पुणे, दि. 21 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव या कार्यालयाच्या अधिनस्त आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, हडपसर, पुणे करिता 300 ते 500 विद्यार्थी निवासी राहु शकतील अशी सर्व सोयी-सुविधायुक्त शासकीय किंवा खाजगी इमारत भाडेतत्वावर शासकीय दराने घ्यावयाची आहे. वसतीगृहाची इमारत शिवाजीनगर, स्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन या परीसरात असणे आवश्यक आहे.
इमारत भाड्याने देण्याकरिता इच्छुकांनी परीपूर्ण कागदपत्रांच्या छांयाकित प्रती आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, अतुल टकले नगर, लाईन नं. २, गोपाळपट्टी मांजरी, हडपसर, पुणे येथे सादर करावीत. तसेच अधिक माहितीसाठी गृहपाल अर्चना पवार (मो.नं. 9921403882) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय वसतीगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर मिळणेबाबत आवाहन
अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा –बाळासाहेब थोरात कडाडले
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुका एकवटला
नवीन लोकप्रतिनिधीचा संगमनेरचा विकास मोडण्यासाठी हत्यार म्हणून वापर
संगमनेर–राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.
स्वाभिमानी संगमनेर तालुका ,सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा संपन्न झाला यामध्ये तालुक्यातील 25000 नागरिकांनी सहभाग घेऊन यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा केला.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह मध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे .गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. सप्ताहांचे आयोजित केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला.
नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का. भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे.
नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही.
. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे .आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत.
यावेळी विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.
मोर्चाला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला खडसावले–शांती मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातील गावागावातून अनेक कार्यकर्ते गाड्या भरून संगमनेर शहरांमध्ये येत होते. मात्र या मोर्चामध्ये लोक येऊ नये याकरता पोलिसांनी चारही दिशांनी गाड्या अडवल्या ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का असा सवाल करताना हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला.
बाळासाहेब थोरात यांचा लावरे तो व्हिडिओ-घुलेवाडी येथील घटनाही नियोजित षडयंत्र होते. यासाठी मागील दहा दिवसांपूर्वीच प्लॅनिंग सुरू असल्याचे विविध व्हिडिओ व पुरावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तमाम जनतेला दाखवले असून प्रत्येक आरोपाचे खंडन करत हे षडयंत्र कसे रचले गेले संग्राम भंडारे कसा खोटा बोलत आहे. त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही. भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचे हे षडयंत्र दाखवताना लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी सर्व पुरावे सादर केले यावेळी तमाम जनतेने भंडारे याचा तीव्र निषेध केला
बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२५
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘मूंह में राम, बगल में छुरी’, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. महात्मा गांधी यांचा खून करण्याआधी नथुराम गोडसे सुद्धा गांधीजींच्या पाया पडला व नंतर तीन गोळ्या झाडल्या हा इतिहास आहे. आजही त्या गोडसेचे गुणगान गाणाऱ्या औलादींना भाजपा पोसत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धमकी देणारा म्हणतो ‘आम्ही नथुराम गोडसे होऊ’ ते तर नथुराम गोडसे आहेतच पण तुमचा पक्षही नथुराम गोडसेंच्या विचाराने चालला आहे. तर बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील वातावरण खराब करावे म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अशी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा काहींचा प्रयत्न दिसत आहे..
सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष अशा लोकांना का पाळतो, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. भाजपाने असे राजकारण करू नये आणि आज भाजपा विरोधकांवर ज्यांना सोडतो तेच उद्या भाजपाच्या अंगावर येतील असा इशारा देत अशा धमक्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच प्रोत्साहन आहे त्यामुळे कारवाई होणारच नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया तातडीने राबवा
रिंगरोडसह इतर महत्वाच्या प्रकल्पांचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला आढावा
पुणे (दि.२१) : शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध यंत्रणांमार्फत उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. गुरुवारी त्यांनी औंध कार्यालयात विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत तातडीने अपेक्षित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पुणे शहरासह इतर काही भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठोस पावले उचलली जात आहेत. हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ते रुंदीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यासह रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरु असून त्यासंबंधी तातडीने मोजणी करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले.
