Home Blog Page 1126

जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी सुमारे ३९ लाख रुपये महसूल जमा

पुणे, दि. २७: पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या ११ वाहनांचा ६ मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला असून त्यामध्ये ३८ लाख ९० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

कर न भरलेली व गुन्ह्यात अटकावून ठेवलेली १३ वाहने ई- लिलावासाठी उपलब्ध होती. यात बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या मालकांनी वेळोवेळी संधी देऊनही थकीत कर भरणा केला नसल्याने या वाहनांचा www.eauction.gov.in या शासकीय संकेतस्थळावर ई- लिलाव ठेवण्यात आला. त्यापैकी ११ वाहनांना ऑनलाईन बोली प्राप्त झाली व त्यानुसार महसूल प्राप्त झाला आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत जाहीर ई-लिलावाद्वारे १ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय महसूल वसूल करण्याची कार्यवाही केली आहे. थकीत मोटार वाहन कर वसुलीकरीता यापुढेही ई-लिलाव केले जातील याची नोंद घेऊन थकीत मोटार वाहन कर भरावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

स्थलांतरीत कामगारांच्या मतदानासाठी कृतीयोजना तयार करा-कविता द्विवेदी

पुणे, दि.२७: बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राबाबत सूक्ष्म नियोजन करावे आणि स्थलांतरीत कामगारांचे मतदान सुलभ होईल यासाठी कृतीयोजना तयार करावी, अशा सूचना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, उपायुक्त समिक्षा चंद्राकार, बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमावर अधिक भर द्यावा. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मतदानाबाबत माहिती द्यावी, यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांची मदत घ्यावी. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निश्चित करून त्याची माहिती सादर करावी. अशा मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील आणि अत्यंत सुलभपणे मतदान होईल अशी व्यवस्था करावी, असेही श्रीमती द्विवेदी म्हणाल्या.

यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएम व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण, टपाली मतदान, सुरक्षा व्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांनी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

पुणे महापालिकेने ठेकेदारांचे लाड थांबवावे ; आम आदमी पक्षाची मागणी

पुणे- महानगरपालिका हे शहरांमध्ये विविध कामे करताना टेंडर प्रक्रिया पार पाडून ठेकेदारांना टेंडरच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळी कामे देवू करते परंतु ही कामे करताना ठेकेदारांकडून मात्र टेंडरच्या अटी शर्तींचे उल्लंघन होताना सर्रास दिसून येते. असा आरोप करत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 महात्मा फुले पेठ भागातील सहस्त्रअर्जुन नागरी सहकारी पतसंस्था ते सावधान मंडळ या ठिकाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण केले आहे. सध्या परिस्थितीत या ठिकाणी सार्वजनिक शौचालया च्या ड्रेनेज लाईनचे काम झाले असून, ते एकदम निकृष्ट दर्जेचे झालेले असून सदर कामासाठी वापरलेले सिमेंट तसेचं डस्ट पावसाळा सुरू होण्यापूर्वीच निघाल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.अशी तकरार आम आदमी पार्टीने केली आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा निषेध नोंदविण्यात आला असून याबाबतची माहिती क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी तसेच महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क करून वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून सदर तक्रारी बाबत ठेकेदाराच्या विरुद्ध कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याने ठेकेदार हे महापालिकेचे जावई आहेत का ? असा प्रश्न विचाण्यात येतो आहे .या ड्रेनेज लाईनच्या निकृष्ट दर्जाच्या कामा संदर्भात महानगरपालिकेमधील कोणताही अधिकारी दखल घेत नसल्याचे ठेकेदारांचे व महापालिकेतील अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचे चित्र निर्माण होत आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे जर होणार असतील तर महापालिकेने अशी कामे त्वरित थांबवावी. कारण कामाचा दर्जा पाहता सदरील ड्रेनेज लाईन निकृष्ट दर्जाची असून पावसाळ्यामध्ये मैला पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना सदर गोष्टींचा त्रास होईल अशी शंका परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता लागण्या अगोदर जो महापालिकेने कामाचा धडका चालू केला व गडबडीत टेंडर पास करून घेतले त्या सर्व घाईगडबडीमुळेच ठेकेदार कामे नीट करत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मीडिया सहसंयोजक निरंजन अडागळे यांनी केला. ते पुढे म्हणाले, आता हे बघावे लागेल की भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हा रोड दुरुस्ती करण्यासाठी त्याच ठेकेदाराला काम करायला सांगणार आहे का दुरुस्तीसाठी नवीन टेंडर काढणार आहे ?

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप..

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.. त्यांच्या गावभेट दौऱ्याची सुरुवात बारामती शहरातून करण्यात आली.. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आले.दरम्यान, समाजकारणातील कामगिरीनंतर सुनेत्रा पवार या आता पक्ष संघटनेतही सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी:’वंचित’ने 8 उमेदवार केले जाहीर

अकोले-प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे ते आता महाविकास आघाडीसोबत नसणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे मविआला धक्का बसला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. संजय राऊतांनी थोड्याच वेळापूर्वी आपण वंचितसाठी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले नाही, अजून वेळ आहे त्यांनी मविआसोबत यावे असे म्हटले होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.वंचित बहुजन आघाडी राज्य समितीने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ठाकरे यांना पाठिंबा देण्यात येणासर आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पक्ष) यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज्य समितीने घेतला आहे. 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल.बहुजन महासंघाचा अविश्वसनीय अकोला पॅटर्न प्रकाश आंबडेकर यांनी यापूर्वी यशस्वी करुन दाखवला होता. त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी या पॅटर्नला कोणत्याही पक्षाला दुर्लक्षित करता आलेले नाही. गेल्या वर्षाच्या मध्यानंतर राज्यात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन प्रयोगाला बळ दिले.आम्ही जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते-मविआ नेत्यांवर आरोप -प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असे आम्ही महाविकास आघाडीला सांगितले होते. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळमधील महापौरांची बेपत्ता झालेली मुलगी गोव्यात सापडली

नेपाळमधील धनगढी शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आरती दोन दिवसांनी सापडली आहे. उत्तर गोव्यातील मंद्रेम येथील एका हॉटेलमध्ये आरती सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओशोंची अनुयायी असलेली 36 वर्षीय आरती गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात ध्यान करत होती. सोमवारपासून (25 मार्च) ती बेपत्ता होती.सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ती अश्वेम पुलाजवळील एका वेलनेस सेंटरमध्ये अखेरची दिसली. आरतीचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी शोधमोहीमही सुरू केली होती. मुलीचा शोध घेतल्यानंतर महापौर गोपाल यांनी सोशल मीडियावर लोकांचे आभार मानले आहेत.वडिलांनी लोकांच्या मदतीबद्दल आभार मानलेपोस्टमध्ये त्यांनी लिहिले- आरती सध्या खूपच अशक्त आहे. माझ्या मुलीचा शोध घेणाऱ्या सर्व लोकांचे तसेच गोव्यात राहणाऱ्या मदतनीस नेपाळी बंधू-भगिनींचे मी आभार मानतो. सोमवारी रात्री 9.30च्या सुमारास उत्तर गोव्यातील अश्वेम पुलाजवळ आरती शेवटची दिसली.

तिची धाकटी बहीण आरजू हमाल सोशल मीडियावर म्हणाली – काही कॉलरनी मला माहिती दिली आहे की आरतीला सिओलिमजवळील पुलावर शेवटचे पाहिले होते. नेपाळमधील वृत्तपत्र हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार, आरती काही काळ ओशो ध्यान केंद्राशी संबंधित होती.महापौर गोपाल यांनी आपल्या मुलीची माहिती देण्यासाठी नंबर शेअर केला होता.

