आमची मुंबई – शिवसेनेची मुंबई अशा ब्रीदावल्या शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतील ;पण ज्या आजतागायत संस्मरणीय मानल्या जात आहेत अशी मुंबई आता कोणाची ? शिवसेनेची कि भाजपाची ? कि अन्य सर्वपक्षीयांची ? असे प्रश्न राजकीय समीक्षकांच्या मनात घोंगावू लागले आहेत .
मुंबईतील 36 पैकी 13 विधानसभा मतदारसंघात गुजराती मतदारांचे वर्चस्व आहे, मुंबईतील सुमारे ३५ लाख गुजराती समाजाच्या लोकसंख्येत १५ लाख मतदार आहेत . भाजप पक्ष आता गुजरातचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हाती गेल्याचे मानले जाते . आणि भाजप आता शिवसेनेसोबत राहिलेला नाही या पार्श्वभूमीवर या मतदारांना आता भाजप – सेना – मनसे – काँग्रेस – राष्ट्रवादी असे पर्याय खुले आहेत हे सारे एकगठ्ठा मतदान असेल कि यातही विभागणी असेल याकडे आता राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून राहणार आहे त्यामुळे मुंबई आता बहुमताने कोणी एकटाच राजकीय पक्ष जिंकणार कि मुंबईच विविध पक्षांना सामावून घेणार ?हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे . अर्थात कोणत्याही एका किंवा अनेक पक्षाच्या नेतृत्वाखाली मुंबई त विधानसभेचे चित्र झळकले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिबिंब असेल असे मानले जात आहे .
मुंबईत एकून विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. 36 जागांवर एकून 520 उमेदवार उभे राहिले आहेत. यात मुंबई शहरात मोडणा-या 10 विधानसभा मतदारसंघात एकून 139 उमेदवार उभे आहेत. तर, मुंबई पश्चिम व पूर्व उपनगरातील 26 जागांवर 381 उमेदवार रिंगणात आहेत. दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड-पश्चिम, गोरेगाव, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर-पूर्व, घाटकोपर-पश्चिम, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या 13 मतदारसंघात गुजराती मतदार निर्णायंक भूमिका बजावतील
बोरीवलीतून विनोद तावडे (भाजपा), अशोक सूत्राले (काँग्रेस), बलबीर सिंह (राष्ट्रवादी), उत्तमप्रकाश अग्रवाल (शिवसेना) आणि नयन कदम (मनसे) उभे आहेत.
विलेपार्लेमधून काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे, माजी नगरसेवक पराग आळवणी (भाजपा), शशिकांत पाटकर (शिवसेना) आणि सुहास शिंदे (मनसे) हे नशिब अजमावत आहेत.
घाटकोपर-पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश मेहता (भाजपा), प्रविण छेड़ा (काँग्रेस), राखी जाधव (राष्ट्रवादी), जगदीश चौधरी (शिवसेना) आणि सतिश नारकर (मनसे) आदी उमेदवार आहेत.
घाटकोपर-पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार राम कदम (भाजपा), सुधीर मोरे (शिवसेना), दिलीप लांडे (मनसे), हारुन खान (राष्ट्रवादी) आणि रामगोविंद यादव (काँग्रेस) मैदानात आहेत.दहिसरमध्ये विद्यमान आमदार विनोद घोसाळकर (शिवसेना), नगरसेविका शीतल म्हात्रे (काँग्रेस), नगरसेविका मनीषा चौधरी (भाजपा), पूर्व महापौर डॉ. शुभा राऊळ (मनसे) आणि हरिश शेट्टी (राष्ट्रवादी) निवडणूक लढवित आहेत.
मुंबईतील मराठी मतदारांमध्ये सुरुवातीच्या काळात शिवसेनेबद्दल मोठ्या प्रमाणावर सहानुभूती तयार झाली होती. आजही ही सहानुभूती मोठ्या प्रमाणावर टिकून असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर काही प्रमाणात तरी मराठी मतदार भाजपकडे वळतील, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मराठी मतदार किती मोठ्या संख्येने भाजपकडे वळतात, यावर बरेच गणित अवलंबून असेल. तसेच मराठी मतांमध्ये मनसेचा वाटा राहणारच असल्यामुळे शिवसेनेला एक गठ्ठा मराठी मते पडतील का, असा सवाल भाजपचे नेते करत आहेत. याउलट गुजराती मतदार मात्र एकसंधपणे भाजपच्या बाजूने उभा असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे.
प्रत्येक मतदारसंघात ३० ते ४० टक्के मराठी मतांचा वाटा असल्याने मुंबईतील सर्वत्रच शिवसेना विरुद्ध इतर असाच सामना पाहण्यास मिळू शकतो, असे ज्येष्ठ सेना नेत्यांचे म्हणणे आहे. मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम मोदींचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांनीच केल्यामुळे त्यांच्या आवाहनालाही मराठी मतदार भूलणार नाहीत, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान युती तुटल्याने मराठी-अमराठी मतांचे विभाजन होईल, असे चित्र उभे केले जात आहे. पण मुंबईसह राज्यातील अमराठीही मोठ्या संख्येने शिवसेनेसोबत आहेत. . महाराष्ट्राचे सरकार दिल्लीतून नाही राज्यातून चालेल, असे शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी रत्नागिरी मध्ये म्हटले आहे . रत्नागिरीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, भाजपने महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न बाळगून युती तोडली आहे. पण त्यांचे हे स्वप्न शिवसेना कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.
भाजपने युती का तोडली, कोणासाठी तोडली याची उत्तरे महाराष्ट्राला मिळायलाच हवीत. ती जो पर्यंत मिळणार नाहीत, तोपर्यंत पुन्हा युती होणार नाही. २५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले.