तीन डिसेंबर रोजी रायगडावर धरणे आंदोलन
पुणे- निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे,दर वेळी केवळ त्यांचे नाव घ्यायचे आणि कोणी त्यांचा अवमान केला कि तो करणारांकडे दुर्लक्ष करायचे हे आता असेच चालणार असेल तर यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका,त्यांची नावे मोठ्माठ्या वास्तूंना देऊ नका आणि दिलेली पुसून टाका अशा उद्विग्नता खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं. शिवरायांचा अपमान होतो तेव्हा दुःख होते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यापालांवर कारवाई का केली नाही अशी विचारणादेखील उदयनराजे यांनी यावेळी केली.
तुमच्या डोळ्यात आता अश्रू आले होते, ही तुमची हतबलता समजायची का, की तुम्ही अश्रु गाळता असा प्रश्न उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, तसं समजा..माझा उलटं तुम्हाला प्रश्न आहे, भावना फक्त तुम्हाला दिल्या आहेत का? आम्हाला नाहीयेत का? हे काय मगरीचे अश्रू होते का? असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
फडणवीस राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांचं समर्थन करतात यावर प्रतिक्रिया विचारली असता, उदयनराजे म्हणाले की, मी जे बोलायचं होतं ते बोललो. त्यांचं समर्थन मी तरी केलं नाही. कुठला पक्ष या लोकांविरोधात भूमिका घेत नसेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊच नका, असेही उदयनराजे म्हणाले.राज्यपालांना पदमुक्त केलं गेलं नाही तर तुमच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ती त्या वेळची गोष्ट आहे, काय होईल काय नाही होणार ते पाहून मी त्यावेळी निर्णय घेईल. माझी भूमिका मी बदलत नाही. कुठल्याही राजकारणासाठी मी त्यापासून फारकत घेणार नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
तीन डिसेंबर रोजी रायगडावर धरणे आंदोलन
तसेच, तीन डिसेंबर रोजी रायगडावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देखील उदयनराजे यांनी यावेळी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असे ते म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांची भेट घेणार असून ते प्रोटोकॉल प्रमाणे ते कारवाई करतील. त्यांनी असं वक्तव्य केलं हे दुर्दैवी आहे. यानंतर कारवाई झाली नाही तर लोकांनी पुढं ठरवावं की कोणाबरोबर राहायचं किंवा नाही राहायचं असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. तीन तारखेनंतर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि त्यानंतर काय होतंय त्यावर मी नंतर बोलीन असे उदयनराजे म्हणाले.राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. असा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला.