Home Blog Page 1368

जी छगन भुजबळांची भूमिका तीच युती सरकारचीही- मुख्यमंत्री शिंदे:ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा आरक्षणाची ग्वाही

मुंबई-‘मराठा आरक्षणाला ना सरकारचा विरोध आहे ना छगन भुजबळांचा. फक्त हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढीच भुजबळांची भूमिका अाहे. सरकारचेही तेच मत आहे,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.

सरसकट सर्वच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ ठिकठिकाणी मेळावे घेऊन आपल्याच सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यांना ओबीसी समाजातून मोठा प्रतिसादही मिळत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी फोनवरून पुण्यात असलेल्या भुजबळांशी चर्चा करून त्यांच्या भूमिकेशी सरकार सहमत असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला भुजबळांचा विरोध नाही. सरकार इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे.

भुजबळांची व सरकारची भूमिका सारखीच आहे. आमच्यात कुठलेही गैरसमज नाहीत.’ भुजबळ म्हणाले, ‘होय, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी ओबीसी व इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी होणार नाही असा शब्द दिला आहे. त्यावर मी समाधानी आहे.’

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 133 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला समई व पणत्या लावून भिडेवाडा येथे अभिवादन!

पुणे –
क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या उद्या असणाऱ्या 133 व्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले व व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पण त्यावर समय पेटवून पूर्वसंध्येला भिडे वाड्यात अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले 133 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना खऱ्या अर्थाने जर आदरांजली व्हायचे असेल तर राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेने भिडे वाड्याचे तातडीने काम सुरू करून त्याचे भूमिपूजन करावे हीच खरी त्यांना या वर्षात आदरांजली होईल. सदर कार्यक्रम प्रसंगी ऍडव्होकेट अभय छाजेड माजी आमदार सौ दिप्ती ताई चौधरी अजित दरेकर सुजित यादव दीपक जगताप बाळासाहेब कांबळे अविनाश अड सूळ, द स पोळेकर, विशाल जाधव शिवा भोकरे राजू ठोंबरे, विजय मोहिते, गणेश भंडारी, राकेश नामेकर,तसेच नीताताई रजपूत,रजियाताई बल्लारी सुरेखाताई काची,शेख वसीम जहा इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजन या भागातील ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने व हेमंत राजभोज यांनी केले

माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल व प्रोग्रामिंग आयडॉल या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय पारितोषिक वितरण संपन्न

