Home Blog Page 1375

पुण्यात 19 वर्षीय तरुणीचा क्लास शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

 पुणे-खासगी क्लासेससाठी एका व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी 19 वर्षाची असून यूपीएससी आणि एफवायबीकॉमच्या क्लाससाठी ती आरोपींकडे जात होती.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमित सिरमनवर (वय 28, रा. मिटकॉन कॉलेजच्या मागे बालेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. 19 वर्षीय पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी यूपीएससी आणि एफवायबी कॉमच्या क्लाससाठी आरोपीकडे जात होती. दरम्यान क्लास घेत असताना आरोपीने फिर्यादीला घरातील कामे करायला लावून काम न केल्यास प्लास्टिकच्या छडीने फिर्यादीला मारहाण केली.तसेच अश्लील भाषेत बोलत संबंधित शिक्षकाने वारंवार विनयभंग केल्याचे फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडील स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या लाभासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी २० टक्के बीज भांडवल कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना तसेच थेट कर्ज व्याज परतावा (एक लाख रुपयांपर्यंत) अशा विविध योजना राबविण्यात येतात.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांस बँकेमार्फत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत देशातंर्गत अभ्यासक्रमासाठी १० लाख तर परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाख, गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत बँकेमार्फत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था आदींना व्यवसायासाठी १५ लाखापर्यंतचे कर्ज वितरित करण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँककडून घेतलेल्या कर्जाचे १२ टक्के पर्यंतचे व्याज महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला आहे.

थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत लाभार्थ्यांस व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंत कर्ज वितरित करण्यात येते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज अदा करावे लागत नाही.

योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. बी, स.नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

आपल्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान उरलेले नाही -मनसेचा महापालिकेवर आरोप

पुणे- दुकानांच्या पाट्या मराठीत च असाव्यात या न्यायालयीन आदेशाच्या मुद्द्यावरून पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना मनसे ने टार्गेट केले आहे. आपल्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान उरलेले नाही असा आरोप करत उद्यापर्यंत पुण्यातील सर्व दुकानांच्या , कंपन्यांच्या , व्यावसायिकांच्या पाट्या मराठीत दिसल्या नाहीत तर आमच्या स्टाईल ला सामोरे जाण्याची तयारी ठेवा ,मागाहून तक्रार करू नका ,आणि सांगितले नाही म्हणू नका असा स्पष्ट इशारा मनसेने आज येथे दिला आहे.

मनसेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि,’आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात आपल्या अधिकार क्षेत्रातील दुकाने व आस्थापना वरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले असून आपल्या शॉप अॅड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या मराठी भाषेतच असणे बंधनकारक आहे परंतु अनेक दुकानदार व आस्थापना प्रचलीत कायदेशीर तरतुदींचा सरस भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानीक भाषेत करावेत या आदेशाची मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय देण्यात आला तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून आपण आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात सर्व दुकानदाराना व आस्थापना यांना कायदेशीर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी तसेच सर्व पाट्या मराठी भाषेत मोठ्या अक्षरातच आहेत का नाही याची तपासणी करण्यात यावी. सदर पत्राने आपणांस कळविण्यात येते कि स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना व आस्थापना यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या व सर्व दुकानदाराच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. हि विनंती.

बॅनरवर ‘हिंदुहृदयसम्राट’ लिहिले तर काय बिघडले?:उगीच एवढा बाऊ अन् राजकारण का करता? सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे गटाला टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका बॅनरवरून सध्या राज्यात आकांडतांडव मांडले आहे. शिंदे यांच्या या बॅनरवर त्यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा होता. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ठाकरे गटाला या प्रकरणी उगीचच महत्त्व न देण्याचा सल्ला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या संरक्षणासाठी एवढे मोठे पाऊल उचलले. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणजे हिंदुत्त्वाचा आवाज असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे. त्यांनी उत्साहाच्या भरात त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख केला असेल. आता त्याचा एवढा मोठा बाऊ करून राजकारण करणे गैर आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला टोला हाणताना म्हटले आहे.

