Home Blog Page 344

पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

बुधवारी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. २६ ऑगस्ट २०२५) वर्षभर धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. बुधवारी (दि.२७) “श्रीं”ची प्रतिष्ठापना करून रात्री ९ वाजता, प्रसिद्ध दिग्दर्शक व सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष विनायक कुलकर्णी व मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त प्रवीण कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
वमंडळाची धार्मिक व सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखत या वर्षी गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे भजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, युवती व महिला भगिनींचे मर्दानी खेळ, निबंध, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, धीरज वानखेडे यांच्या भक्ती गीत आणि शिवगीतांचा कार्यक्रम आणि महिला भगिनींचा आवडता “खेळ पैठणीचा” अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष केतन जाचक, खजिनदार समीर कुदळे आणि उपखजिनदार सौरभ कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. सर्व स्पर्धा मोफत असून स्पर्धेतील बक्षीस विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील या जुन्या आणि नामांकित या मंडळाची स्थापना १९७६ साली झाली होती. माजी नगरसेवक नगरसेवक नंदकुमार जाधव, प्रदीप कुदळे, राजेंद्र परदेशी, दिपक उत्तेकर, गजानन गवळी, प्रवीण कुदळे अशा मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्ष पद भूषवून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून या वर्षीचा गणेशोत्सव विशेषत्वाने साजरा होणार आहे. गेल्या पाच दशकांपासून सुवर्ण मित्र मंडळाने समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेबरोबरच सामाजिक प्रबोधन करणे हा मंडळाचा प्रमुख हेतू आहे. सर्व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, तरुणाईचा उत्साह आणि महिला भगिनींच्या सहभागाने या वर्षी पंचक्रोशीत आदर्श ठरेल असे उपक्रम यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राबवून गणेशोत्सव अधिक उपयुक्त व आदर्शवत करण्याचा संकल्प केला आहे, सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी या उपक्रमांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सुवर्ण मित्र मंडळ, शंभू प्रतिष्ठान, पिंपरीगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :- बुधवारी, दि.२७ ऑगस्ट, रात्री नऊ वाजता, “श्रीं” चा आगमन सोहळा आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उदघाटन; गुरुवारी (दि.२८ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता, जेष्ठ नागरिकांचे भजन आणि “श्रीं”ची आरती आठ वाजता; शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता, विठ्ठल रुक्मणी भजनी मंडळ ,काळेवाडी यांचे भजन नंतर ८ वाजता “श्रीं”ची आरती; शनिवारी ( दि. ३० ऑगस्ट) दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत जेष्ठ नागरीक कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा, रात्री ८ वाजता “श्रीं”ची आरती; रविवारी (दि.३१ ऑगस्ट) सकाळी ११ ते दुपारी ३, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी सहा वाजता, सावतामाळी भजन मंडळ, पिंपरीगाव यांचे भजन, ७:३० वाजता युवती व महिला भगिनींचे मर्दानी खेळ त्यानंतर ८ वाजता “श्रीं”ची आरती;
सोमवारी (दि.१ सेप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता, तुळजाभवानी भजनी मंडळ यांचे भजन आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती; मंगळवारी (दि.२ सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता भजन आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती होईल;

बुधवारी (दि.३ सप्टेंबर) सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, रात्री आठ वाजता “श्रीं”ची आरती होईल; गुरुवारी (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजता धीरज वानखेडे यांच्या भक्ती गीत आणि शिवगीतांचा कार्यक्रम आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती होईल आणि महिला भगिनींचे विशेष आकर्षण असणारा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.५ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे त्यानंतर “श्रीं”ची आरती होईल या सर्व कार्यक्रमाला गणेश भक्तांनी, मंडळाचे हितचिंतक, देणगीदार आणि पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २६ : जिल्ह्यातून २७ ते २९ ऑगस्ट दरम्याण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते आळेफाटामार्गे ओतूर ते बनकर फाटामार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार असून दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरुन नारायणगाव मार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे. समाज बांधवांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी व कायदा व सुव्यसस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी २७ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्याण मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार नगर कल्याण मार्गावरील वाहतूक १४ नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगर मार्गे जातील.
नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे.

नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग क्र.५० व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलिस स्टेशन-नागापूर-रोडेवाडीफाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे.

