मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील शाळेतल्या मुलांना चुकीचा इतिहास शिकवला, त्या मोदींना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विधानसभा निवडणुकीत “छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ‘, अशी जी घोषणा दिली आहे त्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज खिल्ली उडविली. तर उद्धव-राज एकत्र आल्यास आनंद होईल याअगोदरही मी या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही भाऊ एकत्र येऊन बंधुत्व सांभाळणार असतील तर आम्हाला आनंद आहे. दोघे एकत्र आल्यास इतरांचाही त्रास कमी होईल, अशी कोपरखळी पवार यांनी मारली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशामध्ये शिवसेनेचेही योगदान मोठे आहे. आजपर्यंत भाजपला ज्या ज्या वेळी सत्तेत जाण्याची संधी मिळाली, त्या त्या वेळी शिवसेनेचा आधार त्यांना होता, असे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात पवार बोलत होते. गुजरातमध्ये सातवीच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांचा जन्म 1603 मध्ये शिवनेरी या राजवाड्यात झाल्याचे नमूद केले आहे; तर दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा होते, अशी चुकीची माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले, की देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे दसऱ्याच्या दिवशीचे भाषण दूरदर्शनवरून दाखवण्यात आले. दूरदर्शन हे देशाच्या जनतेच्या मालकीचे आहे. कोणाचेही सरकार घटनेनुसार धर्मनिरपेक्ष असते. मात्र, मोदी सरकारला याचा विसर पडला आहे. दसऱ्याच्या दिवशीच नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमा झालेले असताना या सोहळ्याकडे सरकारचे लक्ष गेले नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.
याशिवाय, देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा ते भारताचे प्रतिनिधित्व करत असतात; पण मोदी यांच्या अमेरिकेतल्या भाषणाचा वापर भाजप प्रचारासाठी करत आहे. हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीकाही त्यांनी केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग शांतपणे योजना तयार करायचे, निर्णय घ्यायचे; पण त्याबाबत भाषण करून वाहवा मिळवत नव्हते. त्याउलट नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय दिसत नाहीत; पण भाषणबाजी मात्र जोरात करत आहेत. या दोन पंतप्रधानांमध्ये हा फरक असून, लोकसभेत जनता या भाषणबाजीला बळी पडली. या वेळी महाराष्ट्राची जनता मात्र बळी पडणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.