीत जडपणाच्या तक्रारी घेऊन आलास्कॅनमध्ये छातीच्या मध्यभागीहृदयश्वासनलिका आणि प्रमुख रक्तवाहिन्या असलेल्या भागात मोठा ट्यूमर दिसून आलाही केस अपवादात्मक होती, जेथे तिच्या मानेतील थायरॉईड ग्रंथी पूर्णपणे सामान्य होतीतरीही ट्यूमर थायरॉईड टिश्यू असल्याचे दिसून आलेसुरुवातीला तो ट्यूमर थायमोमा असल्यासारखा वाटत होता,  पण बायोप्सीत तो दुर्मिळ एक्टॉपिक थायरॉईड गोइटर असल्याचे स्पष्ट झाले., असे सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलडेक्कन जिमखानापुणे येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉविनोद गोरे म्हणाले.

हा ट्यूमर हृदय, सुपीरियर व्हेना कावा (मोठी शिरा), एओर्टा आर्क (प्रमुख धमनी), पल्‍मनरी ट्रंक (फुफ्फुसामधील मुख्‍य नस) व धमन्या आणि हृदयाचे संरक्षक आवरण असलेले पेरीकार्डियम अशा महत्वाच्या रचनांजवळ धोकादायकपणे स्थित होता. यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक बनली. खरेतर, इतर राज्यांमधील अनेक हॉस्पिटल्‍सनी यापूर्वी ट्यूमरचे स्थान आणि आकारामुळे त्‍याच्‍यावर उपचार करता येणार नाही असे मानले होते.

शस्त्रक्रियेची प्रक्रिया स्पष्ट करताना डॉविनोद गोरे म्हणाले, “शस्त्रक्रिया उच्‍च अचूकतेने आणि कमीत-कमी जोखीमेने करण्यासाठी आम्ही रोबोटिक-सहाय्यित दृष्टिकोन निवडला. यामध्ये बरगड्यांमध्‍ये, विशेषतः ७व्या आणि ९व्या इंटरकोस्टल स्पेसमध्ये लहान कट करत रोबोटिक उपकरण टाकण्‍यात आले. रॉबोटिक सिस्टीममुळे छातीच्या भागाचा मोठा आणि स्पष्ट (3D view) दृश्य मिळालं आणि मानवी हातापेक्षा जास्त नियंत्रण आणि लवचिकता मिळाली, जे एवढ्या छोट्या आणि अवघड भागात खूप उपयोगी ठरलं. आम्ही ट्यूमरला छातीच्या अस्तरापासून (प्ल्युरा) हळूवारपणे वेगळे करून सुरुवात केली आणि वर जाणाऱ्या महाधमनी व फुफ्फुसीय धमन्यांमधील अरुंद, खोल भागातून मार्ग काढला. रोबोटिक उपकरणामधून शरीराच्‍या प्रत्‍यक्ष स्थितीबाबत अभिप्राय मिळत नसल्यामुळे – ज्याला हॅप्टिक अभिप्राय म्हणतात – कोणत्याही मोठ्या रक्‍तवाहिन्यांना नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला दृश्य संकेतांवर आणि आमच्या अनुभवावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागले.”

डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉविकास कर्णे म्‍हणाले, “या केसमध्ये श्वसनमार्ग सांभाळणे हे सगळ्यात मोठं आव्हान ठरलं. ट्यूमरमुळे मुख्य धमनी बाजूला झाली होती आणि श्वासनलिका दाबली गेली होती, त्यामुळे सामान्य पद्धतीने नळी घालणे (इंट्यूबेशन) खूपच धोकादायक होतं. आम्ही फायबर-ऑप्टिक इंट्यूबेशन केले. हे अत्यंत विशेष तंत्र आहे, ज्यामुळे आम्हाला भूल देण्यापूर्वी श्‍वसनमार्ग पूर्ववत करता आला. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक होता.”

