Home Blog Page 353

चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शासनाकडे सुपूर्द

सांस्कृतिक कार्य विभागाकडून सामंजस्य करारावर स्वाक्षरी

पुणे, दि.२० : संवेदना, संवेदनशीलता आणि सहवेदना यांचे वेगवेगळे प्रकार असले तरी त्यामध्ये कलाकृती, चित्रकला यांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रयत्न असून दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे सुपूर्द करणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या १३९ कलाकृती मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या, यावेळी ते बोलत होते. शासनाच्यावतीने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि स्मीता परांजपे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

ॲड.शेलार म्हणाले, ज्याप्रमाणे ‘एआय’ महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे ‘सीआय’ म्हणजेच क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे. त्यामुळे रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे योग्य पद्धतीने जतन करून शासनाच्या अधिनस्त असलेल्या विविध संग्रहालयांमध्ये जनसामान्यांना पाहण्याकरिता राज्यभर प्रदर्शित करण्यात येतील. या कलाकृतींमधून योग्य संदेश राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. चित्रसाक्षरता हा विषय महत्त्वाचा असून इतका मौल्यवान ठेवा शासनाकडे सुपूर्द केल्याबद्दल मंत्री शेलार यांनी परांजपे कुटुंबियांना धन्यवाद दिले.

दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेल्या ७२ मूळ पेंटिग्ज आणि ६७ फ्रेम आर्ट वर्क अशा एकूण १३९ चित्र कलाकृती महाराष्ट्र शासनास सुपूर्त करण्याची इच्छा दिवंगत रवी परांजपे यांच्या पत्नी स्मीता‍ परांजपे यांनी व्यक्त केली होती. या कलाकृती स्विकारण्यास व यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाच्या १७ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या कलाकृती २६ जून २०२३ रोजी पुरातत्व संचालनालयाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. सध्या त्या सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत. नंतर या चित्र कलाकृतींमधील मोठा भाग मुंबई येथील नियोजित महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
0000

लोकसभेत विरोधकांनी शहांवर कागदी गोळे फेकले:दोष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा देणारे विधेयक निषेधार्ह म्हणत विरोधक संतप्त

नवी दिल्ली- अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके सादर केली तेव्हा विरोधकांनी त्यांच्या प्रती फाडल्या आणि गृहमंत्र्यांवर कागदपत्रे फेकली. काही विरोधी खासदारांनी कागदाचे गोळे बनवून त्यांच्यावर फेकले. त्यानंतर हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले.

या विधेयकांमध्ये एक तरतूद आहे- जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला पाच वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक केली गेली किंवा ३० दिवसांसाठी ताब्यात ठेवले गेले तर त्याला पदावरून काढून टाकले जाईल
तत्पूर्वी, माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल, २०२५ सादर केले, जे ऑनलाइन पैशाच्या गेमवर पूर्ण बंदी घालते.

याशिवाय, मतदार पडताळणी आणि मतचोरीवर संसदेत विरोधकांचा निषेध सुरूच आहे.

अटक किंवा 30 दिवसांसाठी ताब्यात असल्यास PM-CM चे पद जाणार

नवी दिल्ली – गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत ३ विधेयके सादर केली. त्यात अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला ५ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी अटक केली गेली किंवा ३० दिवसांसाठी ताब्यात ठेवले गेले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल.

ही तीन विधेयके…

केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक २०२५
१३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५
जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक २०२५
लोकसभेत तिन्ही विधेयकांविरुद्ध बराच गोंधळ झाला. विरोधकांनी तिन्ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली. काँग्रेस आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी निषेध केला. समाजवादी पक्षाने या विधेयकांना न्यायविरोधी, संविधानविरोधी म्हटले. यावर शहा यांनी ही विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याची मागणी केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ६ महिने आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांनी २४१ दिवस ताब्यात घेऊन तुरुंगात टाकल्यानंतरही राजीनामा दिला नाही. केजरीवाल हे पदावर असताना अटक झालेले पहिले मुख्यमंत्री होते.

तिन्ही विधेयकांबद्दल …

१. केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक २०२५

केंद्र सरकारच्या मते, सध्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा, १९६३ (१९६३ चा २०) अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांवर अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला पदावरून काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही.म्हणून, अशा प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा, १९६३ च्या कलम ४५ मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

२. १३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५

या विधेयकाबाबत केंद्राने म्हटले आहे की, गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मंत्र्याला काढून टाकण्याची संविधानात कोणतीही तरतूद नाही.

म्हणून, अशा प्रकरणांमध्ये पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना आणि राज्यांच्या किंवा राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या दिल्लीच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करण्यासाठी संविधानाच्या कलम ७५, १६४ आणि २३९AA मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

३. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक २०२५

जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ (२०१९ चा ३४) अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची तरतूद नाही. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ५४ मध्ये सुधारणा केल्यानंतर, गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना ३० दिवसांच्या आत काढून टाकण्याची तरतूद असेल.
केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की ही तिन्ही विधेयके लोकशाही आणि सुशासनाची विश्वासार्हता मजबूत करतील. आतापर्यंत, संविधानानुसार, फक्त दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींनाच पदावरून काढून टाकता येत होते. संवैधानिक पदांवर असलेल्या नेत्यांना काढून टाकण्याबाबत विद्यमान कायद्यांमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद नाही.

याबाबत कायदेशीर आणि राजकीय वाद आहेत. दारू धोरण प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतरही दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पदावर होते. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

येथे, तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी हे २४१ दिवस तुरुंगात असतानाही मंत्री होते. मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एमटीसी) मध्ये नोकरीसाठी पैसे देण्याच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली मनी लाँड्रिंग प्रकरणात जून २०२३ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बालाजीला अटक केली होती. त्यानंतरही ते १३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पदावर राहिले.

अटकेपूर्वी ते वीज, उत्पादन शुल्क आणि दारूबंदी खाते सांभाळत होते. अटकेनंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी त्यांना “खाते नसलेले मंत्री” म्हणून ठेवले आणि त्यांचे खाते इतर सहकाऱ्यांना वाटून दिले.

शाह आज मांडणार असलेल्या तीन विधेयकांमध्ये गुन्हेगारी आरोपांचा प्रकार निर्दिष्ट केलेला नाही, परंतु गुन्ह्यांसाठी किमान पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असावी. यामध्ये खून आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार यासारखे गंभीर गुन्हे देखील समाविष्ट असतील.

सिंहगड रोड उड्डाणपूल सुरू करण्यासाठी शिवसेनेचे “ॐ फट स्वाहा आंदोलन” मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री प्रकट व्हा – आगळेवेगळे आंदोलन

पुणे :
सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनसुद्धा फक्त सत्ताधारी नेत्यांच्या उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने आज आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पदमा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकुळ करंजावणे, अनंत घरत, किशोर रजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, वैभव हनमघर, पराग थोरात, दिलीप पोमण, राजाभाऊ चव्हाण, शिवा पासलकर, नाना मरगळे, नागेश खडके, प्रसाद गिजरे, मिलिंद पत्की, उमेश सुर्वे, अरुण घोघरे, दत्ता घुले, संग्राम गायकवाड, निलेश वाघमारे, महेश विटे, गणपत खटपे, धनंजय खाडे, प्रथमेश भुकन, कल्पेश वाजे, केतन शिंदे, विनायक नलावडे, आकाश यादव तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर “ॐ फट स्वाहा” म्हणत होम-हवन करून पूल जनतेसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान “सिंहगड रोडवासीयांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकवणाऱ्या सरकारचा निषेध होवो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले :
“पुलाचे काम जनतेच्या कररूपी पैशातून पूर्ण झाले असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या हव्यासापोटी नागरिकांची गैरसोय केली जात आहे. आज पुण्यातच असले तरी मुख्यमंत्री फडणवीस उड्डाणपुलाचे उद्घाटन करायला आले नाहीत. कारण फक्त दोन दिवसांच्या पावसात या नव्या पुलावर खड्डे पडले आहेत. पुढील पाच दिवसांत पूल सरकारने सुरू केला नाही तर शिवसेना स्वतःच्या पद्धतीने जनतेसह या पुलाचे उद्घाटन करेल.”
          यावेळी आंदोलनस्थळी पुणे मनपा चे प्रकल्प अधिकारी संभाजी कोटकर उपस्थित होते त्यांनी येत्या ४ दिवसात सर्व कामे पूर्ण करून हा उड्डाणपूल सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी महावितरणची ‘एक खिडकी सुविधा’

पुणे, दि. २० ऑगस्ट २०२५ :- पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने रास्तापेठ येथील कार्यालयात ‘एक खिडकी सुविधा’ उपलब्ध केली आहे. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.

          गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, पोलिस परवानगी, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी अहवाल इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. रास्तापेठ पावर हाऊस येथील मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रामध्ये पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. याकरिता अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश लोखंडे (मो. ७८७५७६७४९४) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, गणेश मंडळांनी या ‘एक खिडकी सुविधे’चा लाभ घ्यावा.

          गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. तसेच मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घ्यावी. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत.

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.

———————————-

एक खिडकी सुविधा केंद्र

पत्ता : मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र,

महावितरण, पावर हाऊस, तळमजला

रास्तापेठ, पुणे-११

संपर्क : श्री. अविनाश लोखंडे,

अतिरिक्त कार्यकारी अभियंता तथा नोडल अधिकारी,

मो. ७८७५७६७४९४

राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करा: हर्षवर्धन सपकाळ

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या.

मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२५
राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे, उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे तर नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. जेथे जिवीतहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नव्या काळातील बदल स्विकारणारी पीढी एमकेसीएलने घडवावी-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम संपन्न

पुणे, दि. २०: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्विकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एमकेसीएलच्या नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमात आपली भूमिका अदा करण्यासाठी राज्य शासन अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ.विवेक सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असतांना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे. या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल. क्वांटम कम्युटींग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपीटल आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे, या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न एमकेसीएलने करायला हवे. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल.

माहिती तंत्रज्ञान लाटेप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळातही आपल्याला पुढे रहावे लागेल. रोजगाराचे स्वरुप बदलत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली तर राज्य सरकार त्याला निश्चितपणे सहकार्य करेल. एमकेसीएलचे विविध उपक्रम समाजासाठी आणि शासनासाठी उपयुक्त ठरले आहेत. एमकेसीएलने विकसीत केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५० हजार पुस्तके वाचता येणार आहे. एमकेसीएलच्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात उत्तम प्रकारचे बदल एमकेसीएलने घडवून आणले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही समाजजीवनात नेहमी आव्हाने येत असतात आणि त्यांना उत्तरे शोधणाऱ्या व्यक्ती-संस्था उभ्या राहतात. जगात इंटरनेटची लाट आली असतांना डिजीटल विषमतेसंदर्भातील समाजजीवनापुढच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासोबत ते सर्वांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था उभी करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केले. समाजातील एक विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ लाभाचा विचार न करता दीर्घकालीन लाभ लक्षात घेऊन एमकेसीएलने जबाबदारीने उत्तम प्रकारचे कार्य केले. राज्यात साडेसहा हजार उद्योजकांचे जाळे आणि कोणत्याही क्षणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या माध्यमातून उभी राहीली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत आणू शकलो, अशा शब्दात श्री.फडणवीस यांनी एमकेसीएलच्या कार्याचे कौतुक केले.

राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात एमकेसीएलने महत्वाची भूमिका अदा करावी-अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या २५ वर्षात जगभरात अखंड ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य एमकेसीएलने केले. संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरूवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचविले. डिजीटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले. जगात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे विविध क्षेत्रात वेगाने बदल घडत असतांना बदलत्या तंत्रज्ञान युगासाठी तरुण पिढीला सक्षम बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे एमकेसीएल आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तंत्रज्ञान संशोधन संस्था उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञान युगात राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची गरज आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतर मानवी भांडवलात केले तरच देशाला प्रगती करता येईल. ज्ञान, कौशल्य, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज आहे. एमकेसीएलने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजीटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजाभिमुख उपक्रम आणण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्थेने या संदर्भात शासनाला उपयुक्त सूचना कराव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल.

आगामी काळ कृत्रिम बुद्धीमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे. नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमकेसीएलने अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवन सुलभ, समृद्ध आणि ज्ञानसमृद्ध करण्यात महत्वाची भूमिका अदा करावी, असे आवाहन त्यांनी केले. एमकेसीएल प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञानयात्रेतील डिजीटल प्रगतीत महत्वाचा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात येईल-आशिष शेलार

मंत्री ॲड.शेलार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ हा शासनासाठी अभिमानाचा विषय आहे. ज्ञान आणि कौशल्याला एमकेसीएल महत्व देत असल्याने ही ज्ञानमार्गातील चळवळ झाली आहे. २ कोटी प्रशिक्षणार्थींना संस्थेने माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. जगात प्रगती करतांना मराठी भाषेसोबत तंत्रज्ञानाचे शस्त्र आवश्यक आहे हे एमकेसीएलने ओळखले आणि डिजीटल साक्षरतेचा प्रसार केला. ६ हजारावर केंद्र सुरू करून कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेशही प्रशिक्षणात केला. डिजीटल साक्षरतेसंदर्भात उद्याच्या विषमतेला लक्षात घेवून भारतीयांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य एमकेसीएलने २५ वर्षात केले आहे.

