Home Blog Page 333

उजासकडून शिक्षकांना मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याच्या घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यास प्रशिक्षण

·         पहिल्‍या टप्‍प्‍याला पुरंदरमध्‍ये सुरूवात होण्‍यासह ४ सप्‍टेंबर रोजी एमएमएममध्‍ये १०० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्‍यात आले; पुण्‍यातील सर्व १३ ब्‍लॉक्‍समध्‍ये या उपक्रमाचा विस्‍तार करण्‍यात येईल, ज्‍याचा ३,००० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्‍याचा मनसुबा आहे.

·         आदित्‍य बिर्ला एज्‍युकेशन ट्रस्‍टचा उपक्रम उजास जागरूकता, शाश्वता आणि मोफत सॅनिटरी पॅडच्‍या माध्‍यमातून किशोरवयीन मुली, महिला व समुदायांमध्‍ये मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी व स्‍वच्‍छतेला चालना देतो. 

·         २०२१ मध्ये सुरू झाल्यापासून उजासने ५ लाखांहून अधिक किशोरवयीन मुली व मुलांना शिक्षण दिले आहे आणि संपूर्ण महाराष्‍ट्रात शाश्वत मासिक पाळी व्यवस्थापनासाठी ५० लाखांहून अधिक पॅड्सचे मोफत वाटप केले आहे.

पुणे सप्टेंबर २०२५ – अद्वैतेश बिर्ला यांनी स्थापन केलेला आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम उजासने आज पुणे जिल्हा परिषदेसोबत दोन वर्षांच्या सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत पुरंदर, पुणे येथे मेन्‍स्‍ट्रुअल हेल्‍थ अँड हायजिन मॅनेजमेंट (एमएचएम) शिक्षक प्रशिक्षण उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू केला. या दोन तासांच्या ऑनलाइन सत्रात ३० शाळांमधील १०० हून अधिक शिक्षकांना किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व स्वच्छता व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी माहिती आणि कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यात आले. हा पहिला टप्पा मोठ्या प्रयत्नांची सुरुवात आहे, ज्याद्वारे उजासचा पुणे जिल्ह्यातील सर्व १३ ब्लॉकमधील ३,००० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा मनसुबा आहे.

शिक्षक प्रशिक्षणाचा मूळ सामंजस्य करारात समावेश नव्हता, पण शाळांमध्ये मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याच्या घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत माहिती देण्‍यासाठी उजासने हा उपक्रम सुरू केला. पुणे जिल्हा परिषदेच्या प्रबळ पाठिंब्‍यासह या उपक्रमाने पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करून महाराष्‍ट्रातील शालेय यंत्रणांमध्‍ये एमएचएमचा समावेश करण्‍यासाठी पाया रचला आहे.

दोन तासांच्‍या कार्यशाळेमध्‍ये पुढील गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले:

  1. एमएचएम प्रशिक्षणाद्वारे क्षमता निर्माण करणे: शिक्षकांना उजासच्या मेन्‍स्‍ट्रुअल हेल्‍थ मॅ‍नेजमेंट (मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन) सत्रांचे ज्ञान, साधने आणि पद्धतींसह सुसज्ज करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना वर्गात अध्‍यापन करताना आणि दैनंदिन शालेय संवादात मासिक पाळीबाबत आत्‍मविश्वासाने माहिती देता येईल.
  2. विद्यार्थ्यांना सतत पाठिंबा देणे: वर्गात शिकवण्याव्यतिरिक्‍त शिक्षक प्रश्नांची उत्तरे देण्यास, गैरसमज दूर करण्यास आणि सतत मार्गदर्शन करण्यास सुसज्‍ज होते, कार्यशाळा संपल्यानंतर देखील किशोरवयीन मुलींसाठी ते दीर्घकालीन सहयोगी म्हणून सक्षम झाले.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत उजासच्‍या प्रमुख पूनम पाटकर म्‍हणाल्‍या, “शिक्षक हे परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. भारतात जवळपास २३ टक्‍के किशोरवयीन मुली मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शाळा सोडतात, ज्याचे मुख्य कारण कलंकाची भावना, जागरूकतेचा अभाव आणि अपुरी आधार व्यवस्था आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देऊन आम्ही खात्री घेत आहोत की, शाळेमध्‍ये मुलींना त्यांच्या मासिक पाळीदरम्यान वगळण्याऐवजी आधार वाटेल असे सुरक्षित वातावरण असेल. शिक्षकांना अचूक, मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज दूर करणारे ज्ञान देऊन सक्षम केल्याने शाळेमधून विद्यार्थीनींची गळती कमी होण्‍यास मदत होईल, तसेच उत्तम व उत्‍साहपूर्ण वर्ग निर्माण होतील, जेथे वि़द्यार्थीनींना पाहिले जात असल्‍याचे, काळजी घेतली जात असल्‍याचे व आत्‍मविश्वासपूर्ण वाटेल. ही कार्यशाळा मासिक पाळीबाबत सामान्‍य संवादांना चालना देण्‍यासाठी आणि कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांना सुसज्ज करण्यासाठी जिल्‍हा स्‍तरावरील चळवळीची फक्‍त सुरूवात आहे.” 

आपले मत व्‍यक्‍त करत पुणे जिल्हा परिषदेचे आयएएस श्री. गजानन पाटील म्हणाले, “पुणे मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचा हा उपक्रम मुलींच्या सर्वांगीण विकासाला सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणात समाविष्‍ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. किशोरवयीन मुलींना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने त्यांचे शिक्षण सुरू ठेवता येईल असे सुरक्षित व सहाय्यक वातावरण प्रदान करण्याचा या उपक्रमाचा मनसुबा आहे. हा उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करेल, शाळांमध्ये सॅनिटरी पॅडची उपलब्धता सुनिश्चित करेल आणि शिक्षकांना प्राथमिक आधार म्हणून प्रशिक्षित करेल. जिल्हा परिषदेच्या इतर उपक्रमांसह हा उपक्रम वि़द्यार्थीनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करेल.” 

कार्यशाळेच्या शेवटी शिक्षकांना मासिक पाळीबद्दल खुला, गैरसमज दूर करणारा संवाद करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अचूक माहिती व सहाय्यक पद्धतींसह मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज करण्यात आले. स्वच्छता, पोषण, वेदना व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्‍य या क्षेत्रातील कौशल्यांसह शिक्षक आता त्यांच्या शाळांमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन समर्थक म्हणून काम करण्यास सक्षम आहेत. किशोरवयीन मुलींना त्यांच्या शिक्षणादरम्यान आत्मविश्वासपूर्ण, काळजी घेत असल्‍याचे आणि सक्षम वाटावे यासाठी ही शाश्वत प्रयत्‍नांची सुरूवात आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त१३ सप्टेंबर रोजी कँडल मार्चचे आयोजन

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लबचा पुढाकार

पुणे: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन केले आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कँडल मार्च शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता पुणे येथून निघणार आहे. कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/candlemarch2025 यावर आपले नाव नोंदवावे किंवा कनेक्टिंग ट्रस्टच्या connecting_ngo या इन्स्टा पेजला भेट द्यावी, असे आवाहन कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर यांनी केले आहे. या कँडल मार्चमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज या क्लबचे सहकार्य लाभले आहे.

आत्महत्या हा आपल्या समाजासमोर उभा असलेला एक गंभीर प्रश्न आहे. अनेकदा मनातील वेदना, ताण, एकटेपण बोलून दाखवता येत नाही आणि त्यातून मोठे निर्णय घेतले जातात. या वेदना ऐकल्या जाव्यात, आधार मिळावा आणि प्रत्येकाला हे जाणवावे की तो एकटा नाही, यासाठी जनजागृतीची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून अर्नवाज दमानिया यांनी २००५ मध्ये कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था सुरू केली. गेली दोन दशके ही संस्था सतत आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य जनजागृती आणि जीव वाचविण्याचे कार्य करत आली आहे. या प्रवासात हजारो लोकांना आधार, समज आणि जीवनाची नवी दिशा मिळाली आहे. या प्रवासात आता रोटरी क्लबनेही साथ देण्यासाठी हात पुढे केला असल्याचे कनेक्टिंग ट्रस्टच्या गायत्री दामले यांनी नमूद केले.

रोटरी सदस्यांसह रोटरॅक्टर आणि तरुण मंडळी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होतील. निराश व्यक्तींना आशा देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा कॅन्डल मार्च महत्वपूर्ण ठरणार आहे. हा कँडल मार्च म्हणजे आत्महत्येमुळे आपले जीवन गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सध्या संघर्ष करत असलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी एक गंभीर आणि अर्थपूर्ण पाऊल आहे. आपली एक छोटीशी मेणबत्ती आणि काही पावले, कोणाच्या तरी जीवनात प्रकाशाचा किरण ठरू शकतात. चला, आपण सारे मिळून या उपक्रमात सहभागी होऊन संवेदनशीलता, आशा आणि आधाराचा संदेश पोहोचवूया, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष आशुतोष वैद्य यांनी केले.

GST बदलांमुळे काय स्वस्त? काय महाग?

0

स्टेडियममध्ये IPL पाहणे महाग:चित्रपट तिकिटे, हॉटेल भाडे, सलून सेवा स्वस्त
आता क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये आयपीएल सामने पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील, कारण सरकारने जीएसटी दर २८% वरून ४०% पर्यंत वाढवला आहे. जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३ सप्टेंबर रोजी ही माहिती दिली.

नवीन कर प्रणालीने आयपीएल पाहणे ही एक लक्झरी क्रियाकलाप मानली आहे आणि तंबाखू उत्पादने आणि कॅसिनोसारख्या सेवांच्या श्रेणीत ती ठेवली आहे. तथापि, सामान्य क्रिकेट सामन्यांवर अजूनही १८% जीएसटी लागू असेल. म्हणजेच, हा बदल फक्त प्रीमियम क्रीडा स्पर्धांसाठी आहे.

दुसरीकडे, १०० रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटांवर फक्त ५% जीएसटी आकारला जाईल, जो पूर्वी १२% होता. परंतु १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर पूर्वीप्रमाणेच १८% जीएसटी आकारला जाईल. दुसरीकडे, हॉटेल बुकिंग, सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित सेवांवरील जीएसटी ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
१. जीएसटीमधील बदलांमुळे आयपीएल तिकिटांच्या किमतीत कसा बदल होईल?

समजा आयपीएल तिकिटाची किंमत १००० रुपये आहे…

पूर्वी: १००० + (२८% म्हणजे २८० रुपये) = १२८० रुपये.
आता: १००० + (४०% म्हणजे ४०० रुपये) = १४०० रुपये.
भाडेवाढ: १४००-१२८० = प्रति तिकिट १२० रुपये.
त्याचप्रमाणे, जर आयपीएल तिकिटाची किंमत २००० रुपये असेल तर…

पूर्वी: २००० + (२८% म्हणजे ५६० रुपये) = २५६० रुपये.
आता: २००० + (४०% म्हणजे ८०० रुपये) = २८०० रुपये.
भाडेवाढ: २८००-२५६० = प्रति तिकिट २४० रुपये.
२. जीएसटीमधील बदलांमुळे सिनेमा तिकिटांच्या किमतींवर कसा परिणाम होईल?

१०० रुपयांपर्यंतच्या तिकिटांच्या किमती कमी होतील. तथापि, १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. समजा तिकिटाची मूळ किंमत ८० रुपये आहे:

पूर्वी: ८० + (१२% म्हणजे ९.६० रुपये) = ८९.६० रुपये.
आता: ८० + (५% म्हणजे ४ रुपये) = ८४ रुपये.
बचत: ८९.६० – ८४ = ५.६० रुपये प्रति तिकिट.३. जीएसटीमध्ये बदल झाल्यामुळे हॉटेलच्या राहण्याचे भाडे कसे बदलेल?

