Home Blog Page 303

सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

प्रधानमंत्री यांनी सौर ऊर्जा प्रकल्पातील लाभार्थ्यांशी साधला संवाद

मुंबई,दि.२५ : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतक-यांनी नैसर्गिक शेतीवर भर देवून कमी खर्चात जास्त उत्पन्नावर आधारित पीक पध्दतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे काळाची गरज आहे.. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

राजस्थान बौसंवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक वर राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि पी एम कुसुम सी बी – मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणाली द्वारे राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतक-यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतक-यांनी केमिकल मुक्त शेती करण्यासाठी भर दिला पाहिजे. झिरो कॉस्ट फार्मिंग ला देखील महत्त्व दिले पाहिजे. . झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेती ऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,भारताला आज रोजी एक लाख करोड खाद्यतेलाच्या आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटची देखील सध्या खूप मागणी आहे हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनाआर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल.राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांची नैसर्गिक शेतीवरील व्याख्यांनाचे शेतक-यांनी जरूर ऐकावे असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सौर उर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यी शेतक-यांचा परिचय करून दिला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा प्रकल्प लाभार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या प्रकल्पाच्या यशोगाथा

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांचे वाढले उत्पन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना प्रकल्पाची यशोगाथा प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या.किकवारी,तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील शेतकरी सुनील सिताराम काकुलते यांनी पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत ४० एकर जमीन सिंचनाखाली आणली असून यामुळे दरवर्षी दोन लाख रुपये इन्कम वाढलेला आहे.५० ते ६० लोकांना यामुळे रोजगार प्राप्त झाला असल्याचे सांगितले. भेंडी महळ तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील शेतकरी तुषार वानखेडे यांनी १० मेगावॉट पी एम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची योजना ६.५ एकरं मध्ये राबवली.यापूर्वी रात्री वीज नसल्यामुळे अडचणी निमार्ण होत होत्या. शेतीला पाणी कमी पडत असल्यामुळे हरभरा सारखी पीक घेतली जात होती. आता पपई आणि केळीच पीक घेऊन ३५ हजार ऐवजी ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे त्यांनी सांगितले.

सतेफाड तालुका जाफराबाद जिल्हा जालना मधील सुरत जटाळे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून पाच एच पीचा पंप बसवला असल्याचे सांगून या योजनेमुळे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असेल पंप बसवल्यापासून त्यांचा वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपयांवरून दीड लाख रुपये पर्यंत गेले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतीमध्ये घरातीलच तीन व्यक्ती काम करत असून मुलाच्या शिक्षणासाठी आणि पुन्हा शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी आलेल्या नफ्याचा उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बापकाळ तालुका जिल्हा जालना येथील शेतकरी ताई किशोर सावंत म्हणाल्या की, पीएम कुसुम बी – मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये २ एकर क्षेत्रात तीन एच. पी. चा सोलर पंप बसवला आहे.यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढ झाली आहे. त्याचबरोबर उरलेल्या इन्वर्टर मध्ये च्या माध्यमातून घरात विज वापर केला जातो असेही त्यांनी सांगितले.

माई वस्ती पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील माधुरी धुमाळ यांनी पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.0 या योजनेत दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प 10 एकर मध्ये उभारला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वार्षिक पंधरा लाख उत्पन्न या प्रकल्पातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाकवड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील चंदू पावरा या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम बी- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये 7.5 एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप बसवला असून त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध होऊन पाण्याच्या उपलब्धतेमुळे मका गहू भुईमूग या पिकांची पेरणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील गोपाळ महल्ले यांनी पीएम कुसुम सी- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत लाभ घेतला आहे. या सर्व प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी पाच लाख रुपये मिळत असून या शेतकऱ्यांनी सतराशे लोकांना वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांची विजेची समस्या मिटली असून या भागामध्ये शेतकरी दिवसा दिवसा वीज उपलब्ध होत असल्यामुळे आनंदी असल्याचे सांगितले.

पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 व पीएम कुसुम बी-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत ६ लाख शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे.३२.०८ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. सह इतर विविध योजनेतून राज्यात आतापर्यंत ६ लाख ४६ ६९४ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.या योजनेमुळे २०.९५ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ !

0
  • पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता
  • भाजपा पक्ष संघटनेकडून मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी

पुणे/दिल्ली
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तामिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर लगेचच मोठी संघटनात्मक जबाबदारी मोहोळ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.

पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर युवा मोर्चा, शिक्षण मंडळ, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापौर, प्रदेश महामंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजपा सहप्रमुख असा संघटनात्मक प्रवास केला आहे. सलग तीस वर्ष संघटनेसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल पक्षाकडून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय निवडीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाचा मोहोळ यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नवी जबाबदारीही या भूमिकेतून निभावणार आहे.

‘माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. नव्या जबाबदारीच्या रूपाने पार्टीने दाखवलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल. नव्या जबाबदारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वात नवी जबाबदारी पार पाडेल, हा विश्वास व्यक्त करतो’, असेही मोहोळ म्हणाले.

भिडे पूल,आणि नदी पात्र परिसरात श्रमदानाने स्वच्छता मोहिमेत नवल किशोर,पृथ्वीराज, चंद्रन, दिवटे सहभागी

पुणे- केवळ कर्मचारी , अधिकारी यांना प्रबोधन करणे याहून आता महापालिकेचे आयुक्त , अतिरिक्त आयुक्त अशा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत श्रमदानासाठी सहभाग नोंदविलाआहे आज “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत भिडे पूल, संपूर्ण नदी पात्र परिसरात श्रमदान स्वच्छता मोहिम संपन्न झाली .
पुणे महानगरपालिका उप आयुक्त, परिमंडळ क्र. ५ कार्यालयाच्या अखत्यारीत कसबा विश्रामबागवाड़ा क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत “एक दिवस, एक तास-एक साथ” या श्रमदान उपक्रम अंतर्गत “भिडे पूल, संपूर्ण नदी पात्र परिसरात ” श्रमदान स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमात महापालिका आयुक्त, नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) प्रदिप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी उपस्थित राहून श्रमदान स्वच्छता मोहिम मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच महापालिका आयुक्त यांनी सुचना दिले प्रमाणे संपुर्ण नदीपात्रातील स्वच्छता सेवक व यांत्रिक पद्धतीने करणेत येत आहे. यावेळी उप आयुक्त संदिप कदम (घनकचरा व्यवस्थापन), उप आयुक्त परिमंडळ क्र. ५ सुनिल बल्लाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश बालगुडे, तिमय्या जंगले, किसन दगडखैर, उप अभियंता सुहास जाधव व सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, सेवक, महाविद्यालय विद्यार्थी, स्वच्छता संस्था, ह्युमन मॅट्रिक संस्था सेवक उपस्थित होते.

कर्णबधिर आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सुहृद मंडळ प्रथम

विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे : कर्णबधिर विद्यार्थ्यांची आंतरशालेय एकांकिका स्पर्धा
पुणे : विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत हडपसरच्या सुहृद मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांनी मुलगी वाचवा ही एकांकिका सादर केली. घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेचे उद्घाटन अश्विनी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अ.ल. देशमुख, विद्या महामंडळ संस्थेचे कार्यवाह लिलाधर गाजरे, मुक बधिर विभागाचे महेंद्र अर्विकर व अश्विनी जोशी ,स्वाती साळवी, सुनीता  भांडगे , प्रवीण कदम हे उपस्थित होते. स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर, विनिता पिंपळखरे आणि सुधांशु पानसे आणि उषा उंडे यांनी केले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जोशी यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष राम रानडे व रोटरी क्लब ऑफ शिवाजी नगरच्या सदस्या रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचे सांघिक प्रथम पारितोषिक हडपसरच्या सुहृद मंडळाला मिळाला मिळाले असून त्यांनी ‘मुलगी वाचवा’ ही एकांकिका सादर केली. अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टला द्वितीय पारितोषिक मिळाले असून त्यांनी ‘शब्दाविना बंध आनंदाचे’ ही एकांकिका सादर केली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन भांडारकरच्या सुहृद मंडळाचे अर्जुन मोरे यांना मिळाले, सर्वोत्कृष्ट लेखन धायरीच्या सुहृद मंडळच्या मोबाईल चांगले काम करतो या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्कृष्ट नेपथ्य चिंचवडच्या मूकबधिर विद्यालयाला ‘बुद्धीची चातुर्य कथा’ या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्कृष्ट संगीत अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टला तर सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून हडपसरच्या सुहृद मंडळाच्या वैष्णवी म्हस्के हिला ‘सून’ या पात्रासाठी मिळाले.

सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे दि. 25 सप्टेंबर : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, कारागीर तसेच बचतगटांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. एस. के. केंजळे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगांकरिता कर्ज मर्यादा १०० लाख रुपये, सेवा उद्योग व कृषीपूर्वक उद्योगाकरिता कर्ज मर्यादा ५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

अर्जदार स्थानिक रहिवासी व कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेला असावा. वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे. केवळ नवीन उद्योजक, कारागीर, संस्था व बचतगट योजनेकरिता पात्र राहतील. १० लाखांवरील प्रकल्पासाठी व ५ लाखांवरील सेवा/कृषीपूरक उद्योगाकरिता अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. एका कुटुंबातील (पती-पत्नी) फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.अर्ज करतेवेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचा लोकसंख्येचा दाखला, प्रकल्प अहवाल व इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुणपत्रिका, अर्जदाराचे छायाचित्र जोडावे.

इच्छुकांनी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना KVIB एजन्सीची निवड करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय-२४ब, पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरीसमोर, एस.टी. स्टॅण्ड शेजारी, खडकी येथे संपर्क साधावा.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 3 ऑक्टोबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे दि. 25 सप्टेंबर : राज्यात १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, पुणे विभाग, पुणे तसेच श्री. विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या सर्व संघ- संघटना या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान व गौरव करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवनामध्ये करण्यात आले आहे. असे विशाल लोंढे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणीचे आवाहन

पुणे, दि. २५: १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे यादृष्टीने राजकीय पक्षांनी व ‍शिक्षण संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

विधान भवनात आयोजित पदवीधर व शिक्षक मतदार संघातील याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीत डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख, प्रतिनिधी तसेच विभागातील सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी, राजकीय पक्ष प्रमुख व शैक्षणिक संस्था प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ व शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरुन देणे आवश्यक आहे. भारतातील कोणत्याही विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. तसेच २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहील. शैक्षणिक संस्था एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करु शकतात. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावेत, चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पदवीधर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. कोणीही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असेही ते म्हणाले.

नाव नोंदणी वाढविण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी, सुट्टीच्या दिवशी गृहनिर्माण संस्थांमध्ये नाव नोंदणीसाठी शिबीरे आयोजित करावीत, आदी सूचना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केल्या.

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम

जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार ३० सप्टेंबर २०२५, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार २५ ऑक्टोबर, नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-गुरूवार ६ नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार २० नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार २५ डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार ३० डिसेंबर २०२५.

संगीतक्षेत्रात सलील चौधरींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे _ आबा बागुल

–  “इश्क सुफियाना”च्या माध्यमातून सुफी संगीताची आराधना

पुणे-बंगाली, हिंदी आणि मल्याळयम चित्रपटांना दर्जेदार संगीत देणारे दिवंगत संगीतकार सलील चाैधरी यांची कारकीर्द दिशादर्शक होती. बहुभाषात चित्रपटांना संगीत देणाऱ्या चौधरी यांनी विविध १३ भाषेत संगीत निर्मिती केल्याने त्यांचे चाहते देशभरात दिसून येतात. संगीता साेबतच ते बासरी, पियानो या संगीत वादनात देखील पारंगत होते. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकार यांना करिअरच्या सुरवातीच्या काळात संगीताचे प्रशिक्षण देण्यात त्यांचा पुढाकार होता. १५० पेक्षा अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे संगीत अजरामर झाले असून त्यांच्या कारकीर्दीला जन्मशताब्दी निमित्ताने उजाळा देणे महत्वपूर्ण असल्याचे मत पुणे नवरात्रौ महोत्सवाचे प्रमुख आबा बागुल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संगीत क्षेत्रात “सलीलदा..” नावाने प्रसिद्ध असलेल्या सलील चौधरी यांचे “सुहाना सफर और ये मौसम हसीन..” हे गाणे गात आदरांजली वाहण्यात आली.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर याठिकाणी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निवेदक संदीप पंचवाटकर निर्मित ‘इश्क सुफियाना’ या सुफी संगीताची आराधना करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे  आयाेजन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे वतीने करण्यात आले. नामांकित गायक संदीप उबाळे, प्रवीण अवचार, विनल देशमुख यांच्यासह गायिका राधिका अत्रे यांनी दर्जेदार सुफी गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. ईश्वराच्या एका नावाचा सातत्याने उच्चार करुन त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न सुफी गाण्यांचे माध्यमातून केला जातो. ईश्वराच्या प्रेमासाठी सुफी संगीत लिखाण केले जाते.मात्र, चित्रपट मध्ये त्यांच्या गोष्टीनुसार ते गरजेप्रमाणे कलाकार यांच्यासाठी वापरले जाते. पवित्र प्रेमाची व्याख्या सुफी गाण्यातून करण्यात येते. स्वत:ला विसरुन स्वत:चे सर्वस्व त्यागून ईश्वाराला प्राप्त करण्याचा प्रयत्न सुफी गायनातून केला जात असल्याची भावना निर्माते संदीप पंचवाटकर यांनी व्यक्त केली. गायिका राधिका आणि गायक विनल यांनी “साजदा तेरा साजदा..” या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर “सैय्या” .. “मितवा” ..”दगाबाज रे”..” इश्क सुफियाना”…”पिया रे पिया रे”..या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढत नेली. गायक संदीप, प्रवीण आणि विनल यांनी एकत्रित गायन केलेल्या “लगी तुमसे..तेरे मस्त…तेरा दीदार” गाण्यानी कार्यक्रम आणखी सजत गेला. “ख्वाजा मेरे”.. या गाण्यास तर रसिकांनी टाळ्यांची साथ देत, वन्स मोअर..म्हणत कार्यक्रमात उत्साह वाढवला. “वंदेमातरम” गायनाने कार्यक्रमाची जल्लोषात सांगता करण्यात आली.

