Home Blog Page 1431

दिल्लीतून आजच होणार कसबा आणि चिंचवडच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे. अशी माहिती भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट यांच्या सह विविध संघटना आणि कसबा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि,’ कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आजपर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. यासाठी भाजपकडून सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच या करीता राजकीय रणनीतीकार म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्या सर्व नेत्यांशी संवाद साधत आहे. त्याच दरम्यान आमच्याकडून केंद्रीय समितीकडे इच्छुक उमेदवारांची नाव पाठविण्यात आली असून आज संध्याकाळपर्यंत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत गाफिल राहाता कामा नये. त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केल्याचं त्यांनी सांगितले.

“माफी मागा नाहीतर…” संजय राऊत यांचा नारायण राणेंना इशारा

माझी नेमणूक करायला नारायण राणे हे काय शिवसेना प्रमुख होते का?

मुंबई- नारायण राणे यांनी माफी मागावी नाहीतर खटला दाखल करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून नारायण राणे यांना नोटीस पाठवली असल्याचं स्पष्ट केलं आहे. नारायण राणे यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे आहेत असंही म्हटलं आहे. तसंच नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर मी एकटाच नाही तर ज्या शिवसेनेच्या नेत्यांविरोधात ते बोलले आहेत ते सगळे नोटीस पाठवणार आहेत असंही म्हटलं आहे.

नारायण राणे म्हणतात 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणे यांना विचारला आहे. नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले, आता ती वेळ आली आहे. कायदेशीर लढाई लढू. नारायण राणे म्हणाले की, 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली.संजय राऊत म्हणाले, राणे खोट बोलत आहेत. त्यांनी मतदार यादीतील माझा फॉर्म पाहावा. मला आता त्याविषयी काही बोलायचे नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार आहे. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावे. तुम्ही केंद्रात मंत्री आहात देश लुटला गेलाय. त्यावर हे बोलताय का?

“ हा विकासाभिमुख अर्थसंकल्प – नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसइ) चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) आशिषकुमार चौहान

“ हा विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे, जो पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती या दोन्हीवर लक्ष केंद्रित करणारा आणि जवळपास प्रत्येकासाठी आयकर कमी करून राज्यांना भरपूर पैसे देणारा असा गेल्या काही वर्षातील सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे. राजकोषिय तूट (फिस्कल डेफिसिट) जीडीपी च्या ६.४% वरुन ५.९% पर्यंत कमी झाली आहे आणि पुढील तीन वर्षांत ४.५% पर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्पष्ट आहे. रु ७.५ लाख कोटींवरुन रु. १० लाख कोटींपर्यंतच्या वाढत्या कॅपेक्स परिव्ययासह पीएम गती शक्ती योजनेमुळे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जात आहे हे लक्षात येत आहे आणि आता  रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळांद्वारे या सरकारची अंमलबजावणी करण्याची क्षमता दिसेल आणि हे एकीकडे सिमेंट, स्टील यांसारख्या मूलभूत साहित्याची मागणी तर दुसरीकडे समाजातील सर्व घटकांच्या उपभोगाच्या वस्तूंची मागणी व रोजगार यामध्ये रूपांतरित होईल.

          वित्तीय क्षेत्रासाठी, अनेक प्रस्तावित सुधारणांद्वारे समावेशन एमएसएमईंना वित्त पुरवठा समर्थन आणि जीआयएफटी- आयएफएससी (GIFT-IFSC) मध्ये प्रशासन सुलभ व सक्षम करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्व नियामकांमध्ये सिंगल विंडो आय टी प्रणालीमुळे तेथील व्यावसायिक कामकाज अजून समृद्ध होईल. डेटा दूतावास विकसित केल्याने सायबर धोक्यांविरूद्ध मदत होईल. या संदर्भात, बँक प्रशासन सुधारविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी प्रस्तावित केलेल्या सुधारणांचे स्वागत आहे. आयपीइएफ साठी एकात्मिक आयटी पोर्टल असल्याने शेअर्स आणि न लाभांशावरील दाव्यांना मदत होईल.