या बैठकीत नाशिक फाटा ते राजगुरुनगर (NH-60) या मार्गावरील एलीव्हेटेड कॉरिडॉरच्या अप्रोच रॅम्पसाठी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, चाकण (ता. खेड) या गावातील मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले. यासह चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्य वळण रस्ते तयार करण्याबाबत चर्चा झाली.
मुळशी तालुक्यातील बालेवाडी ते शेडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे – माण यासह इतर मार्गावरील भूसंपादन प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला. नवले ब्रिज भागातून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, सह आयुक्त हिम्मत खराडे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, पुणे महानगरपालिका, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिंग रोडच्या भूसंपादनावर चर्चा
रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात नाशिक हायवे ते नगर रोड या दरम्यानच्या सोलू, सोलू इंटरचेंज, वडगाव शिंदे आणि निरगुडी या गावांमधील मोजणी पूर्ण झाली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात नगर हायवे ते सोलापूर हायवे या मार्गावरील आंबेगाव खुर्द आणि भिलारेवाडीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापूर रोड ते सातारा रोड आणि चौथ्या टप्प्यात सातारा ते पौड रोड या मार्गावरील भूसंपादन प्रक्रियेवर चर्चा झाली. रिंग रोडसाठी टप्प्याटप्प्याने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रवीण दवणे यांची निवड
पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाचे यंदा डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात येणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रांतपाल संतोष मराठे आणि संमेलन प्रमुख मधुमिता बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष असून संमेलन शनिवार, दि. 20 आणि रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासक यांची यंदाच्या संमेलनातही उपस्थिती असणार आहे.
प्रा. प्रवीण दवणे गेली 35 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून त्यांच्या कविता, गीतरचना, ललित गद्य, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध क्षेत्रांतील लेखनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या विविध पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून अनेक साहित्यकृतींना विविध पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले आहे. आजवर त्यांची 140 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील सावर रे!, थेंबातलं आभाळ, रे जीवना, आयुष्य बहरताना, आनंदोत्सव, स्पर्शगंध, मनातल्या घरात, मैत्रबन, अथांग, प्रश्नपर्व या साहित्यकृती वाचकांच्या पसंतीस उतरल्या असून त्यांनी विपुल प्रमाणात बालवाङ्मय निर्मिती केली आहे.
रंगमेघ, ध्यानस्थ, पाऊस पहिला, हे शहरा, गंधखुणा, रुजवात, तो येतोय, एक कोरी सांज, नव्या निरभ्रासाठी आदी काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. प्रा. प्रवीण दवणे यांना साहित्य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले असून त्यांची विविध विषयांवर व्याख्यानेही झाली आहेत.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. आजच्या संगणक तंत्रस्नेही काळात मराठी वाचन संस्कृतीची अभिवृद्धी व्हावी हा संमेलन आयोजित करण्यामागील हेतू आहे.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार:सरकारने दिली परवानगी
बहुराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यापासून थांबवणार नाही
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारत सरकारने गुरुवारी यासाठी परवानगी दिली आहे. सरकारने सांगितले – बहुराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यास कोणतीही बंदी नाही. आमचा संघ ना पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार आहे, ना आम्ही त्यांना भारतात खेळण्यासाठी येऊ देणार आहोत.
क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती शेअर केली आहे.क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने एक पत्र शेअर केले, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचे धोरण स्पष्ट केले होते.

तथापि, आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (मग ते भारतात असो किंवा परदेशात), भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांचे नियम आणि त्यांच्या खेळाडूंचे हित लक्षात घेऊन निर्णय घेईल. भारतीय संघ आणि भारतीय खेळाडू त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील ज्यामध्ये पाकिस्तानी संघ आणि खेळाडू देखील सहभागी होतील. हे अगदी तसेच आहे जसे पाकिस्तानी संघ आणि खेळाडू देखील भारतात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील.
