Home Blog Page 1553

बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृध्द करा – ज्येष्ठ लेखक डॉ. रतनलाल सोनग्रा: एमआयटी डब्ल्यूपीयूत बुद्ध पौर्णिमा साजरी

पुणे: आजच्या काळात संपूर्ण जगाला शांततेची गरज आहे. मनुष्य हा भविष्य व भूत काळाचा विचार करतो परंतू बुद्धांनी वर्तमान काळात सुखी राहण्याचे तत्त्व मांडले. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते. शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान साधना अत्यंत महत्वाची आहे. असे उद्गार ज्येष्ठ लेखक डॉ. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, ह.भ.प.बापूसाहेब तुपे महाराज, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, कुलसचिव गणेश पोकळे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
डॉ. रतनलाल सोनग्रा म्हणाले, बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणेची शिकवण दिली.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्त्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. त्यांनी संपूर्ण जगासमोर ज्ञानाचे स्वरूप मांडले. त्याच्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशात आज संपूर्ण जग शांती शोधत आहे. बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, बुद्धांचे विचारच जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई येथे बुद्ध स्तूपाची निर्मिती करून समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ.एस.एन.पठाण यांनी सांगितले भगवान गौतम बुद्ध हे शांतीदूत म्हणून ओळखले जातात व त्यांनीच जगाला शांतीचे तत्त्व सांगितले.
यावेळी मैत्रेय बुध्द व तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
ह.भ.प.बापूसाहेब तुपे महाराज यांनी बुद्ध जयंती ही शाश्वत असल्याचे सांगितले. डॉ. आर.एम. चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.
प्रा. विनोद जाधव यांनी प्रास्ताविक केले.  

अजित पवार गैरहजर का ? पत्रकारांना सतावणाऱ्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

मुंबई-ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांचा पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला आहे.मुंबईतील वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. मात्र यावेळी अजित पवार मात्र अनुपस्थित राहील्याचे दिसून आले.एकूणच शरद पवारांच्या मागे बसलेले सर्व चेहरे बदलले आणि तरुणाईत ले होते . हे वेगळे चित्र पत्रकारांना सतावणारे दिसले.मात्र शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सोनिया दुहान आणि आमदार संग्राम जगताप ही युवा ब्रिगेड शरद पवारांच्या अगदी मागे बसल्याचं पाहायला मिळालं.

या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित राहीले नाहीत यावरून विचारलेल्या प्रश्नाल शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, सगळे पत्रकार परिषदला असतात का?काही लोक येथे आले आहेत, काही गैरहजर आहेत. आज पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो निर्णय मला कळवला. त्यामुळे येथे कोण आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं. शिवाय अजित पवार दिल्लीला गेले, ही माहिती चूक आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाऊ इच्छितात हे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले..

“उत्तराधिकारी निर्माण करेन

शरद पवार म्हणाले, “उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन.”“काही लोक १०-१५ वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्यपातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे. तसेच राज्यस्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

राजीनामा मागे घेत शरद पवार म्हणाले,तरुण नेत्यांना वाव दिला पाहिजे .. उत्तराधिकारी निर्माण व्हावा हि इछ्या ..

मुंबई -राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून तेच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत, अशी घोषणाच त्यांनी आज (ता. 5) पत्रकार परिषदेत केली. जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहून कार्य करत राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. यावर आता शरद पवार आपली ठोस भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली.

शरद पवार म्हणाले, मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांत तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने मागणी केली होती.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील निरनिराळे कार्यकर्ते यांनी अध्यक्ष राहावे अशी त्यांनी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच देशातून विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली आवाहने या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

शरद पवार म्हणाले, मी कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम बघून भारावून गेलो. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणांसह काम करेल. उत्तराधिकारी असावा हे माझे स्पष्ट मत आहे. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतो हा निर्णय मी पुनश्च जाहीर करतो.

