Home Blog Page 24

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

पुणे, दि. २०: यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीकपद्धतीचे नियोजन करावे, त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील , यादृष्टीने आवश्यक सुक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वितरक आणि दुकांनदारावर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

छत्रपती शाहू संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) सभागृहात खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मीनल करनवाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.

गतवर्षी अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन मदत मिळेपर्यंत कृषी विभागाने अतिशय चांगले काम केल्याबद्दल श्री. भरणे यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात, त्यांचा विभागावर मोठ्याप्रमाणात विश्वास असतो. कृषी विभागाचा सल्ल्यानुसार ते शेती करीत असतात, त्यामुळे अधिकाऱ्यांने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करावे. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासोबतच त्यांची फसवणूक टाळण्याच्यादृष्टीने बियाणांची तपासणी वेळेत करावी. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर ताबडतोब कार्यवाही करावी. तसेच युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता खतांचा साठा होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. युद्धजन्य परिस्थितीमुळे युरिया खताची टंचाई भासल्यास शेतकऱ्यांना पर्यायी खताचा वापर करण्याबाबत तपासणी करावी,जलंसधारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे.  

प्रतिकुल हवामान, अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टीच्या धर्तीवर कृषी विद्यापीठाने संशोधन करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्यादृष्टीने नवनवीन वाण उपलब्ध करुन दिले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होण्यासोबतच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्यादृष्टीने सामूहिक प्रयत्न करावे.

आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारीला सुरुवात केली असून या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शंकाचे निरसन करण्यात यावे, माहितीची देवाण-घेवाण करावी, विधायक सूचना कराव्यात, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी उपायोजना कराव्यात, त्याची कृषी आयुक्तालयाच्यावतीने नोंद घेवून कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. भरणे म्हणाले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एल निनो’ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये कृषी विभागाचा आढावा सादर करण्यात आला आहे. जलसंधारणाची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावी, वैरण विकास कार्यक्रम राबविण्याकरिता कृषी विभागाने अग्रेसर राहून कामे करावीत. ॲग्रीस्टॅक योजनेला आयएफएमएस पोर्टलशी संलग्न करावे. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यादृष्टीने कामे करावीत, असेही श्री. मांढरे म्हणाले.

याकार्यशाळेत भारतीय हवामान शास्त्र विभाग, खरीप नियोजन -२०२६, महाबीज, कृषी विद्यापीठ सर्व संचालक (विस्तार), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींचे सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घ्यावा.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, कृषी विभागाचे सर्व उपसचिव,सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक, सर्व कृषी संचालक,सर्व विभागीय कृषी संचालक,सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक, कृषी उप संचालक व काही शेतकरी उपस्थित होते.

आज सूरत, उद्या मुंबई-पुणे?:गुजरातमधील परिस्थितीवरून रोहिणी खडसे आक्रमक; सूरतमधील गॅस टंचाईचा महाराष्ट्राला इशारा

मुंबई-गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागला असून, त्यावरून महाराष्ट्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मिडल-ईस्टमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी संकटाचा फटका भारतातील अनेक भागांना बसत असून, सूरतमध्ये त्याचे तीव्र परिणाम दिसून येत आहेत. उद्योगधंदे बंद पडत असून, मजुरांना रोजगार गमवावा लागत आहे, असे त्यांनी नमूद केले.

सूरतमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो मजुरांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईमुळे स्ट्रीट फूड विक्रेते, छोटे हॉटेल्स आणि ढाबे बंद पडले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, मोठ्या संख्येने कामगारांना आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

या परिस्थितीचा थेट परिणाम सूरतमधील उधना रेल्वे स्थानकावर दिसून आला. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो मजूर आणि प्रवासी स्टेशनवर जमा झाले होते. या प्रचंड गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या घटनेने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे.

