Home Blog Page 300

अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाचा खून: मृतदेह कात्रज घाटातील डोंगरात फेकला; एकाला अटक

पुणे-पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाने चुलत भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर मृतदेह कात्रज घाटातील एका डोंगरात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.अशोक पंडित (वय ३५, रा. मोशी, मूळ रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अजय पंडित (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९/११/२०२५ रोजी तक्रारदार यांनी कळविले की, त्यांचेकडील कामगार अजयकुमार गणेश पंडीत, वय २२ वर्षे रा सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड हा दि.१७/११/२०२५ रोजी रात्रौ २०/०० वा चे सुमा. घरामधुन भाजी घेवुन येतो असे सांगुन निघुन गेला आहे तो परत घरी आला नाही म्हणुन तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मनुष्य मिसींग क्रमांक १५१/२०२५ अन्वये दिनांक १९/११/२०२५ रोजी दाखल केली आहे.
सदर घटनेच्या अनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना मिसींग व्यक्तीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे मिसींग व्यक्तीबाबत माहीती घेत असताना सदर घटनेबाबत काही संशयास्पद बाबी प्राप्त झाल्या व मिसीग मनुष्य याचे त्याचा चुलत भाऊ यांचे पत्नी सोबत अनतिक संबंध असल्यामुळे त्यांचेमध्ये वादविवाद झाले होते अशी माहीती तपास पथकातील पोलीस अंमलदार अभी चौधरी, मितेश चोरमोले यांना प्राप्त झाली. त्यापुढे अशोक पंडीत याचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी करुन तो पिपरी चिंचवड भागात असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदिप आगळे व तुकाराम सुतार यांनी पिंपरी चिंचवड भागात जावुन अशोक पंडीत याचा शोध घेतला असता तो मिळुन आला.
त्याचेकडे मिसीग व्यक्ती अजयकुमार पंडीत याचेबाबत अधिक तपास करता त्याने सांगितले की, त्याचे पत्नीचे अजयकुमार गणेश पंडीत याचे सोबत अनैतिक संबंध होते. त्या कारणावरुन दिनांक १७/११/२०२५ रोजी रात्रौ २१.३० वा. चे सुमारास खोपडे नगर येथे डोंगरामध्ये झाडीत अजयकुमार गणेश पंडीत, वय २२ वर्षे रा सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड यास गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून ठार करून त्यास गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी डोंगरामध्ये फेकून दिले असल्याचे सांगितले. पुढे अशोक कैलास पंडीत याने गुजर, निबाळकवाडी येथील डोंगरामध्ये झाडाझुडपात मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याची बॉडी जेथे पोत्यामध्ये फेकली ते ठिकाण दाखविले. तेथे जावुन झाडाझुडपात पाहणी केली असता तेथे पांढरे रंगाचे गोणीच्या पोत्यामध्ये मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याची बॉडी मिळुन आली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन अशोक कैलास पंडीत वय ३५ वर्षे रा. यादववाडी मोशी पुणे मुळगाव हजारीबाग झारखंड यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,मनोज
पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मिलींद मोहीते ,सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, स.पो. निरीक्षक स्नेहल थोरात, समीर शेडे, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, दिपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, तुकाराम सुतार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, नवनाथ खताळ, निलेश खैरमोडे, नागेश पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.

“नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन

मुंबई, दि. २० नोव्हेंबर २०२५ :
नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेता, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी वाणिज्य व उद्योग मंत्री मा. पियुष गोयल तसेच राज्यातील पर्यावरण व गृह विभागाला निवेदन देऊन नायलॉन मांजाच्या उत्पादन, विक्री, साठा, वाहतूक आणि विशेषतः ऑनलाईन विक्रीवर कडक आणि प्रभावी बंदी लागू करण्याबाबत आवाहन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की राज्य सरकारने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी तिची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वर्धा, नाशिक, भिवंडी आणि राज्यातील इतर ठिकाणी नायलॉन मांजामुळे नागरिकांचा मृत्यू झालेल्या घटना त्यांनी विशेषपणे अधोरेखित केल्या. अत्यंत धारदार, न तुटणाऱ्या या मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच पोलीस अधिकारीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर पक्षी आणि इतर प्राण्यांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन विक्री हा सर्वात मोठा धोका असल्याचे स्पष्ट करताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की ‘फिशिंग लाईन’, ‘नायलॉन थ्रेड’, ‘स्ट्रॉंग वायर’ अशा नावांनी Amazon, Flipkart, Meesho तसेच Instagram-WhatsApp समूहांतून हा मांजा सहज उपलब्ध होत आहे. बनावट ‘इको-फ्रेंडली’ किंवा ‘कॉटन थ्रेड’ अशा लेबलने ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याने बंदी अत्यावश्यक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना तत्काळ निर्देश देऊन महाराष्ट्रात अशा धोकादायक मांजाची डिलीव्हरी थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे.

कडक अंमलबजावणीची गरज असल्याचे सांगत त्यांनी बाजारपेठा, गोदामे आणि साठेबाजांवर छापे टाकून स्टॉक जप्त करण्याचे निर्देश जिल्हास्तरावर विशेष पथके स्थापन करून देण्याची सूचना केली. गुन्हे नोंदवताना सदोष मनुष्यवध, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कठोर कारवाई केली जावी, यावर त्यांनी भर दिला.

या समस्येवर जनजागृती हे महत्त्वाचे शस्त्र असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी शाळा, मंडळे, बाजारपेठा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जागरूकता मोहीम राबवण्याची सूचना केली. नागरिकांकडून माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन किंवा WhatsApp क्रमांक सुरू करण्याचीही त्यांनी शिफारस केली.

पर्यावरणपूरक सुती मांजाला प्रोत्साहन देणे ही गरज अधोरेखित करत, खादी ग्रामोद्योगासह स्थानिक उत्पादकांना प्रशिक्षण, अनुदान आणि प्रोत्साहन देऊन पर्यायी सुरक्षित मांजा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

नायलॉन मांजामुळे वाढत्या जीवितहानीचा तातडीने विचार करून कठोर बंदीची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत, अशी विनंतीही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस कुचकामी, निष्क्रीय व सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री.

मालेगाव बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या, भाजपा महायुतीच्या राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या अब्रुचे धिंडवडे निघाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मात्र निवडणुका व अंतर्गत वादातच व्यस्त.

राज्याला कणखर व खंबीर गृहमंत्र्याची गरज

मुंबई, दि. २१ नोव्हेंबर २०२५

मालेगावमध्ये तीन वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना संतापजनक व अत्यंत गंभीर आहे. या घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला-मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच दिसते. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नसून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, आका, खोक्या यांचा नंगानाच सुरु आहे. सत्ताधारी पक्षाच्या आशिर्वादाने गुंड खुलेआम फिरत आहेत. मागील काही महिन्यातील घटना पाहता सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी फोफावल्याचे दिसते. माफिया, गुंड, भ्रष्ट लोकांना सत्ताधारी पक्षात प्रवेश देऊन पवित्र करून घेतले जात आहे. सरकारच गुन्हेगारांना राजाश्रय देत असेल तर गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणारच पण सरकारला त्याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. पोलीस केवळ विरोधीपक्षांच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्यासाठी, विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठी ठेवलेले आहेत.

फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडेला राजकीय व पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली या घटनेत सत्ताधारी भाजपाचा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव आहे पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री कोणतीही चौकशी न करताच निंबाळकरांना क्लिन चिट देतात. आजही डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालेला नाही आणि गुन्हेगार मात्र सरकारच्या आशिर्वादाने ताठ मानेने फिरत आहे. मालेगावच्या घटनेने जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. आरोपीला न्यायालयात आणले असता हा उद्रेक सर्वांनी पाहिला आहे. सरकारने आतातरी जागे व्हावे नाहीतर जनतेचा उद्रेक तुमच्या खुर्च्या उखडून टाकेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रचाराचा झंझावात..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री व पैठण येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनिमित्त आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा घेतला तसेच भोकरदन येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, कल्याण दळे, प्रदेश सचिव कमाल फारुकी आदी उपस्थित होते.

मालेगावमध्ये संतप्त लोकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न:तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार अन हत्या; आरोपीला फाशी देण्यासाठी लोक रस्त्यावर

0

उद्रेक आज गुन्हेगाराविरोधात आहे. उद्या तो सरकार विरोधात होईल. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दरारा होता, आता गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही.गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे- वडेट्टीवार

आरोपीची बाजू एकही वकील मांडणार नाही – दादा भुसे

नाशिक – मालेगाव 3 वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे होरपळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. पण मोर्चेकऱ्यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3 वर्षीय मुलीवर गावातीलच विजय संजय खैरनार नामक आरोपीने पाशवी बलात्कार केला होता. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्याही केली होती. या प्रकरणाचे सध्या राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. त्याला व्यापारी संघटना, शाळा व महाविद्यालये, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रकरणी रामसेतू पुलावरून एक मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला. यावेळी मोर्चकऱ्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात मंत्री दादा भुसेही सहभागी झाले होते.

यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी अचानक स्थानिक न्यायालयाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ माजली. मोर्चेकरी थेट कोर्टाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून मोर्चेकऱ्यांना न्यायालय परिसरात प्रवेश न करता आपल्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले. पण मोर्चेकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. हे पाहून मोर्चेकऱ्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर शेकडो मोर्चेकरी कोर्टाच्या परिसरात जमले होते. तिथे त्यांची आणखी समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर कोर्टाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

तत्पूर्वी, मोर्चाला मार्गदर्शन करताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहरातील एकही वकील आरोपीची बाजू मांडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मालेगावच्या वकील संघाने बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची बाजू कोर्टात न मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना आपले डीवायएसपी बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हे निषेधार्थ आहे. त्याचा मी धिक्कार करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची भूमिका घेतली असताना डीवायएसपींनी न्यायालयीन कोठडी मागितली. हे कुणाच्या सांगण्यावरून केले? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मी मागी केल्यानंतर पोलिसांनी एमसीआरची मागणी बदलून पीसीआरची मागणी केली. त्यामुळे या डीवायएसपींची बदली झाली पाहिजे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, असे भुसे म्हणाले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मालेगावात आज झालेला जनतेचा उद्रेक उद्या सरकार विरोधात होण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, मालेगाव इथे आज जमाव कोर्टात शिरला हा जनतेचा उद्रेक आहे. हा उद्रेक आज गुन्हेगाराविरोधात आहे. उद्या तो सरकार विरोधात होईल. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दरारा होता, आता गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही.गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे आपल्याला न्याय मिळणार नाही अशी भावना लोकांची होत असल्याने कोर्टात जमाव घुसला. यातून आता तरी पोलिस खाते अंक सरकारने सुधारले पाहिजे.

आमचे सरकार असताना आम्ही अशा प्रकरणासाठी शक्ती कायदा आणला होता,तो अमलात आणला जात नाही, पोस्को कायद्याची अंमलबजावणी होत नाही. मालेगाव प्रकरणात एक महिन्यात फास्टट्रॅक वर केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपीची 5 दिवसांची पोलिस कोठडी काल संपुष्टात आली होती. त्याला कोर्टात सादर करत असताना संतप्त महिलांनी पोलिसाना गराडा घातला. यामुळे बाका प्रसंग उद्धवला होता. दुसरीकडे, भाजप आमदार चित्रा वाघ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला. अशी घटना ऐकल्यावर काळीज पिळवटून निघते. सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला.

गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली. नंतर मृत्यू झाल्याचे समजले आणि होत्याचे नव्हते झाले. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, गावातील 24 वर्षाचा तरुणाचं एक महिन्यापूर्वी तिच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. त्याने त्या निरागस बाळावर असूरी पद्धतीने राग काढला. तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला. समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ आहे, असे वाघ म्हणाल्या होत्या.

दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव

नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि पुणे महापालिकेतर्फे 25ला कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचा वर्धापन दिन तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन यानिमित्त आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंत-वेणू पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी प्रशांत दामले यांना गौरविले जाणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजीत धांडेकर, समीर हंपी यांनी आज (दि. 21) पत्रकार परिषदेत दिली. यशवंत-वेणू पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुटुंब किर्रतन (सर्वोत्कृष्ट नाटक), ठकीशी संवाद (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक), दोन वाजून बावीस मिनिटांनी (विशेष लक्षवेधी नाटक) तसेच संदेश कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट लेखक), विजय केंकरे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), संकर्षण कऱ्हाडे (सर्वोत्कृष्ट अभिनेता), शुभांगी गोखले (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), दत्ता शिंदे (पडद्यामागील कलाकार) यांचा यशवंत सन्मानाने गौरव केला जाणार आहे.

माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘धुंदी कळ्यांनो.. धुंदी फुलांनो‌’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अजित परब आणि मनिषा निश्चल गीते सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांच्या आहारात बायोफोर्टिफाइड झिंक-समृद्ध गहू, लोहयुक्त धान्याचा समावेश

पुणे, दि. 21: आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याकरिता नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या कराराचा मुख्य उद्देश आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरीता बायोफोर्टिफाइड झिंक-समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीचे धान्य त्यांच्या नियमित आहारात समाविष्ट करुन त्यांचे आरोग्य व पोषण समृध्द करणे हा आहे.

कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला ९ हजार विद्यार्थ्याकरिता बायोफोटिफाइड धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार दररोज ३० ग्रॅम धान्य, सुरुवातीला दोन महिन्यांसाठी आठवड्यातून दोनदा दिले जाईल, त्यानंतर ते नियमितपणे आहारात समाविष्ट केले जाईल. १ हजार विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा बायोफोर्टिफाइड-झिंक गहू आणि लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले लाडू आणि कुकीज असे तयार चविष्ठ पदार्थ पुरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये पोषणयुक्त आहाराचे महत्त्वाबाबत जागरूकता कार्यक्रम, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि.चा भागीदार, अॅग्रोझी ऑर्गेनिक्स (उरुळी कांचन, पुणे येथील) या उपक्रमांना सहकार्य केले जाणार आहे. हा करार आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य पोषण मिळावे आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

रस्त्यावर पडलेली ’दहा लाख’ रोख रकमेची बॅग कचरा वेचक महिलेला सापडते तेव्हा…

पुणे-

स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात २० नोव्हेंबर रोजी देखील सकाळी ७ वाजल्यापासून दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. गोळा केलेला कचरा फिडर पॉईंटला आणताना अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही अशाच औषधाच्या बॅग मिळाल्याचा अनुभव अंजू यांना होता म्हणून तशीच कोणाची बॅग असेल असा विचार करून त्यांनी ती बॅग फीडर पॉइंट ला सुरक्षित ठेवली. पण बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेली जवळपास २० वर्षे या भागात काम करत असल्यामुळे अंजू परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील सर्वांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक नागरिक (त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांचे नाव व ओळख उघड करू शकत नाही) अतिशय अस्वस्थपणे काहीतरी शोधत असल्याचे अंजू ताईंनी पाहिले. त्यांनी त्या नागरिकाला बोलवून, आधी पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून दहा लाख रक्कम जशीच्या तशी असलेली बॅग परत केली.

नागरिकानी देखील अंजू ताईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी त्यांना साडी व काही रोख रक्कम देऊन त्यांचा परिसरातील सर्व नागरिकांच्या साथीने सत्कार केला. अंजू माने यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की स्वच्छ मॉडल मुळे कचरा वेचक आणि नागरिक यांच्यातील नात्याची विश्वासाची वीण मागील २० वर्षात अधिक घट्ट झाली आहे. २० वर्ष दररोज दारोदार कचरा संकलन सेवा पुरवताना या प्रामाणिकपणामुळेच कचरावेचकांनी नागरिकांच्या मनात घर केलं आहे. ४० लाख पुणेकरांना ४००० ‘स्वच्छ’चे कचरावेचक पुरवत असलेल्या दैनंदिन दारोदार कचरा संकलनाच्या सेवेतही हा प्रामाणिकपणा सातत्याने दिसून येतो.

ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा महावितरण व सीएमडी लोकेश चंद्र यांना राष्ट्रीय पुरस्कार

0

मुंबई, दि. २१ नोव्हेंबर २०२५: स्वस्त व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत आतापर्यंत केलेल्या एकूण वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल ६५ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केला आहे. यासह विद्युत व ऊर्जा क्षेत्रात केलेल्या विविध कामगिरीची दखल घेऊन १२ व्या नॅशनल अवार्डस् फॉर एक्सलन्स २०२५ इन पॉवर अॅण्ड एनर्जीच्या कार्यक्रमात महावितरण कंपनीला ‘पॉवर डिस्ट्रीब्यूशन युटिलीटी ऑफ द इयर’ आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी इनोव्हेटर ऑफ द इयर’ या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

मुंबई येथे गुरुवारी (दि. २०) आयोजित कार्यक्रमात हे दोन्ही पुरस्कार मानव संसाधन विकासाचे विशेषज्ञ डॉ. आर. एल. भाटिया यांच्याकडून महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत गोंधळेकर, डॉ. संतोष पाटणी, सचिन घरत, शंतनू एदलाबादकर यांनी स्वीकारले.

केंद्र शासनाकडून सन २०३० पर्यंत देशात एकूण वीज निर्मिती क्षमतेमध्ये ५० टक्के अपारंपरिक ऊर्जेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५०० गिगावॅट (GW) पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता वाढविण्याचे धोरण आहे. त्यास अनुसरून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ ट्क्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे.

ऊर्जा परिवर्तनामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत २७७३ मेगावॅट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्यातून ६ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. तर देशात सर्वाधिक ६० टक्के म्हणजे ६ लाख ४७ हजारांवर सौर कृषिपंप महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आले आहे. यासह गेल्या दीड वर्षांमध्ये राज्यातील २ लाख ५० हजारांवर घरगुती ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी १ हजारांवर मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले असून या ग्राहकांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.

महावितरणकडून विजेच्या मागणीचा अंदाज व त्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे मागणीचा अचूक अंदाज व सर्वात कमी खर्चात वीज खरेदीचे व्यवस्थापन सुरू आहे. सूक्ष्म वीज खरेदीच्या नियोजनाद्वारे विजेचे कुठेही भारनियमन न करता विक्रमी २६ हजार ४९५ मेगावॅट विजेचा सुरळीत पुरवठा करण्यात महावितरणने यश मिळवले आहे, हे विशेष.

वीज वितरण यंत्रणेच्या प्रभावी संचालनासाठी माहिती तंत्रज्ञानावर मोठा भर देण्यात आला असून पायाभूत यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरण वेगात सुरू आहे. ग्राहकांना घरबसल्या सेवा देण्याची प्रक्रिया आणखी तत्पर करण्यात आली असून वीजभारात वाढ किंवा वीजबिलाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरीची प्रणाली सुरू आहे. यासह विविध उल्लेखनीय कामांची दखल घेऊन जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या निवड समितीने महावितरण तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांची पुरस्कारासाठी निवड जाहीर केली.

दुबई एअर शोमध्ये भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले:पायलटचा मृत्यू, हवाई दलाने केली पुष्टी

0

तेजसची किंमत ६०० कोटी रुपये आहे.

दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळले आहे. अल मकतूम विमानतळावर सुरू असलेल्या एअर शोमध्ये डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. वृत्तसंस्था एपीने वृत्त दिले आहे की, शुक्रवारी दुबई वेळेनुसार दुपारी २:१० आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा अपघात झाला.

या अपघातात तेजसच्या वैमानिकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी भारतीय हवाई दलाने केली. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर काळ्या धुराचे लोट दिसले.

अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन केले आहे.

हवाई दलाच्या तेजस जेट अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, २०२४ मध्ये, राजस्थानमधील पोखरण येथे एका युद्धाभ्यास दरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळले होते.दुबई एअर शो हे एक आंतरराष्ट्रीय विमान प्रदर्शन आहे. प्रमुख एरोस्पेस कंपन्या, विमान कंपन्या, हवाई दल आणि तंत्रज्ञान कंपन्या त्यांचे नवीन विमान, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्र प्रणाली आणि एरोस्पेस तंत्रज्ञान प्रदर्शित करतात. दुबई एअर शो १९८९ मध्ये सुरू झाला आणि दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.सध्या, भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये सुखोई एसयू-३०एमकेआय, राफेल, मिराज, मिग-२९ आणि तेजस यांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांमुळे तेजस इतर चार लढाऊ विमानांपेक्षा वेगळे आणि अद्वितीय आहे…

पहिले: विमानाचे ५०% घटक, म्हणजेच यंत्रसामग्री, भारतात तयार केली जातात.

दुसरे: हे विमान इस्रायली EL/M-२०५२ रडारने सुसज्ज आहे, जे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामुळे तेजस एकाच वेळी १० लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकतो आणि त्यांना लक्ष्य करू शकतो.

तिसरे: अतिशय लहान जागेवरून, म्हणजेच ४६० मीटर धावपट्टीवरून उड्डाण करण्याची क्षमता.

चौथे: हे लढाऊ विमान चारहीपैकी सर्वात हलके आहे, त्याचे वजन फक्त ६५०० किलो आहे

तेजसच्या पायलटचा पहिल्यांदाच मृत्यू
२००१ मध्ये झालेल्या पहिल्या उड्डाणानंतर तेजसच्या लढाऊ विमानाच्या पायलटचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च २०२४ मध्ये पहिला तेजस अपघात झाला होता, परंतु पायलट जेटमधून बाहेर पडला होता…

अनधिकृत प्लॉटिंगविरोधात पीएमआरडीएची जोरदार कारवाई!

पुणे – पुरंदरमधील अनधिकृत प्लॅाटिंगविरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्यावतीने दि.19 नोव्हेंबरपासून जोरदार कारवाई सुरू असून, गेल्या दोन दिवसांत तीन गावांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसणार आहे. तसेच, सोमवारी (दि.24)देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी सांगितले.
अनधिकृत प्लॉटिंगमुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयास अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, प्राधिकरणामार्फत मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील १५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यानुसार, दि.१९ नोव्हेंबरपासून पुरंदर तालुक्यातील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामध्ये गेल्या दोन दिवसांत तीन गावांमध्ये कारवाई झाली. त्यात मौजे देवडी, गट क्र. १७०, शंकर बाठे, मौजे आंबोडी गट क्र. १५९, निखिल बोरकर व यशोदीप बोरकर, मौजे काळेवाडी गट क्र. १७०६, गुलाब झेंडे / कातोबा डेव्हलपर्स (गणेश पार्क) मधील प्लॉटिंग, अंतर्गत रस्ता व डिमार्केशन पोल यावर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला तसेच पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील व उपायुक्त किरणकुमार काकडे, तहसीलदार आशा होळकर आणि शाखा अभियंता प्रितम चव्हाण, शशिभूषण होले, शरद खोमणे, हरीष माने, प्रमोद सोनवणे व संकेत बडे यांनी पार पाडली आहे.
या कारवाईमुळे पीएमआरडीए हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसेल. बेकायदेशीर अनधिकृत प्लॉटिंग म्हणजे शासनाकडील कोणतीही बिनशेती परवानगी न घेता, ले-आऊट करून फक्त तात्पुरते रस्ते दाखवले जातात. त्यामध्ये सदर जागेचा ले-आऊट नकाशा मंजूर करून घेतला जात नाही, त्यामुळे अशा प्लॉट्सना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लॉट खरेदी करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासूनच नागरिकांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये, याकरीता बेकायदेशीर प्लॉटिंगबाबत सावधगिरी बाळगण्यासदेखील त्यांनी सांगितले.

आमदार-खासदार कार्यालयात आल्यास अधिकाऱ्यांनी उभे राहावे – राज्य सरकार:शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय

0

मुंबई-आमदार किंवा खासदार कार्यालयात भेट देण्यासाठी आल्यावर जागेवरून उठून उभे राहा, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि फोनवर बोलतानाही नम्र भाषेचा वापर करा, अशा नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जारी केल्या. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही शासन निर्णयातून देण्यात आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान देणे हा प्रशासन अधिक विश्वासार्ह व जबाबदार बनवण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे यात म्हटले आहे. लोकप्रतिनिधींकडून आलेल्या पत्रांसाठी विभागांनी स्वतंत्र नोंदवही ठेवावी व दोन महिन्यांच्या आत त्यांना उत्तर द्यावे, अशा सूचनाही नव्या निर्णयात आहेत. जर वेळेत उत्तर देणे शक्य नसेल, तर संबंधित अधिकाऱ्याने आमदार किंवा खासदाराला त्याबद्दल कळवावे. लोकप्रतिनिधींना सौजन्याची वागणूक देण्याबाबतचे धडे शासकीय प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे निर्देशही यात आहेत.

हा नवीन जीआर अनेक जुन्या परिपत्रकांना एकत्रित करून अधिक स्पष्ट आणि कठोर करण्यात आला आहे. नुकतेच सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही अधिकारी वेळ देत नसल्याबद्दल आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षमता याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे या जीआरच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.

बेकायदा बांधकामांना आमदार आणि सरकारचेच अभय, कायदेशीर बांधकामे करणे, विकत घेणे मूर्खपणाचे ?

0

पुणे- वाहतूक समस्येचे आणि शहरी समस्येचे एकूणच मूळ बेकायदा बांधकामे ,सरकारी जमिनी लाटणे अशा बाबी मुख्यतः असताना अनेक आमदार आणि खुद्द सरकार मधील मंत्री आणि सरकार बेकायदा बांधकामांना अभय देणारे निर्णय घेत असल्याने कायदे पालीन बांधकामे करणारे मूर्ख ठरत असल्याचे स्पष्ट चित्र वर्षानुवर्षे दिसून आले आहे. पण अशा सरकारी धोरणांमुळे लोकांसाठी देखील बेकायदा बांधकामे करणे आणि जमिनी लाटणे हि सुसंधी निर्माण होत गेल्याने आणि बहुसंख्य लोक असे मार्ग स्वीकारू लागल्याने आता हि बहुसंख्यता पुन्हा मतात परिवर्तीत करणे लोकप्रतिनिधींना सुसह्य करत आहे. असे बेकायदा बांधकामात राहणारे लोक खूपच मोठ्या संख्येने असल्याने त्यांना विरोध करणे कोणाला शक्य उरले नाही उलट त्यांच्या याच गोष्टीचा राजकीय फायदा मात्र उचलणे सहज शक्य होते आहे.

