पंढरपूर- श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. कोट्यवधी रुपये किंमतीचा हा एेवज सांभाळणे मंदिर समितीला जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे अाता १९८५ पासून मंदिर समितीकडे जमा झालेले शेकडो किलोंचे सोने-चांदीचे दागिने वितळवून त्याच्या विटा बनवण्यासाठी मंदिर समितीने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भुवैकुंठ पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचरणी लाखो वारकरी श्रद्धेने सोने-चांदीचे दागिने अर्पण करत आसतात. पंढरपूर मंदिरे देवस्थान अधिनियमानुसार देवाला अर्पण करण्यात येणारे सोने -चांदीचे दागिने, वस्तू वितळवून घेताना शासनाचा प्रतिनिधी उपस्थित असणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीचा ठराव संमत झाला असून, शासनाकडे याबाबत परवानगी मागितली आहे.
मंदिराचा ताबा शासनाकडे अाल्यापासून म्हणजे २६ फेब्रुवारी १९८५ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत मंदिराकडे २५ किलो ६६ ग्रॅम ३८७ मिली सोने तर ८३४ किलो २० ग्रॅम ६२४ मिली इतके चांदीचे दागिने आणि वस्तू आहेत. त्यामुळेच तीर्थक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठलाला गरिबांचा बालाजी म्हणून संबोधले जाते. या अर्पण दागिन्यांत सोन्याचा टोप, नाम,लाॅकेट, कंठी, मासोळी, धोतर आदी दागिने, पूजेच्या वस्तू आणि श्री रुक्मिणी मातेला गंठण, पोहेहार, बोरमाळ, कर्णफुले, तोडे, पाटल्या, पैजण, जोडवी, मासोळी अादींचा समावेश आहे.
विविध बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा
स्टेट बँक आँफ इंडिया, कॅनरा, बँक आॅफ महाराष्ट्रात मंदिर समितीच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. ठेवींवरील व्याजापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न समितीला मिळते. २०१६ मध्ये समितीचे वार्षिक उत्पन्न २७ कोटी रुपये इतके होते. दोन वर्षामध्ये त्यात मोठी वाढ झाली आहे. या शिवाय शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळात अर्पण दुर्मिळ दागिन्यांचा मंदिरात खास खजिना आहे. हे दागिने अतिप्राचिन असल्याने त्यांची बाजारात किंमत करणे अवघड आहे. एरव्ही सणासुदीच्या दिवशी, नवरात्रोत्सवामध्ये अशा पारंपरिक दागिन्यांनी विठ्ठल रुक्मिणीस सजवण्यात येते.