Home Blog Page 320

मी कुठलाही ‘सामना’ पाहत नाही – एका द्विअर्थी वाक्यात CM फडणविसांनी भारत-पाक सामन्याला होणारा विरोध लावला उडवून

पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज होणाऱ्या भारत -पाक क्रिकेट सामन्याबद्दल पुण्यात पत्रकारांनी छेडले असता ‘ मी कुठलाही सामना पाहत नाही , त्यामुळे मला माहिती नाही. अशा एका द्विअर्थी वाक्यात भारत -पाक संदर्भातील लोकभावना आणि विरोधकांचा विरोध फडणवीस यांनी उडवून लावला .

ते पुढे म्हणाले कि ,राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील जीआर देखील काढला आहे. या जीआरमुळे कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार असून, ओबीसीतून आरक्षणाचा लाभ भेटणार आहे. या जीआरविरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून, यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “२०१४ ते २०२५ या काळात ओबीसी समाजासाठी जितके निर्णय झाले, ते केवळ आमच्या सरकारकडूनच झाले आहेत. ओबीसी वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसींसाठी योजना आखणारे आम्ही, ‘महाज्योती’ स्थापन करणारे आम्हीच. ओबीसींसाठी ४२ नवीन वसतिगृहे देणारे आणि उद्धव ठाकरे सरकारने घालवलेले २७ टक्के राजकीय आरक्षण परत आणणारे आमचे सरकार आहे. मग ओबीसींचे खरे हित पाहणारे कोण, हे समाजाला उत्तम ठाऊक आहे.”

यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसींचे हित केले? अशी विचारणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेले काम आणि इतर सरकारांनी केले काम, यावर माझ्याशी खुली चर्चा करावी, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. ते म्हणाले, विरोधकांना केवळ राजकारण करता येते. पण आम्हाला ओबीसी समाजाचे हित पाहायचे आहे, आणि आम्ही ते करणारच आहोत. सगळ्या समाजांचे हित आमचेच सरकार करू शकते, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ओबीसी समाजातील दोन तरुणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. यावही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जो पर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. विना नोंदीचे कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाहीये, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कुठेतरी आरक्षण गेलेल्याचे वातावरण तयार केले जात आहे. अशा प्रकारचे वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. दुसरीकडेही, टोकाचेच राजकारण चाललेले आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचे भले होऊ शकत नाही. समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच समाजाचे भले होऊ शकते. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवत आहोत. समाजाची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे नेत्यांनी कितीही राजकारण केले, तरी समाज वास्तविकता समजून घेतो, हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

पवारांनी एक्स म्हटले की, वाय समजायचे-राज्याची एकतेची वीण उसवली जात असल्याचे शरद पवार म्हणाले होते. वाट्टेल ते प्रयत्न करून आम्ही ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार साहेब कशासाठी प्रसिद्ध आहेत, हे आपल्याला माहीत आहे. पवार साहेबांनी एक्स म्हटले की, वाय समजायचे. ते मोठे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आणखी काय बोलणार.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन_

नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️ सीओईपी जीवन गौरव व अभिमान पुरस्कारांचे वितरण

पुणे, दि. १४ सप्टेंबर: देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, माजी संचालक शैलेश सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, सचिव सुजीत परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वायतत्ता मिळाल्यामुळे सीओईपीसारख्या संस्था जागतिक स्तरावर भागीदारी करू शकतील, तंत्रज्ञान देवाण-घेवाण व सहयोगी संशोधन करू शकतील. यामुळे महाराष्ट्राची ३ ट्रिलियन आणि भारताची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना सक्षम मानव संसाधनाचा सेतू उभा राहील. आगामी काळात अधिकाधिक संस्थांना स्वायतत्ता देण्याचा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे,असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे २८ एकर जागा दिली आहे. अशा संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून मदत केली जाईल. तसेच संशोधन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. भारतातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ संस्था म्हणून सीओईपीकडे बघितले जाते. या संस्थेला १७२ वर्षांचा इतिहास असून २०२८ मध्ये संस्थेला १७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा भारताच्या शैक्षणिक इतिहासातील विलक्षण प्रवास आहे. सीओईपीमधून शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात माजी विद्यार्थी कार्यरत असून समाजातील सर्व क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य ते करत आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, १९९० च्या संगणकीकरणाच्या काळात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या, मात्र हळूहळू मानव संसाधनाची निर्मिती होत गेली, भारतीय तरुणांनी सिलीकॉन व्हॅली व्यापली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली क्षमता दाखवून दिल्यामुळे भारताकडे जागतिक पातळीवर बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याचे सर्व श्रेय अभियंत्यांनाच जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कम्प्युटिंगमुळे आज जगात वेगाने बदल होत आहेत. या बदलांसोबतच नवनवीन संधी निर्माण होत असून हॅकेथॉनसारख्या उपक्रमांतून त्याची झलक दिसते. पुण्यातील कृषी हॅकेथॉनमध्ये बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या नव्या किडींवर मात करण्यासाठी एआयच्या साहाय्याने अंदाज दर्शविणारे मॉडेल विकसित झाले असून हे निश्चितच आशादायक आहे.