पाकिस्तानसोबत खेळण्यास विरोध का होतोय
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, क्रिकेट आशिया कपमध्ये भारताच्या पाकिस्तानसोबत खेळण्यास विरोध आहे. बिहारमधील राजगीर येथे भारताने आयोजित केलेल्या हॉकी आशिया कपमधूनही पाकिस्तानने माघार घेतली आहे. यासंदर्भात लोकसभेत पावसाळी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. माजी क्रिकेटपटूंच्या भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) मध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता.
आशिया कपचे यजमानपद भारताकडे आहे, पण ही स्पर्धा यूएईमध्ये होत आहे.
यावर्षी भारत क्रिकेट आशिया कपचे यजमान आहे. पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर तो यूएईमध्ये होत आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. टीम इंडियाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध असेल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ सामने होऊ शकतात
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामने होऊ शकतात. पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. २ सामन्यांबद्दल आणि ते कसे शक्य आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या…
दुसरा सामना: आशिया कपमधील लीग टप्प्यानंतर, सुपर-४ फेरी होईल. जर भारत आणि पाकिस्तान सुपर-४ फेरीत पोहोचले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना २१ सप्टेंबर रोजी होऊ शकतो.
तिसरा सामना: जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आशिया कपचा तिसरा सामना २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल.
देवाभाऊ..अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा,वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा! माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का?
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना आवाहन
मुंबई-अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित केली पाहिजे. इतर राज्यांतील शहरांचा विकास केल्याशिवाय मुंबईवरील ताण कमी होणार नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत मांडले.
राज ठाकरे म्हणाले की, सरकारी जमिनींवर झोपडपट्ट्या उभ्या राहतात, पण खासगी जागांवर मात्र कधीही झोपडपट्टी दिसत नाही. याचा अर्थ सरकारला कुठे तरी ठाम भूमिका घ्यावी लागेल. फक्त अर्बन नक्षल यांचा बागुलबुवा निर्माण करून उपयोग नाही. वाहतूक शिस्त हीही एक अत्यंत गरजेची बाब आहे. गौतम अदानी यांच्या घशात जमिनी घातली जात आहे. तिथे काय विकास होणार आहे. उंच इमारती बांधून काही होणार नाही, त्यासाठी जमिनीवर विकास करावा लागेल.
गेल्या काही महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, राज ठाकरे यांनी सांगितले की त्यांनी वाहतूक कोंडी, पार्किंग आणि शहर नियोजनावर आधारित सविस्तर आराखडा सरकारला दिला आहे. मैदानी जागांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचे पार्किंग करता येईल, आणि त्या मैदानांचा उपयोग पूर्ववत राहील, असे त्यांनी सूचवले.
राज ठाकरे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलिस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले.
राज ठाकरे म्हणाले की, शहरांमध्ये दररोज माणसं आणि इमारती वाढत आहेत, पण रस्ते मात्र तेवढेच राहिले आहेत. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली अनधिकृत गोष्टी घडत आहेत. पार्किंगची शिस्त लावणं अत्यावश्यक आहे. जे पार्किंग लॉट उभारले आहेत, तिथेही लोक गाड्या लावत नाहीत. ही वृत्ती बदलली पाहिजे. दादरमध्ये 70-80 हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दर आहे. तुम्ही रस्त्यावर गाडी पार्क करता तेव्हा ती किती जागा व्यापते हे पाहा. मग पार्किंगसाठी पैसे द्यायला कोणी कचरतं का? सगळं फुकट मिळण्याची अपेक्षा ठेवू नये.
राज ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी विविध शासकीय संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही सांगितले. एका यंत्रणेला रस्ता करायचा असतो तर दुसरी तिथे पाइपलाइन साठी खणते. हे थांबवण्यासाठी एकत्रित नियोजन आवश्यक आहे. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर तुम्ही काय करता? गणपतीचे वाहन आहे म्हणून त्यांना घरात ठेवता का? नाही ना. मग, हे कोणते लोक आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसं रेल्वेखाली चिरडून मरतात, खड्ड्यांमध्ये पडून मरतात, पण माणसांपेक्षा कबुतर महत्त्वाची झाली आहेत. हा एक राजकीय विषय आहे. काही लोकांना यावर राजकारण करायचं होतं, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही अशा भलत्याच विषयांवर लक्ष देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते खराब झालेच पाहिजेत. कारण ते खराब झाले तरच नवीन टेंडर निघतात
राज ठाकरे म्हणाले की, रस्ते खराब झालेच पाहिजेत. कारण ते खराब झाले तरच नवीन टेंडर निघतात. खड्डे बुजवण्यासाठी नवीन टेंडर काढले जातात. हे सर्व एक प्रकारचे साटंलोटं आहे, जिथे राजकारणी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू आहे.अनेक वर्षांपासून हे सुरू असले तरी, निकृष्ट काम करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराला शिक्षा होत नाही. लोक खड्ड्यांमुळे मरत आहेत, तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. ही समस्या केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रा पुरती मर्यादित नसून, देशभरातील सर्व शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील खड्डे दिसतात, पण त्यांच्या स्वतःच्या राज्यातील रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही.
बेस्टच्या पराभवावर म्हणाले…बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. उद्धव आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकत्र येत ही निवडणूक लढवली. त्यामुळे ती विशेष चर्चेत होती. मात्र, या निवडणुकीत ठाकरेंना पराभवाला सामोरे जावे लागले. तर शशांक राव यांच्या पॅनेलचे 14 उमेदवार विजयी झाले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले. या पराभवाबद्दल राज ठाकरे यांना आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी तुम्हाला रोज आग लावायला हवं, असा टोला प्रसारमाध्यमांनाच मारला. शिवाय या निवडणुका छोट्या आहेत. या लहान गोष्टी आहेत. कुठल्या निवडणुकांबद्दल तुम्ही बोलता? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. त्या स्थानिक निवडणुका आहेत म्हणत जास्त बोलणे टाळले.
“दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या की….
पुणे : धायरी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डीपी रोडच्या कामाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, धायरीचा डीपी रोड केवळ आश्वासनांत न राहता तातडीने पूर्ण व्हावा.यासाठी होर्डींग्ज झळकावून ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, “दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या की. दादा तुम्ही आल्यानंतरच धायरीचा डीपी रोड होणार आहे.”
धायरी परिसरातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची अवस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे डीपी रोडचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामस्थांचा ठाम इशारा आहे की, धायरी गावाचा डीपी रोड प्रत्यक्षात आल्याशिवाय नागरिक शांत बसणार नाहीत.
GSTच्या 5% आणि 18% स्लॅबला मंत्रीगटाची मान्यता:4 ऐवजी 2 स्लॅब असतील, यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील
या वस्तू स्वस्त होतील: त्यांच्यावरचा कर १२% वरून ५% पर्यंत कमी केला जाईल:सुका मेवा, ब्रँडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, केसांचे तेल, सामान्य प्रतिजैविक, वेदनाशामक औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स, गोठवलेल्या भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, काही संगणक, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गीझर यासारख्या वस्तू स्वस्त होतील.याशिवाय, नॉन-इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम क्लीनर, १,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५००-१,००० रुपयांमधील शूज, बहुतेक लसी, एचआयव्ही/टीबी डायग्नोस्टिक किट, सायकली आणि भांडी यावरही कमी दराने कर आकारला जाईल.भूमिती बॉक्स, नकाशे, ग्लोब, ग्लेझ्ड टाइल्स, प्री-फॅब्रिकेटेड इमारती, व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतूक वाहने, कृषी यंत्रसामग्री, सौर वॉटर हीटर यासारख्या उत्पादनांचा समावेश १२% कर स्लॅबमध्ये होतो. दोन स्लॅबच्या मंजुरीनंतर, यावर ५% कर आकारला जाईल.