नेमके काय घडले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांचा प्रचार केला. यावेळी बालमुकुंदाचार्य यांच्या समर्थकांनी काही बॅनर्स छापले होते. या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला होता.

ठाकरे गटाने या बॅनरवर तीव्र आक्षेप घेऊन एका ट्विटद्वारे एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली होती. पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात हिंदुह्रदयसम्राट फक्त एकच..वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कुणी होता, त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल. दनता दूधखुळी नाही. सगळ्याचा हिशेब होणार, असे ठाकरे गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुसरीकडे, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली टीकाही फेटाळून लावली आहे. आंतरवाली सराटीतील लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर दोषारोप असतानाही त्यांची बदली पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली. केसरकर यांनी आपल्या पत्राद्वारे गृह मंत्रालयाच्या या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी या पत्रावर हरकत घेतली आहे. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने लागल्यासारखे करायचे. या सरकारमध्ये नेमके चाललंय काय?, असे ते म्हणाले होते.

याविषयी सुधीर मुनगंटीवार यांना छेडले असता त्यांनी वडेट्टीवारांची टीका फेटाळून लावली. एका मंत्र्याने भाषा केली म्हणजे 29 मंत्र्यांमध्ये मतभेद आहेत असा का आभास होतो? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका:नावापुढे हिंदुहृदयसम्राट लिहिले तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही

चिपळूण-राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लिहिण्यात आले आहे. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर आज घणाघाती टीका केली. हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांची चिपळूण येथे खळा बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट केल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, पक्ष, नाव चोरणारे हे पण चोरणार का? निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. किती मास्क लावून फिराल? किती देखावा कराल? त्यापेक्षा जी करताय ती अॅक्टिंग करा. पण हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही.

31 डिसेंबरला सरकार जाणार म्हणजे जाणार, असा पुनरुल्लेखही आदित्य ठाकरेंनी केला. राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत असल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, जिथून त्यांना पगार येतो तिथे हे करावेच लागणार ना. आदित्य ठाकरे म्हणाले, नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार होती. हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा होता, पण उद्घाटन केले नाही. मी ट्विट केल्यानंतर उद्घाटन झाले. बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची आठवणही मी ट्विट केल्यावर आली आणि बोनस द्यावा लागला. मुंबईतला डिलाईन रोड 15 दिवसांपासून तयार होता, आमच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकही (एमटीएचएल) पूर्ण तयार आहे. जे 5 टक्के काम राहिल्याचे दाखवतात ही सरकारी यंत्रणेची जादू असते. यात रंगरंगोटी दाखवतात, डागडुजी बाकी असल्याचे म्हणतात. पण एमटीएचएल पूर्ण तयार आहे, पण महाराष्ट्रासाठी वेळ नसणारे इतर राज्यात प्रचाराला व्यस्त असल्याने उद्घाटन उशिरा होत आहे.

काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे काम सुरु असतानाच पुल कोसळण्याची घटना घडली होती. या पुलाची पाहणीही आदित्य ठाकरे यांनी केली. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, चिपळूणमधील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारालाच मुंबईत 980 कोटींची कामे दिली आहेत. याबाबत कारवाई व चौकशी झालेली नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जो कोणी दोषी असेल कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाचा दर्जा बेकार असून हा महामार्ग आहे की नाही काही कळायला मार्ग नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत पाच कंत्राटदारांना सेटिंग करून कंत्राट दिले. त्यातून एकाला बाजूला काढले, पण काळ्या यादीत टाकले नाही. म्हणजे नक्कीच साटेलोटे असणार. कोणीतरी जवळचा असणार. कारण हे बीसी (बिल्डर कॉन्ट्रॅक्टर) सरकार आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकत नाही, एवढे प्रेम का आहे? एवढेच नाही तर कंत्राटदाराला जो दंड लावला आहे तो बीएमसी त्याला देणाऱ्या पैशातून वजा करणार आहे. हे पैसे कंत्राटदाराच्या खात्यातून यायला हवे, मुंबईच्या खात्यातून नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा-ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