तांत्रिक संस्था व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार मानव संसाधन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नवीन शैक्षणिक धोरण पारंपरिक विषयांना आधुनिकतेसह नव्या संधी उपलब्ध करून देत असल्याने तरुणाई हा बदल स्वीकारेल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश झाला आहे. यामध्ये संशोधन, पेटंट व रॉयल्टी यावर भर देण्यात आला आहे. २०४७ मध्ये विकसित भारतामध्ये या बाबींचे योगदान महत्त्वाचे राहील. सीओईपीसारख्या संस्थांचे बळकटीकरण करण्यास शासन सहकार्य करेल.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव व सीओईपी गौरव पुरस्कार वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ए.आर.डी.ई.च्या माजी शास्त्रज्ञ श्रीमती वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. सीओईपी अभिमान पुरस्कार विलास जावडेकर डेव्हलपर्स, पुणेचे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर, एएसएमईचे माजी अध्यक्ष डॉ. महांतश हिरेमठ, स्ट्रडकॉम कन्सल्टंट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयंत इनामदार, जेएनपीएचे अध्यक्ष उमेश वाघ , इलेक्ट्रोमेक मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक तुषार मेहेंदळे आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते यांनी केले. कुलगुरू सुनील भरुड यांनी विद्यापीठाची माहिती दिली.

ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील नव्याने बांधलेल्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
१५० वर्षांचा अभिमानास्पद वारसा असलेले केंद्रीय ग्रंथालय आता आधुनिक, विशेष उद्देशाने उभारलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. हे ग्रंथालय ४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची गरज भागवेल. येथे गेल्या शतकातील मौल्यवान साहित्य, संदर्भग्रंथांचे जतन, आधुनिक डिजिटल साधने, सहयोगी अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन संगणक अभियांत्रिकी विभाग अत्याधुनिक प्रयोगशाळा व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असून नाविन्यपूर्ण संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे केंद्र ठरणार आहे.

अबब ..पुणेकरांनी दिले ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये

राष्ट्रीय लोकअदालतीत एकाच दिवशी सुमारे दीड लाख प्रकरणे निकालीपुणे जिल्हा राष्ट्रीय लोकअदालतमध्ये राज्यात अव्वल

एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज

पुणे, १४ सप्टेंबर: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (१३ सप्टेंबर) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अशोका सभागृहामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी दाखल २ लाख ४३ हजार ४२४ प्रकरणांपैकी १ लाख २७ हजार ५४१ प्रकरणे आणि विशेष मोहिमेत १७ हजार ५६० याप्रमाणे १ लाख ४५ हजार १०१ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे, या माध्यमातून ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या हस्ते लोकअदालतचे उद्धघाटन करण्यात आले. या उपक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती डेरे-मोहिते आणि संदीप मारणे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या.

दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश
लोकअदालतमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश प्राप्त झाले असून एकूण ९८ कोटी २५ लाख ६२ हजार ३९४ रक्कम तडजोडीपोटी जमा झाले आहेत. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) १ लाख ८४ हजार ७४४ दाखल प्रकरणांपैकी १ लाख ३ हजार ६६ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय तडजोडीसाठी घेण्यात आलेल्या एकूण ५८ हजार ६८० दाखल दाव्यापैकी (पोस्ट लिटिगेशन) २४ हजार ४७५ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यासह विशेष मोहिमेंतर्गत १७ हजार ५६० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये ५६७ कोटी १९ लाख १९ हजार २२७ रुपये तडजाेड वसूल शुल्क करण्यात आले आहे.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ५० हजार ३८०, तडजोड पात्र फौजदारी १८ हजार ३७४, वीज देयक १६२, कामगार विवाद खटले ७, भुसंपादन ३७, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण ३५, वैवाहिक विवाद ६८, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट २ हजार ४, इतर दिवाणी ४६३, महसूल १ हजार ३७६, पाणी कर ४८ हजार १६७, ग्राहक विवाद ५ आणि इतर ६ हजार ४६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज करण्यात आले.

एम.के. महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश: लोक अदालत ही केवळ वाद निपटाऱ्याची पद्धत नसून ती एक लोकाभिमुख चळवळ आहे. लोक अदालत ही न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करते. लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा विक्रमी निपटारा हा सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

श्रीमती सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण: या ऐतिहासिक यशामागे सर्व न्यायमूर्ती, वकीलवृंद, न्यायालयीन कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे अथक योगदान आहे. लोक अदालतीत एकाच दिवशी सुमारे एक लाख ४५ हजार प्रकरणांचा निपटारा होणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह न्यायमूर्ती, वकीलगण, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, बँक, इतर वित्तीय संस्था आदींचे सहकार्य लाभल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आभार व्यक्त करते.

जनरल प्रॅक्टिशनर्स हे मल्टीस्पेशालिस्ट डाॅक्टर्स-आरोग्यप्रमुख डाॅ. नीना बोराडे 

पुणे :  जनरल प्रॅक्टिशनर्स बहुतेक वेळा मल्टीस्पेशालिस्ट असतात. त्यांचे काम सगळ्यात जास्त अवघड असते. आयुर्वेदापासून सुरुवात करत ते अॅलोपथी च्या पुढे आज आले आहेत. अॅलोपथी आणि आयुर्वेद अशी एकात्मक औषधोपचार प्रणाली आपल्याला हवी आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स हे शक्य करतील, असे मत पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डाॅ. नीना बोराडे यांनी व्यक्त केले.

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स प्रियदर्शिनी यांच्या वतीने महिला परिषद व लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्कार समारंभा चे आयोजन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात करण्यात आले होते. डॉ. रूपा अगरवाल यांना लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ, असोसिएशनच्या सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा डॉ. मनीषा खेडकर, सह-अध्यक्षा डॉ. रश्मी खैरनार व डॉ. अमृता महाजन, सचिव डॉ. सीमा पाटील व डॉ. हर्षला बाबर तसेच संयुक्त सचिव डॉ. सयानी गांधी व डॉ. तेजश्री गुरव उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अमोल लुंकड यांनी पीसीओएस विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. मधुसूदन असावा यांनी हृदय व महिला आरोग्य या विषयावर माहिती दिली. सीए रोहन गुप्ता यांनी आर्थिक साक्षरता व महिला यावर मार्गदर्शन केले. डॉ. अमोल लुंकड यांनी शेवटी वंध्यत्वावरील प्रकरणाधारित चर्चा केली.

डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांची वाढ फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मकही आहे. महिलांचे योगदान मोठे असून संवेदनशीलतेची जोड मिळाल्यास वैद्यकीय सेवा अधिक सुंदर होते. महिला डॉक्टरांमध्ये बाईपणाबरोबर आईपण देखील महत्त्वाचा गुण आहे, आईपण हा विचार, वृत्ती आणि सेवाभाव आहे.  

आज काही डॉक्टर १२ तासांपेक्षा जास्त काम करतात, ज्यामुळे कामाचे तास वाढतात आणि तणावही येतो. त्यामुळे स्वतःची आरोग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मेंटल हेल्थसाठी डॉक्टरांनी एकत्र येणे गरजेचे आहे. समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःची देखील काळजी घ्यावी.

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या की, ओपन सर्जरीपासून लेप्रोस्कोपीकडे जाणे रुग्णांसाठी मोठा बदल ठरला. आताच्या काळात रोबोटिक शस्त्रक्रियेच्या सहाय्याने अत्यंत अचूकता आणि कौशल्यामुळे क्लिष्ट लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शक्य झाल्या आहेत. रोबोटिक उपकरणांवर खर्च येतो कारण प्रत्येक उपकरणाची ठरलेली जीवनमर्यादा असते. काही खर्च रुग्णाला पास करावा लागतो, पण काळानुसार हा खर्च कमी होईल. सध्या या तंत्रज्ञानामुळे आधी अशक्य वाटणाऱ्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आता शक्य झाल्या आहेत.

डॉ. सुनील भुजबळ, डॉ. मनीषा खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता व डॉ. राजेश दोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. डॉ.राजेश दोषी यांनी आभार मानले.

जीएसटीमुळं महाराष्ट्रात 20 लाख कोटींची पाकीट मारी:देवा भाऊंची जाहिरात मेघा इंजिनिअरिंगने दिली का?– रोहित पवार

मुंबई- PM मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा GST वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीट मारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीप ही फोटोखाली देणार आहात का? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंच्या वापरावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यासोबतच जीएसटीमुळे जनतेची आर्थिक फसवणूक झाल्याची ‘तळटीप’ही लावावी, असे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? असा सवालही त्यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा जी एसटी (GST) वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीट मारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीपही फोटोखाली देणार आहात का? जीएसटीमुळे सर्वात मोठी पाकीट मारी (20 लाख कोटी) महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर प्रत्येक घरात ही तळटीप असलेले फोटोच लावावे लागतील.कदाचित हे फोटो लावण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कल्पनाही नसेल, पण नेत्यांना खूश करण्यासाठी आजूबाजूचे काही नेते अशा करामती करतात.

मेघा इंजिनिअरिंगने जाहिरात केली का?

रोहित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापल नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 रुपये त्यांचे माफ झाले आहेत. कोकणात अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवा भाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

पाकिस्तानविरुद्ध काळ्या पट्ट्या बांधून खेळणार टीम इंडिया

0

आजच्या आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू काळ्या पट्ट्या बांधतील. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. स्टेडियममध्ये बॅनर आणि पोस्टर्स घेऊन जाण्यासही बंदी आहे.

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. आजचा सामना जिंकणारा संघ सुपर-४ मध्ये पोहोचेल हे जवळजवळ निश्चित आहे.फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात भारतीय संघ आघाडीवर आहे. पाकिस्तानचा संघ फॉर्मच्या बाबतीत भारताच्या जवळपासही नाही. मग सामन्यापूर्वी असे गृहीत धरावे का की भारत जिंकेल?

पाकिस्तानला सामन्यात आणणारा एकच घटक आहे. तो घटक म्हणजे दुबईची खेळपट्टी. या खेळपट्टीत काय खास आहे आणि ती गेम चेंजर का ठरू शकते, हे आपण नंतर जाणून घेऊ. सर्वप्रथम, टी-२० स्वरूपात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांचा सारांश काय आहे ते पाहा.

या दोन्ही संघांमधील शेवटचा सामना अमेरिकेत झालेल्या टी-२० विश्वचषकात झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने केवळ ११९ धावा करूनही ६ धावांनी सामना जिंकला. या विश्वचषकानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांसारखे अनुभवी भारतीय खेळाडू निवृत्त झाले. तरीही, भारतीय संघाची कामगिरी आणखी चांगली झाली. तेव्हापासून संघाने ८६% टी-२० सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, कामगिरी सुधारण्याच्या आशेने पाकिस्तानने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सारख्या खेळाडूंना संघातून वगळले. तरीही, संघाची पातळी घसरतच राहिली. गेल्या टी-२० विश्वचषकापासून पाकिस्तानने फक्त ५०% सामने जिंकले आहेत.

जेव्हा भारतीय संघ इतका चांगला आहे तेव्हा खेळपट्टी सामना कसा खराब करू शकते?

दुबई क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत ९५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ४६ मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. ४८ मध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. १ सामना बरोबरीत सुटला आहे.

या रेकॉर्डमध्ये असे काही खास नाही जे भारतीय संघासाठी तणावाचे कारण ठरेल, परंतु दुबई रेकॉर्डचे अधिक बारकाईने विश्लेषण केल्यास चित्र बदलते.