शरद पवार म्हणाले, माझी नैतिक जबाबदारी होती की, वरिष्ठांना विश्वासात घेणे, पण मी त्यांना विश्वासात घेतले असते तर त्यांनी मला राजीनामा देण्यास विरोध केला असता. त्यावेळीचा माझा निर्णय योग्य नव्हता या निष्कर्षापर्यंत मी आलो असे मला वाटते.

शरद पवार म्हणाले की, भाकरी फिरवणार होतो पण आता भाकरीच थांबली. मविआला काहीही फरक पडणार नाही. आम्ही एकत्र काम करू. अजित पवार या पत्रकार परिषदेला गैरहजर होते त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, ”इथे कोण आहे कोण नाही याचा वेगळा अर्थ काढू नका. मी फेरविचार करावा हेच सर्वांचे मत होते.” कुणाला जायचे असेल तर मी थांबवू शकत नाही. मात्र अशा परिस्थितीत नेतृत्वाला आघाडीवर राहून काम करावे लागते.

शरद पवार म्हणाले, काम करण्याची संधी द्या ही अनेकांची सूचना आहे. याबाबत आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याच्याशी मला काही घेणे देणे नाही. राहुल गांधी स्वतः बोलले. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंतर्फे संजय राऊत आणि बाकीचे सहकारी राजीनामा मागे घेण्याबाबत बोलले.

शरद पवार म्हणाले, मी माफी मागतो कारण मी कुणाला राजीनाम्याची कल्पना दिली नव्हती. फक्त अजित पवारांनाच याची कल्पना दिली होती. सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार हे खोटे आहे.

शरद पवारांचे निवेदन जसेच्या तसे

दिनांक २ मे २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती…परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.
आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद !

(शरद पवार)
5 मे, 2023

अजित पवार, प्रफुल्ल पटेलांना भाजपात जायचे होते; हा डाव हाणून पाडण्यासाठी पवारांचा राजीनाम्याचा ड्रामा- दमानिया

मुंबई-अजित पवार, प्रफुल्ल पटेलांना भाजपमध्ये जायचे होते; पण त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शरद पवारांच्या राजीनाम्याचा ड्रामा केला असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

अंजली दमानिया म्हणाल्या, राजकीय निरीक्षणाचा विचार केल्यानंतर आपल्याला कळते की, एखादी व्यक्ती आनंदी आहे की, दुःखी एखादा व्यक्ती आनंदी असेल तर कार्यकर्ते येऊन त्यांना पेढे भरवतात. जितेंद्र आव्हाडांना पेढेही भरवले नाही. त्यांचा चेहराही हसरा नव्हता. ते माध्यमांना न बोलताच निघुन गेले. यावरुनच बरेच काही समजते.

अंजली दमानिया म्हणाल्या, दिसत होते की, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपमध्ये जायचे होते. पण त्यांचा डाव अटकावयचा कसा? हे त्यांनी केलाला एक प्रकारचा मोठा ड्रामा होता. कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एवढ्या कार्यकर्त्यांसमोर राजीनामा देणे मला गंमतच वाटली.

अंजली दमानिया म्हणाल्या, मुळ मुद्दा असा की, एखादी व्यक्ती अर्थात प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार हे दोघेच पवारांच्या राजीनाम्याला उघड समर्थन करीत होते. दुसरा अध्यक्षाला त्यांची हरकत नव्हती. बाकी मागे बरेच जण म्हणत असतील. त्याच व्यक्तीला प्रस्ताव मांडायला लावला. त्याच व्यक्तींना पत्रकार परिषद घ्यायला लावणे व तोच प्रस्ताव घेवून सिल्व्हर ओकला जाणे हे सर्व मोठे केलेले षडयंत्र आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर अजित पवारांवर गत काही दिवसांपूर्वी ट्वीट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही ट्वीट करुन पुन्हा अजित पवारांना टोला लगावले होते.

पवारांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की, ”अजित पवार हतबल दिसत आहेत, त्यांना पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची खात्री करून घ्यायची आहे. भाजपलाही राष्ट्रवादी हवी आहे पण शरद पवारांशिवाय.” असे ट्वीट करीत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ”भाजप – राष्ट्रवादी आघाडीचा मार्ग मोकळा?”

नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ देऊ नये- डॉ. सुरेश खाडे

 सांगली, दि. 5 : नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे, नदीची स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक ती दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या  अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर माईघाट सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कलश पुजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनिल पवारअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवालउपवनसंरक्षक निता कट्टेनिवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटीलजलसंपदा विभगाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकरजलबिरादरी महाराष्ट्र राज्य नरेंद्र चुग आदि उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचा शेती उत्पादनावरही  विपरीत परिणाम होत आहे. वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. या बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला जाणूया नदीला या  अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे.  संबंधित यंत्रणांनी नदीला जाणून घेवून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. या अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासन यासाठी कुठेही कमी पडणार नाही. नदी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी  या उपक्रमास नागरिकांनीही त्यांचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे व श्री. नरेंद्र चुग यांनी मनोगत व्यक्त करताना चला जाणुया नदीला या  अभियानाचा हेतू विशद करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

            प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कृष्णामाणगंगाकोरडामहाकालीयेरळाअग्रणी व  तिळगंगा या सात नद्यांचे कलश पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. शेवटी या सर्व कलशांचे कृष्णा नदी मध्ये विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले.  सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले.

            या कार्यक्रमास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. अवताडे, चला जाणुया नदीला अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होराकृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटीलअग्रणी नदी समन्वयक अंकुश नारायणकरमहांकाली नदी समन्वयक सागर पाटीलतिळगंगा नदी समन्वयक प्रकाश पाटीलयेरळा नदी समन्वयक संपतराव पवारजाई कुलकर्णीकोरडा नदी केंद्रस्थ अधिकारी सचिन पवारमाणगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी अभिनंदन हरगुडेयेरळा नदी केंद्रस्थ अधिकारी डी. एस. साहुत्रेसांगली पाटबंधारे विभागाच्या सहायक अधीक्षक अभियंता तृप्ती मुकुर्णेउपकार्यकारी अभियंता श्वेता दबडेयांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे सरपंचउपसरपंचनागरिक उपस्थित होते.

नवीन इमारतीमुळे पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

परभणी : न्यायदानाचे पवित्र कार्य गतिमानतेने पूर्ण व्हावे, यासाठी पायाभूत सुविधांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाला सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा नूतन इमारतीची गरज होती. या इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. परभणी येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला अनावरण समारंभ आज पार पडला. त्यावेळी न्यायमूर्ती श्री. सूर्यवंशी बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा न्यायाधीश -१ श्रीमती संध्या नायर व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. दे. बा. नांदापूरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थांच्या विकासविषयक कामांमध्ये वैयक्तिक हित आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून संस्थेचे हित लक्षात घेतले पाहीजे.  सध्या न्यायालयाचे काम भरपूर वाढले असून पायाभूत सुविधा पूर्वीप्रमाणेच आहेत. म्हणून येथे नवीन इमारतीची अत्यंत आवश्यकता होती. ही इमारत निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून न्यायमूती श्री. सुर्यवंशी म्हणाले की, पालक न्यायमूर्ती म्हणून आम्ही दोघेही आवश्यक ते सहकार्य करून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू. याकामी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, त्याशिवाय न्यायदानाचे काम परिणामकारकरित्या पार पाडता येणार नसल्याचे न्यायमूर्ती सुर्यवंशी म्हणाले.

बार आणि बेंच एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, वकिलाच्या सहकार्याशिवाय न्यायदानाचे काम पूर्ण क्षमतेने पार पाडणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेचे घटक असल्याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. सोबतच न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचा सार्थ अभियान असायला हवा. तरुण वकिलांना ज्येष्ठ विधिज्ञ दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात; यापुढेही ते मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास न्यायमूर्ती सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.

