Home Blog Page 332

राज्य महोत्सव : गणेशोत्सव

गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व स्वराज्याच्या लढ्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा होता. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त झाले.

गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारा, संस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. राज्याची परंपरा व संस्कृती जपली जाते. ही परंपरा आणि संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपला गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची 18 जुलै 2025 रोजी विधीमंडळात घोषणा केली. त्यानुसार शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले.

गणेशोत्सवाला शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्यानंतर या महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रम आणि इतर कार्यक्रम समन्वयनासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या कार्यालयाकडे जबाबदारी देण्यात आली.

घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेश मंडळे :

या गणेशोत्सव काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला. यात राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला रूपये 7.50 लाख तर जिल्हास्तरावरीय प्रथम विजेत्यास रूपये 50 हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना रूपये 25 हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आजमितीस महाराष्ट्रभरातील 404 पेक्षा जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. घरोघरीच्या श्री गणेशांचे दर्शन व सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशांचे दर्शन घरबसल्या घेणे शक्य व्हावे यासाठी घरगुती व सार्वजनिक श्री गणेशांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या https://ganeshotsav.pldmka.co.in/ या पोर्टलद्वारे मोठ्या संख्येने भाविक आपल्या श्री गणेशांची छायाचित्रे सर्व गणेशभक्तांच्या दर्शनासाठी अपलोड करत आहेत. या पोर्टलद्वारे आजवर 200 हून अधिक जणांनी आपल्या घरच्या व 70 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी फोटो अपलोड केले आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे थेट दर्शन जगभरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला देखील गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. या पोर्टलमुळे प्रामुख्याने मुंबईचा लालबागचा राजा, मुंबईचा राजा, खेतवाडीचा गणराज, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, श्री सिद्धिविनायक मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन, अष्टविनायकांचे व टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एकाच क्लिकवर उपलब्ध झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या विविध जिल्ह्यातील व शहरातील गणपतींचे अतिशय सुलभ दर्शन होत आहे.

भजनी मंडळ :

गणेशोत्सव काळात भजनी मंडळांचा मोठा सहभाग असतो. याच अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांना रूपये 5 कोटी अनुदान देण्याबाबतची तरतूद करण्यात आली. राज्यात 1800 भजनी मंडळे नोंदणीकृत असून त्यांना प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

रील स्पर्धा :

गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळावे, यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होत आहे. रील तयार करण्यासाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील तयार करावयाची आहे.

महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 15 हजार, तृतीय पारितोषिक 10 हजार, उतेजनार्थ विजेत्यास 5 हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिक 25 हजार रुपये देण्यात येईल. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपये, उतेजनार्थ म्हणून 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

विशेष उपक्रम :
गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात राज्याच्या प्रत्येक विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत “ऑपरेशन सिंदूर”द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना राबविणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनेस्को मानांकन मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विविध विषय घेऊनही हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. श्री गणेशाला वंदन करण्यासाठी पु.ल.देशपांडे अकादमीकडून ‘आला रे आला… गणराया आला…’ या विशेष गीताचीही निर्मिती करण्यात आली.

जागतिक व्यासपीठ :
गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून 27 ते 29 ऑगस्ट, 2025 दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे 1 सप्टेंबर 2025 सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर 3 सप्टेंबर 2025 रोजी के एम गिरी सभागृह, बेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. सर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी म्हणजेच 4 सप्टेंबर 2025 रोजी भाग्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 5 सप्टेंबर 2025 रोजी गोवा राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार, हे नक्की…

  • संजय डी.ओरके,
    विभागीय संपर्क अधिकारी

मल्याळी फेडरेशनच्या ‘‘ओणम सेलिब्रेशन २०२५’’ ला आज पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरुवात

पुणे -पुणे मल्याळी फेडरेशनच्या ‘‘ओणम सेलिब्रेशन २०२५’’ ला आज, ४ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरुवात झाली. या समारंभाचे उद्घाटन पुणे रेल्वे पोलीस अधिक्षक आस्वनी सानप यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास पुणे रेल्वेचे आयआरटीएस वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. रामदास भिसे,  आणि वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर  ए. के. पाठक हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली पारंपारिक ओणम पूकलम (फुलांनी सजवलेली रांगोळी). दुसरे आकर्षण म्हणजे राजा महाबलीची ऐतिहासिक पोशाखातली भव्य मिरवणूक आणि कलाकारांच्या गटाने पारंपारिक केरळ चेंदमेलमसह काढलेली मिरवणूक.