कायदेशीर बांधकामे करणे किंवा विकत घेणे कसे शहराच्या हिताचे असते आणि बेकायदा बांधकामे करणे कसे घातक असते याचा प्रचार करण्या ऐवजी बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणारे निर्णय केवळ मते मिळविण्याच्या स्वार्थापायी घेऊन शहरे बकाल केली जात आहेत

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील तिप्पट शास्तीकर माफ करण्याची आमदार बापूसाहेब पठारे यांनी मागणी केली आहे. ज्यामुळे ज्यांनी कायदा पाळून आणि नियम पाळून बांधकामे केली किंवा अशी बांधकामे विकत घेतली ते सारे मूर्ख ठरणार असे चित्र आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर आकारण्यात आलेला तिप्पट शास्तीकर रद्द करण्याची मागणी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.

पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाने शहरांची बकालतेकडे वाटचाल

ज्या परिसरातून पूर्वी १०० घरे होती आणि १०० वाहने रस्त्यावर बाहेर येत त्या त्या परिसरात आता पुनर्विकास प्रक्लापांच्या नावाने १०० ऐवजी हजार / हजार घरे होऊ लागली आणि तेवढीच वाहने रस्त्यावर येऊ लागली . घरे , रहिवासी दहापटीने वाढले पण रस्ते मात्र होते तेवढेच राहिले . म्हणजे ज्या रस्त्यावर ज्या सोसायटीतून १०० वाहने बाहेर येत त्या सोसायटीतून पुनर्विकास प्रकल्पा नंतर दहापट वाहने बाहेर येऊ लागली तर काय होणार ?जेवढ्या पटीने घरे वाढली तेवढ्या पटीने रस्त्यांची रुंदी होते काय ? याकडे लक्षही दिले जात नसल्याने पुण्याची वाहतूक कोंडी एकीकडे नागरिकांची छळ करणारी समस्या बनली आहे तर दुसरीकडे राजकारण्यांना हि समस्या सोडविण्याचे गाजर दाखवणाऱ्या हजारो कोटीच्या योजना आणणारी संधी ठरत आली आहे.

असे प्रकार मुंबई ,पुण्या सारखी शहरे गिळंकृत करू लागल्याने येथील पर्यावरण, प्रदूषण यावर प्रचंड परिणाम होऊन हि शहरे बकाल बनत चालली आहे याकडे कोणाला लक्ष द्यायला अवधी मिळेनासा झाला आहे. त्यापेक्षा वाहत्या गंगेत हात धूवून घ्या आणि दूरवर फार्म हाउस बांध अशी संकल्पना पुढे जोर धरू लागली. वाहतूक समस्या , चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या रस्ते योजना , वाढते अपघात , वाढते प्रदूषण हे स्माप्त्तीच्या मागे धावताना शहरी जीवनमानावर जोरदार प्रघात करत आहेत आणि त्यास लोक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असे सारेच जबाबदार राहणार असून हे देखील त्यात भरडले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

पार्थ पवारांचा जमीन घोटाळा:शीतल तेजवानीने पैसे न घेता 42 एकर जमीन का विकली याचे कोडे उलगडेना

अजित पवार, बावनकुळे यांच्याकडून पाठराखण प्रकारत्यामुळे त्यांचेवरही संशयाची सुई ?

पुणे- -मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचा जबाब नाेंदवण्यासाठी पुणे पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिला गुरुवारी पाचारण केले. ६ तास कार्यालयात बसून तिचा जबाब नाेंदवून घेत तसेच व्यवहाराची आवश्यक कागदपत्रे पाेलिसांनी घेतली. मात्र, शीतल तेजवानी हिने संबंधित जमिनीचे २७२ मूळ महार वतनदार यांच्याकडून काेणतेही पैसे न घेता पाॅवर ऑफ ॲटर्नी कशा प्रकारे घेतली आणि तिने काेणतेही पैसे न घेता सदर ४२ एकरची जमीन अमेडिया एलएलपी कंपनीस का विकली यामागील काेडे पाेलिसांना अद्याप उलगडले नसल्याने त्याबाबत तेजवानी हिच्याकडे सखाेल चाैकशी करण्यात आली आहे.

महार वतनदार यांच्या म्हणण्यानुसार सन २००६ मध्ये सदर जमिनीशी संबंधित पाॅवर ऑफ ॲटर्नी शीतल तेजवानी हिने घेतली आहे. याबाबत काही जणांना तेजवानी हिची कंपनी पॅरामाउंट एंटरप्रायजेसद्वारे पाच हजारांचे चेक दिले गेले, परंतु नंतर ते बाऊन्सदेखील झाले आहेत. तसेच ही जमीन सरकारकडून रि-ग्रँट मिळवण्यासाठी कुलमुख्त्यारपत्र दिले गेल्याचे सांगण्यात येत असून त्यात जागा विक्रीची तरतूद नव्हती. सन २०१३ मध्ये या जमिनीशी संबंधित वादाबाबत मुंबईत महसूल खात्याने बैठक घेऊन तत्कालीन महसूलमंत्र्यांनी ही जमीन बाॅटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांना ५० वर्षांच्या कराराने दिली

व्यवहार करतानादेखील तेजवानी हिने अमेडिया कंपनीकडून काेणतेही पैसे न घेता खरेदीखत कसे केले हा देखील प्रश्न पाेलिसांना पडला आहे. व्यवहारावेळी २१ काेटी रुपये दस्तनाेंदणी भरणे आवश्यक असताना केवळ ५०० रुपयांत हा व्यवहार कसा पार पडला याअनुषंगानेदेखील हिला प्रश्न विचारण्यात आले.