0

पुणे दि.२४: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि पूर्ण क्षमतेने या योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (आस्थापना/विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सचिव के.टी. पाटील, एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, पंचायत राज संचालक आनंद भंडारी, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विविध जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना अजूनही ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्याचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाही. ते सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि कल्पकतेने काम करावे. गाव स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा. गावातील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

पंचायत राज विभाग ग्रामीण भागाचा आत्मा असल्याचे नमूद करून श्री. महाजन म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तंत्रज्ञानामुळे कामकाजात सुलभता येत असताना शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुलभता झाली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत समाज आणि देशासाठी आपण काय योगदान देऊ शकू या भावनेने ग्रामीण माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. कार्यशाळेच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होईल आणि त्याचा फायदा ग्रामीण भागासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अभिनव कल्पना राज्यस्तरावर राबविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.महाजन यांनी दिली.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘उमेद’सारखी महत्वाची योजना राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. गरीब माणसाला हक्काचे घर देण्यासाठी घरकुल योजना आहे. अशा विविध योजनांचा माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे, त्याला त्याच्या हक्कच्या मूलभूत सुविधा आणि त्याचे जीवनमान उंचाण्याचे कार्य ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा मंत्री श्री.महाजन यांनी व्यक्त केली.

प्रधान सचिव श्री.डवले यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कामकाज सुलभीकरण, संगणकीकरण आणि विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याची भावना विकसित करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), ग्रामीण गृहनिर्माण, पंचायतराज, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, त्रिस्तरीय विकास आराखडे, विविध योजनांचे अभिसरण-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना व इतर योजनांची अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ शाळा-सुंदर शाळा, शाळा विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकास ध्येये, पंचायत विकास निर्देशांक, पर्यावरणपुरक ग्रामीण विकास, प्रशासनातील नैतिकता व नितीमत्ता आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम व यशोगाथांचे सादरीकरणही यादरम्यान करण्यात येईल. जिल्हा परिषदेतील प्र

फर्ग्युसनच्या मैदानावर 16-24 डिसेंबर या कालावधीत ‘पुणे पुस्तक महोत्सव’  

पुणे, दिनांक 24 – राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया) या संस्थेच्या वतीने  16 ते 24 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पुणे पुस्तक महोत्सव-2023’ चे  आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे पत्रकार परिषदेत अनावरण करण्यात आले. ‘ऑक्सफर्ड ऑफ इस्ट’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरातील पुस्तक महोत्सवाचे हे पहिलेच पर्व असणार आहे.  

मराठे म्हणाले, ‘राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड आणि इतर भारतीय भाषांमधील विस्तृत पुस्तक संग्रहांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक प्रकाशकांची दालने, सांस्कृतिक सादरीकरण, साहित्य विषयक विविध सत्रे, शालेय विद्यार्थी-महाविद्यालयीन युवकांसाठी विशेष उपक्रम, रमणीय खाद्यजत्रा अशा कार्यक्रमांचा महोत्सवात समावेश असेल.’

मराठे पुढे म्हणाले, ‘गोमती, लडाख, उज्जैन, शिमला, शिलाँग येथील महोत्सवांच्या यशातून प्रेरणा घेत एनबीटी-इंडियाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून पुस्तकांची आवड आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार केला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात सर्व वयोगटातील विविध प्रकारचे आकर्षक उपक्रम सादर करून साहित्यिक आनंदाची हमी देण्यात आली आहे.’

पांडे म्हणाले, ‘ पुणे शहरात वाचन संस्कृतीला पोषक वातावरण आहे. या शहरात पुस्तकांची जागतिक बाजारपेठ होण्याची क्षमता आहे. यातून पुस्तक महोत्सवाची संकल्पना पुढे आली. शहरातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, साहित्य संस्था, ग्रंथालये, प्रकाशन संस्था, लेखक, अभ्यासक या सर्वांचा सहभाग घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.’  

