भाजपला सर्वाधिक 123 जागा/शिवसेनेला 63 /काँग्रेस 42 /राष्ट्रवादी 41/ मनसे -01
मुंबई – विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले असून, भाजपला सर्वाधिक 123 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांची गरज असून, भाजपला आणखी 22 जागांची गरज आहे. शिवसेनेला 63जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेस 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळत नाही, असे दिसत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी, महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे यासाठी पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीने त्यांची ही भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने आपणहून पाठिंबा जाहीर केल्याने भाजप त्याचा स्विकार करणार का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनने प्रचारादरम्यान भाजपवर जहरी टीका केली होती. त्याने भाजप दुःखावल्याचे त्यांच्या अनेक नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ शकते, असे विश्लेषकांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे, त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, ‘केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभारी आहोत.’ दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात कोणताच पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही असे दिसत असल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी बाहेरुन पाठिंबा देण्याचे काही वेळापूर्वीच घोषित केले होते. त्यावर स्पष्ट उत्तर देण्याचे शहा यांनी टाळले आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे ठामपणे त्यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत असलेली 25 वर्षांपासूनची युती आम्ही तोडली नाही, असे ते वारंवार सांगत होते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सेनेची मदत घेणार का, या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. युतीच्या काळात भाजप राज्यात 119 जागा लढत होता. केवळ तीन जागांवरुन युती तुटली आणि आम्ही बहुतेक सर्व जागा लढल्या आणि 123 पर्यंत जागांवर आज यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 2009 मध्ये भाजपला 14 टक्के मते मिळाली होती, ती यंदा दुप्पट, अर्थात 28 टक्क्यांच्या जवळपास गेली असल्याचे शहांनी सांगितले.