२०२० पासून आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये झालेल्या सर्व टी-२० सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला मोठा फायदा झाला आहे. या काळात, असे १८ सामने झाले आहेत ज्यात दोन्ही संघ कसोटी खेळणारे देश होते. या १८ सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

म्हणजेच, जर आजच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली, तर पाकिस्तानला जोरदार टक्कर देता येईल. अलिकडच्या काळात असे दोनदा घडले आहे. पहिल्यांदा २०२१ च्या टी-२० विश्वचषकात आणि दुसऱ्यांदा २०२२ च्या टी-२० आशिया कपमध्ये. गेल्या १३ वर्षांत, हे एकमेव दोन टी-२० सामने आहेत ज्यात पाकिस्तानचा संघ भारताला हरवू शकला आहे.

शेवटी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११

भारत- अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान : सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि सुफयान मुकीम.

धर्मसत्तेचा पराभव करणे हे खरे आव्हान :विजय दिवाण 

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वे गांधी दर्शन शिबिर गांधी भवन, कोथरूड येथे यशस्वीपणे पार पडले. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात विविध विषयांवर विचारप्रवर्तक मार्गदर्शन झाले.मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी ‘भारतातील भाषेचा प्रश्न’ या विषयावर सखोल विचार मांडले. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘गांधी, विनोबा आणि सद्य-परिस्थिती’ या विषयावर प्रेरणादायी भाष्य केले. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी ‘शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर उपस्थितांना ऐतिहासिक दृष्टिकोन दिला. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचे अध्यक्षस्थान डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) यांनी भूषविले. या प्रसंगी  डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे,डॉ.प्रकाश परब,डॉ.प्रवीण सप्तर्षी,अॅड. स्वप्नील तोंडे,अप्पा अनारसे,तेजस भालेराव,राजेश तोंडे,संदीप बर्वे  यांची विशेष उपस्थिती होती.शिबिरात विद्यार्थी, संशोधक, सर्वोदयी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

विजय दिवाण म्हणाले,’ विनोबा भावे यांच्यावर सरकारी संत असल्याचे आरोप झाले. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कावा पुरेपूर ओळखल्याने त्यांनी संघासोबत जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. आणीबाणीत ज्यांनी संघाला मोठे केले,त्यांनी ज्या चुका केल्या,त्या विनोबा भावे आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांनी केल्या नाहीत. विनोबांची दूरदृष्टि आज मान्य करायला हरकत नाही. काँग्रेसला पाठिंबा देऊनच भाजपचा पराभव आगामी काळात होईल. 

‘आजची परिस्थिती उत्तर पेशवाईसारखी आहे.तेव्हाही धर्मसत्ता,अर्थसत्ता,राज्यसत्ता एकत्र होती आणि ती जाचक झाली होती.राज्यसत्ता,अर्थसत्ता यांचा पराभव करता येईल.मात्र, संघाचा आणि धर्मसत्तेचा पराभव करायला परिश्रम घ्यावे लागतील.कारण ती एकाच जातीच्या हातात आहे.धर्म न नाकारता, धर्मात सुधारणा करीत पुढे जावे लागणार आहे. फॅसिस्ट राजसत्ता, अर्थसत्ता उलथवून टाकता येईल, मात्र, धर्मसत्ता उलथवून टाकणे अवघड आहे. त्यामुळे खऱ्या  द्वेषरहित,मानवतावादी  धर्माच्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. स्वामी विवेकानंद, केवलानंद सरस्वती, स्वामी रामानंद तीर्थ ही उदाहरणे डोळयासमोर ठेवली पाहिजेत’, असेही ते म्हणाले.

डॉ.दीपक पवार म्हणाले,’हिंदी ही राष्ट्रभाषा आहे,हा गैरसमज निर्माण करण्यात आला आहे.हिंदी भाषा सक्तीच्या आग्रहामागे हिंदी-हिंदुस्थान-हिंदुत्ववाद मानणाऱ्यांचे राजकारण असून मराठी माणसाने त्याला बळी पडू नये.भाषा टिकली नाही तर प्रदेश टिकणार नाही,बोली टिकणार नाही.महाराष्ट्रात मराठी भाषेलाच प्राधान्य मिळाले पाहिजे.त्यासाठी प्रत्यक्ष लढ्यात मराठी माणसाने उतरले पाहिजे.अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठीच्या प्रसारासाठी ५०० कोटी मिळतील,असे समजणाऱ्यानी केंद्र सरकारने अशा कारणासाठी पूर्वी किती निधी दिला,याचा हिशेब काढून पाहिले पाहिजे.सकाळी मराठी आणि सायंकाळी हिंदुत्ववादी झाल्याने मराठी माणसाचे शिवसेना आणि मनसेचे झाले तसे नुकसान होणार आहे. 

‘इतिहासातील थरारक प्रसंग आपण आठवत राहतो मात्र त्याकाळातील भाषा व्यवहार आठवत नाही.मराठी माणसाने दिल्लीवर राज्य केले पण मराठी भाषेला मोठे केले नाही.मराठी शाळेत शिकणे,मराठीत बोलणे आवश्यक आहे,नोकरी-व्यवसायात प्रतिनिधित्वाचा आग्रह धरला पाहिजे.परप्रांतीयांनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे.मराठी फक्त आडनावाचे मराठी राहून उपयोगी नाही.मराठी समाजाचे अघोषित हिंदीकरण होतेय,हिंदूकरण होते आहे,त्याला विरोध केला पाहिजे.हिंदी भाषेच्या पोटातून देशांतर्गत वसाहतवाद येत आहे.त्याबाबत सावध राहिले  पाहिजे’,असेही डॉ.पवार यांनी सांगितले. 

