पुणे-सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही धनलक्ष्मी प्रतिष्ठाण, मंडई येथे शारदिय नवरात्रौ उत्सवाचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम पुढील नऊ दिवसात घेण्यात येणार आहेत.
सायं ६ वा ढोल-ताशांच्या गजरात धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठापना आणि अभिषेक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब अमराळे यावेळी म्हणाले कि,’ आपल्या प्रतिष्ठान ला विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच गरजूंना मदत स्वरुपात केलेली लक्ष्मीसेवा याला २१ वर्षांची परंपरा आहे, यंदा प्रतिष्ठान २२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, आपण वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतो, यंदा आपण महिलांचे श्रीलक्ष्मी सूक्त पठन, नवदुर्गा सन्मान तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहोत.
सदर कार्यक्रमास पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे , तुषार पठारे, आनंद खन्ना, ऋषि सणस , सचिन चारोळी, स्वप्नील अमराळे, आशिष हिंगमिरे तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी युवक काँग्रेसचे शहरातील पदाधिकारी व प्रतिष्ठान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे (दि. २३ सप्टेंबर २०२५) संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवात संगीत रंगभूमीवरील विशेष योगदान व मराठी संगीत रंगभूमी या ग्रंथ निर्मितीच्या निमित्ताने डॉ. वंदना घांगुर्डे यांची प्रकट मुलाखत लेखक व निवेदक श्रीकांत चौगुले यांनी घेतली. प्रास्ताविक प्रभाकर पवार, स्वागत संस्थेचे रंगकर्मी सतीश एकार यांनी केले. जेष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ, रमेश वाकनीस आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वंदना घांगुर्डे यांनी संगीत रंगभूमी विषयी सांगितले की, संगीत नाटकाचा प्रारंभ विष्णुदास भावे यांच्यापासून झाला असला तरी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल पासून झाला. त्यानंतर नटसम्राट बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने रंगभूमी अधिक समृद्ध झाली. त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी काही पदे सादर केली. या तीन महान गायकांचा व त्यांच्या गायन विचारधारांचा रसिकांनी पुरस्कार केला. त्यामुळे पुढे अनेकांनी त्यांचे अनुकरण केले. “संगीत रंगभूमी मुळे दरबारी, रागदारी संगीत सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. त्यासठी अनेक संगीतकारांनी नवनवीन प्रयोग केले. उडत्या चालीचा अंतर्भाव केला. गरबा, लावणी, ठुमरी यांचा वापर केला. संगीत नाटक हे काळानुसार बदलत गेले. तंत्रज्ञानात बदल झाला. तसेच सामाजिक परिस्थितीनुसार नाटकाच्या विषयातही बदल झाला. सुरुवातीला पौराणिक कथाच फक्त मांडणाऱ्या संगीत नाटकांनी एकच प्याला, कीचकवध, संगीत शारदा अशा विविध नाटकातून स्वातंत्र्य चळवळीला पोषक व सामाजिक सुधारणांचा विचार मांडला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तीन नाटके लिहिली, संगीत रंगभूमीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचे संन्यस्त खड्ग हे नाटक वेगळ्या धाटणीचे आहे . नाटककारांच्या काही आठवणी, घटना, प्रसंग तसेच सुरेल नाट्यपद यामुळे रंगानुभूति: महोत्सवाच्या उत्तररंगातील ही मुलाखत महोत्सवात सहभागी झालेल्या अभ्यासकांच्या, रसिक श्रोत्यांच्या दृष्टीने अधिक महत्वपुर्ण ठरली. डॉ. वंदना घांगुर्डे यांनी ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने सुरुवात केली आणि ‘शतजन्म शोधताना’ या नाट्यपदाने मुलाखतीची सांगता केली. चिन्मय कुलकर्णी व सार्थक भोसले यांनी संगीत साथ केली. सूत्र संचालन मिलिंद बावा, तेजस्विनी गांधी यांनी आणि आभार अमृता ओंबळे यांनी मानले.
सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
पुणे-तृतीयपंथीयांच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्यातील अर्ज केलेल्या 5686 व्यक्तींपैकी 4783 व्यक्तींना तृतीयपंथी ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
11 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने तृतीय पंथीयांविषयीचे धोरण जाहीर केले. या धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मिसाळ म्हणाल्या, “तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर विशेष भर देण्यात येत आहे. नोंदणी केलेल्या 3901 तृतीयपंथीयांना आधार कार्ड आणि 1240 व्यक्तींना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले आहे. अर्ज केलेल्या उर्वरित व्यक्तींची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.”
तृतीयपंथीयांसाठी महत्त्वाचे निर्णय
हक्काचे संरक्षण करण्यासाठी विभाग आणि जिल्हास्तरावर समिती
जिल्हानिहाय सर्वेक्षण मोहीम राबवणार
जिल्हास्तरावर वैद्यकीय मंडळामार्फत विनामूल्य समुपदेशन, उपचार आणि शस्त्रक्रिया
शासकीय भरती, शिक्षण संस्थांच्या अर्ज/आवेदनावर तृतीयपंथी हा पर्याय
तृतीयपंथीयांना मोफत उच्च शिक्षणाची सुविधा (विद्यापीठाच्या स्वनिधीतून)
गृहनिर्माण धोरणामध्ये समावेश
कौशल्य विकास प्रशिक्षण शिष्यवृत्ती आणि प्लेसमेंट
तृतीयपंथीयांना ओळखपत्र, आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वितरित केल्याचा राज्याचा तक्ता
पुणे २३ सप्टेंबरः संगीतातून निर्माण होणारा भक्तिरस, आत्म्याला भिडणारा अनुभव, लय व माधुर्य आणि आध्यात्मिक अनुभव या सर्वांची अनुभूती तसेच नृत्याच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मातील ९ रसांची अनुभूती घटस्थापनेच्या मुहूर्तावर माईर्स एमआयटीच्या प्रांगणात जाणवली. निमित्त होते माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘फनकार फोरमच्या माध्यमातून सादर करण्यात अलेल्या “पंढरीचा राजा पंढरीनाथ, विश्व माऊली विश्वनाथ” या अध्यात्मिक गीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे. भारतीय संस्कृती, परंपरा व अध्यात्माची महती युवक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश्य ठेऊन याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, पीस स्टडीजचे डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. अंजली साने, डॉ.रोहिणी काळे व डॉ. महेश थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होते. विठोबा व ज्ञानेश्वर माऊली या थीम वर आधारित ‘कानडा राजा पंढरीचा’,‘जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका’, सारखे अनेक भक्ती गितांचे सादरीकरणाने उपस्थितांना साक्षात माऊलीचे दर्शन घडल्यासारखे झाले. सुयश चांडोलकर व सर्वेश रोटकर त्यांच्या चमुने ही भक्ती गिते सादर केली. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरस जसे श्रृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अभ्दुत आणि शांत रसांवर आधारित नृत्य भरतनाट्यम् व कथ्थकच्या माध्यमातून सादर करण्यात आले. त्याच प्रमाणे माँ कालीच्या नृत्य सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कोरिओग्राफर वेल्लरी व श्रेया या विद्यार्थी चमूने या संपूर्ण नृत्यांचे नियोजन केले. या प्रसंगी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी ‘फनकार फोरम’च्या सर्व सदस्यांचा सत्कार केला. तसेच, फोरमच्या पदाधिकार्यांनी प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांचा विशेष सत्कार केला. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“या सृष्टीवर एकच व्यक्ती विश्व माऊली होऊ शकते, ती म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. यांच्या तत्वज्ञानावर आज प्रत्येक व्यक्ती जीवन व्यतीत करीत आहे. विश्वशांतीसाठी विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून दिले जाणारे ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. येथील विद्यार्थ्यांना दिले जाणारे ज्ञान हे विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून हे सिद्ध होते की देश विश्वशांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.” डॉ. मिलिंद पात्रे म्हणाले,“जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर सांगतात की ज्या दिवशी या देशात शिक्षित विद्यार्थी हा भजन, कीर्तन, व वारीत माऊलीच्या तालावर नाचतील तेव्हाच भारत खर्या अर्थाने विश्वगुरू म्हणून उद्यास येईल. ” ‘फनकार फोरम’चे संस्थापक सदस्य सुदीप दहीफळे, प्रज्वल गुप्ता, आदिती, जिज्ञासा व प्रतिक्षा यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. डॉ. सचीन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र असलेल्या एकविरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी प्रसाद, साखर नैवेद्य आणि महावस्त्र अर्पण करून भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, वाहनतळाचा प्रश्न, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. पीएमआरडीए आणि एमएमआरडीएने काही प्रमाणात लक्ष घातले असले तरी अधिक समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येणार असून अनेक वर्षे थांबलेली कामे गतीमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. पीडब्ल्यूडीकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळताच या कामाला तातडीने सुरुवात होईल.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानातील तयारीचाही आढावा घेण्यात आला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्य सेवा सुविधा आणि पार्किंगच्या समस्येचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “भाविकांची सुरक्षितता आणि सोय ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. एकविरा मातेकडे प्रार्थना करते की, सर्व ग्रामस्थ व भक्तांना सुरक्षितता, सौख्य, लक्ष्मी आणि विजय लाभो.”
या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख कांताताई पांढरे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, मावळ संघटक चंद्रकांत भोते तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन व सागर हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचा रौप्य महोत्सव सांगता सोहळा
