Home Blog Page 305

पुणे जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे दि.२४ सप्टेंबर:: पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, शहर बाह्य वळण रस्ते, इतर मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सर्व भूसंपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित खालील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
१) रा.म. ६० – भिमाशंकर – तळेघरवाडा – राजगुरुनगर व रा.म. ६१ – बनकर फाटा – जुन्नर – घोडेगाव – तळेघर रोड.
२) रा.म. ७६१ बेल्हे – अळकुटी, निघोजे – राळेगाव – थेरपाळ रुंदीकरण व रा.म. ५४८ डी बेल्हे – अळकुटी, निघोजे – राळेगाव – थेरपाळ रुंदीकरण.
३) महाड – पंढरपूर रस्ता, भोर – वरंधा घाट (किमी ३३/५५० ते ९५/५५०).
४) नाशिक फाटा ते खेड एलीव्हेटेड कॉरिडॉर.
५) उंडवडी क.प. ते देशमुख चौक बारामती रस्ता.

या प्रकल्पांमधील प्रलंबित मोजणीप्रक्रिया तात्काळ करावी; आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात मोजणी करावी, तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांशी समन्वय साधून बहुतांश भूसंपादन संमतीने करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित पुढील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला:-
१) पुणे इनर रिंगरोड.
२) चाकण शहरातील वाहतूक कोंडीसाठी बाह्यवळण रस्ता.
३) उसे येथील १५ मीटर रुंदीचा सेवा रस्ता.
४) नऱ्हे येथील नवले पुलाच्या दोन्ही बाजूने १२ मीटर सेवा रस्ता.

या प्रकल्पांसाठीही प्रलंबित मोजणी तात्काळ करून शेतकऱ्यांच्या संमतीने व पारदर्शक पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया करावी तसेच ‘पीएमआरडीए’ विभागाने भूसंपादन हे टीडीआर द्वारे करण्यासाठी संबंधित खातेदारांसमवेत बैठक घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेताना चाकण टप्पा क्र. ५, चाकण जोडरस्ता, तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. २, ४ व ५ तसेच जोडरस्ते, वाहनगाव औद्योगिक क्षेत्र, भोर – उत्रोली – वडगाव डाळ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र आणि अतिरिक्त कुरकुंभ (पाटस) औद्योगिक क्षेत्र या प्रकल्पांसाठी बहुतांश भूसंपादन प्रक्रिया संमतीने करण्यावर भर द्यावा,यासाठी संपादन मंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी खातेदारांसमवेत वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे, असे निर्देशही दिले.
तसेच इतर प्रकल्पांमध्ये विद्युत विभागाचा ७६५ के.व्ही. शिक्रापुर – बाभळेश्वर – पुणे शहर – शिरूर, बाभळेश्वर – कडूस – जुन्नर – आंबेगाव हा वीजप्रकल्प तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ विकास आराखडा या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

सदर प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून प्रक्रिया अचूक व पारदर्शकरितीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या.

मासे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली:आंदेकर टोळीच्या चौघांना अटक

पुणे- गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुलीप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बंडू आंदेकर टोळीच्या चार सदस्यांना अटक केली आहे. शेखर दत्तात्रय अंकुश, मनिष वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादुरकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हिलाही आरोपी करण्यात आले आहे.टोळीने मागील 12 वर्षांत व्यापाऱ्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली 20 कोटींहून अधिक रकमेची वसुली केली आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडून 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जात होती. या प्रकरणी 60-65 व्यापाऱ्यांनी आतापर्यंत तक्रारी नोंदवल्या आहेत.

पोलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी, संघटित गुन्हे आणि संगनमताने गुन्हे करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. टोळीच्या अतिक्रमणावर पालिकेच्या मदतीने कारवाई सुरू आहे.टोळीच्या चौकशीदरम्यान कोट्यवधींची मालमत्ता आढळली आहे. मात्र, त्यांनी कधीही आयकर भरलेला नाही. याबाबत पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांच्या अवैध मालमत्तेवरही कारवाई होणार आहे.

आंदेकर टोळीकडे करण्यात आलेल्या चौकशीत व घर झडतीत कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. परंतु, आजतागायत त्यांनी एकदाही इन्कम टॅक्स भरलेला नाही. एकदाही इन्कम टॅक्स न भरता कोणी एवढी माया कशी जमवू शकते? ही बाब निदर्शनास आल्यानंतर इन्कम टॅक्सच्या कारवाईच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्र व्यवहार केला असल्याचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

एकीकडे आंदेकर टोळीवर सर्वच प्रकारे कारवाई सुरू असताना दुसरीकडे वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अवैध मालमत्तेवरही अशाच पध्दतीने कारवाई केली जाणार आहे. त्यामध्ये गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड या टोळीशी संबंधीत सर्वावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यांच्याही अवैध मालमत्ता लक्ष केल्या जाणार आहेत.

गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्याबाबतचा सुरु असलेला वाद संपुष्टात-तहसीलदार सुनील शेळके

पुणे, दि. २४ सप्टेंबर: सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील शेतरस्त्यांबाबतचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याकरिता तहसिल कार्यालय जुन्नर येथे महसूल लोक अदालत व रस्ता अदालत आयोजित करण्यात आली, यामध्ये शेतरस्त्यांबाबत एकूण १०४ प्राप्त प्रकरणापैकी १९ प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली, यामध्ये मौजे भोरवाडी (हिवरे बु) येथील गेल्या पंधरावर्षावासून रस्त्याबाबतचा असलेला वाद संपुष्टात आला असल्याची माहिती माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमात जुन्नर तालुक्यातील १८५ गावामध्ये शिव, पाणंद वहिवाटीच्या रस्त्यांबाबत शिवारफेरी काढून ग्रामस्तरीय समिती समन्वयातून रस्त्यांचे युध्द पातळीवर सर्वेक्षण आले आहे. त्यामध्ये नकाशावर नोंद असलेल्या व नसलेल्या रस्त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून ग्रामसभेमध्ये त्यास मंजूरी घेण्यात आली आहे. तालुक्यातील नकाशावर असलेले व नसलेल्या अंदाजे २ हजार ९८६ रस्त्यांना विशेष सांकेतांक क्रमांक देण्यात आले आहेत.

या १८५ गावांपैकी १५ गावांपैकी बोरी बु गावामध्ये रस्त्यांचे सीमांकन करणेत येऊन जीआयएस पध्दतीने गाव नकाशावर चिन्हांकित करण्यात आले आहेत, उर्वरित राजुरी, पिंपरीकावळ, वैशाखखेडे, पिंपळगाव त नारायणगाव, खानापुर, राळेगण, मंगरुळ, अलदरे, गायमुखवाडी, सितेवाडी, चावंड, मांजरवाडी, कुमशेत, कुसुर या १४ गावांतील रस्त्यांच्या याद्या आणि त्यानुसार ग्रामपंचायतीच्या ठरावासह रस्ते सीमांकन व जीआएस पध्दतीने गाव नकाशावर नोंद घेण्याकरिता उपअधिक्षक भूमी अभिलेख जुन्नर यांना कळविण्यात आले आहे, असेही श्री. शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

चौकट मौजे भोरवाडी (हिवरे बु) येथील आपापसातील खातेफोड, वाटपाबाबत ‘शेरताटी ते वनदेवी ‘ ह्या रस्त्याबाबत गेली १५ वर्षांपासून सुरू असलेला वाद महसूल लोक अदालतीत संपुष्टात आला. सेवा पंधरवडा उपक्रमात रस्त्याबाबतचे वादविवाद संपुष्टात आणून शेतकऱ्यांच्या जीवनमान सुखकर व्हावे, पर्यायाने ग्रामीण अर्थकारणात वद्धी व्हावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे सुरक्षा रक्षकांची कंत्राटी भरती

पुणे दि. २४ : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे कंत्राटी पध्दतीने बिनहत्यारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य, पत्नी तसेच निम-लष्करी सेना (BSF, Assam Rifles, ITBF, TA, GREF, CISF, CRPF, SRPF) मधील निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नी पात्र राहतील.

इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी यशवंत बांदल, पर्यवेक्षक (मो.क्र. ९४२२८३०४७५) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ले.क. हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

आमदार बापूसाहेब पठारे यांचा धानोरी वडगाव शेरी खराडी भागातील रस्ते पाहणी दौरा

पुणे: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी, धानोरी, पोरवाल रोड खराडी खांदवे नगर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

पाहणी दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. “वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,” असे पठारे यांनी सांगितले.

यात पुढील रस्ते व संबंधित सुधारणांबाबत सूचना देण्यात आल्या. धानोरी येथील धानोरी गावठाण चऱ्होली जोड रस्ता, भारत माता रस्ता, मंत्रा मोटोना सोसायटी जवळील रस्ता, या तीनही रस्त्यांचे अंदाजपत्रक करणे, वडगावशेरी येथील जुना मुंढवा रस्ता ते वडगाव शेरी भाजी मंडई रस्त्याचे बांधकाम विभागाकडून मार्किंग करून पथ विभागाने पुढील कार्यवाही करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते (रामवाडी) नगर रस्ता, खराडी शिवणे रस्त्यातील वडगावशेरी येथील स.न.५७ मधील वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्त्याबाबत वनविभागाकडे पाठपुरावा करणे, खराडी येथील खराडी बायपास हडपसर रस्ता (प्रेस्टीज कंपनी येथे युवानकडून येणाऱ्या रस्त्याला ये जा करण्यासाठी सुरू करणे, खराडी बायपास रस्ता ते रेडिसन हॉटेल शेजारून सातव वस्ती, निर्मला शाळेकडे जाणारा रस्ता सुरू करणे, पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या रस्त्यांवर मुख्य चौकामध्ये चॅम्पर करणे, खराडी जकात नाका येथे जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे, खांदवेनगरकडे नगर रस्त्यापासून जाणारा मुख्य रस्ता करणे, खराडी जकात नाका ते ग्रँड रोडला आवश्यक ठिकाणी मुख्य चौकात चॅम्पर करणे, खराडी मुंढवा पूल नदी किनारचा रस्ता व त्याला जोडणारे रस्ते करणे.
“उद्या धानोरी–चऱ्होली फॉरेस्ट पार्क परिसरातील ३२० मीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या परवानगीसाठी वनविभागाशी सातत्याने पाठपुरावा केला होता. काल वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्याचा निर्णय झाला. अखेरीस वनविभागाची परवानगी मिळाली असून, वनविभागाच्या या जागेचा मोबदला म्हणून पुणे महानगरपालिकेने १६ लाख ८० हजार रुपये वनविभागास अदा केल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी महापालिका पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव, उपअभियंता पुनम गायकवाड, सायली सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता सुशिल मोहिते, सारंग देवरे, मनोहर माळी, बांधकाम विभागाचे अभियंता उमेश घाडगे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, कनिष्ठ अभियंता भुषण कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील बार आणि रेस्टॉरंट्सवर छाप्यांमध्ये खाजगी व्यक्तींचा समावेश..

पुणे : शहरातील बार आणि रेस्टॉरंट्सवर अलीकडे छापे टाकले जात असून त्यावेळी काही खासगी व्यक्ती उपस्थित राहून कागदपत्रांची मागणी करत आहेत आणि अधिकृत वेळेपूर्वीच बंद करण्याचे आदेश देत आहेत, असा गंभीर आरोप नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) – पुणे चॅप्टरने केला आहे. संघटनेने या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्फत तक्रारपत्र पाठवण्यात आले आहे. यामुळे “हे खासगी व्यक्ती कोण?” हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देखील याप्रकरणी निवेदन देण्यात आले

अर्थव्यवस्था व रोजगारात रेस्टॉरंट उद्योगाचा वाटा
NRAI – पुणे चॅप्टरचे म्हणणे आहे की रेस्टॉरंट्स आणि बार्स हे केवळ व्यवसाय नसून शहराच्या अर्थव्यवस्था, रोजगार आणि सांस्कृतिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत. पुण्यातील फूड अँड बेव्हरेज (F&B) क्षेत्रातून २.५ ते ३ लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. अप्रत्यक्षरीत्या पुरवठा, लॉजिस्टिक्स, देखभाल आणि इतर सेवांमधून आणखी ३ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होतो. २०२४-२५ आर्थिक वर्षात या क्षेत्रातून १,२०० ते १,५०० कोटी रुपये राज्य आणि स्थानिक सरकारांना कर, परवाने व शुल्काद्वारे उत्पन्न झाले आहे.

छाप्यांदरम्यान खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप अनुचित
एनआरएआयने नमूद केले की अधिकृत तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांसोबत अनधिकृ व्यक्तींना सहभागी होऊ देणे हे पूर्णपणे अनुचित आहे. संघटनेने स्पष्ट केले की, “आम्ही नेहमीच अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे. मात्र, धाडीत खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप अस्वीकार्य आहे. तपासणीची प्रक्रिया फक्त अधिकृत अधिकाऱ्यांनीच पार पाडली पाहिजे.”

जबाबदार आणि सुरक्षित संचालनासाठी सहकार्य
एनआरएआय – पुणे चॅप्टरने सरकारकडे विनंती केली आहे की, संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तसेच उद्योगाच्या सुरक्षित, जबाबदार आणि पारदर्शक संचालनासाठी प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

सरहदच्या गुजरवाडी शैक्षणिक संकुलात ‘विजय धर ॲम्फी थिएटर’चे उद्घाटन

शिक्षण क्षेत्रात विजय धर तसेच ‘सरहद’चे सामाजिक दायित्वातून महत्त्वपूर्ण कार्य : शरद पवार
काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे आणि सदैव राहील : शरद पवार


पुणे : शेजारी देशांनी काहीही केले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही. काश्मिरी जनतेचे देशसेवेत मोठे योगदान आहे. शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले. काश्मिरी जनतेच्या या प्रयत्नांना सरहदसारख्या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काश्मीरसोबत सारा देश उभा आहे, हे सरहदने दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे काढले.

काश्मीरमधील ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ विजय दुर्गाप्रसाद धर यांच्या नावाने सरहद ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘विजय धर ॲम्फी थिएटर’च्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सरहद संस्थेच्या कात्रज परिसरातील गुजरवाडी येथील शैक्षणिक संकुलात बुधवारी (दि. २४) हा कार्यक्रम झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजय धर, त्यांच्या पत्नी कविता धर, कन्या कनिका धर, सरहद संस्थेचे संजय नहार, प्राचार्य सुषमा नहार, संतसिंग मोखा, विश्‍वस्त डॉ. शैलेश पगारिया, विश्‍वस्त शैलेश वाडेकर, आर्किटेक्ट इम्रान शेख, वसंत मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले, पुण्याने देशाला नवा मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे. पुणे हे शिक्षण, उद्योग, संस्कृती, आयटी अशा अनेक क्षेत्रांतील आदर्श शहर आहे. देशातील जनतेला एकत्रित आणण्याचे कार्य याच पुण्यातून लोकमान्य टिळक यांनी केले. कार्याचे शतक पूर्ण केलेल्या अनेक संस्था पुण्यात आहेत. पंजाब एकेकाळी देशाचे धान्यकोठार होता. पंजाबचे योगदान लक्षणीय आहे. काश्मीरमधील परिस्थिती बराच काळ अस्थिर, अशांत आणि चिंताजनक होती. त्यामुळे शिक्षणक्षेत्राची हानी झाली होती. पण विजय धर तसेच सरहद सारख्या संस्थांनी सामाजिक दायित्व जाणून या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. काश्मीर हा भारताचा हीरा आहे. कुणी कितीही अराजक माजवण्याचा प्रयत्न केला, तरी काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि सदैव राहील. अशा काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्याचे प्रकल्प विजय धर आणि सरहद संस्थेच्या माध्यमातून संजय नहार यांनी कार्यान्वित केले आहेत. हे प्रयत्न आणि कार्य महत्त्वपूर्ण आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, विजय धर यांच्याशी माझा परिचय पवारसाहेबांनीच १९७४ च्या सुमारास करून दिला. तेव्हापासून विजय धर यांच्या विविध कार्याशी मी परिचित आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य काश्मीरमध्ये उभारले आहे. त्यांचे वडील दुर्गाप्रसादजी हे इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांचे सल्लागार होते. स्वतः विजयजी हेही राजीव गांधी यांच्या कार्यकाळात सल्लागारपदी होते. विजयजींनी काश्मीरमध्ये उभारलेली शाळा व शैक्षणिक कार्य, सर्वोत्तम मानले जाते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सरहदने ॲम्फी थिएटर उभारले, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना, मी केंद्रीय गृहमंत्री होतो. तेव्हा काश्मीरमधील परिस्थिती आटोक्यात होती. आता ती बिघडली आहे. पहलगाम प्रकरण ताजे आहे. याला जबाबदार कोण, याचा विचार जनतेने केला पाहिजे.

विजय धर यांनी मनोगतात शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहाचा उल्लेख केला. सुरवातीला पवार यांनी मला बारामतीला आमंत्रित केले आणि तिथे उभारलेले कार्य दाखवले होते. काश्मीरमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न केला, त्याला सरहदच्या माध्यमातून संजय नहार यांनी साथ दिली, सहकार्य केले, असेही धर म्हणाले.

प्रास्ताविक करताना संजय नहार म्हणाले, विजय धर यांचे कार्य अनेक क्षेत्रांत आहे. त्यांनी शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामातून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची धुरा पुढे नेण्याचे आश्वासन, ही भावना ॲम्फी थिएटर उभारण्यामागे आहे. सरहद संस्थेच्या अनेक उपक्रमांसाठी शरद पवार तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याचा उल्लेख नहार यांनी केला.

नवकार मंत्र तसेच राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संतसिंग मोखा, वसंत मोरे, डॉ. शैलेश पगारिया यांनी स्वागत केले. गुजरवाडी शैक्षणिक संकुलासाठी कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धा:गुरु व शिष्य एकाच वेळी पदकांच्या व्यासपीठावर!!

पुणे २४ सप्टें. : गुरु व शिष्य यांनी एकाच वेळी पदकांच्या व्यासपीठावर उभे राहण्याचा दुर्मिळ योग येथे नुकताच पहावयास मिळाला.‌ निमित्त होते महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग अजिंक्यपद स्पर्धा. या स्पर्धेमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी सुवर्ण चौकारांसह आठ पदकांची कमाई केली. त्याचबरोबर त्यांच्या प्रशिक्षकांनीही तीन सुवर्णपदके जिंकून चमकदार कामगिरी केली

श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये निया पतंगे‌ हिने २०० बाय फिन, २०० मोनो फिन व १०० मोनो फिन प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर १०० बाय फिन प्रकारात तिला कांस्यपदक मिळाले. रेवा चौगुले हिने ५० अपनिया व २०० मोनोफिन प्रकारात रौप्यपदक मिळविले तर १०० मोनोफिन प्रकारात कांस्यपदक जिंकले. अनया वानखेडे हिने ५० बाय फिन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.‌ या खेळाडूंना प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रुपाली अनाप आणि केशव हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षक श्रीमती स्मिता काटवे यांनी या स्पर्धेत ५० मीटर बाय फिन, १०० मीटर बाय फिन, ५० मीटर सरफेस मोनो फिन या तीनही क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली.
खेळाडू व प्रशिक्षकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये जेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या आठवणीना उजाळा

पुणे-मराठी चित्रपटसृष्टी मध्ये तब्बल ६० वर्ष सुरेल संगीत गायन करणारे पद्मभूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगभूमीवरील त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये श्रीनिवास खळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गायन कार्यक्रमास सुरवात झाली. पुणे नवरात्रौ महोत्सवात २००० साली श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती पुरस्कार देऊन श्रीनिवास खळे यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच त्यांनी त्यावेळी कार्यक्रम देखील सादर केला होता या आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्यात आला. तसेच त्यांच्याशी संबंधित गाणी देखील गाण्यात आली.

३१वा पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. पुणे नवरात्रौ मोहत्सवचे आयोजक अध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल आणि जयश्री बागुल यांनी या सुरेख सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर आर. जे. बंड्या याने आपल्या ओघवत्या शैलीने करत प्रेक्षकांना संपूर्ण कार्यक्रमात खिळवून ठेवले.

१९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अभिषेक सराफ, अक्षय घाणेकर कल्याणी घाणेकर, तन्वी दाते यांनी वेगवगेळया सुरेल गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. नामांकित गायक ए. आर. रहमान , कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल यांच्या विविध गाण्यांचा समावेश यामध्ये होता. प्रेक्षकांनी १९९० च्या दशकातील सुरेल गाणी पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त करत टाळ्या वाजवून तसेच आवडती गाणी गुणगुणत जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. ए. आर. रहमान यांचे “दिल से रे…” हे गाणे गायक अभिषेक घाणेकर यांनी उत्साहपूर्ण वातावरणात गातच प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद देत “वन्स मोअर” म्हणत गाणे पुन्हा गाण्यास लावले. श्रेया घोषल यांनी गायलेल्या ” जादू है नशा है” गाणे गायिका कल्याणी देशपांडे यांनी सुमधुर आवाजात गात उपस्थितांची मने जिंकली. गायक अक्षय घाणेकर आणि गायिका कल्याणी देशपांडे यांनी एकत्रित गायलेल्या सुप्रसिद्ध आशिकी चित्रपटातील गाण्याला तर प्रेक्षकांनी शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. बॉम्बे चित्रपटातील ए.आर.रहमान यांचे अजरामर गाणे “तू ही रे..तेरे बिना में कैसे जिऊ” गाण्यात तर प्रेक्षक ताल्लिन झाल्याचे पाहावयास मिळाले, गायका सोबत एकत्रित गाणे गात त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रथमच नवरात्रौ उत्सव मध्ये गायन करत असलेल्या तन्वी दाते हिच्या सुरेल गाण्यांनी देखील सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी नामांकित गायकांना संगीत वाद्य कलाकारांनी देखील उत्कृष्ट साथ दिली. ड्रम वादनअभिजित भदे, रिदम मशीनओंकार इंगवले, सॅक्सोफोनपीयुष तिवारी, पियानोशंतनु जहागिरदार आणि भारत ढोरे, गिटार वादन अजय थोरात तर तबला वादन मंगेश जोशी यांनी केले. यावेळी आबा बागुल, नंदकुमार कोंढालकर, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, सुनील महाजन, निकिता मोघे, विलास रत्नपारखी, ॲड. चंद्रशेखर पिंगळे, द.स.पोळेकर उपस्थित होते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्चीयाय देवीची आरती संपन्न

पुणे : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. आज पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, मोनल दुगड आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ,आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, मंदिरात येऊन अतिशय प्रसन्न वाटले. दुगड परिवार राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही पोलिस आयुक्तांनी यावेळी कौतुक केले.

मोनल दुगड म्हणाल्या, माणिकशेठ दुगड यांनी 35 वर्षांपूर्वी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या मंदिराची उभारणी केली. येथे नवरात्री मध्ये विविध धार्मिक कार्य करत आहोत, यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, स्त्री सूक्त पठण , याशिवाय येथे गोशाला आहे, चारशे हून अधिक गायांचा सांभाळ आम्ही करत असून इतरांच्या आजारी गायींना इथे आणले तरी आम्ही त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो त्यांची काळजी घेतो, अन्नछत्र 24 तास सुरू असते, आज दुगड यांची चौथी पिढी देवीच्या सेवेत आहे.

प्रमोद दुगड म्हणाले, आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक उपक्रम आम्ही घेत असतो. यंदाही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहोत. अष्टमीच्या दिवशी महाकुंभ महोत्सव होत आहे, यामध्ये 108 जोडपी हवन करणार आहेत. सर्व उपक्रम गौरव दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे प्रमोद दुगड यांनी नमूद केले.

संवेदनक्षम मनाची क्षमता न ओळखणे ही आधुनिक अस्पृश्यता : डॉ. मोहन आगाशे

0
मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात
तरुणांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे : बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेद्रीत असल्यामुळे जगण्याविषयी संवेदना निर्माण झालेल्या नाहीत. जीवनाच्या सर्वात जवळ जाणारे आणि भावनेचे माध्यम वापरणारे एकच साधन आहे ते म्हणजे चित्रपट. चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञान हाताळणे सोपे असले तरी त्याचे व्याकरण समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिक बुद्धिवादी शिक्षण पद्धतीतून फक्त वाचक निर्माण झाले; परंतु उत्तम प्रेक्षक, श्रोते निर्माण होऊ शकले नाहीत. बुद्धिची भाषा शिकविली जाते परंतु संवेदनांची भाषा शिकविली जात नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. संवेदनक्षम मनाची क्षमता ओळखू न येता एखाद्याला वाळीत टाकणे ही आधुनिक अस्पृश्यता आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मुंबा फिल्म फाऊंडेशन आयोजित सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी (दि. 24) ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी डॉ. आगाशे बोलत होते. ‌‘आता थांबायचे नाय‌’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड, एमआयटी कॉलेजच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूलचे विभाग प्रमुख डॉ. अरुण प्रकाश, मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. गणेश पठारे मंचावर होते.
बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रीत; संवेदनांचा अभाव
आधुनिक शिक्षण पद्धतीवर मार्मिक भाष्य करताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, बुद्धी आणि संवेदना असणारे, लेखक आणि कवी झाले, तर बुद्धिवादी नुसते वाचकच राहिले. या शिक्षण पद्धतीमुळे बोलणारा शब्द फक्त लिहिता झाला आणि त्यामुळे दोन पाय आणि दोन डोळ्यांचा मानव एक पाय आणि एका डोळ्यावर आला. चित्रपट हे माध्यम करमणूक आणि शिक्षण या दोन्ही करिता वापरले गेले तर मानव दोन्ही पाय आणि दोन्ही डोळ्यांचा वापर करू लागेल. बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रीत असल्याने यात संवेदनक्षमता नाही त्यामुळे भावना ओळखणे, हाताळणे घडू शकत नाही. यातूनच युद्धासारखे प्रसंग उद्भवले आहेत.
डॉ. मोहन आगाशे पुढे म्हणाले, चित्रपट करणेच नव्हे तर बघणे देखील शिका आणि त्यातून स्वत:ची परीक्षा करा. चित्रपट निर्मिती करताना माध्यमाची कुवत जाणून घेणे गरजेचे आहे. जिवंत माणसाचा मुदडा करून तो साठविणे याला आठवण म्हणत नाहीत हे चित्रपटाच्या माध्यमातून शिकणे महत्त्वाचे आहे. निव्वळ मनोरंजनात्मक चित्रपटातून योग्य ते शिक्षण मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांची मानसिक प्रकृती खराब झाली आहे.
मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संवेदनांचा उत्सव : उमेश कुलकर्णी
उमेश कुलकर्णी म्हणाले, लघुपट हे माध्यम प्रभावी आणि स्वातंत्र्य देणारे आहे. या माध्यमाद्वारे मनातील भावना प्रकट होऊ शकतात. आपल्या मनात नक्की काय घडते आहे हे आजची तरुणाई लघुपटाच्या माध्यमातून मांडत आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करणे, प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात चित्रपट माध्यमांविषयी अपेक्षेएवढे लोकशिक्षण झालेले दिसत नाही. चांगला प्रेक्षक घडविण्याचे कार्य अशा चित्रपट महोत्सवातून वारंवार होणे गरजेचे आहे. फक्त पुणे-मुंबईच नव्हे तर गावागावांमध्ये अशा स्वरूपाचे कार्य व्हावे, ज्या योगे उत्तमोत्तम चित्रपट, लघुपट प्रतिभावान युवा पिढीपर्यंत पोहोचतर,. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संवेदनांचा उत्सव आहे. यातून समाजभान निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपट महोत्सव आनंदयात्रा ठरेल

प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, माध्यम क्रांती झाल्यामुळे चित्रपट महोत्सवाला युवा वर्गाचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. चित्रपट, लघुपट निर्मितीतून संवेदशीलता आणि जाणीवा जागृत झाल्यास युवा पिढीकडून या क्षेत्रात प्रभावी कार्य घडेल. मुंबा फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून सकस निर्मिती करणाऱ्या चित्रपट, लघुपटांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभ्यासक आणि प्रेक्षकांसाठी हा महोत्सव आनंदयात्रा ठरेल.

लघुपट निर्मितीसाठी एनएफडीसीने आर्थिक सहाय्य द्यावे

चित्रपट निर्मितीसाठी एनएफडीसीने आर्थिक सहाय्य केल्यामुळे अनेक लेखक, दिग्दर्शक, कलावंतांना त्याचा फायदा झाला. लघुपट हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना एनएफडीसीने अनुदान द्यावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ सोसायटीज्‌‍ ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी या प्रसंगी केली.

डॉ. गणेश पाठारे, किरण गायकवाड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. महोत्सवाचे सचिव विश्वास शेंबेकर, विरेंद्र चित्राव, बाळासाहेब रास्ते यांनी स्वागत केले. महोत्सवाचे संचालक अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले.
दि. 24 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन नामांकित ठिकाणी चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. यावर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांचाही सहभाग आहे.

निवडणुका 30 जानेवारीच्या आतच घ्या,आता कोणतीही मुदतवाढ नाही

0

डिसेंबरमध्येच जिल्हा परिषदेच्या निवडणुका; आयोगाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिला आहे की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका 30 जानेवारीच्या आत संपन्न केल्या पाहिजेत. कोर्टाने हेही स्पष्ट केले आहे की, आयोगाला या मुदतीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिले मोठे पाऊल उचलले आहे. आयोगाने मतदार यादीची तयारी सुरु केली असून त्यासाठी हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुगमता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू राहील आणि ती जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाईल. यामुळे प्रत्येक मतदाराला आपली माहिती तपासण्याची संधी मिळेल. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रक्रियेत हरकती व सूचना दाखल करणारे मतदार स्वतःचे नाव, पत्ता व मतदार कार्ड तपासून आवश्यक दुरुस्ती सुचवू शकतील

अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार

आयोगाने याच प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवल्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. यावर मतदारांनी 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक तयारी वेळेवर पूर्ण होईल आणि कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळल्या जाऊ शकतील.

हरकती व सूचना मागविल्यानंतर निवडणुका

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हरकती व सूचना मागविल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुका त्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर सुरू होतील. झेडपी व पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकतात, तर महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीवर हरकती व सूचना याच कालावधीत मागविली जाऊ शकतात. यामुळे सर्व स्तरांवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे शक्य होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रियेस सुरुवात

या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराला आपली माहिती तपासून हरकती व सूचना दाखल करण्याची संधी मिळत असल्याने निवडणूक पारदर्शक पद्धतीने होईल, असे निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांचे मत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिकांच्या निवडणुकीत वेळेवर मतदार यादी तयार होणे अत्यंत महत्त्वाचे असून, या प्रक्रियेमुळे सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार सुरक्षित राहील आणि आगामी निवडणुका सुगमता आणि पारदर्शकतेने पार पाडल्या जातील.

विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

सेवा पंधरवडा उपक्रमात इंदापूर तालुक्यातील रस्त्यांना सिमांकन करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु-तहसीलदार जीवन बनसोडे

पुणे, दि. २४ सप्टेंबर: सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता त्यांची कायमस्वरुपी सोय व्हावी याकरिता १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्यांना सिमांकन करावयाचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली आहे.

इंदापूर तालुक्यात थोरातवाडी (रुई), भोडणी, व्याहळी, कपरवाडी (वा), सरडेवाडी, गलांडवाडी नं. २, गोखळी, म्हसोबाचीवाडी, जंक्शन, डाळज नं.१, जाधववाडी, तावशी, अगोती नं.१, वकीलवस्ती आणि करेवाडी १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्याचे सिमांकन कार्यवाही सुरु आहे. या गावांमध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये शिवारफेरी घेण्यात येणार असून मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, मोजणी विभागाचे कर्मचारी व पोलीस पाटील यांच्यामार्फत गाव नकाशावर असलेले आणि नसलेले रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत १७ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत रस्त्यांची प्राथमिक यादी तयार करुन मान्यता घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे ग्रामसभेत ठरावही घेण्यात आले आहेत.

ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावानुसार १५६ पाणंद रस्त्याबाबत गावपातळीवरुन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, या रस्त्यांचे सिमांकन करण्याकरिता उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठविण्यात आहे आहेत. भूमी अभिलेख विभागामार्फत या रस्त्यांची मोजणी व सिमांकनासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. येत्या काळात रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येणार आहेत, असे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी: शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, शेतीउपयोगी व यांत्रिकी साहित्य शेतात ने-आण करणे तसेच बाजारपेठेमध्ये शेतमाल वेळेत पोहचविण्याकरिता शेतरस्ते महत्वाचे आहे. राज्यात मुळ जमाबंदीवेळी तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये तसेच एकत्रीकरण योजनेच्यावेळी तयार करण्यात आलेल्या गट नकाशामध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिवरस्ते व गाडीमार्ग दर्शविण्यात आलेले आहेत. मात्र त्यानंतर नवीन रस्त्याच्या नोंदी न झाल्यामुळे रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी, अतिक्रमण यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये विभागात सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमामुळे रस्त्यांच्या अधिकार अभिलेखामधील नोंदी अद्यावत होतील आणि शेतरस्त्यांच्या समस्यांचे निराकारण होईल. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.

बावनकुळे यांच्या हस्ते श्री रेणुकामातेचा आरती सोहळा संपन्न

पुणे.

श्री रेणुका माता मंदिर केशवनगर, मुंढवा,भंडारी समाजसेवक ट्रस्ट, पुणे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष विशेष जल्लोषात साजरा होत आहे.

या पर्वाला विशेष महत्त्व देत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री रेणुकामातेचा आरती सोहळा पार पडला.या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

या प्रसंगी आमदार टिळेकर,युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे,माजीनगरसेविका वंदना भिमाले, माजी नगरसेवक उमेश गायकवाड,भाजप पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, भाजपा सरचिटणीस प्रियंकाताई शेंडगे,सरचिटणीस बाप्पू मानकर,पुणे शहर युवामोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले,प्रसाद शेठ भिमाले,विश्वस्त डॉक्टर श्रमकांत अकाले,एकनाथ शेठ भंडारी, सुभाष भंडारी,दत्तात्रय वाल्हेर, नारायण बत्ताले,प्राचार्य महादेव वाल्हेर,भीमराव मिट्टले,देवेंद्र उडताले,शिवाजी भंडारी,लक्ष्मण अकाले,कैलास अकाले तसेच भंडारी समाजसेवा ट्रस्ट चे सर्व सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तोंडभरून केले कौतुक

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.”

बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”

कामावरून काढून टाकल्याने २ बिहारी तरुणांनी केली मालकाच्या ३ वर्षीय मुलीचे अपहरण ,पोलिसांनी अवघ्या चार तासात दोघांना पकडून मुलीची केली सुटका

पुणे- कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून दोन बिहारी तरुणांनी पुण्यातील आपल्या मालकाच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून पळ काढल्याची घटना काल सायंकाळी निदर्शनास आली तत्क्षणी पोलिसांनी हालचाली करून या दोन्ही भुरट्याना कल्याण रेल्वे स्थानकावर पकडले आणि त्यांच्या ताब्यातून या ३ वर्षीय मुलीचीही सुटका केली .

या प्रकरणाची हकीकत पोलिसांनी अशी सांगितली कि,’ दि.२२/०९/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे ‘फिर्यादी’ यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे येवुन माहिती दिली की, त्यांची लहान मुलगी वय ०३ वर्ष हिस सायंकाळी ०५/०० वाजले पासुन गायब आहे व ती प्रिन्स पॉल (वय २५ वर्ष )व ओमनारायण पासवान यांनी\ पळवुन नेले असण्याची शक्यता आहे.कारण मी त्यांना कामावरून काढून टाकले . अशी तक्रार प्राप्त होताच विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी पोलीस स्टेशनचे तपास प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफ, सपोनि संतोष शिंदे, सपोनि शिरसाट यांना बोलावुन घेवुन दोन वेगवेगळी पथके तयार करुन तात्काळ मुलीचा शोध सुरु केला. तक्रारदार राहत असलेल्या लेबर कॅम्पच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. आरोपींचे प्राप्त मोबाईल नंबरचे तात्काळ सीडीआर, लोकेशनची माहिती घेण्यात आली. आरोपींचे लोकेशन प्रथम तळेगाव दाभाडे येथे आले होते. म्हणुन तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाणेशी संपर्क करुन त्यांना महिती दिली व तपास सुरु केला. परंतु त्यानंतर आरोपीचे लोकशन लोणावळ्याचे आसपास आल्याने सदरचे इसम मुलीला घेवुन रेल्वेने प्रवास करीत असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांचेसह एक तपास पथक मुंबईचे दिशेने रवाना करण्यात आले होते.
आरोपी यांचे मोबाईल नंबरचे लोकेशनवरुन सदर आरोपी हे इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलीसांना सदर बाबत माहिती देवुन आरोपी व लहान मुलीचे फोटो देण्यात आले होते. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीसांचे मदतीने यातील आरोपी १. प्रिन्स संजय पाल वय २१ वर्ष २. ओमनारायण छोटेलाल पासवान वय २० वर्ष दोघे रा. लेबरकॅम्प म्हाडा कॉलनी विमाननगर पुणे मुळ बिहार यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे मुलीसह ताब्यात घेण्यात आले .मुलगी वय ०३ वर्ष हिस सुखरुप तिचे आई वडीलांचे ताब्यात देण्यात आले. सदर बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४६४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परि ४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे, लालु क-हे, रुपेश पिसाळ, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, श्रीमंत यंपाळे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, शंकर वाघुले यांचे पथकाने केली.