अंजली दमानिया यांना साेमवारी पाेलिसांनी त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी बाेलावल्याचे सांगण्यात आले. नेमका व्यवहार कशा प्रकारे पार पडला याचा उलगडा करण्यासाठी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांचीदेखील पाेलिसांकडून चाैकशी करून जबाब नाेंदवला जाईल.

या गुन्ह्यामध्ये अमेडिया कंपनीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या कंपनीत पार्थ पवार हे प्रमुख भागीदार असून त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे दुसरे भागीदार आहेत. पार्थ पवार यांनी संबंधित व्यवहार करण्यापूर्वी मे २०२५ मध्ये रिझाेल्युशन लेटरच्या माध्यमातून कंपनीच्या वतीने व्यवहार करण्याची जबाबदारी दिग्विजय पाटील यांना दिली असल्याचे कागदाेपत्री स्पष्ट दिसून येते. मात्र, अजित पवार यांनी मुलाची पाठराखण करत हा व्यवहार रद्द करत असल्याचे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सांगत चुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात अमेडिया कंपनीला ४२ काेटी रुपये दस्त नाेंदणी भरल्यानंतरच व्यवहार रद्द हाेऊ शकेल अशी नाेटीस कशी पाठवली गेली याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या जामिनावर २८ ला सुनावणी होणार

या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावरदेखील खडक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर येवले यांनी अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला हाेता. मात्र, याप्रकरणी आता २८ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, सदर भाडेकरार हा सन २०३८ मध्ये संपुष्टात येणार असल्याचे सांगत तेजवानी हिचा अर्ज फेटाळून लावला हाेता. मात्र, त्यानंतर तेजवानी हिने जागेची परस्पर विक्री अमेडिया कंपनीला कशा प्रकारे केली याबाबतची चाैकशी पाेलिसांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

इफ्फीचे उद्घाटन प्रथमच रस्त्यावर लोकांच्या गर्दीत: ऐतिहासिक संचलनाने सुरुवात

#IFFIWood, sharad lonkar 20 नोव्‍हेंबर 2025

रस्त्यांवर उतरा. लय अनुभवा. कथा उलगडताना पहा. इफ्फी गोव्याला जिवंत, उत्साहपूर्ण वातावरणात परिवर्तित करते. आतापर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात प्रथमच, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने -इफ्फी 2025 ने पारंपरिक चार भिंती ओलांडून गोव्याच्या चैतन्यशील हृदयात पाऊल ठेवले आहे – तेथील लोक, रस्ते आणि भावनांना एका अभूतपूर्व उत्सवात सामावून घेतले आहे.

आज भव्य उद्घाटनाची नव्याने धाडसी कल्पना अमलात आणत इफ्फी 2025 ने शहराला एका विशाल, जिवंत कॅनव्हासमध्ये रूपांतरित केले – जिथे सिनेमाची भव्यता सांस्कृतिक वैभवात मिसळून गेली आणि कथाकथनाची अमर जादू गोव्याच्या रस्त्यांवर उतरली. कलाकार, कलावंत आणि चित्रपटप्रेमींची उर्जा आणि मनोरंजनाने सर्व रस्ते ओसंडून वाहत होते, गोवा जणू काही सर्जनशीलतेच्या स्पंदित कॉरिडॉरमध्ये रूपांतरित झाले – जो केवळ उत्सवाच्या प्रारंभाचा संकेत नव्हता तर इफ्फीच्या वारशातील एका धाडसी नवीन अध्यायाची ती पहाट होती.

या समारंभाचे उद्घाटन करताना गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी इफ्फीच्या वाढत्या जागतिक दर्जाचे कौतुक केले. ते म्हणाले, “इफ्फी हे सर्जनशील देवाणघेवाण, नवीन सहकार्य आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेच्या उत्सवाचे एक अर्थपूर्ण व्यासपीठ बनले आहे. गोव्याचे आंतरराष्ट्रीय स्वरूप, सांस्कृतिक समृद्धता आणि जागतिक जोडणी लक्षात घेता चित्रपटप्रेमी येथे इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येणे स्वाभाविकच आहे.” त्यांनी यावर भर दिला.

