Home Blog Page 301

४५ दिवसांचे लग्न अन ४५ लाखांची पोटगी

पुणे-लग्नानंतर अवघ्या 45 दिवसांत संसारवेल तुटल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला तब्बल 45 लाख रुपयांची पोटगी दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. या महागड्या घटस्फोटाची चर्चा आता कुटुंब न्यायालयात रंगली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, या प्रकरणातील दाम्पत्याचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. लग्न अतिशय थाटामाटात झाले होते. पण नवरी सासरी नांदण्यास गेल्यानंतर लग्नातील हुंडा व मानपान या मुद्यांवर कुटुंबात कुरबुरी निर्माण झाल्या. त्यानंतरही काही दिवस तसेच गेले. त्यानंतर पतीने पत्नीला ‘मला तू पसंत नाहीस, कुटुंबाच्या दबावाखाली मी हे लग्न केले’ असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती-पत्नीतील मतभेद टोकाला गेले. त्यातच हा वाद चिघळल्यानंतर सासरच्या मंडळींनी एकेदिवशी नवरीला थेट घराबाहेर काढले.

या घटनेनंतर पीडित महिलेने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळ व हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सविस्तर तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मधल्या काळात पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जानंतर पत्नीची बाजू लढवणाऱ्या वकील प्रियांका काटकर व वकील रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यात पतीने 45 लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. त्याला पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यानंतर वर्षभरापासून एकमेकांविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या या दाम्पत्याच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला आणि एकरकमी पोटगीच्या बदल्यात या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. या घटनाक्रमानंतर नववधूने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा मागे घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून वाघळवाडी येथे साकारण्यात येणार अत्याधुनिक रुग्णालय

बारामती, दि. २६: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमरजीत रामशे, अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

आरोग्य पथक रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आराखड्यातील कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून श्री. पवार म्हणाले, आराखड्यातील रस्ते, पाण्याची टाकी, शवागृह, वाहनतळ, वसतीगृह आदी कामांबाबत केलेल्या सूचनांचा समावेश करुन सुधारित आराखडा तयार करावा.

विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या.

रुग्णालयात सुविधा
वाघळवाडी येथे १० एकर जागेत नवीन शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाच्या बांधकामासाठी ६४ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. रुग्णालय व परिसरामध्ये १० बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), ५ सुसज्य ऑपरेशन थिएटर, महिला व पुरुष सामान्य कक्ष (जनरल वार्ड), अतिदक्षता विभाग (आय.सी.यू/एन.आय.सी.यू), एक्स-रे कक्ष, प्रसूती व बालरुग्ण विभाग, उपहारगृह, औषधालय, अंतर्गत रस्ते, बगिचा (गार्डन), सुशोभिकरण, वाहनतळ, ८० मुला-मुलींसाठी वसतिगृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र:

वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता ४३७.२२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्रामध्ये महिला व पुरुषांकरिता प्रत्येकी ३ याप्रमाणे ६ खाटांची क्षमता, वैद्यकीय अधिकारी कक्ष, प्रयोगशाळा, ड्रेसिंग कक्ष, महिला कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर), औषधसाठा कक्ष, स्वच्छतागृह, अभिलेख कक्ष, सोलार सुविधा, अग्निशमन यंत्रणा, फर्निचर, संरक्षक भिंत, वाहनतळ, जागा सपाटीकरणाची कामे करण्यात येणार आहे. या केंद्राअंतर्गत एकूण १३ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या प्रयत्नातून बारामती परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. वाघळवाडी हे गाव बारामती शहरापासून ४० कि.मी. पेक्षा अधिक अंतर आहे, त्यामुळे रुग्णालयाच्या माध्यमातून तालुकाच्या दक्षिण व पश्चिम भागातील तसेच इतर परिसरातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सोईसुविधा विनाविलंब उपलब्ध होणार आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार आहे.

या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार तसेच स्तनदा माता, लहान बालकांचे लसीकरण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ होणार आहे.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुरुषोत्तम जगताप यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर होते.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर फुटले – अपघात टळला,डॉ.गोऱ्हे सुखरूप

0

खड्ड्यांमुळे वाढलेला धोका

टेंभुर्णी (सोलापूर बायपास), दि. २६ सप्टेंबर २०२५ :
महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर आज टेंभुर्णी बायपासवर फुटले. मात्र, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. डॉ. गोऱ्हे या सोलापूरहून पुण्याकडे निघाल्या असताना ही घटना घडली.टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीनंतर प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटले. यामुळे या रस्त्यावरील गंभीर स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगात डॉ. नीलम गोऱ्हे पूर्णपणे सुखरूप असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे.

उंड्रीतील चौदा मजली इमारतीत भीषण आग; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू,अग्निशमन दलाचे दोन जवान आणि तीन नागरिक जखमी

पुणे – उंड्री येथील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या चौदा मजली इमारतीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. बाराव्या मजल्यावरील एका सदनिकेत लागलेल्या आगीने अल्पावधीतच विक्राळ रुप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पाच अग्निशमन वाहने आणि एक उंच शिडीचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत असतानाच घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान आणि तीन नागरिक जखमी झाले. तर एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नंतर आग नियंत्रणात आणण्यात आली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन राबविले आहे . अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.या घटनेमुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास सुरू असून, नेमकी आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे.

रिंग रोडमधील जमिनींबाबत नागरिकांना त्रास देणाऱ्या 3 महिला तलाठ्यांवर गुन्हा दाखल

पुणे -शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराच्या प्रतीसाठी नागरिकांना त्रास देऊन लाच मागणार्‍या तीन महिला तलाठ्यांवर खडक पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला आहे.. हवेली तहसीलदार यांच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली .

हवेली तालुक्यातील सांगरुळ तलाठी प्रेरणा बबन पारधी (वय ३०, रा. जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण), बहुली गावाच्या तलाठी दिपाली दिलीप पासलकर (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, काकडेनगर, कोंढवा), खडकवाडी गावच्या तलाठी शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (वय ४०, रा. कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी) अशी कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत.
याबाबत एका ४२ वर्षाच्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यांना सांगरुण, बहुली, खडकवाडी आणि कुडजे या हवेली तालुक्यामधील गावांच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्ताविक रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या ७/१२ तसेच आठ अ उतारचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रती हव्या होत्या.

त्यासाठी ते सांगरुळ येथे कार्यरत असलेल्या प्रेरणा पारधी, बहुली येथील तलाठी दीपाली पासलकर, तसेच खडकवाडी, कुडजे येथील तलाठी शारदादेवी, पाटील यांना भेटले. त्यावेळी सांगरुळ गावातील त्यांना आवश्यक असलेल्या ७/१२ च्या व आठ अच्या उतार्‍याच्या २४० प्रतीसाठी पारधी यांनी त्या प्रतीसाठी असलेल्या सरकारी फीच्या व्यतिरिक्त १६ हजार ४०० रुपयांची लाच मागितली. बहुली गावातील आवश्यक असणार्‍या ७/१२ व उतार्‍याच्या आवश्यक असणार्‍या १०६ प्रतिसाठी दीपाली पासलकर यांनी सरकारी फि व्यतिरिक्त ४ हजार ९१० रुपयांची लाच मागितली. तसेच खडकवाडी व कुडजे गावातील आवश्यक असणार्‍या ७/१२च्या व उतार्‍याच्या ३२ प्रतिसाठी शारदादेवी पाटील यांनी सरकारी फी व्यतिरिक्त १५२० रुपयांची लाच मागितली. याची तक्रार त्यांनी १९ सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

या तक्रारीची पडताळणी तीनही तलाठींकडे केली. त्या प्रेरणा पारधी यांनी सरकारी फी ३६०० रुपये होत असताना तक्रारदाराकडून तक्रारी अगोदर ४ हजार रुपये घेतल्याचे कबुल केले. आणखी १२ हजार ४०० रुपयांची लाच मागितली.

दिपाली पासलकर यांनी सरकारी फी १५९० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडे ६ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करुन ती रक्कम प्रेरणा पारधी यांच्याकडे देण्यास सांगितले.

शारदादेवी पाटील हिने सरकारी फी ४८० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडून तक्रारीपूर्वी १५०० रुपये घेतल्याचे कबुल करुन आणखी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर २५ सप्टेंबर रोजी सापळा रचला. शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह, ग्राम महसूल अधिकारी सजा कुडजे यांचा शिक्का, मोबाईल व रोख ११०० रुपये मिळून आले. सर्व तीनही आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी केली आहे. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.

सरकारने दिले अनुदान ४ कोटी अन दिल्ली मराठी साहित्य संमेलन संपन्न केले साडेतीन कोटीत – संजय नहार

आयोजक, प्रायोजक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे झाले चीज

पुणे- सरकारने दिले अनुदान ४ कोटी अन राजधानी दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन संपन्न केले साडेतीन कोटीत – हे सारे आपले सहयोगी संयोजक,आयोजक,प्रायोजक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे आणि घेतलेल्या श्रमाचे एक आनादाद्यी फळ आहे असे येथे सरहद चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी संमेलनाचे समन्वयक डॉ. शैलेश पगारिया,संयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते

ते म्हणाले,’दिल्लीत पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्चाचा ताळेबंद आपल्या समोर ठेवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या संमेलनासाठी मिळालेली देणगी अथवा मदत महाराष्ट्रातील जनतेची असल्याने त्याबद्दल पारदर्शकपणे जमाखर्च देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. या संमेलनाचे आयोजन करण्याच्या घोषणेपासून दिल्लीतील संमेलन मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीची कक्षा विस्तारणारी असावे असे प्रयत्न संयोजक म्हणून आम्ही केले. या संमेलनासाठी झालेला एकूण खर्च 3 कोटी 49 लाख 56,400 रूपये इतका झालेला आहे. जीएसटी आणि टीडीएस यामुळे या जमाखर्चास थोडा वेळ लागला. यामध्ये आणखी थोडी रक्कम वाढण्याची शक्यता आहे मात्र एकूण खर्च 3 कोटी 50 ते 51 लाख रूपये इतका आहे. या खर्चात रेल्वेसहचा प्रवास खर्च, प्रत्यक्ष कार्यक्रमांचा खर्च, मानधन आणि छपाई जाहिरातसह इतर खर्च समाविष्ट आहेत. रेल्वेतील जेवण तसेच व्यवस्थांचे खर्च मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी उचलले तर दिल्लीमधील भोजन व्यवस्थेपैकी अंदाजे 70 टक्के भाग भारती विद्यापीठाने उचलला. महामंडळाने संस्थेस 2 कोटी सत्तर लक्ष रूपये दिले असून सभासद नोंदणी व स्टॉल बुकींग मधून 23 लक्ष 98, 568 रूपये जमा झालेले आहे. 1 लक्ष रूपये नागपूरच्या गिरीश गांधी यांच्या संस्थेकडून संमेलनासाठी आलेले आहेत ते वगळता संस्थेस संमेलनाच्या निमित्ताने केवळ स्वागताध्याक्ष यांच्या विद्याप्रतिष्ठाण कडून 35 लक्ष रूपये व 15 लक्ष रूपयांचे इतर खर्च अशी देणगी आणि पी. डी पाटील यांच्या संस्थेकडून 50 लक्ष रूपयाची प्रायोजकता मिळाली होती (यापैकी 43 लक्ष 10,345 रूपये जमा झाले) महाराष्ट्र शासनाने या संमेलनासाठी प्रथम 2 कोटी आणि अधिकचे 2 कोटी महामंडळाला संमेलनासाठी दिले. (10 टक्के रक्कम प्रशासकीय कामासाठी महामंडळाला ठेवली जाते.) संस्थेकडून जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात अनेकांनी ठरल्यापेक्षाही कमी मानधन घेतले तर दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या कंपनीकडून अक्षम्य चूका झाल्याने त्यांना ठरलेल्या रकमेपेक्षा महामंडळाच्या परवानगीने कमी रक्कम देण्यात आली. एकूण या संमेलनाच्या निमित्ताने अनेक उपक्रम सुरू आहेत आणि ते भविष्यात काही दिवस चालणार आहेत. हा ताळेबंद प्रकाश पागे आणि प्रा. सुरेश मेहता या सनदी लेखापालांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आहे. पुढील कार्यवाही महामंडळ करणार आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे शहराचा आयुक्त म्हणून काम करणे सन्मानजनक: अमितेश कुमार