यावेळी गायकांना विविध गाण्यांना सिंथेसायझर वादनास सईद खान, बासरी- सचिन वाघमारे,बेस गिटार – विजय मूर्ती, ऑक्टोपॅड- असीफ इनामदार, ढोलकी- हर्षद गनबोटे तर तबला वर गोविंद कुडाळकर यांनी सर्मपक साथ दिली.

याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,विलास रत्नपारखी, ॲड.चंद्रशेखर पिंगळे, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात वीणा गोखले यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात वीणा गोखले यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’पानशेतमध्ये २७ व २८ सप्टेंबरला होणाऱ्या महोत्सवाला छाया कदम, विठ्ठल काळे यांची उपस्थिती

पुणे: जागतिक पर्यटन दिवसानिमित्त परभन्ना फाउंडेशन, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा गिरीसागर टूर्सच्या संचालिका वीणा गोखले यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संयोजक गणेश चप्पलवार यांनी दिली.

गणेश चप्पलवार म्हणाले, “येत्या शनिवारी (दि. २७ सप्टेंबर २०२५) व रविवारी (दि. २८ सप्टेंबर २०२४) वरसगाव (पानशेत) येथील सूर्य शिबिर रिसॉर्ट येथे हा लघुपट महोत्सव होत आहे. यंदा महोत्सवात १७ राज्य आणि दोन देशांतून ६१ लघुपट, माहितीपटांपैकी १७ माहितीपट व लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोरचे आमदार शंकर मांडेकर, राज्य पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्त लेखाधिकारी चित्रलेखा खातू, ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार, उपसंचालिका शमा पवार, ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष पंकज देवरे आदी उपस्थित राहणार आहेत.

“महोत्सवाचा समारोप अभिनेत्री छाया कदम, अभिनेता विठ्ठल काळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उत्तम कलाकृतींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. तसेच वीणा गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार, तर अमित कुलकर्णी (गेट सेट गो हॉलिडेज) यांना ‘बेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स अवॉर्ड’ दिला जाणार आहे. यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. महोत्सवात ‘पानशेतमधील महोत्सवाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिणाम’ आणि ‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास आणि पर्यटनातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर परिसंवाद होणार आहेत,” असे गणेश चप्पलवार यांनी कळवले आहे.

मोहोळसाहेब,पुण्याला ही दुय्यम वागणूक कशासाठी ?आयआयएम चे उपकेंद्र पुण्यात आणत आहात

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) चे स्वतंत्र केंद्र होण्याऐवजी उपकेंद्र पुण्यात होणार, ही घोषणा निराशाजनक असून भाजपचे सरकार पुण्याला नेहमी दुय्यम वागणूक का देत आहे? असा सवाल माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केला आहे.

