पुणे, दिनांक 9- जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करतांना शंभर टक्के पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पहाता, जसे पंचनामे होतील तशी लगेच मदत देण्यात यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले होते. या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना विशेष दराने मदत देण्यात येणार आहे. ही मदत देतांना पंचनामे झाले की लगेच देण्यात यावी.
पूर परिस्थिती आणि त्यावरील व्यवस्थापनाबाबत अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी अशाही सूचना त्यांनी दिल्या. आपापल्या विभागातील भविष्यकालीन पूरबाधित होऊ शकणा-या गावांची यादी तयार करणे, तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवणे आदीबाबत योग्य ती दक्षता घेणे तसेच या काळात कोणीही मुख्यालय सोडून जावू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाधित पूल, पाण्याखाली गेलेले पूल, बंद असलेले रस्ते, त्याबाबतची सद्यस्थिती, दूरसंवाद यंत्रणाची पर्यायी व्यवस्था, वीजपुरवठा, पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक, वैद्यकीय सुविधा, औषध फवारणी, औषध पुरवठा, परिसर स्वच्छता, स्वच्छ आणि शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय याबाबत अद्ययावत माहिती ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
सांगलीतील पूरग्रस्तांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटे रवाना
पुणे सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि ‘रेडी टू इट’ असे खाद्यपदार्थ पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर आणि सांगली साठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राम यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिरुर येथून सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 12 हजार लिटर पाण्याच्या बाटल्या (एक ट्रक) आणि बिस्कीटांचे पुडे (एक ट्रक) रवाना करण्यात आले. यासाठी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे तसेच त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेतला.या दोन्ही ट्रकना विभागीय आयुक्तांच्या परवानगीने टोलमधून सूट देण्यात आली आहे.