0

पुणे : जागतिक शहराचा नावलौकिक असलेले व देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कारभार करणे आनंददायी व सन्मान जनक असल्याची भावना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात व्यक्त केली.

शहरातील प्रभावी कामगीरी बद्दल पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून व माजी लोकप्रतिनिधींकडून वाढदिवसानिमित्त अमितेश कुमार यांचा त्यांचे दालनात विशेष सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे शहराची ओळख असलेले महात्मा फुले यांची पगडी , उपरणे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष राहुल डंबाळे , शिवसेनेचे उपनेते अजय भोसले , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के , माजी नगरसेवक आनंद अलकुंटे , माजी नगरसेवक अय्युब शेख , माजी नगरसेवक हिमाली कांबळे , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे , रफिक शेख , सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद , जास्मिन शेख , रेश्मा खान , यांचेसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संगीता जिंदाल शेव्हेलियर दे ल’ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेसया फ्रेंच पुरस्काराने सन्मानित

मुंबई, 26 सप्टेंबर 2025: भारतातील फ्रान्सचे राजदूत महामहिम श्री. थिएरी माथू यांनी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदाल यांना फ्रान्सच्या सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या शेव्हेलियर दे लऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेसचे (नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स) सन्मान चिन्ह आज प्रदान केले. श्रीमती जिंदाल यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा सन्मान त्यांना देण्यात आला. भारतातील कलासंस्कृती आणि वारसा संवर्धनातील अपवादात्मक योगदान तसेच भारत-फ्रेंच सांस्कृतिक संबंधांना चालना देण्याच्या जिंदाल यांच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या प्रमुख असलेल्या श्रीमती जिंदाल यांच्यासाठी संस्कृतीला सर्वोच्च महत्त्व आहे. त्यांच्या प्रत्येक ध्येयाच्या केंद्रस्थानी सांस्कृतिक वारसा आहेच. फ्रान्ससोबत त्यांनी अनेक नवीन गतिमान भागीदारी तयार केल्या आहेत. हंपी आर्ट लॅब्समधील कलाकारांच्या निवासस्थानांद्वारे, त्यांनी भारत आणि फ्रेंच कलाकारांमध्ये परस्पर संवादासाठी उत्तम जागा निर्माण केल्या आहेत. पॅरिस ऑलिंपिक दरम्यान कला आणि खेळ यांच्यातील संवाद अधोरेखित करण्यासाठी 2024 मध्ये त्यांनी फ्रान्ससोबत सहकार्य केले. तर या वर्षाच्या अखेरीस, त्या पॅरिसमधील मोबिलियर नॅशनल येथे “टेक्सटाइल मॅटर्स” प्रदर्शनात भाग घेतील.

पुरस्कार प्रदान करताना राजदूत थिएरी माथू म्हणाले: “त्यांची आवडदूरदृष्टी आणि उदार दृष्टिकोनाद्वारेश्रीमती जिंदाल यांनी भारताचा सांस्कृतिक दृष्टिकोन खोलवर आत्मसात केला आहे. तसेच आपल्या दोन्ही देशांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या कामगिरीबद्दल आणि सांस्कृतिक पूल बांधण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल फ्रान्सला वाटणारी कृतज्ञता आणि कौतुक दर्शवते. या दोन देशांमधील अतिशय फलदायी सहकार्य आणि संवादाची ही केवळ सुरुवात याची मला खात्री आहे.”

कृतज्ञतेने हा पुरस्कार स्वीकारताना श्रीमती संगीता जिंदाल म्हणाल्या: “फ्रान्सकडून झालेल्या या गौरवामुळे मला खूप आनंद झाला आहे. दोन्ही देशांमध्ये  अर्थपूर्ण सांस्कृतिक पूल बांधताना भारताच्या वारशाचे रक्षण करण्याच्या माझ्या वचनबद्धतेला यामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. ज्यांच्यासोबत काम करण्याचा मला बहुमान मिळाला असे अनेक कलाकारकारागीरसंरक्षक आणि संस्था यांच्याप्रती कृतज्ञ राहून मी हा सन्मान स्वीकारते आहे. वारसा हा पिढ्यांना जोडणारा एक दुवा आहे आणि हा वारसाच भविष्याला प्रेरणा देत राहीलयासाठी मी कायम कार्यरत राहीन.”

MPSC ची 28 सप्टेंबरची परीक्षा अखेर रद्द:आता 9 नोव्हेंबर रोजी होणार पेपर; राज्यातील पूरस्थितीमुळे आयोगाने घेतला निर्णय

0

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील पूरस्थितीमुळे येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार, आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. आयोगाने आज जारी केलेल्या एका शुद्धिपत्रकाद्वारे हा निर्णय कळवला आहे.

राज्यात सध्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. अनेक गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. राज्यातील पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आयोगाने आज 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होईल.

काय म्हटले आहे आयोगाने आपल्या शुद्धिपत्रकात?

आयोगाने आपल्या शुद्धिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा -2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.

उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 चा सुधारित दिनांत शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

या शुद्धिपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिव, जाहिरात यांची स्वाक्षरी आहे.

आयोगाने विद्यार्थ्यांना केलेल्या सूचना

तत्पूर्वी, आयोगाने एका परिपत्रकाद्वारे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी काही ठळक सूचना दिल्या होत्या. त्या सूचना खालीलप्रमाणे होत्या.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” काळजीपूर्वक अवलोकन करावे.
परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.
ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही.
परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.
परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.
परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर २०२५ :
नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच माझी प्रार्थना आहे. शेतकरी आत्महत्येच्या मार्गाला जात आहेत, त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती आणि धैर्य लाभावे, अशी विनंती मी आईकडे केली.”

तसेच त्यांनी महायुती सरकारच्या संवेदनशील कामकाजाचे कौतुक केले. “पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही दिलासादायक बाब आहे,” असे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा प्रमुख भारती गायकवाड, अर्चना दराडे, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, तालुका प्रमुख माया चव्हाण, तालुका प्रमुख (कळंब) आशा अव्हाड, शहर प्रमुख महादेवी माळी आदी मान्यवरांचा समावेश होता.

तृतीयपंथी समाजासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शासनाकडून ११ लाख ५० हजारांची तरतूद

0

मुंबई : तृतीयपंथी समाजासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी राज्य सरकारने ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या आदेशानुसार ही तरतूद २०२५-२६ या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.

तृतीयपंथी समाज हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असल्याने त्यांचा सामाजिक प्रवाहामध्ये सहभाग वाढवण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाचे सशक्तीकरण व मुख्य प्रवाहात समावेश साधण्याचा प्रयत्न आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मंजूर निधीचा वापर राज्यस्तरीय नाट्य, नृत्य, संगीत महोत्सव, कला संमेलन, तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी करण्यात येणार आहे. या खर्चासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे.