          मध्यम वर्ग सुधारित कर स्लॅब, ज्येष्ठ नागरिकांसाठी उच्च बचत मर्यादा आणि नवीन कर योजनेसाठी (NTS) साठी असलेल्या इन्सेंटिव्हस चे स्वागत करेल.

          हा अर्थसंकल्प विकास आणि भारतीय उपभोग क्षमतेला समर्थन देईल जे चीन आणि विकसित बाजार पेठेतील जागतिक हेडविंड लक्षात घेऊन उर्वरित जगाची अर्थव्यवस्था थोडी सुरळीत होईपर्यंत आपल्याला चांगल्या स्थितीत ठेवेल.

          अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी भांडवली नफ्यात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत होते. तेथे कोणताही बदल नसल्यामुळे सकारात्मक प्रतिक्रिया देखील निर्माण झाली आहे. एकूणच हा बाजारासाठी अतिशय सकारात्मक अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. मी या अर्थसंकल्पाला १० पैकी १० देत आहे.”

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आज 35% कोसळले:संसदेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ; US शेअर बाजारातून अदानींना बाहेरचा रस्ता

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल 35% ची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत 1000 रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर जवळपास 3500वर होता. अशा प्रकारे मागील 9 दिवसांत कंपनीचे शेअर्स 70%नी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या डाउ जोंस स्टॉक एक्सचेंजने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे . विरोधकांनी अदानींच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वातील समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, बांगलादेश सरकारने अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही या प्रकरणी 6 फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे, बांगलादेश सरकारने अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही या प्रकरणी 6 फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.

माजी मनसे माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

पुणे-मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष, आणि सध्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निलेश माझिरे यांची पत्नी सुप्रिया यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश माझिरे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीने विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांच्य मृत्यू झाला.

आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, मझिरे यांनी ४०० कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता.शिंदे गटाने त्यांच्याकडे पक्षाच्या माथाडी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

सायकलिस्टची गाेल्डन हॅट्ट्रिक; पहिल्याच दिवशी पदकांचा चाैकार

नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या युवा सायकलीस्टने दिल्लीचे वेलाेड्रॅम ट्रॅकवरील आपला दबदबा कायम ठेवताना गुरुवारी साेनेरी यशाचा पल्ला गाठला. गत पदक विजेत्या पूजा दानाेळे, संज्ञा काेकाटे आणि आदिती डाेंगरेने खेलाे इंडिया युथ गेम्सच्या सायकलींगच्या पहिल्याच दिवशी गाेल्डन हॅट्ट्रिक साजरी केली. पूजा आणि संज्ञाने वयक्तिक प्रत्येकी एका सुवर्णपदकासह सांघिक गटातही चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. मुख्य प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय सायकलीस्ट पुजाने महिलांच्या स्क्रॅच रेसमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. पुरुषांच्या याच गटामध्ये महाराष्ट्राचा ओम कारंडे कांस्यपदक विजेता ठरला. तसेच टाइम ट्रायलमध्ये संज्ञाला आपला दबदबा कायम ठेवता आले. तिने प्रतिस्पर्धींना पिछाडीवर टाकत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तसेच साेनेरी यशाची हीच लय कायम ठेवताना पूजा, संज्ञा यांनी आपली सहकारी आदितीसाेबत टीम स्प्रिंट गटात किताब पटकावला. यासह महाराष्ट्र संघाला पहिल्याच दिवशी घवघवीत साेनेरी यश संपादन करता आले.

योगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

उज्जैन
योगासन प्रकारात गुरुवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि चार ब्रॉंझपदकांची कमाई केली.
यामध्ये मुलींच्या १८ वर्षांखालील गटात कलात्मक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखताना विजयमंचावरील पहिली तिनही स्थाने पटकावली. यामध्ये रुद्राक्षी भावे ही सुवर्ण, तर निरल वाडेकर ही रौप्य आणि स्वरा गुजर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. पारंपरिक प्रकारात निरलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळेने तालबद्ध प्रकारातील दुहेरीत सोनेरी यशाची कामगिरी केली. या प्रकारात स्वरा गुजर आणि प्रांजल वहान्नला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या विभागात पारंपरिक प्रकारात सुमित बंडाळे हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. स्वराज फिस्केने ब्रॉंझपदक मिळविले. स्वराजने पारंपरिक प्रकारात हुकलेले सोनेरी यश कलात्मक प्रकारात साध्य केले. निबोध पाटील या प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. तालबद्ध प्रकारात दुहेरीतअंश मयेकर-नानक अभंगने रौप्य, तर रुपेश सांघे आणि सुमित बंडाळे जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

योगापटूंची कामगिरी उत्साहवर्धक – गिरीश महाजन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत योगापटूंच्या यशाचा सर्वांत मोठा वाटा होता. त्याचीच परिणती खेलो इंडिया युवा स्पर्धेत आली. येथेही योगपटूंनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्राची मान ताठ राखली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चौथ्या पर्वाची आता कुठे सुरुवात झाली आहे. योगपटूंची ही दुहेरी पदकसंख्या निश्चितच उर्वरित स्पर्धेत खेळाडूंच्या उत्साहात भर घालेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

एयर इंडिया ने मिलानसाठी थेट विमानसेवा चालू केली; यूरोपसाठी कनेक्टिव्हिटी वाढवली 

नवी दिल्ली फेब्रुवारी२०२३भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने कालपासून आठवड्यातून चार वेळा दिल्ली ते मिलान थेट विमानसेवा सुरू केली. नुकत्याच सुरू केलेल्या दिल्ली ते कोपेनहेगन आणि दिल्ली ते विएन्नाला या एयरइंडियाच्या उड्डाणांसह या नवीन विमानसेवेमुळे यूरोपमध्ये एअरइंडियाच्या पाऊलखुणा लक्षणीयरीत्या मजबूत होतील. परतीचे विमान AI १३८ आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले.

            दिल्ली ते मिलान हे विमान AI १३७  दर बुधवार, शुक्रवार, रविवार आणि सोमवारी चालते. ते दिल्लीहून दुपारी १४:२० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निघून १८:३० वाजता (LT) मिलान येथे उतरते. परतीचे विमान AI १३८ त्याच दिवशी २०:०० वाजता मिलानहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता दिल्लीला पोहोचते.

            १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीटस् असलेल्या या आधुनिक पुढच्या पिढीच्या B787-8 ड्रिमलाइनर विमानामार्फत दिली जाणारी दिल्ली-मिलान-दिल्ली सेवा दोन्ही देशातील लाखों पर्यटक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रवाश्यांच्या आकांक्षा पूर्ण करते.

            भारतातील पर्यटकांना मिलान हून झ्यूरिक, रोम, फ्लॉरेन्स, व्हिएन्ना, व्हेनिस, मॉन्टेकार्लो, म्यूनिक, बुडापेस्ट, जिनिव्हा, कॅन्झ आणि कोपेनहेगन या लोकप्रिय शहरांमध्ये रस्त्याच्या मार्गाने सहज प्रवेश मिळेल. इटलीमध्ये असलेले भारतीय वंशाचे लोक आणि भारतीय उपखंडातील विविध शहरांना भेट देण्याचा विचार असलेले आणि आग्नेय आशिया, पूर्व आशिया, काठमांडू आणि अगदी ऑस्ट्रेलियामधील गंतव्य स्थानांवर प्रवास करण्याचा इरादा असलेले इटालियन पर्यटकांना या दिल्ली ते मिलान थेट विमानसेवेचा लाभ होईल. दोन्ही देशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला सलाम म्हणून एयर इंडिया या मार्गाच्या भाड्यावर प्रचारात्मक आकर्षक सूट ही देणार आहे.

            काल एयर इंडियाच्या ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख आणि ग्राउंड हॅन्डलिंग ग्लोबल प्रमुख श्री.राजेश डोग्रा यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभानंतर २०४ प्रवाश्यांसह विमान AI १३७ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मिलान कडे वेळेवर निघाले. एयर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, जीएमआर आणि एआयएसएटीएस अधिकाऱ्यांसमवेत श्री. राजेश डोग्रा यांनी समारंभपूर्वक दीप प्रज्वलन केले आणि फीत कापून नवीन विमान सेवेचे उद्घाटन केले.  टर्मिनल ३ वर एका सजवलेल्या समर्पित काऊंटर वर विमानासाठी रिपोर्टिंग करणाऱ्या पहिल्या प्रवाश्याला एक मोठे सजवलेले आकर्षक बोर्डिंग कार्ड दिले गेले. या पहिल्या विमान सेवेचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे प्रवाश्यांना जेवणाचा एक संपूर्ण व आनंददायी अनुभव देण्यासाठी अस्सल इटालियन खाद्य पदार्थांसह भारतीय पदार्थांची विशेष समृद्ध चव यांना मिळवून खास बनवलेला केलेला मेन्यू हे होते.

            मिलान येथील मालपेन्सा विमानतळावर या सोहळ्याच्या स्मरणार्थ उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या विमानाचे जोरदार स्वागत केले. परतीचे विमान AI १३८ २४९ प्रवाश्यांसह मिलानहून निघून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ०८:०० वाजता दिल्ली येथे पोहोचले.

            ही उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने एयर इंडिया आता ७९, – ४८ यूनायटेड किंगडम कडे जाणाऱ्या आणि ३१ अन्य यूरोप खंडात जाणाऱ्या-,  साप्ताहिक थेट विमानसेवेमार्फत यूरोप मधील सात शहरांना विमानसेवा देईल.

            भाडे तत्वावर घेतलेल्या विमानांच्या ताफ्यात वाढ करणे आणि विद्यमान विमाने सक्रिय सेवेत परत चालू करणे यावर एयर इंडियाने सातत्याने भर दिल्यामुळे हा विस्तार शक्य झाला आहे.

            या विस्तारावर भाष्य करताना एयर इंडिया चे मुख्य वाणिज्य अधिकारी श्रीनिपुण अग्रवाल म्हणाले, या मिलान कडे जाणाऱ्या नवीन विमानसेवेतून  आम्ही यूरोप मधील प्रमुख स्थळे व्यापण्यासाठी आमचे पंख पसरणार आहोत आणि आमच्या भारताचे जागतिक नेटवर्क मजबूत करण्यासाठी योजलेल्या पंच वर्षीय (विहान.एआयVihaan.AI या योजनेच्या एक महत्त्वाच्या घटकाची पूर्तता करणार आहोतया नवीन उड्डाणांची सुरुवात हा या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे , जो आमच्या विमानांच्या ताफ्याच्या विस्ताराला पूरक आणि सुसंगत आहेआम्ही नवीन प्रवाश्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे खास एयर इंडियाचे खास भारतीय आदरातिथ्य करण्यास उत्सुक आहोत.”