यापूर्वी महापौर गोपाल यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते – “माझी मुलगी, आरती ही एक ओशो ध्यानी आहे जी काही महिन्यांपासून गोव्यात राहते. मला तिच्या मैत्रिणीचा मेसेज आला की, ती गेल्या दोन दिवसांपासून केंद्रातून बेपत्ता आहे. माझी दुसरी मुलगी आरजू आणि जावई आरतीचा शोध घेण्यासाठी गोव्याला जात आहेत. माझ्या मुलीबद्दल काही माहिती असल्यास 9794096014 / 8273538132 / 9389607953 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

मेडिटेशन सेंटरचे व्यवस्थापक आनंद प्रेम कटिपाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ही महिला गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत राहत होती. ती एकटीच फिरत होती आणि अनेकदा सुट्टीसाठी गोव्याला जात असे. काल रात्री ती पुलाजवळ दिसली. सकाळी ती परत न आल्याने आम्ही तिच्या कुटुंबीयांना तसेच पोलिसांना कळवले होते.

केजरीवाल अटकेचे विविध राष्ट्रात पडसाद -भारताने म्हटले,ढवळाढवळ नको:अमेरिकन राजदुतांना भारताचे समन्स

दिल्ली- येथील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेच्या वक्तव्यानंतर एका दिवसानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी अमेरिकन मुत्सद्दी ग्लोरिया बारबेना यांना समन्स बजावले. दुपारी 1.10 वाजता त्या परराष्ट्र मंत्रालयात पोहोचल्या. ही बैठक 40 मिनिटे चालली.यानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही अमेरिकेच्या वक्तव्याचा विरोध केला. म्हणाले, भारतातील कायदेशीर कारवाईबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे विधान चुकीचे आहे. मुत्सद्देगिरीमध्ये देश एकमेकांच्या अंतर्गत समस्या आणि सार्वभौमत्वाचा आदर करतील अशी अपेक्षा असते.खरं तर, जर्मनीनंतर मंगळवारी अमेरिकेनेही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.परराष्ट्र मंत्रालय पुढे म्हणाले – जर दोन देश लोकशाहीवादी असतील, तर ही अपेक्षा वाढते, अन्यथा अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतातील कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर आधारित आहे. त्याची निंदा करणे किंवा प्रश्न उपस्थित करणे मान्य केले जाणार नाही.

अमेरिकेने म्हटले होते – कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे
यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले होते – आमचे सरकार केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आम्हाला आशा आहे की या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असेल. या काळात कायदा आणि लोकशाहीच्या मूल्यांचे पालन केले जाईल.यापूर्वी 23 मार्च रोजी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानेही केजरीवाल यांच्या प्रकरणाबाबत निवेदन दिले होते. ते म्हणाले होते- आम्ही हे प्रकरण लक्षात घेतले आहे. केजरीवाल यांची निष्पक्ष आणि योग्य चाचणी झाली पाहिजे.जर्मनीने म्हटले होते- केजरीवाल प्रकरणात लोकशाहीची तत्त्वे पाळली पाहिजेत
जर्मनीने पुढे म्हटले होते- भारत हा लोकशाही देश आहे. आम्हाला आशा आहे की येथील न्यायालय स्वतंत्र आहे. केजरीवाल यांच्या बाबतीतही लोकशाहीची तत्त्वे पाळली जातील. केजरीवाल यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय कायदेशीर मदत मिळेल. दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष मानण्याचे कायदेशीर तत्व पाळले पाहिजे.जर्मनीच्या या वक्तव्यावर भारताने आपल्या दूतावासाच्या उपप्रमुखाला समन्स बजावले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते- जर्मनीने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. आम्ही अशा विधानांना आमच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप मानतो, अशा विधानांमुळे आमच्या न्यायालयांच्या निःपक्षपातीपणावर आणि स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण होतात.भारताने म्हटले होते-