ते म्हणाले की इफ्फीने नेहमीच पारंपरिक चित्रपट महोत्सवाच्या सीमा ओलांडल्या आहेत – जगभरातील कल्पना, कथा आणि सर्जनशील मनांसाठी बैठकीचे ठिकाण म्हणून काम केले आहे, तरुण चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे, चित्रपटसृष्टीतील प्रतिभेचा सन्मान केला आहे आणि चित्रपट तसेच सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्थळ म्हणून गोव्याच्या उदयावर प्रकाश टाकला. “जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह गोवा सज्ज आहे आणि म्हणूनच ते इफ्फीचे कायमचे घर बनले आहे. आपले निसर्गरम्य सौंदर्य चित्रपटनिर्मात्यांना आकर्षित करतेच, परंतु आपल्या मजबूत धोरणात्मक सुधारणा त्यांना पुन्हा पुन्हा येत राहण्यास भाग पाडतात”, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी नमूद केले की इफ्फी 2025 “सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण” ही संकल्पना साजरी करत आहे जे जागतिक सर्जनशील क्रांतीमध्ये भारताच्या नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे. “इफ्फी भारतीय प्रतिभेला जागतिक शक्यतांशी जोडते. गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. गोव्यात या, तुमच्या कथा सांगा, तुमचे चित्रपट चित्रित करा” असे आवाहन त्यांनी केले. भारतीय चित्रपटांना अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून देण्याच्या आणि कथाकथनाच्या जगात भारताला एक उदयोन्मुख मुलायम शक्ती बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला त्यांनी याचे श्रेय दिले.

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनीही उपस्थितांना संबोधित केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी प्रत्येक पर्वागणिक विकसित होत गेला असल्याचे ते म्हणाले. याआधी परंपरेनुसार या महोत्सवाचा प्रारंभ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होत होता, मात्र यंदा, आपल्या राज्यांमधील वैविध्यपूर्ण परंपरांचं दर्शन घडवणाऱ्या, एका भव्य सांस्कृतिक कार्निव्हलच्या रूपात या महोत्सवाचा प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले. आशय सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृतीचे बळ लाभलेल्या ऑरेंज इकॉनॉमीची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले. मुंबईत आयोजित केलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेसारख्या उपक्रमांमुळे देशभरातील उदयोन्मुख सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन मिळू लागले असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्याला इफ्फीचे कायमस्वरूपी घराचे स्थान मिळवून देण्यात दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी पर्रीकर यांना श्रद्धांजलीही वाहिली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यंदाच्या पर्वाच्या आयोजनाची वैशिष्ट्ये त्यांनी अधोरेखित केली. पहिल्यांदाच, इफ्फीचा प्रारंभ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करणाऱ्या, एका भव्य कार्निव्हलने होत असल्याचे ते म्हणाले. या वर्षीच्या आयोजनाअंतर्गत आत्तापर्यंतचे सर्वाधिक चित्रपट दाखवले जात असून, हे चित्रपट सुमारे 80 देशांचे प्रतिनिधित्व करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय आणि जागतिक प्रीमियरही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एआय फिल्म हॅकेथॉन आणि वेव्ह्ज फिल्म बाजार ही आजवरची सर्वात मोठी सिने बाजारपेठ, अशी नवी जोडही यंदाच्या आयोजनाला लाभली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच आज सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि या उद्योग क्षेत्राशी संबंधीत नवोन्मेषाच्या बाबतीत इफ्फी आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.

ऐतिहासिक भव्य संचलन

गोवा सरकारच्या 12 चित्ररथांसह दोन डझनहून अधिक चित्ररथांनी भारताचा सिनेमॅटिक वारसा, अ‍ॅनिमेशनचे जग आणि प्रादेशिक संस्कृतींच्या समृद्ध विविधतेचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय संचार ब्युरो आणि एनएफडीसीने 50 व्या वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून सादर केलेला ‘भारत एक सूर’ हा भव्य लोककला कार्यक्रम होता. एनएफडीसी मागील पाच दशकांपासून देशभरातील चित्रपट निर्मात्यांना देत असलेले प्रोत्साहन आणि सिनेमॅटिक नवोपक्रमांना देत असलेली चालना यांचा हा गौरव होता. 100 हून अधिक कलाकारांनी पारंपारिक नृत्य सादर केले आणि या सादरीकरणाच्या भव्यतेने आणि उर्जेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

छोटा भीम, मोटू पतलू आणि बिट्टू बहानेबाज सारख्या लाडक्या अ‍ॅनिमेटेड पात्रांच्या उपस्थितीने उत्साहात भर पडली, त्यांनी साधलेल्या थेट संवादांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली. या संचलनाने महोत्सवाच्या पुढील दिवसांसाठी एक उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण केले.

उद्घाटनाचा चित्रपट

गॅब्रिएल मस्कारोची डिस्टोपियन कथा ‘द ब्लू ट्रेल’, ज्याला मूळ पोर्तुगीजमध्ये ‘ओ उल्टिमो अझुल’ म्हणून ओळखले जाते, या चित्रपटाने आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)उद्घाटन झाले, जे गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात त्याच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. उद्घाटन झालेल्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली ज्यामुळे लोकांमध्ये कौतुक आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोंढव्यात छोटी मोठी भेद न करता बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई

पुणे: कोंढव्यात छोटी मोठी भेद न करता बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई महापालिकेने सुरू ठेवली आहे.

कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत दि.19/11/2025 रोजी कोंढवा खुर्द , शिवनेरी नगर गल्ली नंबर 29 मध्ये G+6 व G+7 मजल्या च्या दोन, इमारतीवर 10500 चौ.फुट आर सी सी बांधकाम वर कारवाई झाली
सदर कारवाई साठी 6 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 5 कनिष्ठ अभियंता, 2 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात येत आहे.