वास्तविक पाहता पुण्याला स्वतंत्रपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची गरज आहे. पुण्यातील उद्योजक, आयटी तज्ज्ञ आणि अभ्यासकही ही मागणी गेली अनेक वर्षे मांडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आयआयएम चे स्वतंत्र केंद्र पुण्यात न झाल्याने आयटी क्षेत्रातही नाराजीच्याच प्रतिक्रिया आहेत. पुण्यात जागा, शैक्षणिक वातावरण, शिक्षण तज्ज्ञ असं सगळं उपलब्ध असताना यापूर्वीच पुण्यात हे केंद्र उभं रहायला हवं होतं. पण, आधी नागपूर, नंतर मुंबई या भागांमध्ये हे केंद्र उभं रहातं, पुण्यात मात्र उपकेंद्र उभं रहातं, अशी खंत मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आयआयएमचे उपकेंद्र पुण्यात आणण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, त्याचा गाजावाजा झाला. प्रत्यक्षात ती गोष्ट निराशाजनकच आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मेट्रोचा प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, रिंग रोड प्रकल्प राबविताना पुण्याला दुय्यम वागणूक दिलेली आहे. पीएमपी बससेवेत अधिकारी नेमतानाही अस्थिरता ठेवलेली आहे. मोठ्या प्रकल्पांच्या केवळ घोषणा करणे, पंतप्रधान मोदी यांनी येऊन मेट्रो चे तीन, चार वेळा उदघाटन करणे असे देखाव्याचे कार्यक्रम चालले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गाजावाजा केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतून पुण्याचा काहीही विकास झालेला नाही, उलट स्मार्ट सिटी योजना मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे फसलीच आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

स्मिता शेवाळे हिने साकारली आगळी वेगळी नायिका

तुकारामांची आवली ‘अभंग तुकाराम’ मध्ये

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र वारंवार रंगमंचावर आणि पडद्यावर साकारले गेले आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा – आवली  प्रेक्षकांसमोर फारशी उलगडली नाही. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रथमच आवलीचे वास्तवाशी घट्ट जोडलेले चित्रण पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारत आहे ताकदीची कलाकार स्मिता शेवाळे, तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयांना पडद्यावर जिवंत करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

तुकाराम महाराज जसे अध्यात्मिक व्यक्तिरेखा आहेत, तसेच आवली ही प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे. संसारातील ओझी, दैनंदिन संघर्ष, जबाबदाऱ्यांची तोलामोल सांभाळत तिने पतीच्या आध्यात्मिक प्रवासाला दिशा दिली. तिच्या शब्दांत राग असला तरी तो वास्तवाची जाणीव करून देणारा आहे; तिच्या तक्रारीत कधी कटूता असली तरी त्यामागे पतीवरचे प्रेम आणि कुटुंबाविषयीची काळजी दडलेली आहे. त्यामुळेच आवली ही फक्त पत्नी नाही, तर तुकारामांच्या अध्यात्माला वास्तवाच्या जमिनीवर घट्ट उभी करणारी शक्ती आहे.

तुकारामांच्या संतत्वाला समाजमान्यता मिळाली, त्यांचे अभंग वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग झाले, यात आवलीच्या त्यागाचे मोलाचे योगदान आहे. संसाराचा गाडा हसत-रडत ओढताना तिने दाखविलेली चिकाटी आणि त्याचवेळी पतीच्या साधनेला दिलेली साथ, हे त्यांच्या नात्यातील गूढ आणि गहिरेपण प्रकट करते.

या चित्रपटात स्मिता शेवाळेने साकारलेली आवली ही आजवर कधीही पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना एका ताकदीच्या, संघर्षशील आणि कोमल स्त्रीचे दर्शन होणार आहे. तिची संवादशैली आणि देहबोली आवलीच्या व्यक्तिरेखेला सत्यतेचा आणि अध्यात्मिकतेचा स्पर्श देतात.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’सारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ मधून वारकरी परंपरेतील एका दुर्लक्षित स्त्रीपात्राला नव्या दृष्टीने मांडत आहेत. त्यांच्या दृष्टीने आवली ही फक्त घर सांभाळणारी स्त्री नसून, पतीच्या अध्यात्माला आधार देणारे आणि त्याला वास्तवाचे भान देणारे प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे.

‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

पुणेकरांचा सुर्या बरोबर मैत्रीपूर्ण करार…!!

“स्मार्ट सिटी”चा ध्यास घेतलेल्या पुणे शहराने आता *‘ग्रीन सिटी’*कडे झेप घेतली आहे. पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून,पुणेकरांनी सुर्याबरोबर मैत्रीपूर्ण करार करून छतावरच्या सूर्यकिरणांना कैद केलं..त्यातून स्वच्छ, मोफत आणि शाश्वत वीज निर्माण सुरु केलं. आता प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. हजारो घरांच्या छपरांवर उभ्या राहिलेल्या सौरपॅनेल्समुळे केवळ वीजबिलं शून्यावर येत नाहीत, तर पर्यावरण संवर्धनाचाही नवा अध्याय लिहिला जातो आहे.