अन्वर राजन म्हणाले,’आणीबाणी आणि त्यापूर्वी जनसंघाला अनेक पक्षांनी तत्कालिन कारणांनी जवळ केले.काँग्रेसचा वैचारिक घसरण झाल्याने आणीबाणीत पराभव झाला.पण, त्यानंतर काँग्रेस मध्ये सुधारणा झाल्या. पराभवानंतर सुधारणा होत जातात’.

टाटा टेक्नॉलॉजीज ने जर्मनीतील ईएस-टेक ग्रुपचे धोरण केले अधिग्रहण


पुढील पिढीतील मोबिलिटी सोल्युशन्स बनवण्याच्या त्यांच्या जागतिक क्षमतांना बळकटी देण्याचा उद्देश  

  • अभियांत्रिकी संशोधन आणि विकास (ईआरअँडडी) वाढीला गती: हे अधिग्रहण टाटा टेक्नॉलॉजीजच्या (टीटीएल) उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये – एडीएएस, कनेक्टेड ड्रायव्हिंग आणि डिजिटल अभियांत्रिकी – क्षमतांना वाढवते, हे त्यांच्या ओईएम संशोधन आणि विकास प्राधान्यांना अनुरूप आहे.
  • युरोपातील स्थान अधिक मजबूत होणार: जर्मनीतील ईएस-टेकचे नेतृत्व जगातील सर्वात प्रगत ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये टीटीएलची उपस्थिती मजबूत करते.
  • प्रतिभा आणि कौशल्यांमध्ये वाढ: सिस्टम अभियांत्रिकीमध्ये तज्ञ असलेल्या ३०० हून अधिक अभियंत्यांचे एक मजबूत टॅलेंट पूल सामील झाले आहे.
  • व्यावसायिक सहकार्यामध्ये वाढ: क्रॉस-सेल संधी सक्षम करण्यासाठी पूरक ऑफरिंग आणि भिन्न ग्राहक आधार आणि ओईएम खात्यांमध्ये व्यापक प्रवेश.
  • ईपीएसमध्ये वाढ: या व्यवहारांमुळे ऑपरेशनच्या पहिल्या पूर्ण वर्षापासून ईपीएसमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

पुणे, भारत / वुल्फ्सबर्ग, जर्मनी – १४ सप्टेंबर २०२५ – जागतिक स्तरावरील उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज (बीएसई: ५४४०२८, एनएसई: TATATECH) ने आज घोषणा केली की त्यांनी ईएस-टेक जीएमबीएच आणि त्यांच्या उपकंपन्यांचे (एकत्रितपणे, ईएस-टेक ग्रुप) १००% इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी एक निश्चित समझोता करार केला आहे ज्याचे एकूण रोख मूल्य €७५ दशलक्ष आहे. ही रक्कम पुढील दोन वर्षांत दिली जाईल आणि त्यात कामगिरीवर आधारित फायदे समाविष्ट आहेत. ऑपरेशनच्या पहिल्या पूर्ण वर्षापासून हा व्यवहार ईपीएससाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे.

ईएस-टेक ग्रुपची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली आणि याचे मुख्यालय जर्मनीतील वुल्फ्सबर्ग येथे आहे. हा एक प्रीमियम ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी सेवा प्रदाता आहे जो ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस), कनेक्टेड ड्रायव्हिंग आणि डिजिटल अभियांत्रिकीमध्ये अतिशय कुशल आहे. ३०० हून अधिक कुशल व्यावसायिकांच्या प्रतिभा समूहासह, ईएस-टेकने आपल्या ग्राहकांना जटिल सिस्टम अभियांत्रिकी उपाय प्रदान करून प्रतिष्ठा मिळवली आहे.

या अधिग्रहणासह, टीटीएलने त्यांच्या जागतिक वृद्धी धोरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, ज्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगाला भविष्यासाठी तयार अभियांत्रिकी उपाय प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. जगातील सर्वात प्रगत ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन सेंटरपैकी एक असलेले ईएस-टेकने जर्मनीमध्ये एक स्थान निर्माण केले आहे, ज्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीजना त्यांच्या ER&D ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी, उच्च-स्तरीय अभियांत्रिकी प्रतिभा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रमुख ओईएमसोबत संबंध दृढ करण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

ऑटोमोटिव्ह उद्योगात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, युरोपियन OEMs ADAS/AD, विद्युतीकरण आणि सॉफ्टवेअर-परिभाषित वाहन प्लॅटफॉर्ममध्ये संशोधन आणि विकास गुंतवणूक वाढवत आहेत. परिणामी, युरोपमधील अभियांत्रिकी सेवा प्रदात्यांसाठी (ESPs) बाजारपेठ २०२० मध्ये €४.५ अब्ज वरून २०३० पर्यंत €११.७ अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. हा ट्रेंड ES-Tech ला त्यांच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी, त्यांच्या ग्राहक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि उच्च-मूल्याच्या विकास कार्यक्रमांचा मोठा वाटा मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतो.

टाटा टेक्नॉलॉजीजचे एमडी आणि सीईओ वॉरेन हॅरिस म्हणाले, “ईएस-टेक ग्रुपचे अधिग्रहण ही एक मोठी धोरणात्मक भरारी आहे, जी ऑटोमोटिव्ह मूल्य साखळीमध्ये एंड-टू-एंड उत्पादन अभियांत्रिकी उपाय प्रदान करण्याची आमची क्षमता वाढवते आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी क्षमतांमध्ये प्रवेश करण्यासाठी आमची जागतिक उपस्थिती वाढविण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. ईएस-टेकची तांत्रिक खोली, ग्राहक-केंद्रितता आणि प्रादेशिक क्षमता बुद्धिमान, कनेक्टेड आणि शाश्वत गतिशीलतेकडे संक्रमण घडवून आणणाऱ्या जागतिक ओईएमसाठी भागीदारीसाठी पहिली पसंती बनण्यासाठी आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळतात.

