Home Blog Page 311

आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर लोकमान्यनगर रहिवाशांचा मोर्चा

“आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या, आम्हाला गृहीत धरू नका, आमदार तुम्ही मध्यस्ती करू नका ! नागरिकांचा संतप्त सवाल !

मुख्यमंत्र्यांच्या सहीने आणलेलेली स्थगिती हटवा : लोकमान्यनगर बचाव कृती समितीची ठाम मागणी

पुणे दि. २० : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वसलेले लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. त्या अनुषंगाने येथील रहिवाशांनी स्वतः च्या घरांचा विकास स्वतः विकासक नेमून करण्याचे ठरवेल तसे विकासक नेमले, परंतु आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एकल विकासाच्या नावाखाली स्थगिती आणली. त्यामुळे लोकांच्या घरांच्या पुनर्विकासाचे स्वप्न भंगले आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृतीच्यावतीने आज लोकमान्यनगर येथील शेकडो नागरिकांनी थेट आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी सह कुटुंबासहीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी हात निषेधाचे फलक घेतले होते. रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामुळे लोकमान्यनगर पूर्वविकासाला खीळ बसल्याने संतप्त नागरिकांनी रासने यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या, आम्हाला गृहीत धरू नका, पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या. अशा घोषणांनी नातूबाग परिसर नागरिकांनी दणाणून सोडला. कार्यालयावर रासने उपस्थित नसल्याने नागरिक अजून संतप्त झाले. तब्बल अर्ध्या तासानंतर रासने आले. झालेल्या संवादात आमदार हेमंत रासने आणि रहिवाशांमध्ये जवळ जवळ पाऊण तास शाब्दिक खडाजंगी झाली.

नागरिकांनी आमदारांना खडे बोल सुनावले. “आम्हाला आमची स्वप्नं साकार करू द्या,  आमच्या घरांवर विकासकांवर आणलेले स्थगिती अगोदर उठवा, मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली. आम्हाल आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या, तुम्ही मध्यस्ती करण्याची गरज नाही, आणलेले स्थगिती त्वरित हटवा, एकल विकासला आमचा विरोध आहे, आमचा आम्हाला विकास करू द्या, रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचे पुनर्विकासाला करू द्या. नागरिकांनी यावेळी रासने यांना निवेदन दिले.

केवळ लोकमान्य नगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदार संघांतील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे असे मत आमदारांनी मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर भागाचे आम्हाला काही सांगू नका केवळ लोकमान्य नगर रहिवाशांचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे आम्हाला आमचा विकास करू द्या आणि स्थगिती हटवा अशी स्थानिक रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली.

याप्रसंगी ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची बाजू मांडली. त्याचबरोबर रासने यांचे म्हणणे ऐकून त्यावर सातपुते यांनी समन्वयक म्हणून लोकमान्यनगरवासी आणि रासने यांच्यामध्ये यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला.

लोकमान्यनगरचा विकासासाठी मी प्रयत्नशील – रासने

लोकमान्यनगरचा विकासासाठी मी प्रयत्नशील असून यावर लवकरच तोडगा काढेन. केवळ लोकमान्यनगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदार संघांतील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे. अजून एकदा लोकमान्य नगरच्या नागरिकांशी चर्चा करणार आहे.

दृष्टीहीन व्यक्तींच्या कलागुणांना पुणेकरांचे ‘प्रोत्साहन’

दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रोत्साहन प्रदर्शनात आयोजन : २१ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू

पुणे : दोन्ही डोळे नसतानाही वायर बॅग तयार करणे, भाज्या निवडणे-चिरणे, शोभेच्या वस्तू तयार करणे अशी कामे सहजतेने करत अंधभगिनींनी आपले कलागुण पुणेकरांसमोर सादर केले. पुणेकरांनी देखील अंधभगिनींनी तयार केलेल्या वस्तू विकत घेत त्यांच्या कलेला आणि प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कौशल्यांची ओळख समाजासमोर करून देणे या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी ‘प्रोत्साहन २०२५’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन सुरू आहे. 

या प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन व रोहिणी अभ्यंकर यांनी केले. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या ३१ दिव्यांग व्यक्ती आणि ९ संस्थांचा सहभाग या प्रदर्शनात झाला.

प्रोत्साहन प्रदर्शनाचे उद्घाटन 

इंटिग्रेटेड एज्युकेशन सेंटरच्या अमृता भागवत व गती मंद असलेल्या पूजा मुनोत यांच्या हस्ते झाले. फक्त दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री या ठिकाणी करण्यात आले.