नूतन इमारत कोनशीला अनावरणाचा क्षण अत्यंत आनंद आणि गौरवाचा आहे, असे सांगून कंत्राटदारानेही न्यायदानाच्या वास्तूचे बांधकाम करत असल्याच्या शुद्ध भावनेने चांगले व वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे न्यायमूर्ती सुर्यवंशी यावेळी म्हणाले.

न्यायदानाचे पवित्र कार्य कुठेही करता येते. मात्र न्यायालय परिसरातील वातावरण चांगले राहिल्यास त्याला गतिमानता येते. ती गतिमानता येऊन प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली निघावीत, यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयेही नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे परभणी येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारतीची आवश्यकता होती, ती आता पूर्ण होत असल्याचे न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

संत गाडगेबाबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्य व जनजागृतीबाबत सांगून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत, त्यांना पुस्तक वाचनाकडे वळवण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांनी केले. मुळात न्यायालयात प्रकरणे येण्यापूर्वी ती परस्पर आपसी किंवा मध्यस्थांमार्फत मिटविण्याच्या प्रयत्न केला पाहीजे. त्यातून कौटुंबिक स्वास्थ्य लाभते व त्यामुळे समाजात शांतता प्रस्थापित होते आणि न्यायालयीन प्रकरणे कमी करता येतील, असे ते म्हणाले. येथील न्यायालयाची जुनी इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी कमी पडत होती. त्यामुळे येथे नवीन वास्तू होणे आवश्यक होते. ही पाच मजली वास्तू सर्व सोयीसुविधांनी युक्त राहणार असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयीन कामकाज पार पाडताना, प्रकरणे एकाच ठिकाणी का पडून आहेत. त्याचे सर्व संबंधितांनी आत्मचिंतन करण्याकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधले. तसेच प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढून न्यायदानाचे काम करण्याबाबत न्यायमूर्तीं खोब्रागडे यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून न्यायालयीन वास्तूबाबत सविस्तर माहिती विशद केली. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीमती स्वाती दाभाडे, तहसीलदार गणेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, श्री. इटकर यांच्यासह ज्येष्ठ विधीज्ञ व वकील यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना जलार्पण करून करण्यात आली. जिल्हा वकील संघ, सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालय आणि विविध तालुका वकील संघाच्यावतीने न्यायमूर्तीव्दयींचा शाल, श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

गांधी विद्यालयाच्या वैष्णवी खापरे, वेदिका मुंढे, आर्या गिराम, साक्षी अमिलकंठवार, तबला वादक विष्णू टोणपे, पीयुष निलंगे, पेटीवादक वैष्णवी देशमुख यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन पेडगावकर आणि श्रीमती कामने यांनी तर आर. एन. काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले

               परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीबाबत माहिती

  • पाच मजली नियोजित नूतन इमारत असून, ६८ कोटी ७९  लक्ष  ८ हजार रुपये खर्चाला मान्यता
  • सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग व सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्या देखरेखीखाली होणार काम
  • २ डिसेंबर २०२१ ला मिळाली प्रशासकीय मान्यता
  • रेन, रुफ वॉटर हार्वेस्टिंग, दिव्यांगाकरिता सरकता जिना, पाणीपुरवठा
  • तळमजल्यावर राहणार महिला आणि पुरुषांसाठी लॉकअप, मुद्देमाल रुम, रेकॉर्ड रुम, बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम, कॅन्टीन, न्यायाधीशांसाठी वाहनतळ व्यवस्था
  • इतर मजल्यांवर कोर्ट हॉल, न्यायधीशांसाठी कॉन्फरन्स रुम, ग्रंथालय, ऑफिस, व्हीसी रुम, महिला व पुरुष वकील संघासाठी स्वतंत्र खोली आदी सुविधा राहणार आहेत.
  • या इमारतीमध्ये एकूण 22 कोर्ट हॉल असतील.
  • इमारतीचे बांधकाम 2 वर्षात पूर्ण होणार.