पुणे (दि. २७ नोव्हेंबर २०२३) महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) तर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, डिप्लोमा, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांकरीता माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल व माटीपीओ प्रोग्रामिंग आयडॉल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ॲप्टीट्यूड स्किल व प्रोग्रामिंग स्किल वाढावी आणि त्यांच्यामध्ये रोजगार क्षमता वाढावी यासाठी या द्विस्तरीय स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पी सीईटीच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे योगेश मोरे (वरीष्ठ उपाध्यक्ष, मेडीयाओशन), बळीराम मुटगेकर (उपाध्यक्ष, बीएनवाय मेलन), योगेश खताळे (सहाय्यक महाव्यवस्थापक, प्राज इंडस्ट्रीज), समीर महिंद्रे (संचालक, जेटाटेक इन्फोसर्व्हीसेस) व एन. एन. वडोदे (उपसंचालक, बोट) व संयोजक आणि माटीपीओचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे, सचिव डॉ. संजय जाधव, कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत लोखंडे व माटीपीओ चे सर्व सदस्य उपस्थित होते.
“माटीपीओ प्रोग्रामिंग आयडॉल-२०२३” च्या पहिल्या स्तरात महाराष्ट्रातील ४०० महाविद्यालयातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यातून दुसर्‍या स्तराकरीता प्रत्येक विभागातून टॉप ५० अशा एकूण १५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यातून प्रत्येक विभागातील पहील्या ५ विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्याचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे आहे.
“माटीपीओ प्रोग्रामिंग आयडॉल-२०२३” ही स्पर्धा खालील तीन विभागात घेण्यात आली.
प्रथम विभाग : यूजी,पीजी – अंतिम वर्ष. या विभागातून आदित्य बर्वे (एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग पुणे); ऋषिकेश नायकवडी (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); कार्तिककुमार महिंद्रकर (राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई); मिहीर साळुंखे (अथर्व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई) व संदीप चव्हाण (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) या विजेत्यांचा समावेश आहे.
द्वितीय विभाग : युजी, पीजी अंतिम पूर्व वर्ष. या विभागातून सौमिल तिवारी (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च अवसरी); धीरज पाटील (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च रावेत); सौम्या तिवारी (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च अवसरी); देवांश ठक्कर (लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नवी मुंबई) व अनुज वाघुल्डे (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत) या विजेत्यांचा समावेश आहे.
तृतीय विभाग : युजी – प्रथम व द्वितीय वर्ष आणि डिप्लोमा – प्रथम, द्वितीय व अंतिम वर्ष. शुभम झा (पिल्लई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नवी मुंबई); अथर्व मैंद (एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे); आदित्य सूर्यवंशी (सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); पवन कारके (एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे) व केयुर दोशी (वीरमाता जिजाबाई टेकनॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई) या विजेत्यांचा समावेश आहे.
“माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल-२०२३” च्या पहिल्या स्तरात महाराष्ट्रातील सुमारे ५०० महाविद्यालयातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून दुसर्‍या स्तराकरीता टॉप १२१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यातून पहील्या ५ विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
“माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल-२०२३” स्पर्धेत अजिंक्य म्हसवाडे (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); दर्पण सतीजा (बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा); वरद बोराडे (पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); आर्यन राऊत (अथर्व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई); पुष्पक मैंद (वाटुमल इन्स्टिट्यूट मुंबई) व ईशान मट्टू (नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे) या विजेत्यांचा समावेश आहे.
पारितोषिकांमध्ये प्रथम बक्षीस लॅपटॉप, द्वितीय बक्षीस स्मार्टफोन, तृतीय बक्षीस टॅब, चतुर्थ बक्षीस स्मार्ट वॉच व पाचवे बक्षीस बॅकपॅक चा समावेश होता.
या स्पर्धांकरिता पीएचएन टेक्नॉलॉजी, ई बेक लँग्वेज लॅबोरेटरी, ग्लोबल ड्रीम्झ, गिक्स फॉर गिक्स, कोल्हापूर फाउंड्री व इंजीनियरिंग क्लस्टर, इम्पेरियल ओव्हरसीज एज्युकेशन, आय स्कूल कनेक्ट, इशरे पुणे चॅप्टर व एऑन कोक्युब्स यांचे सहकार्य मिळाले होते.

भारतीयांनी सरस्वती मातेची हत्या केली- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 

