चिपळूण-राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लिहिण्यात आले आहे. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर आज घणाघाती टीका केली. हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांची चिपळूण येथे खळा बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट केल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, पक्ष, नाव चोरणारे हे पण चोरणार का? निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. किती मास्क लावून फिराल? किती देखावा कराल? त्यापेक्षा जी करताय ती अॅक्टिंग करा. पण हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही.
31 डिसेंबरला सरकार जाणार म्हणजे जाणार, असा पुनरुल्लेखही आदित्य ठाकरेंनी केला. राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत असल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, जिथून त्यांना पगार येतो तिथे हे करावेच लागणार ना. आदित्य ठाकरे म्हणाले, नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार होती. हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा होता, पण उद्घाटन केले नाही. मी ट्विट केल्यानंतर उद्घाटन झाले. बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची आठवणही मी ट्विट केल्यावर आली आणि बोनस द्यावा लागला. मुंबईतला डिलाईन रोड 15 दिवसांपासून तयार होता, आमच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकही (एमटीएचएल) पूर्ण तयार आहे. जे 5 टक्के काम राहिल्याचे दाखवतात ही सरकारी यंत्रणेची जादू असते. यात रंगरंगोटी दाखवतात, डागडुजी बाकी असल्याचे म्हणतात. पण एमटीएचएल पूर्ण तयार आहे, पण महाराष्ट्रासाठी वेळ नसणारे इतर राज्यात प्रचाराला व्यस्त असल्याने उद्घाटन उशिरा होत आहे.
काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे काम सुरु असतानाच पुल कोसळण्याची घटना घडली होती. या पुलाची पाहणीही आदित्य ठाकरे यांनी केली. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, चिपळूणमधील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारालाच मुंबईत 980 कोटींची कामे दिली आहेत. याबाबत कारवाई व चौकशी झालेली नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जो कोणी दोषी असेल कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाचा दर्जा बेकार असून हा महामार्ग आहे की नाही काही कळायला मार्ग नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत पाच कंत्राटदारांना सेटिंग करून कंत्राट दिले. त्यातून एकाला बाजूला काढले, पण काळ्या यादीत टाकले नाही. म्हणजे नक्कीच साटेलोटे असणार. कोणीतरी जवळचा असणार. कारण हे बीसी (बिल्डर कॉन्ट्रॅक्टर) सरकार आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकत नाही, एवढे प्रेम का आहे? एवढेच नाही तर कंत्राटदाराला जो दंड लावला आहे तो बीएमसी त्याला देणाऱ्या पैशातून वजा करणार आहे. हे पैसे कंत्राटदाराच्या खात्यातून यायला हवे, मुंबईच्या खात्यातून नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.