बँकेच्या ब्रँच मॅनेजरकडून ग्राहकास 27 लाख रुपयांचा गंडा

पुणे-

आयसीआय बँकेत ब्रांच मॅनेजर असलेल्या व्यक्तीने एका ग्राहकास सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन देऊन तब्बल 27 लाख 46 हजार रुपयांना फसविल्याचा ठपका ठेवत अशोक सूर्यकांत कदम (राहणार -पुणे )या आरोपीवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याबाबत चेतन बळीराम इथापे (वय- 36, राहणार -वाघोली ,तालुका- हवेली, पुणे )यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अशोक कदम हे आयसीआय बँक येथे मॅनेजर असून ते ब्रँच मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन एका ग्राहकाला दिले> त्यानंतर तक्रारदार चेतन इथापे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ब्रांच मॅनेजर अशोक कदम यांनी फोन पे, गुगल पे व एनईएफटीद्वारे 69 लाख 46 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर प्राप्त केले.

तक्रारदार यांच्या आयसीआय सिक्युरिटी पोर्टफोलिओ मध्ये बनावट एन्ट्री करून ती खरी आहे असे सांगून व भासवून त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोरेगावपार्क पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. वराळ हे करत आहे.

वनाज सोसायटीच्या माजी अध्यक्षांसह तीन पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांवर 33 लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

पुणे -शहरातील कोथरूड परिसरातील वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह तीन पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांनी तब्बल 33 लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून या पाच जणांवर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सचिव नितीन सुर्वे, माजी खजिनदार प्रकाश सोलकर (सर्व रा. वनाज सोसायटी, कोथरूड,पुणे), लेखा परिक्षक एम.आर. सलगर (रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे) आणि लेखा परिक्षक धनश्री रत्नाळीकर (रा. पाषाण, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नवे आहेत.

याबाबत लेखा परिक्षक प्रतिभा सुरेंद्र घोडके (वय- 51, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार हा सन 2014-15 ते सन 2018-19 दरम्यान वनाज सहकारी संस्था येथे घडला आहे. वनाज सहकारी गृह रचना संस्थेचे संबधित आरोपी पदाधिकारी असताना त्यांनी 33 लाख 22 हजार 387 रूपये रक्कमेचा अधिकारात बेकायदेशीर गैरवापर केला. त्यांनी सदर रक्कमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. हे संस्थेच्या अभिलेखावर असतानाही त्याचे लेखा परिक्षण करणारे लेखा परिक्षक सलगर व रत्नाळीकर यांनी वास्त परिस्थिती व आर्थिक बाबी त्यांचे लेखा परिक्षण अहवालात न मांडता, वनाज संस्थेचे नमूद पदाधिकारी आरोपी यांनी केलेल्या अपहारास संगणमताने सहाय्य केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहे.