कुंटे म्हणाले, शिक्षण हे केवळ खडू आणि फळ्यापुरते मर्यादित नाही. जीवनातील सर्व अंगांचा विकास होणे शिक्षणात अभिप्रेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्त्वाचे काम आहे.  हे काम या निमित्ताने होईल. हजारो पुस्तके या निमित्ताने पहायला मिळतील. विद्यार्थ्यांचे बौद्धिक आणि मानसिक पोषण करण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळत आहे. 

पुण्यातील वाढती बांधकामे तातडीने थांबवा-खा. सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे- पाण्याची समस्या , वाढते प्रदूषण , वाहतूक कोंडी , कचऱ्याची समस्या यामुळे मानवी जीवन धोक्यात येत असून तातडीने आता पुण्यातील वाढती बांधकामे काही महिन्यापुरती तरी थांबवा अशी मागणी करत १ डिसेंबरला घेरावो आंदोलनाची घोषणा आज येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या भेटी नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हि मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुर्देवाने मागील 2 वर्षांत मनपा निवडणूक होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची साेडवणूक करण्यासाठी मी मनपा आयुक्तांची भेट घेतली. हक्काचे लाेकप्रतिनिधी नसल्याने जनतेची माेठया प्रमाणात गैरसाेय हाेत आहे. महाराष्ट्रात माेठ्या प्रमाणात दुष्काळ असून पुण्यासारख्या शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीचे पाणी, गुरांचे पाणी, पिण्याचे पाणी याचे नियाेजन झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, पाण्याचे नियाेजन करा.

पुण्यात माेठया प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. नागरिकांना पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पायाभूत सुविधा पुरेशा उपलब्ध नाही. त्यामुळे आगामी काळात त्याचे स्वरुप आणखी गंभीर हाेईल. काही महिन्यांसाठी पुण्यातील बांधकाम थांबवा अशी माझी सरकारला विनंती आहे. पुण्यात माेठ्या प्रमाणात प्रदूषण हाेत आहे. त्यामुळे आजारांत वाढ झाली आहे. सरकारने पुण्याचा व राज्याचा पाण्याचा आढावा घ्यावा, प्रदूषण नियंत्रित करावे, वाहतूक काेंडी साेडवावी अशी आमची मागणी आहे. दुष्काळात टँकर माफिया जिवंत राहताे. त्यामुळे कर भरुन सुविधा मिळत नसतील तर पुणे मनपावर आम्ही आगामी काळात 1 डिसेंबरला घेराव घालू, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.सत्ता केवळ लाल दिवा व पक्ष फाेडण्यासाठी किंवा आयकर विभाग, सीबीआय, ईडी या यंत्रणांचा गैरवापर करण्यासाठी नसते. ती सर्वसामान्य लाेकांचे आयुष्यात चांगला बदल करण्याचे सत्ता एक साधन असते. या सरकारने जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली. पण त्याची पूर्तता केली नाही.दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या सर्व गोष्टींत ढवळाढवळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचे खाेके सरकार सुरू आहे. पण दिल्लीची अदृश्य शक्ती महाराष्ट्रात सर्व गाेष्टींत ढवळाढवळ करते. त्यामुळे तीच राज्यात सरकार चालवते का? असा प्रश्न उपस्थिति होत आहे, असे त्या म्हणाल्यात.

तुळशी विवाह सोहळा पारंपरीक पद्धतीने थाटात साजरा

पुणे : शुभमंगल सावधानचे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला… राधे कृष्ण, गोपाल कृष्णचा वऱ्हाडी मंडळींनी केलेला अखंड जयघोष आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुळशी वृदांवन घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा मंडईतील साखरे महाराज मठात पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एरवी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी आज चक्क श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्यानंतर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य व सुखी समाज याकरीता प्रार्थना केली. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे.

विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित मिरवणुकीचे चौका-चौकात उत्साहात स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरुन महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरबार ब्रास बँडदेखील सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, ज्ञानेश्वर रासने, संतोष रसाळ, गजानन धावडे, बाळासाहेब सातपुते तसेच सुलोचना रासने, संगीता रासने, मृणाली रासने, राजश्री गोडसे, माई चव्हाण, लोंढे ताई यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

 अक्का मध्ये कीर्ती सुरेश विरुद्ध राधिका आपटे:YRF ची रिवेंज थ्रिलर

आघाडीचा भारतीय स्टुडिओ यशराज फिल्म्सची स्ट्रीमिंग निर्मिती शाखा YRF एंटरटेनमेंटने त्याच्या पुढच्या टेंटपोल प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे, जो आज भारतातील दोन सर्वात प्रशंसित महिला कलाकारांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारा एक उत्कट रिव्हेंज थ्रिलर आहे! या सुपर पिरियड थ्रिलरमध्ये कीर्ती सुरेश विरुद्ध राधिका आपटे असा सामना असणार आहे.

“कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे या आज भारतातील सर्वात प्रतिभाशाली महिला कलाकारांपैकी दोन मानल्या जातात. ते आश्चर्यकारकपणे नैसर्गिक कलाकार आहेत ज्यांनी अविश्वसनीय परफॉर्मन्स सादर केल्यामुळे स्क्रीनवर संपूर्ण टूर डी फोर्स म्हणून कौतुक केले जाते! त्यामुळे, कीर्ती आणि राधिका एकमेकांच्या विरोधात आहेत ही वस्तुस्थिती अक्काला सध्या देशात बनवल्या जाणार्‍या सर्वात मनोरंजक स्ट्रीमिंग प्रोजेक्टपैकी एक बनवते!” एक ट्रेड सूत्रानी माहिती दिली

“ह्या सीरीज चे दिग्दर्शन नवोदित लेखक आणि दिग्दर्शक धर्मराज शेट्टी करत आहेत, अक्काबद्दलच्या त्याच्या दृष्टीने आदित्यचं लक्ष वेधून घेतलं आणि YRF एंटरटेनमेंटच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टेंटपोल सीरीजपैकी अक्काला बनवण्यासाठी आदित्य ने लगेच प्रोजेक्टला  हिरवा कंदील दिला. या सीरिज ची प्लानिंग करण्यासाठी  या प्रोजेक्ट चा प्रत्येक तपशील YRF द्वारे हेतुपुरस्सर लपविला जाईल,” सूत्रांनी पुढे सांगितले 
YRF एंटरटेनमेंटची पहिली मालिका द  रेल्वे मैन ही सध्या जागतिक यशोगाथा आहे कारण ती Netflix वर जगभरातील टॉप 10 शोमध्ये ट्रेंड करत आहे! आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांनी अभिनय केलेल्या 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेतील समोर न आलेल्या नायकांना ही श्रद्धांजली आहे.

YRF एंटरटेनमेंटची दुसरी सीरीज मंडला मर्डर्स आहे, ही एक बहु-सीझन मालिका आहे जी एक भयंकर गुन्हेगारी थ्रिलर आहे . चंदिगड करे आशिकी चित्रपटात ट्रान्सजेंडर ची भूमिका साकारून समीक्षकांची प्रशंसा मिळवणारी वाणी कपूर, वैभव राज गुप्ता (गुलक फेम) सोबत, स्ट्रीमिंग स्पेसमध्ये पदार्पण करत मालिकेचे नेतृत्व करतेय . सुरवीन चावला (डीकपल्ड) आणि जमील खान (गुलक) प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेची निर्मिती सध्या सुरू आहे.

“YRF एंटरटेनमेंटला नवीन पण  वेगळे प्रोजेक्ट तयार करायचे आहेत जे भारतातील कंटेंट  लँडस्केपला आकार देण्यासाठी योगदान देऊ शकतात. प्रत्येक प्रकल्पासोबत, जागतिक प्रेक्षकांना अतुलनीय भारतीय कथा सांगण्याच्या आपल्या हेतूवर शिक्कामोर्तब करत आहे जे याआधी कोणीही पाहिले नाही. द रेल्वे मैन , हिट ठरले आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून सर्वानुमते सकारात्मक रिव्यु आणि तोंडी समर्थन मिळाले आहे.

कोरोनाकाळात घोटाळा: पुणे महापलिकेच्या तत्कालीन आरोग्याप्रमुखांसह २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

पुणे : महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोरोना काळात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२१ मध्ये कोरोना काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी हा घोटाळा झाल्याचे पोलिसांनी संगितले .शासनाकडून नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किट वापरल्या असल्याचे भासविण्यात आले.  त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकल्या. त्यामधून जवळपास ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वारजे पोलीस ठाण्यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तारडे डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपापसात संगनमत केले. कोविड काळामध्ये कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता. या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्य साथीदारांना हाताशी धरले.सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार केले. खोटी कागदपत्रे तयार करून खरी असल्याचे भासवले. ही कागदपत्रे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोरोना टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी केल्या. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जैतापूरकर करीत आहेत.

दादा… धरणातले पाणी प्रदूषित होतेय .. सुप्रियाताईंनी घातली हाक

प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याची मागणी

पुणे- एकीकडे शरद पवार या आपल्या राजकीय पितामहांशी फारकत घेऊन, त्यांचा पक्ष आणि समर्थक या दोहोंवर कबजा मिळवून पवार साहेबांच्या मनाविरुद्ध भाजप समवेत जाणाऱ्या अजित पवारांचे आणि पवारांची कन्या सुप्रिया यांच्यातील बहीण भावाच्या नात्याचा गोडवा अनेकांना ठाऊक आहे , कित्येक वेळा माध्यमांनी त्याला ठळक प्रसिद्धीही दिली आहे. मात्र पवार साहेबांबद्दल बोलाल तर खबरदार .. अशी तंबीही वेळप्रसंगी याच कन्येने दिलेली आहे. एकीकडे प्रियाचा आशीर्वाद , पित्याचं प्रेम आणि दुसरीकडे भावाचे सत्तेसाठी महत्वाकांक्षी राजकारण यात सुप्रिया सुळे पित्याच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या अनेकांनी आपल्या पित्याशी केलेली प्रतारणा (‘गद्दारी’)त्यांना मानवलेली नाही. मात्र यापूर्वीच्या काळात त्यांच्याशी असलेले स्नेहसंबंध देखील त्या विसरू शकलेल्या नाहीत . अशा अवस्थेत आता संपूर्ण पक्षाचा गाडा त्यांच्या खांद्यावर आहे. तो वाहताना त्यांना याच आपल्या नातलग अथवा जुन्या , सहकारी , आदरणीय अशा नेत्यांच्या विरोधातही प्रसंगी उभे ठाकावे लागणार आहे .. या पार्श्वभूमीचा विचार केला तर त्यांनी कालचे केलेले ट्वीट अजितदादांना टोला मानले तर गैर समजण्याचे कारण नाही अर्थात सुळे यांनी जरी ते लोकहितासाठी केले असले तरी त्याला राजकीय रंगही काहींनी दिला तर तो नाकारताही येणारा नाही . काय केले आहे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट ते पहा ….


खडकवासला धरणातून पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु येथे साठणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत आहेत. त्याचा परिणाम धरणातील पाण्यावरही होत आहे. याशिवाय परिसरात डासांची पैदास होत असून हिवताप, मलेरिया यांसारखे आजारही पसरत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे, महापालिका पुणे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक संयुक्त बैठक लावणे आवश्यक आहे. तरी पालकमंत्री पुणे यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून ही बैठक लावावी ही विनंती.
अर्थात आता पालकमंत्री अजितदादा आहेत. आणि दादांचा आणि धरणातील पाण्याचा वारंवार संबध आलेला आहे . त्यांचा पुण्याच्या पाण्याचा प्रश्न , स्थिती यावर चांगला अभ्यास आहे . पण असे असतानाही त्यांना त्यांच्याच बहिणीला अशी विनंती करण्याची वेळ आली हे विशेषच मानावे लागणार आहे . आता अजितदादा यावर किती लक्ष देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांगासाठी मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन

0

भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांचे सहकार्य; ५ डिसेंबरला बावधनमध्ये होणार शिबीर
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या सहकार्याने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, तसेच ‘इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज’ या दिनाचे औचित्य साधून पाचव्या मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन सोमवार, दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बावधन पुणे येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत करण्यात आले आहे. शिबिरात २५ जणांना कॅलिपर्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून, जयंत साठे (९८२०७३०४५३) आणि डॉ. कांचन गोडे (७२६२०११७७४) यांचेशी त्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण जीवनमान जगता यावे, या दृष्टिकोनातून या कृत्रिम हात-पायांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना वरच्या टोकाच्या कृत्रिम अवयवांची गरज आहे, त्यांनाही उपकरणाच्या अधिक गतिशीलतेचा फायदा होतो. कृत्रिम पाय किंवा कृत्रिम अवयव, पाय विच्छेदन झालेल्या लोकांना अधिक सहजतेने हालचाल करण्यास मदत करू शकतात. काही लोकांना कृत्रिम पाय घेऊन चालण्यासाठी अजूनही छडी, वॉकर किंवा क्रॅचची आवश्यकता असते, तर काहींना मुक्तपणे चालता येते.

दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होते. या सामाजिक कार्यामुळे उपेक्षित-वंचित घटकास लाभ मिळणार असून, दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्वाचे असे पुण्यकर्म सर्व स्तरासाठी कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुढे म्हणाले, “आपण समाजाचे काही तरी देणे लागतो व त्या ऋणातून गरजूंची सेवा घडावी, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सूर्यदत्त’ यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षाच्या कालावधीत संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात पुढाकार घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. कात्रज, येरवडा, पिरंगुट, किवळे व पिंपरी-चिंचवड येथून वाहन व्यवस्था (पिकअप-ड्रॉप) केली आहे.”

सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयांत ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0

मुंबई, : मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविणारी मुंबई देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख व निःशुल्क उपलब्ध होतील.

ही योजना राबविण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्‍यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

मध्यंतरी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी के.ई.एम रुग्‍णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्‍या चर्चेदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्‍णालयात उपलब्‍ध औषधे व संसाधनां व्‍यतिरिक्‍त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो.

गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्‍य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्‍सपेंडिचर) खर्चामुळे साधारणतः १० टक्‍के नागरिक दारिद्रयरेषेखाली खेचले जातात. राष्‍ट्रीय स्‍तरावर विविध संस्‍थांनी केलेला अभ्‍यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्याबाबत महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेमार्फत ४ वैद्यकीय महाविद्यालय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसुतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” देखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्‍णालयांमध्ये ७१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४०००, विशेष रुग्णालयात ३००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात.

लघु उद्योग भारतीकडून महाराष्ट्रात ‘एमएसएमई सक्षमीकरण’ विषयावर सर्वेक्षण मोहीम सुरू

0

उद्योगाच्या समस्यांसाठी सर्वेक्षणद्वारे मोहीम जाहीर

मुंबई, 23 नोव्हेंबर, 2023: लघु उद्योग भारती (LUB) या भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सेवा देणाऱ्या समर्पित संस्थेने मुंबईत “एमएसएमईचे सक्षमीकरण – (टू मार्च टूवर्ड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी)” नावाची नवीन सर्वेक्षण मोहीम जाहीर केली आहे. या सर्वेक्षणात बँकिंगसारख्या आठ प्रमुख विषयांचा समावेश आहे. लघु उद्योग भारती 1 लाखांहून अधिक उद्योजक, कारखाना मालक आणि सेवा प्रदात्यांकडून महाराष्ट्रातील सर्व प्रदेश आणि जिल्ह्यांतील उत्पादन उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी सर्वेक्षणाद्वारे कार्यक्रम आयोजित करेल. लघु उद्योग भारती व्यवसायांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि 45 दिवसांच्या अंदाजे वेळेत निराकरण करण्यासाठी सर्वेक्षणाचे परिणाम विश्लेषित करेल आणि राज्य सरकारसोबत सामायिक करेल.