रोहिणी खडसे यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सूरतमधील दृश्ये अत्यंत वेदनादायक आहेत. गॅस टंचाईमुळे मजुरांच्या हातून रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावले गेले आहेत. हजारो लोक आपल्या कुटुंबासह परत जाताना दिसत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर, महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही त्यांनी इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे शहरांमध्येही गॅस टंचाईमुळे हॉटेल्स आणि खानावळी बंद पडण्याचे प्रकार घडले होते. मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी आलेल्या तरुणांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ही परिस्थिती सूरतसारखीच होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही सूरतसारखीच अवस्था

रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, परिस्थिती अत्यंत गंभीर असताना सरकार निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही सूरतसारखीच अवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारने तात्काळ पावले उचलून गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि मजुरांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्या- शिवसेनेचा आरोप

पुणे- शहरात काही महापालिकेच्या वर्षापूर्वी बोगस गुंठेवारी दाखल्याचे प्रकरण गाजले होते पण तरीही ते हलक्यात घेतले असताना आता त्यावर कोणाचे नियंत्रण उरलेले एकीकडे दिसत नाही अशा पार्श्वभूमीवरच बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विकासक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विकासक आणि महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हे बनावट परवाने मिळवून इमारतींना मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरातील उंच इमारतींच्या मंजुरीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे.

एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेला कळवले आहे की, आंबेगाव येथील एका प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी ‘पूर्णपणे बनावट’ आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याबाबत शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले आहे. ६ एप्रिल रोजी पुरावे देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप घरत यांनी केला. एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात असताना, सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवणे हा राष्ट्रद्रोहाचा प्रकार असल्याचे घरत यांनी म्हटले आहे.

खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या इमारतींना तात्काळ टाळे ठोकून दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही घरत यांनी दिला.

४३ कोटींची फसवणूक:दोन हजार गुंतवणूकदार बळी,बड्या राजकीय आणि प्रशासकीय हस्ती,बडी प्रसारमाध्यमे यांच्याशी कायम संबधित राहिलेल्या संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगेवर गुन्हा दाखल

0

पुणे-गुंतवणूकदारांना १ ते ५ टक्के मासिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजच्या दोन संचालकांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात फसवणुकीचा आकडा ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.संतोष नाथा बांदल Santosh Natha Bandal (रा. गिडणी पार्क, सॅलिसबरी पार्क)आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे Dnyaneshwar Anant Chorge (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने ९ महिने गोपनीय चौकशी करुन स्वत: पुढाकार घेऊन ही कारवाई केली आहे.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बड्या राजकीय आणि प्रशासकीय हस्ती,बडी प्रसारमाध्यमे यांच्याशी कायम संबधित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. बड्या प्रसार माध्यमांच्या इव्हेंट ला स्पॉन्सर शिप देणे मुख्यमंत्र्यांपासून ते असंख्य सिलेब्रिटी समवेत कार्यक्रम करणे, यासह मोठी डामडौल या कंपनीची कायम दिसत आली आहे. त्यांचे कार्यालय Success Square, Office No 301, 3rd FloorKarve Statue Chowk, Karve Road Pune, Maharashtra, 411038 येथे आहे.

आरोपींनी एकूण १५ कंपन्या दाखविल्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक योजना तयार केल्या होत्या. कागदोपत्री १ टक्का, तर प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून त्यांनी गुंतवणूकदारांकडून तब्बल ४३ कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या.जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देणे बंद केल्याने अनेकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या. या तक्रारींच्या आधारे अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनातर्फे अनियमित (अनधिकृत) ठेवी योजना बंदी कायदा, २०१९ च्या कलम २१ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात, पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, “गुन्हा दाखल झाल्यानंतर बांदल आणि चोरगे यांच्या कार्यालयावर व राहत्या घरी झाडाझडती घेण्यात आली. प्राथमिक चौकशीत किमान दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.”

बड्या बड्या प्रसार माध्यमातून जाहिराती द्वारे , कार्यक्रमांतून बड्या हस्तीकडून या कंपनीच्या संचालकांचे कायम कौतुक झाले आहे तरीही असा गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे काही हितचिंतक गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांना रुपाली पाटलांनी घातले साकडे

पुणे-राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे मांडले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026 असणार आहे. 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 मे आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

रूपाली ठोंबरे यांचे पत्र जशास तसे

रूपाली पाटील ठोंबरे आपल्या पत्रात लिहितात की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून मा. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यांने लढा दिला आहे.
माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे.

मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल. त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे.