ई-गव्हर्नन्सकडून एआय गव्हर्नन्सकडे वळतांना एमकेसीएलचे सहकार्य आणि सहभागीता अपेक्षित आहे. विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात एमकेसीएलच्या जोडीने माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य करेल आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा-डॉ.अनिल काकोडकर

यावेळी बोलतांना डॉ.काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलाढाल होत असतांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवूनदेखील समाज परिवर्तनाचे कार्य करणे शक्य आहे हे महाराष्ट्र ज्ञान मंडळाने दाखवून दिले. देशाच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रगती घडवून आणण्यासाठी ज्ञानक्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे. येत्या काळात विकसीत राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सामरिक आणि आर्थिक शक्तीसोबत तात्विक शक्ती मिळणे आवश्यक आहे आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. एमकेसीएलचे हेच उद्दीष्ट असायला हवे.

विविध प्रकारच्या क्षमता असणाऱ्या व्यक्तींच्या परस्पर सहकार्याने अधिक समृद्ध समाज निर्माण करू शकू. जगभरात संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. जगभरात उन्नत तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे. उद्योग आणि संशोधनाचा समन्वय साधण्यासाठी एमकेसीएलने प्रयत्न केल्यास देशाला आवश्यक कार्य करणे शक्य होईल. त्यासोबतच डिजीटल ज्ञानावर आधारित विषमता कमी करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणे सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार केल्यास ही विषमता लवकर दूर होऊन आर्थिक प्रगतीला गती मिळेल. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन डॉ.काकोडकर यांनी केले.

यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ.विवेक सावंत यांनी एमकेसीएलच्या वाटचालीची माहिती दिली. ६ हजार ३०० उद्योजकांनी समाज परिवर्तनाच्या उद्दीष्टाने एकत्रितरित्या कार्य करून एमकेसीलएलचे काम पुढे नेले आहे. ग्रीन कॉलर जॉबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एमकेसीएलने गेल्या २४ वर्षात सेवेतील आनंद घेतला, असे ते म्हणाले.

मराठी साहित्याबाबत अद्ययावत माहिती डिजीटलस्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी एमकेसीएलतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘मराठी साहित्यसृष्टी’ या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘प्रांजळाचे आरसे’ या पुस्तकाचे डॉ.काकोकडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ‘हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी एमकेसीएलने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात एमकेसीएलने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी एकेसीएलला मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे क्रेडीट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमाचे क्रेडीट्स विद्यार्थ्यांना मिळणार असून त्या विषयाचे पुढील शिक्षण घेतांना ते उपयोगात येणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकीत विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्य शासनाने पाच विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत, असेही श्री.पाटील म्हणाले.

देशभरात टाटा कॅपिटलचे सामाजिक उपक्रम; पाणी, आरोग्य, ऊर्जा व शिक्षण क्षेत्रांत १ दशलक्षहून अधिक जीवनांवर सकारात्मक प्रभाव

टाटा समूहाच्या वित्तीय सेवाक्षेत्रातील अग्रगण्य एनबीएफसी कंपनी टाटा कॅपिटल ने आपल्या सामाजिक उपक्रमांची गती कायम ठेवली असून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशभरातील १ दशलक्षहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोच साधली आहे. कंपनीने पाणी संवर्धन, क्लीन एनर्जी, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांत केंद्रित उपक्रम राबवून समाजात सकारात्मक योगदान दिले आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, “भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जबाबदार वित्तीय भागीदार” ही भूमिका बजावताना टाटा कॅपिटलने सामाजिक आणि पर्यावरणीय प्राधान्यक्रम आपल्या मुख्य व्यवसाय धोरणाचा भाग बनवले आहेत.

पाणी संवर्धनासाठी “जलआधार”

टाटा कॅपिटलच्या जलआधार उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २००+ गावांमध्ये पाणलोट क्षेत्रांचा विकास करण्यात आला. या उपक्रमातून २,५०० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली, ७९० पेक्षा अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन झाले आणि ५.४ लाखांहून अधिक नागरिकांना फायदा झाला. सरासरी ५.५ मीटरने भूजलपातळी वाढली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अंदाजे ₹३०,००० ने वाढ झाली.