बहुतेक ट्यूमर रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला असला तरी, मर्यादित जागा आणि जवळच्या रक्‍तवाहिन्यांमुळे वरच्या बाजूला असलेल्या लहान भागापर्यंत सुरक्षितपणे पोहोचता आले नाही. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टीमने मिनी-स्टर्नोटोमी केली, म्‍हणजेच छातीच्या हाडाच्या वरच्या भागात एक लहान सर्जिकल कट केले. यामुळे ट्यूमरच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचता आले आणि ट्यूमर सुरक्षितपणे व गुंतागूंतीशिवाय काढण्‍यात आला.

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्क्न जिमखाना, पुणे येथील लॅपरोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते म्‍हणाले, “या ट्यूमरचा मानेमधील थायरॉईड ग्रंथीशी कोणताही प्रत्‍यक्ष संबंध नसल्याचे आढळून आले, ज्यामुळे तो खरा एक्टोपिक गोइटर असल्याचे सिद्ध झाले. ही अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे. रूग्‍णामध्‍ये इनोमिनेट शिरा आणि कॅरोटिड धमन्यांजवळील लहान रक्‍तवाहिन्यांमधून रक्‍तपुरवठा सुरू झाला, ज्या आम्ही प्रक्रियेदरम्यान काळजीपूर्वक सील केल्या. आवाज नियंत्रित करणाऱ्या नसांपैकी एक असलेल्‍या डावीकडील रिकरंट लॅरिंजियल नर्व्हवर कदाचित दाब किंवा ताणामुळे परिणाम झाला होता, तर उजवी नस योग्‍यरित्‍या कार्य करत होती. अशा गुंतागुंतीच्या केसेसमध्ये, विशेषतः अवघड व खोल भागांपर्यंत पोहोचताना, रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक अचूकता आणि नियंत्रणामुळे अत्यंत प्रभावी ठरते.”

“शस्त्रक्रिया कमीत-कमी रक्‍तस्त्रावासह पूर्ण झाली आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला रक्‍त संक्रमण किंवा व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासली नाही. वेदनांवर योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍यात आले आणि रिकव्‍हरी प्रक्रिया सुलभ होती. छातीमध्‍ये लहान चीर करण्‍यासह संपूर्ण ट्यूमर काढण्‍यात आला आणि छातीचा पिंजरा (स्‍टर्नम) सिंगल वायरसह योग्‍य स्थितीत आणण्‍यात आला.” अशी माहिती सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. फुलचंद पुजारी यांनी दिली.

या केसबाबत मत व्‍यक्‍त करत डॉ. गोरे म्‍हणाले, “या शस्त्रक्रियेमधून अत्यंत गुंतागूंतीच्या ट्यूमरच्या व्यवस्थापनात रोबोटिक तंत्रज्ञानाचे महत्त्व दिसून येते. काळजीपूर्वक नियोजन, अनुभवी डॉक्‍टर आणि योग्य साधनांसह अशा दुर्मिळ व धोकादायक परिस्थितींवर देखील प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. आमचा ट्यूमर काढून टाकण्‍यासह शक्य तितक्या सुरक्षित आणि कमीत-कमी इन्‍वेसिव्‍ह पद्धतीने उपचार करण्‍याचा मनसुबा होता.” 

ही केस हे एक दुर्मिळ उदाहरण आहे की अत्यंत गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीतसुद्धा प्रगत शस्त्रक्रिया तंत्र, बारकाईने केलेले नियोजन आणि अनेस्‍थेसिया व कार्डियोव्‍हॅस्‍कुलर टीम यांच्यातील समन्वयामुळे अपवादात्मक निष्पत्ती साधता येते. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. स्वप्निल कर्णे यांनी प्रभावी हृदय-संबंधित सपोर्ट प्रदान केला, तसेच रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी हार्ट-लंग मशीन अत्यावश्यक बॅकअप म्हणून सतत स्टँडबायवर ठेवण्यात आले होते.