Home Blog Page 327

नेपाळसारखी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते:सावध रहा, संजय राऊतांचे ट्विट

मुंबई-भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या बंदीच्या निर्णयामुळे नेपाळ सरकारला जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. या अभूतपूर्व जनक्षोभामुळे नेपाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळमधील या घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला एक इशारा दिला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1965372762178134074

संजय राऊत यांनी नेपाळमधील परिस्थितीचा दाखला देत, अशी परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते, असे म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, “Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!”, यासोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, “आपल्या हक्कांसाठी जागा झालेला युवक असा दिसतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवू पळवू मारले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय राऊत यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये हा व्हिडिओ शेअर करत, ही घटना कोणत्याही देशात होऊ शकते, असा इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही टॅग केले आहे.

नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झाले, यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणांचा रोष वाढला आणि आंदोलन आणखी तीव्र झाले.

या हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. याशिवाय, पंतप्रधान ओली, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या खाजगी निवासस्थानांची तोडफोड केल्यानंतर जाळपोळ करण्यात आली. माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, शेर बहादूर देउबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या खाजगी निवासस्थानांनाही आग लावली.

माजी पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना मारहाण

निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना घरात घुसून मारहाण केली. त्याच वेळी, अर्थमंत्री विष्णू पोडोल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली.

आतापर्यंत 22 मृत्यू, 400 जखमी

या हिंसक घटनांमध्ये, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. लष्कराने त्यांना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी नेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

युती सरकार तुटण्याचा धोका वाढला

प्रचंड दबावादरम्यान, नेपाळमध्ये युती सरकार तुटण्याचा धोका वाढला आहे. शेर बहादूर देउबा यांची नेपाळी काँग्रेस 88 जागांसह आणि केपी शर्मा ओली यांची सीपीएन (यूएमएल) 79 जागांसह जुलै 2024 पासून देशात एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. आतापर्यंत सर्व राजीनामे नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0

मुंबई, दि. ९ : ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे. पर्यावरणपूरक मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

“व्हील्स ऑफ चेंज – अंडरस्टँडिंग ईव्ही ॲडॉप्शन फॉर मुंबई ऑटो अँड टॅक्सी ड्रायव्हर्स” कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री श्री. सरनाईक बोलत होते.

या कार्यक्रमास परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश ढाकणे, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पाई तसेच मान्यवर उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबईसह महाराष्ट्राला हरित वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमात ऑटो व टॅक्सी चालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने ही केवळ पर्यावरणपूरक वाहतूक साधने नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहन चालकांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची साधन आहेत. इंधन दरातील चढ-उतारांपासून मुक्ती आणि अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे ई-वाहनांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

*दीड लाखाहून अधिक नागरिकांची जिल्ह्यात आरोग्य तपासणी

पुणे, दि.९:: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान २०२५ राबविण्यात आले; या अभिनयात एकूण १ लाख ६५ हजार ७१८ महिला व पुरुषांनी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कालावधीत सुमारे २ हजार ५२५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याममध्ये ४ हजार ३०४ नागरिकांचे रक्तदान,५ हजार २५५ नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी, ३ हजार ६१३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
या शिबिरांत नेत्ररोग, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, महिलांचे आरोग्य, रक्त तपासणी, सर्वरोग निदान, रक्तदान शिबिरे तसेच आजाराविषयी मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच लाभार्थींना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले.
या अभियानाचा उद्देश “गणेशोत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक नागरिकाला प्राथमिक तपासणी व उपचाराची संध उपलब्ध करून देणे हा होता.
या अभियानात पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा, एमजेपीजेएवाय, सीएमआरएफ व धर्मादाय रुग्णालयांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा समनव्यक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली आहे.

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भिती आहे. नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही पण सरकार अदानी सारख्या भांडलदारांसाठी काम करत असून त्यांच्याविरोधात कोणीही आंदोलन करु नये, आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून १० सप्टेंबर व त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही.

0

बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले IP address, Email ID व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ.

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू: अतुल लोंढे

मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत सुरू असलेल्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई दि.९ : – पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी – सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामाचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना २.० ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. मुंबईतील बी.डी.डी. चाळींच्या धर्तीवर बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत,असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

नेरे,रोहकल, शिरूर बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे, खेड तालुक्यातील रोहकल येथे प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

खराडी, पुणे येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे,लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.दापोडी येथील अशोक गृहनिर्माण संस्थेमधील पात्र सदस्यांना तेथील म्हाडाच्या २० टक्के आरक्षणानुसार सोडत न काढता योजनेत समाविष्ट करून घ्यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या बैठकीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास (१) व गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे,म्हाडा पुणे चे मुख्याधिकारी राहुल साकोरे हे मंत्रालयातून तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम हे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे उपस्थित होते.

