राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे ,महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव व राज ठाकरे हे दोघे बंधू नक्कीच एकत्र येतील असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. नाना पाटेकर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा ते बोलत होते.आपण राजकारणात जाणार नाही. कारण तो आपला प्रांत नाही. कॅमेरा आपला प्रांत आहे. मात्र, कोणी जर मला राज्यसभेत पाठवले तर मी जरूर संसदेत जाईन. ज्याने मला पाठवले त्याच्यापेक्षा तेथे मी माझे विचार मांडेन असेही नानाने सांगितले
नाना पाटेकर म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे. पण ते एकत्र येत नव्हते. पण सध्या जी राजकीय स्थिती तयार झाली आहे त्यामुळे ते एकत्र येतील असे मला 100 टक्के नव्हे तर 300 टक्के वाटते. राज आणि उद्धव यांच्यात कोण ऐकत नाही याविषयी नानांना छेडले असता बिनधास्त नाना म्हणाले, दोघेही समंजस आहेत. पण त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. या दोघांतील कोण ऐकत नाही हे सांगणे कठीण आहे, कारण ऐकतील ते ठाकरे कसले? असा फटकेबाजी नानाने केली. सेना-भाजप युती तुटू नये असे मला वाटत नव्हते. आघाडीही तुटायला नको होती. कारण यात सर्वांचे नुकसान होणार आहे. युती, आघाडीच्या वेळी मतदान कोणाला करायचे ते ठरवता यायचे आता सर्वच जण मैदानात असल्याने कोणाला शिक्का मारावा ते कळत नाहीये असा त्रागा नाना यांनी व्यक्त केली.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना मत देऊ नका मग तो कोणत्याही का पक्षाचा असेना असे आवाहन करताना नाना म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी एक समाजातील एक सामान्य माणूस आहे. पण मला शरद पवार, बाळासाहेब ठाकरे व बड्या लोकांवर टीका केली पटत नाही. सध्या सामान्यांवर खूप बंधनं आहेत मात्र ती राजकारण्यावर आहेत. आपण राजकारणात जाणार नाही. कारण तो आपला प्रांत नाही. कॅमेरा आपला प्रांत आहे. मात्र, कोणी जर मला राज्यसभेत पाठवले तर मी जरूर संसदेत जाईन. ज्याने मला पाठवले त्याच्यापेक्षा तेथे मी माझे विचार मांडेन. पण मला सर्वांनी भरभरून दिले आहे आता मी त्यांना देण्याची वेळ आली आहे, असेही नानांनी सांगितले.