लघु उद्योग भारती नोंदणीकृत सहभागींसोबत व्हॉट्सएप आणि ईमेलद्वारे सर्वेक्षण क्यूआर कोड (QR) शेअर करेल. इच्छुक व्यक्ती आणि संस्था कोड स्कॅन करून किंवा लघु उद्योग भारतीच्या वेबसाइटवरील फॉर्ममध्ये प्रवेश करून सर्वेक्षण करू शकतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, सर्वेक्षणाशी लिंक करणारे क्यूआर कोड संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एमआयडीसी (MIDC) आणि बिगर एमआयडीसी (Non MIDC) दोन्ही भागात असलेल्या सर्व औद्योगिक उद्यानांच्या बाहेर लावलेल्या बॅनरवर ठळकपणे प्रदर्शित केले जातील.याव्यतिरिक्त, क्यूआर कोड लघु उद्योग भारतीच्या मुख्य सोशल मीडिया पृष्ठांवर संकलित केले जातील. या व्यापक दृष्टिकोनाचा उद्देश अनेक भौतिक आणि डिजिटल चॅनेलचा लाभ घेऊन संपूर्ण प्रदेशातील भागधारकांना सर्वेक्षणाच्या संधीबद्दल जागरूकता वितरित करणे आहे. सहभागींच्या सोयीसाठी हे सर्वेक्षण इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष, श्री रवींद्र वैद्य-महाराष्ट्र म्हणाले की, “महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या (MSME) व्यवसायांचे सर्वात मोठे योगदानकर्ता आहे. हे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 15% पेक्षा जास्त, औद्योगिक उत्पादनात 20% आणि भारतीय निर्यातीत 20% योगदान देते. या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे, रिअल-टाइममध्ये डेटाचे मूल्यांकन करणे आणि समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी 45-दिवसांच्या कालावधीत डेटामधून निष्कर्ष प्रदान करण्याचे आमचे लक्ष्य आहे.हे उद्योजक आणि व्यवसायांना त्वरीत समस्यांचे स्पष्टपणे निराकरण करण्यात मदत करेल. हे सर्वेक्षण व्यवसाय सुलभतेच्या संदर्भात या क्षेत्रासाठी एक मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे विकासाला गती मिळण्यास मदत होईल. हे निष्कर्ष संबंधित अधिकाऱ्यांना समस्या मान्य करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी तयार संदर्भ म्हणून काम करतील. पोर्टलने या उद्योगासाठी झटपट काही निश्चित वेळेसह किती यशस्वीपणे समस्या सोडवल्या आहेत हे सर्वेक्षण दर्शवेल.”

लघु उद्योग भारतीच्या महाराष्ट्राचे सरचिटणीस भूषण मर्दे म्हणाले की, “पॉलिसी अॅडव्होकसी, पॉलिसी इंटरव्हेंशन, अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे आहेत ज्यांचे निराकरण करण्यावर लघु उद्योग भारती लक्ष केंद्रित करते. या सर्वेक्षणामागील विचार प्रक्रिया म्हणजे आम्ही निवडलेल्या विषयांवरील औद्योगिक अंतर दूर करणे आणि उद्योजक आणि व्यवसाय मालकांना आव्हानांवर मात करण्यास मदत करणे.बँकिंगशी संबंधित क्षुल्लक समस्या, व्यवसायासाठी जमिनीचे नमुने घेणे, नफा तोट्याचे गणितं मांडणे, वीज जोडणी मिळण्यास विलंब होणे, दाखल केलेल्या तक्रारींवर सरकारी अधिकाऱ्यांकडून त्वरित निराकरण न होणे इत्यादी बाबींवर या सर्वेक्षणाद्वारे लक्ष केंद्रित केले जाईल.

लघु उद्योग भारती बद्दल:

लघु उद्योग भारती ही १९९४ पासून भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांची नोंदणीकृत अखिल भारतीय संस्था आहे. आज लघु उद्योग भारतीची सदस्यत्व देशभरात पसरलेली आहे. देशभरातील 250 शाखांसह 580 हून अधिक जिल्ह्यांमध्ये त्याचे सदस्यत्व आहे. लघु उद्योग भारती हे एमएसएमई क्षेत्राला संघटित करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात या क्षेत्राला ग्रासणाऱ्या विविध आजारांशी लढा देत आहे आणि एमएसएमईच्या मार्गात येणारे अडथळे दूर करत आहेत.