पुण्यातील गुरुवार पेठेत प्रसिद्ध असलेल्या भागीरथी चाळीत सध्या ‘चिडिया’ या आगामी हिंदी चित्रपटाचे जोरदार चित्रीकरण करण्यात येत आहे. या चित्रीकरणात प्रसिद्ध अभिनेते विनय पाठक, अमृता सुभाष, संदीप पाठक, इनामुल हक, ब्रिजेंद्र काला यांच्याबरोबरच चाळीतील नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे. ‘की मिडिया वर्क्स’ या संस्थेतर्फे निर्मिती होत असलेल्या ‘चिडिया’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मेहरान अमरोही असून पुण्यातील तरुण उद्योजक सुधीर-कोलते पाटील हे निर्माते आहेत.
‘चिडिया’ चित्रपटात दोन लहान गरीब मुलांच्या स्वप्नांची भावपूर्ण कहाणी असून ही कहाणी पुण्यातील भागीरथी चाळीत चित्रित करण्यात आल्यामुळे ती आणखी वास्तववादी आणि परिणामकारक ठरली आहे असे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मेहरान अमरोही यांनी सांगितले. या कहाणीला मराठीचा बाज असून ती प्रभावशाली होण्यासाठी आम्ही अनेक लोकेशन्स धुंडाळली आणि जेंव्हा आम्हाला ‘भागीरथी चाळ’ मिळाली तेंव्हा हेच चित्रीकरणाचे योग्य स्थळ आहे याची खात्री पटली असे सांगून मेहरान अमरोही म्हणाले, चित्रपटाचे ऐंशी टक्के चित्रीकरण याच चाळीत झाले असून या चाळीतील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळेच हा चित्रपट चांगला होणार आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे अभिनेते विनय पाठक म्हणाले, माझी व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे व स्क्रीप्ट वाचूनच मी भूमिका स्वीकारली आहे. मी या चित्रपटात मुलांच्या काकाची भूमिका केली असून ती मराठी व्यक्तिरेखा असल्यामुळे मी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रीकरण संपेपर्यत मला बऱ्यापैकी मराठी आलेले असेल असा विश्वासशी त्यांनी यावेळी व्यक्त केला. कैमेरामन आणि दिग्दर्शकासह अनेक जण नवीन असले तरी चित्रिकरणादरम्यान तशी जाणीव कधीही झाली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले. अभिनेते संदीप पाठक म्हणाले, चाळीतील एका अस्वस्थ आणि तुसड्या माणसाची व्यक्तिरेखा मी साकारात आहे. या चित्रपटात माझ्यावर एक गाणेही चित्रित करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.
या चित्रपटाची कथा मेहरान अमरोही यांची असून पटकथा लेखन अमिताभ वर्मा आणि अमरोही यांनी केले आहे तर संवाद अंबर गणेश आणि अमरोही यांनी लिहिले आहेत. विकास जोशी यांनी छायांकन केले असून मेहरान अमरोही आणि जितेंद्र जोशी यांच्या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीताला प्राधान्य देणारी एकूण चार गाणी चित्रपटात आहे असे मेहरान अमरोही यांनी सांगितले.
या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत भाग घेवून निर्माते सुधीर कोलते-पाटील हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून या चित्रपटात स्थानिक मराठी कलाकारांनी मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.