पुणे : कुठलेही समाजोपयोगी काम हाती घेताना, ते साकारण्याचे मोठे, विशाल स्वप्न पहा. स्वप्ने पाहताना काळाच्या चौकटीची पर्वा करू नका. सकारात्मक कार्याची परिपूर्ती काळाच्या पटलावर नक्कीच होते. त्यामुळे आपली स्वप्ने विशाल आणि मोठी ठेवा, असे आवाहन रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष रोटोरियन शेखर मेहता यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रोटरी क्लब गांधीभवनच्या अध्यक्ष रोटेरियन अश्विनी शिलेदार, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, सचिव रोटेरियन शामल मराठे, रोटेरियन आणि कार्यक्रमाचे समन्वयक गणेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी क्लबच्या २५ वर्षांतील विविध उपक्रमांची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या वाटचालीत ज्या संस्था, नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशा व्यक्तींचा व संस्थांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ गांधीभवनच्या ‘पसायदान’ या बुलेटीनचे तसेच ‘पढो भारत’ या प्रकल्पाच्या पोस्टरचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. ‘पढो भारत’ या प्रकल्पाद्वारे पुस्तक संकलन मोहीम राबविण्यात येणार असून या द्वारे संकलित झालेली पुस्तके गरीब मुलांना वितरित करण्यात येणार आहेत. रोटेरियन शेखर मेहता पुढे म्हणाले, देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, संशोधकांनी, समाजसुधारकांनी वेळोवेळी विशाल स्वप्ने पाहिली. ती साकार होण्याच्या दिशेने अखंडित काम केले. अनेक जण त्या स्वप्नांची परिपूर्ती स्वतःच्या हयातीत पाहू शकले नाहीत, पण ज्या समाजाच्या उन्नतीसाठी ते झटले, त्या समाजाने ती स्वप्ने साकार होताना अनुभवली, हे महत्त्वाचे आहे. रोटरी क्लब गांधीभवनचे गेल्या २५ वर्षांतील कार्य उल्लेखनीय, कौतुकास्पद आहे. यापुढेही क्लब सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्य करत राहील, असा विश्वास वाटतो. प्रभुणे म्हणाले, समाज आणि देश प्रगतीच्या वाटा नक्कीच चालत आहे, पण अजूनही समाजातील काही घटक वंचित, मागास, अशिक्षित आणि अभावग्रस्त अवस्थेत जगत आहेत. स्त्रियांची स्थिती असहाय आहे. आपले पीडित, दलित, मागास, वंचित बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक आहे. सन २०४७ पर्यंतचे देशाच्या विकासाचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पाहिले आहे. हा काळ अमृतकाळ आहे, अशी धारणा आहे. ती धारणा प्रत्यक्षात उतरवीणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. रोटरी क्लब गांधीभवनचे कार्य अमृतकाळाशी सुसंगत पद्धतीने सुरू आहे. रोटेरियन अश्विनी शिलेदार म्हणाल्या, अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेक सेवा प्रकल्पांचा संकल्प केला आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांच्या मदतीने काही ठिकाणी सीसीटिव्हीचे काम सुरू होत आहे. ‘भवानी’ या नावाने हा प्रकल्प सुरू होत आहे. तसेच या कार्याच्या उद्देशाशी तरुणाई जोडली जावी, यासाठी ‘कवच’ हा प्रकल्पही नुकताच सुरू झाला आहे. दिव्यांगांसाठी ‘साऊंड गार्डन’ उभारण्याची योजना आहे. तसेच पर्यावरणाशी संबंधित कार्य आणि गाव दत्तक घेण्याचा उपक्रम सुरू आहे. रोटेरियन प्रसाद पुजारी यांनी आभार मानले. डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हा संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विरोधात आंदोलन
राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, भ्रष्टाचाराची चौकशी यासाठी संदीप भोंडवे यांचे उपोषण
पुणे: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराबाबत अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अजित पवार यांना संघटनेच्या कामात लक्ष देण्यासाठी वेळ नसेल, तर त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली. संघटनेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर राज्यभरातील २५ ते ३० क्रीडा संघटना व खेळाडू आक्रमक झाले असून, मंगळवारी रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. कुस्ती, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हँडबॉल, स्विमिंग, कुराश अशा विविध २५ ते ३० संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारप्राप्त खेळाडू या निषेध आंदोलनात सहभागी झाले. नामदेव शिरगावकर यांनी तीन नॅशनल गेम्समध्ये केलेला भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत सर्व संलग्न ५० राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी हिंदकेसरी पै. योगेश दोडके, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, सल्लाउद्दीन अन्सारी, संदीप गाडे, तात्या भिंताडे आदी उपस्थित होते.
रामदास तडस म्हणाले, “संघटनेला ५० खेळांच्या संघटनांना मान्यता असतानाही केवळ २२ संघटना मतदानासाठी पात्र ठरवणे, हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. नामदेव शिरगावकर यांची ही मुजोरी आणि भ्रष्ट कारभार खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ आहे. खेळाडूंच्या कल्याणासाठी आमचे हे आंदोलन आहे. ‘नामदेव हटाव’ ही एकच सर्वांची मागणी आहे. त्यासाठी संदीप भोंडवे उपोषणाला बसले आहेत. यासह आम्ही या दोन्ही गोष्टींवर हरकती नोंदवल्या असून, २५ तारखेपर्यंत याचा निकाल लागला नाही, तर २७ तारखेपासून माझ्यासह अन्य खेळाडू व पदाधिकारी महाराष्ट्रभर आमरण उपोषणाला बसतील.”
“गुजरात, गोवा, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्य शासनाने १२ कोटी रुपये दिले. मात्र, त्याचा हिशोब अद्यापही दिलेला नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना मागे खेचण्याचे काम संघटनेकडून सुरु आहे. अजित पवार केवळ नावापुरते पदावर आहेत की काय, अशी शंका आम्हाला येत आहे. माझ्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. पवार यांना संघटनेच्या कार्यात लक्ष घालायला वेळ नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आहे.”
उपोषणाला बसल्यानंतर संदीप भोंडवे म्हणाले, “खेळासाठी वेळ देऊ शकणारे, खेळाडूंचा विचार करणारे लोक संघटनेत येण्यासाठी सर्व संघटनांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. नामदेव शिरगावकर यांच्यासारखे भ्रष्ट लोक संघटनेतून बाहेर काढण्यासाठी हा आमचा लढा आहे. भ्रष्टाचाराची चौकशी, सर्वाना मतदानाचा अधिकार आणि नामदेव शिरगावकर यांना हटवत नाही, तोवर माझे उपोषण सुरु राहणार आहे. खेळाडूंच्या नावावर स्वतःच्या व कुटुंबियांच्या नावाने कंपन्या काढून शिरगावकर यांनी मोठ्या प्रमाणात पैसे लाटले आहेत.”
यावेळी आंदोलनात सहभागी खेळाडूंचे रौद्र रूप पाहायला मिळाले. संघटनेच्या भोंगळ कारभारामुळे खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही आम्हाला योग्य संधी मिळत नसल्याची खदखद खेळाडूंनी व्यक्त केली. कुस्ती, तायक्वांदो खेळांची प्रात्यक्षिके करून हलगीच्या निनादात झालेल्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले.