कार्यक्रमांचे आयोजन पारदर्शकतेने व्हावे यासाठी संबंधित संचालकांना दर महिन्याला खर्चाचा हिशोब शासनास अहवालासह सादर करावा लागणार आहे.

दस्त नोंदणीतील गैर प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे:सह-दुय्यम निबंधक हवेली क्र.२० मधील बेकायदेशीर दस्त नोंदणी, भ्रष्ट कारभाराविरुद्ध लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षा ने निवृत्त जिल्हा सह निबंधक पोपटराव भोई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन त्यांनाही यासंबंधीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. लोकजनशक्ती पार्टी (राम विलास)चे अध्यक्ष संजय आल्हाट यांच्यासमवेत पुणे संपर्क प्रमुख राहुल उभे उपस्थित होते.निवेदनावर संजय आल्हाट,कायदेशीर सल्लागार निवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक मिलिंद गायकवाड, राहुल उभे यांच्या सहया आहेत.

   २० ऑगस्ट २०१४ ते १ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत केलेल्या नोंदींमध्ये २०१ दस्त नोंदणी संदर्भात अनियमितता झाल्याचा आरोप पक्षाने केला होता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते.आंदोलन करण्यात आले होते.ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या इमारतींमधील दस्त बेकायदेशीर रित्या नोंदवून बिल्डर लॉबी चे भले करण्यात आल्याचा आरोप यावेळी बोलताना पक्षाचे शहर,जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी केला. त्यानंतर शासनाने नेमलेल्या तपासणी पथकाने या प्रकरणात नोंदवहीतील दस्तांमध्ये आवश्यक ती शहानिशा न करता नोंदी करण्यात आल्या, असे नमूद केले आहे. काही ठिकाणी मुद्रांक शुल्काबाबत त्रुटी दिसून आल्या असून, संबंधित अधिकारी यांनी योग्य कार्यवाही न करता दुर्लक्ष केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याशिवाय, काही प्रकरणांत आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर न करता नोंदी करण्यात आल्या असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर गंभीर तफावत झाल्याचे दिसले आहे.तरीही भोई यांना पदोन्नती व निवृत्ती प्राप्त झाल्याने त्यांना मंत्रालयात पाठीशी घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाबाबत जबाबदार अधिकारी भोई यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

दिवाळी निमित्त दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट..अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना..

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळी निमित्त भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रूपये देण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी एकूण रू. ४०.६१ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

या निर्णयाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी “अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व सणासुदीच्या काळात आनंदाचा क्षण निर्माण व्हावा म्हणून भाऊबीज भेट स्वरूपात शासनाने ही रक्कम मंजूर केली आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ आहे. त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असे सांगितले.

या अनुषंगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्यामार्फत भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघणार आहे.

उत्तम कलाकृती विचार करायला प्रवृत्त करते : समर नखाते

पुणे : लघुपट म्हणजे वेगळी धारणा असलेली सघन कल्पनांची मांडणी होय. आशयाला धरून कथा, कथन व्यवस्था, कथन सरणी यांची मांडणी होणे लघुपटासाठी अपेक्षित असते. चित्रपट या माध्यमाला गांभीर्याने घेण्याची सवय करणे आवश्यक असून यात शिस्तबद्ध मांडणी, सर्जनशीलता, आशयाचा आकृतीबंध साधला गेला पाहिजे, अशी अपेक्षा चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी व्यक्त केली.
मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांच्या सहकार्याने सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाचे पुण्यात आयोजन करण्यात आले असून आज (दि. 26) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे चित्रपट कसा पहावा या विषयावर समर नखाते यांचा मास्टर क्लास आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नखाते यांचे स्वागत मुंबा फिल्म फाऊंडेशनचे सचिव विश्वास शेंबेकर यांनी केले. महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, संचालक अभिषेक अवचार उपस्थित होते. ‌‘घड्याळांचा दवाखाना‌’ हा लघुपट दाखवून समर नखाते यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले.
उत्तम कलाकृती कधीही थेट संदेश देत नाही तर ती विचार करायला प्रवृत्त करते, असे सांगून समर नखाते पुढे म्हणाले, चित्रपट बघायचा कसा हे समजून घेणे, त्याचप्रमाणे त्या विषयी अभ्यासपूर्ण नोंदी करणे आवश्यक आहे. पात्रांची मनोवृत्ती, स्वभाववृत्ती, दृश्यात्मकता, सामाजिकता अशा अनेक घटकांवर खोलवर अभ्यास गरजेचे असते. चित्रपटातील लय-ताल पद्धतीदेखील समजून घेतली पाहिजे.
आधुनिक तंत्रज्ञानामागे मन-मेंदूतील सर्जनशीलता..
चित्रपट माध्यमाला वलय आहे; परंतु चित्रपट निर्मिती करताना चलचित्र, दृकश्राव्य माध्यमाकडे पाहण्याचा वैचारिक अभ्यास, मनन-चिंतन होणे आवश्यक आहे. हे माध्यम प्रभावशाली, भावनिक असले तरी त्या आधी चित्रपटाच्या भाषेचा अभ्यास, त्याची संरचना, व्यवस्था, व्याकरण याचा गांभीर्याने विचार केला जावा. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला सगळे साधता येते हा समज चुकीचा असून त्याच्या मागे कायम मानवी मन आणि मेंदूतील कलात्मकता, सर्जनशीलता कार्य करीत असते हे विसरून चालणार नाही, असेही नखाते म्हणाले.
कथानकाचे बीजतत्त्व, संरचना यांची मांडणी योग्य पद्धतीने होऊन त्यातून कल्पना, सारांश, कथेची रूपरेषा, कथेवर होणारी प्रक्रिया त्यातून पुढे पटकथेची मांडणी सुरू होते. पटकथेच्या अभ्यासासाठी साहित्य, कला, संस्कृती, मूल्य, कथनपद्धती यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे, हा मुद्दा नखाते यांनी अधोरेखित केला.

महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय उपक्रम‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ २८ रोजीसंपूर्ण महाराष्ट्रातून हजारों वारकर्‍यांचा सहभाग

पुणे, २६ सप्टेंबर ः संतांचा वसा, वारकर्‍यांचा वारसा आणि अभंगांचे अमृत हेच महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे. या वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्या वतिने ‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ हा अभिनव व भक्तिमय उपक्रम साजरा करण्यात येत आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सुस येथील सनीज वर्ल्ड मध्ये सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत साजरा करण्यात येईल. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारों वारकरी, कीर्तनकार व प्रवचनकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज, वारकरी सांप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्र. ९६चे हभप दशरथ महाराज वाहले, हभप पांडूरंग महाराज पारखी, प्रविण माताळे व अमित अखाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राच्या भूमीत भक्ती, श्रध्दा, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे अमूल्य दर्शन घडविणारा हा उपक्रम मा. मिलिंद दादा वाळंज युवा मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ता व युवा उद्योजक मिलिंद नंदकुमार (बाबूजी) वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाची वैशिष्टये म्हणजे वारकरी परंपरेतील पारंपरिक खेळ, विरंगुळा, आनंद मेळावा व भक्तिरसात न्हाऊन निघविणारे अभंग गायन होणार आहे. येथे वारकरी परंपरेचे विविध पैलंचेू खेळ, भक्तिगीत, गवळणी व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यामध्ये सहभागींतील पहिल्या १० भाग्यवान विजेत्या जोडप्यांना विमानाने काशी दर्शन घडविण्यात येईल. खेळाबरोबर अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या उपक्रमातून वारकरी जीवनशैली,भक्ती आणि संस्कार तसेच यातून आनंद यांचे दर्शन घडणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून वारकरी संप्रदायाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आयोजक मिलिंद नंदकुमार वाळंज यांनी केले.