विद्या ज्योती स्पेशल स्कूल, प्रिझम फाउंडेशन, शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रम, संवाद, नंदनवन, स्मित फाऊंडेशन, उन्मेष फाऊंडेशन, मैत्र फाऊंडेशन व मोहोर एंटरप्रायझेस या संस्थांनी सहभाग नोंदवला. धायरी येथील दृष्टीहीन वृद्ध महिलांनी वायर बास्केट व मण्यांच्या शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. याशिवाय दिव्यांग कलाकारांनी करमणुकीचे कार्यक्रम सादर केले.

प्रदर्शन रविवार, २१ सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.

पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागर‍िकांसाठी ऑनलाईन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत संबंधित सेवांचा घेता येणार लाभ

पिंपरी (दि.२०) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १९ सेवा सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहे. नागरिकांना शासकीय सेवा / कामे घरबसल्या ऑनलाईन करता यावी, यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून संबंधित सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. आठवड्याभरात यात १० नवीन सेवांची भर पडणार असून नागरिकांना पीएमआरडीएमधील एकूण २९ सेवांचा लाभ ऑनलाईन घेता येणार आहे.

शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने १५० दिवसाच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा सुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून १९ सेवा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या सेवा सुविधांचा लाभ नागर‍िकांना घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन प्रणालीत अर्जदार नागर‍िकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश मिळणार आहे. यामुळे नागर‍िकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. संबंध‍ितांना आपला अर्ज/ फाईल कुठल्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर कार्यवाहीसाठी आहे, याची माह‍िती अर्जामध्ये नमूद केलेल्या क्रमांकावर या सुरू केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे.

पीएमआरडीएतील या सेवा ऑनलाईन उपलब्ध
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमधील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून १९ सेवा सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

विकास परवानगी विभाग
१. अभिन्यास/इमारत बांधकाम परवानगी
२. जोता मोजणी प्रमाणपत्र
३. भोगवटा प्रमाणपत्र
४. झोन दाखला
५. भाग नकाशा/नकाशा देणे
६. सुधारित बांधकाम परवानगी
७. तात्पुरते रेखांकन परवानगी
८. सुधारित तात्पुरते रेखांकन
९. अंतिम रेखांकन परवानगी
१०. नूतनीकरण परवानगी
११. भागश: भोगवटा प्रमाणपत्र
१२. साईट एलेवेशन प्रमाणपत्र

जमीन व मालमत्ता विभाग
१. वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तातंरण
२. वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर वारसानोंद
३. वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर कर्जासाठी ना- हरकत प्रमाणपत्र

अग्निशमन विभाग
१. प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखला
२. अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला
३. पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र
४. अग्निशमन बंदोबस्त

या सेवा नागर‍िकांसाठी आपले सरकार या https://aaplesarkar.mahaonline.gov.in तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. संबंधित १९ सेवांसाठी नागर‍िकांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी येत असल्यास संबंधितांनी त्या-त्या विभागास भेट दिल्यानंतर त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अरण्येश्वर नवरात्र उत्सवात “यशश्री महिला महोत्सव” ;भव्य नवदुर्गा महल आणि रक्तबीज राक्षसाचा वध ठरणार आकर्षण

0

पुणे : अरण्येश्वर चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही अरण्येश्वर नवरात्र उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. यशश्री महिला महोत्सव, भव्य नवदुर्गा महल आणि जिवंत देखावा : रक्तबीज राक्षसाचा वध ही यंदाच्या उत्सवाची खास वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

उत्सवाचे अध्यक्ष नितीन कदम व आधारस्तंभ माजी नगरसेविका सौ. अश्विनी नितीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणेकरांसाठी आगळावेगळा सांस्कृतिक मेळावा
कार्यक्रमांचे वेळापत्रक