म्हणून आपणास नम्म्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, ही नम्र विनंती, असे रूपाली पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास केला असल्याने त्यांना जनतेच्या प्रश्नांची बारकाईने माहिती आहे. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांच्या योजना आणि विकासकामांमागील भूमिका होती. त्यामुळे जनहिताचे निर्णय घेताना ते कधी कचरले नाहीत, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले.

प्रा. विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या आणि ‘अग्निपंख प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या ‘नोटसम्राट 2’ या पुस्तकाचे प्रकाशन उपाध्ये यांच्या हस्ते झाले. प्रकाशनानंतर ते बोलत होते. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

उपाध्ये म्हणाले, “दूरदृष्टीने घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. विरोधकांनी मात्र मोदीजींना राजकीय विरोधासाठी विरोध केला. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध होत असून, त्यांनी गेल्या बारा वर्षात घेतलेल्या निर्णयांचे चांगले परिणाम समाज अनुभवत आहे.”

कुलकर्णी म्हणाले, ” विषय तज्ज्ञांनी त्यांच्या विषयातील तांत्रिक माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिणे आवश्यक आहे. सध्या माहितीचे युद्ध आहे. जे कुठल्याही देशाच्या थेट आक्रमणापेक्षा गंभीर आहे. सध्या डिजिटल माध्यमांमध्ये अधिकाधिक आशयाची निर्मिती पाश्चिमात्य देशांकडून केली जाते. आपल्याकडून मर्यादित प्रमाणात आशय निर्मिती होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात डिजिटल माध्यमांमध्ये अधिकाधिक आशय वेगाने निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

आंबेकर म्हणाले, “भारतात 1996 पर्यंत बनावट नोटांची समस्या नव्हती. त्यानंतरच्या वर्षात प्रथमच भारताच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या आणी त्यावेळ पासुन भारतात बनावट नोटांचा प्रश्न सुरु झाला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापुन भारतात पाठवायला सुरुवात केली. 2004 ते 2014 या काळात देशांतर्गत झालेल्या 500 अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे हे पैसे वापरले गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना स्वेच्छेने नव्हे, तर अनिवार्यता म्हणून नोटबंदी करावी लागली. या पुस्तकात ही सर्व माहिती रंजक पद्धतीने कथानकाच्या स्वरूपात मांडण्यात आली आहे.”

प्रकाशक अविनाश नाईक यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव

पुणे :
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पाला ७ हजार आंब्यांची आकर्षक आरास करुन महानैवेद्य दाखविण्यात आला. तसेच यानिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने सकाळची आरती बी. यू. भंडारी ग्रूपचे चंद्रवर्धन भंडारी व उल्हास घाटगे यांनी सपत्नीक तसेच चिवडेवाले रामचंद्र भगवानदास यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनीही आरतीत सहभागी होत मंगलमय वातावरणाचा अनुभव घेतला.

आंबा महोत्सवासाठी यंदा तब्बल ७ हजार आंब्यांचा वापर करून बाप्पांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवलेले गणरायाचे रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या सजावटीसाठीचे आंबे शहरातील विविध अनाथ आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत.

दरम्यान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, पुणेकर भक्तांमध्ये या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


‘हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पावर पुणेकरांसह संपूर्ण राज्यातील भाविकांची विशेष श्रद्धा आहे. आज अक्षय तृतियेनिमित्त बाप्पाला ७ हजार आंब्यांचा आरासरुपी दाखवलेला केवळ महानैवेद्य नसून मानवतेचीही पूजा आहे. कारण हे सर्व आंबे शहरातील विविध आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत. बाप्पाचा भाविक म्हणून आमच्या सर्वांसाठीच हे अत्यंत पवित्र कार्य असून आमच्या हातून ते असंच वाढत जावो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना’’.
पुनीत बालन
(उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर:उद्योगमंत्री उदय सामंत; धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

पुणे: “सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देण्याचा धर्म शिवसेना पक्षाने पाळलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे अखेरच्या श्वासापर्यंत सामान्यांसाठी कार्यरत होते. त्यांच्याच नावाने शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’ ही लोकचळवळ सुरु झाली आहे. पुण्यातील नागरिकांना या कक्षाचा चांगला लाभ होईल व शिवसेनेची सामान्य लोकांप्रती असलेली बांधिलकी अधिक घट्ट होईल,” असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केले.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे राज्य प्रमुख व शिवसेनेचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. सारसबागेजवळील शिवसेना भवनात आयोजित या कार्यक्रमावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, सुधीर कुरूमकर, आबा बागुल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला. तसेच ठाण्यातील टेम्भीनाक्यावरील देवीचे पूजन व शासकीय योजनांची दहीहंडी फोडण्यात आली.