या वस्तूही स्वस्त होतील: त्यांच्यावरचा कर २८% वरून १८% पर्यंत कमी केला जाईल:सिमेंट, सौंदर्य उत्पादने, चॉकलेट, रेडी-मिक्स काँक्रीट, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, खाजगी विमान, प्रथिने सांद्रता, साखरेचा पाक, कॉफी सांद्रता, प्लास्टिक उत्पादने, रबर टायर, अॅल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस.
नवी दिल्ली-
जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५% आणि १८% स्लॅबना मान्यता दिली आहे. लक्झरी वस्तू ४०% च्या ब्रॅकेटमध्ये येतील. जीओएमचे संयोजक सम्राट चौधरी यांनी ही माहिती दिली. सध्या जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब आहेत.
GOM बैठकीबद्दल, त्याचे निमंत्रक सम्राट चौधरी म्हणाले – आम्ही केंद्र सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे, जो 12% आणि 28% च्या GST स्लॅब रद्द करण्याबद्दल बोलतो.
केंद्राच्या प्रस्तावांवर सर्वांनी आपापल्या सूचना दिल्या. काही राज्यांनीही काही आक्षेप घेतले. ते जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आले आहे जे त्यावर निर्णय घेईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, यावर्षी दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत.सामान्य लोकांसाठी कर कमी होतील, दैनंदिन वस्तू स्वस्त होतील.
जीओएम ही सरकारची एक विशेष समिती आहे, ज्यामध्ये विविध राज्यांतील वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. जीएसटीशी संबंधित जटिल मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि शिफारसी करण्यासाठी, जसे की कर दर बदलणे किंवा महसूल विश्लेषण करणे, ही समिती स्थापन केली जाते. जीएसटी परिषदेला सूचना देते, जी अंतिम निर्णय घेते.यामध्ये ६ ते १३ सदस्य असू शकतात. उदाहरणार्थ, जीएसटी दर सुसूत्रीकरण मंत्रीगटात ६ सदस्य आहेत. त्यात बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळ येथील प्रतिनिधींचा समावेश आहे. आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी मंत्रीगटात १३ सदस्य आहेत.
GOM च्या मंजुरीनंतर पुढे काय होईल?
जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत जीएसटी परिषदेसमोर आता जीएसटीच्या शिफारशी मांडल्या जातील. अशा मोठ्या बदलांवरील निर्णय जलद गतीने घेतल्याने ही बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे.
सर्व राज्ये परिषदेत त्यांचे विचार मांडतील. काही राज्यांनी आधीच काही आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांवर चर्चा केली जाईल आणि सर्वांना सहमती देण्याचा प्रयत्न केला जाईल.
जर परिषदेने हा प्रस्ताव ७५% बहुमताने मंजूर केला तर केंद्र आणि राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक पावले उचलतील.
नवीन दर कधी लागू होतील याची तारीख निश्चित केली जाईल आणि व्यवसाय/ग्राहकांना आगाऊ माहिती दिली जाईल जेणेकरून ते तयार राहू शकतील.
जीएसटी परिषदेत केंद्र आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी (सहसा अर्थमंत्री) असतात. केंद्रीय अर्थमंत्री त्याचे अध्यक्ष असतात.जर परिषदेने हा प्रस्ताव ७५% बहुमताने मंजूर केला तर केंद्र आणि राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक पावले उचलतील.
जीएसटी कौन्सिलच्या बैठका सहसा दर काही महिन्यांनी होतात. हा प्रस्ताव मोठा असल्याने आणि मंत्रिगटाने आधीच पाठिंबा दिल्यामुळे, पुढील बैठक कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२५ मध्ये होईल. जर मंजूर झाली तर नवीन दर २०२६ च्या सुरुवातीला लागू होऊ शकतात.
