मुंबई-अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या दोन हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यात सर्व भाजप नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. अजित पवार यांची ख्याती सध्या धमकीबहाद्दर झाली आहे. ते रोज उठून मतदारसंघातल्या 10 लोकांना धमक्या देतात, असा ही आरोप त्यांनी केला.
उत्तर मध्य मुंबईच्या जागेबाबत ,नसीम खान यांच्या नाराजीबाबत बोलतांना आज संजय राऊत म्हणाले, ”नसीम खान मुंबई काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आमच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना निवडणूक लढवायची होती. माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं बोलण झालं होतं. नसीम खान यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही बोललो नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. काँग्रेकडे ज्या जागा आहेत, तो त्यांचा निर्णय आहे. अजूनही काँग्रेसला वाटत असेल, उमेदवार बदलून नसीम खान यांना उमेदवारी द्यावी, तर तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही मविआ धर्माच पालन करू आणि नसीम खान यांना निवडून आणू. नसीम खान यांना उमेदवारी नाकारण्याशी आमचा काहीही संबंध नाही”, असे राऊतांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धमकी बहाद्दर असा उल्लेख राऊतांनी केला आहे. ते म्हणाले, ”अजित पवार अजून किती वेळा बोलणार, गुळगुळीत झाले आहे आता. आता दुसरे काहीतरी बोला. धमकी वगेरे द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत”, अशी टीका राऊतांनी केली आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच 2019 चा शपथविधी झाला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावर राऊतांनी भाष्य केले आहे.
राऊतांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे., ”मोदींना माझा सवाल आहे, तुम्ही आमचे बारा लोकं घेतले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. मोदी यांची भ्रष्टाचार विरोधीची बॉम्ब नसून पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी लढाई करत आहेत. मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, ”महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. राजाभाऊ समोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. त्यांना आम्ही गाडणारच”, असा इशारा राऊतांनी दिला आहे.