उन्हाचे सोने – विजेचे धन
“उन्हामुळे छत तापायचं आणि बिलं वाढायची, पण आता त्याच छतावर सूर्या बरोबर मैत्रीपूर्ण करार करून त्याच्या तापण्याला कैद करून मोफत वीज तयार होतेय!” — हा अनुभव आहे पुणेकरांचा.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे पुण्यातील तब्बल १८६९४ घरांनी आपल्या छतावर सौर पॅनेल्स उभारले आहेत. त्यातून तब्बल ९०.६२ मेगावॅट वीज निर्मिती होत असून १५१ कोटी रुपयांचे अनुदान पुणेकरांना मिळाले आहे.

विजेपासून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
या योजनेमुळे अनेक घरांचे मासिक बिल शून्यावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेतून देशभरात ५८८९ मेगावॅट क्षमता तर महाराष्ट्रात ११०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले गेले आहेत. पुण्यातही हा बदल झपाट्याने दिसतो आहे.

पुणे परिमंडलातील प्रगती
३१,६४९ नोंदणी, त्यापैकी १८,६९४ प्रकल्प कार्यान्वित,७३९७ प्रकल्प अंतिम टप्प्यात
मंडलनिहाय क्षमता –
गणेशखिंड : ७३१२ प्रकल्प, ३८.२१ मेगावॅट
पुणे ग्रामीण : ५१४६ प्रकल्प, २१.०७ मेगावॅट
रास्तापेठ : ६२३६ प्रकल्प, ३१.३४ मेगावॅट

अनुदान वितरण –
गणेशखिंड : ६२.४ कोटी,पुणे ग्रामीण : ३६.४ कोटी,रास्तापेठ : ५२.५८ कोटी.

पर्यावरणीय महत्व – स्वच्छ हवा, हरित पुणे
९०.६२ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प दरवर्षी जवळपास १.३ कोटी युनिट वीज तयार करतील. यामुळे दरवर्षी सुमारे ७०-७५ हजार टन कार्बन उत्सर्जन टळेल, जे ३.५ लाख झाडं लावल्यासारखं आहे.
म्हणजेच दरवर्षी पुणेकरांच्या श्वासातली हवा अधिक स्वच्छ होणार आहे.
वाढता एअर कंडिशनिंग वापर आणि औद्योगिक वसाहतींचा ताण कमी करण्यासाठी ही सौर ऊर्जा पुणेकरांना दिलासा देते आहे.

“सूर्य आला घराघरात”
समजा एक कुटुंब दर महिन्याला २५० युनिट वीज वापरत होतं. ३ किलोवॅटचा प्रकल्प बसवल्यानंतर त्यांचे बिल आता शून्यावर येऊ शकतं. उलट, जादा तयार झालेली वीज ग्रिडला विकून त्यांना उत्पन्नही मिळवता येऊ शकतं.वीजबिलाचा ताण जातो आणि मुलांनाही हरित वीज कशी पर्यावरणाला पूरक आहे याचा धडा मिळतो.
याचबरोबर एका गृहसंस्थेने ५० किलोवॅट प्रकल्प बसवून संपूर्ण सोसायटीच्या कॉमन एरिया लाइटिंगची बिलं शून्य करता येऊ शकतात . यामुळे नागरिकांमध्ये सौर ऊर्जेबद्दल प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
पहिल्या २ किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ₹३०,००० अनुदान, ३ किलोवॅटसाठी ₹७८,००० अनुदान,गृहसंस्थांसाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ₹१८,००० अनुदान, ‘जनसमर्थ पोर्टल’वरून ९०% कर्जाची सोय – गृहकर्जापेक्षाही कमी व्याजदरात महावितरणकडून ऑनलाईन प्रक्रिया, अनुदान वेळेत, वीजमीटर मोफत.

पुणेकरांना आवाहन
“पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्व जाणतात. अधिकाधिक नागरिकांनी यात सामील व्हावे. वीजबिल वाचवून, पर्यावरण वाचवून आपण भविष्यातील पिढ्यांसाठी देणगी ठेवूया.”
असे आवाहन महावितरण पुणे परिमंडळा चे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.

हरित क्रांतीची सुरुवात
पुणेकरांनी सूर्याला खरंच आपल्या घराशी जवळ आणलं आहे. आर्थिक बचत, पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा स्वावलंबन या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी अनुकरणीय आदर्श घालून दिला आहे. हा प्रवास फक्त विजेचा नाही, तर हरित पुण्याकडे नेणाऱ्या नव्या क्रांतीचा आहे. चला हरित पुणे करूया आणि पुण्याची वाटचाल स्मार्ट पुण्याकडे करूया…!!