नारायणगावकडून येताना बायपास क्र.६० मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळमार्गे मोर्चा जाताना जीवन खिंड-मंचर शहर-अवसरी फाटा ते जीवन खिंड-नंदी चौक अशी वळविण्यात आली आहे.

खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील.

जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र.४८ वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरुन द्रुतगती मार्गावरुन उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे वळविण्यात येईल.

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात न वळविता मुंबईकडे जातील.
जुना मुंबई ते पुणे मार्गावरुन पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा-वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळविता पुण्याकडे जातील.

लोणावळा शहर परिसरातून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरुन न जाता वलवण पुलावरुन द्रुतगती मार्गाने मुंबई व पुण्याकडे जातील.
या आदेशाची अंमलबजावणी २७ ऑगस्टच्या रात्री १० वाजल्यापासून २९ ऑगस्टच्या रात्री १२ पर्यंत लागू राहील.
०००००

शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २६ : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुंग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे.

आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००००

ग्रामविकासासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पुणे, दि. २६ : ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे उपमहासंचालक तथा यशदाअंतर्गत राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक लक्ष्मीकांत शिंदे, पंचायत राज संचालक गिरीश भालेराव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची येत्या १७ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाकडे मोठी यंत्रणा असून विभागाने ठरविल्यास हे अभियान घराघरात पोहोचेल. सरपंच, अधिकाऱ्यांनी हे अभियान आपले आहे या भूमिकेतून काम करावे लागेल. महिला बचत गट, तरुण मंडळे, नेहरू युवा मंडळे, माजी विद्यार्थी संघटना, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, गणेश मंडळे, वृक्षप्रेमी संघटना आदी सर्वांना या अभियानाच्या प्रारंभी निमंत्रित करुन त्यांना अभियानात सहभागी करून घ्यावे, असेही ते म्हणाले.

समृद्ध गाव बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री यांचा असून त्यासाठी हे अभियान तयार करण्यात आले आहे. हे अभियान १०० दिवसात राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात २० गावे निवडण्यात येणार आहे. सात ते साडेसात हजार गावे या अभियानात सहभागी होणार असून यातील १ हजार ९२० गावांना काही ना काही बक्षीस देण्यात येईल. चांगले काम करणारी जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना बक्षीस देण्यात येणार आहे. समृद्ध महाराष्ट्रासाठी सक्षम पंचायत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अभियानात ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी यासाठी या अभियानात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. १०० टक्के घरकुलांचा लाभ देणारे गाव, १०० टक्के आयुष्मान भारत कार्ड देणारे गाव, स्मशानभूमी आदी कामे करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पोपटराव पवार यांनी राज्यात ग्रामविकासांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षात झालेले बदल, राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, एका गावातील सरपंच, ग्रामसेवकाने ठरवले तर विकास सेवेची मोठी यंत्रणा त्यांच्यामागे उभी राहून गावात मोठे काम करण्याची संधी मिळते. लोकसहभागातून, श्रमदानातून गावात चांगले काम उभे राहू शकते हे हिवरे बाजार गावाने दाखवून दिले आहे. हिवरे बाजारची सुधारणा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून शिष्टमंडळे भेट द्यायला येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियान सुरू करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचे प्रशिक्षण देणे हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे सांगून प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले, पन्नास टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असताना ‘२०४७ विकसित महाराष्ट्र’ साठी गावातील नागरिकांचे उत्पन्न वाढण्यासाठी ग्रामीण उपजिवीकेची साधने शाश्वत असली पाहिजेत. त्यासाठी गाव पातळीवरील संस्था अधिक विकसित, बळकट करणे आणि त्यातून गावपातळीवरील विकास करणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सादरीकरणात सांगितले.

यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी अभियानाची उद्दिष्ट्ये, अभियानाचे निकष व अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्या गोंदिया जिल्ह्यातील डव्वा (ता. सडक अर्जुनी) गावच्या सरपंच श्रीमती योगेश्वरी चौधरी यांनी आपल्या गावात केलेल्या सुधारणा, बदलांबाबतचे अनुभव सांगितले.

कार्यक्रमात श्रीमती योगेश्वरी चौधरी यांच्यासह पंचायत विकास निर्देशांकामध्ये राज्यातील प्रथम १० जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व राज्यस्तरावरील टीमचा गौरव करण्यात आला.