आमच्या कारभारात ढवळाढवळ करू नका
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले होते – भारत एक शक्तिशाली लोकशाही आहे, जिथे कायद्याचे पालन केले जाते. इतर प्रकरणांप्रमाणे या प्रकरणातही (केजरीवाल यांना अटक) कायद्यानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणी बनावट अंदाज बांधून विधाने करणे योग्य नाही.मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. ते 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवाल ईडीच्या कोठडीतूनच सरकार चालवत आहेत. न्यायालयात हजेरी लावली त्यावेळी त्यांनी राजीनामा देणार नाही आणि गरज पडल्यास तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचे सांगितले होते.

प्रकाश आंबेडकर-जरांगे पाटील यांची रात्री भेट

३० तारखेपर्यंत निवडणुकीबाबत काहीही निर्णय नाही -जरांगे पाटील

अंतरवाली सराटी-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले होते. जरांगेंसोबत लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली. पुढील वाटचाल कशी करायची याबद्दल मंथन झालं. त्याबद्दलची माहिती योग्य वेळी देऊ, असं आंबेडकर या भेटीनंतर म्हणाले आहेत तर ३० तारखेपर्यंत आपण निवडणुकीबाबत काहीही बोलणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहेत .

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली का? आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून केली अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा

मुंबई-उद्धव ठाकरे यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे या शिवाय ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १६ उमेदवारांनी नावे आहेत. यामुळे आता १७ उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत .औरंगाबादमधून चंद्रकांत खैर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.

वॉशिंग मशीनमध्ये सापडली नोटांची बंडले

ईडीने देशभरातील पाच शहरांमध्ये छापेमारी केली असून, यातून २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एके ठिकाणी केलेल्या छापेमारीत चक्क वॉशिंग मशीनमध्ये नोटांची बंडले लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे धाडी टाकल्या आहेत. परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडीने कॅप्रिकॉर्न शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या टाकलेल्या धाडीत २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच काही कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच यासंबंधित ४७ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी पाठवले

कंपनीचे संचालक आणि पार्टनर संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्याशी संबंधित काही ठिकाणीही धाड टाकण्यात आली. यामध्ये लक्ष्मीटन मेरिटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लि., स्टवार्ट अलॉयज इंडिया प्रा. लि., भाग्यनगर लि., विनायक स्टील्स लि., वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आदींचा समावेश आहे. या ठिकाणांवर छापेमारी केव्हा करण्यात आली याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही. सिंगापूरच्या गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक आणि हॉरिझॉन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपन्यांच्या मदतीने तसेच FEMA कायद्याचे उल्लंघन करून भारताबाहेर परकीय चलन पाठवण्यात या कंपन्या सामील आहेत. तसेच या कंपन्याचे व्यवस्थापन अँथनी डी सिल्वा यांच्या वतीने केले जाते. शेल कंपन्यांच्या मदतीने सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी रुपये पाठवण्यात आले, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, सिंगापूर येथील कंपनीला पैसे पाठवण्यासाठी मेसर्स नेहा मेटल्स, मेसर्स अमित स्टील ट्रेडर्स, मेसर्स ट्रिपल एम मेटल अँड अलॉयज, मेसर्स एचएमएस मेटल्स आदी बनावट कंपन्यांच्या मदतीने बनावट व्यवहार दाखविण्यात आले.

मराठा समाज उमेदवार देणार स्वतःनिवडून येण्यासाठी, कि फडणवीसांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ? जरांगेंना सवाल

पुणे- पुण्याच्या लोकसभेत अगदी सरळ सरळ फाईट आहे. ती म्हणजे भाजप आणि कॉंग्रेस च्या उमेदवारात,म्हणजेच मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात.कोणी म्हणतो यातील कोणी ज्याची ग्रुपिंग मोठी त्याला महत्व देणारे, तर यातील कोणी एक कायम भेद न करता सर्वात मिसळतो,आणि प्रामाणिकतेला महत्व देतो..अगदी बडा..आणि सामान्य यांच्यातील हि लढाई आहे असेही अनेकांना वाटते,आता खरे खोटे देव जाणो.पण सरळ लढाई सरळ राहिली तर..आता काही ना सोशल मीडियातील भूल भूलय्याने उतावळा करून पायावर धोंडा मारून घ्यायला तयार करून च ठेवलेले होते ते ठेचकाळत इकडे तिकडे फिरत आहे. आता याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक आंदोलन करणारे,सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नावाखाली येथे मराठा समाज एकवटतो आहे. असे म्हणतात कि जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे करायला सांगितलेत. जरूर सांगितले असतीलही.आणि त्यामागे पाटलांचा काही उद्देश देखील असू शकेल.अर्थात तो सगळीकडे समान तत्वावर लागू होईल काय हा प्रश्न आहेच.पण पाटलांचा नेमका उद्देश लक्षात येणे महत्वाचे आहे. पाटील आणि फडणवीस यांच्यातील फाईट सर्वश्रुत आहे. अर्थात हि राजकीय फाईट देखील नाही मराठा आरक्षण विषयाने तिची सुरुवात होऊन ती टोकाला पोहोचली.लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आता प्रयेक लोकसभा मतदार संघात जर जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे करायचे ठरवले असेल तर अर्थात तिरंगी फाईट तर निश्चित आहे. ती म्हणजे भाजप महायुती आणि कॉंग्रेस महाविकास आघाडी यांच्यात या तिसऱ्या उमेदवाराची भर पडेल.आणि हि भर पडली तर मराठा उमेदवार विजयी होईल कि फडणविसांचा म्हणजे भाजपाचा उमेदवार विजयी होईल कि आघाडीचा यावर प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे मंथन होऊ शकेलही पण सरार्स पहिले तर फडणवीसांची मते एकगठ्ठा आहेत, भाजपची मते कुठे हलत नाहीत असे म्हणतात.मग कुणाच्या मतांची विभागणी होईल तर ती आघाडीच्या होईल हे स्पष्ट आहे.अर्थात दोघाच्या मतांना छेद देऊन मराठा उमेदवार जिथे निवडून येऊ शकतोच तिथे तो येईलही पण असे मतदार संघ कोणते हे देखील समजायला हवेत आणि तिथेच उमेदवार द्यायला हवेत असाही विचार मांडला जाऊ शकतो.

एकूणच मराठा नेते जरांगे पाटील आणि ठीक ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना स्वतः निवडून येण्यासाठी आपण निवडनुक लढवतो आहे हे प्रथम पटवून द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांचा फायदा अन्य उमेदवारांना होऊ शकतो काय याचा हि विचार राजकीय स्तरावर होईल असे वाटते आहे. एकीकडे मतांची विभागणी होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याशी शर्थीच्या वाटाघाटी चाललेल्या असताना,दुसरीकडे MIM सारखे पक्ष काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार असताना आता जरांगे पाटलांनी असे उमेदवार उभे केले तर ते महाविकास आघाडीला धक्का देतील कि फडणविसांच्या युतीला धक्का देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बाबा सिद्दीकीच्या 2024 च्या इफ्तार पार्टी मध्ये कलाकारांची मांदियाळी 

 बाबा सिद्दीक यांचा वार्षिक इफ्तार ही एक अनोखी परंपरा झाली असून यंदाची इफ्तार पार्टी नुकतीच पार पडली. मोठ्या दिमाखात या इफ्तार पार्टीत बॉलिवुड सोबतीने अनेक इंडस्ट्रीतील बड्या लोकांनी हजेरी लावली होती. झगमगती इफ्तार खाण्याचे अनोखे बेत डोळ्यांना दिपवणारी सजावट आणि बरच काही असा हा इफ्तार पार्टी चा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 