‘राजर्षी’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन संपन्न

‘ साई वाणी ’ प्रोडक्शन संस्थेतर्फे राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांच्या कल्याणकारी विचारांवर आधारित ‘राजर्षी‘ या सामाजिक मराठी नियोजित चित्रपटाच्या पोस्टरचे  प्रकाशन आज पुण्यात  हॉटेल प्रेसिडेंट येथे समारंभपूर्वक करण्यात आले. या चित्रपटात राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील नानासाहेब करपे यांच्या हस्ते व सहकार्यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले गेले. या आगामी चित्रपटाचे लेखक, पटकथा व संवाद लेखन  राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पवार असून धनंजय भावलेकर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. याचे निर्माते सुदर्शन विष्णू ढेरे असून पुणे, सातारा, कोल्हापूर येथे चित्रीकरण पूर्ण होऊन या वर्षअखेर डिसेंबर महिन्यात हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांनी केलेला शिक्षण प्रसार व त्यासाठी केलेली वस्तीगृहांची सोय, युवकांना मार्गदर्शन, आरक्षण अशा विविध महत्वाच्या विषयांवर हा चित्रपट प्रकाश टाकेल. राजर्षी छत्रपति शाहू महाराजांच्या उदात्त व प्रेरणादायी विचारांचा जागर या चित्रपटाच्या रूपाने तरुण पिढीसह सर्वांना पाहायला मिळेल असे अभिनेते सुनिल करपे यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रसंगी प्रमुख अभिनेता सुनील नानासाहेब करपे यांच्या समवेत दिग्दर्शक धनंजय भवलेकर, निर्माते सुदर्शन विष्णू ढेरे, उद्योजिका चित्रा मेटे, पुणे बार असोसिएशन – खजिनदार ॲड समीर बेलदरे व अन्य सहकारी उपस्थित होते.

राज्यातील मधमाशा पालकांसाठी ‘मधुमित्र’ पुरस्कार

पुणे दि. ५: राज्यातील मधमाशा पालकांना राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यातील मधमाशा पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे, या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षीपासून ‘मधुमित्र’ या पुरस्कारांची घोषणा केली आहे. मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचे वितरण २० मे या जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय येथे होणार आहे. पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मानपत्राचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये जास्तीत जास्त मधपालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.साठे यांनी केले आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत १२ मे पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी डी.आर.पाटील ( ९४२३८६२९१९) यांच्याशी संपर्क साधावा.
0000

शरद पवारांनीअध्यक्षपदीच राहावे, राजीनामा नामंजूर

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांनी मांडले 2 प्रस्ताव

मुंबई-येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झाली आहे . प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. त्यातला पहिला प्रस्ताव शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम रहावेत. तर दुसरा प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा आहे.जे एकमताने मंजूर करण्यात आले आहेत .निवड समितीत हे २ ठराव मंजूर करण्यात आले आहेत .

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आणि समितीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली तेव्हा त्यांनी आपल्या निर्णयासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पटेल पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती करणार आहेत, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

प्लॅन ए आणि प्लॅन बी काय होते ते पहा …

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार होती . प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समिती देणार आहे.

पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार होती . दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.
शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीया सुळेंच्या व्यतिरिक्त इतर कोणाचंही नाव चर्चेत नाही, अशी माहिती मिळत होती.

– शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारच राहणार अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय.

– समितीची शिफारस शरद पवारांना कळवणार. पवारांनी समितीचा निर्णय यापूर्वीच मान्य असल्याचे म्हटले आहे. आता ते काय निर्णय घेतील, याकडे लक्ष आहे.

– कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या भावुक झालेल्या कार्यकर्त्याला इतरांनी रोखले.

– मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. पवार यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्य व देशाला आजच्या कठीण काळात अत्यंत आवश्यक्ता आहे.

शरद पवार यांनी जाहिर केलेल्या निर्णयानंतर धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली आहे.

गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात

बळवंत थिटे हे पवारांचे जुने कार्यकर्ते आहेत. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी या शेतकऱ्याने 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून समर्थन केले होते. आता देखील ते थिटे करत सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. तसेच थिटे यांचे हे झाडावर चढून सुरु असलेले आंदोलन पाहण्यासाठी गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात येत आहेत.

