पुणे- स्वच्छता ही एक चळवळ झाली असून सर्व नागरिकांच्या सहकार्याशिवाय ती यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन शिरुर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी केले. शिरुर येथे स्वच्छ भारत अभियान-स्वच्छता सर्वेक्षण 2018 च्या जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिरुरचे तहसिलदार रणजीत भोसले,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, क्षेत्रीय प्रचार सहायक पी. कुमार, स्वच्छता दूत व हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, पर्यावरणतज्ञ प्रशांत अवचट, दत्तात्रय बर्गे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा वाखारे म्हणाल्या, शहर असो की ग्रामीण भाग स्वच्छता पाळणे, ती टिकवणे ही काळाची गरज आहे. आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी स्वच्छतेचे मोठे महत्त्व आहे.
शिरुरचे तहसिलदार रणजीत भोसले यांनी आपल्या मनोगतात गावाने ठरवले तर कोणतीही गोष्ट अंमलात आणणे अवघड नाही. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. स्वच्छतेबाबत जनतेमध्ये जाणीवजागृती होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने शासकीय योजनांच्या प्रसिध्दीसाठी आकाशवाणी, दूरचित्रवाणी, मुद्रीत माध्यमे आणि सोशल मिडीयाचा वापर नियमितपणे केला जात असल्याचे सांगितले. लोकराज्य मासिकांतून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात असून या मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छता दूत व हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी स्वच्छता आणि आरोग्य याबाबत आपले मनोगत मांडले. पर्यावरणतज्ञ प्रशांत अवचट यांनी प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचे कळकळीचे आवाहन केले. मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी शिरुर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियानाबाबत हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि शिरुर नगरपरिषदेच्या मदतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमात लोकजागृती कला पथक, वसुंधरा पपेट शो आणि स्त्री शक्ती, आदी शक्ती या बचतगटाने मनोरंजनपर प्रबोधक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमस्थळी शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. त्यास शिरुर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट दिली.
जनजागृती कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. यामध्ये रांगोळी स्पर्धेतील प्रियंका काळे,वैभवी वाटेकर, आकांक्षा वरखेडे, पल्लवी शेंडगे, संस्कृती भोसले, सानिका साळुंखे, कोमल गायकवाड तर निबंध स्पर्धेत अनुष्का गावित्रे, ऋतुजा शेवाळे, अक्षदा खिल्लारे, सायली थापा, मुक्ता कळसकर यांचा आणि वक्तृत्व स्पर्धेत देवेंद्र वेताळ, क्रांती गायकवाड आणि कोमल गायकवाड यांचा समावेश होता.
प्रारंभी विद्याधाम हायस्कूल च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची जनजागरण रॅली काढण्यात आली. या रॅलीला हिरवा झेंडा शिरुर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी दाखवला. कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी,नागरिक, स्वच्छता दूत, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.