नवी दिल्ली – भारतातील दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान करीत असून, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यालाही त्यांनी आश्रय दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर दाऊद सध्या राहात आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी (ता.22) सांगितले.
राजनाथसिंह म्हणाले, “भारताला पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र, मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची त्यांची तयारी दिसत नाही. भारतातील दहशतवाद पाकिस्तानातून जन्माला आलेला आहे. तो पाकिस्तान पुरस्कृत आहे. पाकिस्तानमधील घटक भारतातील दहशतवादात सहभागी नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यांची “आयएसआय‘ ही यंत्रणा दहशतवाद पसरवीत असून, ती काय पाकिस्तानाच्या बाहेरील आहे काय? मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तेथे सुरू असलेल्या खटल्याची सुनावणीही अतिशय संथ गतीने सुरू आहे. पाकिस्तान न्यायिक प्रक्रियेत मदत करीत नसून, जाणीवपूर्वक यातील तथ्य बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.‘
“दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात राहत आहे. अनेकवेळा भारताने विनंती करूनही त्यांनी दाऊदला भारताकडे सोपविलेले नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष भारतात आले त्या वेळी दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची विनंती आपल्या पंतप्रधानांनी केली होती. यासाठी पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर दबाव आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. दाऊद सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर राहात आहे,‘ असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
“भारताला पाकिस्तानच नव्हे, तर सर्व शेजारी देश आणि जगातील अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तानकडूनही मैत्रीचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यांनी कमीतकमी मैत्रीपूर्ण बोलण्याची जबाबदारी तरी पार पाडावी. चर्चेच्या प्रक्रियेबाबत ते काय भूमिका घेतात यावर ती सुरू होणे अवलंबून असेल. त्यांच्याकडून मैत्रीची भावना अपेक्षित असून, नजीकच्या काळात यात सुधारणा होईल, अशी मला आशा आहे,‘ असे त्यांनी नमूद केले. दाऊद इब्राहिम याला भारतात परत आणण्यासाठी एखादी मोहीम आखणार आहात का? या प्रश्नावर बोलताना राजनाथसिंह म्हणाले, “आम्हाला थोडा वेळ द्या आणि काही काळ वाट पाहा. सामरिक बाबी अशा उघड करता येत नाहीत. पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर दबाव आणून दाऊदला लवकरात लवकर भारताच्या हवाली करावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.‘
मोदी सरकारवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाबद्दल विचारले असता राजनाथसिंह म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बाह्य शक्ती नाही. मी स्वतः या संघटनेतून आलो आहे.