एमआयटी डब्ल्यूपीयूत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना

पुणे,दि.२७ नोव्हेंबर:”खरा भारत कोणता या प्रश्नाचे उत्तर समाजाच्या मुख्य चार स्तंभ मधून मिळू शकते.  तत्त्वमसी, एकांतवास, विविधता आणि संस्कृती. या स्तंभाभोवती माणूस फिरत असतो. पण ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की भारतीयांनी आज सरस्वती मातेची हत्या केली आहे. हीच तर देशाची खरी फाळणी आहे.” असे विचार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, डॉ. मुकेश शर्मा व डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
विवेक अग्निहोत्री म्हणाले,” एकीकडे संपूर्ण जग योगाबद्दल बोलत आहे आणि दुसरीकडे आम्ही पतंजलीवर विचार ही करत नाही. आपण सभ्यतेचा आधारस्तंभ पाडला आहे. अशा वेळी तत्त्वमसी चा आधारस्तंभ च आपल्याला वाचवू शकतो. हिंदू विचारसरणी अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते. पण आजचे विद्यार्थी विद्येची देवता सरस्वती मातेला विसरली आहेत.”
“पाश्चिमात्य देशांनी प्रत्येक क्षणी नवीन संशोधनावर भर दिला आहे. तर देशातील ऋषीमुनींनी मनावर संशोधन केले आहे. त्याग, तपश्चर्या आणि सर्मपणामुळे हा देश भरभराटीला आला आहे. पाश्चात्य संस्कृती वरचढ होत असल्याने देशात फाळणीची परिस्थिती निर्माण होत आहे. आजच्या तरूणांच्या मनावर बॉलिवूड अफू सारखे वावरत आहे. ज्याने सभ्यतेचा आधारस्तंभ खाली आणला आहे. जग विज्ञानाने चालवले जाते पण जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते आणि भारत भूमीने हे अध्यात्म संपूर्ण जगाला दिले आहे. तसेच समाजाचे तीन स्तंभ पडल्यावर केवल  तत्त्वमसी स्तंभच जीवनदायी राहील.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रख्यात हदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी बदत्या जीवनशैलीमुळे हदयरुग्णांची संख्या कशी वाढत आहे.  याकडे लक्ष वेधले. दैनंदिन व्यायाम, धावणे, पोहणे आणि विश्रांती घेणे याबद्दल ते बोलले. तसेच वैद्यकीय कीट घरात ठेण्याचा सल्ला ही दिला.
अभिनेते आणि कुलगुरू गजेंद्र चौहान यांनी महाभारत मालिकेच्या निर्मितीमागील कथा सांगितली. या मालिकेमुळे दूरदर्शनला २०० कोटींचा नफा झाला होता. महाभारत ही देशातील एकमात्र मालिका आहे जी बीबीसीने ६ वेळा प्रदर्शित केली आहे. यानंतर दूरदर्शनचे माजी महासंचालक डॉ. मुकेश शर्मा  यांनी जीवन जगण्याचे नाव या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

४ घरफोड्या आणि १ वाहनचोरी,अल्पवयीन मुलासह तरुणाला पकडले

पुणे-लोणी काळभोर येथील दोघांना४ घरफोड्या आणि १ वाहन चोरी केल्याच्या आरोपावरून हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’हडपसर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्ह्यांचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची टिम तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहीती संकलीत केली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड असे हद्दीत घरफोडी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, पहिल्या कारवाई मध्ये एक संशयीत विधीसंघर्षित बालक पाण्याची मोटार घेवुन जाताना दिसला. त्यास थांबवून त्याचेकडे चौकशी करीत असताना तो वेग-वेगळी माहीती देत असल्याने, त्यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे अधिक चौकशी करता, त्याने घरफोडीचे ०४ गुन्हे केल्याची माहीती दिली असुन, सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
तसेच दुसऱ्या कारवाई मध्ये आरोपी नामे प्रणव प्रशांत शेजुळ, वय-१९ वर्ष, रा. लोणी टोल नाक्या जवळ, कामठे वस्ती, लोणी काळभोर यास हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.१७९९/२०२३, भा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करून, त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली एम.एच./ १२./आर.बी./३७८१ होंडा अॅक्टीवा ५२,०००/- रू किची हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती. अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांनी केली आहे.

पुण्यातील क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’उद्या घोषित होणार

पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या सातव्या दिवशी अचूक स्पीडक्यूबिंग आणि कॉम्बॅट अजिलिटीचा थरार

● एसएफए चॅम्पियनशीप्समध्ये पोहणे, स्पीडक्युबिंग, तायक्वांदोच्या थरारक अंतिम पेरी

पुणे, २७ नोव्हेंबर २०२३ – पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’ शोधण्याचा प्रवास अंतिम टप्प्यात आला असून खेळाडूंनी एसएफए चॅम्पियनशीप्समध्ये वेगवेगळ्या खेळांत आपली गुणवत्ता दर्शवली आहे. आजच्या दिवशी स्पीडक्युबिंग, तायक्वांदो, खो खो स्पर्धांची सुरुवात झाली, तर बास्केटबॉल, पोहणे, फुटबॉलच्या स्पर्धा सुरू राहिल्या. श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर १२०० खेळाडू सहभागी झाले होते.

अचूकता आणि मानसिक चपळाईचे दर्शन घडवत १०८ खेळाडूंनी स्पीडक्युबिंगमध्ये भाग घेतला. तायक्वांदोनमध्ये अंडर-१४, अंडर-१२, अंडर-१७ आणि अंडर- १९ गटात कॉम्बॅट कौशल्य पाहायला मिळाले. त्यामध्ये १५० खेळाडू सहभागी झालो होते, तर खो खो स्पर्धेत अंडर- १४ आणि अंडर- १८ विभागात १३५ खेळाडूंनी भाग घेतला होता.

एसएफए चॅम्पियनशीपच्या या अनोख्या क्रीडा उत्सवात पालक आपल्या मुलांच्या क्रीडा प्रवासात सक्रिय सहभागी झाले होते. ब्लिस इंटरनॅशनल स्कूलमधील हर्ष वर्धन मौर्यच्या आई सुचिता यांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी एसएफए करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या मुलाला वेगवेगळ्या खेळांचा अनुभव घेण्याची एसएफएमुळे मिळाली, शिवाय या स्पर्धेमुळे मुलांमध्ये आनंद व खिलाडीवृत्ती रूजत आहे. आपल्या संघातील इतरांना यशस्वी होताना पाहून त्यांना मिळणारा आनंद भारावणारा आहे. शाळेचाही सांघिक खेळांना प्रोत्साहन देण्याकडे असलेला कल अनुकूल आहे. सोशल मीडियावर एसएफएला नियमितपणे फॉलो करत असल्यामुळे लहान मुलींना हॉकी, बॅडमिंटन आणि कबड्डीसारख्या खेळात सहभागी होताना पाहाणं समाधानकारक आहे. प्रत्येक वर्षी एसएफएचा विस्तार होत असून ते व्यवस्थापन आणि अमलबजावणी जास्त भर देत आहेत असे माझे निरीक्षण आहे. ही नक्कीच एक सकारात्मक क्रांती आहे.’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल’चे उद्घाटन

0

नागपूर, दि. 27 – ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टीव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  दोन दिवसीय फेस्टीव्हल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कानसेन मोजिदा होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख तथा ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पुढच्या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विकास कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची जगभरात ओळख निर्माण होत असून अनेक सामाजिक  व विकास कार्य होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे यावेळी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ करण्यात आला परिसरात येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात उपलब्ध होणार  आहेत.

प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरांसाठी ‘सर्कुलर इकॉनॉमी पार्क’ची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. २७ – प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासनस्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र, घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची आता क्रमवारी नव्हती ती सुधारण्यास आता मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 65 टक्के वाटा हा शहरांचा आहे. शहरांचे महत्त्व लक्षात घेता शहरे प्रदूषणमुक्त असावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपाययोजना, प्रकल्प शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असून, मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहेत. प्रदूषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

आ. कृष्णा खोपडे यांनीही यावेळी आपले विचार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. तर  उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मानले.

निरक्षर आणि स्वयंसेवकांनी नोंदणी करावी – शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर

पुणे, दि. २७: देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी शासन, प्रशासनाच्या प्रयत्नांना सर्व समाजघटकांनी साथ द्यावी; त्या अंतर्गत ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’त निरक्षर आणि स्वयंसेवकांनी लगतच्या शाळेकडे नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

चालू वर्षी ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनापासून राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. परंतु विविध कारणामुळे त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या कार्यक्रमात आघाडी घेणे महाराष्ट्राला शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रवासियांना शिक्षण विभागाने भावनिक आवाहन केले आहे. ही लोकचळवळ उभारुन राज्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार २०३० पर्यंत १०० टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट प्राप्त करावयाचे आहे. महाराष्ट्रामध्ये १५ व त्या वरील वयोगटातील १ कोटी ६३ लाख निरक्षर व्यक्ती असल्याचे सन २०११ च्या जनगणनेतून निदर्शनास आले आहे.

केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने नव भारत साक्षरता कार्यक्रम एप्रिल २०२२ पासून सुरू केला आहे. यासाठी ‘उल्लास’ ॲपची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती व सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यासाठी मागील व चालू वर्षांचे एकत्रित १२ लक्ष ४० हजार उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमासाठी उद्दिष्टांनुसार निरक्षर स्वयंसेवकांची नोंदणी झालेली नाही, तसेच अध्ययन-अध्यापन वर्गही अल्पप्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास अधिकाधिक निरक्षर नागरिक या अभियानाद्वारे साक्षर होऊ शकतात.