पूर्वी: १२% कर
आता: ५% कर
अट: जर दैनिक भाडे ७५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तरच हे लागू होते.
फायदा: स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आता स्वस्त होतील. उदाहरणार्थ, पूर्वी ५००० रुपयांची खोली ५६०० रुपयांना मिळणार होती, आता ती ५२५० रुपयांना मिळेल.
४. जीएसटीमधील बदलांमुळे जिम, सलून सारख्या सेवा किती स्वस्त होतील?

पूर्वी: १८% कर
आता: ५% कर
यात काय समाविष्ट आहे: जिम, नाईची दुकाने, सलून, योगा सेंटर इ.
फायदा: आता जिम आणि सलून स्वस्त होतील. उदाहरणार्थ, पूर्वी १००० रुपयांच्या जिम फीवर १८० रुपये कर आकारला जात होता, आता तो फक्त ५० रुपये असेल. जिममध्येही असेच होईल.
५. जीएसटीमधील बदलांमुळे विमा सेवा किती स्वस्त होतील?

काय सूट आहेत: जीवन विमा (टर्म, युलिप) आणि आरोग्य विमा (घरगुती आणि ज्येष्ठ नागरिक) वर कोणताही कर नाही.
फायदा: विमा प्रीमियम स्वस्त होईल. १०,००० रुपयांच्या पॉलिसीवर १८० रुपये वाचतील, ज्यामुळे विम्याची व्याप्ती वाढण्यास मदत होईल.
६. जीएसटीमधील बदलांमुळे उत्पादन आणि वितरण सेवा कशा बदलतील?

परवडणारी घरे: १२% ते ५% (पीएमएवाय सारखे प्रकल्प).
स्थानिक वितरण: १८% ते ५% (किराणा मालाची वितरण).
फायदा: स्वस्त घरे आणि स्वस्त ऑनलाइन ऑर्डर.
आता जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या महाग होतील?

जीएसटीमध्ये ४, ५% आणि १८% ऐवजी दोन स्लॅब असल्याने, साबण, शाम्पू, एसी, कार यासारख्या सामान्य वस्तू देखील स्वस्त होतील. येथील ग्राफिक्समध्ये पहा काय स्वस्त होईल आणि काय महाग होईल…
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, नवीन स्लॅब नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून लागू होतील. तथापि, तंबाखू उत्पादनांवर ४०% नवीन जीएसटी दर अद्याप लागू होणार नाही.

या बदलांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे, लहान व्यवसायांना आधार देणे आणि तंबाखूसारख्या हानिकारक उत्पादनांवर कर वाढवून त्यांचा वापर कमी करणे आहे.

मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही:खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल, खोटेपणा चालणार नाही; CM फडणवीस

मुंबई-मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरविषयी वेगवेगळे मतमतांतरे व्यक्त केली जात असताना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरसकटचा लाभ देणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी काढलेला जीआर सरसकटचा नाही. या प्रकरणी जे खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. या प्रकरणी कुणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे ते म्हणालेत.

मराठा आरक्षणाशी संबंधित सरकारने काढलेल्या जीआरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा जीआर दिशाभूल करणारा असल्याचा आरोप केला आहे. पण स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठ्यांचे भले झाल्याचा दावा केला आहे. विशेषतः या प्रकरणी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांनी या प्रकरणी कॅबिनेटलाही दांडी मारली आहे. पत्रकारांनी गुरूवारी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे उपस्थित केला. त्यावर त्यांनी भुजबळ नाराज नसल्याचे नमूद करत सरकारचा जीआर सरसकट आरक्षण देणारा नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या मुद्यावर भाष्य करताना म्हणाले, छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातून कुठेही निघून गेले नाहीत. त्यांची व माझी चर्चा झाली. मी त्यांना आश्वस्त केले आहे की, सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजाला कोणताही धक्का बसणार नाही. हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे. फक्त मराठवाड्यात इंग्रजांचा राज्य नव्हते. तिथे निझामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातील पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, तसे मराठवाड्यात मिळत नाहीत. मराठवाड्यातील पुरावे हे निजामाच्या म्हणजे हैदराबाद गॅझियटमध्ये मिळतात. त्यामुळे तेथील पुरावे आपण ग्राह्य धरले. त्यामुळे जे खरे कुणबी असतील त्यांनाच हे आरक्षण मिळेल.

ते पुढे म्हणाले, मला असे वाटते की, यातून (जीआर) जे काही खरे हक्कदार आहेत, त्यांनाच ते मिळेल. पण कुणालाही खोटेपणा करता येणार नाही. अशा प्रकारचा हा जीआर आहे. अनेक ओबीसी संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. आमच्या मनात कोणतीही शंका नाही असे त्यांचे म्हणणे आहे. भुजबळ व इतर नेत्यांच्याही मनातील शंका आम्ही दूर करू. ओबीसी नेत्यांनाही एक गोष्ट माहिती आहे की, जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा विचार होऊ शकत नाही.

आम्ही मराठ्यांचे मराठ्यांना देणार, ओबीसींचे ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते ते देणार. कुणाचे काढून कुणाला केव्हाच देणार नाही. दोन समाजाला एकमेकांपुढे केव्हाच उभे करणार नाही.

फडणवीस म्हणाले, अनेकदा समजुती गैरसमजुती होतात. अनेकदा काही लोक जाणिवपूर्वक गैरसमजुती तयार करतात. पण आम्ही जे काही राजकारण शिकलो, त्या राजकारणात ‘पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना. सब समाज को लिए साथ में, आगे हे चलते जाना’, हे आमचे ब्रिद वाक्य आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत एक मोठे योगदान देणारा हा समाज आहे. पण त्यासोबतच ज्या अठरापगड जाती आहेत, ज्यांनी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे म्हणून काम केले आहे. त्यांनीही बलिदान दिले आहे. कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे. ही भावना पुढेही राहील.