कार्यशाळेला राज्यभरातून जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. हे सर्व अधिकारी, पदाधिकारी या अभियानासाठी आपापल्या जिल्ह्यात प्रवीण प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत.
०००००

गोदाम बांधकाम उभारणी व तेलबिया प्रक्रियायूनिट घटकासाठी अर्ज करावेत


पुणे दि. 26 :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम घटकासाठी अनुदान देण्यात येणार असून जिल्ह्याकरीता 250 मे. टन गोदाम बांधकामासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत 1 गोदाम व 1 तेलबिया प्रक्रिया युनिटचे उद्दीष्ट प्राप्त आहे. याकरीता शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेकडून गोदाम बांधकाम उभारणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रत्यक्ष झालेल्या गोदाम बांधकामाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रूपये जे कमी असेल अशी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. काढणी पश्चात पायाभूत सुविधांतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लाख 90 हजार रूपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
काढणी पश्चात पायाभूत सुविधा अंतर्गत तेलबिया प्रक्रीया युनिट निवडलेल्या लाभार्थ्याने स्वखर्चाने प्रकल्प तयार केला असल्यास प्रकल्पाचे मुल्यांकन, मूल्यमापन व उभारणी नंतर मुल्यांकन करून किंवा निवडलेल्या लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार याबाबीच्या लाभास पात्र राहील.
इच्छुक शेतकरी संघ व कंपनी यांनी या योजनेत सहभागी होण्याकरीता 30 ऑगस्ट 2025 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे संजय काचोळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

तात्पुरती वीज संच उभारणीसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन


पुणे दि. 26 :- सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना नागरिकांनी खालील प्रमाणे खबरदारी घेण्याबाबत अधिक्षक अभियंता, पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ हे.ना.गांगुर्डे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.
शक्यतो तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करण्यात येऊ नये. वीज संघ मांडणीस कमीत कमी जोड असावेत, वीज संच मांडणीची उभारणी अधिकृत विद्युत ठेकेदार यांचेकडूनच करण्यात यावी, लोखंडी साहित्य वापरुन स्टेज उभारणी केल्यास धातूच्या भागास सक्षम भुसंबंधन /आर्थिगशी जोडण्यात यावे. वीज संच मांडणीस अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अथवा तत्सम उपकरणाची (स्वीचगिअर) ची जोडणी करण्यात यावी, गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शोभा यात्रा गाडयांची उंची नियमानुसार राखावी जेणेकरुन उघडया वीज वाहिनीच्या संपर्कात येणार नाही. वीज संच मांडणीवर क्षमतेपेक्षा जास्त भार (लोड) जोडण्यात येऊ नये. संचमांडणी सहजासहजी लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
00000

आधार संच वितरण साठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. २६ माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई यांचे कडून पुणे जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले असून जाहिरातीत नमूद ठिकाणाकारीता आधार संच वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.आधार संच जिल्ह्यातील पुढे नमुद ग्रामीण महसूल मंडळ व पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात वितरण करणेकामी पात्र “आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी” जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, प्रस्तावित आधार केंद्राबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती डाऊनलोड करून घ्यावी.

इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० वाजल्या पासून ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तसेच १सप्टेंबर २५ रोजीची सुट्टी वगळून)

जिल्हाधिकारी कार्यालय,संजय गांधी योजना शाखा’अ’ विंग, ४ था मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे येथे प्रत्यक्ष सादर करावे असेही जिल्हा प्रशासना मार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

000

चेक बाउन्स प्रकरणात पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रा ली कंपनी संचालकास चार महिन्याचा तुरुंगवास आणि बारा लाखाचा दंड ! दहा वर्षानंतर मिळाला न्याय !

पुणे :सहा लाखाचा चेक बाउन्स झाल्याने न्याय दंडाधिकारी पुणे जिल्हा न्यायालयाने (जेएमएफसी कोर्ट) इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा व फिर्यादी पॅकेरा कंपनीस बारा लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश 20 ऑगस्ट रोजी दिला आहे. पुण्याच्या अतिरिक्त न्यायदंडाधिकारी रेवती देशपांडे यांच्या कोर्टाने चेक बाउन्स बद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय देत इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील डेअरी प्रोजेक्ट क्षेत्रातील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना शिक्षा सुनावली आहे.

वारजे पुणे येथील इंडोटेक कंपनीने पुण्यातील पॅकेरा कंपनीस सतरा जानेवारी २०१५ रोजीचा सहा लाख तीनशे रुपयाचा चेक दूध पॅकिंग मशीनच्या खरेदीपोटी दिला होता. परंतु हा चेक भरला असता आयसीआयसीआय बँकेमध्ये हा खाते बंद असल्यामुळे न वटता परत गेला. त्यामुळे फिर्यादी पॅकेरा कंपनी चे मुकुंद किर्दत यांनी रीतसर नोटीस दिल्यावरही इंडोटेक कंपनीने पेमेंट न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात पुणे कोर्टामध्ये केस दाखल केली होती. तब्बल दहा वर्षांपूर्वी दूध पिशव्या पॅकिंग मशीन दिल्यानंतर त्याच्या पोटी दिलेला उर्वरित रकमेचा चेक बाउन्स झाल्याबद्दल दुप्पट रकमेचा दंड भरपाई पोटी भरावा लागण्याची वेळ आली आहे. व तक्रारदारास मानसिक त्रास आणि कोर्ट कचेरी खर्च या सगळ्यामुळे तब्बल चार महिन्याचा तुरुंगवास ठोठावला आहे. आरोपी जंजिरे हे व्यवस्थापकीय संचालक असल्यामुळे, व सर्व व्यवहार त्यांच्याशी झाल्यामुळे, आरोपी कंपनीच्या कारभारास तोच जबाबदार असतो असा निष्कर्ष काढत भारतीय दंड संहिता निगोटियबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 अन्वये ही शिक्षा सुनावली आहे.

दोषी भाऊसाहेब जंजिरे व त्यांची कंपनी इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर चेक न वटण्यामुळे अनेक जणांची खटले दाखल केलेले आहेत. त्यामुळे अनेक सहकारी दूध संस्था व मशिनरी उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशा खटल्यामध्ये न्यायालयात न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे छोट्या व्यावसायिकांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसान होते अशी खंत फिर्यादी मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली.

Mukund Kirdat, Proprietor PACKERA

ORDER ON COURT WEBSITE . LINK: https://pune.dcourts.gov.in/wp-admin/admin-ajax.php?es_ajax_request=1&action=get_order_pdf&input_strings=eyJjaW5vIjoiTUhQVTA0MDM0MDEzMjAxNSIsIm9yZGVyX25vIjoyLCJvcmRlcl9kYXRlIjoiMjAyNS0wOC0yMCJ9

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.२६.:- लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त ही भेट दिल्याने तेथील महाराष्ट्र मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे.१९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. गेल्या ९३ वर्षांपासून हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे. सध्या लंडन आणि परिसरातील सुमारे एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेले आहेत. मात्र, स्थापनेपासूनच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची वास्तू भाडेतत्त्वावर होती. त्यामुळे मराठीजनांसाठी स्वतःच्या मालकीचे भवन असावे, अशी तेथील मराठीजनांची मागणी होती. गेल्या आठवड्यातच मंडळाच्या प्रतिनिधींनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्याची विनंती केली होती. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने राज्य शासनाने या संस्थेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी वापरला जाणार असून, यामुळे मराठीजनांना लंडनमध्ये स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळणार आहे. ‘महाराष्ट्र भवन’ हे युनायटेड किंगडम आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, तसेच या भवनामुळे मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भाषा वर्ग, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करता येईल. यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी चित्रपट ‘अरण्य’च्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांत येणार आहे.

सामान्य कुटुंबातील एका बापाची आणि त्याच्या मुलीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात एका नक्षलवाद्याच्या आयुष्यातील मानवी पैलू आणि त्याचे आपल्या लहान मुलीशी असलेले नाते प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

एस. एस. स्टुडिओ निर्मित आणि एक्सपो प्रेसेंट या चित्रपटाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली असून, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत हिृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्याही भूमिका आहेत. आदिवासी लोककलेवर आधारित संगीत या चित्रपटाची खासियत असून, प्रेक्षकांना अस्सलपणा सोबत सिनेमॅटिक अनुभव देखील देईल.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल, असा मला विश्वास आहे. यांची ‘एक तिकीट, एक वृक्ष ‘ लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.”

चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी सांगितले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चे पोस्टर अनावरण होणे हा आमच्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील सिनेमापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनापासून केलेला प्रयत्न आहे.”