लोकअदालतीत जास्तीत जास्त सवलतीने वाहतूक दंड भरण्याची संधी

पुणे:हेल्मेट-सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट गाडी चालविणे… अशा अनेक छोट्या वाहतूक नियमभंगांचे प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना बुधवारपासून शनिवारपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे. १० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून पुणेकरांना थकबाकीमुक्त होता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या पुढाकारातून यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांसाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
….

खालील वाहतूक नियमभंगांचा दंड भरता येईल सवलतीत

  • विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
  • सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे
  • सिग्नल तोडणे
  • वेगमर्यादा ओलांडणे
  • चुकीचे पार्किंग
  • वाहन चालविताना मोबाइलचा वापर
  • विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
  • फिटनेस प्रमाणपत्र नसणे
  • चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
  • नंबरप्लेट नसणे
    ….

खालील गंभीर स्वरुपाच्या वाहतूक नियमभंगांचा दंड माफ होणार नाही

  • मद्यपान करून वाहन चालविणे
  • अपघात करून पळ काढणे
  • निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे
  • अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे
  • अनधिकृत शर्यत
  • गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
  • न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे
  • अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने
    …..

राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.

  • न्या. महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे
    ….

या उपक्रमातून नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरून वाहतूक नियमभंगांची चलने तडजोडीने निकाली काढता येतील; तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही होईल.

  • न्या. सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
    …..

PM पळाले ,आंदोलकांनी अर्थमंत्री व माजी PM ना पळवू-पळवू मारले; राष्ट्रपती, गृहमंत्र्यांची घरे जाळली-भारतातील नेपाळ दूतावासाची सुरक्षा वाढवली

0

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर केपी शर्मा ओली काठमांडूतून पळून जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या २ दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, भारतातील नेपाळ दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील नेपाळचा दूतावास बाराखंभा रोडवर आहे.

नेपाळमधील हिंसक घटनांदरम्यान पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा सादर केला. राजधानीतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे आणि सुरक्षा दल परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नेपाळचे लष्करप्रमुख (सेनाप्रमुख) अशोक राज सिग्देल लवकरच राष्ट्राला संबोधित करणार आहेत. लष्करप्रमुखांचे हे भाषण अशा वेळी होत आहे जेव्हा पंतप्रधानांसह देशातील जवळजवळ सर्व उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

देशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानांवरही हल्ला केला आणि तोडफोड केली आणि जाळून टाकले.

संतप्त तरुणांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली, तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून ठार मारण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निदर्शक त्यांच्या छातीवर लाथ मारताना दिसत आहे. दरम्यान, निदर्शकांनी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’, शेर बहादूर देऊबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरांनाही आग लावली.

काठमांडू विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द-नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TIA) येथे आज सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गंभीर परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमानतळ प्राधिकरणाने माफी मागितली आहे.TIA च्या महाव्यवस्थापक हंसा राज पांडे म्हणाल्या की, कोटेश्वरजवळ धुराचे लोट उठल्याने दुपारी १२:४५ वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली.त्यांनी जोर देऊन सांगितले की – विमानतळ बंद नाही. आम्ही तेही बंद करणार नाही. क्रू मेंबर्सना प्रवास करण्यात अडचण येत आहे, ज्यामुळे विमाने उड्डाण करू शकत नाहीत. देशांतर्गत विमान कंपनी बुद्ध एअरनेही सुरक्षेच्या कारणास्तव सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

नेपाळमध्ये मंत्र्यांची घरं पेटवली, 10 मंत्र्यांचा राजीनामा! PM पळून जाऊ शकतात,फेसबुक, यु ट्यूब, व्हाटसअप वर बंदी आणल्याने हिंसाचार

0

Nepal Banned Apps List : बंदी आणण्यात आलेले नेपाळमध्ये 26 लोकप्रिय अॅप्स जसे Facebook, Messenger, Instagram, YouTube, WhatsApp, X (पूर्वी Twitter), LinkedIn, Snapchat, Reddit, Discord, Pinterest, Signal, Threads, WeChat, Quora, Tumblr, Clubhouse, Mastodon, Rumble, VK, Line, IMO, Zalo, Soul, Hamro Patro इत्यादींवर बंदी लागू करण्यात आली आहे.

पीएम ओली यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी सांगितले, “मी सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित पक्षांशी संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या कठीण काळात शांतता राखावी, अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो.”