मुख्य प्रवेशद्वारावरून जाणारे बहुतेक रेल्वे प्रवासी पूकलमचे फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी थांबले आणि सुंदर चेंदमेलम ऐकले, जे पुण्यातील गर्दीसाठी एक वेगळेच होते. पुणे मल्याळी फेडरेशनचे प्रमुख नेते जसे की  जॉन टीडी, सरचिटणीस, शानी नौशाद आणिएम व्ही परमेश्वरन, उपाध्यक्ष,  राजन आर नायर, कोषाध्यक्ष आणि युवा कल्याण नेते व्ही एम कबीर, आयएनटीयूसीचे राष्ट्रीय सचिव  राजन के नायर, एमपीसीसीचे जनरल सेक्रेटरी बाबू नायर हे देखील या उत्सवात उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मल्याळी महिला, मुली आणि पुरुष त्यांच्या पारंपारिक ओणम पोशाखात सहभागी झाले होते.

भारताचा आत्मा खेड्यांत; खेडी सक्षम करण्यासाठी शासनाचा समृद्ध पंचायतराज उपक्रम

पुणे, दि. ४ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश आपोआप समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर , आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, माजी सनदी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह राज्यातील तज्ज्ञ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने येत्या १६ सप्टेंबरपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिनापासून पुढील १०० दिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे प्रत्येक गावाने स्वतःचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. शासनाने या अभियानासाठी तब्बल २४५.२० कोटी रुपयांची बक्षीस योजना आखली आहे. यातून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावरील स्पर्धा होणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. स्वच्छता, शाश्वत विकास, हरित उपक्रम, महिला व बालकांच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकार आदी निकषांवर गावांचे मूल्यमापन होईल.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा “सर्वांना सोबत घेऊन चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम आहे. त्याचे प्रमुख घटक म्हणजे सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणे, पंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, जलसमृद्ध व हरित गावांची निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण साधणे, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करणे, उपजीविका व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे हे आहेत.

आज प्रत्येक गावाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. तो योग्य ठिकाणी खर्च करणे, गावांच्या गरजांनुसार प्राधान्य ठरविणे आणि कामांचा दर्जा उंचावणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. पारदर्शकतेसह जनतेच्या विश्वासास पात्र राहून ग्रामविकासाची कामे झाली पाहिजेत. प्रत्येक गावाने स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आदर्श ग्राम म्हणून घडविण्याची संधी या अभियानातून मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आणि १५० दिवसांचा डिजिटल सुधारणा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवला. यातून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातूनही मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहेत, असे अजित पवार यांनी अधोरेखित केले.

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवूनच शासन कार्य करते. या अभियानातून गावं आणि त्या गावांतील सामान्य नागरिक डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची संधी सरपंच व ग्रामपंचायतींना मिळेल. काम केलेल्या लोकांनाच जनता स्मरणात ठेवते, त्यामुळे गावासाठी उत्तम काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, राज्यातील ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गतचा हिस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला असून, तो लवकरच वितरित होईल, अशी माहितीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या कार्यशाळेचा उद्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविकातून सविस्तर मांडला. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेत पंचायतराज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, निधीचा प्रभावी वापर आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकास यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहात विद्यार्थ्यांनींची गर्भतपासणी होत नाही आदिवासी विकास विभागाची नाहक बदनामी करू नका

पुणे, दि. 4 सप्टेंबर:: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्या अधिनस्त आश्रमशाळा व पुणे शहरातील वाकड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यानींना प्रवेश घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करताना गर्भतपासणी (युपीटी टेस्ट) करावी लागते. ही तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्यानींची अथवा त्यांच्या पालकांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही, अशा आशयांचे वृत्त विविध प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत, याबाबत शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहात विद्यार्थ्यांनींची गर्भतपासणी होत नसल्याबाबत प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी खुलासा केला आहे.अशा वृत्तामुळे शासनाची पर्यांयाने आदिवासी विकास विभागाची नाहक बदनामी झाली आहे, असेही श्री. देसाई यांनी खुलासामध्ये नमूद केले आहे.

घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २३ शासकीय आश्रमशाळा व २४ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलींकरिता ११ वसतिगृह आहेत. आदिवासी विकास विभागाच्या ११ नोव्हेंबर २०११ मधील परिशिष्ट-ड मधील मुद्दा क्र.५ अन्वये वसतीगृह प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी करण्यात यावी, इतर विद्यार्थ्यांना बाधा होईल असे संसर्गजन्य आजार अथवा गंभीर आजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. तथापि यामध्ये गर्भतपासणीबाबत कोणतेही निर्देश किंवा सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

या कार्यालयाचे पत्र क्र. शावगृ-२०२३-२४/प्र.क्र./का.३(६)६२०० दि. ३ सप्टेंबर २०२४ अन्वये पत्रातील परिशिष्ट ‘ड’ अनु क्रमांक ५ नुसार वस्तीगृह प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणेबाबत वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा शैल्यचिकिस्तक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, औंध यांना देण्यात आलेल्या गर्भतपासणीबाबत कुठेही नमूद केलेले नाही.

गृहपाल,आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह वाकड यांच्याकडून वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा शैल्यचिकिस्तक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, औंध यांना विद्यार्थ्यांची विनामुल्य वैद्यकीय तपासणी करुन मिळण्याबाबत पत्र देण्यात आलेल्या पत्रामध्ये गर्भतपासणीबाबत कुठेही नमुद केलेले नाही. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्याबाबतचा वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये गर्भतपासणीबाबत उल्लेख नाही. यामध्ये ‘मेंटली आणि पिझीकली फीट’ असा उल्लेख आहे

या प्रकरणाच्या अनुषंगाने गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह वाकड यांनी २८ ऑगस्ट २०२५ च्या पत्रान्वये याकार्यालयास खुलासा सादर केलेला आहे. त्यामध्ये वसतीगृह प्रवेशावेळी किंवा प्रवेशानंतर गर्भतपासणी केली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांनींच्या पालक अथवा विद्यार्थ्यांनीची पूर्वपरवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातील वृत्ताच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनीची आरोग्य तपासणी केवळ आरोग्य तपासणी केली जात असून गर्भतपासणी केली जात नाही.

या प्रकरणाच्या अनुषंगाने झी-२४ तास या वृत्तवाहिनीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनीची ‘युपीटी टेस्ट’ केली जात असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले. या कार्यालयाच्या अधनिस्त असलेल्या कार्यक्षेत्रात एकूण २३ शासकीय आश्रमशाळा असून याशाळेत अशाप्रकारची तपासणी केली जात नाही. आश्रमशाळा संहिता सन २०१९ मधील १.२.२.३ नुसार अधिक्षक,अधीक्षिका मधील “क” अधीक्षिका यांच्या स्वतंत्र जबाबदाऱ्यांमध्ये मासिक पाळी नोंदवही अद्यावयत ठेवण्याबाबत नोंद आहे. त्यानुसार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींची गोपनीय नोंदवही अधिक्षिका ठेवतात. तसेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून आश्रमशाळेतील विदयार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व आश्रमशाळाच्या ठिकाणी एएनएम परिचारिका (नर्स) कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या आहेत, फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकांकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते.

प्रकल्प अधिकारी स्वतः तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत आश्रमशाळा व वसतिगृहांना दिलेल्या भेटीच्यावेळी याबाबत विद्यार्थ्यांनींनी तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही. सर्व आश्रमशाळांमध्ये विशाखा समिती व शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित असून याअनुषंगाने कुठल्याही प्रकारची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. अशा वृत्तामुळे शासनाची पर्यांयाने आदिवासी विकास विभागाची नाहक बदनामी झाली आहे, असेही श्री. देसाई यांनी खुलासामध्ये नमूद केले आहे.