राज्य सरकारने मराठा आंदोलकांवरील यापूर्वीचे गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला आहे. पण या प्रकरणी आणखी 9 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचे काय करणार? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी फडणवीसांना विचारला. त्यावर त्यांनी हे गुन्हे उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार दाखल करण्यात आल्याचे सांगितले. आत्ताचे गुन्हे हायकोर्टाच्या आदेशांनुसार दाखल झालेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्र सरकारने जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांचेही स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेवरील जीएसटीचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या इतिहासात असे फार कमी वेळा होते. अप्रत्यक्ष करांत इतक्या मोठ्या सुधारणा सामान्यतः होत नाही. पण मोदींनी ते केले. त्याला जीएसटी परिषदेने मान्यताही दिली. महाराष्ट्राने या सुधारणांचे समर्थन केले. त्याचा व्यापाराला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नवीन रोजगार निर्मिती होईल. लोकांवरील बोजा कमी होईल. अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल. मी दुसऱ्या पिढीच्या या सुधारणा लागू केल्याप्रकरणी पंतप्रधानांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

भाजपने मनोज जरांगेंना गंडवले, फसवले:जरांगेच नव्हे तर उपसमिती, शिंदे समिती, मराठे, कुणबी सर्वांचीच फसवणूक; आंबेडकरांचा दावा

0

मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मनोज जरांगे यांच्यासह सर्वांनाच गंडवल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, असे ते त्यांनी म्हटले आहे. आंबेडकरांनी याविषयी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या विविध निर्णयांचा दाखला दिला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न खरेच सुटला काय? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक जीआर काढला. त्या जीआरद्वारे सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्याची घोषणा केली. या जीआरमुळे मराठवाड्यातील सर्वच मराठा समाजाचे कुणबीमध्ये रुपांतर होऊन त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल असा दावा केला जात होता. पण आता या जीआरवर वेगवेगळी मतमतांतरे येत आहेत. कायदेतज्ज्ञ तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारचा हा जीआर गंडवणारा व फसवणारा असल्याचा आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे. “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.”

जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे.

“ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.”

वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

हिंजवडी, चाकणमधील रस्ते विकास कामांचा आढावा

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक

पिंपरी (दि.३) : हिंजवडीसह चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणासह परिसरातील अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे काढण्यात येत असल्याने रहदारी सुरळीत होण्यास मोठी मदत होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. त्या अनुषंगाने सुरु असलेली विकास कामे, कारवाईसंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतूक कोंडी निराकरणासह नागरी समस्या सोडव‍िण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरु आहे. या भागातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी या पर‍िसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्याची कारवाई पीएमआरडीएसह त्या- त्या स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे. हिंजवडी भागातील १९ किलोमीटर पर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली असून या भागातील अरुंद रस्ते रुंद करत काही नवीन रस्ते प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने तातडीने मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी दिले.

यात लक्ष्मी चौक ते मेझा – ९ हॉटेल, पांडवनगर ते माणगाव ते फेस ३, लक्ष्मी चौक ते मारुंजी ते कोलते पाटील गेट, लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मधुबन हॉटेल ते छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक ते एमआयडीसी हद्दीपर्यंत, कासारसाई रोड, छत्रपती शिवाजी चौक ते हिंजवडी गावठाण (स्मशानभूमी रोड), प्राइड रोड ते विप्रो सर्कल, शिवाजी चौक ते पद्मभूषण चौक यासह इतर भागातील रस्त्यासंदर्भातील चर्चा करण्यात आली. माण, हिंजवडी, मारुंजी आदी भागातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने पर्यायी रस्त्यांसंदर्भात सुरू असलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, अनधिकृत बांधकाम विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, जमीन मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांच्यासह जलसंपदा विभाग, एमआयडीसी, एमएसईबी, एमपीसीबी, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगर पालिका, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चाकण भागात आठवड्याभरात कार्यवाही
हिंजवडी भागातील अतिक्रमणावर केलेल्या कारवाईनंतर आता आठवड्याभरात पीएमआरडीएसह इतर प्रशासकीय यंत्रणा चाकण भागातील रहदारी सुरळीत करण्याच्या अनुषंगाने मोर्चा वळवणार आहे. या भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी सोमवारपासून ठोस पावले उचलण्यात येणार आहे. यासह पुणे नाशिक रस्ता नाशिक फाटा ते राजगुरू नगर उन्नत मार्ग, चाकण – तळेगाव – शिक्रापूर, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे व वाहतूक कोंडी, ट्रक टर्मिनल, चाकण भागातील बाह्यवळण रस्ते यासह इतर रस्ते आण‍ि नागरी समस्यांच्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणांकडून आढावा घेतला.

देशात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता!

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले, मतचोरांना आता जनताच शिक्षा देणार: विजय वडेट्टीवार.

‘वोट चोर, गद्दी छोड’चा कामठीत दिलेला नारा देशभर पोहचला; लोकशाहीला हात घालणाऱ्यांना धडा शिकवू.

मतचोर भाजपाविरोधात काँग्रेस पक्षाचा नागपूर जिल्ह्यातील कामठीत ‘वोट चोर, गद्दी छोड’, राज्यव्यापी भव्य मेळावा.

मुंबई/नागपूर, दि. ३ सप्टेंबर २०२५

भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभर ‘वोट चोर, गद्दी छोड’, मेळाव्याचे आयोजन केले आहे, त्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिला राज्यव्यापी मेळावा नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घेण्यात आला. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रतिभा धानोरकर, प्रशांत पडोले, नामदेव किरसान, बळवंत वानखेडे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो लोक उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कामठीतील मेळावा हा सरकारला इशारा असून लोकशाहीला हात लावाल तर खबरदार. नागपूरमधून ७५ वर्षाच्या नेत्यांना खूर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि तो दिवस दूर नाही की देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहु, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे नवे सरकार येईल. ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा काँग्रेसचा नारा असून आता गप्प बसून चालणार नाही. या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपा व रा. स्व. संघावर तोफ डागली, ते म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत प्रत्येक दाम्प्त्याने ३ मुलांना जन्म द्यावा असे सांगतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीत एका घरी ५६ मुले दाखवण्यात आली आहेत आणि १० बाय १० च्या खोलीत १०९ मतदार दाखवले आहेत. भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले आहेत. हे भित्रे लोक आहेत, वोट चोरी करून सत्तेत आले आहेत. भाजपाचे लोक एकमेकाला चिमटे घेऊन विचारत होते आपण विजयी झालो का.. कामठीचा सरदार तर यात सर्वात पुढे होता. मतांचा बाजार कामठीतून सुरू झाला हे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. भाजपाची सत्ता असल्याने मतचोरांना शिक्षा होणार नाही पण मतदार मात्र या मतचोरांना शिक्षा देणार आहे. महाराष्ट्रातील या मतदारचोरांना धडा शिकवला पाहिजे, जिल्हा परिषद निवडणुकीत मतचोरी करणाऱ्यांना धडा शिकवून त्यांची औकात दाखवा, असे वड्डेवार म्हणाले.

विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे पण आपला हा अधिकार राहिला आहे का? अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण टाकलेले मत त्याच पक्षाला जाते का, याबाबत मोठी शंका उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीवर ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली, त्याची दखल जगभरात घेतली गेली. आज देशभर मतचोरीचा मुद्दा चर्चेत आहे, आता हा लढा जनतेपर्यंत घेऊन जावा लागणार आहे, त्यात सहभागी होऊन राहुल गांधींचे हात बळकट करा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

माजी मंत्री नसीन खान यावेळी म्हणाले की, लोकसभेत मविआने घवघवीत यश मिळवले पण पाच महिन्यातच चित्र बदलले, या पाच महिन्यात ४५ लाख मतदार घोळ करून वाढवले. मतदानाच्या चार दिवस अगोदरपर्यंत ऑनलाईन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली पण हा आयोग भाजपाच्या इशारऱ्यावर काम करत आहे. राहुल गांधी यांनीही याविरोधात जोरदार लढा उभा केला आहे पण निवडणूक आयोग मात्र समाधानकारक उत्तर देत नाही. आज देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आहे ते वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि आगामी निवडणुकीत मतांची चोरी होणार नाही यासाठी सजग रहा, असे नसिम खान म्हणाले.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, यशोमती ठाकूर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपा व निवडणूक आयोगावर तोफ डागत लोकशाही व संविधानावर होत असलेला हल्ला हाणून पाडला पाहिजे असे म्हटले.

शाश्वत भविष्यासाठी एआयचा वापर करावाअभिजित अटले यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘एचएसडब्ल्यू टेक-२०२५ परिषदेचे’ उद्घाटन

पुणे, ३ सप्टेंबरः” हवामान अनुकरण, हवेची गुणवत्ता, त्याची देखरेख, अचूक शेती आणि ऊर्जा ऑप्टिमायझेशनमधील अनुप्रयोगद्वारा एआय हा शाश्वतेला पुढे नेत आहे .त्यामुळे या संधीचा लाभ घेतांना एआयच्या नैतिक आव्हानाबद्दल सावधगिरी बाळगावी. शाश्वत भविष्यासाठी एआय वापरासाठी नाविन्यपूर्ण परंतु जबाबदार मार्गांची कल्पना करणे गरजेचे आहे. तसेच डेटा संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे.” असे विचार आयबीएमचे लिड क्लाइंट पार्टनर अभिजित अटले यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग विभागाच्या वतीने ‘आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबिलिटी टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमिनिटी अ‍ॅण्ड स्मार्ट वर्ल्ड’ (एचएसडब्ल्यू टेक-२०२५) या विषयावर आयोजित तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. सुब्रा कांती दास, आईईआई पुणे विभागाचे सचिव डॉ. अभिजित खुरापे, ब्रॉडकॉचे वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक सुनील खराटे हे उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत काळे, अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एमआयटी डब्ल्यूपीयू आणि तांत्रिक कार्यक्रम समितीचे वरिष्ठ प्रा. डॉ. भरत चौधरी, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागाच्या कार्यक्रम संचालक डॉ. पारूल जाधव व प्रा. डॉ. सुनिल सोमाणी उपस्थित होत्या.
सुनील खराटे यांनी, तंत्रज्ञान आणि सोशल डिझाइनमधील नवीनतम प्रगतीवर एक आकर्षक विचार मांडले. सेमीकंडक्टर स्केलिंग कामगिरी, कार्यक्षमता आणि एकत्रीकरण कसे चालवते हे स्पष्ट केले. डिझाइन, पडताळणी आणि ऑप्टिमायझेशनमधील आव्हानांवर प्रकाश टाकला. आयओटी, ५जी, आरई सर्किट डिझाइनच्या वाढत्या भूमिकेवर भर देऊन चिप इनोव्हेशनला चालना देण्यात ब्रॉडकॉमच्या नेतृत्वाची भूमिका सामायिक केली. सेमीकंडक्अर डिझाइनमध्ये एआय आणि ऑटोमेशनचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगितले.
एलटीआय माइंडट्रीचे उपाध्यक्ष आणि जागतिक वितरण प्रमुख निखिल दातार यांनी ग्रीन एआय आणि तंत्रज्ञानाचे अध्यात्माशी एकत्रीकरण यावर भाष्य केले. नवोपक्रमाला चालना देताना ऊर्जेचा वापर आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर शाश्वत एआय पद्धतींच्या गरजेवर अधिक भर दिला.
डॉ. सुब्रा कांती दास यांनी भविष्य निर्मितीसाठी एआयचा वापर किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो यावर भाष्य केले. त्यांनतर डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. भरत काळे, डॉ. भरत चौधरी, डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी शाश्वत उपयांना दैनदिंन जीवनामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. अक्षय ऊर्जा प्रणाली, स्मार्ट ग्रिड, एआय चलित हवामान मॉडेलिंग, आयओटी आधारित अचूक शेती आणि हरित साहित्य ही पर्यावरणीय प्रणाली नाजूक राहिल्यास विज्ञान आणि इंजिनियरिंग कशी लवचिकता मजबूत करू शकते यावर भाष्य केले.
डॉ. पारुल जाधव यांनी प्रस्तावनेत परिषदेच्या माध्यमातून नवीन कल्पनांवर केवळ चर्चा केली जाणार नाही तर त्याला बळकटी देऊ. याचा उपयोग मानवतेसाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या आयईईच्या दृष्टिकोनात योगदान देऊ शकतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सुनिल सोमाणी यांनी केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. गिरीश बापट यांच्या जयंती कार्यक्रमात उपस्थित राहून वाहिली आदरांजली