भारत हे जागतिक शैक्षणिक केंद्र बनेल -उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिजनेस (चाणक्य)इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. २ फेब्रुवारी:“ भारतीय उच्च शिक्षण पद्धतीत सुधारणा केल्यास हा देश लवकरच जागतिक शैक्षणिक केंद्र बनेल. तसेच देशातील सर्व विद्यापीठांनी आपल्या कल्याणकारी योजना गरीब आणि वंचितांपर्यत पोहचविण्यासाठी गांवे दत्तक घेऊन त्या गावाचा शैक्षणिक विकास करावा.”असे विचार उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिजनेस (चाणक्य)इमारतीचे उद्घाटन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्र्रशांत गिरबाने आणि आरएफआयडी आयटेकचे सीईओ असिम पाटील हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्ष स्थानी होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हसिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडा आणि प्रवीण पाटील उपस्थित होतेेेेे.
आनंदीबेन पटेल म्हणाल्या,“ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक स्पर्धात्मक होईल. उच्च शिक्षणात सुधारणा केल्या तर भारत महासत्ता बनेल. विद्यार्थ्यांनी समाजातील संधी आणि आव्हाने समजून घेऊन नाविण्यपूर्ण उपाय उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच विद्यार्थी शिक्षीत व जाणकार झाल्यामुळे भारत लवकरच जागतिक शैक्षणिक गंतव्यवस्था बनेल. आपल्या शैक्षणिक संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीने आणण्याची गरज आहे.”
“स्वदेशी उत्पादने आणि त्यांची रचना बनविण्याचे पारंपारिक कौशल्य ओळखले पाहिजे. सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील गरीबांपर्यत पोहचतील यासाठी विद्यार्थी आणि विद्यापीठांनी सक्र्रिय सहभाग घ्यावा.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विद्यापीठाचे ध्येय म्हणजे जीवन परिवर्तन आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्याामध्ये रुजविण्याचे कार्य सतत सुरू आहे. विद्यार्थ्यांनमध्ये शिस्त आणि चारित्र्य असणे गरजेचे आहे. त्या मुळे जीवनाला नवी दिशा मिळते.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यांचा पायंडा डब्ल्यूपीयूने घातला आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील नवनर्मित या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच येथे सामाजिक कार्याचे धडे शिकविले जाते.”
दीपक करंदीकर म्हणाले, “शिक्षण संस्थांनी उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी अधिक जोडले पाहिजे. या उपक्रमाला फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि उद्योगांना समस्या सोडवण्यासाठी हात आणि बुद्धि मिळेल. विद्यार्थ्यांना व्यवसाय ऑपरेशन्सचे तंत्रज्ञान, वित्त, नियामक अनुपालन आणि स्वदेशीकरण या बाबी समजून घेतल्यास रोजगारक्षम होतील. ”
प्रशांत गिरबाने म्हणाले,“आपल्याला कुठे जायचे आहे हे आपण ओळखावे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. कठोर परिश्रम केले पाहिजे आणि आपली टीम, संस्था व समाजासाठी काय करता येईल यावर लक्ष द्यावे.”
असीम पाटील म्हणाले,“व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सामाजिक आंत्रप्रेन्यूअरशीप मध्ये कार्य करावे.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. तपण पांडा यांनी आभार मानले.

सलग पाचव्या सुवर्णपदकापासून एका पावलावर

खेलो इंडिया युथ गेम्स 2023

  • विजयी चाैकारासह महाराष्ट्राचे खाे-खाे संघ पाचव्यांदा फायनलमध्ये
  • महिला संघाची उपांत्य सामन्यात कर्नाटकवर डावाने मात
  • महाराष्ट्र पुरुष संघाचा ६ गुणांनी ओडिसावर विजय उपांत्य सामन्यात कर्नाटकवर डावाने विजय;