महिलांच्या सशक्तीकरणासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदी योजना

पुणे, दि. ४ सप्टेंबर : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पिंक ई रिक्षा या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन २० टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर १० टक्के आर्थिक भार असणार आहे. या योजनेकरिता पात्र महिलांना रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ २० ते ५० वयोगटातील ३ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांना होणार आहे.
पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडीत जवाहरलाल नेहरु उदयोग केंद्र परीसर, गोल्फ क्लब रोड, डॉ. आंबेडकर चौकाजवळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई – पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश

पुणे, दि. ४ सप्टेंबर- : गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल आदी जलस्त्रोतामधील तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या तसेच संकलित केलेल्या मुर्त्यांचे छायाचित्रण करून धार्मिक भावना दुखावतील व सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी छायाचित्रे अथवा चलचित्रे समाजमाध्यमांवर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा मनाई आदेश पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर व कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. विसर्जनानंतर गणेश मुर्तींचे छायाचित्रण, त्यांचे प्रकाशन व प्रसारण यावर बंदी घालण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

हा आदेश दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अंमलात राहील.

सदर आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत असून स्थानिक वृत्तपत्रांद्वारेही प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

‘फार्मर कप’ द्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

मुंबई, दि. ४ : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात “सत्यमेव जयते फार्मर कप” ची घोषणा करण्यात आली. “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करेल. “फार्मर कप” या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये कृषी विकासाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
पाणी फाउंडेशनने २०२१ पासून “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी गटात संघटित केले आहे. यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे असल्यामुळे, हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. सध्या, हा उपक्रम महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमध्ये सामूहिकीकरणासाठी लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात विस्तार करण्याची क्षमता आणि गरज आहे.
‘फार्मर कप’ ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील – आमीर खान
राज्य शासनासोबतची भागीदारी पाणी फाउंडेशनला राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची मोठी संधी देत आहे. ज्ञान, प्रशिक्षण आणि सामूहिकीकरणाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. ‘फार्मर कप’ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांची उपजीविका उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे मत पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी व्यक्त केले.
‘फार्मर कप’ ची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
राज्यात सर्व तालुके आणि गावांमध्ये ‘फार्मर कप’ या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करणार आहे. राज्यभरात ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणीसाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, एटीई चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित चंद्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे परिमल सिंह, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान, पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांची या समितीमध्ये समावेश आहे. उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्यानंतर ही समिती त्यांचा पहिला कृति अहवाल तीन महिन्यात सादर करेल.
उच्चस्तरीय समितीच्या कार्यकक्षा
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ‘फार्मर कप’चा विस्तार करण्यासाठी सविस्तर कार्ययोजना तयार करणे. शेतकरी सहजपणे सामूहिक शेती आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्वीकारतील यासाठी सोपी व उपयोगी कार्यपद्धती तयार करणे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीवर आधारित उद्योगांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांना आवश्यक साहाय्य उपलब्ध करून देणे. हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे. कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करणे, तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार करणे. शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी ठोस अंमलबजावणी योजना तयार करणे. ‘फार्मर कप’ अंतर्गत प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक आखणे. अंमलबजावणी करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांना प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. योजनांच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करणे. विविध शासकीय विभागांमध्ये सशक्त समन्वय सुनिश्चित करणे असे असेल.
गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होईल : सत्यजित भटकळ
सन २०२२ पासून ‘फार्मर कप’च्या माध्यमातून पाणी फाउंडेशन शेतकऱ्यांच्या उपजीविकेत बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. यामध्ये विशेषतः अल्पभूधारक शेतकरी आणि महिला शेतकरी सक्षम होत आहेत. गटशेतीमुळे प्रति एकर लागवड खर्चात सुमारे २० टक्के बचत होईल आणि नफ्यात १०० टक्के वाढ होईल अशी आमची अपेक्षा आहे. राज्यातील प्रत्येक शेतकरी या संधीचा लाभ घेऊन आपले उत्पन्न व उत्पादकता वाढवू शकेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सांगितले.

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

पुणे, दि. ४ सप्टेंबर : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने “पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव” दिमाखदार पद्धतीने पार पडला.

दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब रंगारी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे दर्शन घेतले.गणेश दर्शनानंतर त्यांनी अस्सल श्रेयस हॉटेलची मराठी पुरणपोळी थाळी व उकडीचे मोदक यांचा मनमुराद आस्वाद घेतला. या अविस्मरणीय अनुभवाच्या स्मरणार्थ सर्व पर्यटकांना विशेष स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

या सोहळ्यास सहाय्यक संचालक (पर्यटन विभाग) श्रीमती शमा पवार, तसेच अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात व दिशा टुरिझमचे मालक तुषार शिंदे व सौ. सुजाता शिंदे, यांसह मधुरा बोडस, स्नेहल हरपळे, विदुला जवंजाल, विक्रम खन्ना, विश्वास भोर, कृष्णा शिंदे, वेदांत चोरघे, वेदांग महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पुण्याचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविणेस निश्चितच हातभार लागला.

रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी सदिच्छा भेट

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२५: राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. पुण्यातील गणपती दर्शनासाठी आलेल्या गोगावले यांनी या भेटीत डॉ. गोऱ्हे यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर सौहार्दपूर्ण चर्चा केली. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.

या प्रसंगी गोगावले यांनी डॉ. गोऱ्हे यांना राज्यातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला चालना देण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी गोगावले यांच्या कार्याचे कौतुक करत पुणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेच्या कामाला उत्तेजन मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामात महिला मजुरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यादृष्टीने हिताचे निर्णय घेतले जात असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होत असल्याची चर्चा दोघांमध्ये झाली.

ही भेट राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

बिबट प्रवण भागातील हिवरे पंचक्रोशीतील शेतीपंपाना आता दिवसा वीजपुरवठा

तेजेवाडी येथील ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ

१० गावातील २ हजार शेतकऱ्यांना फायदा

पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२५- ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत तेजेवाडी येथील १२ एकर गायरानावर उभारलेल्या ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा बुधवारी (दि.३) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील हिवरे बु. सह पंचक्रोशीमधील दहा गावांतील शेतीपंपाना आता दिवसा वीज पुरवठा सुरु झाला असून, येथील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी यापुढे रात्री-अपरात्री  शेतीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. 

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ हाती घेतली आहे. या योजनेतून राज्यात १६ हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प राज्यात होत असून, त्यातून तयार झालेली वीज शेतकऱ्यांना दिवसा दिली जात आहे. या योजनेतूनच जुन्नर तालुक्यातील हिवरे बु. ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत ५ किमी परिघातील तेजेवाडी येथे १२ एकर गायरान जमिनीवर ४ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सौर प्रकल्पात तयार झालेली वीज हिवरे बु. उपकेंद्राला जोडून त्यांतर्गत येणाऱ्या १० गावांना आता दिवसा विजेचा लाभ मिळणार आहे. बुधवारी (दि. ३) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे अधीक्षक अभियंते युवराज जरग, अनिल घोगरे व संजीव नेहते, कार्यकारी अभियंते राहूल गवारे, केशव काळुमाळी, धनंजय अहेर व प्रवीण पंचमुख, तेजेवाडीचे सरपंच संपत सखाराम नायकोडी व उपसरपंच राजू विश्वासराव यांचेसह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच मे. आवाडा कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

या गावांना होणार फायदा

या सौर प्रकल्पामुळे बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी, ओझर, हिवरे बु., हिवरे खु., शिरोली खु.,शिरोली बु., कुरण, ढोळवाडी, भोरवाडी आदी १० गावांतील २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरण कटिबद्ध- राजेंद्र पवार

तेजेवाडी हा मंचर विभागातील तिसरा सौर प्रकल्प आहे. यापूर्वी पेठ (ता. आंबेगाव) व नेतवड (ता. जुन्नर) येथे अनुक्रमे ४ व ८ मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करुन तेथील स्थानिक शेतकऱ्यांना महावितरणने कायमस्वरुपी दिवसा वीज उपलब्ध करुन दिली आहे. ह्या भागात बिबट्यासह अनेक जंगली श्वापदे आहेत. पूर्वी रात्री-अपरात्री मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता सौर वाहिनी योजनेतील प्रकल्प पूर्ण झाल्याने या भागात शेतीला दिवसा वीज मिळणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले.