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२५ : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वर्गीय गिरीशजी बापट यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम श्रुती मंगल कार्यालय, आपटे रोड, शिवाजीनगर येथे पार पडला. यावेळी पत्नी गिरीजा बापट, सून स्वरदा बापट, मुलगा गौरव बापट हे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी स्व. बापट यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “गिरीशजी बापट हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिले. त्यांची कार्यशैली, साधेपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, “त्यांच्या कार्यातून समाजसेवेचा नवा आदर्श पुढे आला. त्यांनी राजकारण हे जनसेवेसाठीच असते हे दाखवून दिले.”

कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. गिरीशजी बापट यांना आदरांजली अर्पण केली.

‌‘नादब्रह्मांजली‌’तून उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांना मानवंदना

पुणे : तबला वादनातील फारुखाबाद घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात बहुमोल योगदान देणारे मरहूम उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे ‌‘नादब्रह्मांजली‌’ या गायन-वादनाच्या कार्यक्रमातून सांगितीक मानवंदना अर्पण करण्यात आली.
गोखलेनगरमधील कलाछाया कल्चरल सेंटर येथे या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सलीम अख्तर यांचे शिष्य देवेंद्र भावे यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीन तालमध्ये पेशकार, कायदे, रेले सादर केला. त्यानंतर पेशकार आणि द्रुतलयीत गत आणि चक्रदार सादर केले.
विश्वास जाधव यांचे शिष्य जितेश झंवर यांनी आपल्या तबला वादनाची सुरुवात तीन ताल सादर करून केली. यात तुकडे, कायदे, रेले तसेच उ. अमीर हुसैन खाँ, उस्ताद जहाँगीर खाँ यांच्या रचना प्रभावीपणे सादर केल्या.
उस्ताद फैय्याज हुसेन खाँ यांची शिष्या युवा व्हायोलिनवादक श्रुती राऊत हिच्या वादनाने मैफलीत रंग भरले. तिने आपल्या वादनाची सुरुवात पुरिया धनाश्री या रागाने केली. ‌‘पायलिया झंकार मोरी‌’ या तीन तालातील रचनेने सादरीकरणाची सांगता केली.
मैफलीचा कळसाध्याय ठरले ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अर्शद अली खान यांचे सादरीकरण. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात पुरिया कल्याणमधील विलंबित तालातील ‌‘आज सोबन‌’ या रचनेने केली. त्यानंतर द्रुत तराणा ऐकविला. ‌‘कारी बदरिया छायी‌’ ही गौड मल्हार रागातील बंदिश सादर केल्यानंतर ‌‘मोरे आए कुंवर कन्हाई‌’ ही बंदिश ऐकविली.
कलाकारांना सलीम अख्तर (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा कुरेशी यांनी केले.

“जुळ्यांचा क्लब” स्थापन करणार

पुणे-“आजवर मी अनेक संमेलने अनुभवली, परंतु जुळ्यांचे संमेलन हा माझ्यासाठी आगळावेगळा आणि विलक्षण अनुभव आहे. या संमेलनातून संविधानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला जात आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये जुळ्यांचे संमेलन हा अभिनव उपक्रम मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला. या अनोख्या कार्यक्रमात १२५ हून अधिक जुळ्यांची नोंदणी झाली होती, तर ५० हून अधिक जुळ्या जोड्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. मंचावर लव कुश यांचे भव्य चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमात “जुळ्यांचा क्लब स्थापन करीत असल्याची घोषणा करण्यात आली त्यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडात करून प्रतिसाद दिला. बालगंधर्व रंगमंदिर पालक व प्रेक्षकांनी खाचाखच भरले होते.

कार्यक्रमाला माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. केरळमधील ‘जगाची जुळ्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना या विशेष निमंत्रित होत्या. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी  मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, बालगंधर्व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू व बाबू नायर उपस्थित होते.

बालगंधर्व येथे रॅम्बो सर्कसचे विदूषकांनी जुळ्यांचे अनोखे स्वागत करून वातावरण रंगवले. तसेच सर्वांना आग्रहाने नाष्टा दिला. या संमेलनात जगभरातील जुळ्यांवरील माहितीपट, राम और शाम जुडवा दो कालिया अशी जुळ्यांवरील चित्रपटातील गाण्यांची चित्रफित आणि  कोडीन्ही गावाची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आल्या. या फिल्म्स माध्यम समितीच्या श्रुती तिवारी, मधुरा नातू वर्धे, सागर बाबर, रोहिणी अद्वैत  तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी केल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या जुळ्या बहिणी पुष्पा देसाई आणि स्नेहलता आठलेकर यांचा विशेष सत्कार पुणे फेस्टिव्हल तर्फे साडी व पेढे देऊन करण्यात आला. जुळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पद्मजा जोशी आणि तनुजा जावडेकर या हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या बहिणींनी मनोगत व्यक्त करताना अनेक गमतीशीर आठवणी सांगितल्या.या संमेलनासाठी आलेली अनेक लहान जुळी मुलं विदुशकांसमवेत मनसोक्त खेळली. या विदुशकांसमवेत पालकांनी जुळ्यांचे फोटो काढून घेतले तसेच मोठ्या जुळ्या भावंडांनी देखील विदुशकांसमवेत फोटो काढण्याचा आनंद लुटला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना म्हणाल्या, “केरळमधील कोडिन्ही गाव जगभरात जुळ्या जन्मांसाठी प्रसिद्ध आहे. यामागील वैज्ञानिक कारण आजवर स्पष्ट झालेले नाही. १९४९ मध्ये पहिला जुळा जन्म नोंदवला गेला, त्यानंतर यावर अनेक संशोधन झाले, मात्र ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत.”

अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “जगभरात पुणे फेस्टिव्हलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक घटकाला आपलंसं करणारे आणि जनजागृती वाढवणारे हे फेस्टिव्हल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.”

वैद्यकीय व ज्योतिषीय अंगानेही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. अरुण गद्रे यांनी “जुळी होण्याची वैद्यकीय कारणमीमांसा”, डॉ. मिलिंद दुगड यांनी “जुळ्यांच्या संगोपनात घ्यावयाची काळजी” आणि ज्योतिषतज्ज्ञ आभा करंदीकर यांनी “जुळ्यांचे भविष्य वेगळे का?” या विषयांवर आपले विचार मांडले.

डॉ. गद्रे यांनी जुळ्या गर्भधारणेत वाढलेल्या ताणतणावाविषयी पालकांना जागरूक केले ते म्हणाले की जुळ्यांच्या बाळंतपणाच्या काळात रक्तदाब व मधुमेह यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते असे सांगितले,  डॉ. दुगड यांनी “गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून नियमित तपासणी आवश्यक असून जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे,” असे सांगितले. ते म्हणाले की मुलं मुलींची लग्नाची वय वाढत आहेत तसेच प्लानिंग मुले बलाचा जन्म देखील लांबवली जात आहे हे योग्य नाही. ज्योतिषा आभा करंदीकर यांनी जुळ्या मुलांचे भविष्य आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करताना ज्योतिष शास्त्राच्या मर्यादा अधोरेखित केल्या.

या कार्यक्रमाची संकल्पना पुणे फेस्टिव्हलचे माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे यांची होती. केरळच्या कोडिन्हीच्या सरपंच श्रीमती तसलीना आणि थबशीर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पुणे फेस्टिव्हल व माध्यम समितीचा विशेष गोरव केला. प्रवीण प्र वाळिंबे यांनी प्रास्ताविकात पुणे फेस्टिव्हलच्या ३७ वर्षांच्या परंपरेचा आढावा घेतला. सूत्रसंचालन नीलिमा बोरवणकर यांनी केले, तर श्रुती तिवारी यांनी आभार मानले. श्रीकांत कांबळे व अतुल गोंजारी यांनी व्यवस्थापन पाहिले.

महिला या उत्तम व्यवस्थापन गुरु-ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे

 मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुणे:  ‘बांगड्या भरल्यात का?’ असे पूर्वी पुरुषांबाबत म्हटले जायचे. तो समज खोडून काढणाऱ्या आणि बांगड्या नसतानाही मनगटांमध्ये किती सामर्थ्य आहे हे सिद्ध करणाऱ्या महिला आज आपल्या समोर आहेत. महिला या उत्तम व्यवस्थापन गुरू आहेत. असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तुळशीबाग गणपती उत्सवमंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या विश्वस्त अभिनेत्री वाळके, अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते.

मुक्ताबाई नाटिकेच्या क्षेत्रात सलग ३० वर्षे योगदान तसेच आयुर्वेदिक वैद्यकात कार्यरत डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी,  वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली भागवत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा पुणतांबेकर, सुर्यदत्ता संस्थेच्या संस्थापक सुषमा चोरडिया, पत्रकार अंजली खमितकर यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, केवळ स्वतःपुरते न बघता. वैश्विक दृष्टिकोन ठेऊन काम करणाऱ्या महिलांचा सन्मान तुळशीबाग गणपती मंडळाने केला. स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी सत्याग्रही स्त्रिया बाहेर आल्या, लढा दिला. आपल्या कार्याचा गाजावाजा करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जाणीव नाही असा नाही; हीच जाणीव आज पुरुषांनी पुढे आणली आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला.

नितीन पंडित म्हणाले, गणेशोत्सवात प्रामुख्याने पुरुष हे मोठ्या संख्येने मंडळांमध्ये कार्यरत असतात. तुळशीबाग गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवात दरवर्षी एक दिवस महिला उत्सवाचे नियोजन करतात आणि सर्व कामकाज पाहतात.  याच दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांचे असामान्य कार्य समाजापुढे पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून आणले जाते, असेही त्यांनी सांगितले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड’

0

मुंबई, दि. ०३ सप्टेंबर २०२५: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नुकताच ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन चालू असून त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामामुळे हा सन्मान झाला आहे. महावितरणच्या कामगिरीत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या पुरस्काराचे श्रेय महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे, असे मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले. 

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे प्रमुख पाब्लो स्टॅन्ले व अध्यक्ष हेन्री आर. यांच्या स्वाक्षरीने मा. लोकेश चंद्र यांना पुरस्कारस्वरूप प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ ही इंग्लंडमधील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे.

प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, ऊर्जा क्षेत्रातील असामान्य नेतृत्व, प्रशासनातील दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या वीजवितरण क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल मा. लोकेश चंद्र यांना एनर्जी लीडरशीप अॅवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात येत आहे. कार्यक्षमता, कल्पकता आणि सेवेबद्दलच्या समर्पित वृत्तीमुळे मा. लोकेश चंद्र यांनी अक्षय्य ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासोबतच लाखो नागरिकांना भरवाशाचा वीज पुरवठा करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

अक्षय्य ऊर्जेचा वापर करून वीजखरेदी खर्चात मोठी बचत करून वीजदरात कपात करण्याची ऐतिहासिक कामगिरी महावितरणने केली आहे. अशा प्रकारे वीजदरात कपात करणारी महावितरण ही देशातील पहिलीच सार्वजनिक वीज वितरण कंपनी आहे. पुढील पाच वर्षात वीज खरेदीमध्ये अक्षय्य ऊर्जेवर भर दिल्यामुळे महावितरणची सुमारे ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने पाच वर्षे वीजदरात कपात शक्य झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मा. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्यावर ४५ लाख कृषी पंप चालविण्याची ही १६,००० मेगावॅट क्षमतेची गेम चेंजर योजना आहे. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्यातील ग्राहकांनी नुकताच एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी महावितरण करत आहे. 

