Home Blog Page 306

अंद्रोथ ही एकात्मिक पाणबुडीविरोधी युद्धनौका श्रेणीतील दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात होणार दाखल

0

अंद्रोथ भारताच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचे प्रतीक

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025

अंद्रोथ ही भारतीय नौदलाची दुसरी अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका 6 ऑक्टोबर 2025 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत (Naval Dockyard) नौदलात सामील होणार आहे. पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग इन चीफ, व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय नौदलात सामील होणार असलेल्या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील 16 युद्धनौकांपैकी हे दुसरे जहाज औपचारिकरित्या नौदलात सामील होणार आहे.

अंद्रोथ या युद्धनौकेची बांधणी कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने केली आहे. या जहाजासाठीचे 80% पेक्षा जास्त बांधकाम हे स्वदेशी घटकांसह झाले आहे. यातून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाची प्रचिती येते. तसेच हे जहाज भारताच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरले आहे. जहाज उत्पादन संचालनालय आणि कोलकात्याच्या युद्धनौका निरीक्षण पथकाच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेली अंद्रोथ ही युद्धनौका 13 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली होती.

अंद्रोथ हे नाव लक्षद्वीप द्वीपसमूहातील अंद्रोथ बेटावरून दिले गेले आहे. धोरणात्मक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या नावातून भारताच्या विशाल सागरी सीमांचे रक्षण करण्याच्या वचनबद्धता अधोरेखित होते.

यापूर्वी आयएनएस अंद्रोथ (P69) या नावाने कार्यरत असलेली युद्धनौका 27 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करून नौदलातून निवृत्त झाली होती. नवीन अंद्रोथच्या नौदलातील समावेशामुळे तिच्या आधीच्या युद्धनौकेचा वारसा आणि भावना कायम राखली जाणार आहे.

प्रगत शस्त्रे आणि संवेदक प्रणाली, आधुनिक दळणवळण यंत्रणा आणि वॉटरजेट प्रणोदनाने सुसज्ज असलेली अंद्रोथ ही युद्धनौका, पाण्याखालील धोके अचूकपणे शोधून काढण्याच्या, त्यांचा मागोवा घेण्याच्या आणि त्यांना निष्क्रिय करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. या युद्धनौकेच्या अत्याधुनिक क्षमतांमुळे सागरी पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्ये आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांसारखी विविध प्रकारची कार्ये पार पाडण्यासही ती सक्षम आहे.

अंद्रोथ ही युद्धनौका नौदलात दाखल होणे, हे भारताची सागरी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या युद्धनौकेमुळे नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता वाढण्यासोबतच, स्वदेशी प्रयत्नांतून जागतिक दर्जाच्या युद्धनौकांचे डिझाइन, विकास आणि बांधकाम करण्याच्या राष्ट्राच्या संकल्पालाही दुजोरा मिळाला आहे.

जुलै 2025 मध्ये ईपीएफओ सदस्यांच्या संख्येत 21.04 लाखांची भर; महाराष्ट्र आघाडीवर

0

ईपीएफओकडे 9.79 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

नवीन सदस्यांपैकी 60% हून अधिक जण 18 ते 25 वयोगटातील

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने जुलै 2025 ची प्राथमिक वेतनपट आकडेवारी जारी केली आहे, या महिन्यात संघटनेच्या सदस्यांची संख्या 21.04 लाखांनी वाढल्याचे दिसून आले आहे. या आकडेवारीच्या वर्ष-दर-वर्ष विश्लेषणानुसार, वेतनपटावरील कर्मचारी संख्या जुलै 2024 च्या तुलनेत 5.55% नी वाढल्याचे दिसून आले असून, ही वाढ नोकरीच्या वाढत्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलच्या वाढत्या सजगतेचे द्योतक असून ईपीएफओच्या प्रभावी आउटरीच उपक्रमांचीही त्याला मदत झाली आहे. वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात 20.47% योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे.

ईपीएफओच्या वेतनपट आकडेवारीची (जुलै 2025) ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणेः

नवीन सदस्य:

जुलै 2025 मध्ये ईपीएफओकडे सुमारे 9.79 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली. नवीन सदस्यांच्या संख्येतील या वाढीस नोकरीच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलची वाढलेली जागरूकता आणि ईपीएफओच्या आउटरीच कार्यक्रमांचे यश कारणीभूत असल्याचे म्हणता येईल .

नवीन सदस्यांमध्ये 18-25 वयोगटाचे अधिक्य:

18 ते 25 वयोगटातील सदस्यांचे सर्वाधिक प्रमाण हा डेटाचा एक उल्लेखनीय पैलू आहे. ईपीएफओकडे 18-25 वयोगटातील 5.98 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी झाली असून जुलै 2025 मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये त्यांचे प्रमाण 61.06% आहे.

याशिवाय, जुलै 2025 मध्ये वेतनपटात समाविष्ट झालेल्या 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची निव्वळ संख्या अंदाजे 9.13 लाख असून ती मागील वर्षाच्या म्हणजे जुलै 2024 च्या तुलनेत 4.09% नी वाढल्याचे आढळते. ही वाढ पूर्वीच्या ट्रेंडशी सुसंगत असून संघटित कार्यबलात सामील होत असलेल्या बहुतांश व्यक्ती तरुण असल्याचे आणि प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणाऱ्या असल्याचे सूचित होते.

पुन्हा सामील झालेले सदस्य:

यापूर्वी बाहेर पडलेले सुमारे 16.43 लाख सदस्यांनी जुलै 2025 मध्ये पुन्हा ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे. ही संख्या जुलै 2024 च्या तुलनेत 12.12% एवढी लक्षणीय वाढल्याचे दिसते. हे सदस्य नोकऱ्या बदलून ईपीएफओच्या कार्यकक्षेत समाविष्ट असलेल्या उपक्रमांमध्ये पुन्हा सामील झाले असून त्यांच्या नावे जमा झालेली रक्कम मिळण्यासाठी अर्ज करून खाते बंद करण्याऐवजी आपल्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार करून ती पुढे हस्तांतरित करण्याच्या पर्यायाची निवड करून आपली सामाजिक सुरक्षा आणखी वाढेल याची काळजी घेतली आहे.

महिला सदस्यांच्या संख्येत वाढ:

जुलै 2025 मध्ये सुमारे 2.80 लाख नवीन महिला सदस्यांनी ईपीएफओच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली. शिवाय, जुलै 2024 च्या तुलनेत वर्षभरात 0.17% वाढीसह महिन्याभरात वेतनपटावरील महिला सदस्यांची संख्या सुमारे 4.42 लाख झाली. नवीन सामील झालेल्या महिला सदस्यांच्या संख्येतील वाढीतून कार्यबलात अधिकाधिक समावेशकता आणि वैविध्यपूर्ण येत असल्याचे सूचित होते.

राज्यनिहाय योगदान:

वेतनपट आकडेवारीचे विश्लेषण केले असता प्रमुख पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा एकंदर वेतनपटात सुमारे 60.85% वाटा असल्याचे आढळले असून या राज्यांमधून महिन्याभरात सुमारे 12.80 लाख सदस्यांची भर पडली आहे. या राज्यांमध्ये, वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात 20.47% योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिन्याभरात वेतनपटात 5% हून अधिक नवीन सदस्यांची भर पडली.

उद्योगानिहाय ट्रेंड:

उद्योग-निहाय आकडेवारीची महिना-दर-महिना तुलना करता वेतनपटावरील सदस्य संख्येतील वाढीत उद्योग क्षेत्रातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसते उदा.

i. लोह खनिज खाणी

ii. विद्यापीठ

iii.विडी उद्योग

iv. तयार कपड्यांची निर्मिती

v. रुग्णालये

vi. इतर

vii. व्यापार – व्यावसायिक संस्था

viii. ट्रॅव्हल एजन्सीज

ix. छत-जमिनीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाच्या खाणी इ.

निव्वळ सदस्यांमधील एकूण वाढीत तज्ञ सेवांमधील व्यक्तींचे प्रमाण अंदाजे 40.21% आहे.

कर्मचाऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे, हे अखंडपणे चालणारे काम असल्याने डेटा तयार करणे, ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असते, त्यामुळे हा पेरोल डेटा तात्पुरता आहे. मागील डेटा दर महिन्याला यावर पुढील गोष्टींनुसार अद्ययावत केला जातो:

i.वेतन अहवाल तयार केल्यानंतर मागील महिन्यांचे ईसीआर दाखल केले जातात.

ii.वेतन अहवाल तयार केल्यानंतर पूर्वी दाखल झालेल्या ईसीआरमध्ये सुधारणा करण्यात येतात.

iii.मागील महिन्यांची बाहेर पडण्याची तारीख पेरोल अहवाल तयार केल्यानंतर नोंदविली जाते.

एप्रिल 2018 पासून, ईपीएफओ सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला वेतनपट डेटा जारी केला जात आहे. मासिक पेरोल डेटामध्ये, आधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे प्रथमच ईपीएफओ मध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या, ईपीएफओच्या कक्षेतून बाहेर पडलेले विद्यमान सदस्य आणि ज्यांनी बाहेर पडल्यानंतर पुन्हा सदस्य म्हणून नोंदणी केली आहे अशांना मासिक वेतनपटावरील सदस्य म्हणून विचारात घेतले जाते.

‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष उपक्रमाद्वारे विविध भाषांमध्ये जाणून घेता येणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना

पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आता संघ प्रार्थना विविध भाषांमध्ये नागरिकांना समजून घेता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाच्या विमोचनाचे.  दि. २७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे या प्रकल्पाचे औपचारिक प्रकाशन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती सिद्धार्थ शिरोळे व इंद्रानील चितळे यांनी कळविली आहे. युट्यूब आणि इतर माध्यमांद्वारे सदर संघ प्रार्थना नागरिकांपर्यंत पोहोचेल.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “संघ प्रार्थना ही लहानपणापासून कायमच मला प्रेरणा देत आली आहे. या प्रार्थनेचा अर्थ हा सार्वत्रिक असून त्यातून मिळणारी उर्जा माझ्यासाठी विशेष आहे. ही प्रार्थना विविध भाषिक नागरिकांपर्यंत पोहोचावी हा आमचा या प्रकल्पाच्या संकल्पनेमागील उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या ८ भाषांमध्ये प्रार्थनेच्या अर्थाचे निवेदन केले आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी हिंदी निवेदन असलेल्या संघ प्रार्थनेचे प्रकाशन करण्यात येईल व त्यानंतर पुढील काळात संघ प्रार्थनेचे इतर भाषांमधले निवेदन प्रकाशित करण्यात येईल.”  
 
चितळे समूह हा गेल्या काही पिढ्यांपासून व्यवसायात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देखील काही पिढ्यांपासून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान देत आहे, त्यामुळे हा समान दुवा लक्षात घेत आम्ही या प्रकल्पात सहभागी झालो.असे सांगत इंद्रनील चितळे म्हणाले, “संघाच्या विचारधारेला १०० वर्षे पूर्ण होत असताना संघ प्रार्थनेचा वैश्विक भाव जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या मागील पिढ्यांचे योगदान माहिती व्हावे हा या संकल्पनेच्या निर्मितीमागील उद्देश आहे.”
सामान्य नागरिकांपर्यंत संघाची प्रार्थना आणि त्याचा योग्य अर्थ पोहोचावा या उद्देशाने संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने ही प्रार्थना तयार केली असून याचे गायन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक शंकर महादेवन यांनी केले आहे. प्रार्थनेचे हिंदी भाषेतील लेखन आणि निवेदन हरीश भिमाणी यांनी केले आहे. मराठी अर्थ विवेक आपटे यांनी लिहिला असून निवेदन सचिन खेडेकर यांनी केले आहे.

‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या प्रकल्पाची मूळ संकल्पना हरीश भिमाणी यांची असून राहुल रानडे यांनी प्रकल्प प्रमुख व संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या प्रार्थनेचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून लंडन येथील रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वादकांनी याला स्वरसाज चढविला आहे. प्रार्थनेचे ध्वनीमुद्रण लंडन येथील ॲबी रोड स्टुडिओज आणि मुंबई येथील यशराज फिल्म्स या ठिकाणी पूर्ण झाले असून ध्वनीमिश्रण व मास्टरिंग विजय दयाळ यांनी केले आहे.

कोंढव्यातील दूषित व विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत आयुक्तांना मनसे साकडे….

पुणे- कोंढव्यातील दूषित व विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्तांना मनसेने आज निवेदन देत साकडे घातले. मनसे प्रमुख साईनाथ बाबर यांनी हे निवेदन दिले आहे. बाबर यावेळी म्हणाले ,’ कोंढवा परिसरातील अजमेरा पार्क, ग्रीन पार्क, रॉयल पार्क व अश्रफ नगर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. या भागात मिळणारे पाणी हे केवळ कमी दाबानेच येते असे नाही तर त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून नागरिकांना आरोग्याच्या भयंकर संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे जीवन धोक्यात आले आहे.महानगरपालिकेने या समस्येकडे आजवर केलेले दुर्लक्ष हे नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदने दिली, तरीसुद्धा प्रशासनाने याकडे काणाडोळाच केला आहे. पुणे महानगरपालिका ज्या जोमाने, ज्या ताकदीने आणि ज्या पद्धतीने मालमत्ता कर, विविध कर आणि दंड वसूल करण्यासाठी उत्साह दाखवते, त्याच जोमाने नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष का देत नाही? नागरिकांकडून कर वसूल करताना प्रशासनास कोणतीही अडचण वाटत नाही, मग त्याच नागरिकांना जगण्यासाठी लागणारे शुद्ध पाणी देताना महापालिका मौन का बाळगते?
हे नागरिकांसोबतचे उघड अन्यायकारक वर्तन आहे. नागरिकांना त्यांच्या पैशाचा, कराचा, अधिकाराचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पाणी हा माणसाचा प्राथमिक हक्क आहे. पुणे सारख्या शहरात २०२५ मध्ये सुद्धा नागरिकांना दूषित व अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागणे हे अत्यंत लाजिरवाणे व प्रशासनाच्या अपयशाचे स्पष्ट निदर्शक आहे.

म्हणूनच आयुक्तांनी तातडीने पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे :
१) वरील परिसरातील संपूर्ण पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करावी.
२) ड्रेनेजचे पाणी मिसळण्याची समस्या कायमस्वरूपी थांबवावी.
३) नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने शुद्ध पाणीपुरवठा होईल याची खात्री करून द्यावी.
४) या सर्व कामांसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून नागरिकांना माहिती द्यावी.

साईनाथ बाबर यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने आम्ही नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन उभारू. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर राहील.नागरिकांचा संयम आता संपत आला आहे. पुणे महापालिकेने जर नागरिकांकडून कर वसूल करताना दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणे या समस्यांवर दाखवली नाही, तर रस्त्यावर उतरून उत्तर मागितले जाईल.

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत साडेसात ते आठ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे – .महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी
स्पर्धेचे आयोजन दिनांक २३/९ /२०२५ रोजी कै. बाबुराव सणस मैदानावर करण्यात आले . या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपायुक्त (शिक्षण) वसुंधरा बारवे, उपायुक्त सामान्य प्रशासन विजयकुमार थोरात
प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, क्रीडा प्रमुख माणिक देवकर , तसेच सर्व सहाय्यक प्र अधिकारी व क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी मुलांना स्पर्धेत यश मिळविण्या साठी शुभेच्छा दिल्या. सुनंदा वाखारे मॅडम यांनी मुलांना खेळाचे महत्व सांगितले आणि आनंदाने खेळात सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद लुटा अशा शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये सुमारे साडेसात ते आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पुढील पाच दिवस या स्पर्धा पार पडणार आहेत.

उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची पोलखोल मालिका सुरु करणार अंजली दमानिया…

मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुकर्मांची मालिका सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया गत काही दिवसांपासून सातत्याने गडकरींच्या मुलाच्या कंपनीच्या नफेखोरीवरून त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच आता त्यांनी थेट गडकरींच्या कुकर्माची मालिका जाहीर करण्याचा इशारा दिल्यामुळे राज्याच्या राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची चिन्हे आहेत.

अंजली दमानिया यांनी मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे नितीन गडकरी यांचा मुलगा दिवसाकाठी तब्बल 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. तत्पू्र्वी परवा त्यांनी आपण एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार, त्यांनी उद्यापासून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पोलखोल मालिका सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे, असे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्यात.नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच माझ्या बुद्धीचे मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये इतके आहे, असे विधान केले होते. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत आज म्हणाल्या होत्या की, गडकरी म्हणतात की, त्यांना पैशांची गरज नाही. त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांच्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरेतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण, गडकरींचे सुपुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.

आपल्याला माहिती आहे की, गडकरींच्या मुलाची सियान अॅग्रो नामक कंपनी आहे. 25 जून रोजी सियान अॅग्रोमध्ये 1,89,38,121 प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किंमतीत आज 76 रुपयांची वाढ झाली. म्हणजेच एका दिवसात 143.92 कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत, असे दमानिया म्हणाल्या.

निवडणुकांची तयारी:मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, हरकतींसाठी 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत

0

मुंबई–राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकीत व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.

काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले. ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण

ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

दरम्यान, मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) पालिका निवडणुका 3 वर्षांनी पुढे ढकलल्याबद्दल फटकारले होते. तसेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश दिले. प्रभागांचे सीमांकन 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे. निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या मशीन्स आणि कर्मचाऱ्यांची संख्या राज्याच्या मुख्य सचिवांना तात्काळ कळवावी, असेही न्यायालयाने म्हटले होते.

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे 2022 पासून महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यापूर्वी 6 मे रोजीही याच प्रकरणात न्यायालयाने आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुकांबाबत अधिसूचना जारी करण्यास सांगितले होते.

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार:शाहरुख खान-विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

0

नवी दिल्ली- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा विज्ञान भवन येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला.शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि विक्रांत मेस्सीला ’12th फेल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हा शाहरुख आणि राणीचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा विक्रांत मेस्सीचाही पहिला राष्ट्रीय पुरस्कार होता.

विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – श्यामची आई

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – भगवंत केसरी

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पार्किंग

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – वश

सर्वोत्तम कन्नड चित्रपट – द रे ऑफ होप

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक – उत्पल दत्ता (असम)

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन दिग्दर्शन – हनु-मॅन (तेलुगु)

सर्वोत्कृष्ट गीत – बलागम (द ग्रुप) – तेलुगु

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – 12th फेल

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – जॅकफ्रूट – अ जॅकफ्रूट मिस्ट्री

सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (12th Fail)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे)

दादासाहेब फाळके पुरस्कार – मोहनलाल

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – रॉकी और रानी की प्रेम कहानी

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – रॉकी और रानी की प्रेम कहानी (धिंडोरा बाजे रे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – द केरळ स्टोरी (सुदीप्तो सेन)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – द केरळ स्टोरी

सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका – शिल्पा राव (छलिया, जवान)

सर्वोत्कृष्ट पुरुष गायक – प्रेमिथुन्ना (बेबी, तेलुगु)

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि कॉस्च्युम डिझायनर – सॅम बहादूर

विशेष उल्लेख – अॅनिमल (री-रेकॉर्डिंग मिक्सर) – एम.आर. राधाकृष्णन

सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना – अॅनिमल (हिंदी)

राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींच्या निधीस मान्यता

0

राज्यातील नागरिकांना मिळणार खड्डेमुक्त व दर्जेदार रस्ते

  • सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २३- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली असून. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या कालावधीसाठी ₹१२९६.०५ कोटी निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले म्हणाले की, रस्ते हे राज्याच्या प्रगतीचे प्राणवाहिन्या आहेत. सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते निर्माण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्ती कामे तर होणारच आहेत, शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांमध्ये पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. खड्डेमुक्त, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध होतील. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल. अपघातांची शक्यता कमी होईल. रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल.
डिजिटल साधनांमुळे कामांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

या निधीच्या मंजुरीमुळे राज्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. खड्डे भरणे, तातडीची दुरुस्ती, पावसामुळे बाधित झालेल्या मार्गांची दुरुस्ती, तसेच पूरक कामे हाती घेण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. AMC (Annual Maintenance Contract) अंतर्गत ४३,०४३.०६ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुस्थितीतील रस्त्यावरुन सुरक्षित प्रवास करणे सोईस्कर होईल.

राज्यातील एकूण आठ प्रादेशिक विभागांखाली येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमधील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. केवळ दुरुस्तीच नव्हे तर कामांची गुणवत्ता तपासणे आणि मानक पद्धतींचे पालन होणे यावरही सरकारकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

रस्त्यांची दुरुस्ती वेळेत व दर्जेदार व्हावी यासाठी शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर AI आधारित अँप विकसित करण्यात आले असून याच्या मदतीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे स्थान, दुरुस्तीची स्थिती, तसेच कामांची वास्तविक वेळेत तपासणी करणे शक्य होणार आहे. या अँपच्या माध्यमातून पारदर्शकता वाढून नागरिकांनाही कामांच्या प्रगतीची माहिती उपलब्ध होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुतर्फा व दुभाजकांवर, तसेच शासकीय इमारतींच्या सभोवताल वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यावर्षीपासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेषतः “वृक्ष लागवड व देखभाल प्रणाली अॅप” विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने वृक्ष लागवडीचे संनियंत्रण अचूकपणे करता येणार असून, वृक्ष संगोपनाची अद्ययावत माहिती शासनाला तात्काळ उपलब्ध होईल. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच रस्त्यांच्या सौंदर्यवृद्धीलाही हातभार लावणार आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा; पंचनामे व सर्वे सोडा आणि तात्काळ मदत करा.

काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी करणार.

डोंबिवलीत ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांकडून जातीवाचक शिवीगाळ, अत्यंत वाईट वागणूक, गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू.

मुंबई, दि. २३ सप्टेंबर २०२५
राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळात बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला.या पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ, खजिनदार अभय छाजेड आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत आहे, पण शेतकरी विरोधी महायुती सरकार मात्र पोकळ आश्वासने देत आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे, शेतातील पिकं, जमीन, पुशधन, गृहपयोगी साहित्य सर्व वाहून गेले पण राज्यातील आंधळं, बहिरं व मुक्या सरकारला त्यांच्या वेदना दिसत नाही, मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन दौरे करा अशा सुचना मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.

काँग्रेस नेते शेतकऱ्यांच्या बांधावर…
काँग्रेस सरकार असताना पिकाचे लाल्या रोग, बोंड आळीने नुकसान केले, गारपीट चक्रीवादळाने नुकसान केली की तातडीने मदत दिली जात पण भाजपा युतीचे सरकार मात्र नियम, अटी, शर्ती यातच अडकून पडले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असताना पंचनामे कसले करता, आधी मदत द्या, मग कागदी सोपस्कार पूर्ण करा. सरकारचे मंत्री झोपले असताना काँग्रेसने समिती नेमून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, राजेंद्र राख, राजेश राठोड, लहु शेवाळे हे नुकसानीची पाहणी करणार आहेत. लातूर, बीड, व धाराशीव जिल्ह्यात खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री अशोक पाटील, दादासाहेब मुंडे, पांडुरंग कुंभार. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात खासदार रविंद्र चव्हाण, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, आ.डॉ. प्रज्ञा सातव, बाळासाहेब देशमुख, प्रा. यशपाल भिंगे. अमरावती विभागात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आ. अमित झनक, आ. अनिल मांगूळकर, विरेंद्र जगताप, महेश गणगणे, प्रकाश तायडे..नागपूर विभागात खासदार नामदेव किरसान, खा. प्रशांत पडोळे, खा. शामकुमार बर्वे, सुरेश भोयर, रविंद्र दरेकर, संतोषसिंह रावत. उत्तर महाराष्ट्रात खासदार शोभा बच्छाव, खा. गोवाल पाडवी, राजाराम पानगव्हाणे, संदिप पाटील, आ. हेमंत ओगले, दरबारसिंग गिरासे यांचे पथक पाहणी करेल तर सोलापूर जिल्ह्यात खासदार प्रणिती शिंदे, माजी आ. प्रकाश यलगुलवार, रामहरी रुपनवर, अलका राठोड, विनोद भोसले हे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

डोंबिवलीत भाजपा गुंडांचे दलित कार्यकर्त्याशी अत्यंत वाईट कृत्य..

डोंबिवलीतील एका ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी अत्यंत वाईट वागणूक दिली. डॉक्टरकडे गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या. तुमच्या जातीचे लोक माजलेत, असे म्हणत धमक्या दिल्या. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. भाजपाच्या या गुंडांवर खून, बलात्कारासारख्या २० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाने असे विकृत, गुंड, मवाली लोक पाळले आहेत, त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा काँग्रेस त्यांना धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

जनता वसाहत कॅनॉल रोड येथे श्रमदानातून स्वच्छता व जनजागृती उपक्रम

पुणे (२३ सप्टेंबर) : स्वच्छतोत्सव २०२५ (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर) निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्पातर्गत निलायम पूल जनता वसाहत कॅनॉल रोड ते आपला चौक या परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली तसेच पथनाट्य, गाणी व घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली.या वेळी शेल्टर असोसिएट्सच्या सहाय्यक कार्यकारी संचालिका सौ. धनश्री गुरव यांनी (PARMM) प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली व स्वच्छतोत्सव २०२५ चे महत्त्व पटवून सांगितले.

कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ. प्रिया गदादे-पाटील, स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर श्री.अविनाश निमसे पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. मंगलदास माने,श्री. आशिष सुपनार, आरोग्य निरीक्षक, मुकादम, आणि शेल्टर असोसिएट्सच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे, टीम लीडर सौ. सुबोधिनी कांबळे, यार्दी संस्था व स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी, तसेच सफाई कर्मचारी व स्थानिक नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शेल्टर असोसिएट्सतर्फे करण्यात आले. स्थानिक नागरिक व महापालिकेचे कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम पुणे महानगरपालिका मलनिःसारण विभाग व NJS-FP सल्लागार संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.

संदेश :
“स्वच्छता हीच सेवा – चला, एकत्र येऊन स्वच्छ व निरोगी परिसर घडवूया!”

मुंबई महापालिकेच्या श्रीमंतीला उतरती कळा:3 वर्षांत मुदत ठेवी 12 हजार कोटींनी घसरल्या

0

मुंबई- महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. पण आता गत काही वर्षांत बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये मोठी घट झाल्याची बाब माहिती अधिकारात उजेडात आली आहे. बीएमसीच्या सातत्याने घटणाऱ्या या निधीवर संशय व्यक्त केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुंबई महापालिकेच्या गत काही वर्षांतील मुदत ठेवींचा तपशील मागितला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या 2021-22 मध्ये 91 हजार 690.84 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. त्यात आता 12 हजार 192 कोटींची घट झाली. त्यामुळे हा आकडा 79 हजार 498.59 कोटींवर घसरला आहे. यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा या ठेवी 81 हजार कोटींवर होत्या. पण आता ताज्या आकडेवारीमुळे अवघ्या 8 महिन्यांतच त्यात तब्बल 2 हजार कोटींची घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवन सर्वाधिक व्याजदर असणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी ठेवण्यास प्राधान्य दिले जाते. 79 हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी 39 हजार 543 कोटींची रक्कम पीएफ, निवृत्ती वेतन, उपदान, विशेष निधी आदींसाठी वापरली जाते. तसे करणे बंधनकारकही असते.

गत काही वर्षांत पालिका प्रशासनाने पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी यामुळे मुदतठेवी झपाट्याने कमी होत असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. बीएमसीएचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्प मांडताना मुदत ठेवींची रक्कम मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठीच वापरली जात असल्याचे स्पष्ट केले होते हे विशेष. सध्या मुंबईत सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता, मलनिस्सारण प्रकल्प आदी मोठ्या खर्चाचे व दीर्घकाळ चालणारे प्रकल्प मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आलेत. त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदत ठेवींची रक्कम कमी होत जाते. पालिकाने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरुवात केली आहे.

खाली पहा कोणत्या बँकेत किती गुंतवणूक?

बँकेचे नाव रक्कम (कोटींमध्ये)
स्टेट बँक ऑफ इंडिया
40,579.70
एचडीएफसी बँक
21,982.30
आयसीआयसीआय
21,988.25
युनियन बँक ऑफ इंडिया
12,528.00

राज्य सरकारचा मोठा निर्णय:पीक नुकसानीसाठी 2 हजार 215 कोटींची मदत मंजूर

0

जून ते ॲागस्टमधील नुकसानीसाठी असणार मदत,शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी

मुंबई -मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार, एकूण 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे.

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतील शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जून 2025 ते ॲागस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्याकरिता ही मदत असणार आहे.

दरम्यान, जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी 14.29, नागपूर विभागाला 23.85 कोटी आणि अमरावती विभागाला 565.60 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला 10.53 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले होते.

राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2 हजार 215 कोटींची मदत आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. मात्र हे सर्व पैसे एकाच जीआरने नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीआरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच ही प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. आत्तापर्यंत 2,215 कोटी रुपयांची मदत आम्ही केली आहे. त्यातले 1,829 कोटी रुपये पोहोचले आहेत. वाटप झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

नेमबाजी खेळाच्या निवासी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी गुरुवारी निवड चाचणी

पुणे, दि. २३: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रात नेमबाजी (शुटींग) या क्रीडा प्रकारामध्ये प्रवेश देण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे गुरुवार २५ सप्टेंबर २०२५ रोजी निवड चाचणी घेण्यात येणार असून इच्छुक खेळाडूंनी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

खेळाडूंची तज्ज्ञ समितीमार्फत निवड चाचणी घेण्यात येणार असून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेसाठी शुटींग खेळाचे राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेले खेळाडूच पात्र असतील. दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी मानके तयार करण्यात आली आहेत. पात्र खेळाडूंनी kiscepune@gmail.com या ईमेल पत्त्यावर २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत.

निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजनाची व्यवस्था स्वत: करावयाची आहे. चाचणीस येताना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रे, आधार कार्ड, जन्म दाखला व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित व मूळ प्रती सोबत आणावी. खेळाडूंचा प्रवेश निश्चित झाल्यावर निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. खेळाडू १ जानेवारी २००५ नंतर जन्मलेला असावा. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी, असेही श्री. नाईक यांनी कळविले आहे.

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव गणपतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

पुणे दि. 23:- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच याच परिसरातील कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न सुध्दा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) डॉ. के. एच. गोविंदराज, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, एमआयडीसीचे सह-व्यवस्थापक डॉ. कुणाल खेमनार, मानसिंग पाचुंदरकर-पाटील यांच्यासह दृकश्राव्य माध्यमाद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे-पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

या बैठकीत रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगावसह हिवरे ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रांजणगाव गणपती हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी असल्यामुळे येथे असणारे कामगार तसेच हे गाव प्रमुख रस्त्यालगत असल्याने बाहेरील लोकांची स्थलांतरीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही अत्यावश्यक गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने या भागात विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी विषयांवरील अडचणी मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसी अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.