प्रसिद्धी ही कार्याच्या प्रामाणिकपणावर ठरते-ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न. म. जोशी
श्री संत सेना महाराज नाभिक एकता संघाच्यावतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम
पुणे : प्रसिद्धी ही नेहमी कार्याच्या प्रामाणिकपणावर ठरते. समाजात आज केवळ विसंवाद, वाद-विवाद आणि स्पर्धा हे पहायला मिळतात. आजच्या काळात समाजातले मूर्ख, स्वार्थी लोक यांची योग्य ती ‘हजामत’ होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले
श्री संत सेना महाराज नाभिक एकता संघ पुणे शहराच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन पद्मावती येथील विणकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी बाळकृष्ण भामरे आणि संजय चित्ते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रामदास सैंदाणे, भिकन वाघ, मनोज अहिरराव, योगेश फुलपगारे, समाधान निकम, पंडित निकम, कैलास नेर पगारे, योगेश पगारे, सुनील पगारे, विलास बोरसे, कमलेश वेळीस, दीपक निकम, डॉ. अरविंद झेंडे, प्रशांत राऊत, शशांक सुर्वे, मंगेश वेळीस, चंद्रकांत जगताप यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. न.म. जोशी म्हणाले, खरी ताकद भक्तीत असते. संत सेना महाराजांची विठ्ठलभक्ती इतकी निर्मळ, नि:स्वार्थ आणि परिपूर्ण होती की स्वतः विठ्ठल त्यांच्या सेवेसाठी धावून आला. खरी मोठेपणाची कसोटी ही यश, पैसा किंवा मानमरातब यात नसून भक्ती, सेवाभाव आणि समाजहित यात आहे.
श्री संत सेना महाराज पालखी सोहळ्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दिवसभरात प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, प्रवचन यांसह उपस्थितांची मनोगते झाली. पालखी सोहळ्यासह दिवसभर आयोजत करण्यात आलेल्या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘टाटा सॉल्ट’ने संपूर्ण भारतभर आपल्या ध्वनीमुद्रित जाहिरातीचा केला विस्तार
बुद्धिमान व तेजस्वी राष्ट्राच्या घडणीसाठी आयोडिनविषयी जागरूकतेला नवी गती
मुंबई : देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, भारतातील अव्वल क्रमांकाचे ब्रॅण्डेड आयोडिनयुक्त मीठ असलेले टाटा सॉल्ट आपल्या ‘नमक हो टाटा का… टाटा नमक’ या ध्वनी-आधारित जाहिरात-मोहिमेचा विस्तार करून अधिकाधिक भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. योग्य त्या पोषणाविषयी आणि विशेषतः मानसिक विकासासाठी आयोडिनची भूमिका, याबाबतच्या चर्चेला चालना देत, टाटा सॉल्ट आपली बांधिलकी पुढच्या पातळीवर नेत आहे. दूरदर्शन व डिजिटल माध्यमांवर यशस्वी वाटचाल केल्यानंतर टाटा सॉल्ट हा ब्रॅंड आता ग्रामीण आणि निम-शहरी भागांत, महत्त्वाच्या प्रवासी थांब्यांवर ध्वनीप्रसारणांद्वारे आपली जाहिरात मोहीम विस्तारत आहे.
या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे ‘टाटा सॉल्ट’ची वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी-ओळख! नव्या रूपात ही ओळख साकारून चार काळजीपूर्वक तयार केलेल्या चित्रफितींमधून ती सजीव करण्यात आली आहे. सांस्कृतिक परिचय आणि राष्ट्रीय हेतू यांवर आधारलेली ही जाहिरात, आयोडिनच्या पुरेशा सेवनामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर होणारा आणि त्यातून राष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीवर पडणारा महत्त्वाचा परिणाम अधोरेखित करते. रोजच्या स्वयंपाकघरातील एक साधा पदार्थ भविष्यातील सशक्त राष्ट्रनिर्मितीचा शांत पण प्रभावी घटक ठरू शकतो, असा संदेश ही जाहिरात देते.
व्यापक प्रमाणात अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, गाझियाबाद, नागपूर आणि दिल्ली जंक्शनसारख्या रेल्वे स्थानकांवर, बसस्थानकांवर तसेच प्रवासी व्हॅन्सवर ‘नमक हो टाटा का… टाटा नमक’ ही जिंगल प्रसारित केली जात आहे. ही मोहीम आता पुढे वाढत मुझफ्फरपूर, पाटणा जंक्शन, हाजीपूर, आग्रा, प्रयागराज, वाराणसी, लखनौ चारबाग, इंदूर, भोपाळ, इटारसी, कटनी, सतना, नाशिक रोड, सोलापूर, खरगपूर, संत्रागाछी, मेचेदा इत्यादी महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत पोहोचत आहे. ग्रामीण भागातही आपला विस्तार साधण्यासाठी टाटा सॉल्टने महाराष्ट्रातील आणि राजस्थानातील प्रमुख बसस्थानकांवरही ध्वनीप्रसारण मोहीम सुरू केली आहे. पारंपरिक माध्यमांना ग्राहकांशी दृढ नाते निर्माण करण्यात अडचण येणाऱ्या अशा ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्या लोकांपर्यंत टाटा सॉल्ट ब्रॅंडचा संदेश पोहोचत आहे.
ग्रामीण भागात लोकांशी संपर्क सुलभतेने व्हावा या धोरणाचा भाग म्हणून टाटा सॉल्ट ‘आयोडिन एक्सप्रेस’ या मोहिमेअंतर्गत व्हॅनच्या माध्यमातून जाहिराती सादर करीत आहे. बिहारमधील २८ शहरांपर्यंत या व्हॅन पोचल्या आहेत. शालेय विद्यार्थी, तसेच बाजारपेठा, गावातील गल्लीबोळ, आठवडी बाजार येथील व्यापक समुदायांना यामध्ये लक्ष्य केले जात आहे. आयोडिनच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, सॅंपल म्हणून मिठाचे वाटप करणे आणि तळागाळात ब्रॅंडविषयी आत्मीयता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या अशा लक्ष्यित प्रयत्नांतून ‘टाटा सॉल्ट’च्या उद्देशपूर्ण व सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी संवाद साधण्याच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रत्यंतर येते. हा ब्रॅंड आपला संदेश केवळ पडद्यावर न ठेवता तो थेट रस्त्यावर नेऊन, प्रवाही ध्वनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या दीर्घकालीन नाते जोडत राहतो.
भारत आपला स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन साजरा करत असताना, टाटा सॉल्ट स्वतःची ओळख केवळ स्वयंपाकघरातील आवश्यक घटक म्हणूनच नव्हे, तर ‘देश का नमक’ म्हणून पुन्हा सिद्ध करीत आहे. भारताच्या, विशेषतः ग्रामीण भागाच्या हृदयापर्यंत पोहोचणारा आणि आयोडिनच्या महत्त्वाबाबत जागरूकतेची सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी विश्वासार्ह सोबती ठरणारा हा ब्रॅंड झाला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे, दि. २०; महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षेचा अंतिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाकडे दिनांक १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत हस्त पोहोच देण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
000
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण
पुणे, दि.२०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे बुधवारी (दि.२०) लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, मुख्य अभियंता रिनाज पठाण आदी उपस्थित होते.
महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाबाबत माहिती दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्प
पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे.
मनमोकळ्या शब्दयात्रेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची साहित्य सफर
मुंबई, दि. १९ ऑगस्ट २०२५ — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे ‘मनमोकळे शब्दयात्री’ या दूरदर्शन सह्याद्रीवरील विशेष साहित्य प्रवासात प्रेक्षकांना भेटणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती बागुल-जगदाळे करणार असून, डॉ. गोऱ्हे यांच्या साहित्य प्रवासातील अनुभव, लेखनाची वाटचाल आणि समाजकारणाशी जोडलेला त्यांचा दृष्टिकोन यावर या वेळी मनमोकळ्या गप्पा रंगणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता होणार आहे. तर पुनःप्रसारण गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता तसेच रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
साहित्य, समाज आणि संवेदनशील विचारांची ही अनोखी भेट प्रेक्षकांनी दूरदर्शन सह्याद्रीवर नक्की अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने ‘साई’ ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल – मुख्यमंत्री
पुणे, दि. २०: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात ‘साई’ ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या (एसएआयआय- साई) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, यावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालक तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, एसएआयआयच्या संचालक प्रा. डॉ. लवलीन गौर आदी उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत जाणून घेत या क्रांतीत आघाडी घेण्याची ही योग्य वेळ आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रात उपयोग करण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.