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीविरोधात Gen-Z अर्थात तरुणाईने आक्रमक पवित्रा घेतला आहे. Gen-Z ने थेट संसद, राष्ट्रपती भवनवर आक्रमण केल्यानंतर आज थेट कायदेमंत्र्यांचं घरच पेटवून दिलं. इतकंच नाही तर नेपाळमधील के पी ओली सरकारमधील १० मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सरकारची ध्येयधोरणं आणि सोशल मीडियाबंदीविरोधात तरुणाईची भूमिका यावरुन हे राजीनामासत्र सुरु आहे. तिकडे नेपाळमधील बीरगंज इथं नेपाळ सरकारचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं. नेपाळमधील या आक्रमक आंदोलनानंतर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत 25 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण मंत्री , आरोग्य मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, लोकशाहीवर निर्बंध आणले जाऊ शकत नाही असं या मंत्र्यांचे म्हणणं आहे.

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी
नेपाळ सरकारने (Nepal Government) एक नवीन विधेयक संसदेमध्ये आणलं आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना (Social Media Platforms Regulation) स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी (Registration Rule), आणि जबाबदारीचे नियम ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, त्या देशातील युवकांना, तरुणांच्या गटांना हा नियम म्हणजे सेन्सॉरशिप (Censorship in Nepal) वाटते.

काठमांडूमध्ये आंदोलन चिघळलं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये युवकांचे सरकारविरोधी आंदोलन चिघळलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.

46 वर्षांनंतर रजनीकांतसोबत काम करणार कमल हासन

दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन आणि रजनीकांत ४६ वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दुबईमध्ये झालेल्या नेक्सा सिमा अवॉर्ड्स २०२५ दरम्यान कमल हासन यांनी याची घोषणा केली.

कमल हासन म्हणाले, आम्ही खूप आधी एकत्र आलो होतो, पण वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. कारण ते आम्हाला एक बिस्किट वाटून अर्धा-अर्धा देत असायचे. आम्हाला दोघांनाही एक पूर्ण बिस्किट हवे होते आणि आम्ही ते मिळवले आणि त्याचा आनंद घेतला. आता आम्ही अर्ध्या बिस्किटाने समाधानी आहोत आणि म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.

रजनीकांत यांच्याशी स्पर्धा करण्याबाबत कमल हासन म्हणाले, अशा संधी मिळणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही खूप आधी ठरवले होते की आम्ही असेच राहू आणि एक आदर्श निर्माण करू. तोही असाच होता आणि मीही असाच होतो. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने हे पुनर्मिलन आश्चर्यकारक असले तरी, आम्हाला तेवढे आश्चर्य वाटत नाही. आम्हाला आनंद आहे की, जे खूप पूर्वी व्हायला हवे होते ते आता घडत आहे.

सध्या कमल हासन यांनी या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण अलिकडेच ओटीटीप्लेच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कमल हासन आणि रजनीकांत यांच्यात एका नवीन अ‍ॅक्शन चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर तमिळ चित्रपटसृष्टीतील हे दोन मोठे स्टार जवळजवळ ४६ वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील. लोकेश कनागराज यांचा हा आगामी चित्रपट राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली बनवला जाईल. तथापि, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. यापूर्वी दोघेही १९७९ मध्ये आलेल्या ‘रा अलाउद्दीनम अलभुथा विलाक्कम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

आयुष कोमकर हत्याप्रकरणी बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. आयुष कोमकर हा क्लासमधून परत येत असताना अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला.या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे. हे सर्व जण बुलढाण्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातवांचाही समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर यांच्यासह एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेवक लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा देखील समावेश आहे. आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात यश पाटील आणि अमित पाटोळेचा देखील समावेश होता. आता आणखी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचत सहा जणांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय 60), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 41), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय 31), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय 40), तुषार निलंजय वाडेकर (वय 26), स्वराज निलंजय वाडेकर (वय 22), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय 23), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19) अशा 13 जणांचा समावेश आहे.

मागील वर्षी 1 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, संजीवनी कोमकर (वनराज आंदेकर यांची बहीण), तिचे पती जयंत कोमकर, आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती.

आता या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा खून करण्यात आला आहे. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत क्लासवरून दुचाकीवरून आला. तो पार्किंगमध्ये पोहोचल्यावर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

या बेनामी खर्चाचा शोध घेणार कोण ?

पुणे- अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेताना फोटो असणारी एक जाहिरात नुकतीच विविध वर्तमान पत्रांतून आणि टीव्हीवरील विविध वाहिन्यांवरून झळकली आहे. त्यात फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहेत. या जाहिरातीत ती देणाऱ्यांचे नाव नाही, या अनामिक जाहिरातीसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या बेनामी खर्चाचा शोध आणि हिशेब घेणार कोण ? असा सवाल करत फडणवीस यात मॉडेल आहेत कि मुख्यमंत्री म्हणून आहेत याचा खुलासा त्यांनी करायला हवा असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे .

कुंभार यांनी असेही म्हटले आहे कि,’या जाहिरातींची देवेंद्र फडणवीस यांना रॉयल्टी मिळालेली आहे का? त्यांचा फोटो मुख्यमंत्री म्हणून वापरलेला दिसत नाही तर खाजगी व्यक्ती म्हणून वापरल्यासारखा वाटत आहे. ते पूर्वी मॉडेल होते असं म्हटलं जातं. त्यामुळे कदाचित त्यांची परवानगी घेऊन फोटो वापरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु पदावर असताना असं करता येतं का?ही जाहिरात नक्की कोणत्या उद्देशाने आणि कोणी दिली? काहीच अर्थबोध होत नाही.मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरून करोडोंच्या निनावी जाहिराती होत आहेत आणि त्यांच्या मागे कोण आहे हे समजत नसेल तर ते धोकादायक आहे.जर फोटो परवानगी घेऊन वापरला असेल, तर तो कोणी वापरला, का वापरला हे स्पष्ट व्हायला हवं.अशा जाहिराती सर्वत्र म्हणजे राज्यभरातील वर्तमानपत्रे. होर्डिंग्ज,पोर्टल्सवर करण्यात आलेल्या आहेत, त्यावर करोडोंचा खर्च करण्यात आला आहे.असा खर्च निनावी होणं योग्य नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचा शोध घेतला पाहिजे.

विनफास्टच्या व्हीएफ ६ आणि व्हीएफ ७या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल्सचे बाजारात दमदार पदार्पण

नवी दिल्ली विनफास्ट या कंपनीने आज भारतात आपल्या बहुप्रतीक्षित प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केल्या. यात स्मार्ट व स्लीक स्वरुपाचे व्हीएफ-६ आणि स्पोर्टी व सुबक रूप असलेले व्हीएफ-७ या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या सादरीकरणातून भारताच्या झपाट्याने विस्तारत असलेल्या ईव्ही बाजारपेठेत विनफास्टचे पहिले पाऊल पडले असून, देशाच्या हरित आणि शाश्वत गतिशीलतेकडे होणाऱ्या संक्रमणाला पाठबळ देण्याची कंपनीची ठाम बांधिलकी अधोरेखित झाली आहे. भारताच्या ईव्ही भविष्याची दिशा ठरवणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा मानसही विनफास्टने यावेळी स्पष्ट केला.

कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि तंत्रज्ञान यासाठी भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर स्वीकारू लागले आहे. अशा वेळी त्यांच्या अपेक्षांना साजेशा एसयूव्ही विनफास्टने तयार केल्या आहेत. व्हीएफ-६ आणि व्हीएफ-७ या दोन्ही गाड्यांमध्ये रेंज, आराम, सुरक्षा आणि आधुनिक वैशिष्ट्ये यांचा मिलाफ आहे. प्रीमियम ईव्ही मालकीचा अनुभव या गाड्या नव्याने परिभाषित करणार आहेत. त्या बाजारात उतरवून विनफास्टने देशातील परिवर्तनाला गती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा चांगला अनुभव असलेल्या विनफास्टने भारतातील स्थानिक बाजारपेठेत बळकट स्थान मिळवून येथील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. 

या प्रसंगी विनफास्ट एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सँह चाउ म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आम्ही अशा गाड्या सादर केल्या आहेत, ज्या केवळ भारतात तयार झाल्या नाहीत, तर भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून आम्ही एक संपूर्ण इलेक्ट्रिक मोबिलिटी इकोसिस्टम सादर करीत आहोत, जी भारतीय कुटुंबांचा विचार करून काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. व्हीएफ-६ आणि व्हीएफ-७ ही वाहने व्यावहारिक डिझाइन, प्रीमियम दर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या सुंदर संयोगातून बनली आहेत. अशाच गाड्यांची भारतीय ग्राहकांना अपेक्षा असते. थुथुकुडीतील आमच्या अत्याधुनिक कारखान्याच्या आणि इथल्या परिसंस्थेशी केलेल्या मजबूत भागीदारीच्या बळावर, आम्ही जागतिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अग्रगण्य बनण्याच्या भारताच्या ध्येयाला पाठबळ देण्यास कटिबद्ध आहोत.”

भारतीय कुटुंबांसाठी तयार केलेल्या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या गतिमान बाजारपेठेत विनफास्टने अगदी योग्य वेळी पाऊल ठेवले आहे. या क्षेत्रात अभूतपूर्व वाढ होत असून प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्हींसाठी ग्राहकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उच्च श्रेणीतील वाहनांत आढळणारी प्रगत वैशिष्ट्ये, अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आणि विक्रीनंतरची संपूर्ण सेवा या गोष्टी शाश्वत तंत्रज्ञानावरील वाहने हवी असणाऱ्या भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यावर कंपनीचा भर आहे.

विनफास्ट व्हीएफ

‘निसर्गातील द्वैत’ या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन व्हीएफ-६ ही प्रीमियम कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही बनविण्यात आली आहे. आनंद आणि आलिशानता, तंत्रज्ञान आणि मानवी केंद्रीतता या भिन्न गुणांचा सुंदर संगम साधत ही गाडी उत्कृष्ट कामगिरीचा व वैशिष्ट्यांचा अप्रतिम अनुभव देते.

विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ५९.६ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक असून, फक्त २५ मिनिटांत बॅटरी १० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. एआरएआय प्रमाणित ४६८ किमीपर्यंतची रेंज, २,७३० मिमी लांबीचा व्हीलबेस आणि १९० मिमी इतका ग्राउंड क्लीयरन्स ही वैशिष्ट्ये भारतीय कुटुंबांच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

ग्राहकांसाठी विविध पर्याय  व्हीएफ-६ प्रीमियम एसयूव्ही ही दोन इंटेरियर ट्रिम रंगांमध्ये आणि अर्थ, विंड आणि विंड इन्फिनिटी या नावाच्या तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार आहे.

• व्हीएफ अर्थ – या मॉडेलमध्ये १३० किलोवॅटची कमाल पॉवर आणि २५० एनएम टॉर्कची क्षमता आहे. आरामदायी प्रवासासाठी स्वतंत्र रिअर सस्पेन्शन देण्यात आले आहे. प्रत्येकाच्या ड्रायव्हिंग शैलीनुसार व मूडनुसार बदलता येणारे विविध ड्राइव्ह मोड्स उपलब्ध आहेत. गाडीच्या आतील भागात सर्वकाळ सुंदर वाटणारे ऑल-ब्लॅक इंटिरिअर आहे. १२.९ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, स्वयंचलित एसी, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट असलेली ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल ही सर्व उपकरणे गाडीत स्टॅंडर्ड स्वरूपात मिळतात. गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पियानोवरून प्रेरित गिअर सिलेक्टर. यामध्ये स्वतंत्र ड्राइव्ह मोड बटण, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो-होल्ड ही आधुनिक सोय देण्यात आलेली आहे.

• व्हीएफ-६ विंड – या मॉडेलमध्ये १५० किलोवॅटची कमाल पॉवर आणि ३१० एनएम टॉर्क आहे. ही गाडी केवळ ८.९ सेकंदांत शून्य ते शंभर किमी प्रतितास इतका वेग गाठते आणि त्यामुळे रोमांचक परफॉर्मन्स देते. गाडीच्या आतील भागात मोक्का ब्राऊन रंगसंगती, प्रीमियम व्हेगन लेदर अपहोल्स्ट्री, आठ प्रकारे अॅडजस्ट करता येणारी इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट आणि पुढील सीट्ससाठी व्हेंटिलेशन अशा सोयी आहेत. ड्युअल-झोन एसी, एअर आयोनायझर आणि पीएम १.० एअर फिल्ट्रेशनमुळे प्रवाशांना नेहमीच आरामदायी वातावरण मिळते. आठ स्पीकर्स असलेली ऑडिओ सिस्टीम, रंगीत एचयूडी प्रोजेक्शन, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, तसेच समोर आणि मागे ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंगसह लेव्हल-टू एडीएएस पॅकेज या गाडीत दिले आहे. याशिवाय १८ इंची मशीन-कट अलॉय व्हील्स या गाडीच्या डिझाइनला अधिक प्रभावी बनवतात.

• व्हीएफ विंड इन्फिनिटी  या मॉडेलमध्ये व्हीएफ-६ विंडची सर्व वैशिष्ट्ये आहेतच, त्याव्यतिरिक्त एज-टू-एज पॅनोरामिक फिक्स्ड ग्लास रूफ देण्यात आले आहे.

• एआरएआयची प्रमाणित रेंज – अर्थ : ४६८ किमी, विंड : ४६३ किमी.

व्हीएफ मॉडेलमध्ये असलेल्या अनेक आधुनिक आणि आकर्षक सुविधा – या गाडीत ऑटो लेव्हलिंगसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि पुढील-मागील भागात सिग्नेचर लाईट्स आहेत. अॅकॉस्टिक विंडशील्ड आणि काचेचे छत यामुळे गाडीला प्रीमियम लूक मिळतो. रिव्हर्स लिंक असलेले ओआरव्हीएम, की-लेस एन्ट्री आणि स्टार्टची सोय, तसेच ड्रायव्हर सीटसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट उपलब्ध आहे. ऑटो एसी, सर्व खिडक्यांसाठी ऑटो अप-डाउन आणि अँटी-पिंच सुविधा, बेझल-लेस ऑटो डिमिंग आयआरव्हीएम या सोयी गाडीला अधिक आरामशीर बनवतात. सुरक्षेच्या दृष्टीने एबीएस, ईबीडी, बीए, ईएससी, टीसीएस, एचएसए, आरओएम, ईएसएस अशा अत्याधुनिक प्रणालींसह सर्व चाकांवर डिस्क ब्रेक्स दिले आहेत. पावसाचे थेंब ओळखून कार्यान्वित होणारे रेन-सेन्सिंग वायपर्स, सात एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (डीटीपीएमएस), ३६० अंशांत फिरणारा सराऊंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम) आणि क्रूझ कंट्रोल यामुळे सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे. मनोरंजन आणि तंत्रज्ञानासाठी १२.९ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस एएसीपी, सहा स्पीकर्स, ड्रायव्हिंगचे व रिजनचे विविध मोड्स आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानाची जोड गाडीला स्मार्ट, स्टायलिश आणि पूर्णतः सुसज्ज बनवते.

विनफास्ट व्हीएफ

“विश्व हे असमतोल आहे” या डिझाईन तत्त्वावर आधारलेल्या व्हीएफ-७मध्ये दमदार बाह्यरचना आणि प्रीमियम दर्जाचे इंटेरियर यांचा उत्कृष्ट संगम साधण्यात आला आहे. ही मोठी एसयूव्ही असून तिची लांबी ४.५ मीटरपेक्षा जास्त आहे आणि तिचा व्हीलबेस २,८४० मिमी आहे. दोन बॅटरी पॅक आणि पाच व्हेरियंट्समध्ये व्हीएफ-७ मॉडेल उपलब्ध होणार आहे. अर्थ, विंड, विंड इन्फिनिटी, स्काय आणि स्काय इन्फिनिटी असे हे व्हेरियन्ट आहेत. तसेच या गाडीत दोन इंटेरियर रंगांचे पर्याय आणि एफडब्ल्यूडी (फ्रंट-व्हील ड्राइव्ह) आणि एडब्ल्यूडी (ऑल-व्हील ड्राइव्ह) अशी दोन ड्राइव्हट्रेन कॉन्फिगरेशन्स उपलब्ध असतील.

• व्हीएफ अर्थ – या गाडीत ५९.६ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक असून, १३० केडब्ल्यू पीक पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क निर्माण करणारी मोटर आहे. फक्त २४ मिनिटांत बॅटरी १० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. गाडीचे इंटिरियर स्पोर्टी ब्लॅक व्हेगन लेदरने सजवलेले असून, कलर्ड एचयूडी प्रोजेक्शन, पावसाचा अंदाज घेऊन चालणारे रेन-सेन्सिंग वायपर्स, ड्युअल-झोन एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट असलेली ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल आणि १९ इंचांची मोठी अलॉय व्हील्स या सर्व सुविधा प्रमाणित स्वरूपात उपलब्ध आहेत. याशिवाय, पियानोवरून प्रेरणा घेतलेला गिअर सिलेक्टर हा गाडीच्या डिझाइनला वेगळेपण देतो. यात स्वतंत्र ड्राईव्ह मोड बटण, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्डसारख्या आधुनिक सुविधाही आहे. त्यामुळे गाडीला एकाचवेळी स्पोर्टी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व प्राप्त होते.

• व्हीएफ विंड  या मॉडेलमध्ये अधिक मोठा ७०.८ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक असून, पीएमएसएम मोटरमधून १५० केडब्ल्यू कमाल शक्ती आणि ३१० एनएम पीक टॉर्क मिळतो. गाडी फक्त ९.५ सेकंदांत शून्य ते शंभर किमी प्रतितास असा वेग गाठू शकते. बॅटरीचे १० ते ७० टक्के चार्जिंग केवळ २८ मिनिटांत पूर्ण होते. स्पोर्टी ब्लॅक रंगात रंगवलेले १९ इंची अलॉय व्हील्स, पॉवर्ड टेलगेट, आठ प्रकारे अॅडजस्ट करता येणारी ड्रायव्हर सीट, वायुवीजन असलेल्या पुढील सीट्स, आठ स्पीकर्सची ऑडिओ सिस्टीम या सर्व सुविधा गाडीला अधिक आरामदायी आणि आधुनिक बनवतात. याशिवाय, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि पूर्ण एडीएएस लेव्हल-टू पॅकेजमधील अनेक अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यात स्टिअरिंगवर बसवलेला ड्रायव्हर मॉनिटरिंग कॅमेरा आणि चालकाच्या विचलनाचा इशारा देणारी स्मार्ट यंत्रणाही समाविष्ट आहे. मोक्का ब्राऊन रंगातील प्रीमियम व्हेगन लेदर इंटिरियर्स गाडीच्या आभामंडळात अधिक श्रीमंतीची भर घालतात.

• व्हीएफ स्काय – या व्हेरिएंटमध्ये व्हीएफ-७ विंडमधील सर्व सुविधा तर आहेतच, शिवाय ड्युअल मोटर सेटअपमुळे तब्बल २६० केडब्ल्यू एकत्रित कमाल शक्ती आणि ५०० एनएम पीक टॉर्क निर्माण होतो. यामुळे गाडीला एडब्ल्यूडी म्हणजेच ऑल-व्हील ड्राइव्हची क्षमता मिळते आणि ती फक्त ५.८ सेकंदांत शून्य ते शंभर किमी प्रतितास असा वेग गाठू शकते.