टीटीएल कुटुंबात ईएस-टेक टीमचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ईएस-टेक ग्रुपचे एकत्रीकरण टाटा टेक्नॉलॉजीजच्या ईआर अँड डी क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल, विशेषतः एम्बेडेड सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिस्टम इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात. आम्ही क्रॉस-सेलिंग सिनर्जी वाढवण्यासाठी, पुढील पिढीतील गतिशीलता कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी आणि संयुक्तपणे नवीन तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी चांगल्या स्थितीत असू.”

ईएस-टेकचे एमडी आणि सीईओ मार्क विली म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीजसोबत सामील होणे हे ईएस-टेक ग्रुपसाठी क्षमतांची व्याप्ती आणि खोली वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. एकत्रितपणे, आम्ही ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत, जसे की स्पर्धात्मक किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जलद विकास चक्रांद्वारे आमच्या ग्राहकांना वास्तविक मूल्य प्रदान करणे. आमचे ध्येय स्पष्ट आहे: जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगाला पुढे नेणे आणि टाटा टेक्नॉलॉजीजसह गतिशीलता क्षेत्रासाठी पसंतीचा भागीदार बनणे.”

हा व्यवहार कस्टमरी क्लोजिंग अटी आणि नियामक मंजुरींच्या अधीन आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आपली जागतिक उपस्थिती वाढवत राहिल्याने आणि त्यांच्या भागीदारांना भिन्न मूल्य प्रदान करत असताना नवोपक्रम, प्रतिभा आणि ग्राहकांच्या यशात गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहे.

या व्यवहारासाठी युरोपमधील एमसीएफ कॉर्पोरेट फायनान्स, टाटा टेक्नॉलॉजीजचे सल्लागार होते.

येत्या बुधवारी महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर

पिंपरी :ईशा नेत्रालय आणि वर्षा सातुर्डेकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांच्या स्मृतिप्रत्यर्थ येत्या बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजक ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी ही माहिती दिली.

बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत ईशा नेत्रालय, प्रीमियर प्लाझा, पहिला मजला,बिग बाजार, कार्निवल सिनेमाच्या बाजूला जुना पुणे मुंबई महामार्ग, चिंचवड स्टेशन पुणे येथे हे शिबिर होणार आहे.नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ईशा नेत्रालयाचे पुणे ब्रांच इन्चार्ज दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात येणार असून त्याबरोबरच डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे,डॉ. जयशील नाझरे मार्गदर्शन करणार आहेत. नेत्रालयाचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यशवंत बो-हाडे यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती संयोजक नंदकुमार सातुर्डेकर यांनी दिली. शिबिराच्या आयोजनासाठी सौ. राधा सातुर्डेकर, सौ. कोमल माटे, सौ.रेश्मा बोबडे यांनी पुढाकार घेतला आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांची निवड:पुण्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

पुणे-साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आज पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देणाऱ्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांची नावे चर्चेत होती, परंतु या सर्वांनी आधीच नकार दिल्याने विश्वास पाटील यांच्या नावाची निवड निश्चित मानली जात होती.

जानेवारीत पार पडणार साहित्य संमेलन

साताऱ्यात जानेवारी महिन्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडेल. नुकतेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले होते.

मराठी साहित्यातील एक मोठे नाव

विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील मोठे नाव असून, ते एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. ते त्यांच्या संशोधनपूर्ण आणि प्रभावी लेखनशैलीसाठी ओळखले जातात. ‘पानिपत’ ही त्यांची गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीसाठी त्यांनी केलेला सखोल अभ्यास, भाषेतील ओघवतेपण, आणि ऐतिहासिक घटनांचे नाट्यमय चित्रण यामुळे त्यांचे लेखन वाचकांना आकर्षित करते. त्यांच्या लेखनात मानवी भावनांचे आणि पात्रांच्या मानसिक संघर्षाचे जिवंत दर्शन घडते.

विश्वास पाटलांच्या उल्लेखनीय कांदबऱ्या

पानिपत – मराठ्यांच्या पानिपतवर झालेल्या पराभवावर ऐतिहासिक कादंबरी

झाडाझडती – राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण.

सिंहासन – राजकीय सत्तासंघर्षावर आधारित.

चंद्रमुखी – समाजाच्या तळागाळातील वास्तव दाखवणारी प्रेमकहाणी.

महाड – अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायावर भाष्य करणारी कादंबरी.

स्मरणगंध – आत्मकथनात्मक आणि चिंतनशील लेखन.

पुणेकर महिलेने भर दौऱ्यात अजित पवारांना घेरले:म्हणाली,”इथल्या समस्या पाहता आम्ही इथे राहायचे की नाही?

पुणे – पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून पुण्यातील हडपसर मुंढवा भागात पाहणी दौरा करत आहेत. हा पाहणी दौरा सुरू असताना, अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या. एका स्थानिक महिलेने तर वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून थेट गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासारखी ‘न सांगता’ पाहणी करण्याचा सल्ला अजित पवारांना दिला. त्यावर पर्रीकर कोण? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी त्या महिलेला विचारला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केशवनगर-मुंढवा येथे नव्याने बांधल्या जाणाऱ्या पुलाची पाहणी करून त्यांनी कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्याला आवश्यक सूचना दिल्या. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. याशिवाय, त्यांनी कोंढवा आणि हडपसर येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर लक्ष घालून अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सकाळी सकाळी विकासकामांची पाहणी करायला आलेल्या पवारांना आज पुणेकरांच्या प्रश्नांचा आणि रोषाचा चांगलाच अनुभव आला.

