नवी दिल्ली : शिवरायांच्या विचारांची पताका घेऊन शंभर देशांमधे जायचे आहे. नवा समाज घडवायचा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड़ यानी केले.
नवी दिल्ली येथे शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते बीव्हीजी समुहाचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला पोलंड, चीन, बल्गेरीया, रोमानिया, स्पेन, इजिप्त, कॅनडा, सायप्रस, टुनिशिआ, इस्राइल या देशांचे राजदूत, संयोगिता राजे भोसले, राहुल कराड आणि मान्यवरांची उपस्थिति होती.
या पुरस्कारामुळे बीव्हीजीवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. शिवरायांच्या विचारांची पताका हाती घेऊन शंभर देशात बीव्हीजी पोहोचवून दहा कोटी लोकांचे जीवन बदलायचे आहे, असे प्रतिपादन गायकवाड़ यांनी याप्रसंगी केले. उपस्थित राजदूतानी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
संपूर्ण यांत्रिकीकरणाचा वापर केला असता तर खूप कमी मनुष्यबळात बीव्हीजीचे काम चालले असते; मात्र सर्व सामान्याना रोजगार देण्याचा उद्देश् आणि ध्येय असल्याने हणमंतरावानी ऐंशी हजार लोकाना रोजगार दिला. रयत प्रथम हा महाराजांचा विचार घेऊन पुढे जाणारे हणमंतराव आहेत. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, असे उद्गार खा. संभाजीराजे यांनी काढले. पोलंडचे राजदूत ॲडम बुरकोवस्की यानी अस्खलित हिंदीतून भाषण करताना, शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली.
या सोहळ्याला नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत प्रचंड गर्दी केली होती. पाहुणयांच्या हस्ते महाराष्ट्र सदनातील शिवप्रतिमेचे ढोल ताश्यांच्या दणदणाटात पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.