  • २२ सप्टेंबर – घटस्थापना (हस्ते आयुक्त नवल किशोर राम), दुर्गा सप्तशती पठण, भजन व मान्यवरांकडून आरती.
  • २३ सप्टेंबर – कन्या पूजन, दुर्गा सप्तशती पठण, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नवदुर्गा महल उद्घाटन व ढोल-ताशा वादन.
  • २४ सप्टेंबर – कन्या पूजन, दुर्गा सप्तशती पठण, “मी व माझे व्यक्तिमत्व” (१५–३० वयोगट).
  • २५ सप्टेंबर – महिलांसाठी दुर्गा सप्तशती पठण, श्रीसूक्त पठण व सामुदायिक आरती स्पर्धा.
  • २६ सप्टेंबर – “मी व माझी राजकन्या” स्पर्धा (आई-मुलगी सहभाग) व शालेय मुलींसाठी लकी ड्रॉ.
  • २७ सप्टेंबर – चित्रकला स्पर्धा, भजन, जिवंत देखावा : रक्तबीज राक्षसाचा वध.
  • २८ सप्टेंबर – पाककला स्पर्धा “उपवासाची थाळी”, भजन व जिवंत देखावा.
  • २९ सप्टेंबर – “सुदृढ बालक अन् सुजान माता” स्पर्धा, भजन व जिवंत देखावा.
  • ३० सप्टेंबर – अष्टमी होम हवन, भजन व जिवंत देखावा.
  • १ ऑक्टोबर – “अरण्येश्वर नवदुर्गा पुरस्कार” सोहळा, भोंडला व मंगळागौरी खेळ.
  • २ ऑक्टोबर – दसरा उत्सव व भव्य लकी ड्रॉ असे विविध कार्यक्रम होणार असून “दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भक्ती, परंपरा, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा गौरव या उत्सवातून अनुभवायला मिळणार आहे. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा,” असे अध्यक्ष नितीन कदम व आधारस्तंभ सौ. अश्विनी कदम यांनी सांगितले.

त्रंबकेश्वरमधील पत्रकारांवर हल्ल्याची घटना : डॉ. नीलम गोऱ्हें कडून घटनेचा तीव्र निषेध

0

त्रंबकेश्वर | पार्किंगच्या वादातून आज दिनांक २० सप्टेंबर रोजी त्रंबकेश्वर येथे तीन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात किरण ताजणे गंभीर जखमी असून ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर अभिजीत सोनवणे व योगेश खरे यांनाही दुखापत झाली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर “खून करण्याचा प्रयत्न” यांसारख्या कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या —

“पार्किंग कंत्राटांवरून वारंवार हिंसाचार घडतोय, ही चिंताजनक बाब आहे. या प्रक्रियेला पारदर्शक व नियमबद्ध करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.”

त्यांनी नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची चौकशी आणि दोषींवर बीएनएस व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. गोऱ्हेंनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती पाठवली असून, सरकार पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करेल, असा विश्वास व्यक्त केला.

‘रंगानुभूति’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होतेय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवाद्गार

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे उदघाटन, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कलाकारांचा सहभाग

पुणे , २० सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक, समृद्धीची पंढरी म्हणून ओळख ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ अशा महोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होण्यास मदत होत आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम करीत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सव २०२५ निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, माजी उपमहापौर राजू मिसाळ, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, हरिभाऊ तिकोने, फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह प्रवीण भोळे, पैस कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक प्रभाकर पवार, अमृता मुळे, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार व रसिक श्रोते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये टेल्को कलासागर – टाटा मोटर्स पुणे, कलापिनी तळेगाव दाभाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड, नादब्रह्म संस्था, अथर्व थिएटर्स, दिशा फाउंडेशन, संस्कार भारती, नाटक घर, द बॉक्स, नाटक कंपनी आसक्त पुणे, महाराष्ट्र कल्चर सेंटर (एमसीसी) आदी संस्थांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा ‘रंगानुभूती’ हा महोत्सव आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश अशा देशाच्या विविध राज्यांतील कलाकार सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरवासियांना चांगल्या प्रकारची सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. हा महोत्सव ग.दि. माडगूळकर या नाट्यगृहात रंगतोय, ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची बाब आहे. कारण ग.दि.मा हे केवळ गीतकार किंवा लेखक नव्हते तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी होते. त्यांच्या नावाने उभ्या केलेल्या या नाट्यगृहात हा महोत्सव होत असल्याने या कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक धोरणानुसार शहरामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यास येथील महापालिकेचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. या माध्यमातून नवकलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जात आहे.पिंपरी चिंचवड शहर हे केवळ आता औद्योगिक शहर म्हणून नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये झपाट्याने वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या शहरामध्ये अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक, साहित्यिक, कवी घडत आहेत. मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचे काम या शहराने केले आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

मराठी भाषा व मराठी नाटकाचे महत्त्व अधोरेखित करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मराठी भाषेसाठी राज्य सरकारने नवीन विभाग सुरू केला आहे. मराठी माणसाचे पहिले प्रेम हे नाटक आहे. मराठी माणूस हा नाटकवेडा असून खऱ्या अर्थाने त्याने नाट्यचळवळ जिवंत ठेवली आहे. मराठी नाटक हे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब आहे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. ग्रामीण भागातील नाट्यगृह ही दर्जेदार असावीत, तेथे उत्तम सोयीसुविधा असाव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातून चांगले कलाकार घडण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महापालिका आयुक्त शेखर सिंह स्वागतपर प्रास्ताविक करताना शहरातील नागरिकांना दर्जेदार कलानुभव, नवोदित व नामांकित कलाकारांना व्यासपीठ आणि सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच या महोत्सवाबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी, मिलिंद बावा यांनी केले. थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशनच्या अमृता मुळे यांनी आभार मानले.
……
चित्रप्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक
‘रंगानुभूती’ या महोत्सवाच्या निमित्ताने ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील कलादालनात पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक प्रवास दर्शवणारी चित्रकृती तसेच अप्रतिम चित्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. शहरातील उत्तम चित्रकारांची अभिनव कलाकृती येथे प्रदर्शित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले. या माध्यमातून नवकलाकारांच्या कलेला वाव देण्याचे काम करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

फुल उत्पादक शेतकरी कंपन्यांकरिता स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करा-पणन मंत्री जयकुमार रावल

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे आढावा बैठक संपन्न

पुणे, दि.२० .: फुल उत्पादक शेतकरी कंपनी यांच्यासाठी संस्था परिसरात किंवा थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत, यामुळे फुल निर्यातीस चालना मिळेल, असे निर्देश पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत दिले.

यावेळी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर व्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

श्री. रावल म्हणाले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येईल, यामुळे संस्थेच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळेल. नेदरलँड, इजराईल, जपान व तांजानिया येथील विद्यापीठांचे सहकार्य घेत फुल उत्पादक शेतकऱ्यांकरिता आंतरराष्ट्रीय पातळीववरील प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत.

आफ्रिका खंडाअंतर्गत येणाऱ्या देशामधील कृषी विभागाशी संपर्क साधून तेथील शेतकऱ्यांना या संस्थेमध्ये किंवा त्या देशामध्ये जाऊन प्रशिक्षण द्यावे. इतर राज्यांच्या कृषी, फलोत्पादन विभागांशी संपर्क साधून त्या राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना संस्थेत प्रशिक्षण द्यावे.

राज्यातील साखर कारखान्यांना संस्थेचे सभासद करुन त्यांच्या कार्यक्षेत्रामधील शेतक-यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण राबवावे. संस्थेच्यावतीने कृषी पर्यटन व नॅचरोपॅथीसारखे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत. बांबू मूल्यवर्धन केंद्राच्या बांबू सायकलचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याबाबत श्री. रावल यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे उपक्रम आणि सुविधांची घेतली माहिती

मंत्री श्री. रावल यांनी संगणकीकृत वर्गखोल्या (डिजिटल क्लासरूम), उपहारगृह इमारत, शीतगृह विस्तारित इमारतीची पाहणी केली. निवासी सुविधा, एम.बी.ए. महाविद्यालय, पी.टी.सी. प्रयोगशाळा, माती व पाणी तपासणी प्रयोगशाळा यांची माहिती देण्यात आली.

श्री. आकरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली तसेच मार्च २०२६ पर्यंतचा प्रशिक्षण आराखडा सादर केला.

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेत गुणवत्तावाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जिल्ह्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची मांडणी

▪️ शिक्षणमंत्र्यांची दिवसभर सर्व तज्ञांच्या सत्रांना उपस्थिती

पुणे, दि. 20
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या दुपारच्या सत्रात विविध तज्ज्ञांनी नवीन शिक्षण धोरण २०२०, परख सर्वेक्षण अहवाल, प्रशासकीय सुधारणा, समग्र शिक्षण व विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबविलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली.

दुपारच्या पहिल्या सत्रात मा. आनंद पाटील, अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी ऑनलाईन व्याख्यान दिले. त्यांनी नवीन शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी, देशभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम व महाराष्ट्राकडून असणाऱ्या अपेक्षा तसेच प्रधानमंत्री पोषण योजनेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती इंद्राणी भादुरी, सीईओ अँड हेड ऑफ परख सेल, NCERT, दिल्ली यांनी परख सर्वेक्षण अहवाल, त्यातील महाराष्ट्राची स्थिती व शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

यानंतर विविध जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादरीकरणे केली. त्यात कोल्हापूरचे श्री. कार्तिकेयन एस., साताऱ्याच्या श्रीमती याशनी नागराजन, छत्रपती संभाजीनगरचे श्री. अंकित, अहिल्यानगरचे श्री. आनंद भंडारी आणि पुण्याचे श्री. गजानन पाटील यांचा समावेश होता. या सादरीकरणांमध्ये नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी व परिणामकारकता याविषयी माहिती दिली. मंत्री महोदयांनी सर्व सादरीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन सन्मान केला.

शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी इ. ११ वी प्रवेश, समूह शाळा योजना, यू-डायस प्लस, पवित्र शिक्षक भरती मान्यता यांसारख्या प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले. राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व समग्र शिक्षेविषयी माहिती दिली.

यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मा. राहुल रेखावार यांनी NEP २०२० ची अंमलबजावणी, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम, SQAAF, क्षमता आधारीत प्रश्नपेढी, VSK, कृती पुस्तिकांचे विकसन,शैक्षणिक दिनदर्शिका, पीएम श्री शाळा योजना, ई-विद्या वाहिन्या, योग अभ्यासक्रम मार्गदर्शिका आदी उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलने व विद्यार्थी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायती आयोजित करण्याचे आवाहन केले. याशिवाय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस रक्कमेत वाढ करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. विशेष बाब म्हणजे मा. मंत्री महोदयांनी शिक्षण परिषदेत दिवसभर पूर्णवेळ उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला व अधिकारी वर्गास मार्गदर्शन केले.

दौंड येथे सेवा पंधरवड्यात ५०० हून लाभपत्राचे वितरण

१६ गावांच्या जीआयएस आधारित नकाशाचे अनावरण

सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

पुणे, दि.२० : दौंड तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्याचे आमदार राहुल कूल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ५०० हून अधिक लाभपत्राचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, बोरीपार्धी, चौफुला येथे वितरण करण्यात आले. नागरिकांना सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होऊन सेवांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले.

राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर)ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती
(२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा दौंड येथे शुक्रवारी (दि.१९) शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी सेवा पंधरवड्यात देण्यात येणाऱ्या सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच तालुक्यात महसूल विभागामार्फत सर्व गावातील गाव रस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार प्राथमिक टप्प्यात एकूण १६ गावांच्या भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित नकाशाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी भटक्या व विमुक्त जाती यांचे जातीचे दाखले ५०, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना लाभार्थी प्रमाणपत्रे १२५, भामा आसखेड व पुनर्वसन शेरे कमी दाखले १३४ गट , पुनर्वसन भूखंड वाटप २६, शिधापत्रिका वाटप ३२, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मदत वितरण दाखले ४ या प्रमाणे लाभपत्राचे वितरण करण्यात आले, असे तहसीलदार अरूण शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविले आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव दीप्ती भोगले आणि अर्चना देशमाने यांना‘तेजस्विनी पुरस्कार’ जाहीर

पुणे:

पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. याचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे यांच्या हस्ते श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न होईल. समाजात उत्तुंग काम करणाऱ्या दोन महिलांना या महिला महोत्सवात दिला जाणारा ‘तेजस्विनी पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीत नाट्य कलावंत व गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी महिला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी दिली.

दीप्ती भोगले : जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत रंगभूमीवरील साधक दाम्पत्याची कन्या. संगीत रंगभूमीवर स्त्री भूमिकेपासून पुरुष भूमिकांपर्यंत स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान, पुणे विद्यापिठाची मराठी विषयाची एम.ए. पदवीधारक, वयाच्या सहाव्या वर्षापासून ६५ वर्षांपर्यंत रंगभूमीवर सुमारे ४००० प्रयोगांतून भूमिका, आकाशवाणीवरील ‘ए ग्रेड’ आर्टिस्ट, २७ नाटकांतून ४४ भूमिका, संगीत मैफलींचे निवेदन, संगीत नाट्यविषयक कार्यशाळा, ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धांमध्ये परीक्षक, जयराम शिलेदार यांच्या ‘सूरसंगत’ या आत्मचरित्राचे शब्दांकन, अनेक पुरस्कारांनी सन्मानित दीप्ती भोगले यांना ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे.

अर्चना देशमाने : आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांनी पती
अशोक देशमाने यांच्यासमवेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १८०हून अधिक मुला-मुलींचे संगोपन, आरोग्य व शिक्षण यांची जबाबदरी स्वीकारून अखंडपणे त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे. आयटी इंजिनीअर असणाऱ्या अशोक देशमाने यांनी उत्तम नोकरी सोडून ‘स्नेहवन’ संस्था २०१५मध्ये सुरू केली. अर्चना देशमाने यांनी पतीला पूर्ण साथ देत या निराधार मुला-मुलींची ‘आई’ बनून या मुलांचे संगोपन, आरोग्य व शिक्षण त्या स्वतः करतात. या निराधार मुलांचे कल्याण हेच जीवनध्येय मानून काम करणाऱ्या अर्चना देशमाने या शेकडो तरुणांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविले जाणार आहे.