मुंबई: महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर व कार्यान्वित होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांसाठी वीज भारात वाढ किंवा कमी करण्याची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे स्वयंचलित करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसीत करून दि. १७ सप्टेंबरते दि. २ ऑक्टोबरच्या सेवा पर्वाचे औचित्य साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये (Load Change/Demand Change) करारापेक्षा आणखी वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर ग्राहकांना स्वतःच्या लॉगीनद्वारे उपलब्ध आहे. मात्र मंजूरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी बराच वेळ लागत होता. आता १५७ किलोवॅटपर्यंतच्या वीज भाराच्या वाढीसाठी स्वयंचलित मंजूरी देण्यात येणार आहे. वीज भार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदविल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येईल. तर कोटेशनचे शुल्क भरण्याची देखील ऑनलाइन सोय आहे.
लघुदाब वर्गवारीमध्ये शून्य ते ७.५ किलोवॅट, ७.५ ते २० किलोवॅट आणि २० ते १५७ किलोवॅट असे वीजभाराचे तीन गट आहेत. या तिनही गटात वीज भार वाढीच्या मंजूरीसाठी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल व नियमानुसार शुल्क भऱावे लागेल. त्यापुढील सर्व प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्याची माहिती संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा नसेल, अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होईल व केवळ २४ तासांत कार्यान्वित होईल. वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येते. अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येईल. त्यामुळे नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणी देखील साधारणतः ४८ तासांमध्ये वीज भार वाढीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यासह ज्या वीजजोडणीचा करारापेक्षा अधिक वीज भार वाढविण्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, त्याठिकाणी महावितरणद्वारे पायाभूत यंत्रणा उभारण्यात येईल. त्याबाबत स्वयंचलितपणे निवडसूचीवरील संबंधित एजन्सीला कळविण्यात येईल. पायाभूत यंत्रणा उभारण्याचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येईल. या प्रक्रियेची माहिती वेळोवेळी संबंधित ग्राहकांना कळविण्यात येईल.
लघुदाब वर्गवारीमध्ये वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजूरी देण्याच्या निर्णयामुळे महावितरणच्या ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्याचा प्रामुख्याने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहकांना तसेच प्रामुख्याने औद्योगिक, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.
दीप्ती भोगले आणि अर्चना देशमाने यांना ‘तेजस्विनी पुरस्कार’ प्रदान
पुणे – पुणे नवरात्र महिला महोत्सवात सर्व शास्त्रीय कलांचा सन्मान केला जातो आणि या कलेच्या उपासकांना सातत्याने व्यासपीठ दिले जाते. याचे श्रेय महोत्सवाचे प्रवर्तन, आयोजक जयश्री बागुल आणि आबा बागुल यांचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ नृत्यांगना, गुरू, संरचनाकार विदुषी शमा भाटे यांनी मंगळवारी येथे काढले.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. या महिला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शमा भाटे बोलत होत्या. त्यांच्याच हस्ते यावेळी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, प्रवर्तक आबा बागुल, तसेच निर्मला जगताप, छाया कातुरे, प्रांजली गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विदुषी शमा भाटे पुढे म्हणाल्या, ‘पुणे नवरात्र महिला महोत्सवाशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेली आहे. या व्यासपीठावरून दरवर्षी नृत्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. जयश्रीताई आणि आबा बागुल यांना नाही म्हणता येत नाही, इतक्या आत्मीयतेने ते हे कार्य करतात. या महोत्सवात सर्व कलांना सन्मानाचे स्थान असते. मान्यवर कलाकारांचा सहभाग असतो. एक कलाकार म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते’.
मनोगत व्यक्त करताना दीप्ती भोगले म्हणाल्या, ‘मी एक भाग्यवान कलाकार आहे. नवरात्र महोत्सवात मी सातत्याने येत आहे. बागुल कुटुंब हे घरची माणसे असावीत, इतके जवळचे आहे कारण कोणत्याही अडचणीत ते धावून येतात. या महोत्सवाच्या माध्यमातून आबा आणि जयश्रीताई, विविध कलांना एका व्यासपीठावर आणून रसिकांना आनंद देतात’.
अर्चना देशमाने म्हणाल्या, ‘स्नेहवनच्या कार्याविषयी शब्दांतून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन कार्य पाहणे अधिक आनंदाचे आहे’.
जयश्री बागुल यांनी प्रास्ताविक करताना नवरात्र महिला महोत्सवाची माहिती दिली. शक्तीचे जागरण आणि शक्तीला अभिवादन, ही भावना असून, या निमित्ताने समाजातील विविध महिलांना एकत्र आणणे, संवाद साधणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू असतो, असे त्या म्हणाल्या.
स्वच्छता कर्मचार्यांच्या वतीने आशा भोसले यांनी प्रातिनिधिक मनोगत मांडले. ‘आबा आणि जयश्रीताईंनी आमची आठवण ठेवली आणि सत्कार केला, याचा फार आनंद झाला’, असे त्या म्हणाल्या. सुरवातीला नृत्याविष्काराच्या माध्यमातून देवीवंदना सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नम्रता जगताप यांनी आभार मानले तर गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : स्वारगेट परिसरात ‘दुधानी’ टोळीने दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. मकोका कारवाईनंतर जामीनावर सुटून आलेल्या आरोपीसह सराईत गुन्हेगारांनी डायस प्लॉट परिसरात भर वस्तीत एकावर कोयत्याने वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाहीतर या टोळक्याने हवेत हत्यारे फिरवलीत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भक्तिसिंग दुधानी, शक्तिसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी यांच्यासह सात जणांविरोधात विविध कलमांन्वये ‘आर्म्स अॅक्ट आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी आबा सरोदे (वय ३९) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय.शनिवारी रात्री तक्रारदार डायस प्लॉटमधील कॅनॉलजवळ उभे असताना आरोपींनी त्यांना गाठले. सुरुवातीला त्यांना हाताने मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात कोयते हवेत फिरवून आरोपींनी दहशत माजवलेली. अचानक झालेल्या या हल्ल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर आरोपी टोळके पसार झाले. सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समजत आहे.गोविंदसिंग टाकवर ‘मकोका’ कारवाई झालेली असून, तो एप्रिल २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. दुधानी टोळीतील सदस्यांवरदेखील खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तक्रारदारांशी आरोपींची केवळ तोंडओळख असून, जुन्या वादातून हल्ला झाल्याचा अंदाज आहे. घटनेनंतर पोलिसांनी छापेमारी करून परिसरात तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता पवार करत आहेत.टोळक्यांवर ‘मकोका’सारखे कठोर कायदे लावले जात असले, तरी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. टोळीतील गुंड गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांना टोळीत सहभागी करून घेत असल्याचे समोर आले आहे.
