Home Blog Page 304

गांधी जयंतीनिमित्त पुण्यात आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’

0

पुणे -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. या सप्ताहात विचारप्रवर्तक नामवंतांची व्याख्याने, प्रभातफेरी – शांतता मार्च, ‘गांधी’ चित्रपटासह अन्य प्रेरणादायी चित्रपटांचे रसग्रहण इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.

या ‘गांधी सप्ताह’चे उद्घाटन गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायं. ५.३० वाजता सर्वधर्म प्रार्थनेने होईल. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. अभय ओक यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन होणार असून, सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी न्या. अभय ओक यांचे  ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर व्याख्यान होईल.

गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता शुभांगी मुळे व सहकारी यांचा प्रार्थना व भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, असा दृढ संकल्प घेऊन सकाळी ९.३० वाजता कर्वे रस्ता – प्रभात रस्ता कॉर्नर पासून गांधी भवनापर्यंत ‘शांतता मार्च’ काढण्यात येणार आहे. समाजातील सर्व शांतताप्रेमी लोक, विशेषतः युवकांनी या शांतता मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. 

सप्ताहात दररोज सायंकाळी ६ वाजता नामवंत व्याख्याते महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन करणार आहेत. यात अधिक कदम यांचे ‘काश्मीर आणि मी’, नीरज हातेकर यांचे ‘अस्वस्थ वर्तमानाचे अर्थशास्त्र’ व अभिजित देशपांडे यांचे ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’ या व्याख्यानांचा समावेश आहे.

प्रत्येक राष्ट्र घडवण्यामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन अशा अनेक जागतिक नेत्यांचा सहभाग आहे. अशा महान व्यक्तींच्या कार्याचा परिचय ऐतिहासिक पुस्तकांप्रमाणे चित्रपटांच्या माध्यमातूनही करून दिला गेला आहे.  या चित्रपटांची ओळख करून देताना एकूणच चित्रपट कसे बघावेत, याबद्दल दृकश्राव्य (audio visual) कार्यक्रम रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता गांधी भवन येथे ज्येष्ठ समीक्षक सुहास किर्लोस्कर सादर करणार आहेत.

मंगळवार, ७ ऑक्टोबर सायं. ६.०० वाजता डॉ. जब्बार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखत व संवादाचे आयोजन केले आहे. यात मुलाखतकार विनोद शिरसाट, डॉ. मोहन आगाशे व डॉ. कुमार सप्तर्षी सहभागी असतील.

‘गांधी सप्ताह’चा समारोप बुधवार, ८ ऑक्टोबर सायं. ६.०० वाजता गांधी भवन येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. यावेळी ‘महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. याचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी असतील.

या आठ दिवसांच्या कार्यक्रमात खादी, पुस्तके, हस्तकला व गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शने गांधी भवन आवारात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.  

देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचे योगदान मोलाचे-शरद पवार

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन

पुणे: “भारताच्या शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी भारत मात्र एकसंध व प्रगतीच्या पथावर आहे. देशाला एकसंध ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान व त्यातील लोकशाही मूल्ये महत्वाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे करायला हवे, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांच्या पुढाकारातून स्थापित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव हे होते. प्रसंगी खासदार निलेश लंके, माजी आमदार ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. सुहास पळशीकर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस अ‍ॅड. शारदा वाडेकर, आमदार बापूसाहेब पाठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संयोजक ॲड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, माजी आमदार लक्ष्मण माने, प्रा. डॉ. प्रकाश पवार, डॉ. नितीश नवसागरे, विजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी ‘भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी विचार मांडले. 

शरद पवार म्हणाले, “सामाजिक चळवळीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. २४ ऑक्टोबरला सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुणे करार झाला होता. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक संशोधन केंद्राचे उद्घाटन होतेय, ही सकारात्मक गोष्ट आहे. बाबासाहेबांनी दाखवल्या दिशेने वाटचाल करण्याचे काम, त्यांच्या मूल्यांचा विचारविनिमय करता येणार आहे. देशात काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, पण तरीही संविधानाचा पाया भक्कम असल्याने संसदीय साधनांचा आधार घेऊन भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे. याच संविधानामुळे भारत एकसंध आहे.”

