भाजप खासदार आणि महापालिका पदाधिकारी यांच्यात ‘कारे दुरावा ‘? प्रश्नावर काय म्हणाल्या आमदार… माधुरी मिसाळ
पुणे- भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी पाणीवितरणाच्या असमतोल पद्धतीवर महापालिका आयुक्त यांना धारेवर धरले असताना,त्याबाबत महापालिकेत अडीच ते पाच वर्षे पदाधिकारी राहिलेल्या भाजपा पदाधिकारी यांनी मौन पाळणे, विमानतळाबाबतचे प्रश्न खासदार दिल्लीतून मार्गी लावून आले असताना यातील पदाधिकारी आणि शहर अध्यक्षांनी याच प्रश्नी दिल्लीतील मंत्र्यापूढे जाणे अशा घटनांच्या पार्शवभूमीवर आज आमदार माधुरी मिसाळ यांना माध्यम प्रतिनिधींनी काही प्रश्न केले असता, या मध्ये दोहोंत कुठे बेदिली झाल्याचे नाकारून त्यांनी ही कम्युनिकेशन गैप असल्याचे सांगितले, आणि खासदार ती निश्चित दूर करतील असा विश्वास व्यक्त केला.आणि आपल्या मतदारसंघात पाण्याचे प्रेशर बाबत तक्रार नसल्याचे त्या म्हणाल्या.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेले महत्वाचे मुद्दे, राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या,आणि मिळविलेले यश या संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषदेतून माहिती दिली त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्या म्हणाल्या, सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलासाठी यापूर्वीही बैठका झाल्यानंतर पुलाच्या आराखड्यात बदल झाले. मेट्रोचाही विचार करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम करताना या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांचे या पुलाच्या आराखड्याबाबत आक्षेप आहेत, असे विचारले असता मिसाळ म्हणाल्या, ” धायरीच्या बाजूने येणारा उड्डाणपूल विठ्ठलवाडीतील पेट्रोलपंपाजवळ उतरत आहे. त्याऐवजी राजाराम पुलाजवळ उतरला पाहिजे अशी भूमिका आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली जाईल. शहरातील बहुतांश उड्डाणपूल चुकलेले आहेत. हा पूल चुकू नये, त्यासाठी आत्ताच बदल होणे आवश्यक आहेविधीमंडळाच्या अधिवेशनात पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचा विषय मांडला. त्याचप्रमाणे वन विभागाच्या जमिनीसाठी मिळणारा निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करावा, महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेही योजना सुरू करावी, मुख्यमंत्री सहायता निधी पूर्ववत करावा, पर्वतीत कामगार विभागाच्या जागेवर ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभे करावे असे मुद्दे उपस्थित केले. तसेच समाविष्ट २३ गावांच्या झोनची निश्चिती करावी, तेथे सुविधा पुरविण्याची मागणी केली. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची नियमावली करावी, पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सोडवावा यासह इतर विषयांवर लक्षवेधी उपस्थित केली होती, असे मिसाळ यांनी सांगितले.
.”माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला त्यांच्या वडीलांचे नाव दिल्याने स्थानिक नागरिकांनी याविरोधात आंदोलन केले आहे. या उद्यानाला पुणे महापालिका उद्यान असेच नाव द्यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आमदार मिसाळ म्हणाल्या,”वडिलांच्या नावाचे स्मरण असावे यासाठी उद्यानाला नाव दिले असावे, पण नागरिकांनी यास विरोध केला असल्याने त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी भेट घेणार आहे. तसेच भिमाले यांच्याशीही चर्चा करणार आहे.