महावितरणच्या ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘आयएसओ’

पुणे परिमंडल कार्यालयासह, ३ मंडल, १ उपविभाग व ग्राहक तक्रार निवारण मंचाचा समावेश

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२५- आजवर महावितरणच्या पुणे परिमंडातील अनेक वीज उपकेंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन मिळालेले आहे. आता प्रथमच महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयासह रास्तापेठ, गणेशखिंड व स्थापत्य मंडल कार्यालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच आणि हडपसर उपविभाग कार्यालय अशा ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘ISO-9001-2015’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

बुधवारी (दि. ३) रास्तापेठ येथील महावितरण कार्यालयात हा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार होते. तर प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, ‘आयएसओ’चे प्रधान निरीक्षक नंदकुमार देशमुख व मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय कामकाजासह विविध योजनांची केली जाणारी अंमलबजावणी, ग्राहक सेवा, सुसज्य इमारत, वीजबिल वसुली आदी निकषांच्या आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना संचालक राजेंद्र पवार म्हणाले, महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप क्षमता आहे. वेळोवेळी आलेल्या आपत्कालिन परिस्थितीमध्ये ती पहायला मिळते. मात्र त्याच क्षमतेने आपण ग्राहकसेवेप्रती झोकून देऊन कामे केले तर निश्चितच चांगले बदल होऊ शकतात. पुणे परिमंडलात ‘आयएसओ’ एक चळवळ बनली आहे. मात्र मानांकन मिळविण्यापेक्षा ते टिकवणे व त्यात सातत्य राखणे तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येकाने ग्राहकांशी सौजन्याने वागावे, महिलांना, ज्येष्ठांना सन्मान द्यावा. तसेच नियामक आयोगाने घालून दिलेल्या कालमर्यादेच्या आत काम करावे असा कानमंत्रही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

याप्रसंगी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, आयएसओचे नंदकुमार देशमुख आदींचीही भाषणे झाली. यावेळी पावर हाऊस मधील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यालयांना मिळाले ‘आयएसओ’

महावितरण पुणे परिमंडल कार्यालय, स्तापेठ शहर मंडल कार्यालय, गणेशखिंड शहर मंडल कार्यालय, स्थापत्य मंडल कार्यालय, ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय व हडपसर उपविभाग कार्यालय अशा ६ कार्यालयांना एकाच वेळी ISO-9001-2015 या प्रमाणपत्र मिळाले.  कार्यालय प्रमुख म्हणून अनुक्रमे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानेश्वर पडळकर, सिंहाजीराव गायकवाड व संजीव नेहते, ग्राहक मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर, हडपसर उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता विष्णू पवार यांनी मानांकन प्रमाणपत्र स्विकारले.

ग्राहक तक्रार निवारण मंचाला प्रथमच ‘आयएसओ’

आजवर अनेक कंपन्यांनी, शासकीय कार्यालयांनी आयएसओ मानांकन मिळवले आहे. मात्र ग्राहकांच्या तक्रारींची जिथे सोडवणूक होते त्या ‘ग्राहक तक्रार निवारण मंचा’ला देशात प्रथमच आयएसओ मानांकन मिळाले आहे. मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर यांनी ग्राहक तक्रार निवारणासह ग्राहक जागरुकतेवर भर दिल्याचेही आयएसओचे प्रधान निरीक्षक नंदकुमार देशमुख यांनी नमूद केले.

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’

0

परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक

मुंबई, दि. ०४ सप्टेंबर २०२५: पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे. या ऊर्जा परिवर्तनासाठी देशाच्या विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे रोल मॉडेल आहे, असे गौरवोद्गार भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि. ४) काढले.

महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्र व विविध सौर ऊर्जा योजनांची माहिती घेण्यासाठी भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई येथील महावितरण व महानिर्मितीच्या सांघिक कार्यालयास भेट दिली. यामध्ये योजना पटेल (न्यूयॉर्क), प्रतिभा पारकर राजाराम, पारमिता त्रिपाठी, अन्कन बॅनर्जी, सी. सुगंध राजाराम तसेच बिश्वदीप डे (टान्झानिया), स्मिता पंत (ताश्कंद) यांचा समावेश होता. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. यांची प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा विभागाने राज्यातील विजेची वाढती मागणी व पुरवठ्याच्या नियोजनासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यासह पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे येत्या पाच वर्षांत सर्वच वर्गवारीतील वीज दर कमी होत जाणार आहे. सोबतच हरित ऊर्जेला प्राधान्य दिल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे (सीओटू) उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टाला बळ मिळेल.  

श्री. लोकेश चंद्र म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० अंतर्गत कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. जगातील ही सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे. या योजनेमुळे राज्यात ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून ग्रामीण भागात सुमारे ७० हजार रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेमुळे देशामध्ये सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रातील ४५ लाख कृषिपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. आतापर्यंत कार्यान्वित झालेल्या १९७२ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ३६९ उपकेंद्रांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. सोबतच क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक वीज दरात घट होण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिली.

या बैठकीमध्ये महावितरणचे संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), महापारेषणचे संचालक श्री. स‍तीश चव्हाण (संचालन), महानिर्मितीचे संचालक श्री. अभय हरणे (प्रकल्प) तसेच कार्यकारी संचालक श्री. दिनेश अग्रवाल, श्री. किशोर पाटील, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट व श्री. संतोष सांगळे यांची उपस्थिती होती.

उत्सवाचा प्राण म्हणजे लोककला

कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे : माणसाच्या शरीरात जसे रक्त वाहते, तसे आपल्या भारतीय संस्कृतीत लोककलेचे दर्शन घडते. आज गणेशोत्सवात ढोल-ताशा वादन, लेझीम पथक, दारासमोरील रांगोळी किंवा तोरण हे सर्व काढून टाकले, तर उत्सवातील जिवंतपणा नाहीसा होईल. त्यामुळे आपली संस्कृती आणि लोककला हा उत्सवाचा प्राण आहे, असे मत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र एज्युकेशन कौन्सिलचे सदस्य अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्या वतीने कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.शिक्षक दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण होते.हे पुरस्काराचे अठरावे वर्ष आहे.यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ कला अध्यापक व चित्रकार दत्तात्रय वेताळ यांना महात्मा फुले पेठेतील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. 

यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, शिरीष मोहिते, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, रंगावलीकार अमर लांडे, वंदना वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सनई चौघड्याचे मंगल वादन, दारात  रांगोळी, दाराला तोरण बांधून हा सोहळा साजरा करण्यात आला.

पराग ठाकूर म्हणाले, लोककलेची पारंपरिकता व शुद्धता जतन करणे हे लोककलावंतांचे काम आहे. पुढच्या पिढीमध्ये देखील ही कलाप्रवाहित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावेळी त्यांनी आपले वडील शशिकांत ठाकूर यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

दत्तात्रय वेताळ म्हणाले, प्रत्येकामध्ये एक तरी कला असतेच ती कला जोपासण्यासाठी तुम्हाला सातत्याने सराव हा महत्त्वाचा असतो. कला अंगी असली तरी ती सरावानेच खुलते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व आभार प्रदर्शन शिरीष मोहिते यांनी केले.

स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना जाहीर.

पुणे-
दरवर्षी स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा संस्थेच्या जेष्ठ व्यापारी सभासदांना जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.
या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना संस्थेच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ,देऊन सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री सभागृह” येथे आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये सन्मानित करण्यात येईल.अशी माहिती संस्थेचे सचिव किशोर पिरगळ यांनी दिली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी,उपाध्यक्ष संजय राठी,सचिव किशोर पिरगळ यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे

‘श्री गणेश रत्न रथा’तून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून

0

सायंकाळी सहा वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

पुणे :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा संपन्न होईल. त्यानंतर आठ वाजता रत्न महालातून निघून बाप्पाचा ‘श्री गणेश रत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार घातला जाईल. त्यानंतर

दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने ‘श्री गणेश रत्न रथ’ सजविण्यात आला असून या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही पथके पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाचे जोरदार वादन करणार आहेत, यानंतर रात्री अकरा वाजता श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन पांचाळेश्वर येथे करण्यात येईल. ” पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक वेळेत संपवू असा आमचा मानस असल्याचेही बालन यांनी सांगितले.


‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’

  • पुनीत बालन
    (विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)