स्वातंत्र्यानंतर देशामध्ये एकूण ९ साक्षरता मोहिमा राबविण्यात आल्या. भारतात २ ऑक्टोबर १९७८ रोजी केंद्र शासनाने राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम घोषित केला आणि त्याची अंमलबजावणी सन १९७९ पासून सुरू झाली. पुढे सन २०११ च्या जनगणनेनुसार देशात प्रौढ निरक्षरांची संख्या २५ कोटी ७८ लाख होती. आजही देशात १८ कोटी निरक्षर व्यक्ती आहेत.

डॉ.महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय- राज्यातील नागरिकांनी कुटुंबातील असाक्षरांची नोंदणी लगतच्या शाळेकडे करावी. समाजातील शिक्षित असलेल्या घटकांपैकी जे वेळ देऊ शकतात, अशांनी लगतच्या शाळेकडे स्वयंस्फूर्तीने विनामोबदला काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी. असाक्षरांना शिक्षित सदस्यांनी साक्षर करण्याचा संकल्प करावा. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षित घटकांनी सहभाग द्यावा.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील- सहकारमंत्री

पुणे, दि.२७: सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी  माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान भाकरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

श्री. वळसे-पाटील म्हणाले, आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे. शेतकऱ्यांना सामुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

यावेळी श्री. वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी (सातगाव पठार), जारकरवाडी, धामणी, लोणी, वडगावपीर, वाळूंजनगर, रानमळा, खडकवाडी, पोंदेवाडी आणि शिरुर तालुक्यातील वडनेर,सविंदणे,कवठे येमाई, मलठण,माळवाडी,म्हसे,निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी,साबळेवाडी, शिनगरवाडी,ऊचाळेवस्ती,डोंगरगण तामखरवाडी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात १०१ पदार्थांचा अन्नकोट 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन 
पुणे : विविध प्रकारची मिठाई, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, लाडू, जिलेबी, पेढे, काजूकतली अशा सुमारे १०१ पदार्थांचा अन्नकोट दत्तमहाराजांसमोर मांडण्यात आला. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती़.  तसेच गाभारा फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता.
दत्तमंदिरातील अन्नकोटामध्ये ठेवण्यात आलेले पदार्थ ट्रस्टतर्फे तसेच भाविकांनी दिलेल्या पदार्थांमधून मांडण्यात आले. मंदिरातील सेवेक-यांनी अन्नकोटाची मांडणी केली. अन्नकोटासाठी मांडण्यात आलेले पदार्थ सामाजिक संस्थांना देण्यात येणार असून उर्वरित पदार्थ मंदिरामध्ये भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलाने चोरल्या ८ दुचाक्या आणि १२ मोबाईल

पुणे-पुण्यात अल्पवयीनमुलांमध्ये वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक असून काल भरती विद्यापीठ पोलिसांनी एका १६ वर्षीय मुलाला दक्षिण पुण्यात पकडले त्याच्याकडून चोरीच्या ८ दुचाक्या आणि १२ मोबाईल हस्तगत केले . हा मुलगा सराईत बाल गुन्हेगार वर्गवारीत मोडला जातो आहे. पोलिसांनी सांगितले कि,’भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६८/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकाने केला असल्याची बातमी मिळाली. त्याअनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सदर बालकाचा शोध घेत असताना, तो कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, गल्ली नं.४, पुणे येथे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२./एन.क्यु./४६७६ व १२ मोबाईल फोनसह मिळुन आल्याने त्याचेकडे त्याबाबत तपास करता, त्याने दुचाकी गाडी व मोबाईल फोन हे चोरी केल्याची कबुली दिल्याने ते जप्त केले आहेत.
सदर विधीसंघर्षीत बालकाकडे अधिक तपास करता, त्याने पुणे शहर व आजुबाजुच्या भागातुन आणखीन दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याने सांगितल्या ठिकाणाहुन एकुण ०८ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. वरीलप्रमाणे त्याचेकडुन एकुण ०८ दुचाकी वाहने व १२ मोबाईल फोन असा एकुण ४,१५,०००/- रुपये किचा ऐवज जप्त केला असुन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