• व्हीएफ विंड इन्फिनिटी  व्हीएफ स्काय इन्फिनिटी  यामध्ये एज-टू-एज पॅनोरामिक फिक्स्ड ग्लास रूफ हे अतिरिक्त आकर्षण आहे.

एआरएआय प्रमाणित रेंज – अर्थ : ४३८ किमी, विंड : ५३२ किमी, स्काय : ५१० किमी.

व्हीएफमधील स्टॅंडर्ड वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत  या मॉडेलमध्ये १९ इंचांची मोठी अलॉय व्हील्स, ऑटो-डिमिंग आणि मेमरी फंक्शन्ससह हीटेड ओआरव्हीएम, फ्लश डोअर हँडल्स, रंगीत एचयूडी प्रोजेक्शन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चार्ज करण्यासाठी ९० वॅट क्षमतेचा सी-टाईप यूएसबी पोर्ट आणि ड्युअल-झोन एअर कंडिशनिंग अशा सोयी आहेत. गाडीत ऑटो लेव्हलिंगसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, पुढे-मागे सिग्नेचर लाईट्स, अॅकॉस्टिक विंडशील्ड आणि काचेचे छत, रिव्हर्स लिंक ओआरव्हीएम, की-लेस एन्ट्री आणि स्टार्ट, ड्रायव्हर सीटसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, ऑटो एसी, सर्व खिडक्यांसाठी ऑटो अप-डाउन आणि अँटी-पिंच सुविधा तसेच बेझललेस ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडी, बीए, ईएससी, टीसीएस, एचएसए, आरओएम, ईएसएस या आधुनिक प्रणालींसह सर्व चाकांवर डिस्क ब्रेक्स दिले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन आपोआप सुरू होणारे वायपर्स, सात एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (डीटीपीएमएस), ३६० अंशांत फिरणारा सराऊंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम) आणि क्रूझ कंट्रोल यामुळे सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे. मनोरंजनासाठी १२.९ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस एएसीपी, सहा स्पीकर्स, ड्राईव्हिंगचे व रिजनचे विविध मोड्स आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीची जोड या सर्व गोष्टी या गाडीला एकाचवेळी स्मार्ट, आरामदायी आणि प्रगत स्वरूप देतात.

संपूर्ण परिसंस्थेच्या भागीदारीतून बाजारपेठेत प्रवेश

विनफास्टने ग्राहकांना समाधानकारक मालकीचा अनुभव मिळावा यासाठी मजबूत आणि व्यापक परिसंस्था उभारली आहे. कंपनीने प्रमुख बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी करून ग्राहकांसाठी विशेष वित्तयोजना उपलब्ध केल्या आहेत. रोडग्रिड, मायटिव्हीएस आणि ग्लोबल अश्युअर यांच्यासोबतच्या धोरणात्मक सहकार्यातून देशभरात चार्जिंग सुविधा आणि विक्रीनंतरच्या सेवांचे जाळे उभारले जात आहे. शाश्वततेबाबतच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेताना विनफास्टने बॅटएक्स एनर्जीजसोबत हातमिळवणी केली आहे. त्या माध्यमातून प्रगत बॅटरी रीसायकलिंग आणि सर्क्युलर बॅटरी मूल्यसाखळी तयार केली जाईल. या सर्व उपक्रमांमधून कंपनी जबाबदार आणि नाविन्यपूर्ण पद्धतींनी हरित भवितव्य घडवण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला मूर्त रूप देत आहे.

वितरकांचे देशव्यापी नेटवर्क आणि मेडइनइंडिया उत्पादन

विनफास्ट इंडिया देशभरातील आपली उपस्थिती झपाट्याने वाढवत आहे. कंपनीने २०२५च्या अखेरीस २७ शहरांमध्ये ३५ डिलर टचपॉईंट्स आणि २६ वर्कशॉप्स सुरू करण्याची योजना आखली आहे. यात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, जयपूर, कोची आणि लखनौ यांसारख्या महानगरांबरोबरच उदयोन्मुख ईव्ही केंद्रांचा समावेश आहे.

तामिळनाडूतील थूथुकुडी येथील अत्याधुनिक कारखाना हा कंपनीच्या भारतातील धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. या कारखान्यात व्हीएफ-६ आणि व्हीएफ-७ या दोन्ही गाड्यांची असेंब्ली होणार आहे. उत्पादनाचे व निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या धोरणानुसार हा कारखाना तामिळनाडूत उभारण्यात आला आहे. या कारखान्याचे स्थान बंदराजवळ असल्याने, देशांतर्गत मागणी भागवण्यासोबतच निर्यातीच्या बाजारपेठेलाही प्रभावीरीत्या सेवा देण्यासाठी हे स्थान आदर्श ठरते.

जागतिक अनुभवस्थानिक बांधिलकी

विनफास्ट भारतात आपला समृद्ध आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन येत आहे. कंपनीने यापूर्वी अमेरिका, कॅनडा, युरोप, फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि मध्यपूर्व आशिया या बाजारपेठांमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश केला आहे. आज कंपनीची उपस्थिती तीन खंडांमध्ये पसरलेली असून, जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहन क्रांती घडविण्याच्या तिच्या दृढ बांधिलकीचे हे प्रतीक आहे.

विनफास्टने आपल्या मातृभूमी व्हिएतनाममध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे व त्या देशात अग्रगण्य वाहन निर्माता म्हणून स्थान मिळवले आहे. कंपनीने वेगवान प्रगती आणि नाविन्यपूर्णतेसाठी आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळवली आहे.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दै. ‘आज का आनंद’चे शैलेश काळे, कार्यवाहपदी दै. पुढारीचे पांडुरंग सांडभोर तर खजिनदारपदी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सुनीत भावे

पुणे :पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शैलेश काळे( दै. आज का आनंद), कार्यवाहपदी पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी) आणि खजिनदारपदी सुनीत भावे ( दै. महाराष्ट्र टाइम्स) यांची सोमवारी (दि. ८ सप्टेंबर ) बिनविरोध निवड करण्यात आली.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी २२ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली. ऍड. प्रताप परदेशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यामध्ये निवडलेल्या विश्र्वस्तांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आज पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात)आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील (सकाळ) यांची पदसिद्ध विश्वस्तपदी याआधीच निवड आली आहे.नवीन विश्वस्तांची पदाधिकारी निवडीची सभा सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) मावळते अध्यक्ष शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आली. या सभेत नवीन पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मावळते कार्यवाह डॉ. गजेंद्र बडे उपस्थित होते.

वनराजच्या खुनातील आरोपी मुलाच्या अंत्ययात्रेला येणार म्हणून पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आयुष आंदेकरचा अंत्यविधी

पुणे : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने आंदेकर टोळीने वनराज च्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करून बदल घेण्यास प्रारंभ केला . आयुष कोमकर क्लासमधून आपल्या घरी आला होता. यावेळी त्याच्यावर झालेल्या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला. आयुषच्या पार्थिवावर आज तीन दिवसांनंतर अंत्य संस्कार करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता आयुषच्या अंत्यविधीसाठी केवळ त्याच्या वडिलांना हजर राहण्यासाठी परवानगी मिळाली होती.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आयुषचे आई-वडील दोन्ही जेलमध्ये आहेत. आयुषचे वडील गणेश कोमकर याला परवानगी मिळाल्यानंतर त्याला पोलिसांच्या बंदोबस्तात नागपूर कारागृहातून पुण्यात आणण्यात आलं. तसेच पुण्यात गणेश विसर्जनामुळे पोलिसांवर ताण होता. यामुळे आयुषच्या अंत्यविधीला तीन दिवस विलंब झाला. त्यानंतर अखेर आज आयुषच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.आयुष कोमकर याच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात तैनात करण्यात आला होता. आयुषच्या अंत्यविधीला त्याचे वडील गणेश कोमकर येणार असल्याने आंदेकर गटाकडून घातपात केला जाऊ शकतो, असा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा स्मशानभूमी परिसरात तैनात होता. कोणत्याही प्रकारची घातपाताची घटना घडणार नाही, याची पोलिसांकडून पूर्ण तयारी करण्यात आली.

आयुषचं पार्थिव आज ससून रुग्णालयातून वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं. पण त्याचे वडील गणेश कोमकर याच्या येण्याची प्रतीक्षा करण्यात आली. गणेश कोमकर याच्यासाठी शेवटचा अंत्यविधी काही काळासाठी थांबवण्यात आला. यावेळी कोमकर कुटुंबीयांसाठी वैकुंठ स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. दोन पोलीस उपायुक्त प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. संवेदनशील परिस्थितीत जमाव नियंत्रण करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते.आयुषच्या अंत्यविधीवेळी कोमकर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. यावळी अत्यंत दुःखद वातावरण होते. आयुषच्या भावडांनी आणि इतर नातेवाईकांना यावेळी टाहो फोडला होता. आयुषचा भाऊ खूप रडत होता. त्याचा आक्रोश सुन्न करणारा होता. या दरम्यान थोड्या वेळाने पेलिसांच्या आणखी काही गाड्या दाखल झाल्या. यापैकी एका पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर बाहेर पडला. त्याच्या आगमनानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्य संस्काराचे विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी आयुषचे वडील गणेश कोमकर यांनी त्यास अखेरचा निरोप दिला. अंत्यविधीवेळी पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतलेली बघायला मिळाली.