क्लीन एनर्जी साठी “ग्रीन स्विच”

या उपक्रमांतर्गत ‘क्लीन एनर्जी’ विकासाच्या माध्यमातून १९ लोकवस्त्यांमध्ये सौरऊर्जा डिसेंट्रलाइज्ड, कम्युनिटी-ओन्ड सिस्टीमच्या माध्यमातून २४x७ पॉवर पोहोचवली गेली, ज्यामुळे ७,४०० हून अधिक नागरिक आणि १,२०० घरे विजेने उजळली. या उपक्रमाचा एकत्रित परिणाम म्हणून आजपर्यंत महाराष्ट्र, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील ९९ लोकवस्त्यांना वीज मिळाली असून २०,७०० हून अधिक नागरिकांना थेट फायदा झाला आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांच्या वार्षिक उत्पन्नात सरासरी ₹४०,००० इतकी वाढ झाली आहे.

आरोग्यासाठी “आरोग्यतारा”

उपचारक्षम अंधत्व नष्ट करण्याच्या दिशेने ६.१६ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली, तर ४४,००० हून अधिक दृष्टी परत आणणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमाद्वारे आजवर १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोच साधली गेली आहे.

शिक्षणासाठी “पंख” शिष्यवृत्ती

तरुणांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १२,००० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.

या उपक्रमांद्वारे टाटा कॅपिटलने केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक प्रगतीलाही हातभार लावण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.

रोमांचकारी फुटबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चॅम्पियन

सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बाजी मारली

पुणे, २० ऑगस्टः जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेची फाइनल मॅच नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूल आणि इनोवेरा स्कूल यांच्यामधील अटीतटीच्या सामन्याने झाली. पहिल्या हाफ मध्ये सुरूवातीच्या काही मिनीटात दोन्ही टीम कडून गोल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतू हा केवळ प्रयत्नच राहिला. दोन्ही टीमकडून झालेल्या उत्कृष्ट खेळीमुळे मॅच ०-० ने संपली. परंतू पेनाल्टी शूट आउट मध्ये ६-७ से बाजी मारून ध्रुव ग्लोबल स्कूल ने सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ जिंकून झोनलसाठी पात्र झाली आहे. फुलगांव येथील मैदानात नुकतीच संपन्न झालेल्या फानइल मॅचचा आनंद शंभर दर्शकांनी घेतला.
या विजयानंतर ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.
सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या फाइनल मॅचमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचा खेळाडू तरंग गुप्ता ने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या टूर्नामेंट मध्ये खेळाडूंना विशेष पुरस्कार ही देण्यात आले. १५ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाचे ध्रुव ग्लोबल स्कूलकडून कर्णधार वीरेश नाईक यांने नेतृत्व केले. या टीम मध्ये अनीश परातणे, कृष्णा बालवड, रुशील कौल, युवांश सिंग, हदय लोढा, अर्णव उपाध्याय, सिद्धार्थ दुबे, अर्णव कोरे, तरंग गुप्ता, अन्वेश खांडे, पार्थ लांडे, रणवीर जिंदाल, सुब्रमणि मायाप्पनवर, अर्णव महामुने या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूंना स्कूलचे प्रशिक्षक अमेय कलाटे व पार्थ सैकिया यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून खेळाडूंकडून कठोर परिश्रम करून घेतले.

आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात

डॉ. मेधा कुलकर्णीं यांची संसदेत लक्षवेधी; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व मजुरांना प्रमाणीकरणात अडचणी

नवी दिल्ली : नागरिकांना आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत राज्यसभेत बुधवारी खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व ग्रामीण भागातील मजुरांना या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आधार हा अडथळा नसून सर्वसमावेशक कल्याणाचा मार्गदर्शक साधन ठरला पाहिजे,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत विशेष उल्लेख (लक्षवेधी) करताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, अनेक नागरिकांचे बोटांचे ठसे झिजल्यामुळे, डोळ्यांच्या पडद्यावरील (रेटिनल) समस्या, शारीरिक अडथळे किंवा दीर्घकालीन आजारांमुळे बायोमेट्रिक पडताळणी होत नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य, जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शन, आरोग्य सुविधा, अगदी बँकिंग सेवांपासूनही वंचित रहावे लागत आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (युआयडीएआय) ‘एक्सेप्शनल एनरोलमेंट’ आणि चेहरा ओळख (फेशियल रिकग्निशन) तसेच ओटीपी-आधारित प्रमाणीकरण यांसारख्या पर्यायी उपाययोजना उपलब्ध असल्या, तरी त्या प्रत्यक्ष पातळीवर प्रभावीपणे अंमलात आणल्या जात नाहीत, असे त्यांनी नमूद केले. “फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना या पर्यायांविषयी माहिती नसते किंवा ते मदत करण्यास अनुत्सुक असतात,” असेही त्या म्हणाल्या.

