मुंबई : राज्यपालांना पाठवलेल्या 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपालांना दोष देता येणार नाही असे म्हणत नवीन चर्चा सुरू केली.
आतापर्यंत राज्यात अनेकांची सत्ता आली आणि गेली, पण ‘अशी ‘वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही. बारा सदस्यांचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिला आहे. त्यावेळी त्यांनी काही गोष्टी आम्हाला खासगीत सांगितल्या. त्या इथे आम्ही उघड करू शकत नाही. सरकार ज्या शिफारशी करते, त्या राज्यपालांनी मान्यच करायच्या असतात,’ असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान बारा विधान परिषद सदस्यांच्या विषयावर बोलताना जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, आम्ही स्वतः बारा सदस्यांचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिला आहे. अनेकदा त्याची आठवण करून दिली आहे. तरीही प्रस्ताव नसल्याचे सांगत असतील तर हे फारच आश्चर्यकारक आहे . राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. ते मुद्दाम असे करतात असे मी म्हणणार नाही. 12 सदस्यांची पदे बराच काळ रिक्त आहेत, याचं शल्य जनतेला आहे. त्यामुळे रोष वाढत आहे. म्हणून तर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे असेही ते म्हणाले.