Home Blog Page 306

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव संपन्न

पुणे, दि. १७ नोव्हेंबर: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२ वा. वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडला.
इंद्रायणीत  वारकर्‍यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गरज केला. यावेळी विश्वरूप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्‍यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड,  हभप तुळशीराम दा कराड,  डॉ. उमेश नागरे, माइर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
या सप्ताहात हभप अर्जुन महाराज लाड, हरिहर महाराज दिवेगावकर, उद्धव महाराज मंडलिक, यशोधन महाराज साखरे, चिन्मय महाराज सातारकर या सारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरुपी सेवा सादर केली.
 तसेच प्रा. सुशांत दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, पंडित रघुनाथ खंडाळकर, सुरंजन व शुभम खंडाळकर, गायत्री गुल्याने,  कार्तिकी व सुपुत्र कौस्तुभ कैवल्य गायकवाड, पुनम ताई नळकांडे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी विश्वशांती दर्शन हा अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
हभप बापूसाहेब मोरे देहूकर म्हणाले,”सृष्टीवर संताच्या वचनामुळे मानवाचे कल्याण होते. संत हे वात्सल्य मूर्ती  असून त्यांची महिमा शब्दात सांगता येत नाही. संत दुसर्‍यांचे दुःख सावरण्यास पुढे येऊन त्यांना सुख व शांतीचा मार्ग दाखवतात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी सेवा रूजू केली. पुढील वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम व विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. रामेश्वर येथे विश्वधर्मी मानवता तीर्थभवनाची निर्मिती करून संपूर्ण जगात संत ज्ञानेश्वर माऊली आणि शांतीचा संदेश पोचविला जाईल. पवित्र तीर्थ क्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञान तीर्थ क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतानी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

२ लाखांहून अधिक मुलांना जोडणारी क्रीडा चळवळ

यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप इंडिया
भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्रीडा उपक्रमांपैकी एक विविधता आणि सर्जनशीलतेचा उत्सव नोव्हेंबर १ पासून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे १३ प्रादेशिक व बँड सिटी फायनल्स

पुणे-
दुसऱ्या हंगामातच, देशभरातील २,५०० पेक्षा जास्त शाळांमधील २ लाखांहून अधिक मुले यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप २०२५ मध्ये सहभागी झाली आहेत त्यामुळे हा भारतातील सर्वात मोठा खासगी पातळीवरील क्रीडा उपक्रम ठरला आहे.
हा उपक्रम सर्वसमावेशकता आणि सर्जनशीलता प्रोत्साहित करतो, ज्यामध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील मुले सहभागी होतात. अनेक शाळांनी त्यांच्या स्पर्धा शाळेच्या प्रांगणात, समुद्रकिनारी किंवा बंद रस्त्यावर आयोजित करून कल्पकतेचे उदाहरण दाखवले आहे.
१ नोव्हेंबरपासून १३ प्रादेशिक व ग्रँड सिटी फायनल्स मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे पार पडतील, ज्यात देशातील सर्वात आशादायी तरुण खेळाडू आपली कामगिरी दाखवतील.
भारताचा क्रीड़ा भविष्य घडवणारी चळवळ
फक्त दुसऱ्या वर्षातच यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप इंडिया हा देशातील सर्वाधिक प्रभावी आणि समावेशक उपक्रम बनला आहे. २,५०० हून अधिक शाळा आणि २ लाखांहून अधिक विद्यार्थी या उपक्रमाचा भाग आहेत, ज्यामुळे समाजातील सर्व स्तरातील मुले एकत्र येत आहेत.
शहरी शाळांपासून ते दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यत प्रत्येक मुलाला खेळण्याची, स्पर्धा करण्याची आणि वाढण्याची संधी मिळते. अनेक शाळा सर्जनशील पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात समुद्रकिनारी, शाळेच्या मैदानात किंवा बंद रस्त्यांवर हे दाखवून की क्रीडेब‌द्दलची आवड असली की मोठी सोय लागत नाही, फक्त इच्छाशक्ती लागते.
डॅनिएल शेन्कर, डीएसपॉवरपार्ट्सचे सीईओ आणि उपक्रमाचे सह-संस्थापक म्हणतातः “यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप भारताच्या क्रीडा भविष्याला आकार देणारे एक सामर्थ्यवान साधन बनले आहे.

फक्त दोन वर्षांत २ लाख मुले यात सहभागी झाली आहेत दहा वर्षांनी ही संख्या किती प्रेरणादायी असेल, याची कल्पना करा! या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सक्रियता वाढेल आणि भविष्यातील भारताचे क्रीडाचॅम्पियन तयार होतील.”
नीरज चोप्रा यांचा अभिमान पुढच्या पिढीसाठी प्रेरणा
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, जो यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कपचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, म्हणतोः “इतक्या मुलांना अॅथलेटिक्सचा आनंद घेताना पाहणे खूप छान वाटते. मला या उपक्रमात सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला, त्याच्या पार्श्वभूमीशी काहीही घेणेदेणे नसले तरी. खेळात सहभागी होण्याची, स्वतःला आव्हान देण्याची आणि मोठे स्वप्न पाहण्याची संधी मिळते. हे अनुभव त्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्य बदलू शकतात.”
चार शहरांत १३ फायनल्स नोव्हेंबर १ पासून सुरुवात
१ नोव्हेंबर ते १७ जानेवारी दरम्यान मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे एकूण १३ फायनल्स आयोजित केल्या जातील. या स्पर्धांमध्ये शेकडो शाळांमधील उत्कृष्ट खेळाडू व्यावसायिक वातावरणात स्पर्धा करतील प्रयत्न, प्रतिभा आणि हालचालीचा उत्सव साजरा करतील.
मथियास शाके, यूबीएस इंडिया सर्व्हिस कंपनीचे प्रमुख म्हणतातः “हे फक्त पदक जिंकण्याबद्दल नाही – हा उपक्रम प्रत्येक मुलाच्या आयुष्याचा भाग म्हणून खेळाची संस्कृती विकसित करण्याबद्दल आहे. जेव्हा मुले अधिक सक्रिय, निरोगी आणि समाजाशी जोडलेली राहतात, तेव्हा आपण एक चांगले भविष्य घडवतो.”
भारतासाठी दृष्टी
बालकांमध्ये वाढत्या जीवनशैलीसंबंधी आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर, यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कपचे उ‌द्दिष्ट आहे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय पिढी घडवणे. हा उपक्रम केवळ सहभागापुरता मर्यादित नाही, तर दीर्घकालीन क्रीडा विकासाची पायाभरणी करतो जो भविष्यात भारताच्या ऑलिम्पिक प्रवासासाठी एक पाऊल ठरू शकतो.
पहिल्या हंगामात काही हजार मुलांपासून सुरु झालेली ही चळवळ आज देशभरातील समावेशकता, सर्जनशीलता आणि प्रेरणेची लाट बनली आहे आणि प्रवास आता फक्त सुरू झाला आहे.

यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप बद्दल
यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कपमध्ये स्प्रिंट, लांब उडी आणि बॉल थ्रो या मूलभूत अॅथलेटिक्स प्रकारांचा समावेश आहे. हा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण शारीरिक विकासाला, टीमवर्कला आणि क्रीडाभावनेला प्रोत्साहन देतो. वय ७ ते १५ वर्षे असलेल्या सर्व मुलांसाठी ही स्पर्धा खुली आहे आणि सहभाग पूर्णपणे मोफत आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.ubsathleticskidscup.com

मुळशीतील लक्झरी वेलनेस सेंटर, आत्मंतनमधील कंट्रोलिंग स्टेक इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) कडे..

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025: भारतातील सर्वात मोठी अगत्यशील कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसीएल) स्पर्श इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडमधील 51% हिस्सा खरेदी करण्यासाठी आज करारांवर स्वाक्षरी केली. पुण्याजवळील मुळशी येथील लक्झरी वेलनेस सेंटर ‘आत्मंतन ब्रँडची मालकी या कंपनीकडे आहे. या अधिग्रहणामुळे आयएचसीएलला आत्मंतन ब्रँडची मालकी तसेची त्याची प्रोप्रायटरी अशा दोन्ही गोष्टी मिळतील. ज्यामुळे त्याच्या संस्थापक प्रवर्तकांच्या सहकार्याने या वेलनेस प्लॅटफॉर्मचा विस्तार करणे शक्य होणार आहे.

या प्रसंगी आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत छटवाल म्हणाले, “वेलनेस टुरिझम मार्केट सध्या चांगलेच वाढते आहे. त्यात आरोग्य आणि आदरातिथ्य यांचे उत्तम समन्वयन दिसून येते. त्यातही पारंपरिक उपचार आणि उपचारपद्धतींच्या पलीकडे जाऊन पारंपरिक आणि आधुनिकता यांची सांगड अनुभवण्याची प्रवाशांची इच्छा आहे. ग्राहकांच्या या नवनवीन गरजा पूर्ण करून आयएचसीएल आत्मंतनसह प्रवाशांच्या संपूर्ण समाधानासाठी प्रयत्नशील आहे. त्याचा सर्वसमावेशक आणि अनोखा वेलनेस प्रस्तावत्याचे सिद्ध व्यवसाय मॉडेल आयएचसीएलच्या ब्रँडस्केपला निश्चितच  पूरक आहे.”

ते पुढे म्हणाले, “संस्थापक शर्मिली आणि निखिल कपूर यांच्यासोबतची ही भागीदारी आत्मंतनचे प्रोप्रायटरी प्रोग्रॅम आणि आमच्या पोर्टफोलिओसह जगभरातील निवडक ठिकाणी पर्यटकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयएचसीएलच्या दृष्टिकोनाची पूर्तता करते.”

“आयएचसीएलसोबतची ही भागीदारी जागतिक आरोग्य उद्योगातील एक महत्त्वाचा करार आहे. गेल्या काही वर्षांत एकात्मिक, विज्ञान-समर्थित कार्यक्रमांद्वारे कल्याणाची पुनर्परिभाषा करण्यासाठी आत्मंतन वचनबद्ध आहे, जे सर्वसमावेशक परिवर्तनावर लक्ष केंद्रित करतात. आयएचसीएलचे उत्तम आदरातिथ्य, कौशल्य आणि काळजी तसेच उत्कृष्टतेच्या सामायिक मूल्यांसह, आम्ही ताज इनरसर्कलच्या 1.3 कोटी ग्राहकांच्या आधारे आत्मंतनचे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहोत.” आत्मंतन वेलनेस सेंटरचे संस्थापक-संचालक श्री. निखिल कपूर म्हणाले.

“आत्मा म्हणजेच भावना, मन म्हणजेच माइंड; आणि तन म्हणजेच शरीर, यांच्यातील सुसंवाद म्हणजे उत्तम आरोग्य. या विश्वासातून आत्मंतनचा जन्म झाला. आयएचसीएलसोबत भागीदारीनंतरही ज्या विश्वासाने आमचे पाहुणे इथे विश्रांतीसाठी येतात तोच विश्वास जपत अधिक संपन्न अनुभवासह हे स्वप्न साकार करण्याची परवानगी आम्हाला मिळते. एकत्रितपणे, आम्ही येथील अनुभव अधिक सोपा, सुलभ ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तसेच लक्झरी आणि समग्र कल्याणात नवीन टप्पा गाठतो. आत्मंतनच्या प्रवासातील हा एक नवीन, रोमांचक अध्याय आहे.” आत्मंतन वेलनेस सेंटरच्या संस्थापक-संचालक श्रीमती शर्मिली कपूर.

पुण्याजवळील मुळशी येथे वसलेले आत्मंतन हे भारतातील आघाडीच्या एकात्मिक आरोग्य केंद्रांपैकी एक आहे. मुळशी तलाव आणि सह्याद्री टेकड्यांभोवतीच्या 36 एकरांवर पसरलेल्या या प्रमुख लक्झरी सेंटरमध्ये आयुर्वेदयोगभारतीय निसर्गोपचारफिजिओथेरपीपोषणसमुपदेशनप्रशिक्षण आणि तंदुरुस्तीवर आधारित अनेक उपयुक्त कार्यक्रम उपलब्ध आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले आत्मंतन हे 2015 मध्ये लाँच झाल्यापासूनसध्याच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या त्रासांवरील उपचारांद्वारे समग्र कल्याणतणाव व्यवस्थापनडिटॉक्सिफिकेशनवजन कमी करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसाठी एक प्रमुख ठिकाण ठरले आहे. गोल्ड लीड-प्रमाणित प्रकल्प असलेल्या आत्मंतनचे शाश्वत पद्धतींद्वारे नैसर्गिक परिसराशी सुसंगत राहण्याचे उद्दिष्ट आहे. उत्तम वास्तुकला आणि भारतातील सर्वात मोठ्या सौर गरम पाण्याच्या स्थापनेपासून ते पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्याच्या वापरापर्यंतप्रत्येक घटक पर्यावरणीय व्यवस्थापनाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

एक्सेलसॉफ्ट टेक्नोलॉजीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 19 नोव्हेंबर पासून

0

·         एक्सेलसॉफ्ट टेक्नोलॉजीज लिमिटेड (“Company”) च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 114  रुपये  ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120  रुपये (“इक्विटी शेअर्स”) पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. 

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 आहे

·         बोली/ऑफर बुधवार 19 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि बोली/ऑफर शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025रोजी बंद होईल.

·         बोली किमान 125 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 125 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         11 नोव्हेंबर 2025 रोजीची रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) लिंक:

https://www.anandrathiib.com/pdf/documents/Excelsoft-Technologies-Limited-RHP.pdf

पुणे–एक्सेलसॉफ्ट टेक्नोलॉजीज लिमिटेड (Company) प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठी (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“Offer”) बुधवार 19 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू करत आहे. प्रमुख  गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025रोजी बंद होईल.  

प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 114  रुपये  ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 125 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 125 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. 

प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये 1,800  दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि पेदांता टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (विक्री समभागधारक) यांच्याद्वारे 3,200 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE“) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

 आनंद राठीॲडव्हायर्स लिमिटेड हे या ऑफरचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (“BRLM”) आहेत.

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने विश्वसनीय हायब्रिड मल्टी अॅसेट अलोकेशन फंड लाँच केला

0

वैविध्य आणि महागाईविरोधी संरक्षणासाठी सोनं आणि चांदीसारख्या धातूंचे, संभाव्य स्थिरतेसाठी निश्चित उत्पन्नाचे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी इक्विटीचे एकत्रीकरण करत

फंडातर्फे एका सक्रिय ॲलोकेशन चौकटीचा अवलंब

मुंबई: पँटोमाथ फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुप अंतर्गत भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या एएमसींपैकी एक द वेल्थ कंपनी अ‍ॅसेट मॅनेजमेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे  ‘द वेल्थ कंपनी मल्टी अ‍ॅसेट अलोकेशन फंड’ सादर करण्यात येत आहे. हा ट्रू-टू-लेबल हायब्रिड, कमॉडिटी-अ‍ॅकर केलेला मल्टी-अ‍ॅसेट फंड इक्विटी, डेब्ट आणि कमॉडिटीज यांचे सक्रिय संतुलन राखेल. त्यामुळे हा फंड बाजारातील विविध चक्रांमध्ये लवचिक आणि चांगले वैविध्य राखलेले पोर्टफोलिओ तयार करत गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीस मदत करतो. न्यू फंड ऑफर (एनएफओ) 19 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि 3 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.हा फंड वैविध्य आणि महागाईविरोधी संरक्षणासाठी विविधीकरण आणि सोनं आणि चांदीसारख्या धातूंचे, संभाव्य स्थिरतेसाठी निश्चित उत्पन्नाचे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी इक्विटीचे मिश्रण करत एक सक्रिय अलोकेशन चौकटीचा अवलंब करतो. प्रत्येक अ‍ॅसेट क्लास वाढ, संभाव्य स्थिरता आणि जोखीम समायोजित परतावा निर्माण करण्यामध्ये स्वतंत्र भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

या फंडाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याची हायब्रिड रचना. ती अ‍ॅसेट क्लासेसमध्ये गतिमान हालचाल करण्यासाठी व्यापक लवचिकता प्रदान करते आणि अनुकूल कर संरचनेचा लाभ देते. द वेल्थ कंपनी मल्टी अ‍ॅसेट अलोकेशन फंड त्याचे अ‍ॅसेट मिक्स इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट अंतर्गत हायब्रिड टॅक्सेशनच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने राखण्याचा प्रयत्न करतो.

कमॉडिटीजमध्ये 50% पर्यंत गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यामुळे हा फंड मॅनेजर्सना बदलत्या मॅक्रो आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार पोझिशनिंग समायोजित करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य सादर करतो. त्यामुळे पोर्टफोलिओ पर्यायी अ‍ॅसेट्सचा फक्त शिल्लक धारक न राहता चक्रांमधील संधी पकडण्यासाठी आणि कालांतराने अधिक सुलभ जोखीम-समायोजित परतावा देण्यासाठी डिझाइन केलेला एक सक्रिय, दूरदृष्टी असलेला अलोकेटर ठरतो.एनएफओच्या सादरीकरणाबाबत सविस्तर सांगताना द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या इक्विटीच्या सीआयओ सुश्री. अपर्णा शंकर म्हणाल्या, “वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड मध्ये अ‍ॅसेट अलोकेशन हा दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि संरक्षणाचा आधारस्तंभ आहे अशी आमची धारणा आहे. भारतीय म्हणून आपण नेहमीच स्वाभाविक बचत करणारे आहोत. आपल्या लॉकरमध्ये सोनं, कुटुंबात जमीन असते. आमचा मल्टी-अलोकेशन फंड याच कालातीत अ‍ॅसेट्समध्ये गुंतवणूक करतो. त्यात इक्विटी आणि डेब्टचा समावेश आहे आणि आता व्यावसायिक रिअल इस्टेटद्वारे अधिक सक्षम केले गेले आहे. त्याचा उद्देश आधुनिक लिक्विडिटी म्हणजेच तरलतेसह स्थिर परतावा देणे आहे. आधुनिकता आणि सुलभता यांनी नव्याने कल्पना केलेले हे पारंपरिक संतुलन आहे.”

त्यात भर घालत द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड डेब्टचे सीआयओ श्री. उमेश शर्मा म्हणाले,
“कमॉडिटीजना इक्विटी आणि डेब्टसह योग्य स्थान देऊन आम्ही केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात काम करणारे वैविध्य निर्माण करत आहोत. फंडच्या मँडेटमधील अ‍ॅसेट अलोकेशन लवचिकता आम्हाला डेब्टच्या संभाव्य स्थिरतेचा, कमॉडिटीजचा जोखीमविरोधी संरक्षणात्मक गुणधर्म आणि इक्विटीच्या दीर्घकालीन वाढीचा लाभ अधिक चांगल्या जोखीम-समायोजित परिणामांसह घेण्याची संधी देते. विविध चक्रांमध्ये सक्रियतेसह कार्यक्षम राहतील अशा पोर्टफोलिओंची रचना करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

एकत्रितपणे, ते “भारताची उभारणी करणारे सातत्य” असे एएमसी ज्या गोष्टीला म्हणतात त्याचे प्रतिनिधित्व करतात. भारताच्या पुढील वाढीचा टप्पा बाजार आणि नाविन्यपूर्णता याद्वारे वास्तविक अ‍ॅसेट्स आणि उत्पादनक्षमतेने प्रेरित असेल असे यातून अधोरेखित होते.

 माहे जहाज भारतीय नौदलामध्ये सामील होणार

0

मुंबई- नौदल गोदीमध्ये येत्या 24 नोव्हेंबर 2025 रोजी  माहे श्रेणीतील (अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट-) उथळ पाण्यातले पाणबुडीरोधी जहाज(एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) माहे हे पहिले स्वदेशी पाणबुडीरोधक जहाज नौदलात सामील केले जाणार आहे.  याद्वारे भारतीय नौदल आपल्या स्वदेशी जहाजबांधणी प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठणार आहे.

 कोची स्थित, कोचिन शिपयार्ड लि. ने तयार केलेले  माहे, नौदलाच्या जहाज आरेखन आणि निर्मितीतील भारताच्या अत्याधुनिक आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे प्रतिनिधित्व करते. आकाराने लहान तरीही शक्तिशाली असणारे हे जहाज, समुद्रकिनाऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक असलेल्या चपळता, अचूकता आणि सहनशीलता या गुणांचे प्रतीक आहे.

मारक क्षमता, गुप्तता आणि गतीशीलता यांच्या एकत्रीकरणातून, पाणबुड्यांच्या शोधासाठी, किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी आणि भारताच्या महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या जहाजाची रचना करण्यात आली आहे.

80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यात केला आहे. माहे युद्धनौकेची रचना, बांधकाम आणि एकात्मता यांमधील भारताच्या वाढत्या  प्रभुत्वाची साक्ष देते. मालाबार तटावर स्थित ऐतिहासिक किनारी शहर माहेच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. या जहाजाच्या शिखरावर ‘उरूमी’ या कलरीपयट्टूमध्ये वापरण्यात येणाऱ्या, चपळता, अचूकता आणि प्राणघातक या गुणांचे प्रतीक असलेली तलवार कोरण्यात आली आहे.

माहे चे जलावतरण, हे आकर्षक, वेगवान आणि दृढनिश्चयी भारतीयाचे उथळ पाण्यातील लढाऊ भारतीय विमानांच्या नव्या पिढीच्या आगमानाचे प्रतीक ठरेल.

एआय कधीही मानवी मेंदूची जागा घेऊ शकत नाही, पत्रकाराला मार्गदर्शित करणारी निर्णयक्षमता, सद्सद्विवेकबुद्धी आणि जबाबदारीची भावना अपरिवर्तनीय आहे: पीसीआय

0

नवी दिल्ली

लोकशाही देशातील नागरिकांसाठी प्रसारमाध्यमे ही डोळे आणि कान असतात. राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा करत असताना, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या( एआय) युगातील वाढत्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर  प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता जपणे हे नागरिकांना सशक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आज आयोजित कार्यक्रमात सहभागी प्रतिनिधींनी ही भावना व्यक्त केली. वाढत्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर  प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता सुरक्षित ठेवणे या यंदाच्या विषयाची भूमिका मांडताना पीसीआयच्या अध्यक्षा न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना  प्रकाश देसाई म्हणाल्या, “एआय कधीही मानवी मेंदूची जागा घेऊ शकत नाही.” निर्णयक्षमता, सद्सद्विवेकबुद्धी आणि जबाबदारीची भावना, जी प्रत्येक पत्रकाराला मार्गदर्शित करते, तिनेच चुकीची माहिती पसरण्यापासून रोखले पाहिजे.

आपल्या मुख्य भाषणात पीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जोशी यांनी आज समाजाला भेडसावत असलेल्या माहितीच्या महामारीला तोंड देण्यासाठी उपाय सुचवला. ते म्हणाले, “पारंपरिक माध्यमांमध्ये वेगापेक्षा अचूकतेला प्राधान्य द्या आणि डिजिटल माध्यमांतील एआय आधारित गणितीय पद्धतीपेक्षा विश्वसनीयतेला स्थान द्या.” कार्यक्रमाला केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. तसेच माहिती व प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव  संजय जाजू आणि पत्रकार परिषद सचिव शुभा गुप्ता यांचीही उपस्थिती होती.

पीसीआयकडून जबाबदार पत्रकारितेचे आवाहन

न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि उच्च दर्जाच्या पत्रकारितेचे पालन ही पीसीआयची दुहेरी जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, विशेषतः आजच्या काळात, जेव्हा चुकीची माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढत आहे, तेव्हा पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, अचूकता आणि योग्य माहिती देण्याची बांधिलकी अत्यावश्यक आहे.

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआयने) समित्या आणि तथ्य शोध पथके तयार केली असल्याचं त्यांनी नमूद केले तसेच पत्रकारांना जबाबदार वर्तणुकीची आणि आणि प्रत्येक वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे स्मरण करून दिले. त्यांनी, कल्याणकारी योजना आणि विमा यांद्वारे पत्रकारांच्या आर्थिक सुरक्षेचे महत्त्वही अधोरेखित केले आणि पीसीआयच्या अंतर्वासिता कार्यक्रमामुळे तरुण पत्रकारांना नैतिक कार्यपद्धती शिकण्यास मदत होईल असेही सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरू शकते मात्र पीसीआय, त्याचा दुरूपयोग रोखण्यासाठी सतर्क असते. साधने कितीही प्रगत झाली तरीही, मानवी मन- निर्णयक्षमता आणि विवेक यांची जागा ते कधीच घेऊ शकत नाहीत, यावर त्यांनी भर दिला.

एआयच्या जगात विश्वासार्हता टिकवून ठेवणे

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जोशी म्हणाले की, माध्यमांनी, लोकशाहीचे नैतिक रक्षक म्हणून भक्कम नैतिकता बाळगली पाहिजे. पैसे देऊन बातम्या छापणे, जाहिरात आणि पीत पत्रकारिता यांमुळे सार्वजनिक विश्वासार्हतेला धक्का पोहोचल्याचा इशारा त्यांनी दिला.

पत्रकारांनी देखील सत्यता पडताळून पाहण्याची सामाईक जबाबदारी पेलली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.  पीटीआयच्या स्थापनेपासून जपलेली सत्य, अचूकता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य यांची परंपरा, 99 वर्तमानपत्रांनी अधोरेखित केली असल्याचे ते म्हणाले. गतीपेक्षा अचूकता नेहमीच आघाडीवर असली पाहिजे आणि कोणत्याही विशिष्ट हेतूंपासून बातम्या मुक्त असल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.

तथ्य पडताळणी -फॅक्ट चेक सारख्या पुढाकारांमुळे, बहुस्तरीय पडताळणीमुळे चुकीच्या माहितीच्या पुराचा सामना करण्यास मदत होते. विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी भविष्यातील पत्रकारांना नैतिकता आणि चिकित्सक विचारसरणीचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. माध्यम स्वातंत्र म्हणजे माहितीची परिसंस्था प्रदुषित करण्याचा परवाना नाही आणि पत्रकारिता ही विश्वासावर आधारित सार्वजनिक सेवा असल्याची आठवण जोशी यांनी करून दिली.

सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू:प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

0

रियाध:
हैदराबादमधील प्रवाशांना मक्काहून मदीनाला घेऊन जाणाऱ्या बसला सोमवारी सौदी अरेबियात अपघात झाला, ज्यामध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २० महिला आणि ११ मुले होती.
स्थानिक माध्यमांनुसार, बस एका डिझेल टँकरला धडकली, ज्यामुळे बसने पेट घेतला. प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की सर्व मृत भारतीय होते. बहुतेक प्रवासी हैदराबादचे होते आणि उमरा करण्यासाठी जात होते.

मदिनापासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुहरासजवळ भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी अनेक प्रवासी झोपेत होते, त्यामुळे बसने धडक दिल्यानंतर आग लागल्याने त्यांना वाचण्याची शक्यता नव्हती.

तेलंगणा सरकारने या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की ते रियाधमधील भारतीय दूतावासाशी सतत संपर्कात आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांना पीडितांची ओळख पटविण्यासाठी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दूतावासाशी जवळून समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
जेद्दाह येथील भारतीय दूतावासाने एक हेल्पलाइन जारी केली आहे. “सौदी अरेबियातील मदीनाजवळ भारतीय उमराह यात्रेकरूंना झालेल्या दुःखद बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हेल्पलाइनचे संपर्क क्रमांक 8002440003 आहेत,” असे दूतावासाने म्हटले आहे.

या घटनेनंतर, तेलंगणा सरकारने कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांबद्दल माहिती मिळावी यासाठी सचिवालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला. कुटुंबातील सदस्य खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात: 79979-59754 आणि 99129-19545.

शाहरुख खानच्या नावावर दुबईत ५६ मजली टॉवर,हेलिपॅड,स्विमिंग पूलने असेल सज्ज

0

मुंबई-मुंबईत एका कार्यक्रमात शाहरुख खानच्या नावावर असलेली पहिली मालमत्ता लाँच करण्यात आली. हे दुबईतील एक टॉवर आहे. ५६ मजली इमारतीत सुमारे ४,५०,००० चौरस फूट प्रीमियम ऑफिस स्पेस आहे.शाहरुखच्या नावाने बांधल्या जाणाऱ्या या टॉवरमध्ये हेलिपॅड आणि स्विमिंग पूलसारख्या सुविधा असतील. हा प्रकल्प तीन ते चार वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रवेशद्वारावर शाहरुख खानचा पुतळा देखील बसवला जाईल, ज्यामुळे लोक फोटो काढू शकतील.

दरम्यान, कार्यक्रमादरम्यान, शाहरुख खान त्याच्या आईची आठवण करून भावुक झाला. अभिनेता म्हणाला, “जर आज माझी आई जिवंत असती तर ती खूप आनंदी असती. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. जेव्हा माझी मुले येतील तेव्हा मी त्यांना सांगेन की त्यावर बाबांचे नाव लिहिलेले आहे; ही बाबांची इमारत आहे.”

कार्यक्रमात मनोरंजनाचीही भर होती. शाहरुख खानने त्याच्या खास शैलीत पाहुण्यांचे मनोरंजन केले, त्याच्या ओम शांती ओम आणि डॉन चित्रपटांमधील प्रतिष्ठित क्षण पुन्हा सादर केले. फराह खान देखील या कार्यक्रमात उपस्थित होती.कार्यक्रमात शाहरुखने विनोदाने म्हटले की तो ईदचा चांद बनला आहे. तो क्वचितच दिसतो, पण जेव्हा तो असतो तेव्हा छान वाटते.तो पुढे म्हणाला, “चित्रपटांव्यतिरिक्त माझ्या नावावर काहीही असणे मला महत्त्वाचे वाटत नाही. चित्रपट हे माझ्या व्यवसायाचा आणि उपासनेचा एक भाग आहेत.”

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्याअध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड,स्वागताध्यक्षपदी गौरव कोलते

0

दशऱथ यादव यांची माहिती

सासवड : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची तर स्वागताध्यक्ष पदी गौरव कोलते यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती संमेलनांचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाला प्रमुख पाहूणे म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आदी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाध्यक्ष प्रशांत देशमुख हे शिव व्याख्याते असून त्यांनी शेकडो व्याख्यानातून समाजाचे प्रबोधन केले आहे. गुड मॉर्निंग, जय शिवराय या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. श्री गौरव कोलते हे गेली पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे संचालक आहे . प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात ते काम करीत आहेत. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला मराठा महासंघ पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय
सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल भोसले, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे, जगदीप वनशिव आदी उपस्थित होते.
या संमेलनात राज्यभऱातूनदरवर्षी मोठ्या संख्येने लेखक, कवी, कलावंत सहभागी होतात. सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.

‘कृष्ण वंदना’ – भक्तीमय संध्या 23 नोव्हेंबर ला

0

पुणे-‘कृष्ण वंदना’ – भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांना आणि त्यांच्या दिव्य गुणांना समर्पित
भक्तीमय संध्या – अभिनेत्री व आध्यात्मिक गायिका मुग्धा वीरा गोडसे पुण्यात सादर करत
आहेत. ही विशेष कीर्तन-संध्या प्रथमच पुण्यात 23 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी ५.३० ते
८ वाजेपर्यंत, कालाग्राम, पी. एल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड येथे आयोजित केली आहे.
‘कृष्ण वंदना’ हे मुग्धांचे पहिले भक्तिगीत असून त्याची रचना त्यांच्या पूज्य गुरु श्री ‘तर्नेव’ जी
यांच्या कृपेने झाली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांवर आणि गुणांवर आधारित हे
मौलिक गीत आता सर्व प्रमुख संगीत मंचांवर उपलब्ध आहे.


संध्येची सुरुवात दिव्य मंत्रोच्चारणाने – ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ – होणार असून त्यानंतर
‘कृष्ण वंदना’चे सादरीकरण केले जाईल. अवीरास आणि समूह आपल्या मधुर भजनांनी व
कीर्तनांनी भक्तिमय वातावरण निर्मिती करतील. तसेच प्रख्यात वंशीवादक पं. रवीशंकर मिश्र
सुंदर रागांनी संध्येला आणखी सुमधुर स्पर्श देतील.
कार्यक्रमादरम्यान ‘कृष्ण वंदना’ या पुस्तकाचीही प्रेक्षकांना भेट दिली जाईल. हे पुस्तक
मुग्धांच्या आध्यात्मिक अनुभवांवर आधारित असून राहुल देव यांनी सह-लेखन केले आहे. हे
ग्रंथ त्यांच्या करुणामय गुरु श्री तर्नेव जी यांना समर्पित आहे.
या पवित्र संध्येस प्रवेश विनामूल्य आहे आणि कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात येईल.

‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन’ या विषयावर तीन दिवस होणार विचारमंथन

कनेक्टिंग ट्रस्टतर्फे नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन’ या विषयावर सलग तीन दिवस विचारमंथन होणार आहे. ही परिषद पुण्यातील हॉटेल तरवडे क्लार्क्स इन, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या सँडी अर्नाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ट्रस्टचे सल्लागार मंडळ सदस्य वीरेन राजपूत व अमीना अजाने, प्रशिक्षक डॉ. आदिती आर., स्वयंसेवक दीपाली वीरमालवार व लॉरेन डेव्हिड आदी उपस्थित होते.

सँडी अर्नाडे म्हणाल्या, “आत्महत्या प्रतिबंधासाठी खुला संवाद, सामायिक अंतर्दृष्टी आणि सामूहिक कृती यांवर परिषदेत लक्ष केंद्रित केले जाईल. आत्महत्यांचे प्रमाण का वाढत आहे आणि कोणते उपाय प्रभावी ठरत आहेत, अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. ही परिषद मानसिक आरोग्य व्यावसायिक, स्वयंसेवक, समाजसेवक, विद्यार्थी आणि संबंधित क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी उपयुक्त आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात मानसिक आरोग्य व्यावसायिक परिषदेतील मुख्य भाषणे, चर्चासत्र आणि कौशल्य-आधारित सत्रांमध्ये सहभागी होतील. हे तज्ज्ञ मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधापासून ते स्वानुभव, युवा, शिक्षण आणि समुदाय कार्यापर्यंत विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतील. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सध्याच्या कामातील सकारात्मक बाबी अधोरेखित होऊन सामूहिक कृतीसाठी नवीन शक्यतांचा शोध घेतला जाईल.”

“२८ नोव्हेंबर रोजी पूर्व-परिषद कार्यशाळा आयोजिली आहे. पहिला दिवस (२९ नोव्हेंबर) मुख्यत्वे आत्महत्या प्रतिबंधातील प्रमुख विषयांवर आधारित असेल. यामध्ये स्वानुभव आणि सामाजिक संदर्भांवर भर दिला जाईल. मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्हचे संचालक राज मारीवाला यांचे बीजभाषण होईल. त्यानंतर चर्चासत्रे, कौशल्य-निर्माण सत्रे आणि चिंतनात्मक बैठक याद्वारे विविध दृष्टिकोन आणि संवादांना चालना दिली जाईल. दुसरा दिवस (३० नोव्हेंबर) आत्महत्या प्रतिबंधातील कृती-आधारित मार्गांवर असेल. आत्महत्या प्रतिबंधाच्या कार्यात सक्रिय असलेल्या विस्कॉन्सिन विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. अरुणा झा यांचे बीजभाषण होईल. भविष्य-केंद्रित भाषणे, पुरावा-आधारित सादरीकरणे आणि कौशल्य-विकास सत्रे होतील,” असे दीपाली वीरमालवार यांनी नमूद केले.

कनेक्टिंग ट्रस्ट ही स्वयंसेवक-आधारित संस्था असून ती आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी काम करते. आत्महत्यांच्या वाढत्या दरावर प्रतिबंध आणण्यासाठी सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्ण समुदाय निर्माण करण्याच्या उद्देशाने ही संस्था विविध कार्यक्रम आणि सेवा चालवते. कनेक्टिंग ट्रस्टचे डिस्ट्रेस हेल्पलाईन क्रमांक ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ असे आहेत. ही सेवा रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य सुरू असते. distressmailsconnecting@gmail.com ईमेलद्वारेही संवाद साधता येतो. परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी https://www.suicidepreventionconference.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन वीरेन राजपूत यांनी केले.

नवले पूल परिसर दुर्घटना पीडित कुटुंबीयांची उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सांत्वनपर भेट

अपघातानंतर मृतांच्या ऐवजांची व कागदपत्रांची चोरी हे कृत्य हीन व संतापजनक – पोलीस आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करणार

दुर्घटनेच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वयाने तत्काळ कार्यवाहीची गरज

पुणे, दि. १६ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबीयांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांशी बोलताना एक गंभीर आणि धक्कादायक बाब उघड केली. अपघातानंतर मदत करत असल्याचे भासवून काही लोकांनी मृतांच्या आधार कार्ड, मोबाईल फोन,दागिने तसेच महत्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलीस आयुक्त यांना तातडीने तपास करणेबाबत कळविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीत त्यांनी स्थानिक अधिकार्‍यांना देखील उपस्थित राहण्याचे सांगितले होते, जेणेकरून नुकसानभरपाई, पुनर्वसन आणि शासकीय मदतीबाबत तत्काळ माहिती व दिशा मिळू शकेल. तरीही मानसिक धक्का मोठा असल्याने अशा दुर्घटनातील आर्थिक मदतीतून दुःख भरून निघणे शक्य नाही.त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना बाबत गंभीर होणे आता अत्यावश्यक झाले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केंद्र,राज्य व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याबाबत कळविले आहे.या निवेदनात त्यांनी नवले पुलावरील धोकादायक उतारात तातडीने बदल, पर्यायी वाहतुकीची सोय, कात्रज बोगद्यापासून न्यूट्रलवर उतरणाऱ्या वाहनचालकांसाठी विशेष जनजागृती, उतारावर वेग नियंत्रणाचे तांत्रिक उपाय तसेच जड वाहनांची तपासणी इत्यादी आवश्यक उपाययोजना करणेबाबत नमूद केले आहे . याशिवाय या स्थळी वारंवार घडणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी उपाय योजना सुचविणे व त्याच्या अंमलबजावणी कामी मुंबईत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.

“सरकारची मदत लवकरच मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. मात्र याचबरोबर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही तातडीची आर्थिक मदत स्वतः दिली आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या भेटीत पुणे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे आणि युवासेना प्रमुख सोमनाथ कुटे ,कार्यकर्ते लोकेश राठोड,हृतिक गलांडे व चेतन कोद्रे हे उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेंबरे यादेखील उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी मृत स्वाती नवलकर यांच्या पती संतोष नवलकर तसेच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मृत दत्ता दाभाडे यांच्या मुलगी कोमल दाभाडे यांनाही भेट देत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.

त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही कुटुंबीयांना देण्यात आली असून या प्रकरणात केंद्र सरकार,महाराष्ट्र शासन,स्थानिक प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा उपस्थित केली.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाला अजिंक्यपद

नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघ उपविजेता

पुणेदि. १६ नोव्हेंबर २०२५:  महावितरणच्या २०२५-२६ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी उपविजेता असलेल्या पुणे-बारामती संघाने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाने या स्पर्धेतील उपविजेतेपद मिळविले आहे. 

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा शनिवारी (दि. १५) सायंकाळी समारोप झाला. यावेळी महावितरणचे संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्याहस्ते अजिंक्यपदाचा करंडक पुणे-बारामती परिमंडल संघाकडून मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे व श्रीकृष्ण वायदंडे आणि सहकाऱ्यांनी स्वीकारला. तर उपविजेत्या नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाकडून मुख्य अभियंता सुहास रंगारी, दिलीप दोडके, हरीष गजबे व सहकाऱ्यांनी करंडक स्विकारला.

पारितोषिक वितरणच्या कार्यक्रमाला स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके, मुख्य अभियंता राजेश नाईक, महाव्यवस्थापक  राजेंद्र पांडे यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांना करंडक व सुवर्ण/रौप्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी केले तर अधीक्षक अभियंता सौ. दिपाली माडेलवार यांनी आभार मानले.

मेहनतीचे फळ मिळाले…

पुणे बारामती संघाला गतवर्षी सर्वसाधारण विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. यावर्षी ते मिळविण्यासाठी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी संघातील सहभागी खेळाडुंच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले. त्यांना सर्व सुविधा पुरविल्या. त्याची फलश्रुती विजेतेपदाने झाली.

सांघिक खेळांमध्ये पुणे-बारामती संघाला – कबड्डी- पुरुष मध्ये प्रथम व महिला संघास द्वितीय, खो-खो- पुरुष संघ प्रथम,  बॅडमिंटन – पुरुष व महिला संघ दोघेही प्रथम आले.

वैयक्तिक खेळांमध्ये – १०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (प्रथम), २०० मीटर धावणे– पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), ४०० मीटर धावणे- पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), १५०० मीटर धावणे- पुरुष गट –हर्षल बोंद्रे (प्रथम), महिला गट- संजना शेजल (प्रथम),  ४ बाय १०० रिले – पुरुष गट – प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, अक्षय केंगाळे, गुलाबसिंग वसावे (प्रथम), गोळा फेक – पुरुष गट –प्रवीण बोरावके (द्वितीय), लांब उडी – पुरुष गट – अक्षय कंगाळे (प्रथम), (अमरावती-अकोला), महिला गट – माया येळवंडे (द्वितीय), बुद्धिबळ – पुरुष गट –संजय देवकाते (द्वितीय),  कॅरम- पुरुष गट- संजय कांबळे (द्वितीय), टेनिक्वाईट– महिला दुहेरी – शीतल नाईक- कोमल सुरवसे (प्रथम),

कुस्ती- ६१ किलो- अश्विन मोरे (प्रथम),  ६५ किलो – राजकुमार काळे (प्रथम) ७९ किलो- अकिल मुजावर (द्वितीय), ९७ किलो- अमोल गवळी (प्रथम), १२५ किलो – प्रविण बोरावके (प्रथम), शरीरसौष्ठव – ९० किलो–कैलेश्वर सांगवे (द्वितीय), पॉवर लिफ्टिंग ७४ किलो – मनीष कोंड्रा (प्रथम), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भरत वसिष्ठ (प्रथम) पुरुष दुहेरी- भरत वसिष्ठ-पंकज पाठक (प्रथम) महिला एकेरी – अनिता कुलकर्णी (प्रथम) व वैष्णवी गांगरकर (द्वितीय), महिला दुहेरी- वैष्णवी गांगरकर-अनिता कुलकर्णी (द्वितीय)

पेट्रोल पंपावर दहशत माजविणा-या रेकॉर्डवरील आरोपींना २४ तासात केले जेरबंद

पुणे- पेट्रोल भरण्याचे किरकोळ वादातुन शस्त्रे चालवून एकाला जखमी करून हवेत शस्त्रे फिरवीत दहशत माजविणाऱ्या तीन तरुण सराईत आरोपींना पुणे पोलिसांनी २४ तासाच्या आत धुंडाळून अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१३/११/२०२५ रोजी सायंकाळी विलास पेट्रोल पंप, गुंजन चौक येथे पेट्रोल भरण्याचे किरकोळ वादातुन दाखल गुन्ह्यातील आरोपींनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांना त्यांचेकडील धारदार शस्त्राने वार करुन जखमी करुन पेट्रोल पंप परीसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत जर पोलीसात तक्रार देण्यासाठी गेला तर फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७६४/२०२५ भा.न्या.सं.क. ११८ (१), (३) (५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी हे येरवडा पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील असुन त्यांचेवर शरीराविरुध्द व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेची पोलीसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपींना शोधण्यासाठी पथक रवाना केले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल जाधव व मुकुंद कोकणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे कल्याणीनगर येथील नदीपात्रात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे सहप्रभारी श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार सोगे, जाधव, व कोकणे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन संशयित इसम पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) कृष्णा प्रभाकर नाईक, वय २५ वर्षे, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे २) अक्षय उर्फ आबा सुदाम जमदाडे, वय २५ वर्षे, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे ३) अली रफिक शेख वय २५ वर्षे रा. गांधीनगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास पोलीस अंमलदार तेजपाल जाधव हे करत आहेत..
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०४ सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशनअंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहप्रभारी श्रेणी पोलीस उप-निरी.. प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार शिदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल व गायकवाड यांनी केलेली आहे.