उदय सामंत म्हणाले, “शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढे यावे. सहायता कक्षाची चळवळ गावागावात पोहोचावी, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. अशा उपक्रमांतून समाज तर घडतोच, पण तुमच्यातील नेतृत्वही विकसित होते. चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहते. वैभव वाघ यांच्यासारख्या उमद्या तरुणाच्या पुढाकारातून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाईल, असा विश्वास आहे.”

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शासनामार्फत विविध योजना, आरोग्यसुविधांसाठी सहायता निधी उपलब्ध असतो. मात्र, माहितीच्या अभावाने अशा योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सुरु होत असलेल्या या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाची मोठी मदत होईल. अडचणीच्या काळात मदतीचा हात मागण्यासाठी येणाऱ्या लोकांना शिवसेना भवन हे दिघे साहेबांच्या आनंदाश्रमाप्रमाणे वाटावे, असे कार्य आपण सर्वानी येथून करायला हवे.”

प्रास्ताविकात वैभव वाघ यांनी सांगितले की, शासकीय योजनांचा अक्षय्य ठेवा जनसामान्यांपर्यंत पोहचवत, तसेच लोकहिताचे काम करत पुणे शहरातील शिवसेना भवनाला आनंद दिघे यांच्या विचारांचा ‘आनंदाश्रम’ बनवायचा आहे. मागेल त्याला मदत आणि प्रत्येकाच्या समस्यांचे निराकरण या दिघे साहेबांच्या संस्काराला अनुसरून अखंड काम सुरु राहील. गोरगरीब जनतेच्या हितासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे व सर्व सहकारी मोठ्या तळमळीने काम करीत असून, त्यांचे हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे.”

महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणे दुर्दैवी
माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. अशा नीच प्रवृत्ती ठेचून काढण्याची शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास सुरु असून, त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींना सोडले जाणार नाही. तपास यंत्रणेच्या कामात मला हस्तक्षेप व त्यावर भाष्य करता येणार नाही. खरातसोबत कोणाचे फोटो आले म्हणजे तेही तितकेच दोषी आहेत, असे मानने योग्य नाही. महिलांसाठी आणलेले विधेयक लोकसभेत नामंजूर होणे दुर्दैवी होते. हा दिवस खऱ्या अर्थाने काळा दिवस होता. देशातील महिलांना सन्मान व न्याय देण्यासाठी आणलेले हे विधेयक नाकारून विरोधकांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना महिलांसमोर जाऊन आता मते मागण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांना महिलांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे. उबाठा गटाच्या माजी खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असेल, तर त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे उदय सामंत म्हणाले. असेल तर त्यांचा अभिनंदन केलच पाहिजे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. विधानपरिषदेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. १२ तारखेपूर्वी याबाबत निर्णय होईल. नवीन चेहरा द्यायचा की जुना चेहरा द्यायचा, याचे अधिकार शिंदे यांनाच आहेत. त्यामुळे योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

“गिग वर्कर्स न्याय अभियान” पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई, दि. १९ एप्रिल २०२६
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली गांधी भवन, कुलाबा येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षण सत्रासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी असद उस्मानी उपस्थित होते. त्यांनी SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देत, मतदार यादी पुनरिक्षणातील तांत्रिक बाबी, अर्ज प्रक्रिया, आक्षेप नोंदविण्याच्या पद्धती तसेच पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा धवले, फरहान मन्सुरी, शेखर जगताप, शिव जतन यादव, उत्तर-पश्चिम मुंबईचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल समद शाह तसेच प्रदेश सरचिटणीस मितेश सोनकर, अमनदीप सैनी, आसिफ खान आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या SIR मोहिमेच्या आधी ज्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली, त्या ठिकाणी लाखो मतदारांची नावे वगळली गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, यासाठी युवक काँग्रेसने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना सुसज्ज करून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, लोकशाहीने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, मतदार यादीतून नाव वगळले जाणे हा नागरिकांच्या हक्कांवर आघात आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरपणा राखण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुंबईत SIR प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने मतदारांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी “गिग वर्कर्स न्याय अभियान” या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गिग इकॉनॉमीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे झीनत शबरीन म्हणाल्या..

शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात मॉलचे उद्घाटन

विकासकामांना गती देण्याचा संकल्प; स्थानिकांना आधुनिक सुविधांची उपलब्धता

पुणे, दि. १९ एप्रिल २०२६ :
पुण्यातील लोहगाव परिसरात उभारण्यात आलेल्या ‘ईशान मॉल’चा उद्घाटन सोहळा शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी उदघाटन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी मॉलच्या प्रगती व भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “पुणे शहरासह वडगाव शेरी, खराडी आणि लोहगाव परिसर झपाट्याने विकसित होत असून नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता स्थानिक पातळीवर आधुनिक सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘ईशान मॉल’मुळे नागरिकांना तुळशीबागेसारख्या खरेदी सुविधा आपल्या परिसरातच मिळणार असून, हा प्रकल्प स्थानिक विकासाला चालना देणारा ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या की, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने सकारात्मक काम करणारे आनंद गोयल यांनी उभारलेला हा मॉल स्थानिकांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. नागरिकांचे प्रेम आणि सहकार्य यामुळेच असे प्रकल्प यशस्वी होतात, असेही त्यांनी नमूद केले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले. त्यांनी आनंद गोयल यांच्या कार्याचे कौतुक करत ‘ईशान मॉल’साठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, आबा बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आनंदजी गोयल यांनी केले होते.
समारोपात सर्व मान्यवरांनी ‘ईशान मॉल’मुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला

बालविवाह रोखूया, भविष्य घडवूया…!!

बालविवाह ही मुलींच्या सर्वांगीण विकासाला अडथळा निर्माण करणारी आहे. शिक्षण,आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधी हिरावून घेणाऱ्या या प्रथेमुळे अनेक मुलींचे बालपण हरवते आणि त्यांचे आयुष्य अडचणीत येते. समाजातील रुढी, परंपरा, अज्ञान आणि आर्थिक कारणांमुळे आजही काही ठिकाणी बालविवाह होत असल्याचे दिसून येते. या गंभीर समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ लागू केला आहे. हा कायदा बालविवाह रोखण्यासाठी, संबंधितांना शिक्षा करण्यासाठी तसेच पीडितांना न्याय व संरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

भारतात मुलीच्या विवाहाचे वय १८ निश्चित करण्यात आले आहे, हे आपल्याला माहिती आहेच. मात्र, भारतात मोठ्या प्रमाणात बालविवाह केले जातात. भारतीय पुरुषप्रधान संस्कृती आणि जुन्या रुढी-परंपरांचा पगडा यामुळे भारतात, विशेषतः ग्रामीण भागात आजही मुलगी वयात आली, की तिचे लग्न लावून दिले जाते. लहान वयात लग्न केल्यामुळे त्या मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. भारतात मोठ्या प्रमाणावर मुर्तीचे बालविवाह केले जात असल्यामुळे ते रोखणे अवघड आहे. त्यासाठी २००६ मध्ये बाल विवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला. हा कायदा २००७ मध्ये अमलात आला.

या कायद्यानुसार, मुलीचे वय १८ पूर्ण आणि मुलाचे वय २१ पूर्ण नसेल, तर तो कायद्याने गुन्हा मानला गेला आहे. अशा विवाहास बालविवाह मानले जाते आणि तो बेकायदेशीर ठरतो. मुलीचे वय १८ पूर्ण आणि मुलाचे वय २१ पूर्ण नसताना त्यांचा विवाह केल्यास त्यांचे कायदेशीर पालक शिक्षेला पात्र ठरतात. भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा एक नोव्हेंबर २००७ रोजी अस्तित्वात आला. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २००७ मध्ये एक ऐतिहासिक निवाडा दिला. त्यानुसार अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध हा गुन्हा ठरविण्यात आला. तोपर्यंत पुरुषांना लग्नबंधनामुळे अल्पवयीन वधूशीही शरीरसंबंध ठेवता येणे हा गुन्हा नव्हता.

