पुणे :- लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना मतदानाचा अमुल्य अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले.
भारत निवडणूक आयोगाच्याच्यावतीने मतदान प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,पुणे, मतदार नोंदणी अधिकारी 209-शिवाजीनगर,211-खडकवासला आणि 214-कँटोनमेंट मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, उपजिल्हानिवडणूक अधिकारी मोनिका सिंग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.आहुजा, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जलतरणपटू सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.म्हैसेकर यांनी, सुशिक्षीत मतदार, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे सांगितले. खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक सरकारसाठी शंभर टक्के मतदान होणे आवश्यक असून मतदान जागृतीसाठी भविष्यात मोहिम राबविण्याची वेळ येणार नाही, अशा पध्दतीने प्रत्येक नागरिकाने स्वयंजबाबदारीने मतदान करायला हवे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, मोठया संघर्षानंतर नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असून लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे सांगितले. मतदानातील उदासीनता टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भरघोस मतदान होते, त्याचप्रमाणे नागरिकांनी विधानसभा व लोकसभा निवडणूकीत भरघोस मतदान करावे असे आवाहन केले.
जलतरणपटू सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी यांनी युवकांनी मतदानाविषयी जागृत रहावे असे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी प्रास्ताविकात, जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या मतदार नेांदणी मोहिमेची माहिती दिली. मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदार नोंदणी मोहिमेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी स्नेहल बर्गे, सुषमा चौधरी, रोहिणी घाडगे, वर्षा सकपाळ यांच्यासह सानिका कुलकर्णी, तीर्थ पुराणिक, संस्कृती माटे, प्रणव चाळके व रेणूका पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व या विषयावर माहिती दर्शविणाऱ्या फलकांसह बोट क्लब सभागृह-जुना मुंबई पुणे महामार्ग-गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालय-अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान रॅली काढून प्रबोधन केले. कार्यक्रमाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.