 इफ्तार पार्टी ही खास ठरते ती अनेक कलाकारांच्या उस्थितीने ! बॉलिवुड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकार , राजकीय नेते अश्या अनेक बड्या स्टार्सनी ही इफ्तार खास केली. सगळ्यांचा लाडका भाईजान ‘सलमान खान’ ने स्वतःच्या उपस्थितीने इफ्तार पार्टीत चार चाँद लावले. दिग्गज सलीम खान आणि खान दान परिवार या इफ्तार पार्टीत आले आणि त्यांच्या परिवाराची चर्चा झाली. लाडक्या मुली अलविरा आणि अर्पिता आणि जावई अतुल आणि आयुष यांच्यासोबत आपला धडाकेबाज नातू निर्वाण यांच्यासोबत एक सुंदर ‘हम साथ साथ है’ क्षण पुन्हा तयार केला.

 विजय वर्मा ची अनोखी स्टाईल , खो गये हम कहां’ स्टार सिद्धांत चतुर्वेदी या दोघांची जोडी रेड कार्पेट वर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. हा दिवस आणखी एका गोष्टी साठी खास झाला कारण बॉलिवुडचा OG अभिनेता इमरान हाश्मी आणि त्याचा लाडका मुलगा याने बाबा आणि झीशान सिद्दीक यांच्या सोबतीने रेड कार्पेटवर इमरान चा वाढदिवस साजरा केला.
 पूजा हेगडेचे , अण्णा ‘सुनील शेट्टी’ शिल्पा शेट्टी आणि त्यांचा शमिता या सगळ्यांचा फॅशन ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. श्री.प्रफुल्ल पटेल (राज्यसभा सदस्य) यांनी त्यांच्या प्रचंड उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा दिली. सैफ बेलहासा होल्डिंग्जचे अब्जाधीश संस्थापक/अध्यक्ष डॉ. सैफ बेल्हासा यांनीही सिद्दीकीच्या इफ्तारमध्ये दुर्मिळ उपस्थिती लावली – मोगल जगातील 100 सर्वात शक्तिशाली अरबांपैकी एक आहे आणि जगातील सर्वात शक्तिशाली अरबांच्या यादीत आहे. 
 GenZs कडून आम्ही ‘एक लिव्हर’ म्हणजे ओरहान अवत्रामणी उर्फ ​​”ओरी” आणि ‘बिजली’ पलक तिवारी यांनी रेड कार्पेटवर अनोखी जादू निर्माण केली. प्रीती झिंटा , श्वेता तिवारी यो यो हनी सिंग, हुमा कुरेशी, श्रिया सरन, सुनील ग्रोवर, शहनाज गिल, करण टाकर, हिना खान, करण कुंद्रा, करण सिंग ग्रोव्हर, कुब्रा सैत, गौहर खान, फायटरचे ऋषभ साहनी, जन्नत जुबेर, फैसू, एमसी स्टेन, अवाज दरबार, मुनावर फारुकी, अष्टपैलू अंकिता लोखंडे आणि पती विकास जैन आणि बिग बॉसची संपूर्ण टीम आणि या सारख्या अनेक कलाकारांनी ही संध्याकाळ खास केली.

दंड आकारून बांधकामे नियमित करणे चुकीचे -हायकोर्ट

बेकायदा कामे करा आणि नंतर दंड भरून त्या कामांना कायदेशीर ठरवा हि कसली प्रथा ?

मुंबई : कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करा आणि महापालिकेने नोटीस बजावल्यावर बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करा, ही बाब नित्याची झाली आहे. भलामोठा दंड आणि शुल्क आकारून संपूर्णपणे बेकायदा असलेली बांधकामे नियमित करा, ही गोष्ट मान्य करण्यासारखी नाही.ती चुकीचीच आहे .नियमित करण्याची परवानगी देणाऱ्या विशेषाधिकारामुळे कायदा मोडण्याचा परवाना मिळत नाही, असे बजावत उच्च न्यायालयाने सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर उभी असलेली इमारत ताेडण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेला दिले.