कायद्याचे स्वरुप: या कायद्याचे २१ विभाग आहेत. केंद्रशासित प्रदेश पाँडिचेरीतील फ्रेंच नागरिकत्व असलेले लोक वगळता तो सर्वत्र लागू आहे. दुसऱ्या विभागात काही व्याख्या दिल्या आहेत.

या कायद्याअंतर्गत २१ वर्षे पूर्ण न केलेला पुरुष व १८ वर्षे पूर्ण न केलेली स्त्री, विवाहेच्छू कुटुंब म्हणून लग्न ज्याचे किंवा जिचे आहे, त्याचे किंवा तिथे अशी दोन्ही कुटुंबे तसेच बालविवाह वर व वधू यापैकी कुणीही बाल असेल, तर तो बालविवाह, सज्ञान कायद्यान्वये जो सज्ञान नाही, अशी कुठलीही व्यक्ती अल्पवयीन मानली जाते.

विवाहविच्छेद (कलम ३) नुसार प्रत्येक बालविवाह विवाहेच्छूक कुटुंबांच्या मर्जीने रद्द करता येतो. सज्ञान झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत वर किंवा वधू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून विवाहविच्छेद करू शकतात. यासंबंधात जिल्हा न्यायाधीश संबंधित कुटुंबांना विवाहाचा खर्च, पैसे, दागिने, भेटवस्तू व इतर किमती वस्तू दुसऱ्या कुटुंबास परत देण्याचा आदेश देऊ शकतात.

बालविवाह रद्द करताना जिल्हा न्यायाधीश वधुपक्षाला पोटगीरूपी भरपाई देण्याचा आदेश वरपक्षाला देऊ शकतात. बालविवाहातील पुरुषही अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांना ही भरपाई द्यावी लागेल. वधूचा दुसरा विवाह होईपर्यंत तिला ही भरपाई घेता येते. ही भरपाई एकदा किंवा दरमहा देता येते. यासोबत वधूच्या राहण्याची व्यवस्था करण्याबाबतचा आदेशही न्यायालय देऊ शकते. वधूची सांपत्तिक स्थिती बघून न्यायालय हा आदेश देऊ शकते.

बाल विवाह केल्यास शिक्षेची तरतूद: बालविवाह करणारा पुरुष १८ वर्षांहून अधिक वयाचा असेल तर त्याला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते किंवा एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, लग्न लावल्याबद्दल शिक्षा बाल विवाह लावणारा, ठरवणारा, पार पाडणारा, सूचना देणारा अशा कुठल्याही पद्धतीने या विवाहाला प्रोत्साहन देणारा माणूस शिक्षेस पात्र आहे. अशा व्यक्तीला दोन वर्षे सक्तमजुरीची किंवा एक लाख रुपये दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बालविवाहास परवानगी देणारे माता पिता, अन्य पालक किंवा अशी एखादी संस्था, कळत नकळत या विवाहाला मान्यता देणारे, या विवाहास उपस्थित राहणारे अशा कुणालाही दोषी आढळल्यास दोन वर्षे सक्तमजुरी किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

श्रीमती रोहणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी:
प्रशासनाच्यावतीने एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ अखेर ५४ बालविवाह रोखलेअसून १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बालविवाह करणे, त्याचे आयोजन करणे हे कायद्याने गुन्हा असून बालविवाहाचे आयोजन करणाऱ्या सर्व सहभागी यांना शिक्षा होऊ शकते. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास चाईल्ड लाईन १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

संकलन: जिल्हा माहिती कार्यलय, पुणे

निवृत्त सहायक आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक:पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे –पुण्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता केदारी (रा. बोरज) आणि बाळासाहेब वाळुंज (रा. कामशेत, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजित विलास उंद्रे (वय ३५, रा. मांजरी खुर्द) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहायक पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहायक आयुक्तांनी २०२६ मध्ये खेड तालुक्यातील बोरज येथे मुंबईतील एका व्यावसायिकाची १२ एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. ही जमीन खरेदी केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष त्यांनी दाखवले.

त्यानंतर सहायक आयुक्तांनी मुंबईतील व्यावसायिकाच्या नावाने एका बँकेत खाते उघडले आणि तक्रारदाराकडून ५० लाख रुपये घेतले. तसेच, सोलापूर येथील एका बँकेत खासगी कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून आरटीजीएसद्वारे २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी व्यावसायिकाकडून आणखी पैसे घेण्यात आले.

खरेदीखत करायचे असल्याचे सांगून सहायक आयुक्ताने तक्रारदार व्यावसायिकाकडून १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. खेडमधील जमीन मुंबईतील व्यावसायिकाची होती, मात्र तो हयात असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. जेव्हा तक्रारदार व्यावसायिकाने पैसे परत मागितले, तेव्हा सहायक आयुक्तांनी टाळाटाळ केली आणि त्यांना धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तपासात असे उघड झाले आहे की, सहायक आयुक्तांनी काही रक्कम पत्नी आणि मुलाच्या खात्यात जमा केली होती. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या इतर दोघांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

“एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच भोंदू खरात बाबा प्रकरणाचा उपयोग

देशात एकीकडे महिलेच्या छेडछाडीतून हाणामाऱ्या खून पडतात त्याच देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करतात

मुंबई- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी भोंदू खरात बाबाच्या प्रकरणी तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. खरातचे आयपीएस महिला अधिकारी आणि अनेक बडे अधिकारी शिष्य आहेत. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय पाठबळामुळेच या भोंदूचे प्रस्थ वाढले होते.”आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय हे आणखी खतरनाक मानले पाहिजे .
प्रा. श्याम मानव यांनी या नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. “हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले कारण याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा नसता आणि रूपाली चाकणकर यांची त्याच्यावर भक्ती नसती, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दाबले असते,” असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला आहे.
अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना श्याम मानव यांनी सांगितले की, हा भोंदू बाबा अत्यंत चलाखीने लोकांच्या काळ्या कमाईची माहिती काढायचा. त्यानंतर स्वतःचे बनावट ‘इन्कम टॅक्स ऑफिसर’ तयार करून तो संबंधित व्यक्तीवर धाडी टाकायचा आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळायचा. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारात आतापर्यंत कोणाही पोलीस अधिकारी किंवा राजकीय नेत्याने हस्तक्षेप केला नाही, ही चिंतेची बाब आहे.
देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना श्याम मानव यांनी तीव्र खंत व्यक्त केली. “खरात सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील. कोणत्याही महिलांचे कपडे त्या बाबाने काढले नाही. जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. कारण, बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं ‘मी गुरु आहे तुमचा’, बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते.आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय,” असेही श्याम मानव यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्र्यांचे ‘आभार’ मानण्यामागचा टोला

हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर यांची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. पण, एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे, म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या.

एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू देत आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दलं ‘एकनाथ शिंदे’ यांचे आभार मानले पाहिजे. म्हणूनचं खरात प्रकरणाचा सर्वार्थाने तपास होतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 23 ठार

0

तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत १९ मृतदेहांची ओळख पटली आहे. यामध्ये १६ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात तीस कामगार काम करत होते.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बचावकार्यादरम्यान आणखी एक स्फोट झाला, ज्यात पोलीस, अग्निशमन आणि बचाव पथकाचे १३ सदस्य जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हा स्फोट कारखान्याच्या पुढील भागात झाला, जिथे कामगार कच्च्या मालावर काम करत होते. प्रशासनाने एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.

काँग्रेसच्या मागणीनुसार कमला नेहरू रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू

पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, शहर सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी या संदर्भात आरोग्य विभागाकडे उष्माघात कक्ष सुरु करावा अशी मागणी केली होती, त्याचा पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले, चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ अशा त्रासांना सामोरे जात आहेत. काही जणांचा तर मृत्यूही होतो. अशा वेळी प्रकृती गंभीर असताना रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असून त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना याचा फटका बसते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून शहरभर या सुविधा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत आणि गंभीर परिणाम टाळता यावेत, या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ”महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु केला जाणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने हा कक्ष सुरु केला आहे.”