पुणे – “”राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. पक्षाच्या कार्यासाठी नव्हे; त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावे व चहापानावरील बहिष्कार मागे घ्यावा,‘‘ असे आवाहन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केले. नागपूरमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांतर्फे विरोधी पक्षांसाठी रविवारी चहापानाचा कार्यक्रम आहे. परंतु, दिल्लीला जायचे असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
या पार्श्वभूमीवर बापट म्हणाले, “”दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद बोलाविली आहे. हा कार्यक्रम पूर्वनियोजीत आहे. त्यात राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी फडणवीस यांना तेथे जाणे क्रमप्राप्त आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे परिषदेचा कालावधी बदलणे शक्य नाही. त्यामुळे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकू नये.‘‘
या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पुण्यात बोलताना फडणवीस यांच्यावर टीका करताना, सत्तेची धुंदी चढली आहे, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेत बापट म्हणाले, “”सत्तेची धुंदी कोणाला चढली होती व जनतेने कोणाची धुंदी उतरविली आहे, हे सर्वज्ञात आहे. मुख्यमंत्री परिषदेला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस जात आहेत. भाजपमधील कोणत्याही नेत्यांना सत्तेची धुंदी नाही व भविष्यातही ती राहणार नाही.‘‘