सरकारी संस्थांचे भूखंड बळकावणे व त्यावर बेकायदा बांधकाम करणे, ही डोकेदुखी एकट्या नवी मुंबईची नाही. राज्यातील सर्वच महापालिकांची आहे. बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटली तयार असायला हवे, असे न्या. गौतम पटेल व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने म्हटले. याचिकादाराने कोणत्या अधिकारांतर्गत याचिका केली, हे स्पष्ट न केल्याने खंडपीठाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली.

काय आहे प्रकरण?
संबंधित सोसायटीतील २९ फ्लॅटपैकी २३ फ्लॅट विकले असून पाच रिकामे आहेत. न्यायालयाने सर्व फ्लॅटधारकांना नोटीस बजावली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. परंतु, दिलासा देण्यास नकार दिला.
दंड आकारून, नुकसान भरपाई घेऊन बेकायदा बांधकामे नियमित करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

फ्लॅट खाली करा, इमारत जमीनदोस्त करा
बेकायदा बांधकाम केल्यावर किंवा परवानगी नाकारल्यावर बांधकाम नियमित करण्यासाठी परवानगी मागू शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणात, संपूर्ण बांधकाम बेकायदा आहे.
फ्लॅटधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांनी सहा आठवड्यांत फ्लॅट खाली करावे. त्यानंतर दोन आठवड्यांनी इमारत जमीनदोस्त करावी, असे आदेश न्यायालयाने पालिकेला काही दिवसांपूर्वी दिले.

मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे साठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रचंड समीक्षक आणि व्यावसायिक प्रशंसा मिळविणारी बॉलिवूडची आयकॉन राणी मुखर्जी हिला नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

राणीने तिच्या मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला, जिथे तिने एका उत्साही स्त्रीची भूमिका केली जी आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी देशाचा सामना करते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आणि हा विश्वास परत आणला की कंटेंट सिनेमा लोकांना महामारीनंतरच्या जगात थिएटरकडे खेचू शकतो. राणीने जगभरातील मोठ्या पडद्यावर धमाल सुरूच ठेवली आहे। 
रेड कार्पेटवर सॅटिन ब्राऊन रंगाच्या साडीत राणी खूपच सुंदर दिसत होती. तिने एक जबरदस्त डायमंड नेकलेस, खुले केस आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला.

पुरस्कार मिळाल्यावर राणी म्हणाली, “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. हे माझे इंडस्ट्रीतील 27 वे वर्ष आहे आणि माझ्या कामाचा गौरव आणि सन्मान होत आहे हे पाहून बरे वाटते. MCVN हा चित्रपट खूप खास आहे कारण तो एका आईची आणि तिच्या ताकदीची कथा आहे. ही कथा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते, कारण ही प्रत्येक भारतीय स्त्रीची, प्रत्येक आईची कथा आहे. मी विशेषतः माझ्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बरचे आभार मानू इच्छिते ज्यांनी माझ्याद्वारे ही कथा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आशयाचे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत नसताना, अशा वेळी माझ्या पाठीशी उभे राहून या चित्रपटाला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझे निर्माते झी स्टुडिओ – शारिक, भूमिका आणि एम्मा एंटरटेनमेंट – निखिल, मधु, मोनिशा यांचे आभार मानू इच्छिते. या चित्रपटाच्या निर्मितीत मोठे योगदान देणाऱ्या एस्टोनियन क्रूचेही मी आभार मानू इच्छिते. 2023 हे चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले आहे कारण MCVN सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड आदर आणि प्रेम मिळाले आहे. तुमच्या प्रेमाचेच फळ आहे की मला हा सन्मान मिळाला आहे. आमचे सहकारी आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्हाला पुरस्कार मिळतात. MCVN ला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे.

50 लाख रुपयांची रोकड पकडली…

पुणे :पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका कार मध्ये 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळाली .

पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचेही पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.