“देशापुढील आव्हाने हळूहळू गंभीर होत आहे. अनेक विचारांचे, भूमिकांचे लोक संसदेत आहेत. कधीकधी चिंता वाटावी, असे चित्र दिसते. निर्णय घेण्याचे व्यासपीठ बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. परंतु, संविधानाच्या चौकटीबाहेर जाता येत नसल्याने अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो. देशातील प्रत्येक समस्येवर संविधानात उत्तर आहे. त्यामुळे संविधानाचा व्यापक अर्थ, महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थात्मक काम उभारणे गरजेचे असून, आज स्थापन झालेल्या केंद्रामुळे हे काम होईल. समतेचा पुरस्कार करणारे लिखाण व्हावे, या विचारांचा प्रसार व्हावा, संविधानाच्या विचारांवर चालणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना प्रोत्साहित करावे आणि बाबासाहेबांचे विचार, संविधानाची मूल्ये जनमानसात पोहोचवण्याचे काम करावे,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.

बाबा आढाव म्हणाले, “भारतीय संविधान हा आपल्या देशाचा पाया आहे आणि संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी संविधानाचे तत्व समजून घेणे आवश्यक आहे. आपण फक्त नियमांचे पालन करणारे नागरिक नसून, त्याचे मूल्य जाणणारे, जबाबदार नागरिक असणे महत्त्वाचे आहे. वर्तमान काळात वाढत असलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी लोकशाहीला केवळ कायद्याचे पालन पुरेसे नाही; त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रियपणे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे. कृतिशील कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.

डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, “हा देश एकात्म, एकसंध ठेवायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर आपल्याला एकत्रितपणे अन्यायाच्या, चुकीच्या गोष्टी व लोकांच्या विरोधात लढायला हवे. लोकशाही फक्त निवडणुका घेण्यात नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे रक्षण करण्यात आहे. जात, धर्म, भाषा किंवा प्रांत यांसारख्या भिंती पाडून परस्परांचा सन्मान करणे ही खरी देशभक्ती आहे. विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सत्तेच्या किंवा समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात आपण आवाज उठवतो, तेव्हाच लोकशाही मजबूत होते.”

डॉ. सुहास पळशीकर म्हणाले, “संविधानिक नैतिकता जपण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. कायदे करून बंधुभाव लादता येत नाही. राष्ट्राची एकात्मता टिकून राहण्यासाठी बंधुभावाचा अंगीकार करायला हवा. राष्ट्राचा आत्मा असलेल्या नागरिकांना या तीनही तत्वांची जाणीव करून देण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपली लोकशाही जगात सर्वात मोठी आहे, असे मानून आपण आत्मसंतुष्ट होतो. आजच्या भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.”

अ‍ॅड. शारदा वाडेकर म्हणाल्या, “माहात्मा फुले यांनी विविध धर्मग्रंथ, पुराणांचा अभ्यास करून सत्यशोधक समाजाला मार्ग दाखवण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला. निर्मिक हा निर्गुण व निराकार आहे. मूर्ती येते तिथे मध्यस्थ येतो. सत्यशोधक समाजाची निर्मिती करताना फुले यांनी मध्यस्थाला दूर ठेवण्यासाठी, भटशाहीकडून नाडल्या जाणाऱ्या समाजाला दिलासा देण्यासाठी त्यांनी काम केले. फुले ब्राह्मणद्वेषी नव्हते, तर ब्राह्मण्यवादाला विरोध होता.”

प्रास्ताविकात अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले की, संविधानाची नैतिकता अधोरेखित करण्याचा आमच्या सामाजिक अभ्यास केंद्राचा प्रयत्न राहणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांशी समन्वय साधून अभ्यास प्रकल्पासंदर्भात चर्चा, संवाद करणे, यावर भर दिला जाणार आहे. डॉ. आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रास्ताविक केले. अरुण खोरे यांनी स्वागतपर भाषण केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. विजय जाधव यांनी आभार मानले.

खरोखर यांना वाहतुकीची कोंडी फोडायची आहे काय ?