दीपक मानकरांना लोकसभेसाठी कॉंग्रेस पक्षातून मोठा पाठींबा

पुणे- एकीकडे दीपक मानकर जर पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लढले तर लोकसभेत आपण इच्छुक म्हणून देखील नाव मागे घेऊ अशी भाजपमधील ‘हिरो’ पदाधिकाऱ्यांनी भूमिका कालच घेतली तर दुसरीकडे दीपक मानकर यांनी कॉंग्रेसकडून लोकसभा लढवावी असा मोठा आग्रह काल दिसून आला. काल मानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीसाठी गुप्ते मंगल कार्यालयात रीघ लागली होती.वाढदिवसाच्या शुभेछ्या द्यायला आलेल्या प्रत्येकाच्या मुखी लोकसभेच्या निवडणुकीबाबत आणि मानकर यांच्या उमेदवारीची चर्चा होती.पुणे लोकसभा मतदार संघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत तसेच महाविकास आघाडीत देखील कॉंग्रेसकडे येतो.परंतु येथून कॉंग्रेसचा पराभव देखील तेवढाच निश्चित मानला जातो,कसब्यात रवी धंगेकर निवडून आल्यावर कॉंग्रेसच्या आशा पल्लवित झाल्यात.परंतु धंगेकर यांनी कसबाच्याच गड राखावा,लोकसभेच्या रिंगणात धंगेकर पार्ट २ चालेल काय ? याबाबत अनेकांना शंका आणि रिस्क वाटते आहे.धंगेकर यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली गेली तर भाजपा कडून संजय काकडे आणि मोहोळ यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल असे बोलले जाते.आणि धंगेकर यांना विजय कठीण होऊन बसेल असा अनेकांचा अंदाज आहे. पार्ट १ चालला म्हणून पार्ट २ चालेल अशी अपेक्षा नेत्यांनी करू नये असे मत अनेकांचे आहे.धंगेकर वगळले तर कॉंग्रेस कडे लोकसभा लढविण्यासाठी मातब्बर उमेदवार इच्छुकांच्यात नाहीच असेहि काही मान्यवरांचे म्हणणे आहे.आणि मानकर कॉंग्रेस मधूनच राष्ट्रवादीत आलेले आहेत.राष्ट्रवादीत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहेच,पण त्यांचे अजूनही कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यां मध्ये ९० टक्केहून अधिक हितचिंतक आणि चाहते आहेत.या सर्वांनी,भाऊ तुम्ही कॉंग्रेस कडून लढा,विजय निश्चित आहे.दादांशी,ताईंशी बोलून हवा तर निर्णय घ्या असा आग्रह मानकर यांना केल्याचे समजले आहे. शिवसेनेत देखील मानकर यांचे चाहते आहेत.आणि भाजपचे एक महत्वाचे पदाधिकारी तर खाजगीत म्हणालेत ,भाऊंना जर अधिकृत उमेदवारी मिळाली तर आम्हाला कठीण होईल,मग इच्छुकांच्या यादीतूनही मला नाव मागे घ्यावे लागेल.

एकंदरीत लोकसभेची पोटनिवडणूक होईल कि नाही ? कि लोकसभा २४ लाच सर्व बरोबरच होईल.अशा शंका असताना मानकर यांच्या उमेदवारीसाठी मात्र मोठी लोकशक्ती एकवटते आहे असे दिसून येते आहे.

चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाची (चांभार, मोची, ढोर, होलार) आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासन अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात, तर केंद्र सरकारतर्फे एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येते.

अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित पात्र अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह मुंबई शहर जिल्हा कार्यालय, खेरवाडी, वांद्रे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती पुराणिक यांनी केले आहे.

प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करा– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः  दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखालील दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींच्या रहिवाश्यांच्या शिष्टमंडळासमवेत आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीस  गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाच्या मुंबई इमारत व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे आदी उपस्थित होते.

बैठकीत आमदार श्री. सरवणकर यांनी दादर परिसरातील उपकर प्राप्त इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची माहिती दिली. या परिसरातील अशा रखडलेल्या ५६ इमारतींमधील सुमारे साडेतीन हजार कुटुंबांची परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर निर्देश देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य आमदार श्री. सरवणकर यांनी संवेदनशीलपणे अनेकदा दाखवून दिले आहे. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही काम देखील सुरु केले आहे. विशेषतः दादर परिसरातील या ५६ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाची सर्वंकष माहिती घेण्यासाठी, प्रत्येक इमारतीचे प्रश्न वेगळे असतील, तर त्याबाबत अभ्यास कऱण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल. तसेच एक आर्किटेक्टही नियुक्त कऱण्यात येईल. जेणेकरून या क्लस्टर डेव्हलपमेंटसह अन्य कोणते पर्याय आहेत, ते अभ्यासले जाईल.