पुणे – एकूण १२.५ किलो गांजासह एकुण ५ लाख रु. कि.चा मुद्देमाल केला हस्तगत करत पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला पकडले आहे .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२१/०९/२०२५ रोजी दोन इसम उरुळी कांचन कडुन निगडीकडे जात असुन सदर रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गोपनिय बातमी पोलीस अंमलदार राहुल कर्डीले नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर बातमी प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा बाबर यांचे अधिनस्त एक स्वतंत्र पथक तयार करुन त्या पथकास सापळा रचुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी रिक्षा येणारे मार्गावर सापळा रचुन संशयीतरिक्षांवर पाळत ठेवली. दि.२१/०९/२०२५ रोजी सकाळी ०९/१५ वा.चे सुमारास शेतजमीनीलगत, थेउर रेल्वे पुल सर्व्हिस रोड, थेउर, ता. हवेली, जि. पुणे येथे संशयीत रिक्षा दिसताच लोणी काळभोर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षाचालकास ताब्यात घेतले. सदर रिक्षाची पोलीसांनी तपासणी केली असता रिक्षामध्ये रिक्षाचालक नामे लक्ष्मण राजु पवार, वय ३० वर्षे, रा. यमुनानगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, ओटास्किम निगडी, पुणे याने त्याचा साथीदार याचेसह सुमारे २,४०,०००/-रु किं.चा १२ किलो ३४५ ग्रॅम वजनाचा गांजा, विक्रीकरीता अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, जवळ बाळगले असताना मिळुन आले. सदर गांजा ते त्यांचे ताब्यातील रिक्षानं. एम एच १४ एल एस ३१४६ मधुन घेवुन जात असताना मिळुन आल्याने सदर रिक्षा देखील जप्त करणेत आली आहे. असा एकुण सुमारे ५,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल लोणी काळभोर पोलीसांनी जप्त केला आहे. सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस वरिल नमुद दोन इसम व एका अज्ञात इसमा विरुध्द गु. र. नं.४२४/२०२५, एन.डी.पि.एस. अॅक्ट ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवीणेत आला आहे. लोणी काळभोर पोलीसांना सदर गुन्हयातील आरोपी तसेच रिक्षा नंबर अथवा इत्तर कोणतीही खात्रीशिर माहिती नसताना देखील, त्यांनी अतिशय कौशल्यपुर्णरित्या संशयीतरिक्षा व रिक्षाचालकास ताब्यात घेवुन त्याचेकडुन सुमारे १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सदरची उकागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार माने, सातपुते, वणवे, देविकर पोलीस शिपाई राहुल कर्डीले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, विर, गाडे, शिरगीरे यांनी केली आहे.
पुणे :सदाशिव पेठ,नारायण पेठ, शनवार पेठ येथील नागरिक जेव्हा कोथरूड सारख्या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले तेव्हा कोथरूड हा शहरातील शांत, सुसंस्कृत तसेच वैचारिक आणि सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला.पण हेच कोथरूड आता टोळ्यांच्या गुन्हेगारी कृत्यांनी बदनाम होऊ लागले आहे. कोथरूड गुन्हेगारी टोळ्यांची नगरी बनली आहे.ज्या कोथरूडमध्ये एक केंद्रीय राज्यमंत्री, राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री,एक खासदार नेतृत्व करतात त्याच कोथरूडमध्ये राज्याला हादरवून टाकणारे गुन्हेगारी टोळ्यांचे आकडे समोर आलेत. पुण्यातील ७६ टोळ्यांपैकी ३६ टोळ्या या कोथरुडमधल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.निलेश घायवळ,गजा मारणे,गणेश मारणे,शरद मोहोळ,बंटी पवारअशा टोळ्यानी कोथरूड चे नाव खराब केले असून यातील काही जन तुरुंगात असले काही मयत असले तरी काही अद्यापही वावरत आहेत अस्तित्व राखून आहे या टोळ्यांच्या सदस्यांची संख्या तब्बल २२८ असल्याचे पोलीस रेकॉर्ड मध्ये नमूद आहे . एकेकाळी पुण्यातली महात्मा फुले मंडई ही गुन्हेगारीचे विद्यापीठ म्हणून नावाजलेली होती या विद्यापीठात माळवदकर, बोडके, मिसाळ,रामपुरी यासारख्या टोळ्यांची पाळमुळं रुजलेली होती. उपनगरांबरोबर अनेक टोळ्या उदयाला आल्या. मात्र या टोळ्यांच्या कारवाया स्थानिक स्वरूपाच्या होत्या.पण महापालिकेच्या हद्दीत येणार म्हणून पुण्याच्या अवतीभवती असलेल्या गावांमधल्या जमिनींना सोन्याचा भाव आला आणि बिल्डर बनलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक मित्रांना गुन्हेगारीकडे वळवले.त्यातली महत्त्वाची नावे म्हणजे मोहोळ,मारणे,बोडके टोळी अशा टोळ्या कोथरूड आणि आसपासच्या परिसरामध्ये फोफावल्या. गजा मारणेचा कधीकाळी सहकारी असलेल्या निलेश घायवळ याने पुढे फुटून गेल्यानंतर स्वतःची टोळी सुरू केली. मात्र एवढं सगळं झालं तरी गेल्या चार-पाच वर्षापर्यंत पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांची संख्या ही स्थानिक आणि मर्यादित स्वरूपाची होती.आंदेकर, माळवदकर,रामपुरी हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील या सर्वांच्या पूर्वीचे जुने नाव.काही राजकारण्यांनी गुन्हेगारीला राजाश्रय दिला आणि या गुन्हेगारी टोळ्यांची धार कमी होत गेली पण त्याबरोबर नव्या टोळ्या उभ्या होत गेल्या.अर्थात त्यांनाही काही प्रमाणात राजाश्रय मिळत गेलाच.