‘तेजस्विनी पुरस्कारा’च्या यापूर्वीच्या मानकरी : शीतल महाजन, शीतल सावंत, कीर्ती शिलेदार, सरस्वतीबाई राणे, सावनी रवींद्र, जयश्री फिरोदिया, केतकी माटेगावकर, ऋतुजा भोसले, शांताबाई किर्लोस्कर, प्राची बडवे, मीना फातर्पेकर, मृणालिनी चितळे, रोहिणीताई भाटे, ऋता बावडेकर, सरू वाघमारे, कल्याणी किर्लोस्कर, सुषमा खटावकर, मनीषा सोनवणे , मुग्धा धामणकर, जुई सुहास आदी.

केंद्र सरकारकडून जीएसटी कपातीची धूळफेक


पुणे ता.२० (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या जीएसटी परिषदेने विविध वस्तूंवरील ‘वस्तू व सेवा करा’ (जीएसटी) दरांमध्ये कपात केल्याची घोषणा केली. मात्र केंद्राने नवीन काढलेल्या परिपत्रकामुळे सरकारने सर्वसामान्य जनतेच्या ही जीएसटीची कपातीची धूळफेक केल्याचे लक्षात येते. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार या दरकपातीचा लाभ ग्राहकांना एप्रिल २०२६ पासून मिळेल अशी शक्यता आहे. जीएसटी दरकपाती आधीच्या वस्तू जुन्या किमतीनेच मार्च २०२६ पर्यंत विक्री करण्याची मुभा विक्रेते आणि उत्पादकांना दिली असल्याचे या परिपत्रकात सांगितले आहे. येत्या २२ सप्टेंबर पासून जीएसटी दरकपात लागू होईल. या संदर्भात ९ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार उत्पादक व त्या उत्पादनांच्या विक्रेत्यांना २२ सप्टेंबर पासून जीएसटी कपातीचा वस्तूंवर नवीन किमतीचे स्टिकर व मूळ किमतीचे स्टिकर लाऊन जुन्या किमतीच्या वस्तू ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत विक्री करण्याची परवानगी दिली होती. मात्र आता १८ सप्टेंबर रोजी काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार ग्राहकांना याचा किमान सहा मिहीने लाभ मिळणार नाही. सरकारने मुठभर उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अगोदरच्या परिपत्रकानुसार कमी झालेल्या वस्तूंच्या किमती वृत्तपत्रात जाहिरात देऊन सांगायची होती. मात्र आता नवीन परिपत्रकात ही अट काढून टाकण्यात आली आहे. याबाबत व्यापाऱ्याकडून ही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विक्रेत्याकडे एखादी वस्तू सहा महिने कशी विनाविक्रीची राहील असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत. त्याबाबत सरकारने तातडीने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी माने यांनी केली.
केंद्र सरकारने मुळात आधीच सदोष जीएसटी आकारणी केली. आपली चूक समजायला सरकारला इतकी वर्षे लागली. जनतेला आता कुठे काही बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता दिसत असताना सरकारने पुन्हा जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका माने यांनी केली.

समाजवाद्यांनो रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हा-समाजवादी एकजूटता संमेलनाचे झाले उदघाटन

  • माताप्रसाद पांडे यांचे आवाहन

पुणे :
सांप्रदायिकता आणि भांडवलशाही व्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी समाजवाद्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरचा लढा लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे विरोधी पक्षनेता माताप्रसाद पांडे यांनी केले.

पुण्यातील सानेगुरुजी स्मारक येथे भारतीय समाजवादी आंदोलनाच्या 90 वर्षे पूर्तीनिमित्त आयोजित समाजवादी एकाजूटता संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवसीय संमेलनासाठी देशभरातून शेकडो समाजवादी नेते, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी उदघाटन सत्राचे अध्यक्ष मध्यप्रदेशचे माजी मंत्री रमाशंकर सिंह, १०० वर्षीय ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार पंडित रामकिशन, सलीमभाई (कश्मीर), विजया चौहान, अन्वर राजन, प्रफुल्ल सामंत्रा (ओडिशा), मेधा पाटकर गजानन खातू, बी.आर. पाटील (कर्नाटक), माजी आमदार डॉ.  प्रा. डॉ. आनंद कुमार आदी उपस्थित होते. या संमेलनाचे आयोजन राष्ट्रसेवा दल, एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, युसूफ मेहर अली सेंटर, समाजवादी समागम आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्यावतीने करण्यात आले होते.  

माताप्रसाद पांडे म्हणाले, समाजवादी आंदोलनाने वेळोवेळच्या सरकारला कंट्रोल करण्याचे काम केले. आवाज उठवला. आंदोलने केली. आता ती चळवळ कुठे आहे ? समाजवादी चळवळीने आपल्या विचाराने गरीब, किसान, मागासांना वर आणण्याचे काम केले. आज आपण सांप्रदायिक, उन्मादवादी लोकांच्या जाळ्यात अडकलो आहे. त्यातून बाहेर पडणे, हाच या संमेलनाचा उद्देश आहे. भांडवलशाही व्यवस्था उद्धवस्त  करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. समाजवादी विचार सर्वत्र पोहचवण्यासाठी पुढे या. ज्या संकल्पासाठी आपल्या लोकांनी कुर्बाणी दिली. तो संकल्प पुढे नेण्यासाठी पुढे या. समाजवादी विचारसरणी पुढे नेण्यासाठी एकत्र या ! असेही आवाहन पांडे यांनी केले.

प्रा. आनंद कुमार म्हणाले, समाजवादाने 19 व्या शतकापासून स्वातंत्र्य समता ही मूल्ये लोकांच्या मनात रुजवली. बेरोजगारी, गरीबी यापासून मुक्ती देणारी व्यवस्था म्हणजे समाजवाद. पण आज देशात अदाणी, अंबानी यांची ताकद वाढत असताना शेतकरी, शेतमजूर, कामागार यांची ताकद कमी होत आहे. अशा परीस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कामागार यांची ताकद वाढविण्यासाठी समाजवादाची आवश्यकता आहे.या उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक ऍड. सविता शिंदे यांनी केले, तर डॉ. सुनीलम यांनी सूत्रसंचालन केले, संदेश दिवेकर यांनी आभार मानले. दत्ता पाकिरे, प्रशांत दांडेकर, प्रकाश डोबांळे, साधना शिंदे, फैयाज इनामदार, राहुल भोसले, भीमराव अडसूळ, विनायक लांबे आदींनी संमेलनाचे संयोजन केले.

चळवळीतील ज्येष्ठांचा सत्कार
समाजवादी चळवळीतील वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या कार्यकर्ते, नेते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रावसाहेब पवार, उमाकांत भावसार, राधा शिरसेकर, भीमराव पाटोळे, राजकुमार जैन, चंद्रा अय्यर आदी या सत्काराला उपस्थित होते. यावेळी समाजवादी आंदोलनाची 90 वर्षे या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. समाजवादी आंदोलनाचा प्रवास दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. 

यकृताचा भाग देऊन भावाने दिले २२ वर्षीय करणला जीवदान !

यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी ठरली जीवनरेखा

पुणे, दि. १९, : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील करण गजानन ठाकरे या तरूणाचे वैद्यकीय कारणास्तव यकृत निकामी झाले होते. गेली दोन वर्षांपासून तो या आजराशी झुंज देत होता. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय डॉक्टरांनी सांगितल्याने उपचारासाठी लागणारा ३० लाख रुपये खर्च करणे शक्य नव्हते. घरची परिस्थिती बेताची असल्याने इतका मोठा निधी उभारण्याचे प्रश्नचिन्ह त्याच्या कुटूंबियांसमोर होते. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांनी ठाकरे यांच्या उपचाराचा मोठा खर्च उचलला. ३० लाख रुपयांपैकी कुटुंबीयांनी ५ लाख रुपये उभारले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तर उर्वरित २३ लाख रुपये धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून उपलब्ध करून देण्यात आले.

पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून करण सध्या प्रकृतीस स्थिर आहे. वर्धा येथील ठाकरे यांना वडील नसल्याने घरची परिस्थिती बिकट आहे. त्यातच त्याच्या आईला पक्षाघात झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी करणच्या खांद्यावर होती. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच तो घरखर्चही भागवत होता. या विचित्र अशा परिस्थितीत डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे शस्त्रक्रियेचा प्रचंड खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता.

या अशा बिकट परिस्थितीत करण यांचा मावसभाऊ चैतन्य बगाडे (वय २४, पुणे) यकृत दान करण्यासाठी पुढे आले. त्यांनी आपल्या यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यारोपणासाठी मार्ग मोकळा झाला.या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्वरेने निर्णय होऊन उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध झाली.

या प्रकरणातून मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची तत्परता आणि मावसभाऊचा त्याग या त्रिसूत्रीमुळे माझ्या भावाचा जीव वाचला अशी भावना गजानन यांची बहिणी अश्विनीने व्यक्त केली.

जिल्हास्तरीय समिती व पुण्यातील धर्मादाय रुग्णालये
पुणे जिल्ह्यातील एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांतून निर्धन व दुर्बल रुग्णांना लाभ मिळत आहे. या रुग्णालयांना शासनाच्या विविध कर व अनुदान सवलती मिळतात. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी आरक्षित खाटा उपलब्ध करून देणे त्यांच्यावर कायद्याने बंधनकारक आहे.
निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दराने उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटांची माहिती ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यावर राज्यस्तरीय मदत कक्ष सतत देखरेख ठेवतो.