राज्यशासनाने एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना कळेल त्या भाषेत शंकाचे समाधान होऊ शकेल. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पुण्यातील वाहतूक विषयक अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी गुगलशी करार केला आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी आवश्यक माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. मानवाचे जीवन सुकर करण्यासाठी बहुविध पद्धतीने हे तंत्रज्ञान उपयोगात आणता येऊ शकते. राज्यशासनाने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित ३ संस्थांची सुरूवात केली आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासन, कृषी, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात या संस्था काम करणार असून त्यासोबतच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मुलभूत ज्ञानाबाबत नागरिकांना याद्वारे प्रशिक्षीत करण्यात येईल.
कृत्रिम बुद्धीमत्तेचा सकारात्मक उपयोग गरजेचा
सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वाँटम कंम्प्युटिंग आणि सेमी कंडक्टर या गोष्टींमुळे मोठे बदल घडून येत आहेत. अशा तंत्रज्ञानाच्या आव्हानांचा क्षमतेने उपयोग करून घेतल्यास प्रगतीचा वेग आणि कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. म्हणून अनुकूल विकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेला स्वीकारणे ही आजची गरज आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे डिजीटल आर्थिक फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेचा जबाबदार आणि सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील आरोग्य सेवेसाठी आणि औषध निर्मितीत एआयचा उपयोग याचेच एक उदाहरण आहे.
इंटरनेट क्रांतीप्रमाणे ‘एआय क्रांती’तही आघाडी घ्या
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या प्रसाराने समाजासमोर येणाऱ्या आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा रोजगारावर होणाऱ्या परिणामाविषयी विशेषत्वाने प्रश्न उपस्थित केले जातात. नव्वदीच्या दशकात इंटरनेट आणि संगणक क्रांतीच्या संदर्भातही अशीच शंका उपस्थित करण्यात आली होती, मात्र देशाने या क्रांतीचे संधीत रुपांतर करून भारतीयांनी जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज एआय क्षेत्राचे ज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवून या क्षेत्रातही आघाडी घेण्याची संधी आपल्याला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सिंम्बायोसिस संस्थेने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. मुजुमदार म्हणाले, कला, वाणिज्य, विज्ञान ज्ञानशाखांतील विद्यार्थ्यांसाठी पदवीस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक शिक्षण देणारी संस्था नसल्याचे ओळखून राज्यात प्रथमच अशा स्वरुपाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. येथे बी.बी.ए. इन एआय आणि बी.एस.सी. इन एआय हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मानवी विकासाच्या चौथ्या क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेची भूमिका महत्वाची आहे. आता भविष्यात तंत्रज्ञानासोबतच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित क्रांतीचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागतपर भाषणात डॉ. येरवडेकर म्हणाल्या, सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटची स्थापना अभियांत्रिकी शाखा विरहित कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. येथे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून पहिल्याच वर्षी १९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील काळात नागपूर येथेही अशी संस्था सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सिम्बायोसिसच्या ‘साई’ (SAII) या बहुभाषिक व्हर्चुअल असिस्टंटचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. रामकृष्णन रमण यांनी या बहुभाषिक व्हर्चुअल असिस्टंटबाबत माहिती दिली. प्रारंभी सिम्बॉयसिसच्या वाटचालीबाबत लघुचित्रफीत दर्शविण्यात आली.
यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0000
