पुणे :गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस पक्ष अध्यक्षाविना चालत आहे. कोणी अध्यक्ष होण्यास तयार नाही. पक्षाच्या उमेदीच्या काळात गांधी घराण्याने अध्यक्षपद भोगले. परंतु आज पक्षाला उभारी देण्याची गरज असताना राहुल गांधी मैदान सोडून पळत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यात शनिवारी केली.
जनसघांचे श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने सभासद नोंदणी अभियान दानवे यांच्या हस्ते सुरू केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक उपस्थित होते.
भाजपच्या सुरुवातीच्या काळात केवळ दोन खासदार निवडून आले म्हणून टिंगल-टवाळी करण्यात आली. परंतु कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे केंद्रात सलग दुसर्यांदा पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आले. दुसरीकडे दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? काँग्रेसला संघटनात्मक मजबूत करण्याची गरज असताना राहुल गांधी व गांधी घराणे मैदान सोडून पळ काढत आहे, अशी टिका त्यांनी केली.
राज्यातील अनेक आजी -माजी आमदार, खासदार व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, ज्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन मजबूत होईल, अशांना पक्षात घ्यायला काहीच हारकत नाही, परंतु स्थानिक पदाधिकार्यांना विश्वासात घेऊनच प्रवेश दिला जाईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
विधानसभेला २२० जागांवर युतीचा विजय होईल
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. परंतु भाजपची विधानसभेची तयारी यापूर्वीच झाली असून, सभासद नोंदणी ही 2024 साली होणार्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. विधानसभेत भाजप-सेना युतीचे 220 पेक्षा अधिक आमदार विजय होतील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
सहयोगी सदस्यांवर भाजप सदस्यांसारखे बंधन नाही-
भारतीय जनता पक्षाचा सदस्य असणे आणि पक्षाचा सहयोगी असणे, यात फरक आहे.सहयोगी सदस्यांवर भाजप सदस्यांसारखे बंधन नाही सहयोगी व्यक्तीने सर्व्हे करावा, की दुसरे आणखी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, पक्षाच्या सदस्यांना तसे वागता येणार नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी पक्षाचे सहयोगी सदस्य खा. संजय काकडे यांचे नाव न घेता लगावला. खा. संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रावसाहेब दानवे पराभूत होतील, असे भाकित केले होते. दानवेंच्या मतदारसंघात आपण सर्व्हे केल्याचा दावाही काकडे यांनी केला होता.
या संदर्भात पत्रकारांनीचं दानवे यांना छेडले …तेव्हा ते म्हणाले, सहयोगी आणि पक्षाचे सदस्य यात फरक आहे. त्यांनी काय करावे त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या सर्व्हेनंतरही मी अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो. ते जरी सहयोगी असले तरी त्यांच्यावर भाजप सदस्यांसारखे बंधन नाही. घटक पक्षांच्या लोकांनी काय बोलावे, कसे वागावे हे त्यांचा प्रश्न आहे, तसेच सहयोगींचेही आहे, असेही स्पष्टीकरण दानवे यांनी दिले