‘सगळ्यांचा हिशोब होणार, मूळ मालक शेतकरीच’; ‘मुळशी पॅटर्न २’ची कथा की राजकीय इशारा, चर्चांना उधाण
पुणे : अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुळशीतील प्रस्तावित रिंगरोड परिसरातील शेतजमिनींबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवली आहे. मागील पाच वर्षांत रिंगरोडच्या आजूबाजूच्या शेतजमिनी कोणी लाटल्या, असा सवाल उपस्थित करत त्यांनी “सगळ्यांचा हिशोब होणार” असा इशारा दिला आहे.
प्रवीण तरडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुळशीमध्ये रिंगरोड आला; पण मागच्या पाच वर्षांत रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी-कोणी लाटल्या… सगळ्यांचा हिशोब होणार… मूळ मालक शेतकरीच!”
या पोस्टसोबत त्यांनी, “आता मोठे-मोठे अंगावर येतील; पण पर्याय नाही. शेवटी मुळशीकर आहे, बोलावं तर लागणारच,” असेही नमूद केले आहे. त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेतलेले नसले, तरी त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

‘मुळशी पॅटर्न २’ची पार्श्वभूमी?
तरडे यांच्या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी हा विषय आगामी ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपटाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काहींनी ही पोस्ट राजकीय स्वरूपाची असल्याचा अंदाजही व्यक्त केला. मात्र, या पोस्टमागील नेमका संदर्भ प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलेला नाही.
पोस्ट प्रसिद्ध होताच त्यावर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांचे समर्थन केले; तर काही चाहत्यांनी ‘मुळशी पॅटर्न २’बाबत उत्सुकता व्यक्त केली.
घरांचे भाव इतके महाग का झाले?
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांबाबत भाष्य केले होते. ‘देऊळ बंद २’नंतर ‘मुळशी पॅटर्न २’कडे वळण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पहिल्या ‘मुळशी पॅटर्न’मधून शेती विकायची नसते, ती जपायची असते, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या भागात सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
“तुझ्या-माझ्या घराचे स्वप्न इतके महाग का झाले?” या प्रश्नाचे उत्तर चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी मुलाखतीत नमूद केले होते.
प्रवीण तरडे यांच्या ताज्या पोस्टचा संबंध आगामी चित्रपटाच्या कथेशी आहे की त्यांनी मुळशी परिसरातील जमीन व्यवहारांवर गंभीर भाष्य केले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या पोस्टमुळे मुळशीतील रिंगरोड आणि परिसरातील शेतजमिनींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