शेतकऱ्यांना हक्काची सिंचन व्यवस्था मिळण्यासाठी शेतात सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात सर्वाधिक पंप बसविले आहेत.

गडांचा राजा : राजगड

सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. हा किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो.

प्राचीन इतिहास

आजचा राजगड किल्ला मुळात “मुरुंबदेव” या नावाने ओळखला जात होता. विविध राजवटींच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता. परंतु इ.स. १६४३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले. तेव्हाच या गडाला “राजगड” म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला.

या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले. १६६४ मध्ये सूरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली. भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.

आजही राजगड हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. इतिहासप्रेमी, साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.

नैसर्गिक रचना आणि संरक्षण व्यवस्था

राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हे, तर सैन्याच्या हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाची होती.

किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. येथे तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी “नेढे” नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतो. बालेकिल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.

राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगरांच्या उंचसखल उतारांवर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळसरळ तटबंदीवर अवलंबून न राहता तीन प्रमुख माच्या – पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेल्या आहेत. या प्रत्येक माचीचा आपापला वेगळा उपयोग होता :

•पद्मावती माची – गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासनिक व निवासी केंद्र होती. येथे राजसदर, पद्मावती देवीचे मंदिर, महाराजांचे निवासस्थान, राणीवसा तसेच मंत्र्यांचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे.

•संजीवनी माची – पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदी, अर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टींनी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.

•सुवेळा माची – पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यांवर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकी, पहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्त, अरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरत असे.

या तिन्ही माच्या एका ठिकाणी येऊन मिळतात – तो म्हणजे बालेकिल्ला. उंच मनोरे, भक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षणस्तर. गडाच्या प्रवेशासाठी पाली, गुंजवणे व अळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यांमुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती.

गडाचे वैशिष्ट्य

राजगडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हता, तर राजकारण, प्रशासन, सैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गड उभारण्यात आला. वळणावळणाच्या पायवाटा, धान्यकोठारे, पहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला.

सांस्कृतिक वारसा

आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाही, तर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. येथे होणारे उत्सव गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्ये, भाषणे, शिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो.

जागतिक ओळख

इतिहास, वास्तुकला, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर तो एक साहस, एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. येथील प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो. ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाने करतो.

राजगड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. येथे आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो. एकदा का तुम्ही येथे पोहोचलात, तर हा प्रवास केवळ एक ट्रेक राहणार नाही, तर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल. राजगड तुमची वाट पाहतो आहे, चला निघा “गडांच्या राजाला” भेट द्यायला!

संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई

पुणे जिल्ह्यातील 99 गाव आदिवासी बहुल ; 17420 कुटुंब पात्र लाभार्थी

पुणे, दि. ३ : आदिवासी समाजासाठी तळागाळातील नेतृत्व घडविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत पुणे जिल्ह्यात आज जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यात शासकीय अधिकारी आदिकर्म योगी असतील तर युवक नेतृत्व, शिक्षक, डॉक्टर्स आणि समाज सेवक हे आदि सहयोगी असतील. आदि साथी म्हणून आदिवासी नेते, स्वयं सेवक, बचत गटातील महिला कार्य करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव खेड, मावळ, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील 99 गावे आदिवासी बहुल असून यातील कुटुंब संख्या 17,420 एवढी आहे तर हीं लोकसंख्या 85 हजार 304 एवढी आहे. यासाठी आदिवासी नागरिकांमध्ये 17 विभागाच्या योजना पोहचविण्यासाठी प्रत्येक गटा मध्ये 30 प्रशिक्षणार्थी तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून एकूण 9 अधिकारी असणार आहेत. त्यात प्रामुख्याने जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी व सोनु कोतवाल, मोमीन अस्मा बेगम या दोन प्रशिक्षकांनी माहिती दिली.
या अभियानाचे मूलभूत मूल्ये सेवा, संकल्प आणि समर्पण ही असून देशभरात २० लाख “आदी कर्मयोगी” घडविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून १० लाख आदिवासी गावे, ५५० पेक्षा अधिक जिल्हे तसेच ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोच साधली जाणार आहे. एकूण १०.५ कोटी आदिवासी नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवणे हा अभियानाचा उद्देश आहे.
अभियानात “आदी कर्मयोगी” म्हणजे शासकीय अधिकारी, “आदी सहयोगी” म्हणजे शिक्षक, डॉक्टर व व्यावसायिक मार्गदर्शक तर “आदी साथी” म्हणजे स्थानिक स्वयंसेवक, महिला बचतगट सदस्य आणि आदिवासी नेते अशी तीन स्तरांवरील कार्यकर्त्यांची संरचना करण्यात आली आहे.
या अभियानात शासन व आदिवासी समाजातील विश्वास दृढ करणे, सहभागी नियोजनाद्वारे सर्वसमावेशक विकास घडविणे तसेच दुर्गम भागांमध्ये शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविणे या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी शासनाच्या विविध राष्ट्रीय मोहीम व योजनांशी अभियानाचे एकत्रिकरण केले जाणार असून ग्रामदृष्टिकोन २०३० कृती आराखडे तयार केले जातील.
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव, आंबेगाव, खेड, मावळ, हवेली व पुरंदर तालुक्यातील ९९ गावे या अभियानात निवडण्यात आली आहेत. एकूण १७,४२० कुटुंबे व सुमारे ८५ हजार लोकसंख्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होणार आहे.

जिल्हास्तरीय उन्मुखीकरण कार्यशाळेनंतर ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान जिल्हा प्रक्रिया प्रयोगशाळा, १५ सप्टेंबरपासून तालुका कार्यशाळा आणि १८ सप्टेंबरपासून गावपातळीवरील कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. विशेष ग्रामसभेद्वारे २ ऑक्टोबर रोजी गाव कृती आराखड्यांना अंतिम मान्यता दिली जाईल.

या अभियानासाठी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी “जिल्हा मास्टर ट्रेनर” म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.