पुणे- विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या म न से च्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता कुठे आपण नेमलेले पदाधिकारी योग्य आहेत कि कसे ? याबाबत माहिती घ्यायला सुरुवात केली आहे . आणि आताशी कुठे त्यांची योग्यायोग्यता तपासून घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने ‘ म नसे सोडून गेलेल्या अनेकांनी’ बैल गेला आणि झोपा केला’ अशा मराठी म्हणी चा यावर टोमणा मारला आहे .
दरम्यान यापुढे मनसे पक्षात ज्या पदाधिका-यावर जबाबदारी दिली जाईल त्याला पक्षाच्या चौकटीतच काम करावे लागेल. आपले काम सोडून इतरांच्या कामांत हस्तक्षेप केल्यास थेट पक्षाबाहेर जाल असा इशारा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यात पक्षाच्या पदाधिका-यांना इशारा दिला. राज्यस्तरीय पातळीवर पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल करणार असल्याचेही राज यांनी जाहीर केले. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट आपल्या समस्या, अडचणी, चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती देण्यासाठी आपला ईमेल आयडी दिला. आपल्या सूचना, माहिती connectrajthackaray@gmail.com या मेलवर पाठवा असे आवाहन करतानाच फक्त तक्रारीच करू नका असेही राज यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मागील 4-5 दिवसांपासून पुणे दौ-यावर असेलल्या राज ठाकरे यांनी पुण्यातील सर्व पदाधिका-यांशी गेली 3-4 दिवस संवाद साधला. त्यानंतर आज सकाळी छोटेखानी झालेल्या मार्गदर्शनपर भाषणात पक्षाच्या नेत्यांना व पदाधिका-यांना राज यांनी चांगलेच फैलावर घेतले. राज म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत मी माहिती घेत आहे. सगळेच याने दगाफटका केला. याने मान दिला नाही, त्याने काम केले नाही. अमक्याने दुस-याचे काम केले अशी माहिती देत आहेत. मान मिळत नसतो आपल्या कृतीने तो मान मिळतो. जे झाले ते गंगेला मिळाले. झाले गेले विसरून आता आपल्याला सर्वांना नव्याने कामाला लागावे लागणार आहे. मी लवकरच पक्षीय संघटनेत फेरबदल करीत आहे. त्यानुसार पक्षाने ज्याच्यावर जी जबाबदारी दिली त्याच्या चौकटीतच त्याने काम करावे लागेल. आपले काम सोडून इतर कामांत हस्तक्षेप केल्यास पक्षाबाहेर जाल. मागील काळात अनेकांनी बेशिस्तपणा केला तो खपवून घेतला. पण यापुढे बेशिस्तपणा मला चालणार नाही अशा इशारा राज यांनी नेते, पदाधिका-यांना दिला.
राज पुढे म्हणाले, आपल्याला लोकांनी स्वीकारले नसले तरी लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. यात आपण खरे उतरतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे. अनेक लोक भेटले. ते म्हणाले राज आम्हाला तुमचे पटते पण तुमचे नेते नीट वागत नाहीत. आता आपल्याला लोकांच्या काय अपेक्षा आहेत त्यानुसार काम करावे लागेल. वह्या वाटप, फळे वाटप यापलीकडे विचार करावा लागेल. लोकांशी संपर्क ठेवून त्यांच्याशी जवळीक जपली पाहिजे. माणुसकी दाखवली पाहिजे. मनसेचे पदाधिकारी म्हणून काम करू नका. एक सामान्य म्हणून लोकांमध्ये मिसळा, मनाला समाधान मिळावे यासाठी काम करा. लोकांची मने जिंका. निकालासाठी, विजयासाठी व मतांसाठी काम करू नका. आपल्यापासून लोक दूर गेले नाहीत, तर आपण लोकांच्या जवळ राहिलेलो नाही असा त्याचा अर्थ आहे हे समजून घ्या. चांगले काम केले की लोक आपोआप दखल घेतील. प्रकाश आमटे, बाबा आमटे यांची लोक दखल घेतातच ना असे सांगत यापुढे मनसेच्या महाराष्ट्रातील एकाही पदाधिका-यांने आपल्या वाढदिवसाचे होर्डिंग लावू नये. तसे झाल्यास तो पदाधिकारी दुस-या दिवशी पक्षातून बाहेर गेलेला असेल असेही राज यांनी सांगितले.