नवी दिल्ली -दिल्लीचे राज्यपाल हे भाजपचे एजंट असून राष्ट्रपती राजवट म्हणजे मागच्या दाराने राज्यपालांमार्फत भाजपचेच सरकार असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे . भाजपचेच दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राज्याचे राज्यपाल नजीब जंग हे ‘भाजपचे एजंट’ असल्याचाआरोप केला आहे. दिल्लीचे राज्यपाल मागच्या दाराने भाजपचं सरकार चालवत आहेत. घटनेचं पालन न करता भाजपचे एजंट असल्यासारखेच ते वागत आहेत, असे विधान केजरीवाल यांनी केलं आहे.
दिल्लीत गेले पाच महिने राष्ट्रपती राजवट असल्याने सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे राज्यपाल आणि केंद्र सरकारला मंगळवारी खरमरीत शब्दांत फटकारले होते. त्यानंतर राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीत सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने आपण भाजपसह सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसात सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी नमूद केलंय. पण . ‘येत्या काही दिवसांत बैठक कशासाठी?, ‘राज्यपालांनी आजच सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय घेऊन गुरुवारी सुप्रीम कोर्टात त्याबाबत माहिती द्यावी’, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.