हा पाहणी दौरा सुरू असताना, अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या. एका स्थानिक महिलेने तर ‘तुम्ही सांगून येऊ नका जसे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसेच तुम्ही या, असा सल्ला अजित पवारांना दिला.

स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना, “इथल्या समस्या पाहता आम्ही इथे राहायचे की नाही?” असा संतप्त सवाल विचारला. यावर अजित पवारांनी हा भाग पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात अडकल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा केली.

यावेळी एक स्थानिक महिला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेला संवाद

अजित पवार : तुम्ही येण्याआधीच आम्ही तुमच्या समस्या ऐकल्या आहेत. निवेदन मिळाले आहे. पीएमसी आणि पीएमआरडीए या वेगवेगळ्या एजन्सीज असल्या तरी, नागरिकांना त्यांच्या सुविधांशी देणेघेणे आहे आणि आम्ही त्यांच्या मागणीशी पूर्णपणे सहमत आहोत. यावर आमचे काम सुरू आहे. उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही कामांना गती देण्यासाठी आणि प्राथमिकता देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

महिला : आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. पर्रीकर ज्याप्रमाणे दिवसा वाहतूक कोंडी पाहण्यासाठी फिरायचे, त्याचप्रमाणे तुम्हीही कधीतरी अचानक येऊन पाहा.

अजित पवार : पर्रीकर कोण?

महिला : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. ते जसे अचानक फिरायचे, तसेच तुम्हीही फिरून पाहा आणि न सांगता भेट द्या. आम्ही प्रश्न विचारू आणि तुम्ही उत्तर द्याल, असे नको.

अजित पवार : मी इथे प्रश्न विचारायला आलेलो नाही. इथला परिसर ठीक व्हावा आणि समस्या सुटाव्यात यासाठीच मी स्वतः प्रयत्न करत आहे.

महिला : असे नाही सर, इथल्या समस्या पाहता इथे राहायचे की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

माऊंट आबू येथे राष्ट्रीय संमेलन २६ ते ३० सप्टेंबर रोजी आयोजन

0

‘ समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका` या विषयावर होतील संवाद

पुणे-राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका (Role of Media for Promoting Peace, Unity & Trust in Society)` या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.

संमेलनात सहभाग

संमेलनात सहभागासाठी स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत नोंदणी होणार असून यासंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सोमनाथ म्हस्के, पुणे जिल्हा माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9922251100 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू

अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-द·या, नेत्रदिपक सुर्यास्त आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ,गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन,शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत.

अजित पवारांच्या अंगात पाकिस्तानी रक्त– संजय राऊत

जय शहा आयोजक असल्याने भारत-पाक मॅचमागे ‘पैशाचा खेळ’-मोदी-शहा हे देशभक्तीचे केवळ ढोंग करतात
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या मुलाला देशभक्ती शिकवता आली नाही त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. तुमचा मुलगा दुबईत बसून भारत-पाकिस्तान मॅचचे आयोजन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पदावरून जावे लागेल त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या 26 लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या 26 लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता

खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळत आहात. म्हणून आपल्या देशात नेपाळ सारखी परिस्थिती होईल हे मी वारंवार सांगत आहे. अमित शहा आम्हाला बाळासाहेब शिकवत आहेत. बाळासाहेब असते तर हे झाले नसते ते झाले नसते असे म्हणणाऱ्या शहा यांना सांगतो की बाळासाहेब असते तर आजचा मॅच झाला नसता.

खासदार संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परवानगी देणं ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात आमचे 26 जण ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या कपाळावरील पुसला गेलेला सिंदूर यावर मोदींनी खूप राजकीय ढोंग केले त्यांचे काय झाले. मोदी-शहा हे राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे केवळ ढोंग करतात. यापूर्वी अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारताने माघार घेतली आहे.

संजय राऊत म्हणाले की, जय शहा दुबईत आहे आणि ते सामन्याला जाणार नाही असे किती तरी मोठे उपकार त्यांनी केले आहेत.सामना तुम्ही आयोजित केला आहे, तुम्ही त्यांचे प्रमुख आहात. देशभक्ती संदर्भात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजपचे पापा वॉर रुकवा सकते है पण भारत-पाकिस्तान सामना रोखू शकत नाही. रशिया-युक्रेनचे वॉर थांबवू शकतात, ट्रम्प च्या दबावाखाली भारत-पाकिस्तान युद्ध थांबवू शकतात, पण भारत-पाकिस्तान मॅच थांबवू शकत नाही. यात कोणता पैशाचा खेळ आहे, या खेळात नेमके कोण कोण गुंतलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल ज्या आंदोलनाची घोषणा केली त्यांची व्याप्ती देशभरात गेली आहे. अनेक राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. दिल्लीत ही मॅच दाखवली जाईल त्या हॉटेलवर बहिष्कार टाकावे असे आवाहन आपने केले आहे.महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान मॅचची तिकीट विक्री होत नाहीये. पण गॅमलिंग होणार कारण तिकडे जय शहा बसले आहेत. नरेंद्र मोदी यांची काय मजबुरी आहे की त्यांना भारत-पाकिस्तानची मॅच खेळवा-वी लागत आहे. नरेंद्र मोदी काल मणिपूरला गेले ते केवळ मॅचला होणाऱ्या विरोधावरुन लक्ष विचलित व्हावे म्हणून त्यांनी हा दौरा केला आहे. भाजपचा राष्ट्रवाद हा जगातील सर्वांत मोठे ढोंग आहे. मणिपूरच्या जनतेविषयी काही प्रेम आहे असे त्यात काही नाही. त्यांचा हिंदुत्ववाद म्हणजे ढोंग आहे.
..तर काय बिघडलं असते

संजय राऊत म्हणाले की, आजची मॅच खेळण्यासाठी अनेकांनी नकार दिला आहे. पण जे खेळाडू आज मॅच खेळतील त्यांना लाज वाटली पाहिजे. त्या खेळाची रक्कम घेताना त्यांनी ही लक्षात ठेवावे की आमच्या मारले गेलेल्या लोकांच्या रक्ताची ते किंमत घेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.त्यांच्या मनात राष्ट्रवाद नाही का? भारतीयांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या का? एक सामना खेळले नाही तर काय होणार होते? अमित शहा काय ईडी लावून जेलमध्ये टाकले असते का? जय शहा यांनी फाशी दिली असती का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
खेळाडूंनी सांगितले असते आम्ही खेळणार नाही तर काय झाले असते.

संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानी मोहसीन नकवीच्या हाताखाली भाजपचे आशिष शेलार काम करत आहेत, त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा होता त्या बोर्डाचा. मॅच रद्द करता येत नसेल तर जय शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. अमित शहा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार. बाळासाहेब ठाकरे यांनी असा व्यापार केला नाही. मोदी, शहा, शिंदे यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी फोटो वापरू नये.

भारत-पाक सामन्याचा निषेध:ओवैसींनी विचारले- 26 लोकांच्या जीवापेक्षा पैसा जास्त मौल्यवान आहे का?


आशिया कप २०२५ मध्ये आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला देशभरातून विरोध होत आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांनी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्याबद्दल सरकारवर टीका केली. हल्ल्यात वडील आणि भाऊ गमावलेले सावन परमार म्हणाले की ऑपरेशन सिंदूर आता निरुपयोगी वाटत आहे. सावन म्हणाले-जेव्हा आम्हाला कळले की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयोजित केला जात आहे, तेव्हा आम्ही खूप अस्वस्थ झालो. पाकिस्तानशी कोणताही संबंध नसावा… जर तुम्हाला सामना खेळायचा असेल तर माझ्या १६ वर्षांच्या भावाला परत आणा ज्याला इतक्या गोळ्या लागल्या होत्या.सावनची आई किरण यतिश परमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला की जर ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण झाले नाही तर सामना का होत आहे. मी देशातील सर्व लोकांना सांगू इच्छिते की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना भेटा आणि ते किती दुःखी आहेत ते पहा. आमच्या जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत

भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ कोण काय म्हटले…

असदुद्दीन ओवैसी- आसामचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सर्वांना माझा प्रश्न आहे की, पहलगाममध्ये आमच्या २६ नागरिकांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास नकार देण्याचा अधिकार तुम्हाला नाही का?

अरविंद केजरीवाल – क्लब, पब आणि रेस्टॉरंट्सनी सामना दाखवू नये. जर असे झाले तर आम्ही निषेध करू. हा देशाशी विश्वासघात आहे.

बीसीसीआयचे सदस्य सामना पाहण्यासाठी दुबईला जाणार नाहीत

बीसीसीआय या स्पर्धेचे अधिकृत यजमान आहे, परंतु बोर्डाचे बहुतेक अधिकारी सामने पाहण्यासाठी जाणार नाहीत. तथापि, बोर्डाचे कार्यवाहक अध्यक्ष राजीव शुक्ला जाऊ शकतात, कारण ते आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य देखील आहेत.फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याचे प्रसारण थांबवण्याचे आवाहन केले आहे.

संरक्षण उत्पादनातील कुशल मनुष्यबळासाठी भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी ठरणार मार्गदर्शक!

0

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसंदर्भात आयोजित संवाद सत्रात प्रमुख उपस्थिती दर्शवली. भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची निर्मिती तसेच भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, 3 मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वाढली आहे आणि भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे योगदान या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून विद्यापीठाने अभ्यासक्रम आखावेत, तसेच आयआयटी मुंबईप्रमाणे जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून विकसित व्हावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात करतांना संरक्षण उत्पादन तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात येत असून विद्यापीठाचा अभ्यासक्रम तसेच नवसंशोधन, तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती तसेच संरक्षण क्षेत्राची गरज लक्षात घेवून विविध अभ्यासक्रमांचा समावेश व्हावा. जागतिक स्तरावर संरक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील उत्पादनाची गुणवत्ता तसेच प्रमाणीकरण यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान संस्था म्हणून विकसित होत असून, उद्योजकांसाठी ती मार्गदर्शक ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षण उत्पादन व निर्यातीला प्रोत्साहन मिळाल्याने नागपूर येथे संरक्षण उद्योगांचा विकास सुरू झाला असून, नागपूर हे संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे महत्व आणखी वाढते, विद्यापीठामार्फत पदवी, पदविका आणि मास्टर प्रोग्राम सुरू होत असून त्यामध्ये संरक्षण उत्पादन व तंत्रज्ञान, लिडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड डिझाईन, आंतरराष्ट्रीय संबंध व पब्लिकपॉलिसी तसेच नॉन-कन्व्हेन्शनल डिफेन्स स्टडी यांसारखे अभ्यासक्रम असतील.

यावेळी भारतीय लष्कराचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, भारतीय हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव व इतर मान्यवर उपस्थित होते.