एयर इंडिया दिल्ली आणि फुकेत दरम्यान विनाथांबा सेवा सुरू करण्यासाठी सज्ज

·         बँकॉकनंतरचे थायलंडमधील दुसरे ठिकाण

·         आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेतील भागात आपले अस्तित्व आणि कनेक्टिव्हिटी विस्तारणार

गुरुग्राम,  – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानकंपनी दिल्ली आणि थायलंडमधील लोकप्रिय ठिकाण फुकेतला जोडण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पासून विनाथांबा सेवा सुरू करत आहे. या सेवेमुळे या दोन्ही शहरांतील पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल व आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेकडील भागात सेवा विस्तार करण्याच्या कंपनीच्या योजनेला बळ मिळेल.

१६२ आसनी (इकॉनॉमीमध्ये १५० आणि बिझनेस क्लासमध्ये १२) A320निओ एयरक्राफ्ट एआय३७८ दिल्लीतून 0110 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 0710 वाजता फुकेतमध्ये पोहोचेल. परतीचे विमान एआय३७९ फुकेतमधून 0810 वाजता निघेल आणि दिल्लीमध्ये 1050 वाजता (सर्व स्थानिक वेळेनुसार) पोहोचेल.

आठवड्यात चार फ्लाइट्ससह (सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार) ही सेवा सुरू होणार असून जानेवारी २०२४ मध्ये दररोज उपलब्ध होईल.

‘फुकेत हे लोकप्रिय जागतिक ठिकाण असून व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्या नेटवर्कमध्ये फुकेतचा समावेश करताना आनंद होत आहे. यापुढेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आम्ही कनेक्टिव्हिटी तसेच वारंवारता वाढवून ग्राहकांना निवडीस जास्त वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहू,’ असे एयर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक आणि ट्रान्सफर्मेशन अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले.

एयर इंडियाद्वारे सध्या दर आठवड्याला बँकॉकला २६ विमाने कार्यरत असून त्यात दिल्ली व मुंबईतून रोज विनाथांबा विमानसेवा आणि कोलकातामधून आठवड्यात सहा विमानसेवांचा समावेश आहे. त्याशिवाय एयर इंडियाच्या प्रवाशांना बँकाकवरून थायलंड, लाओस, कंबोडिया अशा एयर इंडियाच्या इंटरलाइन भागिदारीचा भाग असलेल्या बँकॉक नेटवर्कवरील लोकप्रिय दहा ठिकाणांपर्यंत सेवेचा लाभ घेता येणार आहे.

विमानसेवांचे बुकिंग्ज आजपासून सर्व चॅनेल्सवर खुले होत असून त्यात एयर इंडियाचे संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्स (ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्ससह) यांचा समावेश आहे.

शिंदे समितीचे काम आता संपलेले आहे:अहवाल मान्य करणार नाही, सरसकट मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा

पुणे-  मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात काल ओबीसी नेत्याची सभा पार पडली, सभा दरम्यान जरांगे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. आता पर्यंत मिळालेले कुणबी प्रमाणप्रत्र खोटे असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी केली आहे.