वैद्यकीय मदतीसाठी अर्ज कसा करावा?
रुग्णांना मदत मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे :
• रुग्णाचे आधारकार्ड
• शिधापत्रिका
• पॅनकार्ड
• उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्याकडून)
• रुग्णालयाने दिलेले उपचाराचे अंदाजपत्रक

कुठे संपर्क साधावा?
डॉ. मानसिंग साबळे,
अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
पत्ता: खोली क्रमांक १०, तळमजला, जुनी जिल्हा परिषद, पुणे
वैद्यकीय मदतीचा अर्ज भरण्यासंदर्भात अडचण आल्यास कक्ष प्रमुखांच्या ८०८७६७८९७७ या भ्रमणध्वनी टोल-फ्री हेल्पलाईन १८०० १२३ २२११क्रमांक, https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच cmrfpune@gmail.com ईमेल पत्त्यावर क्रमांकावर संपर्क साधावा.

शरिराला आवश्यक चांगल्या जीवनसत्त्वासाठी मुलांनी नाचणीचे पदार्थ खावेत!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

सेवा पंधरवड्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना नाचणी बिस्किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ

पुणे-मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्व मिळणं आवश्यक असून, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी अतिशय आग्रही आहेत. त्यामुळे मुलांनी देखील आपल्या घरी नाचणीचे पदार्थासाठी आग्रह धरावा, असा कानमंत्र ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, कोथरुड मतदारसंघातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराची गोडी लागावी यासाठी २२००० विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा; यासाठी नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्यात आली असून, या उपक्रमाचा शुभारंभ आज बाणेर मधील कै. बाबुराव बालवडकर प्राथमिक विद्यालयात झाला. यावेळी ना. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

ना. पाटील म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला लहान वयात योग्य पोषक आणि पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्वे मिळावीत यासाठी सदैव आग्रही असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील फास्ट फूड ऐवजी पौष्टिक आहारासाठी पालकांकडे आग्रह धरला पाहिजे. जेणेकरून चांगली जीवनसत्त्वे मिळून शारिरिक विकासासाठी मदत मिळेल.

या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका सुजाता वाघमारे, कल्पना बाबर, सुकेशनी मोरे, शोभा घोरपडे, भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप नेते गणेश कळमकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, अनिकेत चांधेरे, वैदेही बापट, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, निकीता माथाडे, जागृती विचारे, स्नेहल सुतार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचे वैभव प्रथमच पुण्यात!

यंदाच्या नवरात्राचे खास आकर्षण: एक एकर जागेवर साकारतेय हुबेहूब प्रतिकृती

  • शिवदर्शनमधील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ७० फूट उंचीचे आकर्षक गोपुर

पुणे – दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे १६व्या शतकात उभारलेले ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले मीनाक्षी मंदिर यंदा पुणेकरांना पुण्यातच अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पुण्यातील शिवदर्शन, सहकारनगर येथील प्रसिद्ध जागृत श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात सुमारे एक एकर जागेवर मदुराईच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती पुणे नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर श्री. आबा बागुल आणि श्री लक्ष्मीमाता मंदिर समितीचे उत्सवप्रमुख श्री. हेमंत बागुल यांनी दिली.

ते म्हणाले कि, या देखाव्यात ७० फूट उंचीचे भव्य गोपुर, तसेच मीनाक्षी मंदिरातील पौराणिक कथा, देवता, संत आणि विद्वान यांच्या शिल्पांची नक्षी, विविध मंडपांतील खांबावरील सुसंस्कृत शिल्पकाम, रंगीबेरंगी चित्रकला आणि वास्तुशैलीचे विविध पैलू पुणेकरांना पाहावयास मिळणार आहेत. संपूर्ण देखावा मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असून, त्यात मीनाक्षी मातेसह मंदिरातील कलात्मक घटकांचे तपशीलवार सादरीकरण आहे.

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे. सुबक व मनमोहक अशा या स्थापत्यशैलीतून पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव मिळणार आहे.पुणे नवरात्रौ महोत्सव समिती गेली ३१ वर्षे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित करत आहे. दरवर्षी मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटलेला असतो; परंतु यंदाचा देखावा भव्यतेने आणि कलात्मकतेने विशेष ठरणार असल्याचा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांसाठी हे मंदिर दर्शन आणि स्थापत्यकलेचा अनुपम अनुभव ठरणार असून पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेमंत बागुल यांनी केले आहे.