मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका बॅनरवरून सध्या राज्यात आकांडतांडव मांडले आहे. शिंदे यांच्या या बॅनरवर त्यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा होता. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ठाकरे गटाला या प्रकरणी उगीचच महत्त्व न देण्याचा सल्ला दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या संरक्षणासाठी एवढे मोठे पाऊल उचलले. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणजे हिंदुत्त्वाचा आवाज असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे. त्यांनी उत्साहाच्या भरात त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख केला असेल. आता त्याचा एवढा मोठा बाऊ करून राजकारण करणे गैर आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला टोला हाणताना म्हटले आहे.
नेमके काय घडले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांचा प्रचार केला. यावेळी बालमुकुंदाचार्य यांच्या समर्थकांनी काही बॅनर्स छापले होते. या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला होता.
ठाकरे गटाने या बॅनरवर तीव्र आक्षेप घेऊन एका ट्विटद्वारे एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली होती. पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात हिंदुह्रदयसम्राट फक्त एकच..वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कुणी होता, त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल. दनता दूधखुळी नाही. सगळ्याचा हिशेब होणार, असे ठाकरे गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली टीकाही फेटाळून लावली आहे. आंतरवाली सराटीतील लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर दोषारोप असतानाही त्यांची बदली पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली. केसरकर यांनी आपल्या पत्राद्वारे गृह मंत्रालयाच्या या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी या पत्रावर हरकत घेतली आहे. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने लागल्यासारखे करायचे. या सरकारमध्ये नेमके चाललंय काय?, असे ते म्हणाले होते.
याविषयी सुधीर मुनगंटीवार यांना छेडले असता त्यांनी वडेट्टीवारांची टीका फेटाळून लावली. एका मंत्र्याने भाषा केली म्हणजे 29 मंत्र्यांमध्ये मतभेद आहेत असा का आभास होतो? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.