या दरम्यान म्हाडाने विहीत नियमानुसार पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी. त्यांना नोटीस देणे, प्रकल्प अधिग्रहीत करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. काही विकासक पुनर्विकसित इमारतीतील जागा देण्याबाबत या कुटुंबांना टाळाटाळ करत असतील, तर त्यांनाही समज देण्यात यावी. गेली कित्येक वर्षे पुनर्विकास रखडल्याने मुंबईतील या मूळ घर मालकांना मुंबईच्या बाहेर जावे लागले आहे. यामध्ये शासन म्हणून लक्ष घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. रखडलेले हे पुनर्विकासाचे म्हाडाप्रमाणेच अन्य यंत्रणांच्या माध्यमातून कसे पूर्ण करता येतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

यावेळी उपस्थित रहिवाश्यांनीही आपले म्हणणे मांडले. या सर्वांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. या नागरिकांच्या तक्रारी-म्हणण्याची म्हाडाने नोंद घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

विविध संस्था संघटनाद्वारे संभाजी गार्डन येथे ईद मिलन कार्यक्रम साजरा

पुणे-आपल्या देशात कायमच मिली-जुली संस्कृती राहिली आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण या द्वेषाने भरलेल्या समाजात प्रेमाचे दुकान उघडण्याची जबाबदारी आपली आहे असं मतमाजी न्यायमूर्ती बी .जी. कोळसे पाटील यांनी मांडले. निमित्त होते लोकायत, मराठा सेवा संघ, भिम आर्मी (बहुजन एकता मिशन), मूलनिवासी मुस्लिम मंच, युनिक फाऊंडेशन आयोजित पैग़ाम-ए-अमन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. लोकायतच्या समन्वयिका अलका जोशी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाले कि आपल्या संत परंपरेने समता, बंधुता, मानवता यांसारख्या मूल्यांची जपणूक करत तिचा प्रचार-प्रसार केला. हीच मूल्यं आपल्या देशाच्या संविधानातही आली आहेत. म्हणूनच सर्व मिळून सर्व सण साजरे करणं ही आपली परंपरा राहिली आहे. याच भावनेतून प्रेम, शांती आणि सद्भावनेचा संदेश देणाऱ्या ‘पैगाम-ए-अमन’! हा गाणी, कविता आणि शेर-ओ-शायरीचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ईदनिमित्त आयोजित केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी,माजी नगरसेवक अविनाश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, नितीन जाधव, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, युनिक फाऊंडेशनचे विशाल जाफरी यांनीही आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहर अध्यक्षा मृणालिनी वाणी, भिम आर्मी(बहुजन एकता मिशन)चे दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, समाजकल्याण विभागाचे सुशीलकुमार शिंदे, अधिकारी म्हस्के, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अंगणवाडी कर्मचारी सभा, पथारी पंचायत, रिक्षा पंचायतचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. पुणे पोलीस परिमंडळ १, डेक्कन पोलीस स्टेशन यांचे कार्यक्रमात विशेष सहाय्य लाभले. ईद मुबारकचा सेल्फी पॉईंट, पताकांची व लाईट माळांची सजावट, रांगोळीने कार्यक्रम अधिक उठावदार झाला. प्यार बाटते चलो, चल चलिए हि गाणी, मैं खीर तू शीरकुर्मा हा हिंदू-मुस्लिम संस्कृती एक्य सांगणारा रॅपही घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला. मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर यांनी आभारप्रदर्शन मांडले.