  • युवराज पाटील
    जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांची विधाने लाजीरवाणी; मदत करता म्हणजे उपकार करता काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांच्या बांधावर; छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.

मुंबई/छत्रपती संभाजीनगर, दि २५ सप्टेंबर २०२५

राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी प पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे, खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत, मुख्यमंत्री फक्त आकडेवारी फेकत आहेत, पण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. पैसा कुठून आणायचा हा सरकार प्रश्न आहे पण दसऱ्याच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा, कोळीभोडखा, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी ही उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या समजून घेतल्या आणि या कठीण प्रसंगी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा धीर दिला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलतात तशी कृती करत नाहीत, त्यांचे आश्वासन म्हणजे ‘लबाडा घरचे आमंत्रण, जेवल्याशिवाय खरे नाही’, असे आहे. पावसाने शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाले, जगण्याची साधने नष्ट झाली, तरीही निष्क्रीय फडणवीस सरकार केवळ मौन बाळगून बसले आहे. सरकार बांधावर आले आणि फोटो काढून परत गेले पण शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. उलट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांची विधाने तळपायाची आग मस्तकात जावी अशी आहेत. शेतकरी सरकारला प्रश्न विचारत असताना पैसे कुठून आणू, पैसे खिशात घेऊन फिरतो का, राजकारण करू नको, अशा धमक्या देत आहेत. शेतकरी व नागरिक रस्त्यावर आले आहेत, निसर्गाने त्यांचे सर्व काही लुटले आहे अशावेळी जनतेचा आक्रोश जर सरकारला समजत नसेल तर ते असंवेदनशिल सरकार आहे. महायुती सरकारची भाषा अहंकारी व लाजीरवाणी आहे, असेही सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले की, अदानीसाठी सरकारकडे पैसे आहेत. आमदार, खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत, ५५ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गासाठी पैसा आहे, गरज नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गासाठी पैसा आहे आणि शेतकऱ्यांना द्यायचे म्हटले की पैसा नाही हे रडगाणे काय गाता? असा सवाल करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसाठी विशेष पॅकेज घेऊन यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शेअर मार्केट ट्रेडिंग अ‍ॅपवर’श्रीमंत व्हा’ -20 ते 25 कोटींची फसवणूक :कोंढव्यातील ओंकार प्राईड हॉटेलवर छापा-सांगलीच्या २ भामट्यांसह ७ जणांची टोळी पकडली

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी

पुणे- शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणार्‍यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी धरपकड केली. तेव्हा ते सर्व जण चायनीज सायबर चोरट्यांसाठी येथील लोकांची बँक खाती उपलब्ध करुन देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यांनी १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सायबर पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

यश भारत पाटोळे (वय २५, रा. रमण मळा, कोल्हापूर), यासीर अब्दुल माजिद शेख (वय ३४, रा. निर्माण सेरेन, उंड्री), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरुद्दुन (वय ३०, रा. पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (वय २४, रा. घोरपडी पेठ, मोमीनपुरा), हुसेन ताहीर सोहेल शेख (वय २३, रा. मुजीब कॉलनी, संभाजीनगर), बाबुराव शिवकिरण मेरु (वय ४१, रा. निर्मल टाऊनशिप, काळेबराटेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फार्मा कंपनीत प्रोग्रामर असलेल्या तक्रारदार यांना फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये शेअर मार्केटमध्ये रोज १० ते २० टक्के नफा मिळेल, असे सांगितले जात होते. त्यांना कोटक क्युआयबी या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग अ‍ॅपवर ८९ लाख ३५ हजार रुपये गुंतवणुक करण्यासाठी सांगितले. फिर्यादीने गुंतवलेल्या रक्कमेवर ८ कोटी ७१ लाख रुपये नफा दाखविला. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सर्व्हिस टॅक्स भरायला सांगून फसवणुक केली होती.