खरे तर येरवडा हे शिक्षा गृह नाही तर सुधारगृह आहे असे सुरुवातीच्या काळात महासंचालका सारखे अधिकारी नेहमी सांगत पण नंतर उलटी गंगा वाहू लागली येरवडा हे गुन्हेगारीचे विद्यापीठ बनू लागले गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या आकर्षणाने गुन्हे करणाऱ्या अनेक तरुणांवर पोलिसांनी मकोकासारख्या कठोर कायद्याचा अवलंब केला. शेकडो तरुण गुन्हेगार येरवडा नावाच्या या विद्यापीठात गेले आणि बाहेर आले ते थेट गुन्हेगारी टोळ्या चालवायचं तयार करायचं प्रशिक्षण घेऊन…त्याचा परिणाम असा झाला आहे की शहराच्या उपनगरांमध्ये नव्याने जवळपास 80 टोळ्यांचा उदय झालाय आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या टोळ्यांचा आगार ठरलंय ते म्हणजे कोथरूड..आणि त्याच्या आसपासचा परिसर.पुण्यातील ७६ टोळ्यांपैकी सुमारे ३६ टोळ्या या कोथरूड आणि परिसरातल्या आहेत. त्यामुळे महात्मा फुले मंडई नंतर आता कोथरूड हे पुण्याच्या गुन्हेगारीच नवं आगर ठरतंय. या यादीतून झोन-तीन म्हणजेच पुणे पोलिसांच्या प्रशासकीय हद्दीचा तिसरा प्रभाग ज्यात प्रामुख्याने कोथरूड चा समावेश होतो. तिथेच तब्बल 36 नव्या टोळ्या गेल्या पाच वर्षात उदयाला आल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच मात्र कोथरूड सारख्या उच्चभ्रू उपनगरात जिथे समाजातले अनेक नावजलेल्या व्यक्ती, कलेचे उपासक राहतात तिथे इतक्या मोठ्या संख्येने होणारा गुन्हेगारी टोळ्याचा उदय हा गंभीर विषय आहे. मुख्य गँग-निलेश घायवळ प्रमुख / म्होरक्या निलेश बन्सीलाल घायवळ रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड पुणे ( जेल बाहेर) एकूण सदस्य संख्या– ५१ मुख्य गँग-गजा मारणे कोथरुड पुणे (जेलमध्ये ) प्रमुख / म्होरक्या-गजानन पंढरीनाथ मारणे वय- ५७ रा. हमराज चौक शास्त्रीनगर एकूण सदस्य संख्या– ७७ गणेश मारणे( जेलमध्ये) प्रमुख / म्होरक्या-गणेश निवृत्ती मारणे रा. फ्लॅट नं.१५ सरगम सोसायटी गल्ली एकूण सदस्य संख्या-४४ शरद मोहोळ-प्रमुख / म्होरक्या-शरद हिरामण मोहोळ रा. सुतारदरा (दि.०५/१/२०२४ रोजी खुन झाला) महेश उर्फ बंटी प्रकाश पवार रा. तुकाईनगर वडगाव बुद्रुक सिंहगडरोड पुणे (जेलमध्ये ) एकूण सदस्य संख्या-२६
पुणे – पुण्यातील माळवदकर गँग कधीच संपली,Dगँग ची सहायक समजली जाणारीरामपुरी गँगहि संपली,कलमाडींच्या काळात अनेक गुंडांना राजकीय आश्रय मिळाला आणि त्यांचे गुंडगिरीतून राजकीय पुनर्वसन झाले तेव्हा वत्सला आंदेकर महापौर झाल्यावर आंदेकर यांची टोळीही संपुष्टात आली असे वाटले तरीही अलीकडच्या वनराज आंदेकर याच्या खुनाने आंदेकर गँग हि अन्य कुठल्या गँगशी वॉर करताना आढळून आली नसली तरी त्यांच्या घरातील नातलगांच्या कलहातून आंदेकर गँग अजूनही तग धरून बसल्याचे निष्पन्न झाले त्यात टिपू पठाण टोळीने पुण्यात लहान वयातील मुलांना हत्यारे पुरविण्याचे काम सुरु केल्याचेही दिसून आले.वनराज ची हत्या,नंतर बदला म्हणून आयुष कोमकर या आंदेकर यांच्या नातवाची हत्या या दोन्ही प्रकरणात २० /२० हून अधिक जणांना पोलिसांनी तुरुंगात घातले आहे.आता या सर्व पार्श्वभूमीवर आंदेकर नावाचा सुपडा साफ करण्याचा विडा च जणू पोलीस आणि प्रशासनाने उचलल्याचे दिसत आहे.आंदेकर यांच्या घरावरील छाप्यात अवघ्या १ ते दीड कोटीचा ऐवज सापडला पण पुढील तपासात आंदेकर टोळीने चक्क २० कोटीची खंडणी वसूल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.त्याचबरोबर आंदेकर यांच्या कुटुंबात माजी लोकप्रतिनिधी जरी होते तरी त्यांची छायाचित्रे,नावे,असलेली फलके पाणपोई हे सारे काही उखडून या टोळीचा सुपडा साफ करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.अर्थात आता मूळापासून हो टोळी खरोखर या प्रयत्नांतून साफ होणार कि आणखी फोफावणार हे मात्र येणारा काळच सांगू शकणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मच्छि मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्याचे पोलीस सांगत आहेत.या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,शिवम आंदेकर,अभिषेक उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. बंडू आंदेकर याने व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 कोटींची खंडणी घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता इत्यंभूत तपास केला जात आहे.विशेष म्हणजे पुणे पोलिसांना हत्येच्या काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आंदेकर टोळीच्या आरोपींना पोलिसांनी रेकी करताना रंगेहातदेखील पकडलं होतं. पण बंडू आंदेकर हा स्वत:च्याच नातवाला संपवेल, अशी कल्पना पोलिसांना देखील नव्हती. त्यामुळे पोलीस देखील या घटनेने अवाक झाले. या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपासून बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे, पोलीस तपासातून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.
आंदेकर टोळीवर १२ वर्षापासून संघटीरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशस्त भस्मे यांनी कळविले आहे की, गणेश पेठ मच्छि मार्केट, पुणे येथील मासे व्यापाऱ्यांना धमकावून व दहशतीने मागील १२ वर्षांपासून संघटीतरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचेसह इतर ११ त्यात आंदेकर याच्या घरातील महिलेसह टोळी सदस्यांविरुध्द फरासखाना पोलीस ठाणे येथे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुरनं १८२/२०२५, भारतीय न्यायसंहिता कलम ३०८ (खंडणी), ३०८ (४) (जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी घेणे), १११ (संघटीतरीत्या गुन्हे करणे), ३(५) (सामाईक उद्देश) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे शहर पोलीस यांनी पुण्यातील टोळीयुध्दाविरुध्द केलेल्या सक्षम व कठोर कारवाईमुळे दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरीकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला असून, या कारवाईमुळे मनोबळ वाढल्याने एका तक्रारदारने गेल्या १२ वर्षापासून सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीचा दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावाने चालू असलेला खंडणी उकळण्याचा प्रकार उघड केलेला असून, त्याबाबत त्याने फरासखाना पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केलेली आहे. सदरबाबत वर नमुद प्रमाणे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर खंडणी प्रकरणात बंडूअण्णा आंदेकर टोळीने आजपर्यंत २० कोटीपेक्षा जास्तची रक्कम मासे व्यापाऱ्यांकडून व्यवसायाकरीता जागा व इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून उकळली असल्याचे दिसून येत आहे.या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी अक्षरक्षः कर्जबाजरी झाले असून, बंडू आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास व दहशतीमुळे ते सर्व प्रकार निमुटपणे सहन करीत होते. परंतू अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुणे शहर पोलीसांनी संघटीत गुन्हेगारी टोळीविरुध्द आक्रमक व कठोर कारवाई सुरू केल्याने सामान्य नागरीकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला असून पुणे शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत पुणे शहर पोलीस प्रतिबध्द आहे. नागरीकांनी देखील कोणत्याही दहशतीला न घाबरता होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्हयांबाबत पोलीसांना माहिती द्यावी असे अवाहन करण्यात येत आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास अजित जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे, फरासखाना हे करीत आहेत. पुणे शहरामध्ये असे आरोपी, त्यांची टोळी व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांविरुध्द जोपर्यंत अश्या टोळयांचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत अशीच कठोर कारवाई सुरू राहील.असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे- मद्य प्राशन करुन वाहन चालवणा-या २ तरुण चालकाना कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे अशी माहिती येथे वाहतूक पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी दिली
ते म्हणाले,’पुणे शहरातील खडकी वाहतूक विभागाकडुन रोहित शैलेंद्र वर्मा, वय २९ वर्षे, रा. विद्यानगर, लेन क्र. २, पिंपळे गुरव, पुणे याचेवर खटला क्र. ४९७९/२०२४ गोटार वाहन कायदा कलम १८४,१८५,३/१८१ SSC No. १५०३९५/२०२५ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता. दि. २२.०९.२०२५ रोजी न्यायाधीश एस. बी. पाटील साो, मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी सदर खटल्यामध्ये आरोपी रोहित शैलेंद्र वर्मा, वय २९ वर्षे, रा. विद्यानगर, लेन क्र. २, पिंपळे गुरव, पुणे यास १५ दिवसाची साधी कैद व १२,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरातील नांदेड सिटी वाहतूक विभागाकडुन आरोपी राजकुमार मंगिणी कुलाळ वय-३१ वर्षे रा. मंगलभैरव नांदेड सिटी पुणे याचेवर खटला क्र. ०१/२०२५ मोटार वाहन कायदा कलम १८४,१८५ SSC N०. १६५४३७/२०२५ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता. दि. २२.०९.२०२५ रोजी न्यायाधीश एस. बी. पाटील साो, मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी सदर खटल्यामध्ये आरोपी राजकुमार मंगिणी कुलाळ वय-३१ वर्षे रा. मंगलभैरव नांदेड सिटी पुणे यास १५ दिवसाची साधी कैद व १०,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस प्रॉसिक्यूटर वर्षाराणी जाधव तसेच पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोउनि विकास पाटील नेमणुक खटला विभाग यांनी खटल्याचे कामकाज केले आहे.
सन २०२० ते सन २०२५ मधील ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केसेस- सन २०२० एकुण २०१७, -सन. २०२१ एकुण ६९, -सन २०२२- एकुण ३७, -सन २०२३ एकुण ५६२, -सन २०२४- एकुण ५२९३. -आता सप्टेबर २०२५ पर्यंत एकुण ३९४८ केसेस करण्यात आलेल्या आहेत.
३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
पुणे, _ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना नुकतेच एक जीएसटी दर कमी करून मोठे गिफ्ट दिले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे आमूलाग्र बदल घडणार आहे. २८ टक्के जीएसटी काही ठिकाणी थेट पाच टक्के पर्यंत कमी केला आहे. गरिब आणि मध्यम नागरिकांचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान यांनी केला आहे. त्यामुळे काही कोटीचा महसूल कमी होईल याची जाणीव मला आहे पण नागरिकांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. नागरिकांनी आता स्वदेशी वस्तू वापर करण्यावर भर दिला पाहिजे. देशातील पैसा परदेशात न जाता देशातच राहिला पाहिजे.२०४७ चा विकसित भारत त्यातून निर्माण होईल. यापुढे “स्वदेशी” हाच मूलमंत्र आपला सर्वांचा राहील आणि तोच आपला धर्म आहे असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ३१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाले. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी उपमहापौर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल यांनी मान्यवरांचे स्वागत केले . मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, राधा सागर, स्मिता तांबे, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी सहकारनगर, शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.४१ मि. या शुभमुहूर्तावर विधिवत घटस्थापना करण्यात आली. या मंदिराच्या प्रांगणात यंदा मदुराई येथील ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा साकारला आहे त्याचे लोकार्पण देखील मंत्री बावनकुळे यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यात भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन शिक्षण व संस्कार यासाठी अविरत काम करणारे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने डॉ. पराग काळकर (प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सामजिक कार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना गौरविण्यात आले. याशिवाय डॉ. मयूर कर्डिले आणि डॉ. अरविंद खोमणे यांनाही विशेष सन्मानित केले गेले.
बावनकुळे म्हणाले, अनेक वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव यशस्वीपणे आबा बागुल आणि जयश्री बागुल राबवत आहे. या धार्मिक कामाला पुढे नेण्याचा योग त्यांना आला आहे. मी नागपूर मध्ये ३५ वर्ष महालक्ष्मी देवीचा महोत्सव मध्ये कार्यरत असून प्रथमच नागपूर सोडून याकाळात पुण्यात आलो. आबा बागुल यांनी ज्याप्रकारे आपले जीवन समर्पित केले आहे ते प्रेरणादायी आहे. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात.जीवनात कोणी व्यक्ती परीपूर्ण नाही,प्रत्येकजण अनुभव मधून शिकत असतो. प्रत्येकाला परमेश्वर याने एक विशेष गुण दिला त्याचा आविष्कार आपण करत असतो. त्यामुळे एकमेकाकडून आपण अनुभवातून शिकत असतो. मनुष्याच्या जीवनात पत,प्रतिष्ठा, पैसा कधी मागे उरत नाही तर आपल्या जीवनातील काम महत्त्वपूर्ण ठरते. याठिकाणी ज्याप्रकारे नवरात्र उत्सव साजरा होत आहे तो आगामी काळात अधिक समृद्ध व्हावा. जीवनात देव, देश, धर्म यासाठी काम केले तर देश खऱ्या अर्थाने विकसित होईल. वैभवशाली विविध धार्मिक परंपरा भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरली आहे. पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सरकार पुण्यावर विशेष लक्ष्य ठेवून आहे. मुख्यमंत्री सातत्याने पुण्यात कामानिमित्ताने येत असतात. त्यांनी सन २०२९, २०३५ आणि २०४७ मधील विकसित पुण्याचे दीर्घकालीन नियोजन केले आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक चांगले शहर पुणे होईल आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होतील असे काम सध्या सुरू आहे. पुणे मध्ये आमचे विविध नेते एकत्रित काम करत आहे. पुणे बाबत आतापर्यंत जी संकल्पना देखील केली नसेल त्यापेक्षा अधिक चांगलं काम आगामी काळात होईल.
आबा बागुल म्हणाले, पुणे नवरात्र महोत्सव मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष न पाहता आज महोत्सव मध्ये आले त्यांचे मी स्वागत करतो. बावनकुळे यांचे कार्य मोठे आहे अनेक वर्ष ते विविध काम करत आहे. धोरणात्मक निर्णय ते तातडीने मार्गी लावतात. पुण्यात वाहतूक समस्या असून त्याबाबत माझे मायक्रोप्लॅनिंग आहे त्याबाबत विचार व्हावा. मनपा मध्ये जकात बंद झाल्यावर जीएसटी आले आणि बजेट दहा हजार कोटी आणि सहा हजार कोटी जमा होत नाही अशी स्थिती आहे. एकदा ठराविक कर सर्व मनपा यांचा जमा करून त्याआधारे व्याज वापर करून विकासकामे केली जावी आणि कर्मचारी यांचा सुयोग्य वापर करावा.
उद्घाटन सोहळा दरवर्षी प्रमाणे भव्य आणि नेत्रदीपक करण्यात आला. यामध्ये सितार, व्हायोलिन, बासरी व तबला यांची जुगलबंदी असणारा ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर आणि माधवी करंदीकर व ग्रुप यांनी सादर केला. नृत्यगुरु पं. शमा भाटे व सहकारी ‘शरण्ये रुद्र चंडिके’ कथ्थक हा कार्यक्रम सादर केला. विनोद धोकटे, स्वाती धोकटे व सहकलाकार ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ हा कार्यक्रम सादर केला. उद्घाटन सोहळ्याचा आकर्षण ठरणारा मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, राधा सागर, स्मिता तांबे, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर घनश्याम सावंत यांनी आभार व्यक्त केले.