जबलपूर
जानकी पुरस्कार विजेती जान्हवी पेठे आणि नरेंद्रच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र खाे-खाे संघांनी पाचव्यांदा खेलाे इंडिया युथ गेम्सच्या फायनलमध्ये धडक मारली. महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांनी सलग चाैथा विजय संपादन करत अंतिम फेरीचा पल्ला गाठला. यासह आता महाराष्ट्राचे संघ पाचव्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य सामन्यात कर्नाटकचा १ डाव आणि १ गुणांनी पराभव केला. तसेच महाराष्ट्र पुरुष संघाने उपांत्य लढतीत अवघ्या ६ गुणांनी ओडिसाचा पराभव केला.
राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, अश्विनी शिंदे, दीपाली राठाेड यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्र महिला खाे-खाे संघाला पाचव्या सत्राच्या खेलाे इंडिया युथ गेम्सची फायनल गाठून दिली. चार वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र महिला संघाने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्र महिला संघाने गुरुवारी उपांत्य सामन्यात कर्नाटकला डावाने धूळ चारली. जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाने १ डाव आणि १ गुणाने सामना जिंकला. यासह टीमला किताबावरचे आपले वर्चस्व राखून ठेवण्याची संधी आहे. आता सलग पाचव्या किताबापासून महाराष्ट्र महिला संघ अवघ्या एका पावलावर आहे.
उस्मानाबादची अश्विनी शिंदे, साेलापूरच्या प्रीती आणि दीपालीने सर्वोत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान दीपालीने १.२० मिनिटे संरक्षण केले. तसेच अश्विनी शिंदेने २.४० मिनिटे पळती करत प्रतिस्पर्धी कर्नाटक टीमच्या खेळाडूंची दमछाक केली. तसेच प्रीति काळेने २. ४० मिनिटे पळती केेली.
महाराष्ट्र महिला संघाचा पाचव्या किताबाचा दावा मजबूत : कोच साप्ते
यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाची आगेकुच लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे आता संघाला पाचव्या किताबासाठी माेठी संधी आहे. यासाठीचा दावाही संघाने मजबूत केला आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र महिला संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

अशी रंगणार फायनल:
महाराष्ट्र पुरुष संघाचा अंतिम सामना दिल्ली संघाशी हाेणार आहे. तसेच महिला गटामध्ये महाराष्ट्र – ओडिसा यांच्यात फायनल रंगणार आहे.

मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राची दोन पदके निश्चित-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

भोपाळ
महाराष्ट्राच्या अन्वर शेख व उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरी धडक मारत मुष्टीयुद्ध स्पर्धेत दोन पदके निश्चित केली.
तात्या टोपे क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या ४८ किलो गटात अन्वर याने मध्य प्रदेशच्या लोकेश पाल याचा ५-० असा पराभव केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक ठोसे व उत्कृष्ट बचाव अशा दोन्ही तंत्रांचा कल्पकतेने उपयोग केला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही. अठरा वर्षाचा हा खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते व माजी ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथम सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे त्याची सिदरा व साद ही भावंडे देखील मुष्टियुद्ध खेळातच करिअर करीत आहेत. या भावंडांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.‌

उस्मान याने ५१ किलो गटात हरियाणाच्या गंगा कुमार याचा चुरशीच्या लढतीनंतर ४-१ असा पराभव केला. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार झाली मात्र उस्मान याने अतिशय शांत चित्ताने आपल्या प्रतिस्पर्ध्यास चांगला प्रतिकार करीत विजयश्री खेचून आणली. तो बारावी येथे शिकत असून सध्या औरंगाबाद येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत सनी गहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट स्पर्धेत रुपेरी कामगिरी करतानाच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचाही किताब मिळवला आहे. त्याखेरीस त्याने राष्ट्रीय युवा स्पर्धेत रौप्य पदक तर कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तो मुंबई येथील बीएमसी प्रशालेचा विद्यार्थी आहे.

नेमबाजीत ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

भोपाळ
महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले.

मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर आपले नाव कोरले. ती पनवेल येथे ज्येष्ठ प्रशिक्षिका सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे ती यंदा दहावीची परीक्षा देत असूनही शाळा, अभ्यास आणि नेमबाजीचा सराव या तीनही गोष्टी व्यवस्थित सांभाळून वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते. ती दररोज साडेतीन तास नेमबाजीचा सराव करीत आहे. तिने आजपर्यंत राज्य व अखिल भारतीय स्तरावर भरघोस पदकांची कमाई केली आहे. नेमबाजीतच करिअर करण्याबाबत तिला घरच्यांकडून सतत पाठिंबा मिळत आहे. ती मुंबई येथील एम एन आर विद्यालयात शिकत असून शाळेकडूनही तिला चांगले सहकार्य मिळत आहे.
मुलांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात स्वराजला कांस्यपदक मिळाले. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला असून पदार्पणातच त्याने पदकाचे स्वप्न साकार केले आहे. तो पुण्यातील गन फॉर ग्लोरी अकादमीत श्री. सी के चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने नेमबाजीच्या खेळात सुरुवात केली आणि या छोट्याशा काळामध्ये त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. मिटकॉन इंटरनॅशनल प्रशालेत तो शिकत असून शाळेकडूनही त्याला खेळासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवा-अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