या उपाययोजना करा: डॉ. कुलकर्णी
– पर्यायी आधार प्रमाणीकरण पद्धतींची मिशन मोडमध्ये अंमलबजावणी
– बायोमेट्रिक विसंगतीमुळे कोणताही नागरिक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये याची हमी
– जनजागृती मोहीम व तक्रार निवारण यंत्रणा उभारणे
– प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमून तातडीने सोडवणूक सुनिश्चित करणे

‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

७० वर्ष वरील सदस्यांना अतिरिक्त प्रतीवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार ‘

पुणे, दि. 20: जिल्ह्यातील नागरिकांना ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’चा (एमजेपीजेएवाय) लाभ मिळावा यासाठी
‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ तयार करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यानुसार कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. अंगीकृत रुग्णालयांमध्ये या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील वयोवृद्ध ७० वर्ष वरील सदस्यांना अतिरिक्त प्रतीवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’च्या माध्यमातून देणे शक्य होईल.

या योजनेअंतर्गत लाभार्थीला प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळविण्याकरिता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (एबी-पीएमजेएवाय कार्ड) कुटंबातील सर्व सदस्यांकडे असणे बंधनकारक आहे.

शासनाने हे कार्ड बनविणे अंत्यत सोपे केलेले आहे. लाभार्थ्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरमधून ‘आयुष्मान ॲप’ डाउनलोड करून त्यावर किंवा https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर आयुष्मान भारत गोल्ड कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करता येईल.

लाभार्थी स्वतः ‘आयुष्मान ॲप’वरून किंवा संकेतस्थळाला भेट देऊन कार्ड तयार करून घेऊ शकतात. तसेच आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्या माध्यमातूनही सदर कार्ड तयार करण्याची प्रक्रिया करता येईल. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेंतर्गत आपले व इतर इतर नागरिकांचे कार्ड काढण्याकरिता सहकार्य करावे व मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000

देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे.. खरे भारतीयत्व….!‘देशाच्या एकात्मते’प्रती निष्ठा.. हीच् राजीवजींना आदरांजली..!

  • डॉ श्रीपाल सबनीस

पुणे : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त आज कात्रज येथील, राजीव गांधी यांच्या पुतळ्यास डॉ. सबनीस व मान्यवरांचे हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज झाला, त्यावेळी डॉ.  सबनीस बोलत होते. यावेळी त्यांनी राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की धर्मनिरपेक्षता भारत देशाचा आत्मा असून त्याच तत्त्वाच्या आधारे आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. राजीव गांधी यांनी त्यासाठी दिलेले योगदान संस्मरणीय आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास दादा पवार होते. ते म्हणाले की आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधींचे मोठे योगदान असून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करणे व दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. ते पुढे म्हणाले की निष्ठावान काँग्रेसजन गोपाळ तिवारी यांनी पुण्यात दिवंगत पंतप्रधान स्व लाल बहादूर शास्त्री आणि स्व राजीव गांधी यांचे पुतळे उभे करून त्यांची स्मारके निर्माण केली ती सर्वांना प्रेरणा देणारी आहेत.
राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख आणि प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. ‘डीजीटल इंडीया’चा पाया भरणी राजीव गांधी यांनी त्याचवेळी केल्याने कोरोना सारख्या संसर्गजन्य काळात ही भारत थांबला नाही व ‘वर्क फ्रॅाम होम’ माध्यमातून विकास चक्र चालू राहिले.
उपस्थित मान्यवरांना शाल, तुळशीचे रोप व राष्ट्र ऊभारणीत महाराष्ट्राचे योगदान (धनंजय बिजले लिखित) पुस्तक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीकांत शिरोळे, राजीव जगताप, बाळासाहेब मारणे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, सुभाष थोरवे, उद्यान अधीक्षक डॅा जाधव, नंदकुमार पापळ, भोला वांजळे, राजेंद्र खराडे, आबा जगताप, संजय अभंग, ॲड फैयाज शेख, रमेश सोनकांबळे, धनंजय भिलारे, नरसिंह अंदोली, गणेश मोरे, बाळासाहेब बाणखेले, सुभाष जेधे, महेश अंबिके, ॲड संतोष जाधव, ॲड स्वप्नील जगताप, शंकर शिर्के, अशोक काळे, राजेश सुतार, विकास दवे, सौ मनीषा फाटे, मारुती पानसरे, इत्यादी उपस्थित होते. ॲड.  फैयाज शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

पुणे, दि.२०: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयावर जनजागृती करण्याकरिता गणेश मंडळांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. शेलार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. प्रसिद्ध गणेश मंडळे, गणेश मंदीराचे भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलांचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करुन उपक्रमाचे आयोजन करावे. महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करुन द्यावी. आरती करणाऱ्या भजनी मंडळाना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून याबाबतच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे, याचा मंडळांना लाभ देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी,

गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय आस्थापनाच्या इमारती, वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करुन रोषणाई करावी. विसर्जनाबाबत निर्गमित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी. विदेशी विद्यार्थी, नागरिक, विदेश दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी.

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना सन्मान झाला पाहिजे, अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे. समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा.

गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी

यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन ॲड शेलार यांनी यांनी केले.

यावेळी आमदार श्री. शिरोळे आणि श्री. रासने यांनी गणेशोत्सव आयोजनाबाबत सूचना केल्या.

यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या तयारी, सोई-सुविधांबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील आयोजित धान्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-

समुत्कर्ष ग्राहकपेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित धान्य महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऐन गणेशोत्सवापूर्वी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो कोथरुडकरांनी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या धान्यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.

कोथरुड मधील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध मिळावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ॲागस्ट २०२४ रोजी समत्कर्ष ग्राहक पेठ सुरु करण्यात आली. या ग्राहक पेठेमुळे नागरिकांना दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासोबतच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त कोथरुडकर या सुविधेचा लाभ घेत आहेत.

यंदाच्या १६ ॲागस्ट रोजी या ग्राहक पेठेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १९ आणि २० ॲागस्ट रोजी कर्वे रोड येथील हर्षल हॅाल येथे दोन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी कडधान्य, डाळी सर्वसामान्य ग्राहकांसाठी १५ टक्के आणि समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या सभासदांना ३० टक्के सवलतीच्या दरात खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवातून उपलब्ध करुन देण्यात आली.

या महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत, धान्य खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास २० हजार नागरिकांनी धान्य खरेदी केली. आगामी काळात ही कोथरुडकरांसाठी अशा पद्धतीचा धान्य महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ना. पाटील यांनी यानिमित्ताने केली.

खडकवासल्यातून सकाळी 10 वा. 39138 क्यूसेकचा विसर्ग ..पण १२ नंतर पावसाची उघडीप

पुणे-खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35310 क्युसेक वाढवून सकाळी 10.00 वा. 39138 क्यूसेक करण्यात आला आहे.दरम्यान पावसाचे प्रमाण आता कमी होऊ लागल्याने दुपारी १२.०० वा. पानशेत धरणामधून नदी पात्रामध्ये सुरू असणारा १२३०८ क्युसेक विसर्ग कमी करून सांडव्याद्वारे ९५१२ क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे ६०० क्युसेक का एकूण १०११२ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.तसेच दुपारी 12.00 वा. वरसगाव धरणामधून नदी पात्रामध्ये सुरू असणारा. 12416.95 क्युसेक विसर्ग कमी करून सांडव्याद्वारे 9505.40 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे 600 क्युसेक एकूण 10104.5क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. या दृष्टीने अशी परिस्थिती राहिल्यास धरणातून नदीत होणारा पाण्याच्या विसर्गात देखील कमतरता केली जाण्याची शक्यता आहे, मात्र पाउस वाढला तरच विसर्ग वाढेल हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

20 Aug Rains & Seasonal RF so far, 1500+mm

महाबळेश्वर 301.0 / 4869.4 mm रत्नागिरी 105.2 / 2330.2 mm. कुलाबा 107.2 / 1513.0 mm डहाणू 151.0 / 1622.0 mm सांताक्रूझ 209.0 / 2310.7 mm ठाणे 195.6 / 2337.0 mm माथेरान 438.4 / 4247.6 mm