जातीने कुणबी असलेल्या लोकांना कुणबी प्रमाण पत्र शोधून त्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावं अशी मूळ मागणी होती. सगळं तपास व्हावा यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. समितीच काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जाहीर केलं की ५ हजार कुणबी प्रमाण पत्र मिळाली आणि तेलंगणामध्ये निवडणूक सुरू असल्यामुळे त्यांना जात येत नाही. काही लोकांनी आग्रह धरला की ते साडे अकरा हजार झाले. नंतर हे वाढत गेला, परंतु आम्ही त्यांना जिल्हा जिल्हात जाऊन कुणबी प्रमाणपत्र शोधायला नव्हत सांगितलं. महाराष्ट्रातल्या कुणबी लोकांनी या पूर्वीच प्रमाण पत्र काढले आहेत. निजामशाही आणि वंशावळ प्रमाणे पत्र मिळाली आहेत त्यामुळे आता समितीच काम संपलं आहे. आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही आणि करणार ही नाही. छगन भुजबळ म्हणाले, कुणबीमधून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. मराठवाड्यात निजामशाहीच्या वंशावळमध्ये कुणबी नोंद असेल आणि त्याची नोंद मिळाली तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल व त्यानुसार आरक्षणही मिळेल. त्यास आमचा विरोध नाहीच. मात्र, आता यात गैरप्रकार होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आम्ही प्रकाश शेंडगे यांचे माध्यमातून काही कागदपत्रे पाठवली. पेनाने काही ठिकाणी कुणबी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे खाडाखोड करुन स्वत:ला कुणबी म्हणवले जात आहे. त्यास आमचा विरोध आहे. कारण एकदा का कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तुम्ही ओबीसी होता. मराठवाडा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे खरे कुणबी, ओबीसी आहेत, त्यांनी खस्ता खाऊन त्यांचे जातीचे प्रमाणपत्र आतापर्यंत मिळवलेले आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासणीचे काम झाले असून त्यांनाही आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. छगन भुजबळ म्हणाले, आंतरवाली सराटी येथील घटनेत अनेक पोलिस, महिला कर्मचारीही जखमी झाले. त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे, हे त्यांना पटवून दिले पाहिजे. मात्र, त्या घटनेनंतर पोलिस हतबल झाल्यासारखी परिस्थिती आहे. आंतरवाली सराटीत प्रथम पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. महिला पोलिसांना अमानुष वागणूक मिळाल्याने नंतर लाठीहल्ला केला गेला. पहिली बाजू प्रसारमाध्यमासमोर आली नाही. उलट पोलिसांचेच निलंबन करण्यात आले. पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होईल, असे कोणते काम झाले नाही पाहिजे. छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चाैकशी झाली पाहिजे. त्याची माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी दिली पाहिजे. बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे पेटवली. या अन्यायाला कोण जबाबदार आहे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुन्हा करणाऱ्यांना सोडले व माझ्यावर खापर फोडले. बीड नेमके कोणी पेटवले. कोण विदुषक आहे? हे टिका करणाऱ्यांनी विचार करावा. कारण पोलिस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपसात मारामारी केल्या नाही, त्या कोणी केल्या व त्यांना कोण वाचवते हे तपासले जावे. बीडमध्ये ज्याप्रकारे जाळपोळ झाली ती चुकीची आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही पळून जाताय काय ?:पत्रकाराच्या प्रश्नावर तानाजी सावंत भडकले; म्हणाले- शांत राहा, आगीत तेल टाकू नका!

पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल असे आपण म्हणाला होता … असे विचारताच काढता पाय घेतलेल्या मंत्री तानाजी सावंतांना संबधित पत्रकाराने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तुम्ही पळून जाताय काय ? असा मोठ्याने सवाल करताच तानाजी सावंत माघारी फिरले आणि….

तानाजी सावंत सोमवारी पुण्यातील एस एम जोशी हॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. काही महिन्यांपूर्वी तुम्ही 2024 पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल असे विधान केले होते. त्यामुळे तुम्ही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न या पत्रकाराने तानाजी सावंत यांना केला.पत्रकाराचा हा जिव्हारी लागणारा प्रश्न ऐकताच तानाजी सावंत यांनी ‘चला’ म्हणत तेथून काढता पाय घातला. त्यानंतर पत्रकाराने आपल्या प्रश्नाचा पिच्छा पुरवला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून तु्म्ही पळ काढत आहात का? असे तो म्हणाला. त्याचा हा प्रश्न ऐकताच संतापलेले तानाजी सावंत माघारी फिरले. त्यानंतर त्यांनी सदर पत्रकाराचा खांदा व गाल थोपटत मी पळत काढत नसल्याचे स्पष्ट केले.मी पळ काढत नाही. पण जे चालले आहे, ते तुम्हीही पाहत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पत्रकारांनी आगीत तेल ओतण्याचे का करू नये एवढेच मी सांगतो, असे तानाजी सावंत म्हणाले आणि परत निघून गेले.