या गुन्ह्यात आरोपींनी कॉसमॉस बँकेच्या खात्याचा वापर केला होता. त्यात ३३ लाख ८६ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले होते. पोलिसांनी या खात्याची माहिती घेतल्यावर ते ट्रेडिंग गुरु या नावाने यश पाटोळे चालवत होता. तांत्रिक विश्लेषणातून तो कोंढव्यातील हॉटेलमध्ये मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कोंढव्यातील ओंकार प्राईड हॉटेल येथे त्याचे साथीदार एकत्र मिळून अकाऊंट चालवित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ओंकार प्राईड हॉटेलवर छापा टाकून ५ जणांना पकडले. ते टेलिग्रामवरुन चायनीज भाषा बोलणारे व्यक्तीच्या संपर्कात राहून सीसीटीव्ही कॅमेरे लावून अजित आनंदराव गायकवाड (रा. सांगली) व धनाजी नाथा पाटील (रा. सांगली) यांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे दोन बँक खाती चालवित असल्याचे मिळून आले. त्यांच्याकडून ९ मोबाईल, १५ सिमकार्ड, ४ सीसीटीव्ही कॅमेरे, ८ चेक बुक, २० एटीएम/डेबीट कार्ड, १ लॅपटॉप, १ मेमरी कार्ड, १ पासपोर्ट, १३ हजार ५५० रुपये असा माल जप्त केला आहे.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते चायनीज व्यक्तीशी संगनमत करुन वेगवेगळे बँक खाती प्राप्त करुन या खात्यांचा वापर फसवणुकीसाठी चालवून त्यामध्ये फसवणुकीची रक्कम घेऊन ती रक्कम बाहेरील देशातील साथीदारांना क्रिप्टो करन्सी, यु एस डी टीचे माध्यमातून पाठवत. त्यांच्याकडून हवाला, मनि ट्रान्सफर व इतर मार्गाने ही रक्कम घेऊन सायबर फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार हेमंत खरात, सुभाष पाटील, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, प्रविण शेळकदे, सचिन घाडगे, मुकुंद वारे, दीपक भोसले, सोपान बोधवड, माधव आरोटे, सुरज शिंदे, स्वप्नील कणसे, विशाल निचीत, निलेश देशमुख, संतोष सपकाळ, ज्योती साळे, दीपाली चव्हाण, नम्रता कांबळे यांनी केली आहे़ सरकारी अभियोक्ता गिरीष बारगजे यांनी न्यायालयात बाजु मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवुन देण्यात मदत केली आहे.

स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवलचे थाटामाटात उद्घाटन, रास-दांडियाच्या भव्य महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!!

पुणे – स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवल 2025 चा पहिला दिवस अत्यंत भव्य आणि अविस्मरणीय ठरला. नवरात्रीच्या पवित्र पर्वात भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव यांनी नटलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाने संपूर्ण परिसर दांडियाच्या तालावर गजबजून गेला. नागरिकांच्या उपस्थितीने वातावरण प्रफुल्लित आणि उत्साहवर्धक झाले,या भव्य सोहळ्याचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे आणि माझी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विशेष प्रसंगी भारतातील सुप्रसिद्ध ड्रमर गिरीश विश्वा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शोभा अनेक पटींनी वाढली, तर त्यांच्या “विश्वा रॉकर्स” टीमने सादर केलेल्या अद्भुत वाद्यवृंदाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले,सांस्कृतिक कार्यक्रमात लोकप्रिय गायक-गायिका पवन सिंह, शुभम सिंह, इशिता विश्वकर्मा आणि ऋतुजा जाधव यांनी मनमोहक आणि रंगतदार गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. नागरिकांनी ठेका धरत दांडियाचा आनंद घेतला आणि प्रत्येक क्षण भक्तिभाव व सांस्कृतिक उर्जेने नटला.

या आठ दिवस चालणाऱ्या महोत्सवात उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य आणि उत्कृष्ट दांडिया ग्रुपसाठी अनुक्रमे 21 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या बक्षिसांची लॉटरी दररोज करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रत्येक सहभागीला आपल्या प्रतिभेची सादरीकरणाची संधी नियमित मिळणार आहे,विशेष म्हणजे उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब या भव्य महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ज्यामुळे महोत्सवाचा उत्साह आणखी शिखरावर पोहोचणार आहे.

फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी असंख्य नागरिकांनी प्रतिसाद देत भव्य, दिव्य आणि आनंददायी रास दांडिया अनुभवला ज्यातून येणाऱ्या प्रत्येक दिवशी भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव नागरिकांना मिळणार आहे. पुणेकरांना या आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात सहभागी होण्याची संधी नक्कीच उत्साहवर्धक ठरेल, आणि दांडियाच्या तालावर नृत्य करताना साजरा होणारा उत्साह प्रत्येकाच्या स्मृतीत आनंदाचे अविस्मरणीय क्षण नोंदवून जाईल,यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, जिल्हा परिषद सदस्य, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वातीताई टकले, मच्छिंद्र दगडे, राकेश झांबरे, बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना महानगरप्रमुख राजेश पळसकर, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.