प्रदूषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा

मुंबई, दि. २ : मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावेत असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

महापालिका शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करावे

महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईकरांना सुशासनाचा अनुभव यावा

मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेकडून लागणाऱ्या इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण या आवश्यक त्या परवानग्या आणि परवाने ऑनलाईन देताहेत त्याच बरोबर नागरिकांना सर्व सुविधा सुलभ आणि सहज मिळतील अशा पद्धतीने प्रशासनाकडून सुशासन असावे, यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुंबई महानगराच्या सुशोभिकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानात महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

टेबल टेनिस मध्ये तनिषा अंतिम फेरीत, जश मोदी याला कास्यपदकासाठी लढावे लागणार

इंदूर
महाराष्ट्राचे पदकांचे आव्हान कायम राखताना तनिषा कोटेचा हिने मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेबल टेनिस मध्ये आणखी एक पदक निश्चित केले.
तनिषा हिने उपांत्य फेरीतील रंगतदार लढतीत हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती हिचा ४-३ अशा गेम्स मध्ये पराभव केला. शेवटपर्यंत चुरशीने झालेला हा सामना तिने १२-१०,६-११,५-११,१२-१०, ११-१३, ११-८,११-९ असा जिंकला. तिने टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. चक्रवर्ती हिने उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर हिचे आव्हान संपुष्टात आणले. उत्कंठा पूर्ण लढतीत पृथा हिला हा सामना ११-८,८-११,११-८,७-११,११-९,७-११,८-११ असा गमवावा लागला. एकेरीच्या अंतिम फेरीत तनिषा हिला दिल्लीच्या लक्षिता नारंग हिच्याशी खेळावे लागणार आहे. तनिषा हिने याआधी या स्पर्धेतील दुहेरीत रिशा मीरचंदानी हिच्या साथीत रौप्य पदक पटकाविले आहे.
मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मोदी याला उत्तर प्रदेशा दिव्यांश श्रीवास्तव याने १२-१०,११-२,११-५, ११-२ असे पराभूत केले. मात्र मोदी याला कांस्यपदकासाठी खेळण्याची अजूनही संधी आहे.‌

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच

महाराष्ट्राच्या सारा राऊळ व रिया केळकर तसेच मुलांमध्ये आर्यन दवंडे व मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
मुलांच्या गटात आर्यन याने प्राथमिक फेरीत पहिले स्थान घेताना ६९.७० गुणांची कमाई केली. प्राथमिक फेरीअखेर मानस हा चौथ्या स्थानावर असून त्याचे ६६.६० गुण झाले आहेत. मुलींमध्ये सारा हिने ४०.४० गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रिया हिने ४०.२० गुण घेतले आहेत.

स्पर्श जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि. २: कुष्ठरोग निवारण पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित स्पर्श जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवावे. कुष्ठरोग रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्श अभियानाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला सहायक संचालक डॉ.हुकुमचंद आबा पाटोळे, किसन भुजबळ, डॉ.वर्षा आहेर, डॉ.ए.व्ही.मोहोळ, जिल्हा पर्यवेक्षक दिपक कुकडे आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, महापालिकेने झोपडपट्टी भागात आणि कुष्ठरोगाचे रुग्ण असलेल्या परिसरात विशेष मोहिम राबवावी. या भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती द्यावी. आतापर्यंत औषधोपचाराद्वारे बरे झालेल्यांची मोहिमेच्या निमित्ताने एकदा तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ.पोटोळे यांनी सादरीकरणाद्वारे मोहिमेची माहिती दिली. जिल्ह्यात 699 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.