​​​​​​​वैष्णोदेवीमध्ये भूस्खलन, डोडामध्ये ढगफुटी,मनालीत दुकाने आणि घरे वाहून गेली

शिमला-वैष्णोदेवी येथील अर्धकुमारीजवळ भूस्खलन झाल्याने काही लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे. खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. श्री माता वैष्णोदेवी तीर्थ मंडळाने ही माहिती दिली आहे. मंडळाने अद्याप त्यांचे फोटो आणि व्हिडिओ जारी केलेले नाहीत.मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यामध्ये १० ते १५ घरे वाहून गेली. गेल्या २४ तासांत डोडा येथे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, हे मृत्यू कोणत्या भागात झाले याची माहिती मिळू शकलेली नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून शाळा बंद आहेत. जम्मू-श्रीनगर आणि बटोटे-किश्तवारसह अनेक रस्ते आणि अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने लोक इंटरनेट आणि कॉल सेवा वापरू शकत नाहीत.

त्याच वेळी, हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मनाली येथील २० हून अधिक घरे, दुकाने आणि रेस्टॉरंट्स बियास नदी आणि पर्वतीय ओढ्यांमध्ये बुडाली आहेत. नद्यांच्या काठावर बांधलेली ३० हून अधिक घरे देखील धोक्यात आली आहेत. कुल्लू-मनाली रस्त्याचा काही भाग बियास नदीत वाहून गेला. यामुळे मनालीचा कुल्लू जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं.  निमित्त होतं… ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांच्या देहू भेटीचं. पावसाच्या हलक्या  शिडकावातही भक्ती, श्रद्धेच्या    वर्षावाने रंग भरले अन् जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा दर्शन सोहळा उपस्थितांनी याप्रसंगी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. डोक्यावर वारकरी पगडी,  कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या  असा  वेष परिधान करून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेच्या रूपातील दर्शन यावेळी दिलं. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.

संत तुकाराम महाराज अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगरूपी अमृतवाणीने जीवनाची शाश्वत सत्ये सांगितली आणि जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले. मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’  चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात, ‘तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आमच्या या प्रयत्नांना पॅनोरमा स्टुडिओज या निर्मिती संस्थेची भक्कम साथ लाभली आहे. त्यासाठी मी त्यांच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. 

लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवनाचा अर्क प्रादेशिक सिनेमांमध्ये पुरेपूर उतरलेला असल्याने प्रेक्षकांना ते अधिकच जवळचे वाटतात. एका चांगल्या संकल्पने सोबतच उत्तम  चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी पॅनोरमा स्टुडिओज नेहमीच कटिबद्ध असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.

दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटासोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे सीईओ (डिस्ट्रीब्युशन आणि सिंडिकेशन) मुरलीधर छतवानी यांनी सांगितले.

‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी , अजय पुरकर, अवधूत गांधी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचन्द्र,  नुपूर दैठणकर, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे, तेजस बर्वे आदि कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे.  साहसदृश्ये  बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे.  व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर  व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस  यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत. 

गणेशोत्सव: शुभेच्छा, सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश … डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २६ ऑगस्ट २०२५
गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील, देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

त्या म्हणाल्या, “गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत. बालपणापासून बाप्पाशी असंख्य आठवणी जोडलेल्या असतात. आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची हिंमत, यश मिळवण्याची शक्ती आणि मानसिक शांतता हीच बाप्पाची खरी देणगी आहे. या गणेशोत्सवात बाप्पाने सर्वांना निरोगी आरोग्य, आनंद, समृद्धी आणि शांत मनाचा आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना आहे.”

हरितालिका पूजेचे महत्त्व

आजच्या हरितालिका पूजेविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “या दिवशी महिला शंकर-पार्वतीची आठवण ठेवून उपवास आणि तपश्चर्या करतात. हे व्रत केवळ वैयक्तिक नसून कुटुंब, समाज आणि संपूर्ण जीवनाच्या प्रगतीसाठी असते. महिलांनी जशी या व्रताची जाण ठेवली आहे, तशीच पुरुषांनीही त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. मात्र उपवास करताना महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.”

गौरी आगमनाचे स्वागत

गौरी आगमनाविषयी त्या म्हणाल्या, “गौरीमातेचे आगमन हे समृद्धी, ऐक्य आणि मंगल वातावरण निर्माण करणारे असते. या निमित्ताने प्रत्येक घरात भक्ती, प्रेम आणि आपुलकीने सण साजरा होतो. भगिनीभाव आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो.”

सामाजिक एकतेचा संदेश

शेवटी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “गणेशोत्सव हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकोपा, कौटुंबिक बंध, महिलांची तपश्चर्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा एक महान उत्सव आहे.”

एआय संकट नव्हे, संधी!डिजाईन सिंक परिषदेत डाॅ.नचिकेत ठाकूर यांचे मत 

पुणेः आर्टफिशिअल तंत्रज्ञान अर्थात एआयचा वापर सकारात्मकरित्या केल्यास आपण कामे प्रचंड वेगाने करू शकतो. एआय विधायक रित्या वापरल्यास मानवासमोरील अनेक दुर्दम्य संकटे सोडवू शकते. एआय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी, त्याला कायमच मानवी स्पर्शाची कायमच गरज लागणार आहे. त्यामुळे, भविष्यात एआयला संकट न समजता, संधी समजावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचे अधिष्ठाता डाॅ.नचिकेत ठाकूर यांनी केले.ते येथे आयोजित डिजाईन सिंक या एकदिवसीय परिषदेत बोलत होते. या परिषदेसाठी, गुगलच्या युएक्स संशोधक केतकी आगाशे, ट्युरिंग लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोठारी, लँडोर या कंपनीचे डिजाईनर आर्यन शर्मा, सिमरन चोप्रा आदी उपस्थित होते.
डाॅ.ठाकूर पुढे म्हणाले, एमआयटी एडीटी 

इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईन ही देशातील एक अग्रगन्य संस्था आहे. यंदाच्या एनआयआरएफ क्रमवारीच्या डिजाईन गटात संस्थेने राष्ट्रीय पातळीवर १५०-२०० असे स्थान मिळवले आहे. यासह, क्यूएस क्रमवारीतही विभागाने राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वर्षभर सातत्याने अनेक उपक्रम राबवत असतो. ज्यामध्ये, ‘मेराकी’, ‘कारी’ सारख्या राज्यस्तरीय कला महोत्सवांचाही समावेश असतो. आजच्या या परिषदेच्या माध्यमातून डिजाईन आणि एआय यांच्या समन्वयातून भविष्यातील परिणांची चर्चा करणे आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे हा उद्देश आहे. 

ट्युरिंग लॅब्सचे मनोज कोठारी याप्रसंगी म्हणाले की, आमची कंपनी युएक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्य करते. एमआयटी एडीटी विद्यापीठासोबतही आमचा सामंजस्य करार असून त्या माध्यामातून दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. सध्या प्रत्येक क्षेत्रात आपणाला डिजाईनची गरज भासते. डिजाइनर आणि त्याची डिजाइन ही कल्पकतेतून येते. त्यामुळे, जोपर्यंत एका डिजाइनर मध्ये सर्जनशीलता आहे, तोपर्यंत त्याच्या कलेला मरण नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 

याप्रसंगी बोलताना, केतकी आगाशे, आर्यन शर्मा, सिमरन चोप्रा यांनीही त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. 

माझ्याकडे असे कार्ड आहेत, ते उघडले तर चीन नष्ट होईल

वॉशिंग्टन-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘चीनकडे काही पत्ते आहेत. आमच्याकडेही काही पत्ते आहेत, पण मला हे पत्ते खेळायचे नाहीत. जर मी हे केले तर चीनचा नाश होईल. मी हे पत्ते खेळणार नाही.’ट्रम्प यांनी चीनवर २००% कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, ‘जर चीनने अमेरिकेला पुरेसे मॅग्नेट पुरवले नाहीत तर त्यांच्या आयातीवर मोठे कर लादले जाऊ शकतात.’ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले की त्यांना चीनशी चांगले संबंध हवे आहेत परंतु व्यापार तणाव कायम आहे. त्यांनी सांगितले की व्यापार वादात वॉशिंग्टनची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली.ट्रम्प पुढे म्हणाले की त्यांनी अलीकडेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलले आहे आणि बीजिंगला भेट देण्याचा विचार करत आहेत. ते म्हणाले, ‘कधीतरी, कदाचित या वर्षी किंवा त्यानंतर लवकरच, मी चीनला जाऊ शकतो.’ त्यांनी असेही सांगितले की शी जिनपिंग यांनी त्यांना आमंत्रित केले आहे.

अमेरिकेने चीनवरील अतिरिक्त कर ९० दिवसांसाठी पुढे ढकलला

यापूर्वी, ट्रम्प यांनी १२ ऑगस्ट रोजी ते ९० दिवसांसाठी पुढे ढकलले होते. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते की त्यांनी अमेरिका-चीन टॅरिफची अंतिम मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.यापूर्वी, ११ मे रोजी जिनिव्हा येथे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाला होता. अमेरिका आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून टॅरिफ युद्ध सुरू होते.ट्रम्प यांनी चीनवर २४५% पर्यंत कर लादण्याची धमकी दिली होती. चीनने १२५% कर लादून प्रत्युत्तर दिले. तथापि, जिनेव्हा व्यापार करारानंतर हे लागू झाले नाही.

एप्रिलमध्ये, चीनने अनेक दुर्मिळ अर्थ मेटल्स आणि चुंबकांवरील नियंत्रणे कडक केली. अमेरिकेच्या शुल्काचा बदला म्हणून, चीनने अमेरिकेला सात दुर्मिळ पृथ्वी साहित्यांचा पुरवठा रोखला.चीनने कार, ड्रोनपासून ते रोबोट आणि क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व काही एकत्र करण्यासाठी आवश्यक असलेल्या चुंबकांची निर्यात देखील रोखली होती. ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस व्यवसायांसाठी हे साहित्य अत्यंत महत्त्वाचे आहे.या निर्णयाचा परिणाम जगभरातील मोटार वाहन, विमान, सेमीकंडक्टर आणि शस्त्रास्त्रे उत्पादक कंपन्यांवर झाला.

इलेक्ट्रॉनिक्सपासून ते आयटीपर्यंत दुर्मिळ अर्थ मेटल्सच्या साहित्याचा वापर-दुर्मिळ अर्थ मेटल्स हे १७ घटकांचा समूह आहे जे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सपासून ते लष्करी उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरले जाते. ते आयटी उद्योग, सौर ऊर्जा, रासायनिक उद्योग, आधुनिक तांत्रिक तेल शुद्धीकरण कारखाने आणि इतर अनेक उद्योगांमध्ये वापरले जातात.

सध्या चीनवर ३०% कर-अमेरिका आणि चीनमधील सर्वात मोठा संघर्ष टॅरिफवरून होता. मे महिन्यात अमेरिकेने चीनवर १४५% पर्यंत टॅरिफ लादले. त्यानंतर चीनने अमेरिकेवर १२५% प्रत्युत्तरात्मक टॅरिफ लादला. नंतर तो कमी करण्यात आला. सध्या अमेरिकेने चीनवर ३०% टॅरिफ लादला आहे, तर चीनने अमेरिकेवर १०% टॅरिफ लादला आहे.अमेरिकेला फक्त चीनकडून व्यापार संतुलन नको होते. चीनने त्यांच्या सरकारी कंपन्यांना कमी मदत द्यावी अशी त्यांची इच्छा होती. अमेरिकेचा असा विश्वास आहे की चीन त्यांच्या सरकारी कंपन्यांना जास्त अनुदान देतो, ज्यामुळे इतर देशांच्या कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत.अमेरिकेची अशीही मागणी आहे की चीनने परदेशी कंपन्यांना तंत्रज्ञानात अधिक संधी द्याव्यात आणि बौद्धिक संपदा कायद्यांमध्ये (जसे की पेटंट इ.) बदल करावेत. चीन यासाठी तयार नव्हता.

टॅरिफ वाढीमुळे चीनचा जीडीपी १% ने घसरू शकतो

अमेरिकेने चीनवर लावलेल्या उच्च शुल्काचा थेट परिणाम त्यांच्या निर्यातीवर आणि उद्योगावर होईल. चीन अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्स (४३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या वस्तू निर्यात करतो. अ‍ॅपलसारखे ब्रँड चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. त्यांना महागाईचा सामना करावा लागेल.फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात टॅरिफ उपाययोजना केल्या असूनही, चीनवरील आर्थिक परिणाम मर्यादित राहिला आहे. जर टॅरिफ दर वाढला तर चीनचा जीडीपी १% पर्यंत कमी होऊ शकतो.ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो यांनी यापूर्वी म्हटले होते की चीनवर आणखी शुल्क लादले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी इशारा दिला होता की असे केल्याने अमेरिकेचेही नुकसान होऊ शकते.