पुणे-चांगले रस्ते उखडून पैकेज नावाखाली पुन्हा पुन्हा ते करण्याचे घाट घातले गेले तरीही पुणेकरांच्या कराच्या पैशातून तब्बल ३०० कोटी खर्चून २०२३ मध्ये बनवलेले रस्ते दोन वर्षांतच उखडले आहेत खुद्द मुख्यमंत्र्यांना खड्डे दुरुस्त करा हो.. अशी आळवणी महापालिका आयुक्तांकडे करावी लागली.अन आता त्यांनंतर जरी महापालिकेच्या पथ विभागाला जाग आली असली तरी उशिरा जाग आली आहे असेच म्हणावे लागते कारण कुठले तरी रोज रोज इव्हेंट राबवित त्यावर चालणाऱ्या एखाद्या कंपनीच्या गळ्यात गळा घालून त्यांनी आणि वाहतूक नियोजन विभागाने सायकल ट्रॅक उभारून रस्ते भले मोठे रुंद करण्या ऐवजी अरुंद करून ठेवले १० वर्षे हून अधिक काळ झाला यावर लोक ओरडतात,ओरडून थकल्यावर दुचाकीस्वारांनी ते आता पदाक्रांत हि करून टाकले आणि आताशी कुठे झोपी गेलेले महापालिकेचे पथ विभाग जागे झाले आहे जे अर्थात पोलिसांच्या वाहतूक शाखेने जागे केले आहे.आणि हे सायकल ट्रॅक काढून घेण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे.पण हा घेताना नेहमीप्रमाणे अवदसा आठवणार नसेल तर हा पथ विभाग कसला ? या निर्णया बरोबर यांनी म्हणतात,पदपथ..जे पुणेकरांच्या हक्काचे कायम मानले गेले ते छोटे करण्याचा निर्णय घेतला आहे.हि अवदसा पथ विभागालाच आठवू शकते यात नवल नाही.

आधीच पदपथ यांनी ठेवलेत कुठे याचा भिंग लावून शोध घ्यावा लागेल जिथे आहेत तिथेही हे सुव्यवस्थित नाहीतच,आणि अगदीच अरुंद असे पदपथ आहेत तेही आता हे मोडायला निघालेत हि अवदसा नाही तर काय आहे ?

ज्या शहरांचे पदपथ ,रस्ते मोठ्ठाले त्या शहराचे सौंदर्य देखील वाखाणण्याजोगे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून आलेले आहे. BRT चा घाट घालून शेकडो कोटींची उधळपट्टी केलेली BRT आता नाहीसी झाली ‘सायकल चालवा..ची आरोळी देत सायकली आणल्या ,सायकल ट्रॅक करून शेकडो कोटी उधळले.आणि आता पदपथांची बारी आली आहे..

शहराच्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी METRO आणली…तरीही यांची हि नाटके सुरूच आहेत.कारण मेट्रो आणूनही पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार नव्हती हे देखील अधोरेखित होतेच…पण मिरवून घेतले,कौतुक करवून घेतले आणि पुन्हा पाढे पंचावन्न..

खरा प्रश्न आता असा पडणार कि,यांना खरोखर वाहतूक कोंडी सोडवायची आहे कि कायम ठेवून असाच उधळपट्टी कारभार चालवायचा आहे ? वाहने अजून मोठ्या संख्येने रस्त्यावर येतील,येत राहतील कारण महापालिकेच्या हद्दीला आपण लगाम घालणार नाही त्यामुळे शहराचा अजगर फुगत राहील, गलेलठ्ठ होत राहील पण शहाराच्या अंतर्गत आणि शहराबाहेरील रस्त्यांच्या रुंदीच्या नियोजनाचे काय ? ती अशीच छोटी ठेवायची… म्हणजे वाहतूक कोंडी होतच राहील आणि शेकडो कोटीच्या योजना आणायची संधी मिळतच राहील.. असे तर नाही ना ? रस्ते मोठे करणे त्यांचे नियोजन करून अंमलात आणणे हि कामे वस्ती होण्यापूर्वीच म्हणजे वसण्यापूर्वीच व्हायला हवीत,अनधिकृत बांधकामे बडी बडी इमारते अगोदरच पाडायला हवीत पण कारवाई होते ती पथारीवाले,स्टोल धारक आणि टपरी वाल्यांवर.. राजीव अगरवाल,अरुण भाटिया यांच्या काळात झाली तशी अनधिकृत बांधकामे निर्मूलनाची कारवाई नंतर कधी का नाही झाली आणि आता तशी कारवाई यांच्याकडून होणार आहे काय ? कुठल्या किती रुंदीच्या रस्त्यांवर किती मजली इमारतीला परवानगी असावी ? हॉटेल्स आणि कंपन्यांची पार्किंग व्यवस्था रस्त्यावर येते काय? याची शहानिशा न करता त्यांना परवाने द्यावेत काय? याचा कुठलाही विचार महापालिकेने कधी केला आहे का नाही ? असाही प्रश्न विचारावा लागणार आहे.मग अशा स्थितीत आपण वाहतूक कोंडी मुक्तीची स्वप्ने पहावीत काय हाही प्रश्न आहेच.

शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौकांत वाहतूक कोंडी होत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाने आता कुठे माहिती संकलित केली आहे. त्यावर वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत एका महिन्यात त्वरित होणारी कामे पूर्ण करून रस्ते मोठे व अडथळा मुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पादचारी मार्ग लहान करणे, जागा ताब्यात घेणे अशा प्रकारच्या कामांना वेळ लागणार असल्याचे सांगितले आहे .पुण्यातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी का होत आहे? याचे कारणे आत्ता शोधून त्याचा अहवाल पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह या विभागांमधील अधिकारी यांनी सादर केला आहे.निवडणुकीच्या तोंडावर शहरातील वाहतूक कोंडीचा फोडण्यासाठी महापालिका व पोलिसांवर दबाव निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार प्रयत्न करूनही वाहतूक कोंडीत जागतिक स्तरावर पुण्याचा चौथा क्रमांक लागत आहे. टॉमटॉम या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, पुण्यात १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ३३ मिनिटांचा वेळ लागत आहे. त्याचा परिणाम पुणेकरांवर होत आहे.महापालिकेने माहिती संकलित केली असता, त्यात रस्त्यातील अतिक्रमणे, गरजेपेक्षा मोठे पादचारी मार्ग, सायकल मार्ग, पडलेले खड्डे, ओबडधोबड पॅचवर्क यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे प्रमुख रस्त्यांवर हातगाड्या, पथारी, स्टॉलचे अतिक्रमण, पादचारी मार्गांवर झालेले अतिक्रमण, अवैध बांधकाम यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तेथील जुजबी कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे थाटली जात असल्याने कोंडी होत आहे.

स्वामी चैतन्यनंद सरस्वती ऊर्फ ​​पार्थसारथीचे कारस्थान: 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ : गरीब विद्यार्थिनींना धमकावण्याचाही आरोप

0

शंकराचार्य पीठाने आरोपी चैतन्यानंदशी संबंध तोडले

नवी दिल्ली:दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चमध्ये अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप स्वामी चैतन्यनंद सरस्वती ऊर्फ ​​पार्थसारथी यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने विद्यार्थ्यांना धमक्या देऊन, अश्लील संदेश पाठवून आणि परदेश प्रवासाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने विशेषतः ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग) कोट्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना लक्ष्य केले.

२००९ व २०१६ मध्येही आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर यावेळी ऑगस्ट २०२५ मध्ये नवीन एफआयआर दाखल करण्यात आला.पोलिस तपासानुसार तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापकही आरोपीस मदत करत होते. ते विद्यार्थिनींवर त्यांच्या चॅट्स डिलीट करण्यास दबाव आणत आणि त्यांना गप्प राहण्यास सांगत असते. पोलिसांनी ३२ विद्यार्थीनींचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी १७ जणांनी स्पष्ट आरोप केले आहेत.

काही विद्यार्थिनींना परदेश दौऱ्याचे आमिष

पोलिस तपासात असे दिसून आले आहे की स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने धमकी आणि प्रलोभनाची रणनीती वापरली. तो वारंवार सोशल मीडिया आणि एसएमएसद्वारे अश्लील संदेश पाठवत असे. त्याचे संदेश असे असत की, “माझ्या खोलीत या, मी तुम्हाला परदेशात घेऊन जाईन. तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. तुम्ही माझे ऐकले नाही तर मी तुम्हाला परीक्षेत नापास करेन.’ आरोपी रात्री विद्यार्थीनींना त्याच्या खोलीत बोलावत असे आणि नकार दिल्यास त्यांना कमी गुण देण्याची धमकी देत ​​असे. ईडब्ल्यूएस कोट्याखाली शिकणाऱ्या विद्यार्थीनींना लक्ष्य केले जात असे. कारण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते आणि शिष्यवृत्तीवर होते. पोलिसांनी सांगितले की ३२ विद्यार्थीनींचे जबाब घेतले. त्यापैकी १७ जणींनी थेट लैंगिक छळ व मानसिक छळाची तक्रार केली. आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर आपले जबाब नोंदवले आहेत.

या गंभीर प्रकरणाच्या उजेडात आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कर्नाटकातील शृंगेरी येथील श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणाम्नय श्री शारदा पीठाने आरोपींशी संबंध तोडले आहेत. संस्थेने एक सार्वजनिक निवेदन जारी करून म्हटले आहे की स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थसारथी हे त्यांच्या संस्थेचे प्रतिनिधी नाहीत.

बनावट डिप्लोमॅटिक नंबरची कार जप्त, दुसरा एफआयआर दाखल:तपासात पोलिसांनी असंख्य डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. ५० हून अधिक मोबाईल फोन स्कॅन केले आहेत. त्यापैकी बरेच मोबाईल विद्यार्थीनींनी आरोपीच्या दबावाखाली डिलीट केले होते. या प्रक्रियेत तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापकांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा राहू नये यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात होता.

वडील आणि मुलीच्या नात्यातील हळवी बाजू मांडणाऱ्या ‘तू माझा किनारा’चा पोस्टर प्रदर्शित

  • बहुचर्चित ‘तू माझा किनारा’ चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा संपन्न
  • भूषण प्रधान, केतकी नारायण आणि केया इंगळेची हृदयाला भिडणारी तिकडी – ‘तू माझा किनारा’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज

तू माझा किनारा चित्रपटाचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये छोट्या मुलीच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. या कुटुंबामागचं खरं गूढ काय? पोस्टरमधील आई म्हणजेच केतकी नारायण आणि बाबा म्हणजेच भूषण प्रधान तर नाहीत? लायन हार्ट प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत “तू माझा किनारा” या मराठी चित्रपटाचा पहिला अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची नवी लहर निर्माण केली आहे.

पोस्टरमध्ये दिसणारं केतकी, भूषण आणि केया यांचं हसतमुख क्षणचित्र पहिल्या नजरेला आनंदाचं वाटतं. पण त्या नजरेमागे नात्यांची एक वेगळी छटा दडलेली आहे, असं वाटत आहे. जी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. “तू माझा किनारा” हा केवळ कुटुंबकेंद्री सिनेमा नाही, तर प्रत्येक घरात घडणाऱ्या भावनिक प्रवासाचा आरसा आहे.

या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत संवेदनशीलतेने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन एल्धो आयझॅक यांचे असून, कथानकाला वास्तववादी स्पर्श देण्याचं मोठं काम त्यांच्या कॅमेऱ्याने केलं आहे. संकलन सुबोध नारकर यांनी केले असून अनिल केदार यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

“तू माझा किनारा” हा भावनिक प्रवास ३१ ऑक्टोबर रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. चित्रपटात मुक्ताच्या भूमिकेत सुप्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार केया इंगळे असून भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांची पात्र अजून उलगडली गेली नाहीत. पोस्टर पाहून प्रेक्षकांना लगेच जाणवतं की हा चित्रपट केवळ एका कुटुंबाची कथा नाही, तर प्रत्येक घरातल्या नात्यांचा आरसा आहे. कधी आनंद, कधी ओझं, कधी हसू आणि कधी आसवं या सर्व भावनांचा किनारा प्रेक्षकांना या चित्रपटात सापडेल.

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

0

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सोलापूर, दि. २४ :- जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते त्याप्रमाणेच अतिवृष्टी, ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दारफळ गावात पुरामुळे मोठे  नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि  गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे, शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी शासन मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीलाही स्वतंत्र मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दौऱ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

GST वरील व्यापारी संवाद अभियानावर केंद्रीय मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण

0

हा उत्सव नाही, अभियान आहे GST वरील व्यापारी संवाद अभियानावर केंद्रीय मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण

पुणे – GST कमी केल्याने , ‘धन्यवाद मोदिजी ‘ असे व्यापारी संवादाचे अभियान सुरु करणाऱ्या केंद्रीय मंत्री मोहोळांना, एकीकडे तुमचे नेते पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला जात असताना तुम्ही GST कमी केला म्हणून व्यापाऱ्यांसमवेत उत्सव साजरा करता काय ? अशा प्रश्नाला तोंड द्यावे लागले यावेळी पहा मोहोळ यांनी काय उत्तर दिले …

GST कमी केल्याने ‘धन्यवाद मोदीजी’ पुण्यात व्यापारी संवादाचे भाजपचे अभियान

अजितदादांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार-खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार

0

मुंबई, २४ सप्टेंबर २०२५ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.

अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरु करावे अशीही सूचना केली आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न

पुणे-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थ भागात कोथिंबीर वडी ,सुरळी वडी ,पाट वडी आणि आळू वडी व गोड भागात रबडी मालपुवा ,उपवास मोदक , लाल भोपळा बासुंदी ,मकाणा लाडू ,शिंगाडा नानकटाई ,उपवास धोंडस हे पदार्थ होते. २५० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरितास् किचनच्या सरिता पद्मन होत्या. परीक्षक म्हणून किशोर सरपोतदार आणि कोमल पारखे यांनी काम पाहिले.

पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – स्वाती पंडित द्वितीय क्रमांक – सीमा नलावडे तृतीय क्रमांक – विद्या ताम्हणकर उत्तेजनार्थ – १. दिपाली धस २. राजश्री सिद्धेश्वर ३. मनीषा जाळीन्द्रे. यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – पूनम परमार द्वितीय क्रमांक -शीतल भळकर तृतीय क्रमांक – पुण्या सोनी उत्तेजनार्थ – १.मंगला हंकारे ,२. वर्षा तन्ना . यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० असे बक्षिसाचे स्वरूप होते. या प्रसंगी छाया कातुरे , संगीता बागुल , प्राजक्ता ढवळे यांची विशेष उपस्थिती होती.

लोकमान्य नगर पुनर्विकासावरील स्थगिती उठवा-

रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे दी २४:लोकमान्य नगर येथील इमारतींच्या पुनर्विकासाला शासनाने दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
धंगेकर यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हठले आहे की,लोकमान्य नगर येथील म्हाडा वसाहत सन 1961 ते 62 च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे साठ वर्षांपूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या वसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून सद्यस्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरावस्था झालेल्या इमारतींमध्ये राहत आहेत. या ठिकाणी 53 इमारती असून सर्व इमारतीमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे.
येथील इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाहीत. येथील इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर झाल्यास नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. परंतु काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटकांनी शासनाची दिशाभूल करून एकात्म विकासाचा कुठलाही आराखडा नसताना देखील पुनर्विकासाला खीळ घातली आहे. शासनाने स्थानिक रहिवाशांची भावना विचारात घेऊन पुनर्विकासाला दिलेले‌ स्थगिती तातडीने उठवावी व स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा. अशी मागणी धंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अडीच कोटीची फसवणूक सायबर चोराला तेलंगणात पकडले

पुणे – मुंबई आयआयटीतील एका प्रतिष्ठित प्राध्यापकाचे नाव वापरून, शासनाच्या एआय आणि ड्रोन प्रकल्पांचे आमिष दाखवून एका प्रसिद्ध अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या प्रमुखाची २ कोटी ४६ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोराला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मोठी रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सितैया किलारु (वय ३४, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित शिक्षण संस्थेच्या प्रमुखाला आरोपीने वारंवार ईमेल आणि व्हॉट्सॲप कॉल करून दिशाभूल केली. मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाचे नाव वापरून त्याने शासनाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.

या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटली. तांत्रिक तपासामध्ये आरोपी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, तपास पथकाने तात्काळ हैदराबादला धाव घेतली. साईनगर, प्रगतीनगर, निजामपेठ, गच्चीबावली आणि याप्रल यांसारख्या विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर, पोलिसांनी याप्रल येथे सापळा रचून सितैया किलारुला शिताफीने अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीनेच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून १० डेबिट कार्ड्स, १३ पासबुक, १५ चेकबुक, ५ सिम कार्ड्स, सोन्याच्या खरेदीच्या पावत्या, इतर महत्त्वाची कागदपत्रे आणि ७० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, एक टॅब, एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याकडून १ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ४० लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार आणि ८ लाख रुपयांची किया सोनेट कारही जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ४९ लाख ७५ हजार रुपये आहे.

न्यायालयाने आरोपीला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, जेणेकरून या प्रकरणाचा अधिक तपास करता येईल. या घटनेमुळे सायबर फसवणुकीच्या धोक्यांबद्दल पुन्हा एकदा जागरूकता निर्माण झाली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

0

सोलापूर, दि. २४ :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, त्यांना अन्न, पाणी, वीज व औषधांची सुविधा पुरवावी, तसेच ज्यांचे धान्य भिजले आहे त्यांना तत्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिल्या.

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुनी मंगल कार्यालय, संगोबा रोड, करमाळा येथे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असून उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन  नागरिकांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

अमली पदार्थांविरोधात पुण्यात ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ चे आयोजन

पुणे : अंमली पदार्थांविरोधात एकत्रितपणे लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाची बहुचर्चित ‘आपलं पुणे’ मॅरेथॉन जागतिक स्वरूपात झळकणार आहे. पुण्याच्या अद्वितीय मॅरेथॉन परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा १२ ऑक्टोबर रोजी रविवारी पहाटे चारपासून (प्रत्येक गटानुसार) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून सुरू होणार आहे.

या मॅरेथॉनमध्ये सुमारे १०,००० धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामध्ये नामवंत आंतरराष्ट्रीय धावपटू, देशभरातील धावपटू, रनिंग ग्रुप, कॉर्पोरेट संघ, लष्कर, पोलिस कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचा आणि फिटनेसप्रेमींचा समावेश आहे. ही स्पर्धा लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आली असून, पंचशील रियल्टी हे मुख्य प्रायोजक आहेत. यंदा विजेत्यांना एकूण १९.५३ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके नामांकित खेळाडूंना; तसेच विविध वयोगटातील विजेत्यांना देण्यात येणार आहेत. पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखान्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली, यावेळी लोहा फाउंडेशन’चे सचिव आणि आयोजक रवींद्र वाणी,लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल,सहाय्यक पोलिस आयुक्त,पुणे श्री.साईनाथ ठोंबरे, आयर्न मॅन डॉ. कौस्तुभ राडकर उपस्थित होते.

‘Say No to Drugs, Say Yes to Run’ या परंपरेला पुढे घेऊन जाऊन ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन’ समाजात अमली पदार्थमुक्त जीवनशैलीचा प्रसार करणार असून, आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मकतेची संस्कृती रुजवण्याचा संदेश देणार आहे, असे संयोजकांनी नमूद केले.

‘लोहा फाउंडेशन’चे सचिव आणि आयोजक रवींद्र वाणी म्हणाले, की “पुण्यात आधीपासूनच धावण्याची संस्कृती आहे. यंदाचा आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा म्हणजे धावण्याच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा गौरव आहे. पुणे वर्ल्ड मॅरेथॉन शहराला जागतिक व्यासपीठावर नेईल आणि संपूर्ण समाजाला अमली पदार्थांविरोधात एकत्रित करण्यास आणि निरोगी जीवनशैलीकडे घेऊन जाण्यास मदत करील.”

लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल म्हणाल्या, की ‘मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे नाही. फिटनेसचा सण साजरा करताना आपली सामाजिक जबाबदारीही ओळखली पाहिजे. मुलांचे आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करून आपण समाजाचे देणे फेडण्यासारखे आहे.’

मार्ग

‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन’ची सुरुवात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून होईल. त्यानंतर धावपटू राधा चौकातून बाणेर रोडने साई हाउलँडकडे जाऊन बालेवाडी हाय स्ट्रीट – दसरा चौक या मार्गाने धावतील. त्यानंतर धावपटू औंध–बाणेर लिंक रोड – बाबासाहेब आंबेडकर पूल – नवीन डीपी रोड – कास्पटे चौक – बीआरटी मार्ग – जगताप फेरीलँड– डांगे चौक – पुनावळे चौक – संत तुकाराम महाराज पूल – आदर्शनगर बीआरटी – निगडी ब्रिज असा प्रवास करून पुन्हा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे परततील.

इच्छुक नोंदणीसाठी http://www.puneworldmarathon.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

गुलटेकडीच्या वसुंधरा मसाज सेंटर वर छापा,6 पिडीत महिलांची सुटका

0

पुणे-कल्याणीनगर , विमाननगर,आणि कोरेगाव पार्क पाठोपाठ आता स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतही स्पा सेंटर्स सुरू झाले आहेत. आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या दोन स्पा सेंटरवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने आठ महिलांची सुटका केली. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या Recovery ची जबाबदारी साभाळणार्या एका कर्मचाऱ्याच्या आशिर्वादाने हे स्पा सेंटर्स सुरू असल्याचे वृत्त येथे पसरले आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती अशी कि,’आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणा-या मसाज सेंटरवर छापा कारवाई करुन ०६ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी कि,’दिनांक २३/०९/२०२५ रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत असलेबाबत गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली.या माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर कडील व स्वारगेट पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि. २३/०९/२०२५ रोजी वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर गुलटेकडी परिसर येथे छापा कारवाई करुन ०६ पिडीत महिलांची सुटका करुन आयुर्वेदिक मसाज सेटर मॅनेजर नामे वैशाली रंगनाथ विसपुते वय ३१ वर्षे रा. इंद्रप्रस्थ सोसा. टिळेकरनगर कोंढवा, पुणे हिच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.स. क. १४३, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन ०६ पिडीत मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यशवंत निकम हे करीत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर निखील पिंगळे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, मसापोफौ छाया जाधव, सपोफौ अजय राणे, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, इम्रानखान नदाफ, अमेय रसाळ व किशोर भुजबळ व स्वारगेट पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यशवंत निकम व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

१८६९४ पुणेकरांच्या छतावर होतेय ९१ मेगावॅट विजेची निर्मिती

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना-१५१ कोटींचे अनुदान झाले प्राप्

पुणे, दि. २४ सप्टेंबर, २०२५ – उन्हामुळे घराचे छत तापून एसीचे वीजबिल वाढविण्यापेक्षा त्याच छतावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर प्रकल्प साकारुन आपले वीजबिल शून्य करण्याचा पर्याय १८६९४ पुणेकरांनी पसंत केला आहे. या योजनेतून त्यांना १५१ कोटींचे अनुदान देखील मिळाले असून, ९०.६२ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत आहे. या कुटुंबांची भविष्यातील विजबिलाची चिंता आता मिटली आहे.

घरगुती वीज ग्राहकांना त्यांच्या दरमहाच्या वीजबिलापासून मुक्तता देण्यासाठी तसेच त्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजनेची सुरुवात केली आहे. देशभरात या योजनेतून ५८८९ मेगावॅट इतकी क्षमता विकसित झाली आहे. तर महाराष्ट्रात २९१८११ घरांवर प्रकल्प साकारले असून, त्याची क्षमता ११०० मेगावॅटवर पोहोचली आहे. पुणे परिमंडलातही या योजनेचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३१६४९ घरगुती ग्राहकांनी सूर्यघरसाठी नोंदणी केली असून, पैकी १८६९४ घरांवर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून ९०.६२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. ७३९७ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते देखील लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.

महावितरण पुणे परिमंडलात गणेशखिंड मंडलामध्ये ७३१२, पुणे ग्रामीण मंडल ५१४६ व रास्तापेठ मंडलात ६२३६ प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यांची स्थापित क्षमता अनुक्रमे ३८.२१, २१.०७ व ३१.३४ मेगावॅट इतकी आहे. अनुदानावितरणामध्येही अनुक्रमे गणेशखिंडमध्ये ६३५६ लाभार्थींना ६२.४ कोटी, पुणे ग्रामीण ४४८० लाभार्थींना ३६.४ कोटी व रास्तापेठ मंडलातील ५३५० लाभार्थींना ५२.५८ कोटी असे एकूण १५१ कोटींचे अनुदान पुणे परिमंडलातील लाभार्थींना मिळाले आहे.

·        अनुदानाचे स्वरुप : ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. पहिल्या दोन किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ३० हजार रुपये तर ३ किलोवॅट प्रकल्पाला ७८ हजारांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. तर गृहनिर्माण संस्थांना या योजनेतून प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये प्रमाणे ५०० किलावॅट क्षमतेपर्यंतचे अनुदान दिले जाते.

·        स्वस्तात कर्ज उपलब्ध – ज्यांना प्रकल्प बसविण्याची इच्छा आहे. परंतु, आर्थिक नियोजनामुळे शक्य होत नाही. अशांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’ पोर्टल विकसित केले आहे. सूर्यघर प्रकल्पाची नोंदणी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर केल्यानंतर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर कर्जाची मागणी करता येते. नामांकित राष्ट्रीय बँका ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज उपलब्ध करुन देतात. विशेष म्हणजे याचा व्याजदर गृहकर्जापेक्षाही कमी आहे.

पुणेकरांनी लाभ घ्यावा- सुनिल काकडे

पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्व जाणतात. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करुन या योजनेत सामील व्हावे. महावितरणने ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. अनुदानही तातडीने प्राप्त होते. तसेच यासाठी लागणारे वीजमीटर सुद्धा महावितरणतर्फे मोफत दिले जात आहे.