राज्य चित्रपट पुरस्कारात खणखणीत मोहोर उमटविणा या साची एण्टरटेनमेंट निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शीत “नागरिक” चित्रपटाला “प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५“ची तब्बल १४ नामांकने मिळाली आहेत. राजकारण आणि पत्रकारिता यातील संघर्ष आणि सर्वसामान्य जनता यावर आधारित असणारा हा चित्रपट येत्या १२ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये ‘सर्वात्कृष्ट सामाजिक चित्रपट’ठरलेला “नागरिक” हा चित्रपट कवि महेश केळुसकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी त्याला आकार दिला असून ‘प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५’ने उत्कृष्ट चित्रपटा सोबतच तब्बल १४ नामांकने देण्यात आली आहेत.
‘प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५’ने दिलेली नामांकने पुढीलप्रमाणे आहेत. उत्कृष्ट चित्रपट(साची एण्टरटेनमेंट), उत्कृष्ट दिग्दर्शक(जयप्रद देसाई), उत्कृष्ट कथा(महेश केळुसकर), उत्कृष्ट पटकथा(जयप्रद देसाई, महेश केळुसकर), उत्कृष्ट संवाद(महेश केळुसकर), उत्कृष्ट पाश्र्वसंगीत(टब्बी – परेख), उत्कृष्ट रंगभूषा(विक्रम गायकवाड), उत्कृष्ट कला दिग्दर्शक(सुकांत पाणीग्रही), उत्कृष्ट छायाचित्रण(देवेंद्र गोलतकर), उत्कृष्ट संकलन(गोरक्षनाथ खांडे), उत्कृष्ट ध्वनी संयोजन(रसुल पोकुट्टी व अमृत प्रीतम), उत्कृष्ट खलनायक (मिलिंद सोमण), उत्कृष्ट अभिनेता (सचिन खेडेकर) आणि उत्कृष्ट अभिनेत्री (देविका दफ्तरदार).
सर्वसामान्य पत्रकार श्याम जगदाळे अर्थात कथानायक सचिन खेडेकर आणि राजकारणी विकास पाटील अर्थात मिलिंद सोमण यांची जबरदस्त जुगलबंदी आणि त्याबरोबरच टिपिकल राजकारणी माणिकराव भोसलेच्या भूमिकेत नटश्रेष्ठ दिलिप प्रभावळकर यांनी ओतलेला प्राण, समाजवादी कार्यकर्ती नीलिमातार्इंच्या भूमिकेत नीना कुळकर्णी, नायिकेच्या भूमिकेत देविका दप्तरदार, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा, राजकुमार तांगडे, नितीन भजन या कलाकारांनी या चित्रकथेत रंग भरले आहेतच. पण त्याचबरोबर आणखी एक आकर्षण म्हणजे या चित्रपटात ‘श्रीराम लागू’यांनी ‘नाना चिटणीस’ नावाचा बुजुर्ग तसेच अनुभवी राजकारणी रंगविला असून त्यांची ही पूर्ण लांबीची भूमिका बऱ्याच दिवसांनी रसिकांना पहायला मिळणार आहे. त्यांच्या साथीला सुलभा देशपांडे या ज्येष्ठ अभिनेत्रीनेही ‘नागरिक’मध्ये भूमिका रंगवली आहे.
“नागरिक” मधील ‘शाहिरी’हे देखील वेगळे आकर्षण असून शाहीर संभाजी भगत यांच्या स्वतंत्र भूमिकेच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना मांडणाऱ्या शाहिरीने चित्रपटात वेगळेपणा आणला आहे. गीतलेखन संभाजी भगत आणि चंद्रशेखर सानेकर यांनी केले असून संगीत रचना व पाश्र्वसंगीत टब्बी – परीक यांचे आहे. पाश्र्वगायन संभाजी भगत यांच्यासोबत आजचे आघाडीचे गायक सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन यांनी केले आहे. या चित्रपटाचे ध्वनी संयोजन ऑस्कर विजेते रसुल पोकट्टी यांचे असून प्रॉडक्शन डिझाईनचा भार सुकांत पाणीग्रही यांनी उचलला आहे. वेशभूषा ऑस्कर विजेत्या भानू अथय्या यांच्या साथीने पौर्णिमा ओक यांनी केली आहे.